Skip to main content

महाराष्ट्रातला बौद्ध धर्म (शंका)

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 05/08/2021 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातला बौद्ध धर्म
महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माबाबत मला काही शंका आहेत. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जो बौद्ध धर्म फॉलो करतात तो नेमका कसा आहे ? तिबेट, चीन, जपान इथल्या बौद्ध धर्माशी त्याचा कितपत संबंध आहे ? नसेल तर तसे का ? महाराष्ट्रातले बौद्ध कुठल्या पंथाचे आहेत वज्रयान की महायान ? गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे ! बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती. बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ? गौतम बुद्धांच्या किंवा अशोकाच्या काळात तो धर्म जगात सर्वत्र गेला. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का ! गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का , स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?

वाचने 44871
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती.
विशेष अभ्यास नाही. पण साहेबांनी स्वीकारलेला धर्म त्यांची अपरिहार्यता होती. त्यांनी आधी त्यांचा मूळ धर्म सुधारित करायचे शक्य ते प्रयत्न केलें पण त्याना तुम्हीं परफेक्ट २ अथवा सदैव गट क्रमांक दोन मधीलच मानण्यात येईल असे निक्षून सांगितले गेले त्यामुळं बहुसंख्य लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे सोडवला.
गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे
यावर नक्कीचं काही विचार सांगता येतील पण मी बौध्द नसल्याने यावर विचार करून नंतर व्यक्त होईन म्हणतो.
त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही.
लोकांना बाबासाहेब पटले होते असे म्हणता येईल.
पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?
याचे अध्यात्मिक आणि सामाजिक कंगोरे आहेत... पण अध्यात्मिक गती असलेला बुध्द मार्गी जगातील कुठलाच धर्म स्वीकारायचा नादाला लागनार नाही हे नक्की. प्रसंगीतो बुध्दालाही सुधारित करेल,आणि निव्वळ अध्यात्मिक साध्य ही एकमेव रुची असणारा कोणताही धर्मीय एकदा बुध्दाने सांगितलेल्या मानसिक क्रियांचा अभ्यास करून अनुभव घेतल्यावर परत कुठलाच धर्म स्वीकारायचा नादाला लागनार नाही हे ही नक्की. वाद, प्रतिवाद हे फक्त बुध्दाच्या साधनेचा अभ्यास प्रत्यक्ष न केलेले लोकं करतात व करत राहतील कारण त्यांनी अभ्यास बुध्दाच्या बाजूच्या अथवा विरोधी मताचा केलेला असतो, साधनेशी त्यांचा गाढा संबंध उरलेला नसतो. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का ! समजा पोचला असेल अजिंठा वेरूळ परिसरात तरी उद्या तो कोकणात का पोचला नाही असा प्रश्न कोणी विचारेल थोडक्यात प्रश्न विचार करायचा योग्यतेचा नाही हे वैयक्तिक मत.
गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का ,
सकृत दर्शनी हो असे म्हणता येईल.
स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?
कल्पना नाही, माझीच स्थिती तेंव्हां कशी होती हे ही ठावूक नाही.

गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का
सकृत दर्शनी हो असे म्हणता येईल. जसे पाकिस्तानी अन बांगलादेशी लोक भारतीय होते, आणि अखिल उत्क्रांत मानवजात आफ्रिकन वंशाची होती.

हिंदू धर्मात खालच्या जाती मधील लोकांवर उच्च जातीच्या लोकांच्या होणाऱ्या अन्याय मुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण तरी जाती आहे तशाच आहेत.धर्म बदलून सुद्धा लोकांनी जात सोडली नाही. मग बाबासाहेबांचे स्वप्न अधुरेच राहिले असे म्हणता येईल का?

महाराष्ट्रातला बौद्ध धर्म - चांगला चर्चाविषय आहे. ह्यात दोन पदर आलेले आहेत आणि ते दोन्ही स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत. १. बुद्धाचा संघ आणि त्याचा बुद्धकालीन व अशोककालीन परामर्श २. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या अनुषंगाने परामर्श १. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नव्हता. त्याला ज्या मार्गाने सत्याच्या उलगडा झाला तो मार्ग (अष्टांगमार्ग) तो फक्त शिकवत होता. ती शिकवण शील, समाधी आणि प्रज्ञा ह्यावर आधारित होती. बुद्धाच्या काळातच त्याच्या शिष्यांनी त्याची शिकवण पूर्वेकडील देशांमधे पोहोचवली आणि संघ फोफावला. त्याकाळी तो महाराष्ट्रातही पोहोचला असावाच. महाराष्ट्रात ठिकठीकाणी असलेल्या बुद्धकालीन लेण्यांवरून तसे म्हणता येऊ शकते. बुद्ध आणि अशोक क्षत्रिय होते का नव्हते हा प्रश्न ह्या काथ्याकुटीत गौण आहे. पुढे काळाच्या ओघात संघात (बुद्धाच्या अनुयायांमधे), त्याच्या शिकवणीच्या अनुसरणाच्या पद्धतींनुळे, वेगवेगळे पंथ (हीनयान, महायान आणि वज्रयान),तयार झाले आणि संघाचे धर्मात रुपांतर झाले (जे बुद्धाला कधीही अपेक्षित नव्हते). २. बाबासाहेबांचे धर्मांतर पुर्णपणे राजकीय / सामाजिक होते. ते ज्या समूहाचे प्रतिनिधीत्व करत होते त्या समूहाच्या स्वातंत्रोत्तर भारतात राजकीय / सामाजिक अस्तितवासाठी उचललेले पाऊल होते. त्यांनी बौद्धधर्म का स्विकारला ह्यामागची वैचारिक बैठक, त्यांचा हा लेख स्पष्ट करते. बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता ह्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळण्याचे काही करण दिसत नाही. त्यामुळे तसं होणं जवळजवळ अशक्य आहे. - (अभ्यासू विद्यार्थी) सोकाजी

आंबेडकरांना गांजलेल्या जनतेला मुक्त करायचे होते आणि ते पूर्ण साध्य झाले. हिंदू धर्मात उच्चवर्णियांंच्या वागणूकीला निम्न जातीतले लोक त्रासलेले. त्या धर्मातुनच बाहेर पडल्याने सुटका होणार होती. आंबेडकरांचा धर्मबदल निर्णय पक्का होता. ( केरळमध्ये काय झाले पाहा.तिथल्या काही लेखकांची पुस्तके वाचल्यास कळेल. ) ------- धर्मबदल आणि फरक हा पुढचा भाग येतो. पण त्यातले उपप रकार आणि आचरण म्हणाल तर ते सर्वच धर्मात आहेत.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जो बौद्ध धर्म फॉलो करतात तो नेमका कसा आहे ? तिबेट, चीन, जपान इथल्या बौद्ध धर्माशी त्याचा कितपत संबंध आहे ? नसेल तर तसे का ?
दोन्हींचा एकमेकांशी काही संबंध नसावा. अगोदरच्या धर्माचा, जातीचा, मातीचा काही ना काही परिणाम राहतोच. ग्लोबल धर्माच्या लोकलायजेशमुळे काही गोष्टी मुळातूनच बदलून जातात.
महाराष्ट्रातले बौद्ध कुठल्या पंथाचे आहेत वज्रयान की महायान ?
कोणताही पंथ म्हणालात तरी मुख्य म्हणजे मुर्तीपुजा करु नका असे बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे मत मात्र त्यास सरसकट हरताळ फासलेला आढळतो. बौद्ध बांधवांच्या घरात बुद्धाच्या / बाबासाहेबांच्या मुर्ती / तसबिरी आढळतात. त्यांची यथासांग पुजा होते. त्यामुळे वज्रयान की महायान याने फारसा फरक पडतो असे मला वाटत नाही.
गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे !
माझ्या मर्यादित परीचीत वर्तुळातील फारच थोड्या बौद्ध व्यक्तींना योगसाधनेत रस आहे असे जाणवले.
बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती.
हा निर्णय केवळ सामाजिक होता. बाबासाहेबांचे मुख्य लक्ष समाजातील पिचलेल्यांना मानसन्मान मिळवून देणे होते. बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही. मात्र बाबासाहेबांनी देवाधर्माचा त्याग करा आणि नास्तिक व्हा असा सल्ला दिला असता तर तो जनतेला मान्य झाला नसता. थोडक्यात धर्म हा समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा एक खुंटा एवढाच त्याचा अर्थ आहे. मात्र स्वतः बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा अभ्यास गाढा होता एव्हढे सांगता येईल. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माबद्दल लिहिलेले आणि थायलंड (की इंडोनेशिया) येथून प्रकाशित झालेल्या एका पुस्तक मी वाचल्यावर हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्म स्वीकारावा असे माझे स्वतःचे मत झाले होते. मात्र पुढे जाऊन हिंदू धर्माबद्दल अभ्यास केला तेव्हा इथे आणि तिथे फारसा फरक नाही हे लक्षात आल्यावर धर्मपरिवर्तनाचा विचार डोक्यातून काढून टाकला.
बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?
स्वत: बाबासाहेब जरी परत आले तरी आता ते शक्य नाही.
गौतम बुद्धांच्या किंवा अशोकाच्या काळात तो धर्म जगात सर्वत्र गेला. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का !
त्याचा दोष भारतीय रक्तात आहे. त्याला या मातीतला कोणताही धर्म, जात अपवाद नाही. आपल्याकडे दुसरी फळी तयार होत नाही. कोणीतरी एखादे राम / कृष्ण / शिवाजी महाराज / बाबासाहेब तयार होतात. आता त्यांचे वंशज तपासून पहा आणि आडनाव सोडले तर दुसरे काही साम्य, वकुब आढळतो का ते बघा.
गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का , स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?
की फर्क पेंदा है ?

> गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे ! गौतम बुद्ध ह्यांनी विविध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना केली. त्यांनी विविध प्रकारे समाधी अवस्थेची अनुभूती सुद्धा घेतली. तत्कालीन योगपद्धतीत काही फेरफार करून त्यांनी आपला मार्ग निर्माण केला. बुद्ध स्वतः तसे मान्य करतात. विपश्यना हि पद्धती बुद्ध ह्यांना आवडली आता ती त्यांनी इतर कुठल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली आत्मसात केली कि त्यांनी स्वतः शोधून काढली हे नक्की ठाऊक नसल्याने ती त्यांनीच निर्माण केली असे आम्ही म्हणून शकतो. अर्थांत बुद्ध ह्यांनी स्वतः सांगितले कि ते रामाचे अवतार आहेत आणि हिंदू धर्मातील अनेक "बुद्ध" लोकांपैकी ते एक आहेत. बुद्ध ह्यांनी स्वतः नवीन धर्माची स्थापना केली नाही. बुद्ध स्थितीतील सिद्धार्थ ह्यांना पुन्हा पृथ्वीवर सामान्य माणूस म्हणून जाण्यासाठी ब्रम्हा अन ईंद्र ह्या दोन देवांनी विनंती केली. हे कथा स्वतः बुद्ध ह्यांनी सांगितली असल्याने ती सर्वत्र विख्यात आहे. जपान मध्ये सुद्धा तुम्हाला इंद्र, ब्रह्म आणि बुद्ध अश्या कलाकृती पाहायला मिळतात. > बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती. राजकीय खेळी होती. आंबेडकर ह्यांच्याविषयी कुणाचे काहीही मत असले तरी ते अत्यंत व्यासंगी आणि सखोल विचार करण्याची क्षमता बाळगून होते ह्यांत शंका नाही. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे दुष्ट आहेत हे त्यांनी आधीच ओळखले होते आणि त्यावर भरपूर लिहिले सुद्धा होते. माझ्या वैयक्तिक मते त्यांचा बौद्ध धर्माचा स्वीकार हा टॅक्टिकल पद्धतीचा होता. प्रस्थापित हिंदू धर्मीय विरोधकांना मिरची झोंबावी म्हणून त्यांनी धर्म परिवर्तन केले आणि आता त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी सुद्धा लोक बौद्ध धर्म स्वीकरतात आणि त्यांची हि स्ट्रॅटेजी बरीच यशस्वी ठरली असे वाटते. पण त्याच वेळी त्यांनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म नाकारला कारण दोन्ही धर्मात त्यांना दुय्यम स्थान मिळाले असते कारण ह्या धर्मांत तुम्हाला पोथीनिष्ठता दाखवावी लागते. तुम्ही बाटगे असाल तर तुम्हाला धर्मप्रचार करावा लागतो. पण बौद्ध धर्मांत तसे काहीही नाही. त्यामुळे आंबेडकर ह्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्या धर्माचे पालन म्हणून ते नक्की काय करत होते हा प्रश्न कोणीही विचारला नाही. त्यांनी इस्लाम स्वीकारला असतात तर मात्र टोपी घालून दर रोज नमाज पढणे त्यांना अनिवार्य झाले असते. दुसरा भाग म्हणजे आज सगळयाच जाती स्वतःला मागासलेल्या म्हणून घेण्यात धन्यता मानतात. आणि जातीभेद कितीही असला तरी सर्व जाती आपल्या धर्मांत आणि परंपरांत हिरीरीने भाग घेतात आणि त्याबद्दल अभिमान सुद्धा बाळगून असतात. नवबौद्ध कुणी झाला म्हणून त्यांना आपल्या परंपरा सोडाव्या लागत नाहीत. त्यामुळे धम्मपरिवर्तन करणे सोपे जाते. पण इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माचे तसे नाही. बाबासाहेबानी सांगितले म्हणून इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म बहुतेक हिंदू दलितांनी स्वीकारला सुद्धा नसता. त्यामुळे झाकली मुठ सव्वालाखाची ह्या न्यायाने त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असे वाटते. > बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ? आंबेडकर हे आज देशांतील सर्वांत लोकप्रिय जुने नेते आहेत. तुम्ही नेहरू गांधींना शिव्या देऊ शकता पण बाबासाहेब आंबेडकरांवर साधे टीका करणारे पुस्तक जरी लिहिले तरी लोक तोंडाला काळे फासतात. इतकी लोकप्रियता असून सुद्धा आंबेडकर प्रेरित बौद्धधर्माचा भारतिय समाजावरील प्रभाव जवळ जवळ शून्य आहे. माझ्या मते काळाच्या ओघांत आंबेडकर प्रेरित नवबौद्ध हळू हळू हिंदू धर्मांत परत येतील. ह्याची कारणे : १. आधुनिक आंबडेकर प्रेरित राजकारणी आंबेडकर ह्यांच्या प्रमाणे विद्वान नाहीत आणि ते बौद्ध धर्माचा फक्त राजकीय फायदा उठवू पाहतात. (फोटो ऑप) २. धर्मपरिवर्तनाने काहीही फरक पडत नाही. उलट शिक्षण, व्यवसाय, उद्योगाच्या संधी आणि शहरीकरण ह्यामुळे दलितांना जास्त संधी उपलब्ध होतात. ३. हिंदू धर्मांत सध्या जात न पाहणारे अनेक पंथ निर्माण झाले आहेत आणि प्रचंड प्रमाणात फोफावले आहेत. उदा इस्कॉन. दलित व्यक्ती ह्यांचा फायदा हिंदू म्हणून सहज घेऊ शकतात पण नवबौद्ध म्हणून त्यांना काही फायदा होईल असे वाटत नाही. > गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का , सिद्धार्थ हे शाक्य ह्या जमातीचे राजकुमार होते आणि चंद्रवंशीय होते. इक्वनक्षु चे वंजश होते आणि ह्यांचे मूळपुरुष हे "मनू" होते. हे वादातीत आहे. > पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का ! पोचला नाही असे कुणी सांगितले ? महाराष्ट्रांत विविध ठिकाणी भल्या मोठ्या बौद्ध विहार गुफा आहेत. गुफा आहेत ह्याचा अर्थ राजाश्रय होता आणि राजाश्रय होता ह्याचा अर्थ गुंफा नरिमन होण्याच्या बऱ्याच आधी तिथे बौद्ध लोक होते असा अर्थ होतो.

In reply to by साहना

अर्थांत बुद्ध ह्यांनी स्वतः सांगितले कि ते रामाचे अवतार आहेत आणि हिंदू धर्मातील अनेक "बुद्ध" लोकांपैकी ते एक आहेत
‘गौतम बुद्ध रामाचा अवतार आहे’ असं त्यांनी स्वत: कुठे सांगितले आहे? ह्याचा रेफरंस मिळू शकेल का?
त्यामुळे झाकली मुठ सव्वालाखाची ह्या न्यायाने त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असे वाटते.
असं वाटणं हे, काहीतरी करायचं म्हणून बौद्ध धर्मात धर्मांतर केलं, इतकं सुलभीकरण होऊन अतिशयोक्त होतंय. बौद्ध धर्म स्विकारण्याची त्यांची वैचारिक बैठक इतकी उथळ नव्हती. - (वैयक्तिक मतांबद्दल आदर असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

जातक कथा ४६१. ह्यांत भगवान बुद्ध "मीच राम होतो" असे सांगतात. हे झाले बुद्धांचे स्वतःचे शब्द. इतर बौद्ध साहित्यांत भगवान बुद्ध ह्यांना आणि राम ह्या दोघांना त्या प्रबुद्ध स्वरूपाचेच अवतार मानले आहे. > काहीतरी करायचं म्हणून बौद्ध धर्मात धर्मांतर केलं, इतकं सुलभीकरण होऊन अतिशयोक्त होतंय. नाही काहीतरी म्हणून नाही तर त्यांना आपला राजकीय फायदा बघायचा होता. त्यांत बौद्ध धर्म हा सर्वांत जास्त प्रभावशाली होता. आंबेडकर सारख्या विद्वान माणसा अध्यात्मिक प्रगतीसाठी काही गाजावाजा करून धर्मांतर करणे जरुरीचे नव्हते त्याशिवाय त्यांचा विविध धर्मांचा अभ्यास गाढा होता. बौद्ध धर्म त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला सर्वात जास्त परिणामकारक टूल होते. (ज्या प्रमाणे हिंदू धर्म आणि गरिबीचे नाटक गांधी ह्यांच्यासाठी एक हत्यार होते तसेच). पण हे वैयक्तिक मत आहे. आंबेडकर साहित्याच्या अभ्यास कमीच आहे.

In reply to by साहना

जातक कथा ४६१ ह्या कथेत राम आणि सीता बहीण - भाऊ आहेत. 😀 Jatak-461 असो, ह्या कथा बुद्धांनी स्वतः सांगितलेल्या नाहीत. त्यांनी जे काही सांगितले ती शिकवण (buddha's teachings) विनयपीटक, सुत्तपीटक आणि अभिधम्मपीटकात (त्रिपीटकात) आहे.
बौद्ध धर्म त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला सर्वात जास्त परिणामकारक टूल होते.
धर्मांतराचा निर्णय टूल होता. तसं त्यांनी जाहीर केलं होतं. बौद्ध धर्म टूल नव्हता. तो का स्विकारला ह्याची मिमांसा त्यांनी खालच्या दुव्यावरच्या लेखात केली आहे. तसंच 'Buddha And His Dhamma' ह्या पुस्तकातून अधिक स्पष्ट केलं आहे. https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religio… - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

त्या न्यायाने कुठलेच साहित्य स्वतः भगवान बुद्धांनी निर्मित नाही सर्व काही शेवटी त्यांच्या शिष्यानी लिहून काढले आहे. त्यामुळे बुद्धांनी कुठलीही गोष्ट स्वतः म्हटली असा पुरावा कुठल्याच बाबतीत नसेल. बौद्ध रामायण आणि महाभारताच्या कथेंत अनेक फरक असले तरी त्यांत आश्चर्य वाटायचे काहीच नाही भारतांत अनेक ठिकाणी असे फरक आढळून येतात. जातक कथांत सुद्धा शेवटी कथा लिहीणार्या व्यक्तीची बुद्धाप्रती श्रद्द्धा होती आणि जे काही लिहिले ते भगवान बुद्धांच्या शिकवणुकीला पूरक होते असे आम्ही म्हणू शकतो. त्याशिवाय अन्य सेकंडरी साहित्यांत तसेच आधुनिक हिंदू मानसिकतेत बुद्धांना अवताराचेच स्थान आहे. बुद्ध आणि त्यांचं शिकवणुकीला हिंदू धर्मातून बाहेर काढून बुद्धांना बंडखोर दाखविण्याचा प्रयत्न हा म्हणूनच आंबेडकरवादी वाटतो.

In reply to by साहना

त्या न्यायाने कुठलेच साहित्य स्वतः भगवान बुद्धांनी निर्मित नाही सर्व काही शेवटी त्यांच्या शिष्यानी लिहून काढले आहे.
हे बरोबर आहे. सगळं डॉक्युमेंटेशन नंतरच झालेलं आहे.
त्यामुळे बुद्धांनी कुठलीही गोष्ट स्वतः म्हटली असा पुरावा कुठल्याच बाबतीत नसेल
आनंद, बुद्धांचा सहाय्यक, त्यांच्याबरोबर सावलीसारखा असायचा. त्याने ह्या डॉक्युमेंटेशनमधे महत्वाची भूमीका बजावली होती. त्रिपिटकात प्रत्येक सुत्ताची सुरुवात 'एवम मे सुतम' म्हणजे मी असं ऐकलं (बुद्ध असं म्हणाले) अशी होते. एक उदाहरण - महासतीपठ्ठाण सुत्त. त्रिपिटकात जे डॉक्युमेंटेशन झालं आहे ते बुद्धांनी स्वतः सांगितलेल्या प्रवचनांचं डॉक्युमेंटेशन आहे. जे अर्हंतांच्या एका समितीने एकमताने केले होतं आणि आनंद त्या समितीचा प्रमुख होता.
जातक कथांत सुद्धा शेवटी कथा लिहीणार्या व्यक्तीची बुद्धाप्रती श्रद्द्धा होती आणि जे काही लिहिले ते भगवान बुद्धांच्या शिकवणुकीला पूरक होते असे आम्ही म्हणू शकतो.
म्हणायला कोणीही काहीही म्हणू शकतो, त्यामुळे आपल्या वैयक्तिक मतांचा आदर आहेच!
बुद्ध आणि त्यांचं शिकवणुकीला हिंदू धर्मातून बाहेर काढून बुद्धांना बंडखोर दाखविण्याचा प्रयत्न हा म्हणूनच आंबेडकरवादी वाटतो.
एकदा बुद्ध आणि त्याचा धम्म वाचला / समजला अनुभवला की अशी विधानं किती पोकळ आहेत ह्याची अनुभूती येईल. सो कॉल्ड धर्माची लेन्स लावून, फक्त आंबेडकरांच्या चौकटीतून (कारण त्यांनी बुद्धधर्म स्विकारला) बुद्धाला आणि त्याच्या शिकवणीला बघण्यामुळे, ते बघणं महाराष्ट्रात फार संकुचीत होऊन गेलंय. अर्थात बुद्ध आणि त्याची शिकवण कशी सो कॉल्ड धर्मातीत आहे हा विषय शाब्दिक चर्चेचा नसून त्याच्या शिकवणीतली साधना करून त्याचा अनुभव घेण्याचा विषय आहे. एकदा ती अनुभूती आली की सर्व अस्मिता लोप पावून, सगळे सो कॉल्ड धर्म, बंडखोरी, सगळे वाद, ईझम्स कसे पोकळ आहेत हे कळतं वळतं. - (फक्त तत्व'वादी' असलेला) सोकाजी

In reply to by साहना

भगवान बुद्ध "मीच राम होतो" असे सांगतात.
आधी खूप हसायचो... पण लोकं हे विधान जोक म्हणुन करत नाहीत वा घेत नाहीत लक्षात आल्यावर कीव वाटू लागली.

In reply to by साहना

इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे दुष्ट आहेत हे त्यांनी आधीच ओळखले होते आंबेडकराना या वर्माचे लोक भेटले आणि आमच्याकडे या म्हणाले. आंबेडकर गाडगे महाराजांना भेटले. त्यांचा सल्ला मानला. जैन धर्मात जी अहिंसा तत्वे आहेत ती टोकाची आहेत. बुद्ध धर्म सम्यक आहे. यामुळेच तो आशियायी देशांत पसरला.

बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही. अगदी बरोबर , यावर त्यांचे स्वतचे भाष्य काही असेलच! ते कोणास माहित आहे का? म्हणजे" मी बुद्ध धर्मच का स्वीकारला? इतर का नाही ?" तसेच हे हि बघावे लागेल कि किती दलित बुद्ध झाले १००% तर नसावेत ? - जन्मलेल्या धर्मात अन्याय होता आणि त्यात बदल करणे शक्य होत नसल्याने त्याचा निषेध म्हणून यांनी हे केले असणार असा तर्क लावता येईल - दगडापेक्षा विट बरी म्हणी प्रमाणे हिंदू धर्म सोडायचाच मग त्यातल्या त्यात त्याच मातीतील दुसरा धर्म कोणता तर बुद्ध किंवा जैन ( जैन धर्म धर्मांतराने स्वीकरता येतो का माहित नाही ) त्यातील त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला - त्यावेळीस त्यांना आपण ख्रिस्ती व्हा असे प्रयतन झाले असतील..

In reply to by चौकस२१२

अगदी बरोबर , यावर त्यांचे स्वतचे भाष्य काही असेलच! ते कोणास माहित आहे का? म्हणजे" मी बुद्ध धर्मच का स्वीकारला? इतर का नाही ?"
वरच्या प्रतिसादात त्यांच्या लेखाची आणि पुस्तकाची लिंक दिली आहे. इथे परत देतो. लेखः https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religio… पुस्तकः https://drambedkarbooks.files.wordpress.com/2009/03/buddha-and-his-dham… - ('लिंका'ळलेला) सोकजी

In reply to by सोत्रि

https://pariahstreet395990737.wpcomstaging.com/2020/06/07/can-sikhism-s… अगर आप मेरे से पूछो तो सिख धर्म ख़तम हो चूका है। ब्रह्मिनिस्म ने खा लिया है सिख धर्म को भी जिस तरह ब्रह्मिनिस्म ने खा लिया जैन और बुद्ध धर्म को। हे नवीनच कळले ! ह ह पु वा

१) बौद्ध धर्मीय लोकांची भारतात कमी संख्या होती. मुळ बौद्ध धर्मीय हे भारतात नगण्य होते.त्या मुळे जे धर्म बदलून बोद्ध धर्मात येणार होते त्या नवं बौध्द लोकांचे च वर्चस्व भारतात बौध्द धर्मावर राहणार होते. बौद्ध धर्म व्यतिरिक्त दुसरा कोणता ही धर्म स्विकारला असतात तर ह्या नवीन आलेल्या नवं धर्मीय लोकं ना त्या धर्मात जास्त स्वतंत्र मिळाले नसते. बौद्ध धर्म सोडून बाकी धर्मीय लोकांची संख्या बर्या पैकी जास्त होती. २) बौध्द धर्म आणि हिंदू धर्म ह्या मध्ये जास्त फरक नाही . योग साधना,,पुनर्जन्म,कर्म सिद्धांत ,अहिंसा,प्राणी मात्र वर प्रेम अशा शिकवणी दोन्ही धर्मात एक सारख्याच आहेत. ३)सम्राट अशोक ज्यांनी बौध्द धर्माला राज आश्रय दिला तेव्हाच बौध्द धर्म आणि हिंदू धर्म हे फार वेगळे नसावेत,एक मेकाचे प्रती स्पर्धा करणारे नसावेत. म्हणून च हिंदू धर्मीय सम्राट अशोक ह्यांनी त्या धर्माला राज आश्रय दिला असावा.

In reply to by Rajesh188

बौध्द धर्म आणि हिंदू धर्म हे फार वेगळे नसावेत,
बरोबर, ते कधीच न्हवते आणि नाहीत फक्त वैदिक ब्रांच म्हणजेच अखंड हिंदुत्व हा समज जसा रूढ झाला तसे विभाजन दिसणे सुरू झाले.

कंजूस आपण हा प्रश्न राजेश ना विचारला आहे, पण मला उत्सुकता आहे कि तो जरा उलगडून सांगाल का? इंडोनेशिया मध्ये बहुसंख्यांक मुस्लिम आणि बाली मध्ये हिंदू आणि अगदी फार थोडे बुद्ध आहेत इंडोनेशियात ( बाली) एक रोचक पहिले ते सांगतो, जुन्या हिंदू देवळाची रचना अशी होती कि चौकोनी आवारात चार कोपऱ्यात चार उपदेवळे होती त्यातील एकात वर्दळ त्या दिवशी जास्त होती पण अंतर्गृहातील सजावट थोडी वेगळी वाटली, लोकांचे कपडे मात्र इतर बाली हिंदूं सारखेच होते म्हणून कुतूहलाने जमलेल्या गर्दीला विचारले तर कळले कि ते बालीतील बुद्ध ( चिनी वंशाचे) होते ... मग त्यांचे हे प्रार्थना स्थळ हिंदू मंदिरात कसे? तर त्याने सांगितले कि पूर्वी बुद्ध लोकांना तेथील हिंदू राजाने राजाश्रय दिला होता ... अर्थ हा कि हिंदू आणि बुद्ध यान्चायत तसे भांडण्याचे काही कारण नसावे

आंबेडकरांनी बुद्धांचा मार्ग स्वीकारला त्यातलं एक कारण हे आहे - बुद्धांनी पुनःपुन्हा हे शिकवलं की जो माणूस चांगली कर्म करतो, चांगले विचार करतो, तो/ती श्रेष्ठ, Irrespective of his/her जात. त्यांनी हेही शिकवलं की कोणी फक्त विशिष्ट जातीधर्माचे आहेत म्हणजे ते by default 'श्रेष्ठ माणूस' बनत नाहीत. म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारून बाबासाहेबांनी तत्कालीन अस्पॄश्यतेच्या मूळ कारणावरच घाव घातला. (मराठी टाईप करायला लय वेळ लागतोय राव. माझे बाकी पॉईंट्स नंतर लिहिते)

बुद्धांच्या काळात आणि नंतरही बरीच शतकं बुद्ध धम्म खूप दूरवर पसरला. भारत, अफगाणिस्तान, जपान, श्रीलंका, थायलंड. चीन. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याआपल्या परंपरा बनल्या. १९च्या शतकात आंबेडकरांनी ठिकठिकाणच्य बुद्धिझम चा अभ्यास केला आणि त्यांना श्रीलंकेतला बुद्धिझम सगळ्यात जास्त 'ओरिजिनल' वाटला म्हणून त्यांनी आपला भारतीयांचा बुद्ध धम्म श्रीलंकेतल्या परंपरेवर बेतला (योग्य एक्स्प्रेशन सापडत नाहीये). म्हणजे आपला थेरवादिन टाईप आहे. (महायान नाही, हीनयान नाही ) बुद्धांनी ध्यानधारणेला खूप महत्व दिलं आहे. मन, आचरण शुद्ध करण्याची ती पहिली पायरी आहे, म्हणून. सध्याच्या काळात ध्यानधारण नक्कीच जास्त लोकप्रिय होत चालली आहे, माझ्या मते. "बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती." - हे सगळंच होतं की. तत्कालीन अस्पॄश्यांना साधना, अध्यात्म, राजकीय, सामाजिक विचारधारा हे तसंही आधी कधीही accessible नव्ह्तंच ना. जेव्हा बुद्ध धम्म स्वीकारला तेव्हा हे सगळंच 'पॅकेज' मिळालं. "बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही" हा मुद्दा थोडआ असा झालाय की जीझस ने मुस्लिम धर्म स्थापन केला अस्ता तर किंवा पैगंबरांनी सिख धर्म स्थापन केला अस्ता तर...मुद्द्यात फारसा पॉईंट नाही म्हणुन पास.. "काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?" नाही :-) एकदा तुम्हाला खरा धम्म कळला की तुम्ही कशाला अजून कोणता मार्ग शोधायला जाल? "गौतम बुद्धांच्या किंवा अशोकाच्या काळात तो धर्म जगात सर्वत्र गेला. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का " - पोचला होता की. महाराष्ट्रातली इतकी लेणी साक्ष आहेत. सातवाहन , मगध अशा राज्यांनी आणि राजांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता. नाशिक ची त्रिरश्मी लेणी सातवाहन कालातली आहेत. "सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती" - तेव्हा महाराष्ट्र असं नाव तरी होतं की नाही, शंकाच आहे. पण एवढं नक्की, गौतम बुद्धांच्या काळात आपण तत्वज्ञान ह्या प्रकारात फार प्रगत होतो. तेव्हा वेगवेगळे school of thoughts होते आणि त्या सगळ्यांमध्ये चांगल्या systematic चर्चा चालायच्या.

In reply to by सुमित्रा

भारतात बुद्ध धर्म होता आणि त्याचा प्रसार महाराष्ट्र पर्यंत होता. हे वाक्य सत्य मानले तर धर्मांतरित बौध्द सोडून मुळ बौध्द धर्मीय लोकांची लोकसंख्या 1% पण नाही त्याची काय करणे असावीत. आणि बौध्द धर्मीय लोकांची संख्या पहिल्या पासूनच भारतात जास्त असती तर धर्मांतरित लोकांवर त्यांचेच वर्चस्व असते. पण तसे दिसून येत नाही.

In reply to by सुमित्रा

सातवाहन , मगध अशा राज्यांनी आणि राजांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता.
सातवाहन राजे हे वैदिक होते. गौतमी बलश्रीच्या नासिक शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन 'एक ब्राह्मणनस' असे आले आहे तसेच त्याची तुलना राम, कृष्ण, अर्जुन, नहुष, नाभाग, अंबरीश अशा राजांशी केली आहे. नाणेघाटातील नागनिकेच्या शिलालेखात सुरुवातीला राम, संकर्ष्ण, इंद्र आदी देवतांना वर्णन केले असून अश्वमेध, राज्सूय अशा श्रौत यज्ञांचे वर्णन आलेले आहे. उत्तरकालीन सातवाहनांच्या लेखांतही देवतांना वंदन करण्यात आलेले आहे. सातवाहन मात्र धार्मिकदृष्ट्या उदार होते व त्यांनी बौद्धांना विपुल राजाश्रय आणि धर्मादाय केला होता इतकेच म्हणता येईल. मगधांबाबत बोलायचे झाले हे सतत वैदिक, जैन, बौद्ध अशा धर्मांना आश्रय देत राहिले तर इकडून तिकडे जात राहिले. मगधांनंतर नंद व त्यानंतर मौर्य सत्तेवर आले. चंद्रगुप्त आयुष्याच्या शेवटी जैन धर्माकडे झुकला होता तर त्याचा मुलगा बिंदुसार हा वैदिक असून त्याचा ओढा नंतर आजीवकांकडे गेला होता. खर्‍या अर्थाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली ती अशोकाने, अशोकाच्या मृत्युनंतर लवकरच मौर्‍यांचा र्‍हास होऊन कट्टर वैदिक असे शुंग घराणे सत्तेवर आले. त्याच सुमारास महाराष्ट्रात सातवाहनांचा उदय झाला.
"सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती" - तेव्हा महाराष्ट्र असं नाव तरी होतं की नाही, शंकाच आहे.
मुळात महाराष्ट्र हे स्थलवाचक नाम तेव्हा अस्तित्वातच नव्हते. इकडे तेव्हा अश्मक, भोज, राष्ट्रिक अशी लहानसहान राज्ये होती.

In reply to by प्रचेतस

Thank you very much.. कारण इतका अभ्यासपूर्ण प्रतिसाद पाहून बरं वाटलं, if you know what I mean :-) नाशिकच्या त्रिरश्मी लेणींचा इतिहास मी मागच्या वर्षी जरा शोधत होते. मुंबई युनिव्हर्सिटी च्या एका scholar चा Ph.D की M.Phil. चा रिसर्च पेपर सापडला, त्यात लिहिला होतं की सातवाहन राजा बुद्धिस्ट होते, त्यांनी ह्या लेणी बांधल्या आहेत. पेपर परत सापडला तर सन्दर्भ सांगेन. "सातवाहन राजे हे वैदिक होते" हो एका काळापर्यंत असतील. पण तेव्हा बुद्ध धम्म शिखरावर होता, तेव्हा बरेच लोक्/राजे बुद्ध धम्म स्वीकारायचे. तसंही इतकी भव्य लेणी फक्त राजाश्रय आणि धर्मादाय चा भाग असतील असं काही वाटत नाही. अशा लेणी बांधण्या साठी त्याहून ब-री-च जास्त श्रद्धा विश्वास असला पाहिजे. जेव्हा तुम्हाला बुद्ध धम्म समजेल तेव्हाच तसा काही भाव मनात येऊ शकतो असं माझं मत आहे आणि अनुभवही आहे.

In reply to by सुमित्रा

त्यात लिहिला होतं की सातवाहन राजा बुद्धिस्ट होते,
मुळात असा एकही ज्ञात लिखित पुरावा नाही की सातवाहन राजे बौद्ध धर्मीय होते. वर प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे त्यांनी अनेक यज्ञयाग केले होते, विपुल दानधर्म केला होता. नाशिक,नाणेघाट शिलालेख तर ह्याचे उत्तम प्रमाण आहेतच. सातवाहनांची नावे सुद्धा ह्याला प्रमाण आहेत. श्री, श्रीमुख, यज्ञश्री, शिवस्वाती, स्कंदश्री, शिवस्कंदश्री, विष्णूकुंड इत्यादी. अर्थात त्याकाळी बौद्ध धर्म पुष्कळच फोफावला होता ह्यात काहीच शंका नाही. व्यापारी श्रमणांबरोबरच बौद्धांचे तांडे सुद्धा इकडून तिकडे ये जा करत असायचे. बौद्धांना राजेलोकांसोबतच सामान्य जनांनीही अगदी ब्राह्मणांनीही धर्मादाय केला होता. कुडा लेणीतील हा शिलालेख त्या दृष्टीने रोचक आहे. ब्राह्मण उपासक अयितिलु ह्याची पत्नी भयिला हिची चेतीय गृहाची देणगी मात्र बौद्धांसोबतच मूळचा धर्म न सोडलेले लोकही येथे होतेच. गाथासप्तशतीतील कित्येक गाथा सनातन धर्माचे वर्णन करणार्‍या आहेत. दिअरस्स असुद्दमणस्य कुलवहू णिअअकुडड्लिहिआईं। दिअहं कहेइ रामाणुलग्गसोमित्तचरिआईं ॥ आपल्याबद्द्ल दिराची अशुद्ध भावना जाणून कुलवधू दिराला म्हणते रामाचा बंधू लक्ष्मण सीतेशी जसा वागत असे तसे तुम्ही माझ्याशी वागा. गुणाढ्याची बृहत्कथा तर प्रसिद्धच आहे. सातवाहनांतर वैदिक असे वाकाटक नृपतीही इकडे सत्तेवर आले. वाकाटक नृपती हरिषेणाने तर अजोड अशी अजिंठ्याची दोन क्रमांकाची लेणी खोदवून घेतली. उत्तरेत शुंगांचे बौद्धांबरोबर वैर चालू असताना इकडे मात्र राजे बौद्धांना उदार राजाश्रय देतच होते.

In reply to by प्रचेतस

मला तो पेपर सापडला, त्यात असं लिहिलंय "It seems there was always a conflict between Satavahanas and the Kshatrapas over supremacy. However, all the 3 kings fully supported Buddhism though they were not Buddhist in real sense."

In reply to by सुमित्रा

सुमित्रा, रूपाली मोकाशींचा प्रबंध का? त्यांची अनुदिनी इथे आहे : https://rupalimokashi.wordpress.com अनुदिनीतला एक लेख : https://rupalimokashi.files.wordpress.com/2010/05/virmata.pdf आज जसे रंगवले जाताहेत तसे बौद्ध आणि हिंदू धर्म वेगळे कधीच नव्हते. इतकाच माझा मुद्दा आहे. आ.न., गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा नाही दुसरा लेख होता . शोधून बघते. "आज जसे रंगवले जाताहेत तसे बौद्ध आणि हिंदू धर्म वेगळे कधीच नव्हते. इतकाच माझा मुद्दा आहे." थोडे मूलभूत फरक आहेत ना. पण सध्या काही काही बुद्ध आणि हिंदू धर्मियांमध्ये जसं friction होतं , तसं ते पूर्वी नक्कीच नव्हतं. Those days we were good, intelligent and very philosophical people . नंतर वाट लागली :-) अजून नंतर लिहीन. कळावे. लोभ असावा :-)

In reply to by सुमित्रा

उत्सुकता आहे... भारताला पडलेले सर्वात सुंदर अध्यात्मिक स्वप्न (स्वप्न आशा साठी के ते भारतात चिरकाल टिकले नाही) म्हणजे गौतम बुद्ध. यांच्या विषयी मनात खूप उत्सुकता आहे.

In reply to by गामा पैलवान

आज २५०० वर्षांनंतर धर्मांची , पद्धतींची, तत्वज्ञानाची देवाण-घेवाण झालेली असणारच. पण जरा २५०० वर्षं मागे जाऊया. बुद्धांच्या वेळची परिस्थिती बघितली, तर तेव्हा "62 different schools of philosophy " होते. (which is VERY impressive by the way. मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं फार आश्चर्य वाटलं होतं. तेव्हा मुळात philosophy असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातही इतके school of thoughts होते म्हणजे भलताच प्रगत समाज होता) सगळ्यांचे आपली आपली विचारधारा होती- "फक्त नशिबावर सगळं अवलंबून आहे" "सगळं प्रयत्नांती*च* होतं, नशिब हा प्रकारच नसतो" "आयुष्य फक्त उपभोगण्यासाठी आहे" "कसलाही उपभोग घेणं अगदी चुकीचं आहे, स्वतःला खूप पीडा दिली तरंच मोक्ष मिळेल" - या वेगवेगळ्या schools of philosophy असे टोका टोकाचे विचार होते. बुद्धांनी जो मार्ग शोधला त्याला 'मज्झिमा प्रतिपदा ' म्हणतात. अगदी ढोबळ मानाने सांगायचं झालं तर 'मध्यम मार्ग'. सोत्रिंनी याविषयी जरा अजून टेक्निकल लिहिलं तर बरं होईल.

In reply to by सुमित्रा

कालची माझी पोस्ट मला थोडी विस्कळीत वाटली म्हणून पुन्हा विस्तार - आज २५०० वर्षांनंतर धर्मांची , पद्धतींची, तत्वज्ञानाची देवाण-घेवाण झालेली असणारच. त्यामुळे आत्ताच्या बुद्ध आणि हिंदू धर्मात common concepts असतीलच. पण जरा २५०० वर्षं मागे जाऊया. बुद्धांच्या वेळची परिस्थिती बघितली (त्यांनी बुद्ध व्हायच्या आधीची), तर तेव्हा "62 different schools of philosophy " होते. (which is VERY impressive by the way. मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं फार आश्चर्य वाटलं होतं. तेव्हा मुळात philosophy असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातही इतके school of thoughts होते म्हणजे केवढं विचारस्वातंत्र्य, भलताच प्रगत समाज होता) सगळ्यांचे आपली आपली विचारधारा होती- "फक्त नशिबावर सगळं अवलंबून आहे" "सगळं प्रयत्नांती*च* होतं, नशिब हा प्रकारच नसतो" "आयुष्य फक्त उपभोगण्यासाठी आहे" "कसलाही उपभोग घेणं अगदी चुकीचं आहे, स्वतःला खूप पीडा दिली तरंच मोक्ष मिळेल" - या वेगवेगळ्या schools of philosophy असे टोका टोकाचे विचार होते. वेदही होते. म्हणजे तेव्हाच्या प्रस्थापित समाजात खूप वेगवेगळे मतप्रवाह होते. बुद्धांनी जो मार्ग शोधला तो त्या सगळ्यांपासून वेगळा होता. त्याला 'मज्झिमा प्रतिपदा ' म्हणतात. अगदी ढोबळ मानाने सांगायचं झालं तर 'मध्यम मार्ग'. उदा. - आत्मपीडन किंवा अतिसुखलोलुपता दोन्ही गोष्टी extreme आहेत. दोन्ही टाळल्या पाहिजेत.

जातक कथेचा संदर्भ देऊन वरती साहना जे म्हणल्यात कि बुद्ध म्हणजेच राम, त्याचं सोत्रिंनी परफेक्ट खंडन केलं आहे. जातक कथा ह्या 'कथा' आहेत, इतिहास नाहीत. "इक्वनक्षु चे वंजश होते आणि ह्यांचे मूळपुरुष हे "मनू" होते. हे वादातीत आहे" - कसं काय वादातीत आहे? गौतम बुद्ध खरे खुरे मनुष्य होते. मनूच्या असण्याचा पुरावा तरी आहे का?

In reply to by सुमित्रा

मग मनुस्म्रुती कोनी लिहिली?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

त्या पुस्तका विषयी आंबेडकरांचं मत फारसं चांगलं नव्हतं :D त्यामुळे मी काही उत्तर शोधण्यात वेळ घालवणार नाही...

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बाबा वाक्यम प्रमाणम झाल.
मनुस्मृती वाचली आहे का ? नसेल तर हे म्हणजे... आणि असेल तर हा प्रतिसाद म्हणजे... असो धागा मनुस्मृतीवर केंव्हा अवांतर होईल याचाच विचार करत होतो.

In reply to by गॉडजिला

इकडं मनुस्मृती जाळताय अन दुसरीकडे मनू अस्तित्वात नाही म्हणताय ही विसंगती लक्षात आणून द्यायचा सूक्ष्म प्रयत्न होता.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

Not necessarily a विसंगती. मनू नावाचा व्यक्ती नव्हता आणि मनुस्मृती मधला मजकूर जाळण्यायोग्य आहे हे दोन विचार परस्परविरोधी नाहीयेत.

भारतात जी बौध्द धर्मीय लोकांची लोकसंख्या आहे त्या मध्ये. 87% संख्या ही धर्मांतरित लोकांची आहे.ज्यांनी आंबेडकर साहेबांच्या आव्हान ला प्रतिसाद देवून धर्म परिवर्तन केले त्या लोकांची.. धर्मांतर साठी बौध्द धर्म निवडण्याच्या मागे हे च महत्वाचे कारण असावे. ह्या धर्मात जाणार त्या धर्मात वर्चस्व वादी संघर्ष झाला तर स्थलांतरित लोकांचे पारडे जड असावे असे माझे मत आहे.

बौध्द किंवा कोणताही धर्म बदललेले लोक रोटी-बेटी व्यवहार करताना आपल्या जुन्या धर्मातील जातीप्रमाणेच करतात अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत.

धर्म बदलला पण जाती तशाच आहेत.अनुसूचित जाती मध्ये कोण कोणत्या जाती आहेत आणि त्यांचा कागदावर धर्म कोणता ह्याची माहिती सरकार दरबारी मिळेल. बौद्ध धर्मात जाती हा प्रकार च नाही.

In reply to by Rajesh188

बरोबर

राजेशएकशेअठ्याऐंशी ! अश्या अनेक विसंगती पाहुन गोन्धळायला होते !

धर्म बदलला पूजा अर्चा,श्रद्धा बदलल्या पण कागदावरच नाव आणि जात नाही बदलली . ख्रिस्ती धर्मात गेलेली लोक. कागदावर हिंदू नाव आणि जात पण .आणि समाजात रॉबर्ट ,ज्युली . हिंदू देवता शिव्या शाप. पण आरक्षण,आणि विविध सवलती ह्याचा मोह सुटत नाही म्हणून जात सुटली नाही. रॉबर्ट नाव घेवून ख्रिस्ती संस्थेकडून आर्थिक मदत आणि हिंदू जात कागदावर दाखवून सरकारी मदत दोन्ही फायदे. तेच बाकी धर्मा विषयी आहे.. मुस्लिम मध्ये गेलात तर मुस्लिम नाव असावेच लागणार. पण बौध्द धर्मात गेलात तर नावात काहीच बदल करायची गरज नाही. बौद्ध धर्माची विशेष अशी नावं नाहीत. तिथे रॉबर्ट, Aslam नाव फिट होत नाहीत मात्र सखाराम,तुकाराम,अनिल,सुनील नाव फिट होतात. हीच तर गंमत आहे.

रॉबर्ट नाव घेवून ख्रिस्ती संस्थेकडून आर्थिक मदत आणि हिंदू जात कागदावर दाखवून सरकारी मदत दोन्ही फायदे. हे खरंच आहे का? असेल तर अयोग्य आहे, कायदा याला परवानगी देतो? हिंदू धर्मातील जातीची भलावण करीत नाही पण जे हिंदू धर्म सोडून गेलेत आणि त्याचे कारण जात व्यवस्था हे देतात यांना एक प्रश्न सतत विचारावासा वाटतो - तुम्ही हिंदू धर्मातील अन्यायामुळे चिडून धर्म सोडला तर मग ज्या धर्मात जात हा प्रकारचं मान्य नाही तिथे जात का लावता ? म्हणजे जो हिंदू दलित चिडून ख्रिस्ती झाला त्याने हिंदू दलितांना मिळणार्या सोयींन्वरील हक्क पण सोडून दिला पाहिजे ! दोन्ही बाजूने डमरू का वाजवता .. नाहीतर हिंदू धर्म तरी सोडायचा नवहता ! ख्रिस्ती मराठा, ख्रिस्ती ब्राम्हण हि काय भानगड? चालूगिरी नुसती

सौंदाळा,
बौध्द किंवा कोणताही धर्म बदललेले लोक रोटी-बेटी व्यवहार करताना आपल्या जुन्या धर्मातील जातीप्रमाणेच करतात अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत.
भारतात जात हीच सामाजिक ओळख आहे. याचं कारण की भारतात लोकं स्वत:ची ओळख म्हणून जातच लावतात. वैयक्तिक ओळख हा प्रकार भारतात जवळजवळ नाहीच. जी काही ओळख आहे ती समूह म्हणूनंच असते. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की जात बदलून नवी जरी घेतली तरी ओळख जुनीच लावावीशी वाटते. आ.न., -गा.पै.

Rajesh188,
धर्मांतरित बौध्द सोडून मुळ बौध्द धर्मीय लोकांची लोकसंख्या 1% पण नाही त्याची काय करणे असावीत.
याचं कारण माझ्या मते असं की, बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही. जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही. कारण की त्यात स्मृतीच नाही. सर्वसामान्य लोकांना आचरता येईल असं काहीही नव्हतं. ना कसले सामाजिक नियम होते. नियम जरूर होते, पण ते सदस्यांसाठी होते, उर्वरित समाजातल्या लोकांसाठी नव्हते. बौद्ध हे विशेषण भिख्खु, श्रमण, इत्यादींना लावण्यासाठी आहे. गृहस्थी माणूस बौद्ध नसतो. आंबेडकरांनी बौद्ध म्हणून जी काही ओळख दिली आहे त्यात उपासनेचा काहीही संबंध नाही. ती एक सामाजिक सोय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही
बरोबर ती उपासना/साधना पद्धती आहे... पण त्याचा प्रसार व प्रचार साम, दाम, दंड, भेद न करता इतका व्यापक झाला की पुढे त्याला आपोआप धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. मग ते पिढीजात होणारे आचरण असो की त्यामार्गातील इतर साधक असोत त्यांच्या योगदानातून तो विशाल अन व्यापक बनला म्हणुन तो लोकांनी लोकांसाठी बनवलेला लोकांचा धर्म म्हणुन विस्तारीत झाला

In reply to by गॉडजिला

गॉडझिला, काहीही हं! तुम्ही जे काही सांगताहात त्याला काही ऐतिहासिक आधार आहे का? की आपलं उगीच काहीतरी ठोकून देताय? आ.न., -गा.पै.

In reply to by गॉडजिला

मार्गदर्शक आचरणाची तत्वे दिली, बुध्दाने मार्ग सांगितला तो आचरणात आणायचा की नाही हे त्याने साधकांवर सोपवले. सुरुवातीला त्याला माहित होते त्याला जे सापडले ते जगात त्याक्षणी कोणाला चटकन समजणार अथवा मान्य होणार नाही म्हणुन त्याने त्यातल्यात्यात अभ्यासू व ज्ञानी म्हणुन त्याचे जुने गुरू बंधूजवळ सर्वप्रथम आपले ज्ञान खुले केले प्राथमिक शंका नंतर त्यांना तो मार्ग पटला, अनुयायी झाले बुध्दाकडे त्यांच्या ज्ञानवअ वस्थेमुळे लोक आकर्षित होउ लागले ज्यांनी विचारलं त्यांना बुध्द उपदेश करत गेले सुरुवातीला तात्कालिक समाजस्थिती नुसार त्यांना स्त्रिया हा मार्ग अनुसरू शकतील याची खात्री न्हवती पण नंतर त्यांनी त्यात सुधारणा केली व स्त्रियांनाही हा मार्ग उपलब्ध केला... पुढे महायान सारख्या बाबी त्यांच्या शिष्यांनी स्थापित केल्या आज दलाई लामा पुढील दलाई लामा एक स्त्री सुध्दा असु शकते असेही विधान करतात. बुद्धाने धर्म पसरावा म्हणुन लढाया केल्या नाहीत, त्यांचा मार्ग लोकांनी आपणहोऊन स्वीकारलेला मार्गच राहिला सदैव... अगदी बाबासाहेबांनी देखिल त्याचा स्वीकार केला अन सम्राट अशोकाने देखिल थोडक्यात माणसांनी मांनसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म हेचं त्यांचे विस्तारीत स्वरुप आहे. :) जे मानसिक क्रियांचा अभ्यासातून आत्मिक शांतता व प्रगती याची खात्री देते. जगातील कोणत्याही धर्म, लिंग विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीने आत्मिक शांतता व आत्मिक प्रगती यासाठी तूर्त जो मार्ग तो वापरत आहे जितका वेळ त्यासाठी देत आहे त्याच्या एक टक्का वेळजरी त्याच्या मूळ श्रध्दा न सोडता बुध्दाने सांगीतलेल्या क्रियांचा अभ्यास केला तर मिळणारी आत्मिक लाभ हे काईकपट आहेत हे याचे रेफरन्स आजूबाजूला, जालावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतः अनुसरून मिळू शकतात

In reply to by गॉडजिला

गॉडझिला,
थोडक्यात माणसांनी मांनसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म हेचं त्यांचे विस्तारीत स्वरुप आहे. :) जे मानसिक क्रियांचा अभ्यासातून आत्मिक शांतता व प्रगती याची खात्री देते.
हे नक्की कुठे लिहिलंय? की तुमचं मत आहे? काहीही का असेना, हे जर खरं असेल तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू धर्माचं अंग बनून जातो. त्याला वेगळा दाखवायचा खटाटोप कशासाठी? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा पै , अहो मुळात धर्म असले नसेल काय फरक पडतो... आता त्यावर चर्चा करून ? बुद्ध धर्म आज एक मोठा धर्म आहे, हिंदूंचं जवळची विचारसरणी ह्यातील हिंदूंचाच फायदा बघा ना ! २ अब्राहमीक धर्म हिंदूंना आणि बुद्धांना गिळल्यालं बसेल आहेत ते जास्त गंभीर आहे .. यावर जास्त विचार व्हावा असे वाटते , उगाचच बुधः धर्मीयांशी वाद कशाला घालताय पूर्व आशियात बरेचदा मला असा अनुभव आला कि वरकरणी ख्रिस्त नावे धरण करणारे चिनी वंशाचे मलेशियन किंवा सिंगापोर चे नागरिक मुळात बुद्ध असतात आणि जेवहा मी त्यांना मी हिंदू हे सांगतो तेव्हा एक प्रकारचे कुतूहल आणि आदराची भावना असते ... सामूहिक शत्रू कोण याची नकळत उच्चारणी होते !

In reply to by गामा पैलवान

तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू धर्माचं अंग बनून जातो. त्याला वेगळा दाखवायचा खटाटोप कशासाठी?
गा.पै., मुळात बौद्धधर्म असा काही धर्म नाही त्यामुळे तो हिंदू धर्माचं अंग असणं किंवा नसणं ह्याला काही अर्थ नाही. वेगळेपणाबद्दल बोलायचंच झालं तर, बुद्धाने त्याच्या शिकवणूकीतून समतेचा पुरस्कार केला, सर्व माणसे सारखी आणि समान! हिंदूधर्मातल्या स्मृतींमधल्या 'जन्माधारित वर्णव्यवस्थेच्या' अगदी वेगळी शिकवणूक होती ती. इथे बुद्धाच एक वेगळेपण दिसतं. आ.न., - (अधार्मिक) सोकजी -------------------------------------------------------------------------------------- हिंदू धर्मासाठी धर्मग्रंथाऐवजी स्मृती, ही सोय म्हणून वापरण्याचा प्रयत्न आवडला :)

In reply to by गामा पैलवान

" सर्वसामान्य लोकांना आचरता येईल असं काहीही नव्हतं." - What??????!!!!! गा.पै., तुम्ही कोणी बौद्ध ओळखीचे असतील, त्यांच्या घरी किंवा बाहेर एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल तेव्हा दर वेळेस त्रिसरण, पंचशील ऐकले असतील ना? पंचशील commoners साठी beginner's manual type आहे : "१.मी जीवहत्या करणार नाही, २.चोरी करणार नाही, ३.व्यभिचार करणार नाही, ४.खोटं बोलणार नाही, ५.मादक पदार्थांचं सेवन करणार नाही " हे सगळं अकुसल कम्म, ज्याला हिंदू परिभाषेत पाप म्हणतात, त्यापासून दूर रहाण्यासाठी. नंतर कुसलकम्म, (पुण्य मिळवून देणारी कामं) , त्यांची खूप सारी सुत्त ( हिंदूंमध्ये ज्याला प्रार्थना म्हणतात) आहेत. हे सगळी सुत्त सुद्धा to the point, precise आहेत. भाषांतर वाचलं की कुसलकम्म कोणकोणती आहे पटकन कळतं. ज्यांना कुतुहल आहे त्यांनी मंगलसुत्त /mangalasutta google search करून बघावं. "बौद्ध हे विशेषण भिख्खु, श्रमण, इत्यादींना लावण्यासाठी आहे. गृहस्थी माणूस बौद्ध नसतो" - गृहस्थी माणूस बौद्ध असतो. गृहस्थांची आणि भिक्खूंची बौद्ध धम्म दीक्षा आणि पाळायचे नियम वेगवेगळे असतात. "जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही. कारण की त्यात स्मृतीच नाही" त्रिपीटका (=विनय पीटका, सुत्त पीटका, अभिधम्म पीटका) हे बुद्ध धम्माचे मुख्य ग्रंथ आहेत. तुम्ही exactly कशावरून म्हणालात की नियम नाही, स्मृती नाहीत म्हणून?

In reply to by सुमित्रा

प्रतिवाद करणारा छान प्रतिसाद ! @सुमित्रा, एक वेगळा लेख येऊ द्यात ह्या मतमतांतराचं खंडन करणारा. अवांतरः १९८८ साली बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांच्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत २ लेख लिहिले होते. साप्ताहिक सोबतमध्ये ग.वा.बेहरे यांनी ते छापले होते. तेव्हा गांगलांच्या लेखांचे सप्रमाण खंडन करणारे लेख हरि नरके यांनी सकाळ, म.टा., लोकसत्ता आदींमधून लिहिले. हरि नरके तेंव्हा विद्यार्थीदशेत होते. लोकांकडून लेखांची प्रशंसा झाली आणि यावर पुस्तक लिहिण्याची मागणी झाली. त्यातून त्यांनी "महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" हे पुस्तक लिहिले ! अस्सल सोने नेहमी तावून सुलाखून उजळते !

In reply to by सुमित्रा

येईल, येईल नक्की येईल, आणि अगदी मनापासुन येईल ! कदाचित थोडा वेळ लागेल, वाचन करावं लागेल. जाणकार लोकांशी बोलावं लागेल, काही ठिकाणांना भेटी द्याव्या लागतील अन ते ही होऊन जाईल !

आंबेडकरांनी धर्म जशाच्या तसा स्विकारला नव्हता, त्यात २२ प्रतिज्ञा अ‍ॅड केलया होत्या. चर्चेत त्याचा उल्लेख नसल्यचे आश्चर्य वाटले. 1.मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2.राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3.मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4.देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही. 5.गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो. 6.मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही. 7.मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. 8.मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. 9.सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. 10.मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11.मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12.तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन. 13.मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14.मी चोरी करणार नाही. 15.मी व्याभिचार करणार नाही. 16.मी खोटे बोलणार नाही. 17.मी दारू पिणार नाही. 18.ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. 19.माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो. 20.तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21.आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. 22.इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

In reply to by कपिलमुनी

मुळ बुध्द धर्मात नसलेल्या गोष्टी बाबासाहेबांनी नवीन बुद्ध धर्मात निर्माण केल्या असे म्हणावे लागेल. फक्त हिंदू धर्माचे देव मानू नका असे गौतम बुद्ध ह्यांनी सांगितले नाही तर ईश्वर हा अस्तित्वात नाही.ह्या जगाचा निर्माता कोणी नाही असे सांगितले आहे. हिंदू पासून काही तरी वेगळे असावे म्हणून हिंदू देव देवता मानू नका . ईश्वर ,निर्माता न मानणारा जगातील एकमेव धर्म म्हणजे बौध्द धर्म. इसवी सन पूर्व स्थापित झालेला म्हणजे २३०० वर्ष पूर्वी. तेव्हा विज्ञान कशाला म्हणतात हे पण माहीत नसेल . लोक आदिवासी जीवन जगत असतील. बौद्ध धर्म हा विज्ञान वादी आहे म्हणजे नक्की काय हे मला अजून पण समजत नाही. चीन पासून जपान पर्यंत भले बौध्द धर्मीय असतील पण त्यांच्या प्रथा ,रीतिरिवाज वेगवेगळे आहे. एक धर्म म्हणून एक सारखी संस्कृती ,रिती रीवज असेल पाहिजेत पण तसे नाही. आणि सर्वात कळीचा प्रश्न बौध्द धर्माचा उगम भारतात झाला,चक्रवर्ती सम्राट अशोक बौध्द धर्मीय होता . असे मानले येत राजसत्ता च्या जोरावर पूर्ण देशभर बौध्द धर्मीय लोक असायला हवी होती. पण तसे घडले नाही. बाबासाहेबांनी हिंदू दलित लोकांना बौध्द धर्म दिला नसता .तर भारतात बोध्द धर्मीय लोकांची संख्या फक्त काही लाखात असती. हा धर्म इथे वाढला नाही ह्याची नक्की काय कारणे आहेत. आणि असे नसेल तर हिंदू धर्मात सांगितलेल्या कथा पण सत्य च असल्या पाहिजेत. हिंदू धर्म त्या पेक्षा पुरातन आहे.

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्म हा विज्ञान वादी आहे म्हणजे नक्की काय हे मला अजून पण समजत नाही.
जाऊ द्या हो, सगळं समजलच पाहिजे असं थोडीच आहे! - (विज्ञानवादी साधक) सोकाजी