पडघम २०१४-भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये
यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली
भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश
भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड
आता या भागात आपण उत्तर भारतातील इतर राज्यांविषयीचे अंदाज बघू.या राज्यांविषयी मतदारसंघनिहाय विश्लेषण देत नाही पण राज्यातील एकूण अंदाजांविषयी माहिती देत आहे. या राज्यांमधील मतदारसंघनिहाय विश्लेषण देत नाही यामागे पुढील कारणे आहेत:
१. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये चतुरंगी लढत आहे. अशा स्थितीत अगदी थोडी मते फिरली तरी निकाल खूप बदलू शकतात. अशा परिस्थितीत तिथला मतदारसंघनिहाय निकालांचा अंदाज व्यक्त करणे अयोग्य होईल.
२. काही राज्यांविषयी मतदारसंघनिहाय विश्लेषण करण्याइतकी त्या राज्यांची माहिती मला नाही.
३. उत्तर प्रदेशात मुझप्फरनगर दंगलींनंतर वातावरण बरेच बदलले आहे. त्याचा नक्की कसा परिणाम मतांमध्ये होईल हे सांगणे थोडे धाडसाचेच ठरेल.
४. हरियाणासारख्या राज्यात यापूर्वी विधानसभा निवडणुका २००९ मध्ये झाल्या होत्या.गेल्या पाच वर्षात वातावरण किती आणि कसे बदलले आहे हे सांगणे थोडे धाडसाचेच ठरेल.
या कारणांमुळे या राज्यांमधील एकूण परिस्थितीविषयीचा अंदाज व्यक्त करत आहे.
जम्मू काश्मीर
राज्यातील जम्मू आणि उधमपूर या मैदानी प्रदेशातील हिंदूबहुल भागात भाजपला विजय मिळविणे कठिण जाऊ नये.लडाखमधील एका मतदारसंघात कॉंग्रेसला विजय मिळेल असे म्हणायला हरकत नाही.काश्मीर खोऱ्यातील तीन मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि एका ठिकाणी पी.डी.पी ला विजय मिळेल असे वाटते.
| |
| जम्मू काश्मीर | |
| एकूण जागा | ६ |
| भाजप | २ |
| नॅशनल कॉन्फरन्स | २ |
| कॉंग्रेस | १ |
| पी.डी.पी | १ |
हरियाणा
राज्यात भाजप दिल्लीजवळच्या भागात आणि अंबाला परिसरात थोडेफार बळ राखून आहे.अगदी अयोध्या आंदोलनाच्या काळात उत्तर भारतात इतर राज्यांमध्ये भाजपने चांगले यश मिळविले पण हरियाणात मात्र पक्षाला हातपाय रोवता आलेले नव्हते.१९९६ मध्ये बन्सीलाल आणि १९९९-२००० मध्ये ओमप्रकाश चौटालांबरोबर युती करून पक्षाने यश मिळविले पण राज्यात स्वत:चे बळ भाजपचे नव्हते.२००४ मध्ये भाजपने राज्यात एक जागा जिंकली पण ती जागा जिंकणारे किशनसिंग दिलेर हे मुळात आय.एन.एल.डी मधून भाजपमध्ये आलेले होते आणि बऱ्याच अंशी ती जागा भाजपपेक्षा दिलेर यांनी जिंकली असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.राज्यात भाजप आणि भजनलाल पुत्र कुलदीप बिष्णोई यांचा हरियाणा जनहित कॉंग्रेस यांची युती आहे.तर कॉंग्रेस आणि चौटालांचा आय.एन.एल.डी स्वतंत्रपणे निवडणुक लढवत आहेत. चौटालांना भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा झाली असली तरी त्यांच्या पक्षाची पूर्ण वाताहत झाली अशी परिस्थिती नाही.
काही जनमत चाचण्यांनी हरियाणात भाजपला सहापर्यंत जागा दिल्या आहेत.तितक्या जागा जिंकण्याइतके भाजपचे बळ राज्यात आहे असे वाटत नाही.मला वाटते राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील असे वाटते:
| |
| हरियाणा | |
| एकूण जागा | १० |
| भाजप | २ |
| हरियाणा जनहित कॉंग्रेस | १ |
| कॉंग्रेस | ४ |
| आय.एन.एल.डी | ३ |
चंदिगड
चंदिगडमध्ये भाजपच्या किरण खेर, कॉंग्रेसचे पवनकुमार बन्सल आणि आआपच्या गुल पानंग यांच्यात लढत आहे.पवनकुमार बन्सल रेलगेट प्रकरणी बदनाम झालेले असले तरी त्यांचे स्थान चंदिगडच्या राजकारणात नक्कीच नाकारता येणार नाही. पवनकुमार बन्सल यांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे गुल पानंग यांना बन्सलविरोधी मते जातील हे नक्कीच.तरीही गुल पानंग या अराजकीय आणि अगदीच नवख्या उमेदवार आआपने दिल्या आहेत.योगेन्द्र यादव यांच्यासारखा ओळखीचा चेहरा आआपने दिला असता तर त्याचा जास्त फरक पडला असता असे वाटते.भाजपकडूनही सत्यपाल जैन यांच्याऐवजी किरण खेर या अराजकीय व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे. तसेच कॉंग्रेसविरोधी मते आआपमुळे फुटणार आहेत असे वाटते.तेव्हा चंदिगडमधून कॉंग्रेस जिंकेल असे वाटते.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात भाजप, सपा, बसपा आणि कॉंग्रेस अशी चतुरंगी निवडणुक आहे.तसेच दिल्लीजवळच्या भागात आआप सुध्दा चांगली मते घेईल असे वाटते.तेव्हा त्या भागात पंचरंगी निवडणुक असेल.पंचरंगी निवडणुक असलेल्या भागात ३०% मते मिळविणारा पक्षही निवडणुक अगदी स्वीप करेल. राज्यात भाजप ’रिव्हायवल मोडमध्ये’ आहे अशा बातम्या आहेत. २००९ च्या लोकसभा आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात पुढीलप्रमाणे परिस्थिती होती (मतांची टक्केवारी):
| | | |
| उत्तर प्रदेश | २००९ | २०१२ | फरक |
| भाजप | १७.५% | १५.१% | -२.४% |
| समाजवादी पक्ष | २३.३% | २९.१% | ५.८% |
| बहुजन समाज पक्ष | २७.४% | २५.९% | -१.५% |
| कॉंग्रेस | १८.३% | ११.७% | -६.६% |
| राष्ट्रीय लोकदल | ३.३% | २.४% | -०.९% |
| इतर | १०.२% | १५.८% | ५.६% |
या तक्त्यावरून कळते की फ्लोटिंग पक्षांची मते ५.६% ने वाढली.२०१२ मध्ये समाजवादी पक्षाने १९९१ नंतरच्या २० वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा (४०३ पैकी २२६) जिंकल्या.पण पक्षाला मते मात्र २९.१% म्हणजे ३०% पेक्षा कमीच मिळाली.चतुरंगी लढतीत ३०% मते मिळाली तरी व्यस्त प्रमाणात जागा जास्त मिळतात हे परत एकदा त्यातून सिध्द होते. बसपा २५% ते २८% मते नेहमी मिळवत आलेला आहे.पण बसपाची मते अधिक प्रमाणात विखुरलेली असल्यामुळे पक्षाला तितक्या प्रमाणावर जागा मिळत नाहीत.
राज्यात गेल्या १० वर्षात सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांचे सरकार राहिलेले आहे.दोन्ही पक्षांच्या सरकारांची कामगिरी फारशी लोकप्रिय नव्हती. २०१२ मध्ये समाजवादी पक्षाचा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली नवा चेहरा पुढे येणार असे चित्र उभे राहिले होते.पण समाजवादी पक्षाबरोबर जाणारी गुंडगिरी आणि इतर प्रश्न अखिलेश यादव यांच्या काळातही तसेच आहेत.गेल्या सव्वादोन वर्षात समाजवादी पक्षाच्या कारभाराविरूध्द नक्कीच प्रस्थापितविरोधी मते जातील.मायावतींच्या सरकारची आठवणही लोकांच्या मनात फार जुनी नाही.तसेच केंद्रात कॉंग्रेस सरकारने घातलेल्या अनागोंदीमुळे ही मते त्या पक्षाकडेही जाणार नाहीत. तसेच नरेन्द्र मोदींच्या रूपाने चांगले प्रशासन देऊ शकेल असा चेहरा लोकांपुढे आहे.मुझप्फरनगर दंगलींनंतर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात ध्रुवीकरण होऊन भाजपला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यातून भाजपची मते १०% पर्यंत वाढली तर मला आश्चर्य वाटणार नाही. नरेन्द्र मोदी वाराणसीतून निवडणुक लढवत असल्याचा फायदा पक्षाला राज्याच्या पूर्व भागात नक्कीच होईल.
तेव्हा माझ्या मते राज्यात पुढील चित्र उभे राहिल असे वाटते:
| | |
| उत्तर प्रदेश | मते % | जागा |
| भाजप | २७-३०% | ४५ |
| समाजवादी पक्ष | १८-२०% | १६ |
| बहुजन समाज पक्ष | २२-२४% | १३ |
| कॉंग्रेस | ८-१०% | ५ |
| राष्ट्रीय लोकदल | २-३% | १ |
राज्यातील काही जागांविषयीचे अंदाज:
१. वाराणसी: नरेन्द्र मोदी (भाजप) नक्की
२. लखनौ: रामनाथ सिंग (भाजप) नक्की
३. कानपूर: मुरली मनोहर जोशी (भाजप) नक्की
४. आझमगड: मुलायमसिंग यादव (सपा) नक्की
५. रायबरेली: सोनिया गांधी (कॉंग्रेस) नक्की
६. अमेठी: राहुल गांधी (कॉंग्रेस) नक्की-- जरी निवडणुक कठिण गेली तरी
७. देवरिया: कलराज मिश्रा (भाजप) नक्की
तेव्हा उत्तर भारतात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते.
| | | | | | | | | |
| | एन.डी.ए | युपीए | आआप | सपा | बसपा | पी.डी.पी | आय.एन.एल.डी | इतर | एकूण |
| जम्मू-काश्मीर | २ | ३ | | | | १ | | | ६ |
| पंजाब | ५ | ८ | | | | | | | १३ |
| हरियाणा | ३ | ४ | | | | | ३ | | १० |
| हिमाचल प्रदेश | ३ | १ | | | | | | | ४ |
| चंदिगड | ० | १ | | | | | | | १ |
| दिल्ली | ६ | ० | १ | | | | | | ७ |
| राजस्थान | २२ | ३ | | | | | | | २५ |
| उत्तराखंड | ५ | ० | | | | | | | ५ |
| उत्तर प्रदेश | ४५ | ६ | | १६ | १३ | | | | ८० |
| एकूण | ९१ | २६ | १ | १६ | १३ | १ | ३ | ० | १५१ |
उत्तर प्रदेश
तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण
In reply to तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद पैजारबुवा
In reply to तसेच उत्तर प्रदेशच्या एकुण by ज्ञानोबाचे पैजार
नाय ब्वॉ
In reply to नाय ब्वॉ by पैसा
आता उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत
In reply to आता उत्तर प्रदेशात ८० जागा आहेत by क्लिंटन
मी आहे इथं वाराणसीचा(बनारसचा)
लखनौ: राजनाथ सिंग (भाजप)
चंदिगढमध्ये सट्टेबाजार/ मटका