मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूमिगत मेट्रो , नेहरू विज्ञान भवन, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्राला भेट

गोरगावलेकर · · जनातलं, मनातलं
वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते . भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३  किंवा अ‍ॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .   गाडी येण्याची सूचना मिळाली . काही सेकंदासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूस असलेल्या काचेचे व आलेल्या गाडीचे दोन्ही दरवाजे एकाच वेळी अघडल्या गेले .  आम्ही आत शिरलो . काही सेकंदात दरवाजे बंद झाले . गाडी जणू काही आमच्यासाठी आरक्षित अशी संपूर्ण मोकळी . बहुदा शनिवारचा दिवस असल्याने बरीच कार्यालये बंद असावीत .  फोटोच्या नादात आमचा एकजण फलाटावरच राहिला होता . आम्ही सायन्स सेन्टर स्टेशनला उतरून त्याची वाट पहिली . दहा मिनिटात पाठीमागच्या गाडीने तोही येऊन पोहचला . बरे झाले आम्ही प्रत्येकाकडे ज्याचे त्याचे तिकीट दिले होते . कारण स्टेशनहून बाहेर पडताना देखील तिकीट स्कॅन करावे लागते , सरकत्या जिन्याने वर आलो . प्रवास खूपच सुखकारक झाला होता . अगदी बाजूलाच विज्ञान केंद्र आहे .  एक थ्री डी शो आणि अजून एक दुसरा शो मिळून प्रत्येकी रु . १ ३ ० /- चे तिकीट काढले . केंद्राच्या आवारात बाग आहे आणि तेथे विज्ञानावर आधारित पुष्कळ खेळ ठेवले आहेत . जसे तरफेचा उपयोग करून वजन उचलणे . साखळी - कप्पीचा उपयोग . एकाच उंचीवर बांधलेले पण विविध लांबीचे झोके . लंबकाचा आंदोलनकल त्याच्या लांबीवर अवलंबून असतो त्याचे प्रात्यक्षिक . येथेच एक दीड तास सहज वेळ घालवू शकतो .     नंतर केंद्रात प्रवेश केला . येथेही काही प्रात्यक्षिकं आहेत . आणि वरच्या काही मजल्यांवर मानव इतिहास वगैरे चितारले आहे . दोन्ही शो पाहिले . सर्व आवडले . थोड्याच वेळात वेगवेगळ्या शाळांच्या सहली येण्यास सुरुवात होऊन बरीच गर्दी झाली . शाळांचे शिक्षक मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना रांगेने शिस्तीत केंद्रात घेऊन जात होते . त्यामुळे मुले बागेतील खेळांना मुकली होती . त्यामुळे एक सांगावेसे वाटते . पालकांनी मुलांना सहलीस जरूर पाठवावे पण स्वतःही निदान एकदा तरी त्यांना स्वतंत्रपणे फिरवून आणावे . केंद्राच्या बाहेरून टॅक्सी घेतली आणि तारांगणाला पोहचलो . शनिवार , रविवारी येथे घुमटाकार गृहात खागोलशास्त्र व ताऱ्यांबद्दल मराठीतून माहितीपूर्ण दिली जाते . विषय होता आज रात्रीचे आकाश आणि दुसऱ्या भागात ब्रह्माण्डा विषयी माहिती. हा शॊ सुद्धा खूप आवडला . समोरच गोलाकार आकाराची नेहरू केंद्राची इमारत आहे .  येथे कला दालनात आमच्या परिचितांपैकी एकाचे चित्र प्रदर्शन (व विक्री ) होते . त्यांचा चित्र विषय होता 'सखी ' . मला चित्रांमध्ये जास्त काही समजले नाही पण आमच्या अचानक भेटीने ते मात्र खूप खुश झाले . अजून वरच्या मजल्यावर 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'  हे एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे जेथे भारताचा इतिहास, संस्कृती आणि कला यांचा वेध घेता येतो . सर्व पाहून कालीपिलीने परत CSMT आलो . (पूर्वीचे बोरीबंदर जास्त सुटसुटीत वाटते )

वाचने 1244 वाचनखूण प्रतिक्रिया 11

कंजूस Sat, 01/24/2026 - 17:11
सुंदर चित्र संकलन आणि सहल. पार्कातले झोपाळे पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी असतात. ------ ही मेट्रो कफ परेडपर्यंत सुरू होण्याअगोदर मरोळ नाका ते T1 जाऊन आलो होतो आणि मुद्दामहून लिफ्टने न जाता जिन्याने चढाउतरायचे ठरवले. गर्दी नसल्याने उतरण्याचा सरकता जिना बंद ठेवला होता.बारा मजले चढ उतार करावा लागला. काही युट्यूबरनी भीती व्यक्त केली होती की मुंबई मेट्रो आठ डब्यांची आहे आणि सर्व डबे भरून प्रवासी आल्यास खूप ताण पडेल लिफ्ट किंवा जिन्यावर. याउलट तुडुंब गर्दीत चालणारी पहिली घाटकोपर - वर्सोवा चारच डब्यांची आहे.

गोरगावलेकर Sat, 01/24/2026 - 19:04
पार्कातले झोपाळे पाच वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी असतात. इतर बागेतले झोके लहान मुलांसाठी असतात पण इथे तसे नसावे . हे स्वतः प्रयोग अजमावण्यासाठी आहेत . येथील सुरक्षा रक्षकानेच आम्हाला प्रयोग करून बघण्यास सांगितले होते .

In reply to by गोरगावलेकर

कंजूस Sat, 01/24/2026 - 20:05
हं म्हणजे वैज्ञानिक तथ्य पटवून देण्यासाठी असणार. पण फारच थोडी नशीबवान लहान मुले ( चौथी पाचवी पर्यंतची) आहेत की त्यांचे पालक त्यांना दूरच्या उपनगरांतून इथे स्वतंत्रपणे सुटीच्या दिवशी आणू शकतात. रविवारी मुंबईतील लोकल ट्रेन सर्विसेसचा "मेगा ब्लॉक" ( हे इतर शहरातल्या लोकांना समजावणे अवघड आहे) सकाळी दहा ते चार असतो. सेवा "कोलमडलेल्या" असतात. ट्रेनचे तिकिट परवाडणारे असते आणि ट्राफिक जामवगैरे नसते. टॅक्सी करणे हाताबाहेर ची कामे आहेत. शाळेच्या सहली या वर्षातून एकदा आणि उपकार केल्यासारख्या नेतात. [ जाताना आणि येताना मुले मोजून न हारवता आणणे जोखीम.] दोन दोनच्या जोडीने रांगेने फिरवले की झाले. किती. अवघड आहे ते शिक्षकच सांगू शकतील.

मला एक कळत नाही या नव्या बांधलेल्या मेट्रोमध्ये चार दोन माणसं फक्त कशी काय प्रवास करतात? इतक्या कोट्यावधीच्या प्रोजेक्ट मधून मग काय मिळतं नेमकं? ते पुण्याच्या मेट्रोची रायडरशिप पण एवढी कमी आहे की मला हसायला येते. म्हणजे हा डेली ट्रान्झिट चा एक सगळ्यांना सर्वसामान्यांना परवडणारा महत्त्वाचा प्रवास व्हायला पाहिजे मात्र चार दोन मंडळी गंमत म्हणून या मेट्रोचा वापर करत असतील तर या मेट्रोचा काय फायदा आहे नेमका? आता नागपूर मध्ये सुद्धा एक मेट्रोची लाईन आहे एका मेट्रोच्या लाईन ने काय घंटा फरक पडणार आहे? म्हणजे हा विचार तरी कसा करू शकतात किती गैरसोयीचे आहे या एका लाईन मधून प्रवास करणे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

कंजूस Sat, 01/24/2026 - 19:53
प्रश्न रास्त आहे. पण नोकरदार लोकांचे कार्यालयात जाण्याचे नेहमीचे मार्ग पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवर त्या उपनगरांतून चर्चगेट किंवा मुंबई छत्रपती म.टर्मिनस हे आहेत. शिवाय अगोदर आणि नंतरही बसमध्ये जावे लागते त्यात ही मेट्रो स्टेशने फारशी बसत नाहीत. एकदा का लोकल ट्रेनच्या गर्दीत कसेबसे घुसले आणि गंतव्य स्थानावर बाहेर ढकलले गेले की तो दिवस 'भरतो'. काही नशिबवान लोकांनाच घर ते कार्यालय याजवळची एकाच मेट्रोवरची स्टेशने आहेत.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गामा पैलवान Sun, 01/25/2026 - 02:56
हणमंतअण्णा, मेट्रो महाग आहे. म्हणून माणसं कमी असतात. मात्र घाटकोपर ते वर्सोवा मार्ग याला सणसणीत अपवाद आहे. मला या मार्गावर कधीच बसायला मिळालं नव्हतं, (गुदस्ता जुलै/ऑगस्ट) इतकी ती तुडुंब भरून वाहते. आ.न., -गा.पै.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विवेकपटाईत Sun, 01/25/2026 - 17:29
सुरुवातीच्या काही महिने दिल्लीची अनेक मेट्रो रूट वर कमी bhid राहायची. पण आता सर्वच मेट्रोवर भयंकर भिड असते. आजच्या घटकाला मुंबई लोकल पेक्षा जास्त लोक दिल्ली मेट्रो वापरतात. काही महिन्यांपूर्वी पुण्यात गेलो होतो पुरमेट्रो मध्ये भरपूर गर्दी होती. वर्षातून एक किंवा दोनदा नागपूरला जातो. विमानतळावरनं सरळ मेट्रोन जातो. नागपूर आज सध्या दोन लाईन सुरू आहेत रोजची प्रवासी संख्या एक लाखांवर पोहोचली तीन वर्षाआधी 5000 ही नव्हती. सुट्टीच्या दिवशी दीड लक्षच्यावर प्रवासी असतात. 43 किलोमीटरच्या चार लाईन वर काम सुरू आहे 30 पर्यंत चारी लाइफ पूर्ण होती तेव्हा वापरण्याची संख्या पाच ते सात लक्षच्या वर निश्चित जाईल.

In reply to by विवेकपटाईत

कंजूस Sun, 01/25/2026 - 21:39
दिल्लीकरांना राग येईल परंतू खरी गोष्ट म्हणजे राजधानीच्या या शहरात वेगळे अटी नियम ( शिथील केलेले) लागू असतात. कागदी थोडक्यात सांगायचं तर subsidised rates लागतात इथे. आणखी स्पष्ट किंवा साखरेच्या पाकाची आवरण दिलेली घोषीत ...... इकडे बुफे पद्धत आहे. आपणच आपल्या ताटात हवे तेवढे गोड पदार्थ आणि तूप वाढून घेऊ शकतो. [ संदर्भ.. Delhi milk Scheme तोट्यात जाते पण गुजरातची मात्र वर्गिज कुरियन फायद्यात चालवतात म्हणून त्यांना बोलावले तेव्हा कुरियन म्हणाले की मला अधिकार दिले तर करून दाखवीन. मग त्यांना कृषी मंत्र्याएवढे अधिकार दिले. मग तीन महिन्यांत त्यांनी तो प्रकल्प फायद्यात आणला. कसा? दिल्लीतल्या बाबूंना स्वस्तात दूध मिळणे बंद करून टाकले. ( कॉस्ट प्राईस पाच रुपये लिटर पण बाबूंना तीन रुपये लिटरने दूध द्यायचे.] हे त्यांच्या पुस्तकात आहे. माझा आरोप नाही.

धर्मराजमुटके Sun, 01/25/2026 - 11:20
छान लेख ! एक अजब प्रश्न विचारतो. मागील एका भटकंतीच्या लेखात तुम्ही सगळ्या घरातल्या सभासदांचे चेहरे त्यावर गोल काढून लपविले होते. मात्र मागील काही लेखांमधे तुमचे चेहरे दिसत आहेत असे का ? (मेरा चेहरा मै दिखाऊ या छुपाऊ, मेरी मर्जी हे मान्य आहे ) प्रश्न आगावू वाटला तर उत्तर नाही दिले तरी चालेल :)

In reply to by धर्मराजमुटके

गोरगावलेकर Sun, 01/25/2026 - 16:27
तसं काहीही नाही. पूर्वीही नाही आणि आताही नाही “चेहरा लपवायचं काही कारणच नाही" किंवा चेहरा लपवायची गरज मला कधीही भासलीच नाही