Skip to main content

असा अनुभव यावा म्हणूनच का?

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 10/11/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अ‍ॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले. पुढच्या गाड्या जसजशा पुढेपुढे गेल्या तशी मीही त्यांच्या मागून मार्गक्रमण करत पुढे गेले. फोडलेली बस आणि त्याशेजारी खाऊ की गिळू अशा अवतारात असलेल्या संतप्त लोकांचा घोळका प्रत्यक्ष बघण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग... मनात चर्र झालं माझ्या अगदी. अजिबात वेळ न दवडता गाडी पुढे दामटली मी. उण्यापुर्‍या नेहमीच्या एका तासाच्या प्रवासाला तब्बल पावणेतीन तास लागले. रस्त्यात असेच संतप्त जमाव अनेक ठिकाणी बघायचे नशिबी आल्याने मी मनातून जाम टरकले होते. माझ्या परिसरात माझी गाडी प्रवेशताच 'घर जवळ आलंय..' असे वाटून नेहमीचा वाटणारा आगळा आराम वाटला नाही कारण सगळीकडे मिट्ट काळोख होता. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख. इथेही असेल का एखादा संतप्त जमाव.. हीच धडधड होती मनात. नको नको तेच विचार मनात यायला लागले माझ्या. गाडीच्या आणि मग मोबाईलच्या उजेडात घरात सुखरूप जाऊन पोहोचले पण हृदयाची धडधड मात्र कायम होती. थंडी आणि भीतीने थरथरत अनाशा पोटीच झोपायच्या आधी मोबाईलच्या उजेडात डायरीत इतकेच लिहिले .. "अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबल्यावर थकून घरी परतताना असा अनुभव येण्यासाठीच का मी पाळते सगळे कायदे आणि भरते सगळे कर?"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21173
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

ऐकून सगळेच बरोबर आहेत असे वाटायला लागले आहे. :( पण तेही खरे नव्हे. श्री. प्रकाश घाटपांडे यांच्या प्रतिसादाशी सहमत. सार्वजनिक मालमत्ता ही सर्वांची असते, म्हणूनच तिच्या नुकसानाचा अधिकार कोणालाही नाही. खरे तर मराठी/हिंदी असा हा प्रश्नच नाही, प्रश्न आहे प्रसिद्धीचा - ती देखील जितक्या लवकर मिळवता येईल त्याचा. बाकी वेदश्रीताईंना झालेल्या त्रासाबद्दल वाईट वाटले. तरी असे दंगलीसारखे काहीही घडलेले नसताना पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सोयीची नसल्याने, एकही रिक्षा थांबत नसल्याने, रात्रीच्या वेळी, पुलाच्या खाली, झीब्रा क्रॉसिंगवरही रस्त्यातले एकही वाहन बाजूला अडकलेल्यांची दया येऊनही थांबत नसल्याने लहान मुलांसकट तब्बल पंधराहून अधिक मिनिटे अडकण्याचे सुख (!) अनुभवलेले असल्याने हे जे सामान्यांना वेठीस धरणे आहे, ते अगदी दंगल होत नसतानाही घडल्याचा, तेही सामान्यांनीच सामान्यांना वेठीला धरण्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे वेदश्रीताईंच्या भावना कळू शकतात. (यात कुठच्याही शहराला नावे ठेवण्याचा उद्देश नाही, ही कृपया ध्यानी घ्यावे, नाहीतर चर्चा भलतीकडे जाईल). तरीही (मुंबईकर असल्याने असाच सपाटून पडणार्‍या पावसाच्या वेळी अडकण्याचा अनुभव असल्याने) एक न मागता सल्ला - गडबड चाललेली असताना लवकरात लवकर घरी सुखरूप पोचावे अशी इच्छा असणे अगदी योग्य आहे, पण त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरू नये (हे स्वतःच्या अनुभवावरून). ऑफिसमध्ये थांबण्यासाठी जागा असल्यास किंवा मूलभूत सोयी (बाथरूम, पाणी, सुरक्षा, किंवा वीज इ. )असल्यास काही विश्वासार्ह व्यक्तींबरोबर तेथेच बाहेरची स्थिती बदलेपर्यंत थांबणे चांगले. नसल्यास जवळ राहणार्‍या मित्रांच्या/नातेवाईकांच्या घरी जाणे/ थांबणे चांगले. (पुणेकर/मुंबईकर/मध्य रेल्वेकर) चित्रा

छान चर्चा. एकूण दीड तास मस्त गेला!!!