मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरा २

साऊ · · जनातलं, मनातलं
आणि मग, कुतुहल जागृत झालेली मी प्रत्येक तपशिल एखादा निसटता संदर्भ शोधायला लागले. आऊ ज्या घरात रहायची ते तिच सासर होतं. दोन भाऊ आणि एक म्हातारी आई. आऊची सासु ही आऊची सख्खी आत्या! आऊच्या भाषेत तिच्या सख्ख्या आत्यान तिचा गळा कापला होता! मामेआते भावंडाची लग्नं काही फार जगावेगळी नाही आहेत. तसच आऊला वयाच्या १२-१३व्या वर्षी लग्न करुन आणल गेल. नावासारखाच 'दगड' असलेल्या तिच्या मोठ्या आतेभावाला पुरुषाचे कपडे घालुन त्याच नसलेल पुरुषपण सिद्ध केल गेल. आपल्या मुलाबद्दल 'पुर्ण' कल्पना असलेल्या आंधळ्या माळिणीने, तिचा एकडोळा फुटका होता, आपल्या भावाचा घात केला होता. आपल्या पोराची 'पत' सांभाळण्यासाठी तिने कोवळ्या आऊवर काय काय अत्याचार केले असतील याची मला कल्पना नाही, पण आऊ नावासारखी प्रखर निघाली असावी. तिन सरळ सरळ बंड पुकारल्यावर तिच्या सासुन पुर्वापार चालत आलेला महाभारतातला डाव घातला अन गांधारीच्या स्वाभिमानान फडा काढुन उभारलेल्या आऊला पोर होत नाहित म्हणुन कुंती सारखी कावेबाज सवत आणली गेली. दगडुच 'पुरुषपण' दुपटीन सिद्ध झाल! आलेली सवत या घरातल्या सासुची वा धाकट्या दिराची कोणीच लागत नव्हती. जे सुख नवरा देउ शकत नव्हता, ते तिन राजरोस बाहेर शोधल. गावाची 'सोय' झाली अन दोन वर्षात तिला दिवसही गेले. स्त्रित्वात कणभरही उणिव नसणारी आऊ वांझ ठरवली गेली. आप्तस्वकियांकडुन झालेला छळ, मानहाणी ,अपमानास्पद सवत आणि आता समाजाकडुन वांझपणाचा ठपका ! सवतिला मुलगा झाला. इकडची सारी बारश्याला गेली. बारस करुन घरी पोहोचेपर्यंत मागुन माणुस आला. बाळ पाळण्यातच गेला होता. त्याच्या तोंडावर कोणितरी गोधडी ओढली होती. अस म्हणतात की शेवटी येताना आऊ पाळण्याकड गेली होती. त्या दिवशी आम्हाला नदीवर भेटलेला तो इसम आऊचा नवरा होता. गावात कधीही कुणातही न मिसळणारा, कोणत्याही कार्यक्रमात नसणारा, एक दिवाभितच ! आऊचा धाकटा दिर मात्र कायम आऊचा धाकटा भाउच राहिला. तीही त्याला हक्कान 'शिदु' म्हणुन हाक मारायची. त्याच्या मुलाबाळांच करायची. तिची जाउ तिला मान द्यायची. कधीतरी दुपारी घरात आईंच्याबरोबर बोलताना आऊचा संयम सुटला. आवेगान तिच्या डोळ्यातुन निखार्‍यातुन ठिणग्या उडाव्यात तसे अश्रु अक्षरशः उडत होते. बोलता बोलता ती म्हणाली," आत्या होउन तिने माझा गळा कापला , जन्मभराचा तळतळाट दिला, किडे पडतील तिला". आणि खरच महिन्याभरात उकळता हंडा उलटुन 'आंधळी माळीण' भाजली. वय आणि भाजलेल्या जखमा म्हणुन डॉकटरनी घरी न्यायला सांगितल. दोन महिन्यात आंधळी माळीण विव्हळुन विव्हळुन अन सरते शेवटी त्या भाजलेल्या जखमात किडे पडुन मेली. अक्षरशः शेवटची आंघोळ नाही घातली प्रेताला लोकांनी. आऊ खुपशी कोणात मिसळलेली मी पाहिली नाही. पण शेजारगावच्या एका मातब्बर पुरुषाबरोबर तिची उठबस वाढलेली मी ऐकली. खर विचाराल तर मला त्यात काहिच वावग वाटल नाही. 'ते' शरीरसुखही आऊला; मानाच नसल्यान फारस भावल नसणार याची खात्री आहे मला. भुरळ पडण्याजोग व्यक्तिमत्व असलेली, वागण्या बोलण्यात हुषार, चोख व्यवहारी अन स्वाभिमानी असलेली आऊ फक्त कपाळाच्या कुंकवाच्या दुबळेपणान अन नशिबाचे भोग म्हणुन की काय जन्मभर फरफट्त राहिली. हल्ली गावी गेल की आऊ गावावर नसते. तिच्या माहेरच्यांनी कायमच तिला त्यांच्या घरात जागा ठेवलेली. आऊ तिच्या भाच्याकड जास्त दिवस असते. तो ही तिला अतिशय मानान वागवतो. तिच्या सवतिला साधारण आमच्या वयाची ( पाच सहा वर्षान लहाण) मुलगी झाली. लग्नाचा पडलेला डाग सोसत , समाजाच्या चालीरितींनी भरडुन निघालेल्या आऊवरचा अन्याय, तिला फक्त एक स्त्री म्हणुन सोसावा लागला. पण तो सोसतानाही तिची झळाळी कुठेही कमी झाली नाही. अन मला तिच्याबद्दल असणारा आदर वा ममत्वाच हेच कारण असाव. समाप्त.

वाचने 2874 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पैसा 03/10/2013 - 10:04
प्राप्त परिस्थितीशी झगडून आऊने शक्य तो मार्ग शोधला. त्यातल्या त्यात कमी मानहानीचा. नीतिनियमांच्या चौकटीत तिला कोणी अन का बसवावं? तशी तर मला तिच्या सवतीचीही काही चूक वाटत नाही. तीही फसवणुकीची बळीच.

In reply to by प्यारे१

कारण लैगिकतेच्या नजरेतुन बघितले तर त्यात अयोग्य ते काय आहे बोआ ? अन तसही लैंगीकताच सोडली/दुर्लक्षिली तर स्त्रि अन पुरुषांत तुम्ही अजुन नक्कि कोणते भेद माणता बोआ ?

In reply to by प्यारे१

स्पंदना 08/10/2013 - 04:48
ऑ? मग आई वडिल लग्न कशाला लावुन देतात ब्वा? सासूला टाईमपास म्हणुन छळ करायला अन सासरघरची धुणी भांडी करायला? लिहीलेला संदर्भ काय ओळखीतून प्रेमविवाहाचा आहे? मी तुला जसा आहेस तसा स्विकारते म्हणायला?

प्यारे१ 08/10/2013 - 13:45
@अग्निकोल्हा, अपर्णा, माझं म्हणणं, निव्वळ वय झालं म्हणून लग्न केलेल्या, कुठलीही जबाबदारीची जाणीव नसलेल्या, घरच्या घरी एक सुख मिळवण्याचं साधन म्हणून बायकोकडे बघणार्‍या कोणत्याही व्यक्तीला 'पुरुष' म्हणणारांना, मानणारांना नि मुळात त्या व्यक्तीला 'सलाम' असं आहे. टीपः सलाम हा शब्द आत्यंतिक चिडेनं वापरला आहे. कारण अशा व्यक्तिंमुळे आयुष्याचं मातेरं झालेल्या बायका घरासभोवती बघितल्या आहेत. त्यातही मानानं जगणार्‍या आहेत मात्र त्यांची परवड संपता संपत नाही. बघवत नाही.