जपून जा. पोचल्यावर पत्र पाठव, गाडीतून उगाच उतरु नकोस. वेळच्या वेळी जेवत जा. जीवाला घोर लागेल असा वागू नकोस. अभ्यास नीट करत जा. खुशाली कळवत जा. रात्री लवकर झोपत जा. तुला भान रहात नाही. वाचत तर वाचत बसतोस. सकाळी लवकर उठत जा. अंघोळ नीट करत जा. दोन मिन्टात पाणी अंगावर घेऊन बाहेर पडू नको.
आईच्या सुचनांचा भडीमार चालू होता. आणि मी हसत हसत अग हो आई किती काळजी करतेस. मी आता मोठा झालो आहे. आई म्हणायची असू दे माझ्यासाठी लहानच आहेस. पहिल्यांदा इतक्या लांब चालला आहेस. काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि मी हसत होतो. हसु नको. जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव. हो हो म्हणत आईला म्हटले गाडी सुटेल तु कशाला थांबतेस जा आता घरी. नाही गाडी गेल्यावर जाईन असे म्हणून आई थांबूनच राहिली. डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या. मला हसू आवरत नव्हते. गाडी सुटली. वळुन पाहिले आई दिसेनाशी झाली. कॉलेजच्या गावी पोचेपर्यंत अधून मधून आईचा आविर्भाव आठवून हसू येत होतं. आज पंचवीस तीस वर्षांनी ते आठवून डोळ्यात पाणी येतं, ते पुसायला आई नाही.
लहानपणी घरी पाहुणे आले आणि ते जायला निघाले की मी रडून आकांत करायचो. पाहुणे आले की मस्त वाटायचे. खेळायला मिळायचे. मला ते बाहेर घेऊन जायचे. खाऊ द्यायचे. परत त्यांची जाण्याची आवराआवर सुरु झाली की मी बावरुन जायचो. काहीतरी मोठे गमावत असल्याची जाणीव व्हायची. पोटात खड्डा पडायचा. आणि डोळे ओले होऊन जायचे. पण मी गावी गेलो कुणाकडे की खुश असायचो. प्रवास मला आवडायचा. खिडकीतून बाहेर पहायला मजा वाटायची. परत तिकडून निघतांना सुद्धा मी खुश असायचो. कारण परत प्रवास. मी जसा कुणी प्रवासाला निघाले की रडतो तसे मी प्रवासाला निघाल्यावर कुणी रडत नाही हे समजेपर्यंत माझे रडण्याचे दिवस संपले होते. प्रवासाला निघालेला माणुस परत कधीतरी येईलच हे समजत होते. त्यामुळे माझे कुणी प्रवासाला निघाला की रडू येणे कमी कमी होत संपून गेले. ते इतके की नंतर कधीतरी आई परत न येण्याच्या प्रवासाला गेली तरी डोळ्यात पाणी आले नव्हते.
कोडगा आहे पहा. आई गेली तरी काही वाटत नाही त्याला. पुटपुटणारे उद्गार कानावर यायचे पण मी गेल्यावर अजिबात रडायचे नाही. हातपाय गाळायचे नाही. स्वतःची काळजी घ्यायची. दुसर्यावर बोज बनायचं नाही. वेळच्यावेळी खात पित जायचं. कुणाच्या अध्यात मध्यात पडायचं नाही. अन मदतीला नाही म्हणायचं नाही. आई बजावून बजावून सांगायची. अग आई हो गं अजिबात काळजी करु नको. आणि तुला काही धाड भरली नाही. अजुन पन्नास वर्ष काही होत नाही तुला. हो पन्नास वर्ष असं तुझ्या हातुन सगळं करुन घेत मजेत जगते, आई हसून म्हणाली. मग काय बिघडलं लहानपणी मी त्रास दिला ना तुला.. त्याची भरपाई नको का व्हायला. अशी का भरपाई होत असते आई म्हणाली. झोपवून देऊ का पाठ भरली ना? हो झोपते आता. आईला अलगद मागची उशी काढून झोपवले. अंगावर पांघरुण घातले. आईचा एक खोल निश्वास ऐकू आला. अन मग सगळं शांत. डोळ्यात पाणी दाटून आलं ते मागे रेटता रेटता आयुष्य १० वर्षांनी सरुन गेलं.
इंजीनियरींगची परिक्षा झाली सुट्टीत घरी आलो होतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील संरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलाच्या जशा नोकरीच्या अपेक्षा असतात त्याच अपेक्षा ठेवत सुटीत एका ठिकाणी काम करु लागलो. आजोबांनी टायपिंग शिकून घे असा त्यांच्या दृष्टीने मोलाचा सल्ला दिला. मी हो म्हटलो पण सल्ला मानला नाही. त्यांच्या काळातुन ते बाहेर आलेले नव्हते. त्यांचा दोष नव्हता. मी सुद्धा जेव्हा आज विचार करतो तेव्हा मी माझ्या काळातुन बाहेर पडू शकत नाही हे प्रखर वास्तव बोचत असतेच. नव्या पिढीचे फेसबुक, गेम्स, मोबाईल मला भावत नाहीत. फोनवर तासंतास गप्पा मारण्यापेक्षा समोरासमोर १० मिनिटे मित्र भेटतात ते जास्त जवळचे वाटते. काळाचा दोष. मी ज्याकाळात तरुण होतो त्या काळात फोन असणे श्रीमंती होती. तातडीचा निरोप म्हणजे तार होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठे सदस्य एकमेकांना पत्र लिहून हे पत्र म्हणजे तार समजून ये अशी विनवणी करायचे. तारेचा खर्च अफाट वाटायचा. कधीतरी अमुक तारखेला निकाल आहे असं कळालं आणि मी निकाल काय लागला आहे हे पहायला गेलो. निकाल अपेक्षेपेक्षा सुखद होता. लगेच घरी परतलो. सगळे वाट पहातच होते. दारातुनच मी पास झालो असे सांगितले, अन सगळे घर आनंदाने भरुन गेले. आईच्या डोळ्यात पाणी आले. वडीलांनी हलकेच पाठ थोपटली. पण त्यांना बोलवेनाच, अन थोडंस पाणी डोळ्यात आलं. आजी आजोबा सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं पुसत होते. त्यादिवशी कळलं की आनंदाचे सुद्धा अश्रु असतात. निकालाची बातमी जसजशी पसरली तसतसं अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मानवी स्वभावाचे नमुने देऊन गेल्या. खराखुरा आनंद कुणाकुणाला झाला याची खुणगाठ आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडली.
त्यानंतर दु:खात अन आनंदात डोळ्यात पाणी आणुन सहभागी होणारे एक एक कमी होत गेले. एकेकाने निरोप घेतला. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले जातात तेव्हा आभाळ कोसळतं पण जेव्हा वयाने लहान असलेले जातात तेव्हा पायाखालचा आधारच निसटतो. त्रिशंकुप्रमाणे अधांतरी लटकत रहाणं नशिबी येतं. अधांतरी लटकलं की कुठे जावे ही दिशा सुद्धा कळत नाही. आणि मग केवळ सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष मोजणं हाती असतं.
२०१२ संपलं. २०१३ चालू होईल.
वाचने
10151
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
नि:शब्द...
सुंदर
अप्रतिम..
+१
In reply to अप्रतिम.. by अक्षया
त्यानंतर दु:खात अन आनंदात
मग केवळ सेकंद, मिनिट, तास,
हळवा क्षण
मस्तच
+१
In reply to मस्तच by अविकुमार
-
हम्म..
नाना.. आवडलं..
अतिशय सुंदर!!
नानबा
खरंच अतिशय छान!
सुरेख
खुपच भावस्पर्शी
अप्रतिम!!
खरंय. या वर्षात निरोपाचा हात
नान्या अतिशय सुरेख... यावर्षी
सुरेख
असल्या लिखाणात तुझी हातोटी
+१
In reply to असल्या लिखाणात तुझी हातोटी by गणपा
सुरेख नाना!
सुंदर.
नाना साहेब, खरच फार सुंदर लिहिल आहात.
शेवटचा श्वास.
नाना
का लिहिलंस?
अप्रतिम!
दु:खात अन आनंदात डोळ्यात पाणी आणुन सहभागी होणारेआपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिमत्व जाणवून घेण्याची कुवत अंगी असो!सुंदर
सुंदर
फार सुंदर लिहिले..
मस्त्......(पण आत ऊतरणारं )
सुंदर..
जबराट!
साधे, सरळ, सुरेख.
मस्त लिहिलंय नानासाहेब.
नान्स एकदम सुरेख लिहले आहेस !
नाना, वाचून डोळ्यांत तरळले...
चुक दुरुस्ति
In reply to नाना, वाचून डोळ्यांत तरळले... by बारक्या_पहीलवान
आवडले..
हळव केलेस अगदी लिखाणातून
म्हणूनच...
अगदी
In reply to म्हणूनच... by अनन्न्या
अप्रतिम
एकदम टचिंग..
माझपण असच झाल होत
सुरेख
सुंदर. --टुकुल
अनेकांना निरोप दिला..
सुरेख
__/\___
अप्रतिम
बर्याच काळानंतर नाना तुमचं
नाना
नानांनी हे लिहिलच नाही, मी ते
एकच नं.......
नाना..
नानाशेठ..
केवळ अप्रतीम ! अजून काय म्हणणार ?
उत्तम ! मनस्वी लेख आहे.
लिहित रहा, अजुन काय.
केवळ अप्रतिम.....
अप्रतिम रे नाना....
खुपच सुंदर