Skip to main content

पत्र

पत्र

Published on 10/09/2010 - 15:11 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रिय अबक, तुला नवल वाटेल मी तुला अचानक हे पत्र लिहीत आहे म्हणून परंतु मला माझ्या भावना कागदावर उतरवणं आवश्यक बाब वाटली. कोणतही नातं हे तुमच्या जीवनात विशिष्ट हेतू, ध्येय घेऊन येतं आणि तो हेतू साध्य झाल्यावरच ते अनंतात विलीन होतं यावर माझा विश्वास आहे. तुझं नेहेमीचं मिष्कील हसू हसलास ना? नाही रे हे घोकंपट्टी केलेलं पुस्तकी वाक्य नाही. हा तर माझा स्वानुभव आहे. मला जाणवलेलं सत्य आहे हे. आपलं नातं या सत्याला अपवाद कसं असेल? आपल्यामधे तुला परस्यू मी केलं. मी तुला भेटत राहीले वारंवार, इमेल पाठवल्या, या निमित्ताने तर कधी त्या निमित्ताने मैत्री वाढविण्याचा प्रयत्न केला. तुझ्या व्यक्तीमत्वाची, तुझ्यातील कलाकाराची मला अतोनात भुरळ पडली होती, आहे. कोणी विचारलं असतं तर मला नक्की सांगता आलं नसतं पण मी ठाम होते, आहे. तू तर जात्याचा सौजन्यशील. मोठ्या मनानी तूदेखील माझी मैत्री स्वीकारलीस, दोस्तीचा हात पुढे केलास. इथवर सगळं गाडं सुरळीत होतं. खरी परीक्षा नंतर सुरू झाली. मैत्री की आकर्षण या नाजूक , निर्णयक्षम, दोलायमान स्थितीत आपण काही काळ घालवला.त्या काळात कस लागला तो माझ्या आत्मविश्वासाचा, संवादकौशल्याचा. मी आतापर्यंत जरूर वाचलेलं होतं की जोवर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोवर तुम्ही दुसर्‍यावर प्रेम करू शकत नाही. पण मला याची प्रचीती येईल असं कधीच वाटलं नव्हतं कारण इतक्या धबडग्यात स्वतःवरचं प्रेम तपासून पहाण्याची संधी मी कधी घेतलीच नव्हती. आपल्या "कोर्टशिप्"च्या काळात मी वारंवार ठेचकाळले. मला या सत्याला सामोरं जावं लागलं की मला मी कुठेतरी कमी वाटते, मी स्वतःवर टीकेचा आसूड ओढते, मला माझ्यात न्यूनच न्यून दिसतं, मी स्वतःला कुणासाठीच "गुड इनफ" समजत नाही. आणि हे असं स्वतःला मनाच्या आरशात सामोरं जाणं खूप क्लेशदायक होतं. तू जेव्हा भरभरून बोलत असायचास तेव्हा मी गप्प रहायचे न जाणो काहीतरी चूकीचं बोलून बसेन, न जाणो तुला माझे विचार अतिशय कमी बौद्धीक पातळीवरचे वाटतील. आपल्यातील अखंड सुसंवादाचा प्रवाह आपल्या बाजूनी खंडीत झालेला असायचा. तुलाही हे चूकीचं वाटायचं पण नक्की काय ते कळायचं नाही कारण तू देखील अननुभवीच तर होतास माझ्यासारखाच. आपल्या प्रत्येक भेटीनंतर माझं मन चुकचुकत रहायचं - मी हे बोलू शकले असते, मी ते बोलू शकले असते. मनाची अशा चुकचुकण्यानी फक्त अधिक शकले व्हायची. तू येण्याआधी मी एकटी होते पण आता माझ्यातल्या कमतरतांमुळे दुकटी असूनही एकाकी झाले होते. लॅकलस्टर अशी मी किती काळ तुला बांधू शकणार होते? शेवटी रेंगाळत रेंगाळत का होईना आपण या निर्णयाप्रत आलो की आपली फक्त निखळ मैत्री राहू शकते, फक्त मैत्री.. त्या निर्णयाचा अर्थ मला नीट माहीत होता.मला तुझी मैत्री नको होती कारण ते म्हणजे ओढून ताणून नातं फरफटवणं झालं असतं. म्हणून मग मी ही हळूहळू दूर गेले. आजचं हे पत्रं तुला माझी भूमिका सांगण्यासाठी. माझ्या मनात कसलाही कडूपणा नाही. आय होप यु अंडरस्टँड! ~ शुचि
लेखनप्रकार

याद्या 2107
प्रतिक्रिया 10

शब्दांत बसवलेली बीजगणिते सोडवायला खूपजणांना आवडत असेल किंवा कठिण वाटत असेल. तसे हे गणित कठिण नाही. मुलांनो सोडवा. तर अबक = ?

In reply to by प्रियाली

हा हा हा बरं आहे आमचं गणित कच्च आहे ते ;) बाकी एखादा दुसरा वेगळा धागा काढुन काही डोक्याला चालना देणारे करत असाल तर भाग घेऊ म्हणतो :)

हे असं छान, नेमक्या शब्दात मनातलं कागदावर आणता येणं म्ह्णजे मला तर एक वरदान वाटतं, असं काही वाचलं की.. अप्रतिम!! च्या मारी, आमचं मात्र सगळं ढवळलं गेलं वाचून उगाचच... :)

In reply to by माजगावकर

यमुनेच्या डोहात निवांत पहुडलेल्या आठवणींचा कालिया फुत्कार मारु लागला आणि बघता बघता डोह विषमय होऊन गेला... कधी -कधी मैत्री \ आकर्षण \ प्रेम सगळ्या भावना एवढ्या एकरुप होऊन जातात, मनाची भंबेरी ऊडते आणि चांगला हसणारा-बोलणारा पार येरवड्यात जमा होतो...

सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद. कुंडलीत प्रथम स्थान असतं स्वतःच, स्वतःच्या प्रगतीचं, कौशल्याचं आणि सप्तम असतं जोडीदाराचं. दोन्ही १८० अंशात असतात, एकमेकांसमोर. तराजूची पारडीच म्हणा ना. एकात भर जास्त घाला दुसरं वर जातं आणि व्हाइसे व्हर्सा. दोन्हींचा ताळमेळ नीट ठेवणं ही तारेवरची कसरत असते. एका घराकडे अधिक लक्ष दिलं की जुळ्याचं दुखणं असल्यागत दुसरं घर लक्ष वेधू पहाते. हा माझा अनुभव. त्यात एका घरात जास्त ग्रह पडले असतील आणि मुळातच कुंडलीत असंतुलन असेल तर विचारायलाच नको. असो. परत एकदा ज्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या त्या सर्वांचे आभार. हा धागा वाचलेल्यांचे देखील आभार.