मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समुद्रावरील पहिला दिवस-पुढे

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
क्षमा करा- . आज मुलुंड येथील स्वर झंकार चा तिसरा दिवस होता त्यात श्री जय तीर्थ मावुंडी यांचे अप्रतिम गायन आणि पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन वीणा वादन होते म्हणून पहिला भाग घाईघाईत लिहून अर्धवट सोडल्याबद्दल. असो अवोमिनची गोळी तोंडात धरली होती थोडा वेळ आडवा पडून होतो. थोड्या वेळाने पोटात ढवळणे थांबले परंतु डोके गरगरतच होते. पण थोडेसे धैर्य दाखवून मी उठलो आणि परत जिना चढून ब्रिज वर गेलो. वरून दिसणारे दृश्य भयंकर होते. जहाज पूर्ण तिन्ही मितीत ४५ अंशात डोलत होते समुद्र खवळलेलाच होता. पाणी लाटा आणि फेसामुळे पांढरे दिसत होते. तेवढ्यात तेथील रडार वर काहीतरी दिसले असे त्याचा ऑपरेटर सांगत होता. कप्तानाने जहाज तेथे वळवण्यास सांगितले. जवळ जाऊन पहिले तर एक प्रेत तरंगत होते. प्रेताची बोटे आत वळली होती शरीर आखडलेले होते लाटावर वर होणारे प्रेत पाहून परत मला पोटात ढवळ ल्यासारखे होऊ लागले.परंतु. कप्तानाने मागून येणाऱ्या तट रक्षक दलाच्या वरद नावाच्या जहाजाला त्या प्रेताचा ठावठिकाणा सांगितला आणि आम्ही पुढे निघालो. मी कप्तानाला विचारले कि प्रेत सोडून का दिले? तो म्हणाला कि आपल्याला जास्तीत जास्त जिवंत लोकांना वाचवायचे आहे तेंव्हा प्रेत आहे त्याला मागून येणाऱ्या जहाजासाठी सोडणे आवश्यक आहे.प्रेत वर घेण्यात जाणारा वेळ फुकट घालवणे परवडणारे नाही. असेच आम्ही पुढे जात होतो आणि रडार वर दिसणाऱ्या गोष्टीचा मागोवा घेत फिरत होतो. मधेच एक होडके दिसलेत्याच्या जवळ गेल्यवर लक्षात आले कि त्यावर जिवंत माणसे आहेत आणि ते समुद्रावर भरकटले आहेत. त्यांचा दोर पकडून त्यांना आमच्या जहाजाने खेचायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना खेचत खेचत जवळच्या किनार्यापर्यंत नेले. सर्वात जवळ अलिबाग होते ते दृष्टी पथात आल्यावर त्यालोकाना बंदराजवळ सोडले आणि जहाज परत फिरले या वेळेपर्यंत माझे डोके परत गरगरू लागले आणि पोटात पण ढवळू लागले म्हणून कोणालाही न सांगता मी घाईघाईने परत दवाखान्यात परत आलो आणि बेड वर आडवा पडलो. डोळे गच्च मिटून घेतले.जहाज फारच हलत होते. तेवढ्यात बाजूच्या केबिन मधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी तसाच पडून होतो. त्या केबिन मधून एक मद्रासी आवाज येत होता अप्पा, अम्मा व्हाय डिड आय जॉईन नेव्ही? आय वाज बेटर एज क्लार्क इन बँक.व्हाय डिड आय मेक धिस मिस्टेक? मला तशा स्थितीत सुद्धा हसायला आले.नंतर कळले तेथे एक लेफ्टनंट रवि म्हणून होता जो माझ्यासारखाच उलट्या करीत गरगरत पडला होता. बहुधा अवोमीन च्या प्रभावाने मला झोप लागली आणि थोड्या वेळाने दवाखान्याच्या ध्वनिक्षेपकावर घोषणा होत होती. ए सेलर ईज अनकोन्शियस ऑन ब्रिज मेडिकल ऑफिसर टू इव्हाक्यूएट.(ब्रिज वर नौसैनिक बेशुद्ध पडला आहे डॉक्टर येउन घेऊन जाणे.) मी माझ्या सहाय्यकाला म्हटले स्ट्रेचर घेऊन चला. आता पर्यंत शिडीवरून वर आणि खाली एकट्याने जाणे सोपे होते पण ती शिडी पूर्णपणे सरळ वर जाणारी होती.एखाद्या विवरात उतरल्यासारखी. आम्ही वर गेलो.आणि कप्तानाला विचारले काय झाले? तो म्हणाला माहित नाही हा बाजूच्या गच्चीत समुद्रात निरीक्षण करण्याच्या ड्युटी वर होता आणि आता बेशुद्ध आहे. मला माहित नाही पुढे काय झाले. आता जे काय करायचे आहे तो तुझा प्रश्न आहे. मी आजूबाजूला असलेल्या नौसैनिकांना विचारले त्यांना काहीही माहित नव्हते शेवटी त्या गरगरत्या अवस्थेत मी माझ्या सहाय्यकाला त्याला स्ट्रेचरवर घेण्यास सांगितले. त्याला स्ट्रेचरवर आवळले (हे स्ट्रेचर लवचिक असते) आणि त्याचे वरचे handal मी धरले माझा सहाय्यक खाली उतरलं होता त्याने खाली धरले होते. असे त्या रुग्णाला आम्ही खाली उतरवले आणि दवाखान्यात आणले.त्याला तेथे जमिनीवर झोपवले आणि मी त्याची नाडी पहिली तर हृदयाचे ठोके मंदपणे चालले होते. मिनिटाला फक्त ४० ठोके. बाकी त्याचा श्वास सुद्धा मंद पणे चालला होता. इतर कोणतीही खूण त्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यासाठी उपयोगी नव्हती.माझे डोकेच चालेना काय करावे. मी माझ्या सहाय्यकाला सांगितले कि त्याला सलाईन लाव. तो म्हणाला सर सलाईन नाही. मी म्हटले ग्लुकोज लाव तो म्हणाला शिरेतून देण्याचे कोणतेच द्रव्य नाही. आता मला कळेच ना कि काय करावे. शिरेतून देण्याचे द्रव्य नाही रुग्णाचा श्वास आणि ठोके मंद पणे चालले आहेत. मला वाटले हा आता दगावतो कि काय ? नौदलात आलो डॉक्टर म्हणून आणि समुद्रातील पहिलाच दिवस एक मृत्यू चे सर्टिफिकेट देऊन चालू होतो कि काय? मग परत विचार करू लागलो काय झाले असावे. एक वाटले कि याचे ठोके ४० झाले आहेत म्हणजे त्याच्या रक्तातील कल्शियम कमी झाले असावे किंवा पोटाशियम वाढले असावे. मी सहाय्यकाला सांगितले कि त्याला एट्रोपिन चे इंजेक्शन दे. हे औषध हृदयाचे ठोकेवाढवते. त्याने ते इंजेकशन दिले. परत थोड्यावेळाने त्याची नाडी बघितली तो त्याचे हृदयाचे ठोके १०० पर्यंत आले. त्याच्याबरोबर माझ्याही जीवात जीव आला.मी सहाय्यकाला सांगितले कि नाकातून घालायची नळी आहे का? तो हो म्हणाला त्याने ती नळी त्याच्या नाकातून सरकवली. तो बेशुद्ध असल्याने नळी पटकन आत गेली. त्याला त्या नळीतून मी इलेकट्रोल देण्यास सांगितले. त्याने एका भांड्यात इलेकट्रोलचे द्रावण तयार केले आणि एक एक घोट करत त्याला तीन ग्लास द्रावण पाजले आणि काय आश्चर्य त्याने डोळे उघडले.इकडे तिकडे बघितले आणि तो चक्क उठून बसला. मी त्याला विचारले तुला काय झाले होते? तो म्हणाला मला सारखे गरगरत होते आणि उलट्या होत होत्या. नौदलात कोणालाही गरगरते उलट्या होतात म्हणून कामातून रजा मिळत नाही.त्याला काळ्या रंगाची बालदी देतात. त्यात उलटी करा आणि काम करा. सगळ्यांनाच गरगरते कोणाचे लाड करणार. आत माझ्या डोक्यात थोडे थोडे शिरू लागले.बहुधा उलट्या करून करून त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि इलेक्ट्रोलाईट कमी जास्त झाल्याने तो बेशुद्ध झाला असावा. अर्थात हा तर्क आहे आणि याची पुष्टी करणे शक्य नव्हते. निदान प्रथम ग्रासे मक्षिका पात टळला होता.आणि त्या इंजेक्शन ने त्याचे ढवळणे पूर्ण थांबले होते आणि तो छान बसून खिडकीतून इकडेतिकडे पाहत होता. खरेतर त्याची परिस्थिती माझ्यापेक्षा आता चांगली होती. माझे डोके गरगरत होते मळ मळ होतच होती. आता त्याल बसून मी १ लिटर एलेक्ट्राल पाजले. तो पूर्णपणे टुणटुणीत झाला होता. थोड्यावेळाने मी परत ब्रिज वर गेलो. तेथे परिस्थिती तिच होती. आम्ही तोवर ५-६ जहाजांना पकडून अलिबाग ला सोडले होते असे समजले. मी परत कप्तानाला विचारले कि जिवंत माणसांचे काय केले. त्याने सांगितले कि जिवंत माणसाना आम्ही हेलिकोप्तरने कुंजाली या बेसवर आणि तिथून जे जे हॉस्पिटल ला पाठविले. त्यांना आपल्याबरोबर फिरवण्यात काहीच हशील नव्हता. आमचे काम फक्त माणसे किंवा बोटीना शोधून काढणे होते. बोटीना अलिबाग ला(सर्वात जवळच्या किनार्यावर सोडले) माणसाना हेलिकोप्तरने पाठविले आणि प्रेते मागून येणाऱ्या वरद या जहाजाने उचलून मुंबईत आणले. कप्तानाने मला खाण्यासाठी sandvich देऊ केली. पण खाण्याकडे पाहावे अशी माझी परिस्थिती नव्हतीच. मी तर पाणी सुद्धा पिण्यास घाबरत होतो. (उगाच आपल्यालाच dehydration झाले आणि बेशुद्ध झालो तर आपल्याला atropin कोण देईल?) आमच्यापेक्षा खूप जास्त माणसे तटरक्षक दलाच्या डोर्नियर या विमानाने शोधली होती, हे विमान पाण्याच्या पातळीच्या १० फुटावरून उडत होते आणि २०० किलोमीटर वेगाने गेल्याने मोठे क्षेत्र लवकर निरक्षण करू शकत होते. डोर्नियर या विमानाने डझनावारी माणसांचा ठावठिकाणा शोधून फारच छान काम केले होते त्याबद्दल त्यांच्या वैमानिकाला तटरक्षक पदक दिले.(१०-१५ फूट उंचीवरून २०० किमी वेगाने वेगवान वार्यातून उडत जाणे हि गोष्ट फार कठीण आणि अतिशय कौशल्याची आहे. थोडीशी चूक जीवावर बेतू शकते.) असे दिवसभर फिरत फिरत शेवटी सूर्यास्ताच्या वेळी आम्ही परत फिरलो जेंव्हा कुलाब्याच्या दांडीच्या पुढे जहाज आले तेंव्हा जहाज हलणे पूर्ण बंद झाले. आता माझी परिस्थिती पण बर्यापैकी सुधारली होती. आतापर्यंतजहाजाचा खानसामा सुद्धा आपल्या पायावर उभा होता. पूर्णवेळ तो सुद्धा आडवाच होता असे मला कळले. असो मी त्याला एक कोकाकोला देण्यास सांगितले. कैन मधील कोकाकोला थोडेसे लिंबू घालून प्यायला तो अमृतासारखा लागला.अख्ख्या दिवसात माझ्या पोटात गेलेले ते पहिले अन्नद्रव्य होते मुंबईत परत येताना तोच सकाळ सारखा देखावा दिसत होता पश्चिमेला मावळता सुर्य त्याच्या पुढे मुंबईतील इमारती त्यात दिसणारे दिवे. लखलखती नगरी आणि पायाखालची जमीन हलत नव्हती पायाखाली घटत जमीन काय असते हा पहिला अनुभव होता. असे बरेच दिवस परत माझ्या आयुष्यात येणार होते त्याचि हि नांदी होती. पण आज सुद्धा तो दिवस माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे दुसर्या दिवशी आमचे नाव वर्तमानपत्रात वाचण्यास मिळाले. मच्छीमार कृती समितीच्या अध्यक्ष श्री भाई बंदरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे कोळी लोकांच्या वसई सातपाटी इथल्या बोटीना नौदलाने अलिबागला सोडले होते. त्यांना वसई येथे सोडणे हे नौदलाचे काम होते पण ते तसे करायला तयार नव्हते. नौदल असहकार्य करीत असल्याची टीका केली होती. जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवणे हे काम सोडून आम्ही शोधलेल्या बोटीना वसईला सोडायला हवे होते कारण त्या लोकांजवळ परत जायचे पैसे नव्हते. हवामान खात्याने वादळाचा बावटा दाखवलं असता ते समुद्रात का गेले याचे उत्तर देणे त्यांनी चातुर्याने टाळले. कर्मण्ये वाधिकारस्ते म फलेषु कदाचन कामावर आपला अधिकार असतो फळावर नाही हा बोध मिळाला.

वाचने 10004 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अग्निकोल्हा Sun, 02/17/2013 - 20:02
मान गये! अतिशय सॉलिड प्रथमोपचार केले तुम्ही त्या बेशुध्द व्यक्तिवर.. तुमच्या प्रसंगवधानाला सलाम.
१०-१५ फूट उंचीवरून २०० किमी वेगाने वेगवान वार्यातून उडत जाणे हि गोष्ट फार कठीण आणि अतिशय कौशल्याची आहे. थोडीशी चूक जीवावर बेतू शकते.
विमान आहे म्हटल्यावर असेल बुआ, पण इथं द्रुतगतीमार्गावर तवेरा सोडाच अगदी आय-२० सुध्दा २०० ला टच करता येते. अहो! टायटलमधे किमान रिलीज वर्शन तरी टॅग करायचे ना ? गोंधळ झाला पुन्हा तोच लेखा आला कि काय म्हणुन ?

In reply to by अग्निकोल्हा

प्यारे१ Sun, 02/17/2013 - 22:17
तवेरा, आय २० ला पंख असतात? आमच्याकडं नसतात. विमान १०-१५ फुटावरुन उडत असताना थोडं डावी उजवीकडं कललं तर त्याचा पंख जमिनीला/ पाण्याला घासून तुटू शकतो,नि मोठा अपघात होऊ शकतो. गवि कॉलिंग गवि!

In reply to by अग्निकोल्हा

आनंद Sun, 02/17/2013 - 23:06
२०० किमी प्रती तास हा विमाना साठी धोकादायकच वेग झाला. विमान उडत राहण्या साठी लागणार्‍या न्युनत्तम वेगाच्या जवळ आहे हा वेग.(stalling speed)

In reply to by आनंद

सुबोध खरे Mon, 02/18/2013 - 00:01
डोर्नियर चा सर्वात जास्त वेग हा ३३४ किमी आणि stall स्पीड १४८ किमी आहे (पहा विकीपेडिया)२००किमी हा वेग धोकादायक पातळीच्या बर्यापैकी वर आहे अनि या वेगात जाताना खालचे दिसू पण शकते म्हणूनच हे विमान भारतीय नौसेना, वायुसेना आणि तटरक्षक यात शोध आणि बचाव(search and rescue) यासाठी वापरतात

In reply to by आनंद

सुबोध खरे Mon, 02/18/2013 - 00:01
डोर्नियर चा सर्वात जास्त वेग हा ३३४ किमी आणि stall स्पीड १४८ किमी आहे (पहा विकीपेडिया)२००किमी हा वेग धोकादायक पातळीच्या बर्यापैकी वर आहे अनि या वेगात जाताना खालचे दिसू पण शकते म्हणूनच हे विमान भारतीय नौसेना, वायुसेना आणि तटरक्षक यात शोध आणि बचाव(search and rescue) यासाठी वापरतात

स्पंदना Mon, 02/18/2013 - 06:39
शेवट वाचुन खेद झाला. असो. एकुण बरेच अवघड काम म्हणायचे तुमचे. नाही स्वतः आजारी अगदी उभे न रहाण्याच्या स्थितीतही तुम्ही योग्य विचार करुन त्या खलाश्याला वाचवलतं. h+e+l+i+k+shift O+p+T+r+a = हेलिकॉप्टर अन "र्‍या" लिहिण्यासाठी hift r +y +A

अमोल खरे Mon, 02/18/2013 - 10:34
मस्त लेख. प्रसंगावधान सॉलिड आहे. हे मच्छिमार पण नमुने आहेत. जीव वाचला त्याचं काही नाही, पण अलिबागला सोडलं त्याचा राग. त्यांना परत त्या समुद्रात सोडु का असं विचारायला हवं होतं. गप्प बसले असते.

पैसा Mon, 02/18/2013 - 10:41
अनुभव फार छान लिहिला आहेत! शेवट कोळी लोकांच्या प्रतिक्रिया वाचून मजा वाटली. त्यांना खरेच जिथे सापडले तिथे परत नेऊन सोडायला पाहिजे होते! :D

मैत्र Mon, 02/18/2013 - 11:08
जबरा अनुभव. कामाची सुरुवात भन्नाट झाली तुमची. मस्त लिखाण. शेवट वाचून भारतीयांमध्ये मुरलेल्या राजकारणाची जाणीव झाली. कृती समितीला वाचवलेले लोक आणि नौदलाच्या कष्टांची जाणीव आणि तटरक्षक दलासारख्या महत्त्वाच्या फोर्सची इमेज टिकवण्यापेक्षा टीका करून आपले स्थान (काही तथाकथित अध्यक्षपद वगैरे) मध्ये जास्त इंटरेस्ट असावा. सामान्य मच्छीमारांना नौदला पेक्षा त्यांचेच म्हणणे खरे वाटणार.

बॅटमॅन Mon, 02/18/2013 - 11:40
अतिशय थरारक अन वास्तव लेखन. अंगावर काटा आला म्हणणे ही ऊनोक्ति ठरावी असे एकूण अनुभव आहेत तुमचे. बाकी या मूर्खागमनी राजकारण्यांना अक्कल येणार नाही ती नाहीच.

आनंद भातखंडे Mon, 02/18/2013 - 17:52
झकास आणि थरारक अनुभव. भारतीय सेनेतील माणसांचे विश्वच वेगळे. श्री भाई बंदरकर किंवा आमच्या सारख्या सामान्य माणसांना नाही समजणार.

सुबोध खरे Mon, 02/18/2013 - 20:44
कोणत्याही गोष्टीत आपला फायदा बघितला नाही तर तो राजकारणी कसला? प्रश्न एवढाच होता कि त्यांनी नौदलाने असे का केले हा साधा प्रश्न सुद्धा न विचारता वक्तव्य केले ते वाईट आहे. सेनेतील लोकांना वार्ताहरांशी बोलण्याची परवानगी नाही.आणि त्यांचा अधिकृत प्रवक्ता दर वेळी अशा वार्तांचे खंडन करण्याच्या फंदात पडत नाही.शेवटी ज्या कोळी लोकांचे जीव वाचले ते लोक नौदलाला दुवा देत असतील मग बाकी काय फरक पडतो.

जेनी... Mon, 02/18/2013 - 21:23
दोन्हि भाग वाचले . :) सुब्बु काका तुम्हि म्हणजे मिपाला उशिरा का होइना पण मिळालेली लाभलेली एक देणगी आहाता ... अजुन चांगले शब्द सद्ध्या सुचेनात . लिहित रहा .. तुमचे अनुभव , तुमचं ज्ञान सगळं आपलेपणाने इथे शेअर करत रहा. खुप खुप शुभेच्छा :)

In reply to by अमोल खरे

बॅटमॅन Tue, 02/19/2013 - 12:14
कुठल्याही पुरुष आयडीला लाडात येऊन काका म्हटल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आता हेच पहा, इथे प्रतिसाद दिल्यावर पळत पळत येते की नाही भौराया भौराया करत.

थरारक भाग झाला आहे. कोक मध्ये लिंबू घालून पिणे हा धडा कॉलेजात शिकलो. चव अप्रतिम माझ्यामते आपल्या राज्य सरकारने त्या कोळ्यांना अलिबाग ते मुंबई परत आणण्याची व्यवस्था केली पाहिजे होती. नौदलाने आपले काम चोख केले , पुढे राज्य सरकारची ही जबाबदारी होती. तसेस धोक्याचा इशारा देऊन सुद्धा समुद्रात जाणार्‍या कोळ्यांवर कारवाई करण्याची तरदूत मासेमारी संघटनेकडे हवी,