श्री. ना. आणि व्ही. एस.
"मी कोण" हा प्रश्न मानवाला अनादि कालापासून पडला आहे. प्रत्येक मानव जाणते-अजाणतेपणे या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे. कधी आपल्या कक्षेत राहून, तर कधी कक्षा भेदून. वैयक्तिक आवडी निवडी, निवडलेले पर्याय, घेतलेले निर्णय हे प्रत्येकाच्या "मी" च्या शोधाचं दृश्य रूप. मानवसमूहात रहायचं तर प्रवाहाबरोबर पोहोणं आलंच. सर्वदा आपल्या मनाप्रमाणे घडेलच असं नाही. मानवसमूहाचा हा अदृश्य दबाव माणसाला वेगळं वागायला भाग पाडतो. कधीकधी काही पर्याय मनाविरुध्द निवडावे लागतात, काही निर्णय बळजबरीने घ्यावे लागतात. अशा वेळी तो "मी" चा शोध बंड करून उठतो. घुसमट होते.
एकत्र कुटुंब आणि त्यापायी कधीकधी होणारी वैतागवाडी या विषयावर मराठी साहित्यात बरंच लिहिलं गेलं आहे. (विशेषतः सानिया, आशा बगे, गौरी देशपांडे या "नातेसंबंधपटू" लेखिकांकडून.) पण मला भावलेलं चित्रण श्री. ना. पेंडसे यांनी "तुंबाडचे खोत" आणि "रथचक्र" या कादंबऱ्यांत केलं आहे.
"तुंबाडचे खोत" मध्ये खोतांचा मोठा वाडा, गोतावळा. गावाची खोती म्हणजे मोठा मान आणि आर्थिक सुबत्ता. खोत म्हणजे गावाचे राजे. सत्ताकेंद्राबरोबर येणारा माजसुद्धा खोतांमध्ये ठेचून भरलेला. अशा वाड्यात एका गरीब कीर्तनकाराची मुलगी गोदा सून म्हणून येते. तिच्या नवखेपणापासून सुरुवात करून ती वाड्यात रुळेपर्यंतचा प्रवास पेंडश्यांनी मोठा झक्क रंगवला आहे. तिच्या तिजवर नवऱ्याबरोबरच्या पहिल्या शैय्यासोबतीचा प्रसंग, वयाने मोठ्या पण नात्याने धाकट्या असणाऱ्या जावांबरोबर वावरतानाच्या घटना फार खुलवल्या आहेत. पण पेंडसे हे सारखं जाणवून देतात, की गोदा खोतांच्या वाड्यात रुळली, पण रमली नाही. मनाने अजूनही ती त्या गरीब कीर्तनकाराची पोर आहे. खोतांच्या वाड्यात तिचा जीव कासावीस होतो आहे.
पुढे तिच्या नवऱ्याच्या अघोरी कृत्यांमुळे खोतांची श्रीमंती लयास जाते. गाडं उतरणीला लागलेलं पाहून गोतावळा नाहीसा होतो. एक दीर परागंदा होतो, तर दुसरा वेगळं बिऱ्हाड थाटतो. या आपत्कालीन परिस्थितीत खरी गोदा ताठ कण्याने उभी रहाते. वेड लागलेल्या नवऱ्याला सांभाळते. एकुलत्या एक मुलाला गावाने वाळीत टाकलेलं असलं तरी खंबीर रहायला शिकवते. मुलाचा नामांकित वैद्य गणेशशास्त्री होतो. आपल्या सेवाभावी वृत्तीने तो गेलेलं वैभव परत मिळवून देतो.
याच्या उलटं टोक म्हणजे "रथचक्र" मधली "ती". मोठ्या वाड्यात, एकत्र कुटुंबात तीही घुसमटते आहे. वेडसर नवरा संन्यासी होण्यासाठी घर सोडून गेला आहे. पदरी दोन मुलं. तिला घराच्या उतरंडीत पायपुसण्याचं स्थान आहे. तिच्या दोन्ही मुलांना इतर कुटुंबीय नोकरासारखं वागवताहेत. अशा वेळी ती कक्षा भेदायचा प्रयत्न करते. आपल्या धाकट्या मुलाला शिकवायचं आणि या दलदलीतून बाहेर काढायचं या ध्येयाने ती प्रेरित आहे. पण ती गोदाइतकी खंबीर नाही. परिस्थितीखाली पिचून ती आक्रस्ताळेपणा करते, कधी पराकोटीचा स्वार्थीपणा दाखवते, हितशत्रूंचा पाणउतारा करायच्या नादात हितचिंतकांना डिवचते. रथचक्र जमिनीत रुतत जातं - तिने वर खेचायचा खूप खूप प्रयत्न करूनही. परिस्थिती बिघडत जाते. मोठा मुलगा वाड्याने फेकलेलं नोकराचं स्थान स्वीकारतो. धाकटा मुलगा शिकायला मुंबईला जातो खरा, पण आईचा धिक्कार करतो. सगळं करून-सावरून कोणाला त्याची किंमत नाही, या विचाराने ती कोलमडते. शेवटी विहिरीत जीव देते.
इंग्रजी साहित्यात ही घुसमट वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण व्ही. एस. नायपॉल यांनी लिहिलेलं "अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास" ही कादंबरी नुकतीच वाचली. नायपॉल भारतीय वंशाचे त्रिनिदादियन लेखक आहेत. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्कार मिळाला आणि २००१ साली साहित्याचं नोबेल पारितोषिक. (नायपॉल काही वेगळ्या कारणांमुळे भारतात वादग्रस्त आहेत, पण ते इथे महत्त्वाचं नाही.)
मिस्टर बिस्वासची नाळ थेट गोदाशी आणि "ती"शी जुळते. बिस्वास एका दरिद्री कुटुंबातला. त्याचं लग्न गावातल्या मातब्बर तुलसी परिवारातल्या मुलीशी होतं. तुलसी परिवार त्याला घरजावई करून घेतो. तुलसी घरात अनेक विवाहित मुली त्यांच्या घरजावई पतींबरोबर रहात असतात. घराच्या आर्थिक चाव्या तुलसी पुरुषांकडे. घरजावयांना आश्रिताची वागणूक. सततचा पाणउतारा. बिस्वासचा कोंडमारा होतो. बिस्वास बंड करू पहातो, पण दोनतीनदा त्याला लज्जित अवस्थेत परत तुलसींच्या घरात परतावं लागतं. त्याच्या लक्षात येतं, की आपलं स्वतःचं घर असण्याला पर्याय नाही. त्याचं स्वतःचं घर हे त्याच्या स्वातंत्र्याचं आणि स्वत्वाचं प्रतीक ठरतं.
इथे नायपॉल पेंडश्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कथा पुढे नेतात. पेंडश्यांची गोदा जिंकते आणि "ती" हरते. नायपॉल मात्र वेगळाच शेवट दाखवतात. बिस्वास घर बांधतो खरा, पण ते ओबडधोबड, गचाळ आणि गलिच्छ असतं. बिस्वासला ते माहीत नसतं असं नाही, पण त्याला "आपलं घर आहे" हीच भावना महत्त्वाची वाटते. तो विजयी झाल्याचं दाखवतो, पण आतल्याआत त्याला त्या विजयाचा पोकळपणा खात रहातो.
कक्षा भेदली की नाही हे महत्त्वाचं नाही, स्वत्वाची जाणीव महत्त्वाची.
वर्गीकरण
छान!
चांगला धागा आहे
मस्त परिक्षण..
In reply to मस्त परिक्षण.. by मुक्त विहारि
एकदम सहमत .
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by प्रचेतस
होय....
तुलना
In reply to तुलना by सस्नेह
कारण ..
In reply to कारण .. by चौकटराजा
नणंदा भावजया, जावा जावा, सासू
परिचय आवडला....
परिचय आवडला....
लेखन आवडलं!
सुरेख
लेखन मस्त आवडले.
पैसातै, मुक्तविहारी, खटासि खट
लेखन फारच आवडले.
लई भारी लिहिलंय, तुंबाडचे खोत
चौथा कमरा
छानच परिचय दिलात, कधी योग आला
श्री.नां.ची ही महाकादंबरी
In reply to श्री.नां.ची ही महाकादंबरी by प्रचेतस
आमचे एक मित्र गड, किल्ले,
In reply to श्री.नां.ची ही महाकादंबरी by प्रचेतस
चला, वल्लीशेठनं सर्टिफाय केलं
छान लिहिले आहे. मिपा सुरु
हत्या पण मस्त आहे वाचायला.
In reply to हत्या पण मस्त आहे वाचायला. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हत्या छानच आहे. पण त्याचा
In reply to हत्या छानच आहे. पण त्याचा by प्रचेतस
'कलंदर' राहीलय अजुन वाचायचं.
छान लिहलं आहे, रथचक्र वाचली