लिंगबदल (आणखी एक गोष्ट)
अर्जुनाने द्रुपदाचा पण जिंकला व द्रौपदी त्याची पत्नी झाली. पण भावाभावात तंटे उद्भवू नयेत म्हणून तिने इतर चौघा भावांचा स्विकार केला व ते नाते अतिशय समर्थपणाने सांभाळले. तिच्या बाजूने तिने स्वच्छ व्यवहार केला केवळ अर्जुन हा पती रहावा म्हणून ! तिला प्रत्येकाकडून एकएक मुलगाही झाला. तिने पत्नीधर्म सांभाळला पण पांडवांनी त्याप्रमाणे काही त्याग केला का ? तसे दिसत नाही. धर्म, भीम, नकुल व सहदेव यांनी आणखी एकएक राजकन्या पत्नी म्हणून घरात आणली व त्यांना मुलेही झाली.(हिडिंबा धरली तर) भीमाच्या बायका दोन. पण कहर केला तो अर्जुनाने. त्याने सुभद्रेला पळवून तिच्याशी लग्न केले व उलुपी व चित्रांगदा ह्या आणखी दोन बायका केल्या. आजच्या आपल्या कल्पने प्रमाणे हा द्रौपदीवर उघड उघड अन्याय झालेला दिसतो. पण त्या काळी तसे धरले जात नसावे. सुभद्रा पहिल्यांदी घरी आली तेव्हा द्रौपदीला भेटावयास कसे जावयाचे हा मोठा प्रश्न होता. सुभद्रा नवयौवनसंपन्न राजकन्या होती व अर्जुनाने तिच्या रूपाकडे पाहून तिला वरले हे द्रौपदीला खटकणारे होते. मोठ्या काव्यात्मक भाषेत तिने अर्जुनाला आपली खंत दाखवली आहे. " अर्जुना, इकडे कशास येतोस ! ती यदुकन्या सुभद्रा असेल तिकडे जा. माझ्यापेक्षा सुभद्रेवर तुझा अधिक लोभ जडला हे स्वाभाविकच झाले. ओझे एकदा घट्ट बांधिले असले तथापि त्यास पुन्हा दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच ! तेव्हा नव्या प्रेमाने जुने प्रेम शिथिल होणे साहजिकच आहे." सुभद्रेने राजवस्त्रे न नेसता साधा गोपवधूवेष धारण केला व द्रौपदीकडे जाऊन 'मी तुमची दासी आहे" असे विनयाने सांगितले. द्रौपदीने आढी सोडून तिचा स्विकार केला. नंतर अर्जुनाने उलुपी व चित्रांगदा यांच्याशीही विवाह केले. पण यावरून अर्जुन हा स्त्रीलंपट होता असे म्हणता येणार नाही. याला दोन गोष्टी साक्षी आहेत. तो विराटाच्या मुलीला नृत्य-गायन शिकवावयला एक वर्ष होता. विराटावरचे संकट निवारून जेव्हा पांडव प्रकट झाले तेव्हा विराटाने आपली मुलगी त्याला पत्नी म्हणून देऊ केली. त्या वेळी तो म्हणतो,"ही माझी शिष्या म्हणून, मला ती मुलीप्रमाणे आहे. मी तिचा स्विकार सून म्हणून, अभिमन्यूची पत्नी म्हणून करीन ." दुसरी कथा हा आजचा विषय आहे.
पांडव वनवासात असतांना त्यांनी भविष्यात आपणास कौरवांशी युद्ध करावे लागणार आहे व त्या वेळी भीष्म-द्रोण यांसारख्या अस्त्रवेत्त्यांशी लढावयाचे आहे हे ध्यानात घेऊन असे ठरले की अर्जुनाने हिमालयात जाऊन स्वर्गीय देवांकडून त्यांची अस्त्रे मिळवावीत. मोठ्या कष्टाने सर्वांचा निरोप घेऊन अर्जुन एकटा हिमालयावर गेला. तिथे त्याने प्रथम शंकरांकडून पाशुपतास्त्र मिळवले व नंतर इंद्राच्या सांगण्यावरून तो इतर देवांकडील अस्त्रे मिळवण्याकरिता स्वर्गात गेला. तेथे इंद्रगृही राहून त्याने सर्व देवांकडून त्यांची अस्त्रे शिकून घेतली. नंतर इंद्र त्याला म्हणाला की चित्रसेन गंधर्वापासून तू गायन,वादन नृत्यही शिकून घे. पुढे एके दिवशी अर्जुनाची दृष्टी उर्वशीवर जडली आहे असे कळून आल्यावरून इंद्राने चित्रसेन गंधर्वाबरोबर उर्वशीला निरोप पाठवला व तीला अर्जुनाकडे जाण्यास सांगितले. ती नटूनथटून रात्री अर्जुनच्या मंदिरात आली. रात्री स्त्री आपल्या मंदिरात आल्यामुळे साशंक झालेल्या अर्जुनाने तिला प्रणाम करून वडील मनुष्याप्रमाणे तिचा सत्कार केला. तो म्हणाला "हे देवि, काय आज्ञा आहे सांग, हा दास तुझ्या सेवेविषयी तत्पर आहे." त्यावर उर्वशी म्हणाली " इंद्रदरबारी एकदा सर्व श्रेष्ट अप्सरांचे नृत्य चालू असतांना तू केवळ एकट्या माझ्याकडेच टक लावून पहात होतास.तेव्हा इंद्राच्या निरोपावरून तो व चित्रसेन या उभयतांच्या अनुमोदनाने मी येथे प्राप्त झाले आहे. मीही तुझ्या गुणाच्या योगाने अंत:करण आकृष्ट झाल्यामुळे मदनाच्या अधीन होऊन, तुझी सेवा करावयास आले आहे." तिचे हे बोलणे ऐकून अर्जुन लज्जेने व्याप्त झाला व कानांवर हात ठेऊन बोलू लागला, " हे सुमुखी, तूं मला खास गुरूस्त्रीसारखी वा इंद्रपत्नी सची
प्रमाणे आहेस. मी तुझ्याकडे का पहात होतो ते ऐक. ही आमच्या पौरववंशाची जननी आहे हे ऐकल्यावर आनंदित होऊन तुझ्याकडे पहात होतो.हे कल्याणि, आमच्या वंशाची अभिवृद्धिही तुझ्यामुळे झाली असल्याने तूं मला गुरूपेक्षाही गुरू आहेस.मजविषयी तूं भलत्याच प्रकारची कल्पना करू नकोस." यावर उर्वशी म्हणाली, " हे वीरा, आम्हा अप्सरांस कोणाचाही प्रतिबंध नाही.पुरूच्या वंशातले जे पुत्र किंवा नातू स्वर्गात येतात ते आम्हाला रमवतात. त्यात त्यांना दोष लागत नाही,मदनाने माझ्या शरीराचा भडका उडवून दिला असल्याने विव्हल होऊन गेले आहे." यावर अर्जुन म्हणाला "मी खरेच सांगतो ते तूंही ऐक, सर्व देवता, दिशाही ऐकू देत. भूलोकी कुंती किंवा माद्री, ह्या स्वर्गात सची तशी तूं मला आहेस, तू माझ्या वंशाची जननी असल्याने जास्तच मान्य आहेस. मी तुझ्या पायांवर मस्तक ठेवतो, जा तूं येथून.
तूं मला जननीप्रमाणे असल्याने तूं माझे पुत्राप्रमाणे रक्षण केले पाहिजेस." उर्वशीने क्रोधाने अर्जुनाला शाप दिला, "तुझ्या पित्याने अनुज्ञा दिली असून मी कामाच्या अधिन होऊन आपण होऊन तुझ्याकडे आले असतांना तूं ज्या अर्थी मला मान देत नाहीस त्या अर्थी तू
पुरुष नाहीस अशी प्रसिद्धी होऊन षंढाप्रमाणे बायकात नृत्य करीत फिरशील." ती रागारागाने नोघून गेली.
सकाळी त्याने चित्रसेनाला व चित्रसेनाने इंद्राला रात्रीची हकिकत कळविली. इंद्राने अर्जुनाला बोलावून घेऊन त्याचे सांत्वन केले. इंद्र म्हणाला " तूं आपल्या धैर्याच्या योगाने ऋषींच्यावरही मात केली आहेस. हा शाप अभिष्ट गोष्ट घडवून आणणारा आहे. अज्ञातवासांत असतांना
एक वर्ष तुला नर्तकाचा वेष व पुरुषत्वाचा अभाव प्राप्त होईल व वर्षाने तू परत पुरुष होशील." इति. (महाभारत, वनपर्व,अ.१४४-१४६.)
(१) शिखंडी स्त्रीचा पुरुष झाला तर अर्जुन एका वर्षापुरता पुरुषाचा क्लैंब झाला.
(२) कौरव-पांडव हे पुरूच्या वंशातले म्हणून पौरव. उर्वशी पुरूची पत्नी होती.
शरद
वाचने
4982
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही आमच्या पौरववंशाची जननी आहे
ते उत्तरेकडुन आले होते, माहित
In reply to ही आमच्या पौरववंशाची जननी आहे by मृत्युन्जय
धन्यवाद श्री. शरदजी एक शंका
निरसन
In reply to धन्यवाद श्री. शरदजी एक शंका by परिकथेतील राजकुमार
आणखी एक शंका: द्रौपदी व
आणखी एक शंका..
In reply to आणखी एक शंका: द्रौपदी व by नगरीनिरंजन
मुद्दामच ठेवलं असेल तिथे.
In reply to आणखी एक शंका.. by योगी९००
मिष्टीक
नियम
शंकेचे निराकरण केल्याबद्दल
In reply to नियम by शरद
गचाळ पर्याय कलीयुगातील
In reply to नियम by शरद
ह्या बार्बरिकाकडे कृष्णाने
In reply to गचाळ पर्याय कलीयुगातील by परिकथेतील राजकुमार
माझ्यापेक्षा शरदजी अधिक
In reply to ह्या बार्बरिकाकडे कृष्णाने by आळश्यांचा राजा
घटोत्कचपुत्र
In reply to माझ्यापेक्षा शरदजी अधिक by परिकथेतील राजकुमार
अधिक स्पष्टीकरण हवे.
In reply to गचाळ पर्याय कलीयुगातील by परिकथेतील राजकुमार
वि.म. बुक कं च्या महाभारत
In reply to अधिक स्पष्टीकरण हवे. by प्रचेतस
ज्यान पण जिंकुन द्रौपदी
दोन्ही भाग वाचले,नविन माहिती