Skip to main content

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन

Published on 16/08/2010 - 11:19 प्रकाशित मुखपृष्ठ
ज्येष्ठ कवी श्री. नारायण सुर्वे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.. एक वेगळं जग दाखवुन संवेदना जागवणारा निर्मळ कवी आणि सच्चा कार्यकर्ता हरपला.. मनःपुर्वक श्रद्धांजली.. आत्ता त्यांच्या कविता वाचाव्याश्या वाटतायत कुणी इथे त्या देउ शकेल का.
लेखनप्रकार

याद्या 6325
प्रतिक्रिया 33

In reply to by विलासराव

अतिशय भावपूर्ण कविता तितक्याच ताकदीने गायलेली. समृद्ध व्हावे असे काही. धन्यवाद इथे हा व्हिडीओ दिल्याबद्दल.

नुकतेच विंदा आता सुर्वे. दोन मोत्ये गळाली. (शब्द अचूक आठवत नाही, चूभूद्याघ्या) 'भरल्या पोटी बघतो जर आम्ही चांद आम्हालाही कुणाची याद आली असती' अशा शब्दांत कामगार, पीडित, शोषितांची व्यथा मांडणाऱ्या; लिटरेटांच्या जगातल्या, आपल्याच फुटपाथवरच्या, गिरणीतल्या विद्यापीठात शिकलेल्या, प्रोलिटरेट कवीला गुढगे टेकवून वंदन.

In reply to by राजेश घासकडवी

खरेच, दु:खद बातमी. आणि तुम्ही दिलेल्या ओळींवरून साहिरच्या 'ताजमहल' ची आठवण झाली.

कवी सुर्वेंना मी आमच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.ए.ला शिकत असतांना पहिल्यांदाच पाहिले. त्यांनी 'तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा' ही कविता आम्हाला म्हणून दाखवली होती. तेव्हा मराठी विभाग प्रमुख असलेले डॉ.एस.एस.भोसले यांनी [आम्ही डॉ.भोसले सरांचे लाडके विद्यार्थी ] विद्यार्थ्यांची मुख्य कार्यक्रमानंतर केबीनमधे भेट घडवून आणली. तेव्हा साहित्य साहित्यिक याचे फार आकलन नव्हते. आताही फारसे नाही. पण त्यांनी तेव्हा आमच्याशी संवाद साधला होता आणि त्याचवेळी एका हातात सारखी सिगारेट पिणे चाललेले होते, हे दृष्य अजूनही डोळ्यासमोरुन हलत नाही. कवी नारायण सुर्वे एक अनाथ मुलगा. गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणी कामगाराने त्यांना सांभाळलेआणि त्यांना नाव दिले नारायण. पुढे जगण्याचा संघर्ष करतांना त्यांनी उपहार गृहात बशा विसळल्या, कधी रस्त्यावर ओझी वाहिली. कधी रेल्वेस्टेशनवर हमाली केली. असे श्रमाचे जीवन ते जगले. पुढे ते प्राथमिक शाळेत शिक्षक झाले. साम्यवादावर त्यांची निष्ठा होती. 'कामगार आहे मी तळपती तलवार आहे | सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे'' कामगारांच्या दारिद्र्य आणि त्यांच्या लढ्याचे वर्णन त्यांनी केलेले दिसते. 'ऐसा गा मी ब्रह्म' 'माझे विद्यापीठ' ’जाहिरनामा’ 'सनद’ या आणि अशा काही काव्यसंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. कवी नारायण सुर्वे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.......! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनम्र श्रद्धांजली! गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणी कामगाराने त्यांना सांभाळलेआणि त्यांना नाव दिले नारायण. पुढे जगण्याचा संघर्ष करतांना त्यांनी उपहार गृहात बशा विसळल्या, कधी रस्त्यावर ओझी वाहिली. कधी रेल्वेस्टेशनवर हमाली केली. असे श्रमाचे जीवन ते जगले. पुढे ते प्राथमिक शाळेत शिक्षक झाले. हे सगळे वाचताना आणि त्यांचा वाढता आलेख आणि समाजाला परत दिलेली देणगी बघता, आपण आयुष्यात उगाचच किती कुरकुर करत असतो असे वाटते...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवी नारायण सुर्वे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.......! असेच म्हणते. बिरूटेसरांनी यावरून अधिक लिहावे अशी विनंती करते.

In reply to by चित्रा

मोठ्या कवीबद्दल लिहिण्यासाठी जरासा वेळ घेतो आणि मग नक्की लिहितो. ''एका नव्या क्रांतीकडे, नव्या प्रकाशाकडे आमचे घोडे उधळले, तर हे देशा कृतघ्नतेचे आरोप आमच्यावर करु नकोस तुझ्या आकाशातील आम्हीही तारे आहोत हे विसरु नकोस'' - नारायण सुर्वे -दिलीप बिरुटे

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

In reply to by सुनिल पाटकर

आज स्टँडिंग ओव्हेशनच्या स्मायलीची नितांत गरज भासते आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराच्या एक्झिटला अजून दुसरे काहीच नाही समर्पक.

In reply to by सुनिल पाटकर

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले. काय कल्पनेचा आवाका, काय रुपकाचं थोरपण! सलाम!! (आचंबित)चतुरंग

वरिल व्हिडीओतील गाणे ,कविता नारायण सुर्वेंची नसून ती स. ग. पाचपोळ या कवीची आहे.

वरिल व्हिडीओतील गाणे ,कविता नारायण सुर्वेंची नसून ती स. ग. पाचपोळ या कवीची आहे. व्हिडीओमधे स्पष्ट उल्लेख आहे. नारायण सुर्वें यांनी मराठीत भाषांतर केले आहे म्हनुन. नारायण सुर्वें यांचं नाव आल्यावर मला एवढेच गाणे आठवले. बा़की मला जास्त काही माहीती नाही. कविता नारायण सुर्वेंची नसून ती स. ग. पाचपोळ या कवीची आहे. या माहीती बद्दल धन्यवाद.

In reply to by विलासराव

ही कविता मिपावरच या आधी 'मधुमति' यांनी इथे दिली होती मूळ रचनेत ताकद आहे म्हणूनच रूपांतरही इतकं भिडणारं आहे. तेंव्हा श्रेयावरून निष्कारण वाद नकोत असं वाटतं. (कुणाला मूळ हिंदी काव्य माहीत असेल तर वाचायला आवडेल.)

माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता जानकी अक्का म्हणाली, 'वळिखलंस ह्याला - ह्यो आमचा मार्क्सबाबा जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला संन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.' माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला पुढे; एका सभेत मी बोलत होतो, तर या मंदीचे कारण काय ? दारिद्र्याचे गोत्र काय ? पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला, आणि घडाघडा बोलतच गेला. परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हणालो - 'आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्व चरित्रांचेही.' तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली खळखळून हसत, पुढे येत; खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, 'अरे, कविता-बिविता लिहीतोस की काय ? छान, छान मलासुध्दा गटे आवडायचा.'

हे खरे तर अतिशय विचित्र आहे, परंतु एरवी मर्यादित प्रमाणातच आवडणार्‍या एका कवीबद्दल या क्षणी विचार येताएत : मंगेश पाडगांवकर. वसंत बापट काही वर्षांपूर्वी गेले, वर्षा-दोन वर्षांमागे विंदा , नि आता काव्यसादरीकरणामध्ये साथ देणारा हा "साथी"सुद्धा हरपला. एकाकीपणाच्या तर्‍हा अनंत आहेत खर्‍या, पण एकेका मित्राने अशी "एक्झिट" घेताना पाहून एखाद्याचे मन किती कातर होत असेल - अपार करुणा वाटते.

नारायण सुर्वेंना आदरांजली. किशोर कदम अभिनित आणि स्वतः नारायण सुर्वेंचा सहभाग असलेला त्यांचा जीवनपट मध्यंतरी मराठी आंजा वर पाहिला होता,तो बघत असताना भटसाहेबांच्या भोगले जे दु:ख ज्याला सुख म्हणावे लागले... ह्या ओळी बॅकग्राउंडला सारख्या आठवत राहिल्या होत्या. जीवनपट दुवा- नारायण गंगाराम सुर्वे स्वाती

साध्यासुध्या शब्दातून जीवनाचे जाडेभरडे मांजरपाट उलगडून दाखवणारा श्रेष्ठ कवी हरपला. त्यांनी मराठी कवितेला दिलेल्या थोर देणगीबद्दल कृतज्ञ आहे.

आताशा वर्षातन असे एक दोन दिवस मोजक्या अश्रुंनी सुरु होतात. बदललेल्या जागतिगकरणात दुपार पर्यंत विसरुन गेलेलो असतो मी यांना. असे किती लोक जिंवत आहेत आणि तेही जाणार हेही माहित असते. ते अश्रु त्यांच्यासाठी नसतात. कुठलातरी स्वतःच्या आत्म्याचा कुठलासा भाग काढुन घेतला जातोय असे वाटते. गिरणगाव राहिले नाही आणि नाहि तो समाजवाद. तसे भांडवलदारही राहिले नाहित. आत सगळेच भांडवलदार झालेत. काळ फार पुढे सरकलाय. बदलेल्या काळालाहि सुर्वे हवे असतात, विंदा हवे असतात, प्रश्न जाणा-यांचा नाहि नव्याने जन्म घेणा-यांचा आहे. पण आता ते जन्म घेत नाहित. एक मोठ्ठा काळ कधिचाच मेलाय. सुर्वेंसारख्याच्या जाण्याने तो फक्त निघुन गेल्याची आठवण करुन देत असतो.