मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पडघम २०१४-भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड

क्लिंटन · · राजकारण
पडघम २०१४-भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा) भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब सुरवातीला उत्तराखंडमध्ये २००७ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू. तक्ता क्रमांक १
       
उत्तराखंड२००७२००९ २००७२००९२००७२००९
 मते %मते %मतांमधील फरकविधानसभा जागाविधानसभा जागा आघाडीलोकसभा जागा आघाडीलोकसभा जागा
भाजप३१.९%३३.६%१.७%३४१९
कॉंग्रेस२९.६%४३.३%१३.७%२१५१
बसपा११.८%१५.३%३.५%
सपा५.०%१.८%-३.२%
उत्तराखंड क्रांती दल५.५%१.२%-४.३%
इतर१६.२%४.८%-११.४%
तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात १. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपाने ११.८% मते मिळवली.त्यापूर्वीच्या २००२ च्या निवडणुकांमध्येही पक्षाला १०.९% मते मिळाली होती.१९८९ मध्ये मायावती सर्वप्रथम बिजनोरमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.त्यापूर्वी त्यांनी १९८५ आणि १९८७ मध्ये बिजनोर आणि हरिद्वार लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली होती हे आपण लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषेमध्ये बघितले आहे. बिजनोर हा आता उत्तर प्रदेशातला उत्तराखंडाला लागून असलेला शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे.तेव्हा मायावती आणि बसपा यांचा प्रभाव उत्तराखंडच्या मैदानी भागात पहिल्यापासून होता. २००७ मध्ये मायावती उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्या.उत्तर प्रदेशातील वातावरणाचा परिणाम म्हणा की अन्य काही कारणाने म्हणा बसपाने उत्तराखंडमध्ये आणखी चांगली कामगिरी केली. २. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सपाला ५%, उत्तराखंड क्रांती दलाला ५.५% तर अपक्ष आणि इतरांना १६.२% अशी २६.७% फ्लोटिंग मते मिळाली. ही मते २००९ मध्ये कमी होऊन ७.८% वर आली (१८.९% ने कमी). यापैकी बरीचशी मते कॉंग्रेसने आपल्याकडे वळवली. त्यामुळे कॉंग्रेसचा राज्यात जोरदार विजय झाला.पक्षाने सगळ्या म्हणजे ५ पैकी ५ लोकसभा जागा जिंकल्या. ३. अन्यथा उत्तर प्रदेशाबाहेरील कुठल्याही राज्यात बसपाला मिळालेल्या मतांचा समावेश मी फ्लोटिंग मतांमध्ये केला असता.पण २००९ मध्ये तिसऱ्या आघाडीचे सरकार आल्यास मायावती पंतप्रधान बनणार असे चित्र उभे केले जात होते.डाव्या पक्षांनी यासाठी पुढाकार घेतलाही होता.कदाचित या वातावरणाचा परिणाम म्हणून बसपाचीही विधानसभेपेक्षा लोकसभेत मते वाढली. (बसपाची अशीच चांगली कामगिरी इतर राज्यांत का झाली नाही? याचे कारण म्हणजे असा फायदा करून घेण्यासाठी लागणारा बेस तितक्या प्रमाणात इतर राज्यांमध्ये नाही). तक्ता क्रमांक २ मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दिले आहेत. सोयीसाठी २००७ च्या विधानसभा निवडणुकांचे निकालही परत एकदा त्याच तक्त्यात दिले आहेत. तक्ता क्रमांक २
      
उत्तराखंड२०१२  २००७  
 मते %विधानसभा जागालोकसभा जागा आघाडीमते %विधानसभा जागालोकसभा जागा आघाडी
भाजप३३.१%३१३१.९%३४
कॉंग्रेस३३.८%३२२९.६%२१
बसपा१२.२%११.८%
सपा१.४%५.०%
उत्तराखंड क्रांती दल१.९%५.५%
इतर१७.६%१६.२%
तक्ता क्रमांक २ वरून आपल्याला खालील गोष्टी कळतात: १. भाजपची मते २००७,२००९ आणि २०१२ मध्येही जवळपास सारखीच होती.पण कॉंग्रेसने २००७ च्या तुलनेत ४.२% मते अधिक मिळवली. कॉंग्रेसच्या वाढलेल्या मतांचा फटका जास्त बसपाला बसला.उत्तराखंडमध्येही निवडणुकांमध्ये मताधिक्य फार नसते.त्यामुळे थोडी मते इकडची तिकडे झाली तरी त्यातून निकाल चांगलेच बदलतात. २. सपा, उत्तराखंड क्रांती दल, अपक्ष आणि इतर यांना एकूण २०.९% इतकी फ्लोटिंग मते मिळाली. तक्ता क्रमांक ३ मध्ये २०१२ च्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी दिली आहे. तक्ता क्रमांक ३
         
लोकसभा मतदारसंघभाजपकॉंग्रेसबसपासपाउक्रांदइतरएकूणआघाडी पक्षआघाडी %
अलमोडा३६.६%३८.२%१०.१%०.२%५.२%९.७%१००.०%कॉंग्रेस१.६%
गढवाल३३.०%३५.५%४.४%०.५%१.२%२५.४%१००.०%कॉंग्रेस२.५%
हरिद्वार३०.०%३०.६%२१.५%०.७%०.४%१६.९%१००.०%कॉंग्रेस०.६%
नैनीताल-उधमसिंग नगर३३.८%३१.८%१५.६%३.९%१.०%१३.९%१००.०%भाजप१.९%
तिहरी गढवाल३३.७%३५.३%४.०%१.०%३.१%२२.९%१००.०%कॉंग्रेस१.६%
एकूण३३.१%३३.८%१२.२%१.४%१.९%१७.५%१००.०% 
तक्ता क्रमांक ३ वरून आपल्याला कळते की कॉंग्रेसला ४ मतदारसंघात आघाडी मिळाली आणि भाजपला १ मतदारसंघात आघाडी मिळाली. या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त आघाडी अवघी २.५% होती.यावरून लढत किती चुरशीची होती हे समजते. तिहरी-गढवाल लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये विजय बहुगुणा निवडून गेले होते.त्यांनी मार्च २०१२ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर खासदारपदाचा राजीनामा दिला.त्यानंतर तिथे ऑक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव साकेत बहुगुणा यांचा भाजप उमेदवार माल्या राज्यलक्ष्मी शाह (मानवेंद्र शाह यांच्या सूनबाई) यांनी पराभव केला यावरूनच राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवूनही कॉंग्रेसची स्थिती तितकिशी बळकट सहा महिन्यातच नव्हती हे समजून येईल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे अंदाज माझे अंदाज पुढील गृहितकांवर आधारीत आहेत: १. राज्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात विजय बहुगुणा यांच्या सरकारला अपयश आले. त्याविरूध्द राज्यातील डोंगराळ प्रदेशातील जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. २. मार्च महिन्यात विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून त्यांच्या जागी हरिश रावत यांची नियुक्ती करण्यात आली.रावत यांना मार्च २०१२ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते पण त्यावेळी विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री केले गेले.त्याविरूध्द रावत नाराज होतेच.मधल्या काळात बहुगुणा आणि रावत यांच्यात विस्तव जात नव्हता ही परिस्थिती होती.आता जरी रावत मुख्यमंत्री झाले असले तरी पक्षाचे जे काही नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे. यामुळे कॉंग्रेसची अवस्था २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये फारशी चांगली नाही. ३. राज्यातील २०.९% फ्लोटिंग मतांपैकी १४% पर्यंत मते भाजप आणि कॉंग्रेसकडे वळायची शक्यता आहे.देशातील परिस्थिती, नरेंद्र मोदींचा प्रभाव आणि राज्यातील कॉंग्रेसची परिस्थिती यांचा परिणाम होऊन भाजपला या १४% पैकी १०% पर्यंत मते आपल्याकडे वळवता आली तरी त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही.शिवाय कॉंग्रेसची स्वत:ची मते भाजपकडे काही प्रमाणात नक्कीच वळतील.तेव्हा भाजपला सुमारे ४५-४६% आणि कॉंग्रेसला ३२-३३% मते मिळतील असे मला वाटते. या पार्श्वभूमीवर मला वाटते की राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील: मुळात मार्च २०१२ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला अत्यंत निसटती आघाडी होती.उत्तराखंडसारख्या तिरंगी सामना असलेल्या राज्यात भाजपला कॉंग्रेसपेक्षा १०-१२% मते जास्त मिळत असतील तर राज्यात भाजप जोरदार विजय मिळवेल असे वाटते. भाजपने राज्यात चार मुख्यमंत्री दिले त्यापैकी तीन (भुवनचंद्र खंडुरी, भगतसिंग कोशियारी आणि रमेश पोखरियाल) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या तीनही माजी मुख्यमंत्र्यांना विजय मिळवायला काहीच अडचण येऊ नये. तसेच तिहरी गढवालमध्ये माला राज्यलक्ष्मी शाह परत एकदा उमेदवार आहेत. मानवेन्द्र शाह यांच्याविषयीच्या सद्भावनेचा फायदा त्यांना फायदा नक्कीच होईल. तेव्हा राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील असे मला वाटते:
 
एकूण जागा
भाजप
कॉंग्रेस

वाचने 3207 वाचनखूण प्रतिक्रिया 2

दुश्यन्त Sun, 05/11/2014 - 14:59
उत्तरखंडमध्ये खास करून महापुर/ प्रलयानंतर राज्य सरकारवर असलेली नाराजी , १० वर्षापासून केंद्र सरकारबद्दल असलेली नाराजी (anti incumbency) हे मुद्दे तर आहेतच. मात्र निवडणुकांच्या तोंडावर माजी खासदार सतपाल महाराज या मातब्बर नेत्याने कॉंग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने भाजपला फायदा होणार आहे. सतपाल महाराजांच्या मागे ५-६ आमदार असल्याचे बोलले जातेय (पैकी एक तर त्यांची पत्नीच आहे). तेव्हा उत्तरखंडमध्ये भाजप चांगले यश मिळवेल. तसेच लोकसभा निवडणुका निकाल वगैरे सगळ आटोपलं की तिथलं राज्य सरकार पण पडून भाजपा सरकार बनवेल अशी चर्चा आहे.