Skip to main content

बोगदा

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 14/10/2014 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद? पण आता हे सांगणार तरी कोण?) वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय... (बहुतेक माझी एमाराय चाललीये ! अजिबातच हालता येत नाहीये) ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ? (एमाराय कुणी करायला सांगितली होती बरं?) ..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ? ( `ऐकावे डॉक्टरचे आणि करावे मनाचे' हेच खरं!) माझी वाट चुकली आहे का ? (यालाच `वाट लागली' म्हणतात का? पण आता `वाट पाहाण्याशिवाय' हातात काये ?) किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे... (पुन्हा तोच प्रश्न डोळे उघडेत का बंद? आणि ते सुद्धा कोण ठरवणार, मी की बोगदा?) ....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ? कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ? (हल्ली पेशंटला एमारायमधे बासरी ऐकवतात असं दिसतंय!) कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ... फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ? (का मीच तो? आयला, काय लफडा आहे हा? `मी' तू आहेस की `तू' मी आहेस? कोण कुणाशी बोलतंय?) अन इथे कसा अवचित समोर आलास ? (तू समोरून आलास का मागून हा खरा प्रश्न आहे! ....पण तो नंतर सोडवू.) ...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो.. ..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...! (अरे, आता आलं लक्षात तू आदी उर्फ अ‍ॅडी (किराणावाला)! आणि मी आँटी!) हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..! (येस, अ‍ॅड्या वाणी! कडकीत सुद्धा वाणसामान देणारा आणि मला शुद्ध डालडा देणारा तो तूच!) ..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा, विजेसारख्या क्षुल्लक गोष्टीचे बील थकले होते तेव्हा, तूच ना नवा मार्ग सुचवलास ? (`आज उधार उद्या रोख' हाच तो वाणसामानाचा मार्ग आणि शेजार्‍याकडून टेंपरवारी कनेक्शन घेऊन घर उजळवून टाकलं होतस, आठवतंय?) ..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे. ...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे.. (आता तरी बीलं भरु का नको? चालललंय ते काय वाईट आहे?) पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने... (ज्ञानीजनांनी पूर्वीच सांगितलंय `नाईलाज को क्या इलाज? आणि सिनियर सिटिझन्स म्हणतात ते, `कर्म माझं!' म्हणजे हेच असावं) निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले. (आयला, संपतेयं का नाही ही एमाराय?) होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं (अरे, गॅस कोण फुकटात देणार? तिथे पैशाची आहुती द्यावीच लागली) कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित.. (म्हणजे बीलं थकवायची मी आणि परिणाम मात्र `एकत्रित'! दैवी चमत्कार म्हणतात तो हाच) या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ? (तू बोगद्यात आहेस का बाहेर? आणि एकावेळी दोघांचा एमाराय कसा चालूये?) ..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...! (बील वाढलं की काय?) ...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ? (छे, छे, रामराया, सोडव रे या हिवतापातून) पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे ! (जन्म घेतला का दिला? हातपाय हालायचे थांबून आता, डोक्यात विचारांना सुद्धा हालायला जागा राहिली नाही. टोटल ज्याम!) आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं. .( अ‍ॅडया, गैरसमज नको बरं, `आत्मन' म्हणजे संस्कृतमधे `ग्रोसर', ज्याच्याशिवाय `आत्मा चालत नाही' तो) आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे. (एमारायच्या पाईपात ही बिसलेरीची बाटली कुठून आली?) अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी ! (आयचा घो, जीवाला शिवायचा अनुभव यावा म्हणून मला या पाईपात घातलं?) अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ? (त्यापेक्षा साईडनं पाईप खोल!) पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने ! (लावा रे कुणी तरी लाईट लावा!) .....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले ! (मायला, आणि पुन्हा नवा बोगदा लागला!) ______________________________ (मूळ बोगदा इथूनच साभार!)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23840
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

विडंबनाचं सध्या बाजूला राहू दे, वास्तविकता अशीये. एकतर बोगदा एक्स्पिरियन्ससाठी व्यक्ती कोण वणवण करते. त्यात असा अनुभव `जाहीर' केल्यावर, इतरेजन बावचळून जातात. `आपल्याला केव्हा दिसणार बोगदा?' म्हणजे एकतर बोगदावाली व्यक्ती मानसिक टनेलमधे सापडलेली असते. तो अनुभव म्हणजे भ्रम असतो, कारण सत्य समोर आहे, ती क्लॅरिटीये, व्यापकता आहे, बोगदा नाही. मग दुनिया, बोगदा एक्स्पिरियन्सवाल्या व्यक्तीकडे `पोहोचलेली' म्हणून बघायला लागते. `तुला बासरी ऐकू येतेयं? सिंप्ली ग्रेट! आता टनेलच्या त्या एंडला उभा असलेला `तो' भेटणार! खरं तर कसली बासरी आणि कसलं काय, मायला सगळे कल्पनेचे खेळ. इकडून तिकडून काहीबाही वाचलेलं, निरुद्योगी डोक्यात फिरत असतं, त्यातनं नाही नाही ते भास व्हायला लागतात. पण आता बोगदावाली मागे हटू म्हणता हटू शकत नाही कारण बाकीचे तिला पुढे ढकलत राहातात. असा हा भंपक सोहळा उत्तरोत्तर रंगत जातो. मग कुणी म्हणतं `कसा दिसतोयं तो कृष्णसखा?' की ही सुरु! कल्पनेला अंत नाही. मग `सुगंध' वगैरे यायला लागतात, `प्रकाश' दिसायला लागतो. ही खरं तर बाकीच्या सेंसरीज बाद होत चालल्याची लक्षणं असतात पण या `विद्वानांच्या' भाऊगर्दीत कोण कुणाला समजावणार? तस्मात `कधी संपणार हा बोगदा ?' हा प्रश्न उपमर्दकारक ठरतो. तर अशी ही विद्वजनांची मांदियाळी आणि त्यांचे खुळे बोगदे!

In reply to by संजय क्षीरसागर

स्वत: च्या ललित लेखाबद्दल स्वतःलाच येक्षप्लेशन द्यावे लागावे यासारखे खेदकारक काही नाही, विषय चांगला पण , लांबण जास्त झाली....त्यामुळे एक तर विमान डोक्यावरून च नव्हे तर आकांशगंगेच्या बाहेरून गेलयं , त्यात मग कंस ही भरुन पावलेत. लेखन सरल असते तर वेगळे नक्की वाटले असते . ( बाकी तेच, निंदा, परखड परीक्षण, गांभीर्य ई.ई. ) हे उदाहरणादाखल, कल्लोळ तर दाखवायचा पण सरल आणि संयत भाषेत :) http://misalpav.com/node/12078

In reply to by सुहास..

आता लेखच इतका दीर्घ आहे म्हटल्यावर (जवळजवळ) सगळे मुद्दे कव्हर करणं आलं. जेपींना स्पष्टीकरण दिलेलं नाही, फॅक्ट सांगितलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

आला आला ! सुगंध आला एकदाचा. तरी म्हंटल अजुन खुळा हा शब्द कसा आला नाही. आता त्यांचे खुळे बोगदे म्हणजे माझा शाना बोगदा नाय का?

तुम्ही दुखावलेले आहात का ? आर यु डीपली हर्ट ?

In reply to by मारवा

आजवर आंजावर बघितलेलं अत्यंत सार्थ असं सदस्यनाम.

In reply to by मारवा

जे लिहितो तो अनुभव असतो. दुसर्‍याचा अनुभव आणखी सघन असेल तर तो आपलासा करण्यात आनंद वाटतो (पाहा: `ती गेली तेंव्हा रिमझिम' वरचे तुमचे आणि माझे एक्सचेंजेस). आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिंदगी अनेकानेक बाजूंनी रंगीन केलीये. संगीत, वैवाहिक आयुष्य, आपत्य संगोपन, आप्तांशी नाते-संबंध, सचोटीची व्यावसायिक कारकिर्द, निर्धास्त सांपत्तिक स्थिती, आणि त्याच्या जोडीला आध्यात्म, कविता, ललित साहित्य, योगा, प्राणायम, खेळ, दोस्त लोक...आणखी काय हवं?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय जी मग माझा गैरसमज झाला कदाचित. मला वाटल तस की तुम्ही कुठेतरी दुखावलाय म्हणुन विचारल इतकचं.

या रसग्रहणाचा एक महत्वाचा पैलू कोणाही प्रतिसादकाच्या लक्षात आलेला दिसत नाही. ते म्हणजे "प्रगाढ" आणि "दीर्घकालीन" अभ्यास!!" मूळ लेख १३/३/२०१३ ला प्रसिद्ध झाला आणि हे रसग्रहण झाले १४/१०/२०१४ ला, म्हणजे तब्बल एकोणीस महिन्यांच्या अभ्यास आणि चिंतनानंतर. मलासुद्धा माझ्या व्यासंगपूर्ण अभ्यासांतीच हे लक्षात आले. .

आजवर मिपावर कधीच न केलेली गोष्ट आज करावी लागतेय, स्वत:च्या लेखाचा अर्थ सांगणे. इथे सर्व लोक्स समजदार आहेत. पण काही विद्वान लोकांना अर्थ समजला नाही असे वाटते म्हणून हा प्रपंच. सदर लेख हा माझ्या ‘साक्षात्कार’ या लेखाचे विडंबन असावे असे वाटते. ‘साक्षात्कार’ हे एक रूपक असून चिवट मानवी आशेचे अन जिजीगीषेचे प्रातिनिधिक चित्रण आहे. जीवनात अपयश अपमान दु:ख अनंत वेळा अनुभवास येते. प्रियजनांचा मृत्यू, वियोग प्रतारणेचा धक्का, .. कित्येक क्षणी तर जीवन संपवावेसे वाटण्याइतके नैराश्य येते. सर्व काही संपले, फिरून या जीवनात जगण्यासारखे काहीच राहिले नाही असे वाटते. तरीही जीवन शिल्लक असतेच असते. आणि ते रेटताना विस्मय वाटावा अशी एक जीवनेच्छा, वठलेल्या खोडला अंकुर फुटावा तशी पुन्हा बहरून येत राहते. ती जीवनेच्छा कुठल्यातरी निमित्तमात्र प्रकाशाच्या कवडशाच्या आधाराने सरसरून येते. जीवन संपले तरी जीवनेच्छा अंकुरणे संपत नाही. आपणा सर्वांना आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आला असेलच. हीच थीम आहे या लेखाची. यात कुणाला काही अध्यात्मिक दिसावे याचे नवल वाटले. धन्यवाद.

In reply to by सस्नेह

जाऊ द्या हो ताई, फार मनाला लावून घेऊ नका. तुमच्या लेखाला ओढून ताणून कुणी अध्यात्माचा शिक्का मारत असेल तर जैसी जिसकी सोच. मला सिंह आणि कोकरू यांची गोष्ट आठवली. ज्यात "तू नाही तर तुझ्या बापाने माझेकडे येणारे पाणी उष्टे केले असेल" असे म्हणून कोकराचा जीव घेणारा सिंह आठवला. कुणाला स्पष्टीकरण द्यावे लागावे यासारखा मनस्ताप दुसरा नाही. पण एक बरे झाले तुम्ही त्या लेखामागची भावना स्पष्ट केली ते. मी त्यामागच्या भावनेशी जुळवून घेऊ शकलो आणि त्याचा मला आनंद झाला.

मी काय कुणाचं घोडं मारलेलं नाही. आणि तो स्वभावही नाही. नाय तुम्हि गाढव मारलय बहुधा, त्यामुळेच ते पुनर्जन्मात खंप्लिट निराकार होउन सगळा रस एका दमात ग्रहण करून अगदी विरस करून टाकते ;)