Skip to main content

घोडचुक..

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 03/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
टारुभाऊंच्या विनंतीला मान देऊन साभार... १० वीची परीक्षा संपली आणि वारं प्यालेल्या खोंडागत आमचा कंपु ( मी, भेम्या, बैल, विव्या, प्रण्या) ऊधळला. मी रहायला कसबा पेठेत आणि बाकी सारे मैतर शनिवारातले.. सकाळची पहीली भेट ७ वाजता वाड्याच्या पटांगणात .. तेथे आत्ता सारखी प्रेमवीरांसाठी राखुन ठेवलेली हीरवी कुरणे नव्हती, होते मोकळे मैदान, सायकलचे पहिले धडे तिथेच गिरवले. तर त्या पटांगणात आम्ही सुर्य डोक्यावर येईस्तोवर मनोसक्त चेंडुफळी खेळायचो. विव्याचे आई-वडील बँकेत, त्यामुळे त्याचे घर म्हणजे आमचा खास अड्डा बनला होता. त्याच्या घरात जमुन आम्ही जाम धिंगाणा करायचो, ईतका की जवळपास रोजच समोर राहणारे बोंबलत यायचे. व्यापार, पत्ते, कुस्ती यात दुपार कशी जायची ती कळायची नाही. खेळताना मारामार्‍या या ठरलेल्या, बुध्दीबळ खेळताना सुध्दा आम्ही सोंगट्यांनी मारामारी करायचो. आमचा खास खेळ म्हणजे कुणीतरी एकानी गप्प बसायचे आणि बाकिच्यांनी त्याला हसायला भाग पाडायचे!! चार माकडे समोर असताना हसणे दाबुन ठेवणे निव्वळ अशक्य व्हायचे, पण इथे भेम्याला हसवताना आमची दमछाक व्हायची. संध्याकाळी विव्याच्या घरी नाश्ता करुनच मी भटकायला बाहेर पडायचो, नंतर गल्लीतल्या पोरांसोबत भटकुन गिळायला रात्री घरी परत ..... बघता बघता सुट्टी संपली, निकालाचा दिवस येऊन ठेपला. दोन दिवस आधीपासुनच पोटात गोळा येत होता, घरात्-दारात तीच चर्चा.. ऊत्सुकता..जीव टांगणीला लागला होता. आमचा अजुन एक वर्ग्-मित्र सात्यकी, याच्या घरी लवकर निकाल कळणार आहे ही बातमी कळताच, सकाळी सकाळी ८ वाजता त्याच्या घरी आमची टोळधाड धडकली. त्याच्या घरी माझा खास शत्रु दबा धरुन बसला होता, मी नेहमीप्रमाणे मी दारावर धडक देऊन आत शिरताच ती बया अंगावर आली आणि मी पाय लावुन सुसाट रस्त्यावर.. माझ्या मागे ती 'चिंगी'..कुत्ती कमीनी! आमचा कंपु पोट धरुन हसत माझी फजीती बघत होता. निकाल लागला आणि जगन्मान्य पध्द्तीने सायन्सला प्रवेश घेऊन, राजा धनराज गिरजीमध्ये मी आलो. इथे आम्ही विखुरलो गेलो.. भेम्या टेल्कोत ट्रेनी, विव्या कॉमर्स, बैल फर्ग्युसन आणि स्कॉलर प्रण्या मॉडर्नला.. आता आली का पंचाईत, नविन कॉलेज, नविन पोरे.. सगळी नवी सुरवात...च्यामारी आपला तर मुडच गेला. तसा पहिल्यापासुनच मी थोडा सायको, भडकू.. मित्र बर्‍याचदा सांभाळुन घ्यायचे, ईथे कोणीच नव्हते.. फुकट राडा नको, म्हणून पोरांना टाळत, लांबुन मजा बघत होतो. आमचे स्कुल-कॉलेज असल्याने पोरी पण खास नव्हत्या, अगदी नव्हत्याच म्हणा ना .. त्यामुळे मग पहिले २ महीने फक्त अभ्यास एके अभ्यास, रीझल्ट चाचणीत चक्क पहीला.. मग हळुहळु बस्तान बसले, कॉलेज फार काही ग्रेट वगैरे नव्हते, माझ्यासारखे वाट चुकलेले काही पर्या, रव्या, विशल्या एकत्र आलो. ग्रुप जमला, सगळे पण एक नंबरचे ऊनाड, पण फालतुपणा नाही, बिडी, बाटली, बाईपासुन लांबच!! पर्या राहयला तुळशीबागेत, त्याचे घर आम्हाला पर्वणीच, तुळशीबागेत कावरेच्या बाजुला आमचा अड्डा जमायचा.. पुण्यातली बहरलेली हीरवळ पहात संध्याकाळ छान जायची त्यात श्रीकृष्णची मिसळ म्हणजे सोने पर सुहागा | ग्रुपमध्ये पर्या एकदम हीरो, बोलबच्चन.. साला कुठल्याही पोरीशी बिनधास्त बोलायचा, टवाळी करायचा.. सुरवातीला पोरीशी दोन शब्द बोलायचे म्हणजे माझी जाम तंतरायची, पण पर्‍याकडुन शिक्षण घ्यायला वेळ नाही लागला. रव्या जुन्या तोफखान्यातला, त्यामुळे परत वाड्यावर टवाळक्या, पुतळ्याच्या खाली आमचा कट्टा अजुन सुध्दा कधीतरी असतो. त्यावेळी तीथे प्रेमवीरा युगुलांच्या गप्पा ऐकता ऐकता जाम मजा यायची, जमल्यास एखाद्याची खेचायचो पण. अशातच एके दिवशी सकाळी..... आमच्या मनीमाऊचा फिजीक्सचा (बाईंचे डोळे घारे, रंग गोरापान) तास चालु होता, शेवट्च्या बाकावर मी आणि पर्‍या गणिताचा गृहपाठ करत होतो, अचानक "एक्स्युझ मी, मे आय कम ईन?" कुठेतरी लांबवर मंजूळ घंटानाद व्हावा असा नाजुक आवाज आला, पाठोपाठ ती आत आली, आख्खा वर्ग जऊन काही हिप्नोटाईज झाला. साधारण ५'२", गोरीपान, थोडा उभट चेहरा, नाजुक अशी की चवळीची शेंग, चाफेकळी नाक, मोकळे सोडलेले केस, अंगावर टाईट जीन्स आणि टीशर्ट... आईग्ग! आहा, आत्ता पण काळजात कळ ऊठली!! नकळत माझ्या तोंडुन शिट्टी वाजली, गरकन वळुन तीने पाहीले, आणि आमची नजरानजर झाली आणि ते काळेभोर डोळे खोल कुठेतरी आत रुतुन बसले. अवघे दोन सेकंद.. पण सार्‍या वर्गाला कळले, ह्याची विकेट पडली, तास संपला आणि पोरांच्या चेष्टेला ऊत आला. दीवस भरात परत तीने माझ्याकडे वळुनसुध्दा पाहीले नव्ह्ते. दोन दीवस असेच गेले, मग मी जागा बदलली, मधल्या ओळीतला तिसरा बेंच, ती दारापाशी पहील्या बेंचवर.. एकटीच.. इंग्लिश मिडियमची ना, म्हणुन बाकीच्या पोरींना तिचा आणि तिच्या रुपाचा कॉप्लेक्स !! खुपदा वेळा मी तीच्याकडे बघत बसायचो, तीची नजर मात्र खाली ती खालीच, ती फीरायची ३ ठिकाणी, मास्तर, फळा आणि वही.... ती आल्या आल्या शिट्टी मारल्याने मी थोडा ओशाळला होतो, ती कशी रीऍक्ट होईल याचा विचार करुन बोलायची हिम्म्त पण होत नव्हती. तेव्हा आमचे कॉलेज सकाळचे असायचे, ७:२० ला पहिली घंटा, ७:३० ला प्रार्थना, मग ७:४० ला तास चालु. त्या गोष्टीला दोन्-तीन दीवस झाले असतील, कॉलेजला लेट झाला म्हणुन मी सायकल हाणत चाललो होतो, तर चौकात समोरुन ही! पटकन ब्रेक मारला, मनाशी म्हटले हाच चान्स आहे, सोडु नकोस... थेट तिच्या समोर, हाय म्हणालो तर ती अशी हसली की दोन क्षण मी सगळे विसरलो... नंतर काय बोललो काय नाही हे कधीच आठवले नाही!! पण मैत्री झाली.. डबे, वह्या ह्या माध्यमातुन वाढली, आता मी तीच्याकडे बघत असलो की ती पण बघायची, परत जीवघेणे हसायची.. मला वेड लागाचये... मी स्वतःला विसरुन जायचो... अहाहा, काय भारी वाटायचे तेव्हा!!! आमचा नजरा-नजरीचा खेळ सगळ्यांना समजला होता, कधी कधी मास्तर पण फिरकी ताणायचा.. मजा यायची.. ती मस्त लाजायची.. मला उगाच फुशारल्यागत वाटायचे. ती रहायची अप्परला, रोज बस स्टॉपवर उतरुन थांबायची, मी तिथे जायचो मग दोघे सोबत चालत, कधी सायकलवर कॉलेजला यायचो. जाताना रोज तीला बस-स्टॉपवर सोडायला जायचो, २-२ बस गेल्या तरी आमच्या गप्पा संपत नसत. सुरवातीला रव्या माझ्यावर जाम वैतागायचा, कट्ट्यावर रोज झाडायचा.. अभ्यास पहीला हे ठासुन सांगायचा, पर्‍या हळुहळु आमच्यातुन बाजुला झाला होता, त्याला तीच्यात इंटरेस्ट होता, पण मैत्रीला जागुन तीच्या वाटेला गेला नव्हता, पण माझ्याशी बोलणे, ग्रुपमध्ये मिक्सअप कमी झाले होते. ती सुध्दा हेच सांगायची, अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायची, त्यामुळे अभ्यासावर कधी फारसा परीणाम नाही झाला. सहामही, दिवाळी, नाताळ, तिच्यासोबत वेळ कसा गेला कळलेच नाही. सगळे कसे छान चालले होते, मला अपेक्षा नसताना एवढी चांगली सोबत मिळाली होती. आम्ही कधी एकमेकांना प्रपोझ नाही केले, तशी गरजच वाटली नाही.. रविवारी, सुट्टीच्या दिवशी आम्ही ठरवुन पर्वती, कात्रज, तळजाई कुठे कुठे भेटायचो, भटकायचो. तीच्या घरचे कडक असल्याने बहुतेक वेळा तीच गुपचुप बाहेरुन मित्राच्या दुकानात फोन करायची, कधी मी फोन केलाच तर दुपारी करायचो, त्यावेळी ती पटकन फोन घ्यायची. चोरुन फोन करताना छातीत धडकी भरायची, कड्याच्या टोकावर उभे असल्याचे फिलिंग यायचे, तीचा आवाज ऐकण्यासाठी, सर्वांगाचे कान करुन मी वाट पहायचो... ती फोन उचलुन मंजुळ आवाजात हॅलो म्हणायची आणि मी काय बोलायचे ते विसरुन जायचो... तीला कळायचे हे ध्यान लाईनवर आहे, मग कानोसा घेत हळुच म्हणायची, "अरे, बोल ना!" ती अदा, ती नजाकत, ती जादु क्या कहेने|| बॉस आपण तर त्या "अरे, बोल ना" वर जाम फिदा होतो. मी इथे मित्राच्या दुकानाच्या मागे पोत्यावर बसुन फोन करतोय, ह्या.. छे!! “मी स्वर्गात आहे आणि एखादी अप्सरा माझ्याशी संवाद करतेय असा भास व्ह्यायचा….” वार्षिक परीक्षा झाली, सुट्टी लागली, कॉलेज बंद - १२ वीचे क्लास चालु, त्यामुळे आमचे भेटणे अगदी रोज नाही तरी आठवड्यातुन २-३ दा व्हायचेच. अशातच एक दीवस कॉलेजमधुन पत्र आले, माझा टॉपचा परफॉर्मन्स अबाधित होता, पर्या, रव्या पण नंबरात होते, त्यांना पण पत्र गेली होती. आमची दोस्ती व्हायचे कारणच मुळी ते होते ना.. संध्याकाळी कट्टा जमला, भेळ्-पुरी, वडापावची पार्टी झाली.. थंड पिताना पर्याला हीची आठवण आली. ही पण नंबरात असणार, सगळ्यांना उत्सुकता होती, पण मी त्यांना टाळले कारण तीच्या घरी फोन करायची ही वेळ नव्हती हे मला तीने बजावुन सांगितले होते. मी दुसर्‍या दीवशी दुपारपर्यंत थांबणार होतो. पर्‍या नाराज झाला, पण रव्याला पटले. दुसर्‍या दीवशी मी फोन केला, तर फोन तीने घेतला, हॅलो म्हणाली पण आवाज नेहमीचा नव्हता, बोलली, संध्याकाळी भेटायचे कबुल केले. मी गेलो, पण ती आलीच नाही.. वाट बघुन बघुन कंटाळलो, घरी निघालो. डोक्यात तीचेच विचार होते, तीने आधी असे कधीच केले नव्ह्ते, कित्येकदा तीच आधी यायची, वाट पहात थांबायची नंतर तीचा खोटा रुसलेला चेहरा काय मोहक दिसायचा! पण आज काय झाले असेल, डोळ्यात कधी नाही ते पाणी येत होते, विचार करुन डोके बधीर झाले होते. सवयीमुळे यंत्रवत सायकल चालवत होतो, डोक्यातुन तीचा विचार काही जात नव्ह्ता. बाजीराव रस्त्यावरुन जाता जाता तुळशीबागेच्या गर्दीत ती ओझरती दिसली. क्षणभर वाटले भासच झाला, पण खात्री करायला थांबलो. किती वेळ शोधत होतो कुणास ठावुक, शेवटी एका विक्रेत्यापाशी दिसली, जवळ गेलो आणि हाक मारली. ती दचकली, तीला मी तीथे येणे हे पुर्णपणे अनपेक्षित होते, तीच्या आईशी तीने ओळख करुन दिली आणि काकुंनी पटकन मला बाजुला घेतले. झाले, भर तुळशीबागेत शब्दांचे आसुड माझ्या पाठीवर ओढले जाऊ लागले. माझ्यावर अकस्मात हा हल्ला होत होता, ती मख्खपणे बघत आपण त्या गावचेच नाही असे दाखवत होती, पण डोळ्यातले पाणी लपत नव्हते. काकुंचा आवाज संयमी पण त्याला कट्यारीची धार होती, जाणारे येणारे संशयाने बघायला होते.. अश्यावेळी पब्लिकची मेंटॅलिटी मला परीचयाची होती. मला मेल्याहुन मेल्यासारखे झाले होते, काही कळत नव्हते, माझे काय चुकले. काकुंनी कॉलेज मध्ये येऊन कंप्लेंट करण्याची धमकी दिली आणि मी सपशेल शरणागती पत्करली. माझ्या घरी यातले काही कळले असते तर माझ्या पिताजींनी माझी साग्रसंगीत, विधीवत खेटराने पुजा बांधली असती. नशिबाने ते प्रकरण तिथेच मिटले, आई पाठोपाठ ती जायला वळली, मी तिथेच बावळटासारखा उभा असताना अचानक तीची ओढणी जरा बाजुला झाली आणि पाठीवरचा वळ सारी कथा सांगुन गेला. माझी कवटी सरकली आणि मी जाऊन तीचा हात धरणार तोच पर्‍याने मला हाक मारली, त्याला त्यावेळी तीथे पाहुन मला जरा संशय आला आणि मी थोडा शांत झालो. त्यानी मला तिथुन कट्ट्यावर आणले, रव्या, विशाल सगळे तिथेच होते. पर्‍या बोलु लागला, माझ्याकडे आधीपासुनच तीचा नंबर होता, उत्सुकतेपोटी आम्ही नंतर रात्री तीच्या घरी फोन केला, बहुतेक तीच्या आईने तो फोन घेतला होता, पर्‍या माझे नाव घेऊन बडबडत राहीला. इकडे त्याची ट्युब पेटेपर्यंत तीच्या आईचे दीवे लागले होते. आता मला लिंक लागली आणि मी पर्‍याला धुतला.. एवढा की शेवटी रव्याने मला मारुन बाजुला केला. नंतर पर्‍या कट्ट्यावर आलाच नाही, माझे पण जाणे कमी झाले होते. कॉलेज सुरु झाले, आमचा ग्रुप परत जमला.. पर्‍या आता एकदम शांत झाला होता. ती माझ्याकडे बघायला पण तयार नव्हती, बोलणे लांबच होते. बोलायचा प्रयत्न केला तर तीने झीडकारुन टाकले, पोरांनी सांगितले तीचा बाप पहिल्या दिवशी मुख्याध्यापकांना भेटला होता. तो रोज तीला न्यायला, चौकात येऊन थांबतो म्हणे. मी नाद सोडुन द्यायचे ठरवले, मला करीयर करायचे होते. सुरवातीला तीने सगळ्या वर्गाशी संबंध तोडुन टाकले, कुणाशीच बोलत नव्हती, नंतर नंतर दुसर्या ग्रुपशी बोलायची, पण माझ्याकडे ढुंकुनही पहायची नाही. हळु हळु मी सावरलो, रव्यामुळे माझा अभ्यास सुरळीत चालु राहिला, वर्ष संपले, बोर्डाचे पेपर संपत आले आणि शेवटच्या पेपरला तीने मैत्रिणीकडुन चिठ्ठी पाठविली. आम्ही भेटलो, मला खुप काही सांगायचे होते, बोलायचे होते, ऐकायचे होते. वर्षभरात मी बरेच काही शिकलो होतो… पण तीला सगळे ठावुक होते, माझी प्रत्येक खबर तीला होती, मी तो फोन केला नाही ह्यावर तीचा गाढ विश्वास होता, मला धक्क्यावर धक्के बसत होते. केवळ माझ्या करीयरसाठी ती माझ्यापासुन लांब होती. तीच्या मैत्रिणीकडुन सगळे रिपोर्ट तीच्या घरी जात होते, तीच्या बाहेर जाण्या येण्यावर बंधने होती. बोलायचे मला होते, पण तीच बोलत होती, वळवाच्या सरींप्रमाणे बरसत होती. मला कळत होते, मी किती स्वत:त गुंतलो होतो, थोडे प्रयत्न केले असते तर कदाचित परिस्थीती बदलली असती. शेवटी म्हणाली आता ऊशीर झाला, निघते...... ती गेली... जाताना एकदा मागे वळुन बघितले... मी तीथेच बसलो होतो.. फक्त तीला पाठ्मोरी पहात! तीला अडवावे हा साधा विचारही आला नाही, आला तेव्हा ती दुर गेली होती. दोन दिवसांनी तीच्या मैत्रीणीचा फोन त्याच दुकानात आला, तिने सांगितले आदल्या दिवशी संध्याकाळच्या गाडीनी ती बेंगलोरला गेली, कायमची !!!!! अक्षरशः हादरलो, पुन्हा कोलमडुन पडलो, आठ दिवस रडलो, ऊपाशी राहीलो, नंतर सगळे शांत झाले .. मित्रांनी पुन्हा एकदा ऊभे राहण्यास मदत केली.. इंजीनिअरिंग पुर्ण केलं, नोकरीमध्ये बेंगलोरला जायला मिळाले, तिच्या मैत्रिणीकडुन तीचा पत्ता घेतला, खुप शोधले तिला, पण नाही सापडली. ती गेली ती कायमची!!! मध्येच कधीतरी तीची आठवण येते.....मग मी तळजाईला आमच्या नेहमीच्या ठिकाणी जातो, तीच्या आठवणीत रममाण होतो..वाटते तीने परत यावे.. खरंच ती परत येईल का? १-२ वर्षापुर्वी रव्याने सांगितले, तीचे लग्न झाले.. आता परत पुण्यात सेटल झाली आहे, अजुन भेटायचा प्रयत्न नाही केला.. करणारही नाही.. जुन्या जखमांच्या खपल्या काढुन तीला परत त्रास द्यावा असे वाटत नाही...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6198
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

वा. छानच प्रकटन. आता मनमोकळे झाले असेल, नाही? मौजमजा या सदराखाली लेख टाकायचे प्रयोजन समजले नाही. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी

छान प्रकटन रे. परत उभा राहीलास हे चांगले. खुद के साथ बांता: आता मिपावर पोपटांचीही फॅशन येणार तर पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

मित्रा ! फ्लॉलेस !! प्रत्येकाच्या लाईफ मधे ऐसा होता है !! लेका लेखाचं नाव सोडून सगळंच टची होतं :) ही घोडचुक कुठे ही तर त्या घोड्याची चूक !! - टारझन सेंटी

खूप छान लिखाण. कोणीही पटकन रिलेट करू शकेल असं. शेवटी 'हर्षद आनंदी' राहिल्याशी मतलब आहे. आता त्या गोष्टी आठवून ओठांवर हसू येत असेल तर समदं ठीक हाये ! शुभेच्छा

In reply to by जे.पी.मॉर्गन

"शेवटी 'हर्षद आनंदी' राहिल्याशी मतलब आहे." अगदी बरोबर आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

साला ह्या मिपावर सगळे प्रेमवीर कमनशीबीच ठरलेत रावा पहिले आमचे राजे मग टार्‍या आता आमचा हर्षद आनंदी ह्यांच्या सर्व लेखांमधे एक गोष्ट कॉमन आहे सगळ मनमोकळेपणाने लिहिते झालेत राव ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय

छान लिहलय प्रकटन...! :)

मनापासून लिहिलेले प्रकटन आवडले.

In reply to by स्वाती२

असच म्हणते. सगळ्यात चांगली गोष्ट ही की तू पक्षी संग्रहालय चालू केलं नाहीस! रेवती

In reply to by रेवती

टोमणा आवडला :) -(पक्षीसंग्रहालयातून प्राणीसंग्रहालयाकडे) टी

In reply to by रेवती

खरे तर प्रयत्न केला असता तर शक्य झाले असते, संधी पण होत्या. पण तीच्या आठवणींशी कुठेतरी ट़क्का - २टक्के प्रामाणिक असल्याने, कुठलिही पोरगी तिच्या एवढी भावली नाही. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

असच्ं म्हणते..

एवढं झाल्यावरही आनंदी आहात हे वाचुन छान वाटल...

मनमोकळ लिखाण आवडल. "घोडचुक" शिर्षक पटल नाही . सुजय

In reply to by sujay

मला अजुनही वाटते... कदाचित मी तिला थांबवले असते तर.. बरेच काही वेगळे घडले असते, म्हणुन 'घोड्चुक' आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मस्त...यापेक्षा जास्त काय बोलू शकत नाही... अरे कुणी मिपाकर सफल झालेली प्रेमकहाणी लिहेल काय??? साला सगळ्यांना राजे चावला की काय???? --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टारझनच्या पोपटाने हळू हळू सर्वांना बोलत केलेल दिसत आहे. मीनल.

भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासुन आभार.. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

त्या वेळी चिन्गी नसून सनी हा कुत्रा होता माझ्याकडे... :) असो बाकी लिखाण उत्तम..

शिर्षक सोडून सगळं लेखन प्रचंड आवडलं. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रकटण आवडले तरी कसं म्हणू.....:-( असो.... लिहीत रहा मित्रा..... बिरादरीमध्ये स्वागत आहे......:-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

लयं भारी लिवलयं !!!!!!! या गोष्टीला बरेच दिवस झाले मित्रा, त्यानंतर केलेल्या लफड्यांमधलं एखादं येऊ देत वाचकांसमोर !!! भेम्या !!

मस्त लिहिलय चुचु

खरी प्रकटनं वाचायला आवडतात,... डीटेलिंग आवडले.. शंका : तुझं नाव घेऊन तिला घरी फोन करण्याचं तुमच्या परममित्राचं कारण काय होतं? तुमच्या चालत्या गाडीला ब्रेक लावणं?

एकदम भावुक. प्रेमभंग झालेला माणूसच समजु शकेल रे बाबा तुझे दुख

तुझा लेख वाचून मला माझे जुने दिवस आठवले. इथे आमच्या चालत्या गाडीला ब्रेक माझ्या घरच्यांनीच लावला ..... (राज्य हरवलेला ) वरुणराजे

खतरनाक .. शब्द फुटेनात..अगदी सुरेख झाला आहे लेख.. पण जरा धावता आढावा झाला हा.. एकदम डीटेल मध्ये येऊ द्या की! एवढा प्रेमभंग होऊनही हर्षद आनंदी?? मानलं पाहिजे!
तीचे लग्न झाले.. आता परत पुण्यात सेटल झाली आहे, अजुन भेटायचा प्रयत्न नाही केला.. करणारही नाही.. जुन्या जखमांच्या खपल्या काढुन तीला परत त्रास द्यावा असे वाटत नाही...
हृदयस्पर्शी! भावुक करून गेले हे वाक्य..