Skip to main content

फसवणूक प्रकरण २२

लेखक अप्पा जोगळेकर यांनी बुधवार, 01/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करतो. तेथे माझ्या स्वतःच्याच बाबतीत घडलेली एक छोटीशी घटना. सुमारे २ वर्षांपूर्वी मी या कंपनीत पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून रुजू झालो. २००९ सालच्या जानेवारी महिन्यात कंपनीला एक अजस्त्र बजेट असलेले अमेरिकन प्रोजेक्ट मिळाले आणि एप्रिल २००९ मध्ये रीतसर इंटरव्ह्यू घेउन आधीच्या प्रोजेक्टवरुन या प्रोजेक्टवर मला रुजू करण्यात आले. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य हे की एखाद्या माणसाच्या क्षमतेबद्दल जराशीसुद्धा शंका आली तरी त्या माणसाला ताबडतोब कामावरुन कमी करण्यात येत असे. त्यामुळे प्रोजेक्ट जरी खूप चांगले असले तरी ती सुळावरची पोळीच होती. ५० माणसांच्या प्रोजेक्ट्मधून जवळपास १५-२० माणसांना २ महिन्यांत अशा प्रकारे कमी करण्यात आले. रेसेशन संपायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर ०९ पासून लोकांनी धडाधडा राजीनामे द्यायला सुरुवात केली. आणि मॅनेजमेंट्ची मस्ती उतरायला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंत लोकांची गयावया करण्यापर्यंत मजल गेली आणि जे सोडून गेले त्या जागी जे मिळतील ते लोक भरण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी हात सोडून बोलणी करणारे आता हात जोडून बोलणी करु लागले. मे २०१० मध्ये मला इन्क्रिमेंट लेटर देण्यात आले. इन्क्रिमेंट जूनपासून लागू होईल आणि विथ एफेक्ट फ्रॉम एप्रिल असेल असे लेटर मध्ये लिहिले होते. शिवाय हे इन्क्रिमेंट कोन्फिडेन्शियल असून कुठेही डिस्क्लोज करु नये असे सांगितले गेले. हे लपवाछपवीचे धंदे पाहून हे लोक विश्वासार्ह नाहीत अशी शंका त्याच वेळी माझ्या मनात डोकावून गेली होती. पण २८% इन्क्रिमेंटची नशा वास्तविकतेच्या जाणीवेपेक्षा जास्त प्रबळ असावी. २००९ मध्ये ४०% आणि २०१० मध्ये २८%. लॉटरी लागली आहे असंच मला वाटत होतं. जॉब चेंज करण्याचा विचार डोक्यात रेंगाळत होता तो सोडूनच दिला. जून गेला, जुलै गेला पण इन्क्रिमेंटचा पत्ता नाही. मॅनेजरला मेल टाकला तर स्पीड (या कंपनीत इन्क्रिमेंट साठी जी प्रोसेस आहे त्यास 'स्पीड' असे म्हणतात.) चालू आहे असे सांगण्यात आले.ऑगस्ट महिन्यात वैतागून मी समोरासमोर बसून काय ते रोखठोक विचारु असे ठरवले होते. पण त्याआधीच मॅनेजरने मला बोलावून घेतले. आणि गोड गोड शब्दांमध्ये तुला ४ आउट ऑफ ५ रेटिंग देण्यात येत आहे. तुझी या कंपनीला जरुरी आहे. कोणताही नविन निर्णय घेण्याआधी आमच्याशी बोलून घे. धिस इज अ‍ॅन ओपन वर्ल्ड वगैरे चर्पटपंजरी ऐकवली. त्यानंतर आमच्या कडून प्रोसेस संपायला उशिर झाला याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मीसुद्धा सलग दोन वर्षं चांगल्यापैकी रेटिंग मिळाल्याने थोडासा हवेतच होतो. शेवटी या महिन्याच्या सॅलरी मध्ये इन्क्रिमेंट रिफ्लेक्ट झाले ते १३% च्या कॅलक्युलेशने. लेखी कमिटमेंट देताना २८% आणि प्रत्यक्ष देताना १३%. तेसुद्धा इतक्या उशिरा. आणि तेदेखील विथ इफेक्ट फ्रॉम अप्रिल नाही तर गेल्या महिन्यापासून. वा! मी तर सर्दच झालो. कारण नसताना त्या लेटर वर अवलंबून राहिलो. लेखी कमिटमेंट आहे म्हणून अगदी निर्धास्तपणे विश्वास ठेवला. आता मॅनेजरला आणि एचआर ला एक खरमरीत इ-मेल पाठवणार आहे. पण त्याने काही फारसा फरक पडेल असं वाटत नाही. पण याहून अधिक काही करुही शकत नाही. आणि मर्यादेच्या बाहेर जाउन या लोकांशी पंगाही घेउ शकत नाही. आणि समजा या लेटरने फरक पडला तरी माझा काही या मॅनेजमेंटवर विश्वास राहिलेला नाही. असो. तुम्हाला असा अनुभव आला आहे का ? - (नविन जॉबच्या शोधात) अप्पा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2443
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अप्पा आपल्या हिंदूस्थानात आयटी वाल्यांची युनियन हवी रे. माझे अनुभव नंतर कधी तरी लिहीन्...लय वाईट्ट हायेत. :(

मला वाटले काळे काकांनी पुढचे भाग आउटसोर्स केले का काय... ;) >>अप्पा आपल्या हिंदूस्थानात आयटी वाल्यांची युनियन हवी रे. असो. युनियन वगैरे गोष्टी विकासाला मारक असतात असे थोर्थोर तसेच सामान्य लोकांकडून ऐकले आहे. आणखी एकदा असो. रोखठोक बोलणी हाती दुसर्‍या कंपनीचे लेटर आल्यावर करायची असतात. आयटी मधल्या लोकांनी (माझ्यासकट) आपली खूप लायकी आहे म्हणून आपल्याला खूप पगार मिळतो ही कल्पना मनातून काढून टाकावी हे बरे. आपल्याला (किंवा कोणालाही) मिळणारा पगार आपल्याकडे असलेल्या स्किलची त्या क्षणाची/काळाची गरज आणि त्या क्षणी तशा स्किल्ड माणसांची उपलब्धता यावर ठरते. कधी आपण बार्गेनिंग पोझिशनमध्ये असतो तर कधी कंपनी असते. योग्य वेळी संधी ओळखणे हे फार महत्त्वाचे. आमचा अनुभव: या आधी मी ज्या प्रोजेक्टवर काम केले ते रिमोट लोकेशनला आणि मोठे तसेच अवघड प्रोजेक्ट होते. त्यात बराच उशीर, खर्चाचे ओव्हरशूट वगैरे झाले होते. आम्ही लोक तिकडे होतो तोपर्यंत मोठे साहेब लोक तिकडे येऊन लोकांना "तुम्ही फार ग्रेट काम करीत आहात. अशा रिमोट ठिकाणी, कॉम्प्लेक्स प्रॉजेक्टवर काम करणे खूप अवघड असते. तुम्हाला याचा भविष्यात नक्की फायदा मिळेल" वगैरे गोष्टी सांगत. प्रोजेक्ट संपवून लोक परत गेले. त्यानंतरच्या अ‍ॅसेसमेण्टमध्ये याच लोकांना 'तुमचा परफॉर्मन्स वाईट होता. क्ष महिन्यांच्या प्रॉजेक्टला तुम्हा लोकांना २ वर्षे लागली" असे ऐकवले गेले. आधी कंपनीला गरज होती नंतर ती गरज उरली नव्हती.

सगळीकडे हेच चित्र आहे. आपण काहिही 'मागायला' गेलो की समोरचा नाड्तो. ...आपली लाळ गळते, हेच चुकते! कुणीतरी लालूच दाखवून फसवून जाते.... इंग्रजानी पण असेच केले, 'सिक्युरिटी' देतो सांगितले, आणी सगळ्या 'राजाना' गुलाम बनवून टाकले........ आयडियली आपणच 'मालक' व्हायचे, साधी चहा-मिसलपाव ची टपरी टाकली तरी चालेल, ( स्वतत्र उद्योगधंयाच्या शोधात असलेली) माउ

...आपली लाळ गळते, हेच चुकते! इकडे लाळ गळत नाहीये. मी ऑलरेडी सगळ्यां साहेब लोकांना विशिष्ट ठिकाणी मारलं आहे. आणि लेखाचे स्वरुप तक्रार किंवा माझ्यावर अन्याय झालाय म्हणून उर बडवण्यासाठी नाही. एका फसवणुकीची माहिती असावी म्हणून हे लिहिले आहे. माझा आक्षेप अमुक इतकं इन्क्रिमेंट द्यावं यावर नाही. खोट्या कमिटमेंट बद्दल आहे. असा खोटेपणा हा जगरहाटीचा भाग आहे याचीही मला जाणीव आहे. मला त्याचा अनुभव प्रथमच आला तो शेअर करावासा वाटला इतकंच. श्री थत्ते - समाजात चोर असतात हे वास्तव मला मान्य आहेच. पण म्हणून त्या चोराचा चोर असण्याचा हक्क मान्य करणे हे मला जमणार नाही. - साहेबाला **वर मारणारा

In reply to by अप्पा जोगळेकर

>>समाजात चोर असतात हे वास्तव मला मान्य आहेच. पण म्हणून त्या चोराचा चोर असण्याचा हक्क मान्य करणे हे मला जमणार नाही. अप्पा, मी वर जे उदाहरण दिलं त्या प्रोजेक्टच्या काळात पेपर टाकून पगार ५०% वाढवून घेऊन राजीनामे मागे घेतलेली 'व्हिक्टिम' मंडळी पण होती. तेव्हा जेव्हा तुम्ही ऐरण असता तेव्हा सोसायचे, आणि घण असता तेव्हा घाव घालायचे हीच दोन्हीकडून जगरहाटी आहे.

In reply to by नितिन थत्ते

मी वर जे उदाहरण दिलं त्या प्रोजेक्टच्या काळात पेपर टाकून पगार ५०% वाढवून घेऊन राजीनामे मागे घेतलेली 'व्हिक्टिम' मंडळी पण होती. नोकर लोक झोल करतंच नाहीत असा माझा दावा नाही. माझ्या एका मित्राने नुकतीच एक कंपनि जॉईन केली आणि पंधराच दिवसात नविन ठिकाणी जाउन कंपनीला चांगलीच थुक लावली. बाकी तुम्ही सध्या घणाच्या भूमिकेत आहात असं दिसतंय.

अरे रे ! फसवणुकीचा बदला फसवणुक करुन घ्या असा सल्ला मी दिला नाही आणी तुम्ही वाचला नाहीत.

मंडळी, घण मोडून पडणार अशी चिन्हं दिसू लागली आहेत. पण सध्या तरी चिन्हंच दिसताहेत. प्रत्यक्ष काही होईल तेंव्हाच विश्वास ठेवणार. 'जितं मया' अशा समजुतीत मी राहणार नाहीच. याखेपेला लाईनीवर आले तरी 'अरे' ला 'कारे' म्हणण्याचे दुष्परिणाम पुढच्या एप्रेजलला दिसतीलच. इथून सटकणे हाच काय तो उत्तम पर्याय होय.