पडघम २०१४-भाग १६: बॅटलग्राऊंड स्टेटस-दक्षिण भारतातील इतर राज्ये
यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली
भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश
भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड
भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये
भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये
आता या भागात आपण दक्षिण भारतातील इतर राज्यांविषयीचे अंदाज बघू.
तामिळनाडू
तामिळनाडू राज्यात ३९ जागा आहेत.या राज्याविषयी अंदाज वर्तवणे म्हणजे मोठे जोखमीचे काम आहे. सर्वप्रथम राज्यातील विविध पक्ष/आघाड्या कोणत्या ते बघू.
१. अण्णा द्रमुक
२. द्रमुक
३. एन.डी.ए-- या आघाडीत भाजप, वायको यांचा मद्रमुक, रामदास यांचा पट्टाली मक्कल काची, विजयकांत यांचा डी.एम.डी.के आणि इतर काही पक्षांचा समावेश आहे.
४. कॉंग्रेस
राज्यात विविध आघाड्यांमध्ये गेल्या ५ वर्षात इतके बदल झाले आहेत की त्यामुळे २००९,२०११ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आकडेवारी प्रसिध्द करणे बऱ्यापैकी अर्थहिन ठरेल.
राज्यात एकदा द्रमुक आणि पुढच्यावेळी अण्णा द्रमुक हा गेल्या अनेक निवडणुकांमधला कल २००९ मध्ये राहिला नाही.२००६ मध्ये द्रमुक आघाडीचा राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाला.२००९ मध्ये परत एकदा कॉंग्रेस आणि द्रमुक आघाडीचाच विजय झाला.याचे कारण म्हणजे विजयकांत यांच्या डी.एम.डी.के ने १५% मते घेऊन द्रमुकविरोधी मतांमध्ये फूट पडली आणि त्याचा फायदा द्रमुकला झाला. हे लक्षात घेऊन २०११ मध्ये विधानसभा निवडणुकांसाठी जयललितांनी डी.एम.डी.के पक्षाला बरोबर घेतले आणि द्रमुकचा जोरदार पराभव केला. पुढे जयललितांनी आपल्या कार्यपध्दतीला अनुसरून विजयकांत यांच्या पक्षाशी सत्तेत आल्यानंतर युती तोडली.
मला वाटते की एन.डी.ए यावेळी तामिळनाडूमध्ये काही जागा जिंकून मोठा धक्का देणार.
चेन्नई दक्षिण मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते एल.गणेशन, द्रमुकचे टी.के.एस.इलांगोवन, अण्णा द्रमुकचे डी.जयवर्धन आणि कॉंग्रेसचे एस.व्ही.रामाणी यांच्यात लढत आहे. अण्णा द्रमुकने २००९ मधले जिंकलेले सी.राजेन्द्रन यांना तिकिट नाकारले. राज्याच्या उत्तर भागात द्रमुक बळकट आहे तसेच इलांगोवन हा ओळखीचा चेहरा पक्षाने उमेदवार म्हणून दिला आहे.तरीही भाजपने एल.गणेशन यांना उमेदवारी देऊन लढतीत नक्कीच रंगत आणली आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता शहरी भागात आहे त्याचा फायदा गणेशन यांना होईलच. तसेच द्रमुक, अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस यांच्यात मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा एल.गणेशन यांना होईल.मला वाटते की चेन्नई दक्षिण मतदारसंघात भाजप धक्का देणार.
तसेच एन.डी.ए ला आराकोणम (पी.एम.के चे आर.वेलू), धर्मापुरी (पी.एम.के चे अंबुमणी रामदास), अराणी (पी.एम.के चे ए.के.मूर्ती), कोईम्बतूर (सी.पी.राधाकृष्णन), विरूधुनगर (मद्रमुकचे वायको) आणि कन्याकुमारी (भाजपचे पोन राधाकृष्णन) आणि चेन्नई दक्षिण या एकूण ७ पैकी किमान ६ जागा मिळतील असे मला वाटते.
कॉंग्रेस राज्यात भोपळाही फोडू शकणार नाही याची शक्यता जास्त.शिवगंगा मतदारसंघात पी.चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम निवडणुक लढवत आहेत.पी.चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे हे कॉंग्रेससाठी फार मनोबल वाढवणारी गोष्ट आहे असे नक्कीच नाही.मायिलादुतुराई मधून मणीशंकर अय्यर, सेलममधून कै.पी.रंगराजन कुमारमंगलम यांचे चिरंजीव मोहन कुमारमंगलम, तिरूप्पूरमध्ये ई.व्ही.के.एस इलांगोवन, कोईम्बतूरमध्ये आर.प्रभू यासारखे उमेदवार चांगली लढत देतील पण तरीही विजयी होण्यात ते यशस्वी होतील असे वाटत नाही.
उरलेल्या ३३ पैकी अण्णा द्रमुक २० आणि द्रमुकला १३ जागा मिळतील असे धरतो. तसेच पॉंडेचेरीची जागा अण्णा द्रमुकला मिळेल असे धरतो.
| |
| तामिळनाडू+पॉंडेचेरी | |
| एकूण जागा | ४० |
| अण्णा द्रमुक | २१ |
| द्रमुक | १३ |
| एन.डी.ए | ६ |
सीमांध्र+तेलंगण
आंध्र प्रदेशात ४२ जागा आहेत (सीमांध्र: १७ आणि तेलंगण: २५). दोन्ही राज्यात भाजप आणि तेलुगु देसम यांच्यात युती आहे. तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती आणि सीमांध्र मध्ये वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांचा वाय.एस.आर कॉंग्रेस आणि अर्थातच कॉंग्रेस हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तेलंगणमध्ये हैद्राबादची जागा परंपरेप्रमाणे एम.आय.एम ला नक्कीच मिळेल. सिकंदराबादमध्ये भाजपचे बंडारू दत्तात्रय यांना निवडून यायला फार कठिण जाऊ नये. करीमनगर मतदारसंघ खरोखरच इंटरेस्टींग आहे. २००४ मध्ये या मतदारसंघातून तेलंगण राष्ट्र समितीचे के.चंद्रशेखर राव निवडून गेले होते.पण तिथे भाजपने ज्येष्ठ नेते विद्यासागर राव यांना उमेदवारी देऊन रंगत आणली आहे.ते निवडून आल्यास मला नक्कीच आश्चर्य वाटणार नाही. तेलंगणमधील १७ पैकी १ जागा एम.आय.एम, ७ जागा तेलंगण राष्ट्र समितीला, ५ जागा एन.डी.ए आणि ४ जागा कॉंग्रेसला मिळतील असे धरतो.
सीमांध्रमध्ये आंध्र प्रदेशातून तेलंगण हे राज्य वेगळे करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल कॉंग्रेसविरोधी वातावरण नक्कीच आहे.कॉंग्रेसचे अनेक नेते वाय.एस.आर कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत.त्यामुळे पक्षाचे बळ बरेच कमी झाले आहे.त्यामुळे २५ पैकी अगदी एखादीच जागा कॉंग्रेसला मिळेल (आरकूमधून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरचंद्र देव) असे वाटते.उरलेल्या २४ पैकी १४ जागा वाय.एस.आर कॉंग्रेस आणि उरलेल्या १० जागा एन.डी.ए जिंकेल असे वाटते.
| |
| सीमांध्र+तेलंगण | |
| एकूण जागा | ४२ |
| एन.डी.ए | १६ |
| वाय.एस.आर कॉंग्रेस | १४ |
| तेलंगण राष्ट्रसमिती | ७ |
| कॉंग्रेस | ४ |
| एम.आय.एम | १ |
तेव्हा दक्षिण भारतात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते:
| | | | | | | | | | |
| | एन.डी.ए | युपीए | जदध | डावी आघाडी | द्रमुक | अण्णा द्रमुक | तेलंगण राष्ट्रसमिती | वाय.एस.आर कॉंग्रेस | एम.आय.एम | एकूण |
| कर्नाटक | १० | १६ | २ | | | | | | | २८ |
| केरळ | | ८ | | १२ | | | | | | २० |
| तामिळनाडू | ६ | | | | १३ | २० | | | | ३९ |
| पॉंडेचेरी | | | | | | १ | | | | १ |
| आंध्र प्रदेश | १६ | ४ | | | | | ७ | १४ | १ | ४२ |
| एकूण | ३२ | २८ | २ | १२ | १३ | २१ | | | १ | १३० |
चित्र स्पष्ट होत आहे