मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ८

अवलिया · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागील भाग - http://misalpav.com/node/16883 *** अनेक कथा कादंबर्‍या आपण वाचतो. काही आवडतात, काही आवडत नाहीत. काहींचा काही भाग आवडतो. कुणाला त्याबद्दल सांगायला जावे तर आवडली किंवा आवडली नाही किंवा ठिक आहे.. पण या दोन तीन ठराविक प्रतिक्रियांपलीकडे आपली सहसा मजल जात नाही. जाईलच कशी? जे काय कळले आहे, जे काही समजले आहे त्याला शब्दांचे रुप तर देता आले पाहीजे ! हे काही सहजसाध्य नसते. मग कुणीतरी कधीतरी असंच आपण वाचलेल्या कथा कादंबर्‍यांबद्दल काहीतरी लिहीतो आणि आपल्याला असे वाटते की अरे हे तर मला मांडायचे होते तसेच आहे. किंवा ज्या काही गोष्टी नीटपणे स्वतःला उमजल्या नव्हत्या त्याच गोष्टी हा लेखक मांडत आहे. नकळत आपण त्याच्या म्हणण्याला मुकपणे संमती देत जातो आणि त्याच्या विचारांच्या मांडणीचे कळत नकळत फॅन होतो.
महाजन बाईंची आधीची गाजलेली कादंबरी "ब्र" मी वाचलेली नव्हती. त्यानंतर प्रकाशित झालेली प्रस्तुत कादंबरीच मी आधी वाचायला घेतली. अलिकडच्या काळातली लक्षांत राहिलेली , मनावर दीर्घकाळ परिणाम करणारी कादंबरी असे तिचे वर्णन उचित होईल. आता हे पुस्तक महाराष्ट्रात कितपत "बेस्टसेलर किंवा टीकाकारांनी प्रशंसा केलेले " आहे याची मला कल्पना नाही. पण माझ्यापुरते हे पुस्तक महत्त्वाचे आहे. तर अलिकडे काही नवीन लेखकांनी लिहिलेल्या कादंबर्‍या वाचताना थोडे कडुगोड अनुभव आलेले होते. "बाकी शून्य" , "नातिचरामि" या कादंबर्‍यांनी तर पार धुलाई केलेली. (यातल्या पेठे यांच्या कादंबरीच्या (माझ्या व्यक्तिगत दृष्टीने ) अनपेक्षित अशा अपेशामुळे तर जीभ जास्त पोळलेली.) त्यामुळे , तुलनात्मक दृष्ट्या काहीशा नव्या अशा या लेखिकेची नवी कादंबरी हातात घेताना काहीसा साशंक होतो. कर्णोपकर्णी आलेल्या , अंधुकशा माहितीनुसार हे पुस्तक "एड्स्"वर आहे इतकेच ऐकले होते. पुस्तक वाचायला घेतले आणि पहिल्या २-३ पानांत त्याने मला ताब्यात घेतले. "एड्स्"ने ग्रस्त अशा एका स्त्रीची कहाणी आणि त्या कहाणीला अनुसरून , तिच्या सहवासातल्या अन्य स्त्रियांच्या कैफियती असे , स्थूलमानाने याचे स्वरूप सांगता येईल. कादंबरीचे चार भाग आहेत. प्रत्येक भाग आत्मनिवेदनात्मक.
अधिक वाचा - http://misalpav.com/node/6202 *** जे कथा कादंबर्‍यांचे तेच चित्रपटांचे. माध्यम भिन्न असले तरी रसास्वाद तर समानच असतो.
सर्वप्रथम सांगायचे तर हा चित्रपट पहाणे हा अतिशय आनंददायक अनुभव बनला , याचे कारण , चित्रपटाच्या टायटल्स पासून शेवटच्या प्रसंगा-फ्रेम पर्यंत जपलेली अर्थपूर्णता. (सटल्टी ला योग्य मराठी शब्द काय ?) हिंदी चित्रपट बर्‍याचदा गाळून गाळून पहावा लागतो. अर्थहीन तण कापत कापत. इथे म्हणजे प्रत्येक प्रसंग आस्वाद घ्यावा असा. या चित्रपटाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल केलेली ही एक टिप्पणी आहे. आणि ही टिप्पणी आहे अर्थातच , नर्मविनोदी. इथल्या माणसांमधल्या , त्यांच्या व्यवहारांमधल्या विसंगती, स्पर्धा, स्वार्थ , असूया , खोटेपणा , यशापयश, नातेसंबंध, त्या संबंधांमधला तात्पुरतेपणा इ. इ. बद्दलची टिप्पणी. आणि यात कुठेही , भडक, बटबटीतपणाचा स्पर्श नाही. म्हणजे , प्रसंगी माणसे बटबटीत वागतात, ढोंगीपणा दाखवतात ; पण त्याचे चित्रण मात्र अगदी अलगदपणे केलेले आहे. किंवा एरवी ढोंगी , बटबटीत वागणार्‍या कुणाचे ठसठसते दु:ख कधीकधी व्यक्त होते. या चित्रपटाचा मला सगळ्यात आवडलेला पैलू म्हणजे , ही नजाकत. अशा छोट्या छोट्या क्षणांना शब्दबंबाळपणा किंवा आचरटपणा यांचा शाप नाही. चित्रपटात उपरोक्त सर्वात महत्त्वाच्या दोन पात्रांशिवाय अक्षरशः डझनावारी पात्रे आहेत. ऋषि कपूर, डिंपल , जुही चावला , संजय कपूर , हृतिक रोशन आणि नवतारका इशा श्रावणी यांच्या भूमिका या दोघांच्या खालोखाल महत्त्वाच्या. यांच्या व्यतिरिक्त शाहरुखखान पासून आमीर खान पर्यंत आणि करीनाकपूर पासून बोमन इराणी पर्यंत अनेकानेक लोकांची एकेका प्रसंगापुरती हजेरी आहे. या सार्‍यांना "ओम शांति ओम" सारखे , एकाच लांबच लांब गाण्यात गुंफण्यापुरते आणलेले नाही , तर या सर्वांच्या प्रसंगांना चित्रपटाच्या "थीम" च्या संदर्भात अर्थपूर्ण स्थान आहे. या मोठ्या मोठ्या स्टार्स च्या "कॅमीओज" इतकेच महत्त्वाचे आहेत अनेक इतर , अनोळखी सहकलाकारांचे छोटे छोटे प्रसंग. मग ती एखादी नायिकेची मैत्रीण असो , नायकाचे मित्र असोत , कुणाचे पी ए असोत , एखादी नृत्यदिग्दर्शिका असो ... कोणाच्याही छोट्याशा संवादामधे आनंद घेण्यासारखे , काहीतरी नर्मविनोदी किंवा अर्थपूर्ण असे काहीतरी आहेच. सगळ्यांना आपल्या मिळालेल्या तुकड्याचे चीज करायला मिळाले आहे. संजय कपूर , ऋषि कपूर यांना माझ्या मनात फार मोठे अभिनेते म्हणून स्थान नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या भूमिकेत ते फिट्ट बसतात , त्यांना मिळालेले प्रसंग खरोखरच एंजॉय करण्यासारखे.
अधिक वाचा - http://misalpav.com/node/7297 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो लेखक केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/303 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे मुक्तसुनीत. :) अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्ता, स्वत:चे विचार अत्यंत संयमशील आणि मृदु शब्दांमधे मांडण्याचे कसब असलेला, अनंत गोष्टींची माहिती असलेला, कुठलीही माहिती चटकन नजरेसमोर आणुन देत प्रतिसाद देणारा हा लेखक मिपाच्या रत्नांमधला नीलमणी आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. मुक्तसुनीत आमच्या या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे त्याचा लेख वाचुन युगे लोटली आहेत. बहुधा गेल्या काही दिवसांत वाचन केले नसावे. हरकत नाही. आम्ही त्याला भरपुर पुस्तकं भेट देत आहोत. त्याच बरोबर शाल श्रीफळ पण देत आहोत त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर सुरेख लेख लिहावा अशी आमची इच्छा ! बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे? श्रीफळ शाल पुस्तकं दुकानांचे पत्ते श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-treasure-shawl-1.jpg. पुस्तकं - http://3.bp.blogspot.com/_ebSEkWOkRfQ/TOGVddwIjHI/AAAAAAAAA18/hMU8InWPgmQ/s1600/books2.jpg क्रमशः (पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)

वाचने 3875 वाचनखूण प्रतिक्रिया 14

स्वाती दिनेश 22/02/2011 - 18:58
मुसुंनी बरेच दिवस विश्रांती घेतलेली आहे, आता मात्र वाट पाहत आहे.. नानांचा आदरसत्कार मान्य करुन मुसुंनी लवकर लिहिते व्हावे.. स्वाती

धमाल मुलगा 22/02/2011 - 19:02
मुसु अजुन आहे होय? मी तर असं ऐकलंय की मुसुने संजीवन समाधी घेतली आणि त्याच्या गुहेशी नंदनने शिळा लोटली.. त्यानंतर दोघांनीही काही लिहिलेलं ठाऊक नाही बा. :D

In reply to by धमाल मुलगा

अडगळ 22/02/2011 - 19:12
काय सांगताय काय धमालराव पण आता चानुस घावलाय तर दोन ओव्या गाऊन घेऊ . धमा म्हणे दिनकर , पावलासे अस्त , बाप मुसेश्वर , समाधिस्त. ठोब्बा रख्माय.

रमताराम 22/02/2011 - 19:45
मुसुंनी लेखनसंन्यास का घेतला असावा यावर स्वतंत्र काथ्याकूट टाकायचा विचार आहे. अवांतरः शालीचा फटू पाहून 'वार्‍यावरची वरात' मधल्या पुलंच्या हार घालून केलेल्या भरघोस स्वागताची आठवण येऊन र्‍हायली ना भौ. ;)

शुचि 22/02/2011 - 20:20
मुसुंचा वहाणा हा लेख खूप आवडला होता. कारण त्या लेखाने वाचकाला विचारप्रवृत्त केले आणि मन मोकळे करायची संधी दिली. मुसुंनी स्वतःचे लिखाण तर करावेच पण प्रतिक्रिया तरी किमान प्लीज जरूर जरूर द्याव्यात. अतिशय उत्तम प्रतिक्रिया आम्हाला सदैव वाचायला मिळाव्यात. त्यांच्या प्रतिक्रिया यासुद्धा लेखाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात मग त्या - कोपरखळ्या मारणार्‍या (= या वाक्यातील कर्ता , कर्म, क्रियापदं जत्रेत हरवलेल्या मुलामाणसांप्रमाने हरवली आहेत - सौजन्य पुलं) असोत की चिंतनीय = ("कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" बस्स. पूर्वग्रहांचे , पूर्वसंस्कारांचे चष्मे जमतील तसे बाजूला ठेवून सामोरे जाणे. हे नेहमी जमत नाही. परंतु "काशीस जावें नित्य वदावें".) असोत. आम्ही त्यातून खूप आनंद लुटतो.

श्रावण मोडक 22/02/2011 - 20:27
हं. खरंय... च्यायला, या मालिकेमुळं सारखं उठून नानाशी सहमत म्हणण्याची वेळ आलीये राव. ;)

निखिल देशपांडे 22/02/2011 - 20:32
नाना ने आत्तापर्यंत निवडलेले एक सोडून सर्व मिपाकर डोक्यात जाणारे पटले बुवा... मुसुंनी आता काहीतरी लवकरच लिहावे हीच इच्छा!!!

निवांत पोपट 22/02/2011 - 20:47
मुक्तसुनीतसाहेबांच्या लिखाणाचा मी फ़ॅन आहे. सॉफ़्ट आणि संयत लयीतील नेमक्या शब्दांची त्यांची लिखाण शैली कुणालाही प्रभावीत करेल अशीच आहे. त्यांनी भरपूर लिहावे.

मनिष 24/02/2011 - 23:54
मुसु आणि नंदन ह्यांचा मीही मोठ्ठा फॅन आहे, मुसु - पुन्हा लिहा काहीतरी! :-)