Skip to main content

किल्ल्यांवरची हागणदारी...!

किल्ल्यांवरची हागणदारी...!

Published on रवीवार, 23/01/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार गेल्या पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा! नाणेघाट म्हणा किंवा हरिश्चंद्रगड, राजमाचीला मोठ्या पठारवजा जागा तरी आहेत पण रतनगडावर मुक्कामाच्या गुहांच्या जवळपास सपाटी नसल्याने (..आणि मुळातच रतनगडावर सपाटीचा भाग अतिशय कमी आहे) आणि जोडून कसल्यातरी आलेल्या सुट्ट्यांमुळे मुक्कामी असलेल्यांची संख्या मोठी असल्याने प्रातर्विधीच्या कार्यक्रमाला काहीच शिस्त नव्हती. रतनगडावर दरवाजा ओलांडून वर आलं की उजवीकडे वरील बाजूस राणीचा हुडा नांवाने ओळखला जाणारा गोल बुरूज आहे. तिथून थोडं डावीकडे वर पाण्याची टाकी आहेत. रतनगडावर मुक्कामी असणार्‍यांना पिण्यासाठी या टाक्यांचं पाणी सर्वात जवळ..! या टाक्यांजवळ कोंबड्यांच्या पिसांचा पसारा आणि इतर मद्य-मांसाहारी घाण टाकलेली होती. ( ..हा त्रास माहुलीलादेखील होतो) इथून मागील बाजूस जाणार्‍या पायवाटेवरच हागणदारीला सुरुवात झाली होती. आमच्याबरोबर दोघे- तिघे रतनगडाचे पहिलटकर होते, त्यांनी ही घाण पाहून तिथूनच कलटी मारायच्या गोष्टी सुरु केल्यावर मात्र त्यांना चुचकारत कसं तरी पुढे नेलं. पुढील गडदर्शनाने गेलेला मूड परत आला हा भाग वेगळा पण हा अनुभव वाईट्ट होता. गडावरील जाण्यायेण्याच्या वाटा, स्मारके इ. जागा टाळून मंडळींनी आपले विधी उरकायला हवेत . ..पण हल्ली होतं कांय की सुट्टीच्या दिवशी अनेक गट किल्ल्यावर मुक्कामी असतात, त्यांत वर वर्णिलेली जनताच भरपूर असते. सकाळी पॉटघाईच्या वेळी जागा शोधायला वेळही नसतो अशा वेळी मुक्कामी असलेल्या प्रत्येक गटाच्या नेत्याने आदल्या रात्री आपल्या गटाला प्रातर्विधीच्या जागेबाबत सूचना देणं अपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिवार्य असतं. ते होत नाही आणि मग किल्ला दर्शनाच्या वेळी हा सगळा त्रास सोसण्याची वेळ बाकी जनतेवर येते. आता बायोडिग्रेडेबल वगैरे असलं म्हणून कांय कुठेही टाकायचं की काय? काही सूचनांचा अवलंब केला तर खूप त्रास कमी होईल. त्या म्हणजे - आदल्या दिवशीच नेत्याने सर्व सहभागींना योग्य जागा दाखवून ठेवावी. मुली/ महिलांना वेगळी जागा ठरवून ठेवावी. महत्त्वाची सूचना म्हणजे दगडाने छोटा खड्डा करावा आणि विधी आटोपल्यावर वर माती टाकावी. याचे कारण एखादा कँप असेल आणि प्रातर्विधीची जागा जरी लांब असली तरी कँपवर माशांचा त्रास होतो तो होत नाही, हा अनुभव आहे! किमान एवढया सूचना अवलंबल्या तरी आपले व इतरांचे गडदर्शन सुखकर होईल. खरं तर हा खरडायचा विषय नव्हे पण भोग भोगल्यावर तितकाच महत्त्वाचा वाटला म्हणून खरडलं.
लेखनप्रकार

याद्या 2901
प्रतिक्रिया 12
हागणदारीचे फोटु नाही टाकलेत ? :) लेख अजुन प्रभावी झाला असता !! शंका : एखाद्याला जर इमर्जन्सी आली किंवा दगड ऐनवेळी भेटला नाही , किंवा "वापरलेला" दगड भेटला , तर यावर गटप्रमुख ह्या नात्याने काही माहिती शेयर करणे शक्य होईल काय ? -(प्रश्नग्रस्त) टारझन

हे गड आता इतीहासातच जमा व्हायला पाहीजेत. आमच्या सरकारने महाराजांची आठवण कायम यावी म्हणून समुद्रात स्मारक बांधायचे ठरवले आहे. मग असल्या गोष्टींची गरज काय???? X( ;)

गेंड्यासारख्या जंगली प्राण्यांना जे जमते ते प्रगत(?) माणसांना जमु नये? दुर्दैव, दुसर काय...

विषय महत्त्वाचा आहे. या संदर्भातली सोप्या भाषेतली सर्वसाधारण नियमावलीचा बोर्ड बनवून घ्या आणि तो त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारी लावून टाका. सही म्हणून रतनवाडी - पंचायत असे लिहा. शिवाय शौच जागा जेथे आहे तेथे पुरुष आणि स्त्री असेही बोर्ड बनवून घ्या व ते विचारपूर्वक तुम्हाला जेथे योग्य वाटतात तेथे लावा. महत्त्वाची सूचना म्हणजे दगडाने छोटा खड्डा करावा आणि विधी आटोपल्यावर वर माती टाकावी. याचे कारण एखादा कँप असेल आणि प्रातर्विधीची जागा जरी लांब असली तरी कँपवर माशांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो तो होत नाही. हे वाक्यही टाका. मांसाहारी भोजनानंतर कचरा टाकण्याची जागा मुक्रर करून द्या. तेथे तशी पाटी लावा. शिवाय किल्ल्याचा इतिहास ४ ओळीत देऊन ' अशा पवित्र ठिकाणी मद्यप्राशनास पूर्ण बंदी आहे. दारू प्यायलेले आढळल्यास प्रत्येकी रु.५००० दंड. आणि सार्वजनिक ठिकाणे मद्यप्राशना बद्दल पोलिसात दिले जाईल.' अशीही नोटीस तेथे लावता येईल. पाणी चांगले का राखले पाहिजे या विषयी थोडक्यात माहिती द्या. मुक्कामी असणार्‍यांना पिण्यासाठी पाणी. कचरा टाकल्यास रु. ५००० दंड असा बोर्ड तेथे लावा. गडाच्या वाटेवरही ' तुमचा कचरा तुमच्या घरी/ गावी घेऊन जा!' असे बोर्डही ठिक-ठिकाणी लावता येतील. तुम्हाला चांगले काम केल्याचे समाधान मिळेल. आणि प्रबोधन विनासायास होत राहील. शिवाय बोर्ड आहे म्हंटले की इतर लोकही जरा ताठ मानेने नियम दाखवू शकतात. गडावर तसा अधिकार स्थानिकांचा म्हणजे रतनवाडीचा आहे. त्यामुळे सही, रतनवाडी ग्रामस्थ अशी असल्यास उत्तम. अश्या पाट्या लावल्याने गडाची शोभा जाते असे वाटत आक्षेप असतील, तर कचराकुंडी आणि हागणदरी करून शोभा परत मिळते का?, असे विचारा म्हणजे ते आपोआपच गप्प होतील. योग्य सूचना आणि मार्गदर्शन असेल तर अनेकदा गोष्टी बर्‍यापैकी आटोक्यात येतात. हे सर्व करण्यापूर्वी भंडारदरा पोलिस स्टेशनला कल्पना देऊन ठेवा. त्यांना फुकट बकरे मिळणार असल्याने ते आनंदी होतील. ग्राम पंचायतीला या भावात दंड मिळणार असल्याने ते ही आनंदी होतील आणि नियमावली राखू लागतील. रतनवाडीच्या अमृतेश्वराच्या मंदीरात एक बाबाजी आहेत/होते. त्यांनाही कदाचित यात सामील करून घेता येईल. रस्त्यात मंदिराजवळही हेच बोर्ड लावता येतील. याउप्पर काही 'धन्य पोहोचलेली' मंडळी असतीलच त्यांना जागेवरच टोले देता येतीलच. यासाठी धमु आणि टारझन महत्त्वाचे मार्गदर्शन आपल्याला करू शकतील.

रतनगडावर हाच अनुभव आम्हालाही आला होता. विशेषतः अगदी जिथे आपण कात्रा कडा बघतो तिथल्या छोट्याश्या खंदकातही लोकांनी घाण करून ठेवली होती. या लोकांनी आता मांजराचा आदर्श घेतला पाहिजे असे वाटते. अवांतरः रतनगडाचे फोटोंसहीत वर्णन येउ दे रे बाबा.

शक्यतो दुर्लक्षित किल्ल्यांकडे जावे म्हणजे अशा गोष्टींचा त्रास होत नाही.

चांगला विषय. एकेकाळी अप्रूपाच्या समजल्या जाणार्‍या आणि पाय ठेवणं दुरापास्त वाटणार्‍या एव्हरेस्टवरसुद्धा आता ट्रेकिंग वाढल्याने हा घाणीचा प्रॉब्लेम वाढत चाललाय आणि कचर्‍यासोबत चोर्‍या, लूटमार, वेश्याव्यवसाय हेही एव्हरेस्ट बेस्कॅम्प ते काही टप्प्यापर्यंत चालू झाले आहेत हे मधे वाचनात आलं होतं.

भोर,वेल्हा मावळ,सातारा इ. भागात हा त्रास कमी झालाय. गावोगावी स्थानिक ग्रामस्थांची किल्ले संवर्धन/संरक्षण समिती स्थापन केल्यामुळे हा त्रास कमी झालाय. गडावरील कचरा साफ करणे,किल्ल्या वरील पाण्याच्या टाक्या मंदिरे साफ करणे,मार्गदर्शक फलक लावणे इ. कामे केली जातात. तसेच गडावर येणाऱ्या ट्रेकर्स ना आगाऊ सूचना दिल्या जातात - १) गडावर मंदिराच्या आसपास मांसाहार करू नये. २) मद्यपान निषिद्ध आहे. ३) पाण्याची टाकी स्वच्छ ठेवावीत. ४) गडाचे पावित्र्य राखावे. ५) आपल्या ट्रेक ग्रुप ची नोंदणी गावातील ऑफिस मध्ये करावी ६) गडावर कोणतेही अश्लील चाळे करू नयेत ७) बुरुज,तट,दरवाजा कोठेही नावे कोरु नयेत (निर्मात्यांनी आणि राखणदारांनी सुद्धा आपली नावे टाकली नाहीत हे लक्षात घ्यावे ) वर दिलेल्या सूचना एकदाच सांगितल्या जातात,कारण दुसर्यांदा या सूचना हॉकी स्टिक आणि बेसबॉल स्टिक च्या मदतीने सांगण्यात येतात. विशेषत: २ री आणि ६ वी सूचना न पाळणार्यांना आम्ही येथेच्छ तुडवतो. अश्या प्रकारे प्रेमाच्या सूचना आम्ही रोहीडा,राजगड,रायरेश्वर,केंजळगड,तोरणा इ. ठिकाणी अनेकदा दिल्या आहेत. स्थानिक नेते,शिवप्रेमी आणि पोलीस यांच्या सहकार्यातून या समित्या आता गावोगावी होत आहेत.