- SECH: Sounds just like "setch", or like the word "sketch" without the k.
- wahn: Sounds like the word "swan" without the s
म्हणजे हा शब्द इंग्रजीत कसाही लिहिलेला असला तरी त्याचा उच्चार "से च (चहातला च) वान" असा अपेक्षित आहे. त्यामुळे मराठीतून लिहिताना (किंवा बोलताना) तो "से च (चहातला च) वान" असा हवा. परंतु भारतात हाच शब्द मी "शेझवान" असा म्हटला नाही तर मी काय म्हणतो आहे हे कुणालाच कळत नाही हा माझा अनुभव आहे.
तसे पाहिले तर विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच चीन अस्थिर होता. जरी डॉ. सन यत सेन यांच्या नेतृत्वाखाली राजेशाही संपवून प्रजासत्ताक राज्यपद्धतीची घोषणा १९११ साली झाली तरी ही नवी सत्ता प्रत्यक्षांत पूर्ण देशावर ताबा मिळवू शकली नव्हती आणि बराच काळ चीनच्या वेगवेगळ्या भागांत भूत पूर्व अधिकारी, जमीनदार, स्वतःची सेना बाळगून असलेले बलदंड आपापली सत्ता राखून होते. डॉ. सन यत सेन यांच्या १९२५ साली झालेल्या मृत्यूनंतर थोड्याच काळांत त्यांचे उत्तराधिकारी प्रजासत्ताक राज्यपद्धतीचे पुरस्कर्ते (कुओमिन्टान्ग) आणि नवीनच स्थापन झालेली कम्युनिस्ट संघटना यांच्यात यादव युद्ध सुरू झाले. ती संधी साधून दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीपासून चीनमधल्या बऱ्याच मोठ्या प्रदेशावर जपानने कब्जा मिळवला. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला चीनमधील सगळा प्रदेश सोडून द्यावा लागला. चीनमध्ये अंतर्गत यादवी युद्ध पुन्हा सुरू झाले आणि त्यात हरलेल्या चांग कै शेक नेतृत्व करत असलेल्या कुओमिन्टान्ग सेनेने तैवानला पळ काढला आणि १९४९ साली माओ झु डंग (Mao Zedong यांना बऱ्याच वेळा भारतांत माओ त्से तुंग म्हटले जाते) यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट चीनची राजवट स्थापन झाली.
या प्रत्येक सत्ता बदलाची झळ अर्थातच सामान्य जनतेला सोसावी लागली.
Mao Zedong यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट चीन जास्त लोकाभिमुख झाला आणि बरेच सामाजिक बदल घडले. तरी सुद्धा चिनी गरुडझेप (The Great Leap Forward) आणि सांस्कृतिक क्रांती (Cultural Revolution) अशा सारख्या सरकारी खाक्याच्या काहीशा आततायी आणि अविचारी कार्यक्रमांमुळे शेती, उद्योग धंदे आणि शैक्षणिक व सामाजिक संस्थांची प्रगती होण्याऐवजी गोंधळच निर्माण झाला. Mao Zedong यांच्या कारकीर्दीत त्यामुळे सामान्य माणसांच्या सुखी जीवनाच्या अपेक्षा पुऱ्या होणे कठीण गेले. त्यानंतर १९७८ सालापासूनच्या दंग शाओ पिंग (Deng Xiaoping) यांच्या नेतृत्वाखाली चीनने जरी शेती, उद्योगधंदे, संरक्षण, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात बरीच प्रगती केली तरी त्यातून मिळणारी फळे समाजाच्या सगळ्या थरात पोचली नाहीत. त्यामुळे आणि सर्वसाधारण माणसाला एकूणच सरकारी कारभारात काहीही मत नसल्यामुळे सर्वसामान्यांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा असंतोष धुमसू आणि वाढू लागला. हा असंतोष सरकारने (आणि सरकार चालवणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी) लक्षातच न घेतल्यामुळे सुरवात झालेली विद्यार्थी चळवळ "४ जून १९८९ ची कत्तल" होऊन दाबली गेली.
कांही दशकांचा हा सगळाच घटनाक्रम येथे थोडक्यांत दिल्याने (जरी पुढे येणाऱ्या भागांत ही सगळीच माहिती आणखीन विस्ताराने येईलच) "तियानानमेन चौकातील कत्तल" या प्रकरणातला जनतेचा, विशेषतः विद्यार्थ्यांचा वाढता असंतोष आणि त्यावरची सरकारची प्रतिक्रिया समजणे जास्त सोपे जावे.
वादळापूर्वीची अशांतता
चेअरमन माओ कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य असतानाच्या काळांत खुंटलेल्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांच्यानंतर चीन देशाची सूत्रे हातात घेतलेल्या Deng Xiaoping यांनी Hu Yaobang आणि Zhao Ziang यांना हाताशी धरून (कम्युनिस्ट पक्षाची मूलभूत तत्वे न सोडता) कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा केल्या आणि लाचलुचपत कमी होऊन सरकारी यंत्रणा जास्त कार्यक्षम व्हावी यासाठी प्रयत्न केले. Hu Yaobang यांनी सांस्कृतिक क्रांती (Cultural Revolution) मुळे विस्थापित झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सक्षम पदाधिकाऱ्याना पुन्हा पक्षांत संधी मिळवून दिली. त्यांच्या इतर अनेक वैयक्तिक यशांखेरीज त्यांच्या वेगळ्या विचारसरणीचा एक नमुना म्हणजे चीनमध्ये सगळीकडे प्रचलित असलेल्या "Mao suit" चा (भारतीय "बंद गळ्या" सारखा काहीशा अव्यवस्थित तऱ्हेचा डगला) त्याग करून पाश्चिमात्य कपडे वापरणारे ते पहिले कम्युनिस्ट उच्च पदस्थ होते. या सगळ्यामुळे कम्युनिस्ट पक्षांतील इतर उच्च पदाधिकारी करत त्याप्रमाणे फक्त पक्षादेश काटेकोर न पाळता काही प्रमाणात का होईना पण सहृदयपणे काम करणारा उच्चपदस्थ असा त्यांच्याबद्दलचा सर्वसाधारण माणसाचा ग्रह झाला होता.
१९८६ च्या शेवटी आणि १९८७ च्या सुरवातीला चीनमधल्या वेगवेगळ्या शहरात (आणि बेजिंग मध्ये तर तियानानमेन चौकातच) काही हजार ते काही शेकडा विद्यार्थी एकत्र येऊन, कुठे घोषणा देत मिरवणुका काढत तर कुठे मोठ्या चौकात जमावापुढे भाषणे देत सरकारकडे अनेक मागण्या करू लागले. त्या मागण्यांना काही एकसंध रूप नव्हते आणि लोकशाही आणण्यापासून वाढत असलेल्या महागाईवर ताबा मिळवण्यापर्यंत अनेकविध मागण्या होत्या. मुख्यतः विद्यार्थी करत असलेल्या या सगळ्याच सरकार विरोधी चळवळीत कोणी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी किंवा इतर नेते नव्हते आणि सरकारने फारसे त्यात लक्ष घातले नाही तरी या चळवळीने फारसे उग्र स्वरूप घेतले नाही आणि काही काळातच विद्यार्थी रस्त्यावरून हटले.
या थोडक्यात शमलेल्या चळवळीने जरी फारसे काही बिघडले नाही तरी हु याओबांग (Hu Yaobang) यांच्यावर त्या बद्दल मवाळ धोरण ठेवल्याचा आरोप केला गेला आणि त्यांना १५ जानेवारी १९८७ रोजी राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. कम्युनिस्ट पक्षातल्या Deng Xiaoping यांच्यापेक्षा एकच पायरी खाली असलेल्या Hu Yaobang यांना त्या राजीनाम्यानंतर जेमतेम कांही समित्यांमधील आपले स्थान टिकवता आले पण त्यांची आधीची कर्तबगारी विसरली जाऊन कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासातून त्यांचे नांव जवळजवळ पुसूनच टाकले गेले. या राजीनाम्यामुळे तयार झालेला Hu Yaobang हे विद्यार्थी धार्जिणे असल्याचा खरा खोटा समज पडताळून पाहता येण्याआधीच १५ एप्रिल १९८९ रोजी त्यांचे निधन झाले.
या पार्श्वभूमीवर पूर्ण चीनभरातल्या विद्यार्थ्यांना वाटत होते की Hu Yaobang यांच्यावर मृत्यूनंतर मानसन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत पण त्यांचा मृत देह तियानानमेन चौकातल्या "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवला जाण्यानंतरच्या कार्यक्रमाबद्दल बरीच संदिग्धता होती. त्यामुळे बेजिंगमधील सुमारे ९२ विद्यापीठातील हजारो तरुण विद्यार्थ्यानी प्रथम त्यांच्या संस्थेत १६ एप्रिल १९८९ पासून एकत्र जमून श्रद्धांजली वाहिली आणि नंतर लहान मोठ्या जमावाने अंत्यदर्शनासाठी तियानानमेन चौकाकडे जाण्यास सुरवात केली.
तियानानमेन चौक, बेजिंग
हा चौक जगातील सगळ्यात मोठा चौक समजला जातो. तुलनात्मक अंदाज येण्यासाठी काही उदाहरणे - मुंबईत आणलेल्या निदर्शकांना ज्या आझाद मैदानावर एकत्र केले जाते त्याचे क्षेत्रफळ सुमारे २ एकर आहे. तशाच तऱ्हेच्या दिल्लीतल्या रामलीला मैदानाचे क्षेत्रफळ सुमारे १० एकर आहे. तर तियानानमेन चौकाचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे १०९ एकर आहे आणि त्यात सुमारे १० लाख लोक मावू शकतात असे म्हटले जाते. हा चौक प्रथम १६५१ साली बांधला गेला आणि त्यानंतर अनेक वेळा वाढवला आणि सुशोभित केला गेला.
या चौकाच्या उत्तरेच्या बाजूला चीन शाही राजसत्तेखाली असलेल्या काळापासूनचा असलेला Forbidden City (फक्त राजघराण्याच्या लोकांच्या आणि त्यांचा लवाजमा, नोकर चाकर, सरकारी कामकाजाची यंत्रणा वापराकरता असलेला) हा शहराचा भाग आहे. या भागाच्या भव्य प्रवेशद्वारावर "चेअरमन माओ" यांचे (मोना लिसासारखे गूढ स्मितहास्य करणारे, त्यांच्या उमेदीच्या काळातले) ६ मीटर x ४.५ मीटर आकाराचे अवाढव्य चित्र लावलेले आहे, जे या अतिप्रचंड चौकाच्या बऱ्याच भागातून दिसू शकते.

या चौकाच्या पश्चिमेच्या "Great Hall of the People" मध्ये एकावेळी सुमारे १०,००० लोक बसू शकतील असे मुख्य सभागृह, वेगवेगळ्या आकाराचे ३० सभाकक्ष आणि अशाच धर्तीवरच्या अनेक सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची अनेक वेगवेगळ्या दर्जाची संमेलने आणि सभा, चीनमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या परदेशी पाहुण्यांचे आगत -स्वागत आणि त्याकरता होणारी मानवंदना आणि अशाच तऱ्हेचे भव्य प्रमाणातील वेगवेगळे राष्ट्रीय औपचारिक समारंभ अशा सगळ्यांसाठी ही भव्य इमारत वापरली जाते.
या चौकाच्या इतर भागांत देखील अनेक महत्वाच्या इमारती आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत (जसे चेअरमन माओ यांची समाधी, राष्ट्रवीरांच्या स्मरणार्थ उभारलेले शिल्प) आणि त्यामुळे हा चौक पाहणे हे बहुतेक पर्यटकांच्या यादीत समाविष्ट असते.
वादळाची सुरवात आणि वाढते घोंघावणे
Hu Yaobang यांचा मृत देह तियानानमेन चौकातल्या "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणे हे जरी यथोचित होते तरी त्यांची कम्युनिस्ट पक्षातील कामगिरी, स्थान आणि लोकप्रियता लक्षात घेता आणखीनच आदराने आणि शाही औपचारिकतेने त्यांचे अंत्यसंस्कार व्हायला हवे असे बहुतेक विद्यार्थ्यांना मनापासून वाटत होते. विद्यार्थ्यांना Hu Yaobang हे लाचलुचपत विरोधी आणि राजकारणातील नव-विचारवादी वाटत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट पक्षाच्या इतर कुठल्याच उच्चपदस्थाला त्यांच्या उदार मतवादी विचारांची कदर नसल्याचा संशय होता. त्यामुळे या प्रसंगाचा फायदा घेऊन एकत्र येऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करता आला तर त्याचा उपयोगाच होईल असे विद्यार्थ्यांना वाटत होते.
जसजसे हजारोनी विद्यार्थी (आणि त्यांच्याच बरोबरीने कामगार आणि इतर) "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी येऊन त्यानंतर बाहेर तियानानमेन चौकात जमा होऊ लागले तसतसा जमावाचा आवेश वाढू लागला आणि घोषणांतून लाचलुचपत आणि कम्युनिस्ट पक्षाची दडपशाही यांच्या विरोधाखेरीज महागाई, अपुरी घरे आणि नोकऱ्या याबद्दलही आवाज उठवला जाऊ लागला. पंतप्रधान Li Peng आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर अनेक उच्चपदस्थाना या सगळ्याच मागण्या अवास्तव, अनाठायी आणि परकीयांच्या चिथावणीमुळे होत असल्याचे वाटत होते आणि त्याबद्दल कडक कारवाई लगेच करून अशा मागण्या वाढण्या आधीच, कुठल्याही उपायाने सगळ्या जमावाला दाबून टाकावे असे त्यांचे मत होते. या उलट पक्षाचे सरचिटणीस Zhao Ziyang आणि इतर मूठभर पदाधिकारी "विद्यार्थी जे इतके चवताळले आहेत ते काही तरी तथ्य आहे म्हणून, आपण त्यांचे मत ऐकून, त्यांना चुचकारून त्यांचे आणखी प्रक्षुब्ध होणे टाळायला हवे (म्हणजे निदान २२ एप्रिलला ठरवलेली औपचारिक दुखवट्याचे सभा तरी गोंधळ न होता पार पडू शकेल)" अशा थोड्याशा नरमाईने पुढील पावले उचलण्याच्या मताचे होते.
१७ एप्रिल ते २१ एप्रिलच्या दरम्यान काही हजार विद्यार्थ्यानी वेळोवेळी तियानानमेन चौकाच्या पश्चिम बाजूला असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्य कार्यालयात घुसण्याचे प्रयत्न केले पण त्यांना पोलिसांच्या तटबंदीपलीकडे जाता आले नाही. या विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील संघर्षात काही वेळा पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यामुळे वातावरण आणखीनच तापत गेले. या काही दिवसात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या संख्येच्या गटाने घोषणा देत आणि घोषणा फलक मिरवत "शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, Hu Yaobang यांच्या विचारसरणीचा सर्वत्र प्रसार, राज्यकारभारात सुधारणा" अशा विविध मागण्या करत होते.
अशा वातावरणांत २२ एप्रिल १९८९ रोजी "Great Hall of the People"मधल्या Hu Yaobang यांच्या औपचारिक दुखवट्याच्या सभेच्या वेळी बाहेर एक लाखाहून अधिक विद्यार्थी आणि कामगार एकत्र होऊन घोषणा देत होते. या सभेला जरी कम्युनिस्ट पक्षाचे बरेच उच्चपदस्थ हजर होते तरी ती जरा झटपटच आटपली गेली. तीन विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान Li Peng आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर अनेक उच्चपदस्थाना गाठून आपल्या मागण्या सादर करण्याची ही उत्तम संधी आहे असा विचार करून पोलिसांचे कडे चुकवून दरवाज्याबाहेर पंतप्रधान Li Peng यांची वाट पाहिली तर आणखी एका विद्यार्थी नेत्याने पोलिसांनी अडवून धरलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांना शांत ठेवण्यासाठी भाषण सुरू केले. Li Peng किंवा इतर कोणीही उच्चपदस्थ या मागण्या ऐकण्यासाठी देखील न फिरकल्याने विद्यार्थी निराश आणि अपमानित झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी बेजिंगमध्ये आपली एक वेगळीच कम्युनिस्ट पक्षाबाहेरची विद्यार्थी संघटना स्थापन करून सगळ्या शिक्षण संस्था बहिष्कृत करण्याचे ठरवले. इतर शहरातल्या विद्यार्थ्यांनी देखील अशीच पावले उचलली.
हा सगळाच प्रकार कम्युनिस्ट पक्षाच्या संघटनेबाहेर घडत असल्यामुळे (आणि त्यामुळे त्यावर कांही नियंत्रण करणे कठीण झाल्यामुळे) पक्षातील उच्च पदस्थाना ही सुरू होणारी क्रांतीची लाट जास्त वाढू न देता कुठल्याही परिस्थितीत थांबवलीच पाहिजे असे वाटू लागले असावे.
२५ एप्रिल १९८९ रोजी एका उच्च पदस्थांच्या बैठकीत (ज्या वेळी Zhao Ziang परदेशाच्या दौऱ्यावर असल्यामुळे गैरहजर होते) Deng Xiaoping, त्या वेळचे चीनचे सर्वे-सर्वा यांनी सर्वत्र पसरू लागलेली विद्यार्थी चळवळ म्हणजे कम्युनिस्ट राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न आहे आणि आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे असे ठरवले आणि २६ एप्रिल १९८९ रोजी या आशयाचा अग्रलेख कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या "Peoples Daily" या वृत्तपत्रात देखील छापला गेला. या सगळ्याचा परिपाक मात्र विद्यार्थी दबून मागे हटण्या ऐवजी जास्तच खवळण्यात झाला आणि "२६ एप्रिल १९८९ चा अग्रलेख मागे घ्या" ही आणखी एक मागणी पुढे येऊ लागली.

प्रतिक्रिया
सखोल माहिती बद्दल...
धन्यवाद.
थोडीफार माहिती होती परंतू आपला लेख वाचल्यावर चित्र स्पष्ट झाले.
शिक्षण क्षेत्रातल्या खेळखंडोब्याला तोंड द्यावे लागत आहे. अशा आणि इतरही संदर्भात दुखावलेल्या तरुणांची प्रतिक्रिया काय असू शकते हे समजण्यासाठी तियानानमेन चौकातील विद्यार्थी चळवळ हे एक जागतिक महत्वाचे उदाहरण आहे.
सहमत आहे. मंडल नंतर थोड्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यांनी मर्यादित स्वरूपात चळवळ केली परंतू एक भाग लाभान्वीत असल्याने चळवळ तीव्र नव्हती व शमन करण्यासाठी वेळ लागला नाही.
बाकी आवांतर...
"शेझवान" न्युडल्स बद्दल ऐकले तेंव्हा असे वाटले की शेजारी शेजारी बसून वळलेल्या शेवयांना हे नाव चिनी भाषेत दिले असावे.
हा एक प्रांत आहे हे कळल्यावर सामान्य ज्ञानात वृद्धी झाली.
हलकेच घ्या...
जबरदस्त माहीती!!
तिआन्मेन चौकात निदर्शने झाली तेव्हा खूपच लहान होतो. शिवाय २४ तास दळण घालणारे तथाकथित आक्रस्ताळी बातमीदार नव्हते ना ईंटरनेट होते. त्यामुळे दूरदर्शन वर जितके बघितले त्यातही तो रणगाड्यावरती चढलेला तरुण आठवतोय. मला वाटते त्यानंतरच चीनी मिडिया अधिकाधिक सरकारी होत गेला आणि चीनमधील बातम्या चाळणी लावुन बाहेर येऊ लागल्या ते आजतागायत.
अजुन एक, त्यावेळी परदेशी हस्तक्षेप, कंत्राटी गर्दी, आंदोलनजीवी तरुण, झुरळे बिरळे असे शब्दप्रयोग वापरले जात नसत त्यामुळे दूरदर्शनवर जे काही दिसते ते जेन्युइन आहे असे मानले जाई.
तुमच्या चश्म्यातून त्या वेळच्या साऊथ ईस्ट एशिया बद्दल अजुन वाचायला आवडेल. विशेष्त: तैवान, हॉंगकॉग, मलेशिया,सिंगापूर यांनी ईतकी प्रगती कशी केली आणि आपण त्यातुन काय शिकले पाहीजे?
चांगली माहिती. सध्या अशी…
चांगली माहिती. सध्या अशी विद्यार्थी क्रांती नेपाळ, बांगलादेशात दिसली, त्यांचं भविष्य चीन सारखं असेल काय हे येणारा काळ ठरवेल.
लेखात विविध font दिसत आहेत.सर्व लेख एकच फॉन्टमध्ये असावा.