मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - या ज्योतिषाचं काय करायचं ?

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
या ज्योतिषाचं काय करायचं ?
सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत. मग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती? वैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत? हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते. समजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय? एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय? हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही. फॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी ... या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय? रामसे बंधूंच्या भयपटांचे 'थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना. भविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का? हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्योतिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला. भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.
मटका ज्योतिष
मटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का? हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर? सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना! ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब! ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला? असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! पाहुणा संपादक : प्रकाश घाटपांडे.

वाचन 32735 प्रतिक्रिया 42
Permalink

घाटपांडेसाहेबांचा अग्रलेख आवडला. त्यांचे विचार आणि भूमिका यांची कल्पना असल्याने ज्योतिषशास्त्र अथवा त्याचा वापर करणारे यांच्याबद्दल लिहीलेले विचार वाचताना शेवटी ते जेंव्हा स्वतःच भाकीत करतात तेंव्हा मजा वाटली...:) त्यांनी ज्योतिषशास्त्राला मरण नाही हे सांगताना दिलेले सिगरेटचे उदाहरण मात्र चपखल आहे. वास्तवीक या संदर्भात मला कायम एकच वाटते की एखादी गोष्ट जर व्यसन नसली तर काही बिघडत नाही...(डिसक्लेमरः मला सिगरेट आणि ज्योतिषशास्त्र दोन्ही व्यर्ज आहेत!) ज्योतिषशास्त्राच्या विरोधात असलेले अनिस सारखी मंडळी जणू काही प्रत्येक ज्योतिषी हा फसवतच असतो असे गृहीत धरतात. वास्तवी़क असे बरेच ज्योतिर्विद असतात की ज्यांना प्रामाणिकपणे ते जे काही बोलतात ते शास्त्राधारीत वाटते. या उलट सिगरेटच्याच काय पण अगदी औषधाच्या कंपन्या पण शास्त्राधारीत अपायांची कल्पना असूनही जाहीराती करून करून सामान्यांना त्यांच्या उत्पादनाच्या व्यसनात बळी पाडतात. पण त्या विरुद्ध कधी कोणी आवाज काढल्याचे ऐकलेले तरी नाही. (एकदातर त्यात अंधश्रद्धा निर्मूलनात साथ देणार्‍या कलाकार लागूंचा अभिनय आणि त्यापुरती डॉक्टरकीची पदवीपण वापरली गेली ज्यामुळे लागूंची औपचारीक का होईना डॉक्टरकीचे रजिस्ट्रेशन काढून टाकावे लागल्याचे आठवते - पेशाचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट). बाकी या अग्रलेखामुळे "आकडे लावणे" आणि त्यातील प्रचलात असलेले शब्द समजले हा एक विशेष फायदा ;)
Permalink

वाचनीय लेख ... आवडला... मटका आणि ज्योतिष यातलं साधर्म्य वाचून मौज वाटली... जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! हेही १०० % पटले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
Permalink

भविष्य सांगता येणे , "क्रिस्टल बॉल" सारख्या संकल्पना , "टाईम ट्रॅव्हल" या सार्‍या गोष्टीनी युगानुयुगे आपल्याला आकर्षित केले आहे. विज्ञानाने यातल्या काही गोष्टींचे स्पष्टीकरण सांगितले तर काही गोष्टींमधला फोलपणा दाखवला. आणि असे काही असले तरी त्यातले आकर्षण काही संपत नाही. मला वाटते, या सार्‍या गोष्टींकडे आपण चूष म्हणून पहायला काहीच हरकत नाही. (मूळ लेखात उदाहरणे आली आहेतच . सिगारेट , फँटसीज ....) आपल्या "माणूसपणा"पासून आपण एकदम स्वतःला असे सहजासहजी विलग नाहीच करू शकणार. प्रश्न तेव्हा येतो , जेव्हा या श्रद्धा/विश्वासांचा संबंध गरीब , निरक्षरांच्या पिळवणूकीशी , त्याना नागविले जाण्याशी येतो. तिथे मात्र अंनिस चे काम महत्त्वाचे ठरायला लागते. र. धों. कर्वे यांच्यासारखे लोक आस्तिक्याची यथेच्छ निंदा करताना पहाण्यात येते तेव्हा इतक्या बुद्धिमान माणसाना बाकी काही समजले तरी मानवी स्वभाव , आपल्यावर पडलेला या विश्वासांचा घट्ट पगडा तेव्हढा समजला नाही असे वाटले. ज्या समाजाच्या उन्नयनासाठी हे लोक त्यांच्यावर विवेकवादाच्या काठीचा प्रहार करत असतात, नेमक्या त्या समाजाने त्याना आयुष्यभर झिडकारले या सगळ्यातील विसंगतीने विषण्ण तर व्हायला होतेच , पण त्याबरोबर त्याच काळात जगलेल्या गाडगेमहाराजांचा मोठेपणा अजूनच मोठा वाटायला लागतो. मला वाटते , प्रबोधनाच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा शत्रू जर हा अज्ञानाचा अंधःकार असेल , तर प्रबोधकांच्या "सेल्फ राइचस्-नेस"(self righteousness)च्या धोक्यालासुद्धा कमी लेखून चालणार नाही ... प्रकाशकाकांचे अनेक आभार. त्यांच्यासारखे लोक म्हणजे अज्ञानाचा अंधःकार आणि इतरांची पर्वा न करणारा मूठभर बुद्धिवंतांचा गट यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा होत. मिपा वर त्यानी जास्त जास्त लिहावे ही त्याना प्रार्थना !

जेव्हा या श्रद्धा/विश्वासांचा संबंध गरीब , निरक्षरांच्या पिळवणूकीशी , त्याना नागविले जाण्याशी येतो. तिथे मात्र अंनिस चे काम महत्त्वाचे ठरायला लागते. र. धों. कर्वे यांच्यासारखे लोक आस्तिक्याची यथेच्छ निंदा करताना पहाण्यात येते तेव्हा इतक्या बुद्धिमान माणसाना बाकी काही समजले तरी मानवी स्वभाव , आपल्यावर पडलेला या विश्वासांचा घट्ट पगडा तेव्हढा समजला नाही असे वाटले. एकदम मान्य! त्यांच्यासारखे लोक म्हणजे अज्ञानाचा अंधःकार आणि इतरांची पर्वा न करणारा मूठभर बुद्धिवंतांचा गट यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा होत. "प्रकाश" अंध:काराची पर्वा कशी करेल? ! :) बाकी अवांतर - या संदर्भात ऐकलेला एक भाग: आपण (भारतीय/हिंदू तत्वज्ञान) अंधाराचे अस्तित्व स्वतंत्र मानत नाही. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार असे मानले जाते.

In reply to by मुक्तसुनीत

Permalink

मला वाटते , प्रबोधनाच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा शत्रू जर हा अज्ञानाचा अंधःकार असेल , तर प्रबोधकांच्या "सेल्फ राइचस्-नेस"(self righteousness)च्या धोक्यालासुद्धा कमी लेखून चालणार नाही ...
नरहर कुरंदकरांसारख्या लोकांनी याच भान ठेवलं. अज्ञानातुन निर्माण झालेल्या अंधश्रद्धा एकवेळ दुर करता येतील पण अगतिकतेतुन निर्माण झालेल्या अंधश्रद्धांचे काय? तत्वज्ञान भरल्या पोटी सुचते. ते एखाद्याच्या भाकरीची भुक दुर करु शकत नाही. प्रकाश घाटपांडे
Permalink

प्रकाशराव, तुमचा अग्रलेख आवडला. विज्ञान हे फक्त केलेल्या प्रयोगाच्या व उपलब्ध माहीतीच्या (डेटा) आधारे आपले निष्कर्ष मांडते. ते निष्कर्ष लोकप्रिय आहेत की नाहीत याचा वि़ज्ञान विचार करीत नाही. पृथ्वी सपाट नसून गोल आहे, ग्रहमाला ही पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे हे निष्कर्ष तत्कालीन लोकप्रिय मताच्या विरूद्धच होते. हे निष्कर्ष पूर्णपणे स्वीकारले जायला काही पिढ्या जाव्या लागल्या. तसेच धूम्रपानाचेही आहे. जिथे त्याबद्दल संशोधन झाले त्या देशात आता धूम्रपानाचे प्रमाण कमी होत आहे, पण अजुनही ते सर्वमान्यपणे पूर्णतः थांबलेले नाही. तीच गोष्ट ज्योतिषाबद्दल! अंनिसचे काम स्पृहणीय आहेच पण त्याच बरोबर त्या कार्याची फळे दिसू लागायला अजून बराच काळ जावा लागणार आहे. पण मग मध्यंतरीच्या कालात हानी होतच रहाणार का? माझ्या मते होय! हे कटू असले तरी अनिवार्य आहे. (धूम्रपानाच्या बाबतीतही माझे हेच मत आहे.) एक माझ्या मते किंचित डावललेला गेलेला मुद्दा म्हणजे ज्योतिषी नुसते ग्रहमानाप्रमाणे निदान करुन थांबत नाहीत तर अनिष्टनिवारणासाठी अमुक विधी करा, फलाण्या यंत्राची पूजा करा, तमुक दानं द्या असे सांगतात. हे बहुतेक उपाय हिंदू धर्माप्रमाणे असतात. जर ज्योतिष हे सर्वमान्य शास्त्र होण्याचा दावा करीत असेल तर माझ्या मते तरी ते धर्मातीत असले पाहिजे. ते तसे असल्याचे दिसत नाही. म्हणजे एका हिंदू ज्योतिष्याने त्याच्या हिंदू जातकाला "तू दिवसातून पाच वेळा कुराणेशरीफचे वा बायबलचे पारायण कर" म्हणून सांगितल्याचे ऐकिवात नाही. :) असो. उत्तम अग्रलेखाबद्द्ल अभिनंदन!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

Permalink

एक माझ्या मते किंचित डावललेला गेलेला मुद्दा म्हणजे ज्योतिषी नुसते ग्रहमानाप्रमाणे निदान करुन थांबत नाहीत तर अनिष्टनिवारणासाठी अमुक विधी करा, फलाण्या यंत्राची पूजा करा, तमुक दानं द्या असे सांगतात. हे बहुतेक उपाय हिंदू धर्माप्रमाणे असतात. जर ज्योतिष हे सर्वमान्य शास्त्र होण्याचा दावा करीत असेल तर माझ्या मते तरी ते धर्मातीत असले पाहिजे. ते तसे असल्याचे दिसत नाही. म्हणजे एका हिंदू ज्योतिष्याने त्याच्या हिंदू जातकाला "तू दिवसातून पाच वेळा कुराणेशरीफचे वा बायबलचे पारायण कर" म्हणून सांगितल्याचे ऐकिवात नाही.
खरं आहे. २००१ मध्ये सोलापुरला झालेल्या आखिल भारतीय ज्योतिष संमेलनात हा विषय अध्यक्ष व.दा. भट यांनी मांडला होता. त्यांचे मत व आमचे भाष्य खालील प्रमाणे "धर्मशास्त्र व ज्योतिषशास्त्र गल्लत नको. :- भारतीय ज्योतिषशास्त्रावर धर्मशास्त्राचे प्रचंड प्रमाणात आक्रमण आहे. ज्योतिष हे धर्मशास्त्राशी सुसंगत असावे हे विशिष्ट मर्यादेपर्यंतच योग्य आहे. मुसलमान ख्रिश्चन या धर्मांसाठीही ज्योतिषशास्त्र आहे. पितृपंधरवडा हा ज्योतिषशास्त्रदृष्टया अशुभ नसतोच. गोदावरीच्या दक्षिणेला एक नियम व उत्तरेला एक नियम करता येणार नाही. रत्नधारण, तोडगे, उपाय यांना जास्त किंमत देउ नये, त्याचे स्तोम माजवू नये. अचूक भविष्यासंबंधी शास्त्राच्या कुवतीपेक्षा जास्त दावे करणाऱ्या काही ज्योतिष पद्धती लोकांच्या या शास्त्रासंबंधी अनाठायी अपेक्षा वाढवत आहेत. तसेच व्यावसायिक ज्योतिषांकडून करण्यात येणाऱ्या अवास्तव जाहीराती या शास्त्रासंबंधी गैरसमज पसरवित आहेत. याची दखल ज्योतिषमासिकांतून घेतली गेली पाहिजे." भाष्य :- साताऱ्यात १९९५ साली झालेल्या अधिवेशनात त्यावेळचे संमेलनाध्यक्ष कृष्णराव वाईकर यांनी ज्योतिषाला धर्मशास्त्राचा अपरिहार्य भाग मानले होते. ज्योतिषाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वठणीवर आणण्यासाठी त्या आधारे शिवसेना, विहिंप सारख्या संघटनांना हाताशी धरुन 'कुंकवाची उठाठेव` केली होती. ( संदर्भ म.टा अग्रलेख ३१-१०-९५ ) धर्माशी फारकत घेतली नाही तर फलज्योतिष हे कालसुसंगत राहणार नाही तसेच ते संकुचित राहील याचे भान या वेळेच्या संमेलनाध्यक्षांना आहे.मात्र बऱ्याच पोटार्थी ज्योतिषांना ही बाब रुचणारी नाही. पाश्चात्य देशात फलज्योतिष हे धर्माशी निगडीत नाही. ज्योतिषमासिकांनी शास्त्रासंबंधी गैरसमज पसरणाऱ्या गोष्टी वा अवास्तव जाहिराती यांची दखल घ्यायची म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा कि काय? जातक लोक जेवढे अज्ञानी व अंधश्रद्ध राहतील तेवढे ज्योतिषांना सोयीचे असते. ते जर चिकित्सक बनले तर काही बनेल व्यावसायिक ज्योतिषी लोकांचे कसे फावणार? प्रकाश घाटपांडे

In reply to by पिवळा डांबिस

Permalink

म्हणजे एका हिंदू ज्योतिष्याने त्याच्या हिंदू जातकाला "तू दिवसातून पाच वेळा कुराणेशरीफचे वा बायबलचे पारायण कर" म्हणून सांगितल्याचे ऐकिवात नाही. अगदी अचूक बोललात. ह्याचे कारण ज्योतिषाने जातकाचा विश्वास संपादण्याची गरज. हे नाते, आणि डॉक्टर-पेशंट चे नाते फारसे वेगळे नाही. (आजवर कुणा डॉक्टर नेही , कोलेस्टरॉल कमी करायला औषधाची गरज नाही. रोज बेदम वाईन पीत जा, असे सांगितलेले ऐकिवात नाही.) प्रकाशकाका, अग्रलेख आवडला. - सर्किट

In reply to by पिवळा डांबिस

Permalink

एक माझ्या मते किंचित डावललेला गेलेला मुद्दा म्हणजे ज्योतिषी नुसते ग्रहमानाप्रमाणे निदान करुन थांबत नाहीत तर अनिष्टनिवारणासाठी अमुक विधी करा, फलाण्या यंत्राची पूजा करा, तमुक दानं द्या असे सांगतात सहमत. ग्रह गोलांच्या गुरुत्वाकर्षणाचे परिणाम होत असतील ते यन्त्राची पूजा करुन त्यांना नाहीसे कसे करता येईल? मग संशोधनासाठी गुरुत्वाकर्षणविरहीत अवस्था प्राप्त करण्यासाठी अवकशात न जाताही एखादे मोठे दान देऊन किंवा यज्ञ करुन; नागबळी वगैरे करुन पाहता येईल बहुतेक. ज्योतीष शास्त्राप्रमाणे एखादी गोष्ट जर होणारच असेल तर ती टाळता कशी येईल ? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by पिवळा डांबिस

Permalink

संगीतकार ए. आर रहमान या हिंदू धर्मात जन्मलेल्या व्यक्तीला त्याची बिकट परिस्थिती बदलावी यासाठी मुस्लिम होण्याचा सल्ला एका हिंदू ज्योतिषानेच दिला आहे. https://hindi.news18.com/news/entertainment/why-singer-a-r-rahman-converted-his-religion-all-facts-on-his-birthday-931958.html
Permalink

>> एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय? असेच म्हणतो :) (सेहवागच्या पायांच्या हालचाली तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्या तरी भारतातर्फे कसोटी क्रिकेट खेळताना ३०० धावा ठोकणं फक्त त्यालाच जमलंय !) अनेक थोरा-मोठयांसमोर आपण कुणीच नाही पण आजच्या घडीला जी गोष्ट विज्ञान म्हणून सिद्ध करता आली नाहीये...ती अजून पाचशे वर्षांनी करता येणार नाहीच ह्याची काय गॅरंटी? शेवटी ज्योतिषावर कसा आणि किती विश्वास ठेवायचा ही वैयक्तिक बाब आहे, असे मला वाटतं ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com
Permalink

फलज्योतिष भले किंवा बुरे ही चर्चा जे काही आहे ते अमुक उपाय करा म्हणजे तुमचे कार्य, इच्छा सफल होईल ह्या एका व्यवहारात अडकले आहे. वर उल्लेख केलेल्या लॉटरीप्रमाणे ज्यांच्या याबाबत अनुभव चांगला आहे ते पुर्ण विश्वास ठेवुन आहेत. तसेच ज्यांना यातले काही समजत नाही पण काही करुन यश प्राप्त झाले पाहीजे अश्या लोकात एक मानसिक आधार म्हणुन फलज्योतिषाचे बळकट स्थान आहे. सर्वसाधारणपणे माणुस ज्योतिषाकडे लहान मुलाची पत्रिका काढणे नंतर डायरेक्ट लग्न, नोकरी, किंवा आजार , अजुन काही मोठी संकटे आल्यावरच जातो. अर्थात तो माणुस इतर लोक उदा डॉक्टर कडे ही जातो, अजुन कोणी मदत करणारा असेल त्याच्याकडेही जातो. मानसीक आधार हा मोठा भाग. सर्व काही उत्तम चालु असताना ज्योतिषाकडे जाणारा विरळाच! सामान्य लोकांना भलते सलते उपाय करायाला न लागावे व जादा आर्थीक नुकसान न व्हावे ह्या जागरुकतेसाठी फलज्योतिषाच्या "विरोधात" माध्यमातुन अधुनमधुन आवाज जरुर निघावा. बाकी इतर व्यसन व आर्थीक बाबींनुसार हा प्रकार देखील शेवटी ज्याने त्याने हाताळायचा आहे. माणसाच्या नेहमीच्या संकटप्रसंगाला तोंड द्यायला इतर काही सामाजिक व्यवस्था बनतील, बळकट होतील, तसतसा फलज्योतिषाचा वापर कमी होईल. अग्रलेख विचार करायला लावतोच पण बुद्धीजीवी लोक सोडले तर जास्त गंभीरपणे सामान्य लोक विचार करतीलच असे नाही.

सर्वसाधारणपणे माणुस ज्योतिषाकडे लहान मुलाची पत्रिका काढणे नंतर डायरेक्ट लग्न, नोकरी, किंवा आजार , अजुन काही मोठी संकटे आल्यावरच जातो. अर्थात तो माणुस इतर लोक उदा डॉक्टर कडे ही जातो, अजुन कोणी मदत करणारा असेल त्याच्याकडेही जातो. मानसीक आधार हा मोठा भाग. सर्व काही उत्तम चालु असताना ज्योतिषाकडे जाणारा विरळाच!
खर आहे. म्हणुनच ज्योतिषा कडे मार्गदर्शक / समुपदेशक या भुमिकेतुन पाहिले जाते. तिथे शास्र आहे का नाही? हा मुद्दाच गौण ठरतो. प्रकाश घाटपांडे
Permalink

ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही. अगदी सही !! आणी ऑफ्कोर्स अग्रलेख आवडला !!! एक मानसिक आधार म्हणुन फलज्योतिषाचे बळकट स्थान आहे. आणी राहीन .............. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
Permalink

मटका ज्योतिष मस्तच! :) अभिनंदन प्रकाशराव, सुंदर अग्रलेख....! प्रकाशकाकांचे अनेक आभार. त्यांच्यासारखे लोक म्हणजे अज्ञानाचा अंधःकार आणि इतरांची पर्वा न करणारा मूठभर बुद्धिवंतांचा गट यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा होत. मिपा वर त्यानी जास्त जास्त लिहावे ही त्याना प्रार्थना ! मुक्तरावांशी सहमत आहे... तात्या. अवांतर - मिपाने अलिकडेच सुरू केलेले हे संपादकीय सदर अधिकाधिक यशस्वी होवो हीच इच्छा! मिपावरील इतर लेखनाबद्दल आग्रह नाही, परंतु या सदराला मात्र शक्यतोवर सर्व मिपाकरांनी आवर्जून प्रतिसाद देऊन आपले मत मांडावे अशी आग्रहाची विनंती. त्यामुळे भावी अग्रलेखाकारांना प्रोत्साहन मिळून त्यांच्याकडून उत्तमोतम, विचार करायला लावणारे असे अग्रलेख लिहिले जातील व हे सदर अधिकाधिक उत्कृष्ट व वाचनीय होईल असा विश्वास आहे...!
Permalink

सगळा लेख आवडला . मुळ लेखातील आणी प्रतिसादातील खालील मुद्दे पटले. १)भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे. - अचुक विश्लेषण २) असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! - खरंआहे हे ३) ज्योतिषा कडे मार्गदर्शक / समुपदेशक या भुमिकेतुन पाहिले जाते. तिथे शास्र आहे का नाही? हा मुद्दाच गौण ठरतो. - आम्ही शिकत असलेला टॅरो कार्डेस हा प्रकार ही हेच सांगते. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
Permalink

सर्वप्रथम अग्रलेखाबद्दल घाटपांडे साहेब आपले अभिनंदन !!! एक चांगला विषय, हजारो वर्षापासून ते या क्षणापर्यंत अनेकांना भविष्यातील गोष्टीचे वेड आणि ओढ असते. सिगारेट पिणे आरोग्यास अपायकार आहे, कारण त्याचे काही निष्कर्ष विज्ञानाने शोधले आहेत, मात्र फलज्योतिषाला असे करणे जमले नाही असे आमचे मत आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे. सहमत आहे, पण ब-याचदा फलज्योतिषाचे अभ्यास करणारे, किंवा सांगणारे भूतकाळ अगदी बरोब्बर सांगतात किंवा ते का पटते त्याचा अर्थ ते कसे शोधतात. त्याचे एक ठराविक उत्तर आम्ही नेहमी ऐकतो, की ते सर्व ठोकताळे असतात. असे असूनही काही आडाखे का चुकतायेत याचे विश्लेषण करणे चालू आहे, ही चांगली गोष्ट आहे. मटका : आमच्याकडे एक पंचाग पाहणारे लोकप्रिय गुरुजी होते.घरातून शुभ कार्यास बाहेर कधी पडावे इथपासून तुमची हरवलेली वस्तू कोणत्या दिशेला सापडेल इथपर्यंत ते तज्ञ होते, पण त्यांना नाद होता मटक्याचा त्यांचा आकडा मात्र कधी बरोब्बर आला नाही, ते म्हणायचे त्या मालकाची एकदा मला कुंडली सापडली की मी मालामाला होऊन जाईन. :) असो, मटका भविष्यही आवडले. असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! फलज्योतिषावर एकमत होणार नाही,पण वरील वाक्याबद्दल माझी नव्हे अनेकांची सहमती असेल हे सांगने न लगे. विचाराला चालना देणारा एक सुंदर अग्रलेख त्या बद्दल पुन्हा एकदा आपले मनःपुर्वक अभिनंदन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Permalink

अग्रलेख उत्तम उतरला आहे हे निश्चित. जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! १००% टक्के सहमत. (ज्योतिषावर विश्वास नसलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
Permalink

प्रकाशरावांचा अग्रलेख आवडला त्याचबरोबर सुनीतरावांचा प्रतिसादही. मटका आणि ज्योतिष यातले साधर्म्य पाहून मौज वाटली. मास्तरांरारखेच म्हणते. असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! अगदी पटले. स्वाती
Permalink

अभ्यास पुर्ण लेख. याबाबत निनाद बेडेकरांचे पुस्तक जरुर वाचावे.. "शोध अंधश्रद्धेचा" विशेष म्हणजे जोतिष्याची /देवभक्तिची जाहीर खिल्ली ऊडवाणारी मंडळी (खाजगी आयुष्यात ) मात्र देवावर/भविष्यावर विनासंकोच विश्वास ठेवतात. देवावर विश्वास असलेला परंतु देवभोळा (कर्र्मठ ) नसलेला.. नाद खुळा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

याबाबत निनाद बेडेकरांचे पुस्तक जरुर वाचावे.. "शोध अंधश्रद्धेचा"
माझ्या माहिती प्रमाणे हे ठाण्याचे डॉ विजय बेडेकर आहेत. निनाद बेडेकर हे पुण्यातील इतिहास संशोधक आहेत. प्रकाश घाटपांडे

चूक मान्य आहे.. याच पुस्तकामध्ये डोळस श्रद्धा याबद्द्ल सुंदर विवेचन आहे.. नाद खुळा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
Permalink

आणि यथासांग विवेचनमुळं अग्रलेख आवडाला. पु.ले.शु. आपलाच, मनोबा
Permalink

तर्कशास्त्राच्यापेक्षा वेगळे कल्पनाशक्तीचे महत्त्व आपल्या आयुष्यात खूप असते. आशा जागवण्याची प्रतिभा असलेल्यांना त्या कौशल्याचे मूल्य मिळणे योग्यच आहे. तरी बाजारभाव ठरवताना योग्य निकष वापरण्यात न्याय असतो. आशा विकत घेणारा जातक अगतिक असला तर दिलेले मूल्य अवाच्यासवा असू शकते. वधूवरसंशोधनात एका पक्षास दिलासा म्हणजे दुसर्‍या पक्षास त्रास, असेही होऊ शकते. अशा वेळी "आशा काय भावाला मिळवली" हे गणित फारच गुंतागुंतीचे ठरू शकते.
Permalink

आशा विकत घेणारा जातक अगतिक असला तर दिलेले मूल्य अवाच्यासवा असू शकते.
पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.
वधूवरसंशोधनात एका पक्षास दिलासा म्हणजे दुसर्‍या पक्षास त्रास, असेही होऊ शकते.
अहो मंगळी मुलगी खपवायची म्हंजी लईच तरास आसतोय. सांगून आलेल्या मुलाची / मुलीची पत्रिका मंगळाची आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी हल्ली ज्योतिषाची गरज भासत नाही. किरकोळ आजारासाठी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो का? आपल्याला घरगुती वा प्राथमिक उपचार माहीत असतात. तद्वत हा मंगळाचा प्रथमोपचार हल्ली पुष्कळ लोकांना - बायकांना सुद्धा - माहीत असतो. मंगळ दिसल्याबरोबर नकार देण्यात येतो! बापाला मुलगी म्हणजे एक भार त्यातून मुलीला मंगळ असला की विचारायलाच नको. अशावेळी एखादे गुरुजी-कम-ज्योतिषी-कम मध्यस्थ अशी मंगळी मुलगी खपवायचं काम कुशलतेनं करीत असतात. मुलीच्या मंगळाला जाब विचारणारे राहू, केतू शनी यांना पुढे करून मंगळदोषाचा परिहार होतोय् असे मुलाकडच्यांना पटवून ते ही मुलगी खपवतात. अशा मध्यस्थीतून त्यांना आर्थिक लाभही होत असतो. साहजिकच मंगळाचा बागुलबुवा ज्योतिषीलोक जोपासतात. विवाहाच्या सौदेबाजीत मंगळ हा एक हुकमी पत्ता ठरतो.
अशा वेळी "आशा काय भावाला मिळवली" हे गणित फारच गुंतागुंतीचे ठरू शकते.
सोप गणित असतं जातक व ज्योतिषी यांच्या परस्परसंबंधातुन हा भाव निश्चित होतो. पंचतारांकित हॉटेल व त्यांच्याकडे जाणार्‍या जातकाच्या आशेचा भाव आणी पोपट वाल्या ज्योतिषाकडे जाणार्‍या जातकाच्या आशेचा भाव हे गुणोत्तरातच असतात. पुण्यात लॉज वर मुक्काम करणार्‍या एका ज्योतिषानी जातकाच्या आशेचा भाव अवाच्यासवा सांगितल्याने त्यांच्यात बाचाबाची होउन त्या ज्योतिषाचा खुन झाला. (वीस - पंचवीस वर्षापुर्वीची घटना आहे) आशेचा लईच भाव झाला त मंग निराशा परवडते जातकाला. प्रकाश घाटपांडे

किरकोळ आजारासाठी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो का? आपल्याला घरगुती वा प्राथमिक उपचार माहीत असतात. तद्वत हा मंगळाचा प्रथमोपचार हल्ली पुष्कळ लोकांना - बायकांना सुद्धा - माहीत असतो. मंगळ दिसल्याबरोबर नकार देण्यात येतो! अगदी पटले. "मंगळी" असलेल्या मुलीच्या घरच्यांना किती त्रास होत असेल, याचा विचार तरी केला जातो की नाही असे वाटते.
Permalink

छान लेख!!!! http://sucheltas.blogspot.com
Permalink

असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! १००% पटलं... नाशिकला आमच्या घरासमोर एक ज्योतिषी राहत...आणि पुजा वगैरे सांगत असत. एकदा अशीच सत्यनारायणाची की कुठलीतरी पुजा करुन घरी परत येतांना त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन जागच्या जागी गेले...घरी बायको आणि एक शाळेतला मुलगा...त्याची आठवण झाली!
Permalink

जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!
अनिश्चितता, अज्ञात, अज्ञान इ. इ. सर्व आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही.
जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते
हे भारीच.
Permalink

प्रकाश साहेब, लेख आवडला..ज्योतिष बद्दल मस्तच लिहिले आहे..आवडलं >>ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला? हे पण मस्तच.. स्वप्निल..
Permalink

लेख खूप आवडला. मटका भविष्याची माहिती याच्या जोडीला देऊन घाटपांडे काकांनी काही न बोलताही भाष्य करण्याचे सहज साधले आहे! या विषयाच्या विज्ञान असण्या-नसण्यावर आपण - किंवा कुणीही - कितीही ऊहापोह केला, तरीही जोवर लोकांना ज्योतिषाकडून, फसवा का होईना, आधार मिळतो आहे, तोवर ते तिकडे जाणारच. आणि कुणाला किती मेगावॅटचे सत्य पेलते हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात ढवळाढवळ करणारे आपण कोण? फक्त यातले ढळढळीत क्रूर शोषण टाळण्यासाठी (तेही काही प्रमाणात. पूर्णांशाने ते शक्य नाही. कारण ही अतिशय व्यक्तिसापेक्ष बाब आहे.) आपण काही अंशी अंधश्रद्धा निर्मूलन - प्रबोधन - कायदा असे प्रयत्न करू शकतो. हे सगळे इतक्या नेटकेपणानं मांडल्याबद्दल, विचार करणे भाग पाडल्याबद्दल मनापासून धन्यवाद. (आता पुढच्या सोमवारी कुठला विषय आहे, त्याची उत्सुकता वाटते आहे! हे अग्रलेखाचे प्रकरण भारीच आहे!)
Permalink

घाटपांडेकाकांचा "भविष्य आणि फलजोतीष्य" यांचा परामर्श घेणारा लेख उत्तम .... मुळात पुर्वीपासुन ज्यांनी "फलज्योतिष" निर्माण केले वा त्याचा विकास केला त्यांनी ते परिपुर्ण आहे व त्याने भविष्याचा पुर्णपणे वेध घेता येतो असा कधीही दावा केला नव्हता. पुर्वीच्या काळात त्याचा वापर वर म्हटल्याप्रमाणे फक्त "भुतकाळातील घटानांचा अभ्यास करुन त्याच्यातुन भविष्याचा वेध" घेणे असाच होता. काही अपदाव वगळता त्याचे "व्यवसायीकरण" झाले नव्हते व सर्वसामान्य जनतेशी त्याचा "डायरेक्ट " असा संमंध क्वचीतच यायचा. त्यामुळे याची "चांगले किंवा वाईट" अशी चर्चा क्वचितच झाली. आता काळ बदलल्याने हे "फलज्योतिष" थेट सामान्य माणसाच्या दारापर्यंत आहे व त्याचा परिणाम म्हणजे आज गावोगावी हिंडणारे, जत्रेत बसणारे भविष्य सांगणारे भोंदु [ हा शब्द मी मुद्दामुन वापरत आहे] लोक जागोजागी दिसायला लागले. त्याचा वाईट परिणामही दिसु लागला. मुळात त्या लोकांचा अभ्यास नव्हताच व त्यांनी काही "अतार्कीक" दावे करुन चांगलाच गोंधळ निर्माण केला. काहींच्या मुर्खपणामुळे काही ठिकाणी लोकांना आपल्या जिवाचीही किंमत मोजावी लागली ... उदा : गुप्तधनासाठी बळी घेणारे लोक, ह्यांच्यामागे काही "काळी जादु" ह्या नावाखाली भविष्य सांगणारे म्हणजे पर्यायी ज्योतीषी असतात ... ह्यातली काळी बाजुसमोर आल्याने पुर्वी ह्या गोष्टीवर थोडीका होईना पण श्रद्धा असणारा "शिकलेला व सुसंस्कॄत वर्ग" यापासुन पुर्णपणे फारकर घेऊन दुर चाललेला दिसतो .... त्यातल्या काहींनी आता ह्यातल्या काळ्या बाजुवर अधिक जोराने हल्ले करायला सुरवात केली. तर दुसर्‍या बाजुला ग्रामीण व काही प्रमाणात अडाणी जनतेत याची लोकप्रियता वाढतच आहे. फलज्योतिष हे "एक आधार" मानुन काम केले तर ते कधीही उत्तम पण तेच खरे ह्या अंधश्रद्धेने काम केल्यास नुकसान होऊ शकते . हे ज्याला समजेत त्या "लॉटरी" लागली हे मानायला हरकत नाही ... असो. उत्तम लेख ! अजु येऊ द्यात .... अवांतर : तात्यांना "संपादकीय वर लोकांनी प्रतिसाद द्यावेत" अशी विनंती करावी लागली ह्याचा खेद वाटला. अशी वेळ यायला नको होती. लोकांनी स्वतःहुन उत्फुर्त प्रतिसाद द्यायला हवेत. पुढच्या वेळेसपासुन तरी ह्याची काळजी घेतली जावी जी विनंती ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
Permalink

सुरु केल्याबद्दल प्रकाशकाकांचे अभिनंदन. आपल्या खास शैलीत त्यांनी काही प्रश्नांचा उहापोह केला आहे आणि बर्‍याच गोष्टी ह्या काही मतप्रदर्शन न करता वाचकांना चर्चा घडवून आणण्यास उद्युक्त करतील अशा कौशल्याने तरंगत्या ठेवल्या आहेत. (स्वगत - पोलीस खात्यातल्या नोकरीतला अनुभव कसा आणि कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही बॉ! ह.घ्या. :P ) भविष्यकाळात आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले जाणार आहे?ह्या प्रश्नाची उत्सुकता ही माणसाला असतेच असते, त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. माणसालाच काय पण कंपन्यांनाही ही उत्सुकता असते कारण त्यांचे भवितव्य त्यावर अवलंबून असते. प्रयत्नवाद/कर्मवाद/शास्त्रीय विचार ह्या सगळ्यांच्या बरोबरीनेच अनिश्चितता हा एक महत्त्वाचा घटक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करीतच असतो. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात ही अनिश्चितता आपल्याला दिसते. उदा. मी काम करीत असलेल्या कंपनीत मार्केटिंग टीम ह्या वर्षी किती मोबाईल चिप्स (इंटीग्रेटेड सर्किट्स) खपतील त्याबद्दल आकडेवारी जाहीर करीत असते. अमेरिका, यूरोप, आशिया खंडातल्या परिस्थितीप्रमाणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उत्पादनातली कोणती त्यांच्या गरजा भागवू शकतील त्याप्रमाणे, बाजारातले बदलणारे संकेत, नवीन चालू झालेल्या त्याच क्षेत्रातल्या कंपन्या, बंद पडलेल्या/विलीन झालेल्या कंपन्या, आपल्या उत्पादनाबद्दलच्या प्रतिक्रिया, इतर गोपनीय माहीती; ह्या आणि अशा इतर अनेक बाबींवर हे आडाखे आधारलेले असतात. जाहीर केलेल्या चिप्सची संख्या ही बदलू शकते/नव्हे बदलतेच! ती कितीतरी कमी किंवा कितीतरी जास्त अशी होऊ शकते. आणि हे व्हायला अनेक घटक कारणीभूत असतात. हे सगळे संचालक मंडळाला ध्यानात घ्यावेच लागते. मार्केटिंग टीमवर १००% विसंबून त्यांना चालत नाही. इतर ठिकाणाहूनही माहीती घेणे. आपल्या अनुभवाच्या कसावर ते घासून घेणे आणि मग एका निर्णयाप्रत येणे हे सतत चालू असते. अंदाज चुकले म्हणून कोणी लगेच मार्केटिंग टीमला हाकलून देत नाही आणि अचूक आले म्हणून डोळे झाकून त्यांचा प्रत्येक निर्णय मान्यही करीत नाही. त्यात तरतम भाव/फॅक्टर लावणे हे असतेच. कंपनीच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे, त्यांच्या समोरील प्रश्नांच्या व्याप्तीप्रमाणे कोणत्या निर्णयावर किती अवलंबून रहायचे हे ठरते. परिस्थिती सर्वसामान्यपणे चांगली असेल तर थोडे धाडसी निर्णय घेतले जातात. आणीबाणीची/जिवनमरणाची परिस्थिती असेल तर काही वेळा जपून आणि काही वेळा टोकाचे निर्णय घेण्यावाचून पर्याय नसतो. ज्योतिषाचे बरेचसे असे आहे असे मला वाटते. सगळे आलबेल असेल तर ज्योतिषाचा सल्ला हा काही विशिष्ठ गोष्टींपुरताच घेतला जातो. अन्यथा बिकट परिस्थितीत तो म्हणेल ती पूर्वदिशा ठरते. ह्यात मानवी भावनांचा आणि वैयक्तिक विश्वास/अविश्वासाचा जवळचा संबंध असल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनत जाते. गैरफायदा ज्योतिषाकडून घेतला जाण्याची शक्यता वाढत जाते. परंतू प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा आणि बराचसा वैयक्तिक असल्याने एका वरुन दुसरा तसाच असेल असे आपण म्हणू शकत नाही. माझ्या मते ज्योतिष हे एक आडाखे बांधण्याचे तंत्र आहे. आडाखे बांधण्याच्या निकषात बदल घडतील त्याप्रमाणे अंदाजांमधे/आडाख्यांमधे बदल होतात. श्रद्धा हाही एक भाग आपल्याला इथे विचारात घ्यावा लागेल. आपल्या फॅमिली डॉक्टरांचे एखादे निदान चुकू शकते औषधे बदलून द्यावी लागतात म्हणून लगेच आपण डॉक्टरला शिव्या देतो किंवा डॉक्टरच बदलतो असे नसते. श्रद्धा असल्यामुळे चूक होऊ शकते हे आपण मान्य करतो. तसेच इथे आहे वैयक्तिक श्रद्धा असल्यामुळे ज्योतिषाचे आडाखे हे त्या नजरेतून बघितले जातात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातली सीमारेषा मात्र फार धूसर असते/होऊ शकते. बुद्धीचा अंकुश ठेऊन ह्या गोष्टींकडे बघता आले तर पिळवणूक होणार नाही ह्याची काळजी घेता येते. सर्वसामान्य/गरीब/पीडित/अति गरजू लोकांना मात्र ह्यात भरडण्यापासून वाचवायचे असेल तर लोकसंख्या नियंत्रण, मूलभूत शिक्षण, रोजीरोटी कमावण्याचे साधन ह्या इतर आनुषंगिक बाबींकडे गांभीर्याने लक्ष पुरवून सबल करावे लागेल अन्यथा फक्त ज्योतिषाच्या नावाने खडे फोडून फारसे काही हाती लागणार नाही. (अवांतर - धोंडोपंतांसारख्या ज्योतिषविषयातल्या अभ्यास असणार्‍या व्यक्तीचे ह्या विषयावरील विस्तृत विवेचन/विचार ऐकण्यास नक्कीच आवडेल!) चतुरंग
Permalink

जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! हे भाकीत संपादकांनी चर्चेतून पुढे आणले आहे. विकास ने विचारले होते: "नक्की कोणाच्या बाजूने आहात?" लेख जसा रचला आहे त्यावरून संपादकांनी कुठलीही बाजू घेतलेली दिसत नाही. वाचकांनी आपापला निष्कर्ष काढायचा आहे. ले़ख आवडला.
Permalink

लै झ्याक! प्रकाशराव संपादकीय एकदम मस्त झाल आहे. ते धोंडोपंत इकडं का फिरकत नाही? तसा इशय तर त्यांचाच की बैलोबा
Permalink

छान लिहिल॑ आहेत स॑पादकिय..
Permalink

कदाचित मटका हा वेगळा लेख म्हणून आवडला असता. असो, इतकेच विचारतो की आमचे सगळे बिंग जाहिर करून तुम्ही काय साधलेत? आता माझ्या सारख्या गरीब माणसाने धंदा कसा करायचा? आपला गुंडोपंत मटकेवाला, वास्को हॉटेल जवळ, नाशिकरोड.
Permalink

मिपावरचे संपादकीय कालौघात गाडले गेल्याने धाग्याचे उत्खनन ! :~
Permalink

घाटपांडेकाका, उत्खनन करून धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. फार छान लेख, आवडला. - (ज्योतिषाचं काय करायचं ह्या विवंचनेत असलेला) सोकाजी
Permalink

मटका ज्योतिष लै भारी!