मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रारंग ढांग - एक सो सो पुस्तक !

यकु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कपाट बरेच भरून वाहात असल्याने व तीन-चार लायब्रऱ्याही खुडूस झाल्याने बऱ्याच दिवसांपासून पुस्तके विकत घेणे बंद केले होते. पण तोत्तोचान, दुनियादारी, रारंगढांग, उत्सुकतेने मी झोपलो या पुस्तकांबद्दल वर्तमानपत्रे व आंतर्जालावर वारंवार वाचायला मिळत होते. म्हणून ही सगळीच्या सगळी व व्यंकटेश माडगुळकरांचे “गावाकडच्या गोष्टी” हे फार जुने, पूर्वी कित्येकदा वाचलेले अगदी फर्मास पुस्तक व गो.नि.दां.ची वाघूर व रानभुली, श्याम मनोहरांचे हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तम राव ही पुस्तके एकदाची आणून टाकली. मौज प्रकाशनकडून प्रकाशित प्रभाकर पेंढारकरांचे “रारंगढांग” हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. १९८१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबद्दल आत्ता, म्हणजे जवळपास ३० वर्षांनी २०१०-११ मध्ये अंतर्जालात “फार चांगलं आहे, फार चांगलं आहे” असा गहजब का उडावा हे पुस्तक एका बैठकीत पूर्ण वाचूनही कळले नाही. कारण एवढे सगळे ब्लॉग व विविध साईट्सवर या पुस्तकाची वाहव्वा वाचून मी हे पुस्तक विकत घेतलं. मला या पुस्तकातलं काय आवडलं नाही म्हणाल, तर शैली व त्याचा कथाविषय! तो सांगू का नको? सांगतोच. एक मुलकी अभियंता मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतीय सैन्यात बॉर्डर रोड मध्ये सैनिकी अभियंता म्हणून नोकरी धरतो. जे सगळीकडे असतं ते शिस्त शिस्त असा उद्घोष करणाऱ्या सैन्यातही असायचंच! ते म्हणजे वरिष्ठांची “नियम आणि शिस्त” या गोंडस सबबीखाली चालणारी अधिकारशाही! अधिकारशाही ऐवजी मनमानी असा शब्द वापरणार होतो, पण गोष्ट सैन्यातील असल्याने ही मनमानी नसून अधिकारशाही आहे. फिल्डवर काम करणाऱ्याला त्याच्या आकलनाप्रमाणे व्यापक हित लक्षात घेऊन आवश्यक असेल तसे काम न करू देता केवळ नियम व शिस्त या सबबीखाली बसेल तसे काम करून घेणे, मग त्या माणसाने आदेश व नियम धाब्यावर बसवून लोकहितासाठी बंडखोरी करणे वगैरे कथेत होत जाते. हे आपणही रोजच्या आयुष्यात अनुभवतच असतो, त्यामुळं पुस्तक वाचून घ्यावा असा नवा अनुभव यात काहीच नाही. कादंबरीचा नायक मनासारखं काम करता येत नाही म्हणून मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून सैन्यात नोकरी धरतो, आणि तिथेही त्याला पळसाला पाने तीनच हा अनुभव येतो – हा घटनाक्रम महत्वाचा आहे. पण कथानायकाने मुंबईतील नोकरी का, कशी सोडली, सैन्यात नोकरी कशी धरली हे स्थित्यंतर लेखकाने पुस्तकात बिलकुल रंगवलेले नाही. खरे म्हणजे लेखकाने पुस्तकाच्या शैलीकडे जेवढे लक्ष द्यायला हवे, तेवढी दिलेले नाही असे मला वाटते. शैली म्हणावी तेवढी आकर्षक नाही. विश्वनाथ मेहेंदळे हा नायक वरिष्ठांना शांतपणे वस्तुस्थिती समजावून सांगतो, त्याच्या आकलनाप्रमाणे बॉर्डर रोडचे रारंगढांगवरील चुकीचे काम बरोबर होण्यासाठी, सैन्यात असूनही वरिष्ठांना अक्कल शिकवतो, त्यासाठी आवश्यक ती मंजुरी घेतो.. तरीही ते बांधकाम त्याच्या मनाप्रमाणे होत नाही व रारंगढांग खाली दबून सहा माणसे मरतात.. मग कथानायक सैन्याचा आदेश मोडून लोकांचा जीव वाचवणाऱ्या टेकूचे बांधकाम स्वत:च्या अधिकारात करून घेतो, त्यासाठी त्याच्यावर कोर्ट मार्शल होते, कोर्टासमोर ही सगळी वस्तुस्थिती उघड होते व कोर्ट सगळी वस्तुस्थिती विचारात घेऊन त्याला शिक्षा न देता त्याची नोकरीची लिहून दिलेली तीन वर्षे पूर्ण व्हायच्या आत निवृत्त करते एवढे काय ते कथानक. कदाचित विषय सैन्याशी संबंधीत असल्याने हे पुस्तक लोकांना आवडले असेल, माहीत नाही. मला तरी शैलीच्या बाबतीत ते नक्कीच आवडलेले नाही. जेव्हा एवढा खटाटोप करून पुस्तक लिहिले जाते तेव्हा त्याची शैलीही मोहक असायला हवी, कथा सुद्धा खिळवून ठेवणारी असायला हवी आणि त्यातून नेहमीच्या आयुष्यापेक्षा काही वेगळं मिळायला हवं अशा माझ्या एवढं वर्णन केल्या जात असण्याऱ्या पुस्तकांच्या अपेक्षा आहेत – त्या रारंगढांगने पूर्ण केल्या नाहीत. त्यातल्या त्यात खिळ्याची छपाई असलेल्या मला मिळालेल्या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण बाइंडरांच्याच्या कृपेने पुढे मागे झाले आहे. वाचण्याच्या ओघात नंतर ते लक्षात आले. पुस्तक तसे ठाकठीक आहे, पण आवर्जून वाचायलाच पाहिजे असे त्यात काही विशेष नाही, हे खेदानं म्हणावं वाटतं. पुन्हा असंही वाटतं की कदाचित आपल्याच संवेदना बोथट तर झाल्या नाहीत? नेहमीनेहमी व्यंकटेश माडगुळकरांची शैलीचे चोचले पुरवणारी पुस्तके वाचून तर असं वाटत नसेल? तुम्ही जर रारंगढांग वाचले असेल तर तुम्हाला काय वाटतं?

वाचन 8886 प्रतिक्रिया 0