मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य पंचविशी- २ -- गंधार

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गंधार पंचेन्द्रीयातील पहिले इंद्रिय आणि मानवाची आद्य संवेदना म्हणजे घ्राणेन्द्रीय शक्ती सर्वात आदिम प्राणी म्हणजे अमिबा सारखा एक पेशीय प्राणी सुद्धा आपल्या पेशीच्या भिंतीतून झिरपणार्या अणुरेणु ची रासायनिक तपासणी करून आजूबाजूच्या वातावरणाची माहिती काढत असतात. मुळ वासाची शक्ती म्हणजे वेगवेगळ्या रसायनाची संवेदना मेंदूला देणे. हि शक्ती अंधारात उन्ह पावसात रात्री बेरात्री सुद्धा काम करीत असते आणि प्राणी मात्रांना सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करून देत असते. प्राण्यांच्या आहार निद्रा भय आणि मैथुन या चार मूलभूत अंतरप्रेरणा सुद्धा वासाच्या शक्तीवर अवलम्बून असतात. मानवी वास घेण्याचा अवयव म्हणजे नाकाच्या आत असलेले ग्रहण केन्द्र/ संवेदक. यावर जेंव्हा वासाचे अणु/ रेणू येउन चिकटतात तेंव्हा त्याचे कुलूप किल्लीने उघडल्या सारखे आतील संवेदक मेंदूकडे संवेदना पोहोचवितात. मानवाच्या नाकात दहा चौरस सेमी क्षेत्र या संवेदाकाचे असतात तर कुत्र्याच्या ते एकशे सत्तर चौसेमी असतात म्हणजेच मानवाच्या नाकात जर एक मेगा पिक्सेल कैमेरा असेल तर कुत्र्याच्या नाकात सतरा मेगापिक्सेल असतात म्हणूनच कुत्र्याची वास घेण्याची क्षमता इतकी जास्त असते. हे वासाचे रेणू जेंव्हा नाकाच्या संवेदकांवर येउन चिकटतात तेंव्हा ते तेथे आपली एक आकृती निर्माण करतात आणि हि आकृती जाणून घेण्याची आपल्या मेंदूची क्षमता अफाट असल्याने एकाच तर्हेच्या वासंमध्ये मानवाला फरक करता येतो म्हणजेच दोन गुलाबच्या फुलातील वासंध्ये मेंदू फरक करू शकतो. मूळ वासाची शक्ती माणसात कमी का झाली? प्रथम मानवाचे पूर्वज हातापायावर( दोन हात दोन पाय) यावर चालत होते तेंव्हा त्याला जमिनीलगत असलेले असंख्य वास येत होते आणि त्याचे पृथक्करण करण्यासाठी तेवढी जास्त घ्राणेन्द्रीय शक्ती लागत होती. एकदा माणूस ताठ उभा राहून चालू लागला तेंव्हा त्याची या असंख्य आणि नको असलेल्या वासापासून त्याची मुक्तता झाली त्याच बरोबर त्याचे डोळे उंचीवर पोहोचल्यावर त्याला अधिक दूरचे दिसू लागले आणि त्या दृष्टीचा अन्वयार्थ लावण्यासाठी लागत असलेला प्रगत मेंदू विकसित झाला त्यात त्याचे डोळे एकाच रेषेत आल्यामुळे दोन्ही डोळ्याने त्रिमित (३ डायमेन्शन)दृष्टी लाभली त्यामुळे मानवाला वासाची तेवढी आवश्यकता राहिली नाही. परंतु मानवाची वासाची शक्ती अजूनही तेवढी कमी झालेली नाही. फक्त आपण ती जेवढी आवश्यक तेवढीच वापरत आहोत(need based). त्यामुळे जर आपण ती वापरण्यास सुरुवात केली तर अतिशय आश्चर्य कारक रित्या आपल्याला तिचा वापर करता येतो. आपण सध्या सोप्या गोष्टी वापरत असतो तरीही त्या लक्षात घेत नाही. पेरू किंवा आंबा याचा वास घेऊन तो पिकला आहे कि नाही हे आपण सहज सांगू शकतो (पण प्रत्यक्ष किती लोक विकत घेण्याअगोदर आंब्याचा/ पेरूचा वास घेऊन पाहतात) दही/अन्नपदार्थ खराब झाला आहे हे सुद्धा सहज सांगता येते. वासाच्या शक्तीचा एक फार महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थांचा स्वाद घेणे. चव आणि स्वाद यात फरक काय? फक्त पाच चवी आहेत गोड आंबट खारट कडू आणि नवी चव म्हणजे उमामी (MSG किंवा मोनोसोडियम ग्लुतामेट ची चव). मग गुलाब जामून आणि काला जामून किंवा कलाकंद आणि कुंदा यांच्या चवीतील (खरंतर स्वादातील) फरक काय? जेंव्हा कोणतही पदार्थ आपण खातो तेंव्हा त्यातील मसाल्यात असलेल्या तेलाचे बशिभावन होते आणि ते आपल्या तोंडाच्या मागच्या भागातून उच्छवासाद्वारे नाकात शिरते आणि त्या पदार्थाच्या चवीबरोबरच त्याचा वास अशी संयुक्त आणि गुंतागुंतीची संवेदना मेंदूकडे जाते आणि आपल्याला स्वादाचा स्वर्गीय अनुभव मिळतो. मागे एका प्रतिसादात पेठकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे या स्वादाची एक प्रतिमा आपल्या मेंदूवर उमटते आणि परत आपण तो पदार्थ खाल्ला कि मेंदू हि नवी प्रतिमा त्या मूळ प्रतीमेबरोबर तुलना करून पाहतो आणि म्हणून आपल्याला सांगता येते को कोणता पदार्थ जास्त चांगला आहे/होता. म्हणूनच मिसळपाव वर जेंव्हा आपण पाककृती बरोबर त्याची छायाचित्रे पहातो तेन्व्हा ते आपल्याला जास्त भावते किंवा आपले पोट आरडा ओरडा करू लागते. वरिल कारणासाठीच आपल्याला सर्दी झाली कि चव लागते पण स्वाद येत नाही कारण त्या स्वादाची तेले आपल्या घ्राणेन्द्रीयांपर्यंत पोहोचत नाहीत आणि उत्तम पदार्थ आणि भुसा यातील फरक कळत नाही. याच कारणासाठी गरम केलेला अन्नपदार्थ जास्त चांगला लागतो. कारण जास्त तापमानाला हि तेले जास्त प्रमाणात बाष्पीभवन होतात. आपण बिर्याणी "दम" करायला ठेवतो तेंव्हा मटण किंवा रस्स्यातील तेले बाष्पीभवन होऊन बाहेर येतात आणि भांडे बंद असल्यामुळे बाहेर आलेल्या भातात शिरतात त्यामुळे असा भात सुद्धा स्वादिष्ट लागतो. क्रमशः

वाचने 9005 वाचनखूण प्रतिक्रिया 17

वामन देशमुख Tue, 08/20/2013 - 13:09
फक्त पाच चवी आहेत गोड आंबट खारट कडू आणि नवी चव म्हणजे उमामी...
काही बाळबोध शंका: तुरट आणि तिखट या चवी नव्हेत का? षडरिपू कोणते आहेत? आम्हीतर (आत्तापेक्षा) लहान असल्यापासून गोड (ऊस), आंबट (चिंच), खारट (मीठ), तिखट (मिरची) तुरट (आवळा) आणि कडू (कडुलिंब) अशा सहा चवी असल्याचे समजत, ऐकत, खात, पीत, गिळत, थुंकत आलो आहोत.

In reply to by वामन देशमुख

सुबोध खरे Sun, 08/25/2013 - 22:26
पंडित साहेब आपण म्हणता तसे षडरस हे आयुर्वेदात किंवा पारंपारिक साहित्यात म्हटले असले तरी ते चार(आता उमामी धरून पाच) चवीमध्ये धरता येत नाहीत कारण या पाच चवी मेंदूकडे पोहोचविण्याचे काम करणारे विशिष्ट संवेदक जिभेत आहेत तसे तिखट आणि तुरट(कषाय) या चवीसाठी विशिष्ट संवेदक नहित.तिखट हि संवेदना मेन्दुपर्यंत दुखः आणि तापमान (गरम) या संवेदना पोहोचविणार्या नसातून पाठविले जाते. म्हणून तिखट वस्तू खाल्ली तर (मिसळीच्या तर्री चा भुरका मारला तर थंडीतहि आपल्याला घाम येतो.(मेंदूला तापमान वाढले आहे / गर्मी झाली आहे हि संवेदना झाल्याने). तिखट हि संवेदना आपल्याला जीभेलाच येते असे नव्हे तर नाकाच्या( जोरात ठसका लागल्यास हा अनुभव येतो) अन्न नलीकेच्या जठराच्या आतल्या त्वचे कडूनही निया दुसर्या दिवशी पार्श्वभागाच्या आतील त्वाचे कडून सुद्धा मिळते. तूरट हि चव नसून जिभेला तोठरा बसल्याची संवेदना आहे हि त्यातील astringent.अशा पदार्थाने. यात तुरटी चहा कच्ची फळे इत्यादी आणि क्षारयुक्त पदार्थामुळे त्वचेतील प्रथिने अवक्षेपित(PRECIPITATE) झाल्याने आपल्याला हि संवेदना होते.

प्रभाकर पेठकर Tue, 08/20/2013 - 17:23
घ्राणेंद्रियांच्या कार्याची उत्तम माहीती. तरी विस्तारभयास्तव जरा आवरती घेतल्यासारखी वाटते. अजून थोडे जास्त आणि उदाहरणांसहित तपशील आले असते तर आवडले असते. असो. माझ्या एका मित्राला जन्मतःच घ्राणेंद्रिय नाही. त्याला कसला वासच येत नाही. त्यामुळे भूकही लागत नाही. वयाच्या ५० व्या वर्षीही एकूण वजन ५० किलोच्या आसपास आहे. घड्याळ पाहून तो जेवायला बसायचा. जेवायची इच्छाच कमी. तो गमतीने म्हणायचा, 'डोळ्यांवर पट्टी बांधली तर मी संडासात बसूनही जेवू शकेन.' पर्फ्यूम खरेदी साठी तो आम्हा मित्रांना बरोबर घेऊन जायचा आणि आम्ही सुचवू तेच पर्फ्यूम घ्यायचा. त्याला म्हंटलं, 'तुला जर वास येत नाही तर पर्फ्यूमवर खर्च कशाला करतोस?' तर म्हणायचा, 'मला वास येत नाही पण माझ्या आजूबाजूला वावरणार्‍या माणसांना तर वास येत असतो नं!' एखाद्याला कुठलाच वास न येणं म्हणजे आयुष्यभर तो त्या अनुभवापासून किती आणि कसा वंचित राहतो ह्याचा विचार केला तर फार वाईट वाटतं.

"कुत्रा /कुत्रे गाडी मागे धावतात याचे १ कारण गाडीच्या चाकावर जर एखाद्या कुत्र्याने मूत्र विसर्जन केले असेल तर तो वास रस्त्यावरच्या कुत्र्यांना समजतो"

रामपुरी Tue, 08/20/2013 - 21:45
"त्यामुळे जर आपण ती वापरण्यास सुरुवात केली तर अतिशय आश्चर्य कारक रित्या आपल्याला तिचा वापर करता येतो. आपण सध्या सोप्या गोष्टी वापरत असतो तरीही त्या लक्षात घेत नाही" नीट वास घेतला तर पदार्थातले मीठ/तिखट इत्यादीचे प्रमाणसुद्धा सांगता येते.

In reply to by रामपुरी

स्पंदना Wed, 08/21/2013 - 04:53
हो! मी बर्‍याचदा तिखट मिठ जास्त किंवा कमी हे वासावरुनच अ‍ॅडजस्ट करते. बेसनाचा लाडू करताना बेसन भाजताना एका विशीष्ट क्षणी एक वेगळाच खमंग वास सुटतो त्या तासभर भाजत असलेल्या बेसनाचा. मी त्यावर अवलंबुनच गॅस बंद करते.

पैसा Sat, 08/24/2013 - 23:01
आता कळलं की सर्दी झाल्यावर कोणताही खाद्यपदार्थ आणि कागद खायला एकसारखेच का वाटतात ते! =))

In reply to by पैसा

आतापर्यंत अनेकदा सर्दी झाली पण अजून कागद खाऊन बघितलेला नाही !... आमचे एक स्नेही म्हणतात त्याप्रमाणे, "प्रयोग करून बघण्यासारखा आहे"... मात्र मुळात कुठला कागद कसा लागतो हेच माहित नाही... म्हणजे अगोदर सर्दी झाली नसताना बरेच प्रयोग करायला लागतील ! मग आमचा पास ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा Sun, 08/25/2013 - 15:56
कधीतरी चॉकलेट किंवा एखाद्या मिठाईच्या रॅपरचा कागद काढायचा कितीही प्रयत्न केला तरी जरासा तरी तोंडात जातोच!

In reply to by पैसा

जरा गंमत बाजूला ठेवली तर तुम्ही म्हणता ते खरेच आहे. आमचे एक प्रोफेसर धुम्रपान सोडण्याचे फायदे सांगताना "धुम्रपान सोडल्यावर काही दिवसांनी सफरचंद आणि केळे याची चव वेगळी असल्याचे समजते." हा फायदा न चुकता मिश्कीलपणे हसत सांगायचे.

सस्नेह Sun, 08/25/2013 - 17:49
जर आपण ती वापरण्यास सुरुवात केली तर अतिशय आश्चर्य कारक रित्या आपल्याला तिचा वापर करता येतो.
खरेकाका, ही शक्ती कशी वाढवावी याबद्दल पुढच्या लेखात जरूर सांगा.