मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक स्वप्न प्रवास.(५)

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699 एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712 एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785 एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797 प्रिय ऍन्.........मला आता कळत नाही की मी तुझ्या स्वप्नात कसा येउ......स्वप्नात दिलेले वचन पाळणार्या राजा हरिश्चन्द्राच्या देशातला मी...तुला चॆट् करताना दिलेले "स्वप्नात येउन भेटेन " हे वचन मला पूर्ण करायलाच हवे. तरच राजा हरिश्चन्द्राचे नाव पुन्हा घेता येईल्. लोक राजा हरिश्चन्द्राच्या नन्तर राजा शिबी च्या नन्तर वचन पाळणारा म्हणुन् माझे नाव घेतील्. आता प्रश्न होता की तुझ्या स्वप्नात यायचे कसे. तू मलेशियात रहाणार आणि मी भारतात. मलेशियावर एके काळी भारतिय राजा महेन्द्रविक्रान्ताने राज्य केले होते ह इतिहास आहे म्हणुन मला तेव्हढे तरी बरे होते.विमानाने / समुद्रमार्गे / इ मेल ने तुझ्या पर्यन्त् पोहोचण्याचे स्वप्नातले सर्व मार्ग आता मला बंद होते.त्यांचा वापर करुन झाला होता. आता काहीतरी वेगळा मार्ग पहायला हवा होता. कोणत्याही तांत्रीक गोष्टींवर अवलंबुन न रहाता लोक पूर्वी वापर करायचे तसला काहीतरी मार्ग आता वापरायला हवा. काय करु शकतो......काय करु शकतो......काय करु शकतो......असे केले तर? इथुन मलेशिया पर्यन्त् चालत गेलो तर ? छे: तिथपर्यन्त चालत जायला केवढा वेळ लागेल. शिवाय पाय दुखतील ते वेगळेच. पाय दुखले तर दाबुन घ्यायला पुन्हा सदाशिव पेठेपर्यन्त उलटे चालत यावे लागेल. पोहत गेले तर ? हरकत नाही.पण मधे विषुववृत्त लागते. तेथे पृथ्वीची फ़िरण्याची गती सर्वात जास्त असते. त्यामुळे फ़ार जोर करुन पोहावे लागते म्हणे. हे जरा अवघडच जाइल. नाहीतर असे करुयात का? आपण स्वत:ला बाटलीत बंद करुन घेउ आणि ती बाटली समुद्रात फ़ेकुयात.......पण समजा ती बाटली भरकटत इतर कोठेतरी गेली आणि हजार पाचशे वर्षानन्तर कोणाला सापडली तर तो मला बाटलीतला राक्षस समजेल. आणि उगाचच् राजवाडा बांधुन मागेल. तुला भेटणे दूरच राहील. बंद बाटलीतुन प्रवास करणे तेवढे प्रॆक्टिकल वाटत नाही. अरे.आपण कसे जायचे हा विचार करण्यापेक्षा या पेक्षा लौकर झोपायचे याचा प्रयत्न करायला हवा. हल्ली "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक वाचुन ही झोप येत नसे त्यापेक्षा काहीतरी स्ट्रॊन्ग् उपाय करायला हवा म्हणुन मी मनोगत वर गेलो अहो आश्च्रर्यम.... तिथले घनगंभीर विषय / अनाकलनिय विषयावरच्या निरर्थक चर्चा आणि इतिहासकारांचे बुद्धी जडावणा-या तर्कांचे जंजाळ वाचुन मला लगेच झोप् आली .(झोपण्यापूर्वी मी ठरवलेसुद्धा की आता हॊस्पिटल मधल्या भूल स्पेश्यालिष्टाला हा उपाय सूचवायचाच.) मी तुझ्यापर्यन्त कसे पोहोचायचे हाच विचार करत होतो.मी बस ने तुझ्या स्वप्नात यायचे ठरवले. बस चे बूकिंग करण्यासाठी मी तिकिट खीडकी पाशी गेलो. पलिकडल्या माणसाने विचारले की कधीचे तिकिट पाहिजे.वैषाख महिन्याची सगळी तिकिटे संपली होती. ज्येष्ठ सप्तमी पर्यन्त बूकिंग्स चालु होती.आषाढाच्या पहिल्या दिवसाचे तिकिट चालेल का ? आषढाचा पहीला दिवस............ आषाढस्य प्रथम दिवसे. एकस्मीन यक्ष: .......मला अचानक कालीदासाचे मेघदूत आठवले. कालीदासाच्या मेघदूता मधला यक्ष ढगाला आपला दूत बनवुन प्रेयसीला संदेश पाठवतो.....आपण ही तसेच काहीसे केले तर? त्याने मेसेज पाठवला आपण ढगावर बसुन जाउ शकतो की? मी त्वरीत तिकिट खीडकी पासुन परत फ़िरलो.घरी येउन गच्चीवर गेलो. आकाशात पाहीले तर औषधालासुद्धा ढग नव्हता.आता ढगाचे औषध कसे करतात हे कोणालाच माहीत नाही पण अमूकतमूक औषधालासुद्धा नव्हता असा वाकप्रचार आहे म्हणुन म्हाणायचे इतकेच. हा तर काय म्हणत होतो. .आकाशात पाहीले तर औषधालासुद्धा ढग नव्हता आता ढग शोधायचा कोठे ? हां आठवले.बारामतीला कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी डॊप्लर रडार बसवले होते. त्या रडार ला समजते म्हणे ढग कोठे आहेत ते.मी तडक त्या कार्यलायत गेलो. त्याना विचारले की रडार कोठे आहे ? त्यावर डॊप्लर रडार हल्ली ट्वेन्टी ट्वेन्टी मॆचेसचा पावसाने विचक होऊ नये म्हणुन वापरले जाते.असे समजले. मी मनाचा हिय्या करुन त्याच कार्यलायत "ढग आणा नाहीतर आमरण उपोषणाला बसेन अशी धमकी दिली. माझ्या धमकी चा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तेथिल लोकानी उलट माझ्या सत्कारासाठी हार फ़ुले आणायला माणुस पाठवला. उपास करणारा भारतीय माणुस हा जगातील अन्नधान्य टंचाई चा प्रश्न सोडवण्यास मदत करतो म्हणुन् माझा सत्कार करणार होते ते. सबसे तेज वाहीनी चा माणुस तर असे लोक सापडावे म्हणुन लोकाना दिवसाला अर्धा किलो तांदूळ् अशा बोलीवर रोजंदारीवर माणसे आणुन त्यांच्या उपास करणारे भारतीय म्हणुन रोज मुलाखती घेत होता. मला इंटरेस्ट हार फ़ुलात नव्हता. तर ढगात होता. ढग तर मिळवायलाच हवा होता. मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे.पण गिरण्यांचे मॊल झाल्यापासुन तेथले हवामन स्वच्छ झाले आणि ढग नाहीसे झाले होते. ढ्ग आणायला मी "कारे मेघा कारे मेघा पानी तो बरसा" वगैरे फ़िल्मी गाणी म्हणुन पाहीली पण ती सगळी आकाशात असलेल्या ढगांना उद्देशुन होती. नसलेल्या ढगाला बोलावण्यासाठी एकही गाणे सापडले नाही. शेवटी मी "येउन येउन येणार कोण ढगाशिवाय आहेच कोण असे ओरडुनही पाहीले". हिन्दी गाणी नाहीत म्हणुन् मी मराथी गाण्यांचा शोध घेतला. पन तरीही निराशाच. मराठीतही ढगांना बोलावण्यासाठी एकही गाणे नव्हते. "येरे येरे पावसा....." हे पावसाला बोलावण्याचे गाणे. पण त्या गाण्यात मिळणारा पैसा खोटा असतो हे ठाऊक झाल्यापासुन पाउसही गाने ऐकुन येत नाही.उलट पावसाची कशी फ़जीती झाली म्हणुन हजर असलेले दोन चार ढग कडाडकन टाळ्या वाजवतात इतकेच्. ढग कोठे मिळतील याचा विचार करत असताना मला कोणीतरी सांगितले की जेथे क्रिकेट मॆचेस् असतात तेथे पावसाचे ढग असतात. ही परिस्थिती आठ दहा वर्षापूर्वी होती. आता मॆचेस एकाचवेळेस इतक्या ठिकाणे असतात की नक्की कोठी जायचे असा ढगांनाच प्रश्न पडतो.शिवाय पाउस पाडण्या अगोदर डकवर्थ-लुइस चा नियम समजून घ्या असा आदेश काढला गेला तर काय ? या धास्तीने ढगानी मॆचला येणेच सोडुन दिले होते. हल्ली मी "प्रयोगशाळेत ढग" तयार करतात हे ऐकुन होतो. तसा प्रयोग पहायला मी माझ्या शाळेत गेलो. तेथे तयार झालेला ढग इतका छोटा होता की त्यावर बसणे म्हणजे त्या ढगाला बालकामगार म्हणुन वागवल्याची मला शिक्षा झाली असती. अचानक आठवले की आमच्या ऒफ़िस मध्ये सिगारेटी फ़ुंकण्यासाठीची जागा रामसे बंधुंच्या सिनेमात असते तशा धुक्याने नेहमी भरलेली असते. तेथे ढग असू शकते. मी सिगारेट लाउंज मधे गेलो. पण तेथले धुके आपलाच तोरा सांभाळत होते. डॊट नेट कन्सल्टंट ने सोडलेला धूर जावा प्रोग्रामर ने सोडलेल्या धूरात मिसळायला तयार नव्हता. एस् ए पी कन्सल्टन्ट् ने सोडलेला धूर ओरॆकल ऎप्स वाल्याच्या धूराला आपला म्हणायला तयार नव्हता. कॊल सेंटर वाल्यांचे धूर तर तीन वेगवेगळ्या पातळ्यात विभागले होते. अमेरिकन ऎक्सेंट वाल्याने सोडलेला धूर हा ब्रिटीश ऎक्सेंट वाल्याने सोडलेल्या धूरापेक्षा दोन इंच वरच रहात होता. ढग मिळवण्यासाठे करावे लागणारे हे सगळे उपद्व्याप पाहुन मी वैतागलो. आणि वैतागुन म्हणालो सुद्धा "जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात" एवढे बोलतो न बोलतो तोच मला जाणीव झाली....मी खरंच ढगात गेलो होतो. (क्रमश:)............................................

वाचने 5905 वाचनखूण प्रतिक्रिया 8

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 17:24
हम्म्म... हे आपले विजुभाऊ स्वप्न बघतात का गंमत करतात? कुठुनही कसेही काहीही केव्हाही करतात..काय स्वप्न आहेत का "द मेट्रीक्स" ?
"ढग आणा नाहीतर आमरण उपोषणाला बसेन अशी धमकी दिली. माझ्या धमकी चा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तेथिल लोकानी उलट माझ्या सत्कारासाठी हार फ़ुले आणायला माणुस पाठवला.
:)) काय राव, बारामतीतल्या माणसांना उपोषणाच्या धमक्या देता होय? असंच होणार की मग.
"जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात" एवढे बोलतो न बोलतो तोच मला जाणीव झाली....मी खरंच ढगात गेलो होतो.
हे हे हे...चला, म्हणजे फायनली तुम्हाला ढगाची वडाप मिळाली तर :)
(क्रमश:)............................................
च्यामारी टोपी ह्या क्रमशःची! काय करावं बरं ह्या संसर्गजन्य विकाराला :?

राजे गुरुवार, 05/22/2008 - 17:35
विजूभाऊ ! हे मात्र जबरा ! त्या गाण्यात मिळणारा पैसा खोटा असतो हे ठाऊक झाल्यापासुन पाउसही गाने ऐकुन येत नाही.उलट पावसाची कशी फ़जीती झाली म्हणुन हजर असलेले दोन चार ढग कडाडकन टाळ्या वाजवतात इतकेच्. ढगाला बालकामगार म्हणुन वागवल्याची मला शिक्षा झाली असती. अजब स्वप्न प्रवास आहे तुमचा ... वाचतो आहे लिहीत जा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 20:22
ढ्ग आणायला मी "कारे मेघा कारे मेघा पानी तो बरसा" वगैरे फ़िल्मी गाणी म्हणुन पाहीली पण ती सगळी आकाशात असलेल्या ढगांना उद्देशुन होती. नसलेल्या ढगाला बोलावण्यासाठी एकही गाणे सापडले नाही. शेवटी मी "येउन येउन येणार कोण ढगाशिवाय आहेच कोण असे ओरडुनही पाहीले". निवडणुकीला उभे राहिल्याप्रमाणे वाटले:))) मस्त स्वप्नप्रवास झाला....आणि वैतागुन म्हणालो सुद्धा "जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात"वैतागून म्हटले वाटते?...कारण तिला भेटायची अजुनी आस आहे आणि ती मिळत नाही लवकर हे जाणवते.....

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 20:39
मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे.पण गिरण्यांचे मॊल झाल्यापासुन तेथले हवामन स्वच्छ झाले आणि ढग नाहीसे झाले होते. खरं आहे हो! भीषण सत्य...किती लोक बेरोजगार झाले ..:( आता मॆचेस एकाचवेळेस इतक्या ठिकाणे असतात की नक्की कोठी जायचे असा ढगांनाच प्रश्न पडतो. झक्कास! क्रिकेट मॅच च्या कॉन्सेप्ट्चीच वाट लावलेय अगदी हल्ली...तुमच्याशी सहमत... स्वगतः आता कुठला मार्ग उरला बर? पत्रातून पोचायचा? एखाद्या पक्षाच्या पाठीवर बसून वगैरे उडतील विजुभाऊ पुढच्या स्वप्नात?

पिवळा डांबिस Fri, 05/23/2008 - 02:26
ए विजुभाव, तुजा भेजा मंजे शाला असली हाय हां! हे क्लाऊडच्या आयडिया लयी चोक्कस!! हल्ली "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक वाचुन ही झोप येत नसे त्यापेक्षा काहीतरी स्ट्रॊन्ग् उपाय करायला हवा तेच्यासाठी तू शाला दुसरे साईटवर का गेला? इथे मिपावरच्या समदा पोएट्री वाच्यला असतां ना तर कुंभकरण सारखा झ्योपला असता सिक्स मंथ!!:) मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे. हां! आपन तिथेच मिलमदी काम केला, विव्हिंगमाष्टर!! तीस वरस सर्विस करून रिटायर झ्याला. अरे पन त्ये कालच्या ढगच वेगला!! असला मरियल नवतां!! मी मराथी गाण्यांचा शोध घेतला. पन तरीही निराशाच. मराठीतही ढगांना बोलावण्यासाठी एकही गाणे नव्हते. काय गांडी वार्ता करते? तू "ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" कवा ऐकला नाय के? माजा ते लई फेवरिट गाना हाय! अजूनपन मुंबईथी नलाला पानी नाय आला तर मी निस्ता ते गाना म्हनते आनि आंगाला पावडर लावते!!:) कॊल सेंटर वाल्यांचे धूर तर तीन वेगवेगळ्या पातळ्यात विभागले होते. अमेरिकन ऎक्सेंट वाल्याने सोडलेला धूर हा ब्रिटीश ऎक्सेंट वाल्याने सोडलेल्या धूरापेक्षा दोन इंच वरच रहात होता. ते शाला तुमच्या घाटी तात्या लोगच्या तसाच हाय! जरा इंग्लीश आला तर लगेच ऍक्सेंट मारते! आता मी बघ किती झकास मराटी बोलते, जरापन ऍक्सेंट हाय काय?:) आपण स्वत:ला बाटलीत बंद करुन घेउ आणि ती बाटली समुद्रात फ़ेकुयात हे मस्त सुच्यवला! आता तू जास्त बोर करायला लागला की तुलाच्य बाटलीत भरून बाटली दरयामधी फेकून नाखू या! शाला घंपतीबाप्पा मोरया!!!:)) बाकी हा पोर्शन लिवलाय च्यांगला! ते फायरवोल वगेरेपेक्षा घणा सरस! आपल्याला आवडला!! सिन्सियरली, यलो दांबिसवाला

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Fri, 05/23/2008 - 03:22
तू आज ते पेस्तनकाकाची श्टोरी ऐकली दिसते, बराबर के? ते तू ऐकली ना के मग असाच होउन जाते, थोदा वेल टायपिंगमदी पन गुजराति इफेक्ट येते! ए तो अपनु भाईकाकानो जबरा इफेक्ट छे! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Fri, 05/23/2008 - 06:39
नाय मंजे ते तुमचा लोगचा भाईकाका तर ज्यबरदस्त खराच, आमी त्येचा बराच बुक वाच्यला हाय!! पन आमी हे शिकला आमच्ये एक प्रोफेसरकडून! आमी झेवियरला असताना बे साल त्याच्या हाताखाली रिसर्च प्रोजेक्ट केला होता... शाला तेच्या डोका घणो सूपीक, आपले हे विजुभावसारखाच, पण आटाबी सटकलेला, आपले हे **भावसारखाच!! (विजुभाव, ते तुमच्ये क्लाऊडपेक्षा हे लाईटली घ्या!!:) अरे, हे तर आमी अगदी सिंपल राईट केला, एकबी पारसी-गुजराती गाळी नाय दिला! शाला हे न्हल्ली-न्हल्ली डिकरी लोग हे साईट वाच्यते, आपल्याला "काका" बोलते, उगाच तेनला एंबरेसमेंट नको शाला!!:)) परफॅक्ट जंटलमेन, यलो दांबिसवाला. पीएसः ए चतुरंग! ते पारसी-गुजरातीमदी "इफेक्ट" नसते, "इफॅक्ट" असते! :)) ट्यूशन लावते का माझी ट्यूशन, आं!!!:))

बकुळफुले Sat, 05/24/2008 - 10:22
शिवाय पाउस पाडण्या अगोदर डकवर्थ-लुइस चा नियम समजून घ्या असा आदेश काढला गेला तर काय ? या धास्तीने ढगानी मॆचला येणेच सोडुन दिले होते. =)) हे बेष्टच हो विजुभौ. बाकी हा नियम भडकमकर क्लासेस मधे समजाउन सांगतात का हो? हे वाचुन आनंदीत झालेली बकुळफुले