Skip to main content

अरे विठ्या विठ्या ...

लेखक अवलिया
Published on गुरुवार, 28/10/2010
संत जनाबाई. महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा, भक्तीमार्गदर्शन या हेतुन प्रेरीत होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव. नामयाची दासी, दासी जनी, जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधुन विठ्ठल भक्तीत अखंड रममाण झालेली एक स्त्री संत. कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी. एक ना अनेक अशी तिची रुपे आपल्याला तिच्या अभंगातुन पहायला मिळतात. कधी विठ्ठलाचे गुणगान करतांना जनी त्याला लेकुरवाळा म्हणते आणि सारे तिचे सखे सोबती हे जणू काही विठ्ठलाची लेकरे आहेत असे समजुन तल्लीनतेने म्हणते - विठु माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा अहाहा ! काय ही एकेक लेकरे ! प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा कौतुकाने यांना खेळवत असेल हे नि:संशयच. ती वयाने लहान असली तरी समज आणि जाणिवेने महान अशी चौघे दैवी लेकरे आणि त्यांचे सोबती विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर एखाद्या अल्लड नातवाने आपल्या आजोबाच्या अंगावर बागडावे अशाच प्रेमाने आणि आपुलकीने बागडत आहेत आणि जगाच्या दृष्टीने तो सर्वेसर्वा, परमेश्वर असला तरी या नातवांसाठी तो पोराहुन पोर झाला आहे. नातवांना खेळवणे हा खरोखर आजोबांच्या आयुष्यातील आनंदाचाच क्षण असतो. पण ही मंडळी जरी विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळत असली तरी जनी त्यांना विठ्ठलापासुन वेगळे समजत नाही. जनीच्या दृष्टीने विठ्ठलच विविध मानवी रुपांमधे आला असुन त्याची लीला दाखवत आहे. जनीला हे उमगले आहे की संत हेच देव आणि दगडाचा देव हा केवळ प्रतिकात्मक आहे. पण हे सांगतांना जनी एकापेक्षा एक सुंदर दाखले देते. पाणी, ढग समान आहेत, माती धुळ समान आहेत इत्यादी दा़खले देत जनी म्हणते असेच संत आणि देव समान आहेत. इतक्या सरळसोपेपणाने जनीने सांगितले आहे की अडाण्याहुन अडाण्याला सुद्धा ते चटकन कळावे. पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काय या दोन्हीपणीं वेगळीक माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न असे साक्षात देवस्वरुप असलेले संत जेव्हा एकत्र येतात तेव्हा विठ्ठल सुद्धा सर्व काम सोडुन त्यांच्यात येउन रहातो. नाम संकिर्तन चालले असतांना विठ्ठल स्वतः त्यात रंगुन जातो तर मानवाची काय कथा ! आणी मग जनी सांगते अशा विठ्ठलाला सुद्धा रंगात रंगवुन टाकणार्‍या संतानाच शरण जावे. अर्था ज्या संताला शरण जायचे त्याची परिक्षा करुनच मग शरण जावे केवळ भगवी वस्त्रे ल्यायलेल्या मनुष्याला नव्हे. संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचें जो जिव्हार ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला ध्यावें असे कृपाळु संत उपदेश करतात. येणारी व्यक्ती कशी आहे, काय आहे, ती कितपत खोल पाण्यात आहे हे खरा संत बरोबर ओळखतो. टप्याटप्याने उपदेशाचा डोस संत वाढवत नेतात. कुणाच्याही श्रद्धा एकदम विचलित न करता हळु हळु त्याला उन्नतीच्या मार्गावर कसे न्यायचे हे संतांना ठाउक असते. त्यामुळे संत एकदम कूणालाच उपदेश करत नाहीत. एकमुखाने सर्व संत आधी नामाचे महत्व सांगतात. रोज मुखाने देवाचे नाव घ्यायची सवय लावतात. मनुष्याला खरोखर बुद्धी आणि अहंकारामुळे मी केले असा गर्व असतो तो नामाने, देवाचे नाव घेतल्याने कमी होतो असा अनेकांचा अनुभव आहे. संत हेच शिकवतात. नाम घेता घेता अहंकार कमी होतो. अहंतेने बुद्धीवर आलेले जळमट बाजुला झाले की मनुष्याचा सारासार विचार जागृत होतो. संत अशा पद्धतीने योग्य रितीने नांगरट झालेल्या जमिनीत शिकवणुकीचे बीज पेरतात आणि मग बघता बघता डोलदार पीक येऊन तो मनुष्य साधकाचा सिद्ध होतो. योगी होतो. संतपदाला पोहोचतो. पण हे सर्व सुरु होते नामापासुन म्हणुन जनी सांगते - जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक वाचे नाम विठ्‌ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा नाम तारक त्रिभुवनीं । ह्मणे नामयाची जनी पण नुसते नाव घेऊन उपयोग नाही. तोंडाने नाव घेत आहे आणि मनात भलते विचार आहेत. अशावेळेस ते नाम घेणे हा फक्त उपचार होतो. कर्मकांड होते. अशा रितीने आयुष्यभर जरी नाम घेत बसले तरी त्याचा उपयोग शून्य होणार. कारण तेथे भाव नाही. आणि देव भावाचा भुकेला ! मग जर भाव असेल, मुखी नाम असेल आणि कर्मेंद्रिये त्यांचे कार्य योग्य रितीने करत असतील तर देव धावत येणार हे निश्चितच. जनीने खात्रीच दिलेली आहे - देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा सर्व सुखाचा सागर । जनी ह्मणे शारंगधर असा हा भावाचा भुकेला देव मग भक्ताची काळजी घेतो. भक्ताला काळजी करायची गरजच रहात नाही. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखानेच मिळालेले आश्वासन आहे "योगक्षेम वहाम्यहम्". काळजीच नको. एखाद्या बालकाप्रमाणे भक्त निश्चित होऊन जीवन जगतो. बालकाप्रमाणे का ? तर बालक ज्याप्रमाणे कुठलीही चिंता न करता जगत असते कारण त्याला माहित असते आपल्याला भुक लागली तर आई आहेच आपली काळजी घ्यायला ! आणि आई आपल्या बाळाची काळजी घेतेच. विद्यारण्य स्वामींनी मातेची, जगदंबेची स्तुती करतांना म्हटलेच आहे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति | जनी हाच दृष्टांत कसा देते बघा ! ती म्हणते घार ज्याप्रमाणे उंच आकाशात उडतांना सुद्धा आपल्या पिलावर लक्ष ठेवते, तिच्यासाठी चारा आणते, वानरी पिलाला पोटाशी घेऊन वनांतुन, झाडांवरुन उड्या मारत फिरते पण पिल्लाला पडू देत नाही, आई कामात असली तरी तिला बाळाचे रडणे चटकन ऐकु येते, लगेच त्याच्यापाशी जाउन काय दुखले खुपले ते पहाते तसेच विठ्ठल मायेच्या ममतेने आमच्याकडे पहातो असा आम्हाला विश्वास आहे. पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं तैंसी आह्यासी विठ्‌ठल माये । जनी वेळोवेळां पाहे असा विश्वास असलेली जनी आपले नित्य नैमित्तिक कार्ये सोडत नाही. घरची कामे, दळण दळणे , केर काढणे हे जनी सगळे करतच आहे. पण विठ्ठ्लाच्या चरणाशी तिचे मन एकरुप झाल्याने तिला खात्री आहे की ह्या कामात तिचा विठ्ठ्ल तिला मदत करत आहे. त्यामुळे तिला कामाचा भार काहीच वाटत नाही. अगदी आनंदाने ती पडेल ते काम करता करता विठ्ठलाचे नाम स्मरण करत आहे. कूणी विचारलेच अग जनी येवढे काम तु एकटीच कशी करतेस? तर ती सांगते मी कुठे केले सगळे काम? माझे बरेचसे काम तर विठ्ठलानेच येऊन पूर्ण केले. बघा काय सांगते जनी - झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला आपल्यामूळे विठ्ठलाला त्रास सहन करावा लागतो या भावनेने जनी मनात ओशाळलेली आहे. त्यामुळे तिला आता संसारच नको वाटतो. त्या दीनांच्या नाथाचे, कनवाळु मायबाप विठ्ठलाचे उपकार किती काळ घ्यायचे या विचाराने जनी अस्वस्थ झाली आहे. तिला आता त्याच्या चरणांची आस लागली आहे. विठ्ठलाला किती काळ त्रास द्यायचा असे म्हणुन जनी म्हणते - आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण नारिरुप होउनी हरी । माझें न्हाणें धुणें करी राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी या सगळ्या प्रवासात जनीला अनेक सोबती मिळाले. त्यांच्या सहाय्याने जनी तत्वज्ञान शिकली. सांख्य तत्वज्ञानानुसार प्रकृती आणि पुरुष हे नित्य (कायम असणारे) पदार्थ असुन पुरुष चेतनारुपाने तर प्रकृती जड किंवा अचेतन रुपाने आहे असे मानले जाते. प्रकृतीत विकार किंवा बदल घडल्याने दृश्य सृष्टीची निर्मिती झाली अर्थात प्रकृती हेच उत्पत्तीचे कारण आहे. मुळतः प्रकृतीत जे अनेक चांगले वाईट बदल घडुन येतात त्यानुसार प्राप्त होणा-या अवस्थेला सत्व, रज आणि तम गुण असे मानुन ही सृष्टी तीन गुणांची आहे असे प्रतिपादन सांख्य करतात. पुरुष हा चेतन रुपात असला तरी तो केवळ साक्षीभावाने असुन तो स्वतः काहीही करत नाही. चेतनरुपातील पुरुषावर काल, स्थळ यांचे काहीच विकार होत नाहीत. हे विकार होतात प्रकृतीवर. जग प्रकृतीपासुन उगम पावुन त्यातच विलिन होते. पुरुष साक्षीभावाने असतो. हेच जनी थोड्या ग्राम्य शब्दांमधे सांगते - अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी अरे विठ्या ! अरे विठ्ठला ! बघा इथे जनी निर्गुण पुरुषाला विठ्ठल असे संबोधुन हा विठ्ठल योगमायेच्या आधाराने सगुण झालास. साकाररुपाने प्रकृतीचे व्यक्त रुप झालास. तुझे निर्गुणत्व प्रकृतीत विलिन झाले. पुरुष म्हणजे परमात्मा तोच तो विठ्ठल पण मायेच्या आधाराने निर्गुणत्व नाहीसे झाले. नवरा नाहीसा झाला म्हणून बायको रंडकी (विधवा) होते. म्हणजेच विठ्ठलाचे (पुरुषाचे) निर्गुणत्व गेले त्यामुळे त्याची बायको (प्रकृती) तिचे सौभाग्य गेले. पण विठ्ठलाचे नित्य स्वरुप, अनादिअनंतत्वअजन्माअजरत्व गेले नाही. त्याचे 'सत चित् आनंद् ' स्वरूप कायमच आहे. म्हणून प्रकृती जन्मसावित्रीसारखी अखंडचूडेमंडित, सौभाग्यवतीच आहे. विठ्ठला समोर काळाचा महीमा तो काय? परमेश्वर कालातीत आहे. अशी ही जनाबाई. महाराष्ट्रातील संतांच्या मांदीयाळीतील एक अग्रणी नाव.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 10883
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

अरे वा वा! सुंदर! येऊद्यात आता असेच काही लेख. संतांची, त्यांच्या साहित्याची ओळख अशी लेखमाला येऊदेत.

मस्त विवेचन केलं आहेस! आवडलं :)

ह.भ.प. नानामहाराजांचं बर्‍याच दिवसांनी आख्यान लावायचं ठरवलं आणि त्यांचं हे निरुपण ऐकुन आम्ही गावकरी तृप्त झालो. :) छान नानबा! मस्तच. मी ह्याला लेख नाही म्हणू शकत..हे माझ्यादृष्टीनं निरुपणच. आणखी लिही नानूस आणखी लिही! भरपूर लिही...महाराष्ट्राच्या संतसाहित्यात कित्येक हिरे दडले आहेत, त्याची आम्हा आंधळ्यांना मुळीच पारख नाही....निदान ते हिरे आम्हाला उजळवून तरी दाखव. ब्बोला.... पुंडलीक वरदाऽऽऽ.............

In reply to by धमाल मुलगा

पण सुहासने म्हतल्याप्रमाणे पुढच्या लेखांमधे संतांचं व्यक्तिमत्त्व थोडं उलगडून दाखवलंत तर "सोने पे सुहागा".

वाह ! He Is Back :) नानुडी हेच रे हेच हवे तुझ्याकडुन. जबरदस्त लिहिले आहेस :)

"जगातलं मनातलं" मध्ये नानाचं नाव पाहून बरं वाटलं होतं! हे निरूपण वाचून आनंदीआनंद झाला! धम्याशी खंप्लीट सहमत आहे. मस्त रे नानबा!

असेच सत्कार्य करत रहा. ताकद कारणी लागेल. :)

लेख संत जनाबाईवर :)

In reply to by यशोधरा

चोखा मेळ्यावर लिहिणार?
+१ त्याशिवाय, बहुजनसमाजातील इतरही संत आणि महाराष्ट्रामधे भागवतधर्माच्या संतांनी एकंदरीतच जातीभेद मोडून केलेला प्रसार याबद्दलही लिहिले तर ते आवडेलच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया, चोखामेळा ह्यांच्याविषयी लिहिण्याची विनंती करताना, जातीभेदविषयक/ निर्मूलनात्मक काही लिहावेत अशी खरं तर माझी विनंती नाही. मला चोख्याच्या मनःशांतीचे मनापासून आकर्षण वाटते. त्याला कमी का त्रास झाला? पण त्याने कोणाला शिव्याशाप दिले नाहीत. त्याच्या मागची व्यावहारिक व्यवधाने सुटली नाहीत, तरीही त्याची भक्ती खंडली नाही. त्याचा मृत्यूही सामान्याप्रमाणे झाला, त्यानंतर जरी तात्पुरते मोठेपण मिळाले, तरी तो पायरीचा महार, द्वारीचा कुत्राच राहिला! पण त्याला खंत नव्हती. त्या त्याच्या अखंड अनुसंधानाचे मला कौतुक आणि आकर्षण वाटते. कुठून आणली असेल इतकी आंतरीक शक्ती? इतका ठाम विश्वास? जातिभेद वगैरे मुद्दे आहेतच पण ह्या मुद्द्यांवरुन लिहा, असे सुचवायचे होते.

In reply to by यशोधरा

मला चोखामेळ्याबद्दल सहमती आहेच पण त्या अनुषंगाने अवलिया यांना अजून काही लिहिता येईल असे सुचवावेसे वाटले ते इथेच लिहिले. त्याकरता वेगळा प्रतिसाद लिहिला नाही एवढेच. या निमित्ताने एखादी बहारदार लेखमाला होऊन जाईल एवढाच उद्देश. त्याचा या विषयाचा अभ्यास आहे हे मला माहित असल्याने असे सुचवले.

म्हणलं तर थोडक्यात पण फारच छान ओळख! अजून येउंदेत ही विनंती!

ह्यातले काही काही अभंग आधी ऐकल्यासारखे वाटत आहेत. मात्र त्याचे आज वाचलेले निरुपण झकासच. उपक्रम आवडला, पुढे अशाच लिखाणाची वाट बघतो आहे. अनेक थोर संतमहात्मे आणि त्यांचे लिखाण बाकी आहे, पुलेशु. वाट बघत आहे हे तर आहेच. अवांतर : मलापण ह्या विषयावर लिहायचे आहे, वेळ मिळाला तर ह्या जनाबाईच्या लेखाच्या अनुषंगाने माहितीत अजुन भग घालेन :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

हेच म्हणतो. उत्तम लेख.

जनाबाईच्या रचनांची ओळख आवडली.

अवलिया साहेब, आपला लेख खूप आवडला. संत जनाबाईं बद्दलच्या माझ्या माहिती मध्ये भर. आभार. दिवाळी पाहाट ला आकाशवाणी / दूरदर्शन वर किर्तने असतात , त्याचे जणू "कर्टन रेझर ".

व्वा! आता प्लिज थांबू नका. लेखमाला येऊ दे.

>> येणारी व्यक्ती कशी आहे, काय आहे, ती कितपत खोल पाण्यात आहे हे खरा संत बरोबर ओळखतो. टप्याटप्याने उपदेशाचा डोस संत वाढवत नेतात. कुणाच्याही श्रद्धा एकदम विचलित न करता हळु हळु त्याला उन्नतीच्या मार्गावर कसे न्यायचे हे संतांना ठाउक असते. >> सुरेख!!!

नाना इज बॅ़क!!! खूप सुंदर! अतिशय रसाळ आणि सुंदर केले आहे निरूपण.. खूप आवडले. आणि खूप आनंदही झाला हा लेख वाचून. आणखी येऊद्या असेच सुंदर लेख!

संतसाहित्याचे रसग्रहण हा एक आनंद देणारा प्रकार असतो. त्या आनंदात आम्हालाही सहभागी करून घेतल्याबद्दल आभार.

वर डॉनने म्हटल्याप्रमाणे काही अभंग परिचयाचे आहेत पण काही मात्र नवीनच वाचले. निरूपणात्मक लेख आवडला!! अभिनंदन!!

अवांतर : विठु माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा जरा वरचं चित्र डोळ्यासमोर आणा. सारे या विठोबाला बिलगून आहेत. कोण हाताशी , कोणी कडेवर , कोण खांद्यावर. पण ही दोघं ,या विठोबाला पण पचवलेली भाऊ-बहीण फटकून आपल्याच नादात चालली आहेत. एक सगळ्यात पुढं , आणि एक रमतगमत शेवटी. ज्ञानोबाचा तिखटपणा असा कधी तरी दिसतोच . साहाजिकच आहे .२१ पण धड पूर्ण झाली नव्हती . असाच ताटी उघडा चा प्रसंग. आणि सगळ्यावर कडी म्हणजे ज्ञानोबाची नाममुद्रा जी त्याच्या ओवी - अभंगाच्या शेवटी येते. बाप रखमादेवीवरू . मला संन्यासाचं पोर म्हणून हिणवता. हा बघा माझा बाप . हा रखमादेवीवरू. अगदी ठणकावून. (संदर्भ : नपेक्षा ,अशोक शहाणे )

नाना परत आला ! आयडी पण बदलुन नाना चेंगट कर मस्त !! लेख उत्तम आहेच. माझ्यासारख्या लोकांना यात शून्य माहिती असते, त्यांच्यासाठी हा लेख (रादर ही लेखमाला) म्हणजे पर्वणीच ! अभिनंदन आणि धन्यवाद !