✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ओढ समुद्राची

म
मालविका यांनी
Sat, 11/23/2019 - 23:30  ·  लेख
लेख
ओढ समुद्राची आमच्या चिपळूण पासून समुद्र तसा लांबच. म्हणजे समुद्र बघायला जायचं तर जवळच्या जवळ म्हणजे गुहागर गाठायला हवं. नाहीतर जरा लांब रत्नागिरी किंवा दापोली जवळचे बीच. त्यामुळे लहानपणी समुद्रावर जाणं खूपच कमी होतं. हां पण ओढ मात्र नक्की होती. लहान असताना आमच्या बिल्डिंग मधले शेजारी एखाद्या शनिवारी त्यांच्या मुलीबरोबर मलादेखील घेऊन जायचे. दोन तीन तास समुद्रावर घालवल्यावर त्यांच्या गाडीतून येताना दमून सॉलिड झोप लागायची. वर्षातून साधारण एकदा आमची कौटुंबिक म्हणजेच आम्ही चौघे आणि अप्पा काकांचं कुटुंब, ते चौघे असे आमच्या कुलदैवताला जायचो. देव आणि देवी दोन्ही रत्नागिरीच्या जवळपास त्यामुळे हमखास गणपतीपुळे वारी व्हायचीच. तेव्हा अगदी न चुकता समुद्रावर जाऊन पाण्यात पाय घालून यायचो. मस्त वाटायचं. पायाखालून वाळू निघून जाताना पायाला गुदगुल्या करीत जायची. तेव्हापासूनच समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटायला लागला. वाटायचं, कसलं मस्त आहे ना यांना. रोज संध्याकाळी समुद्रवर फिरायला यायचं, रोज तो सुंदर असा सूर्यास्त बघायचा, जेव्हा मनाला येईल तेव्हा पाण्यात डुंबायचं, नाहीतर नुसतं पाण्यात पाय घालून आलं परत, कधी वाटलं तर वाळूत खेळलं, किंवा चप्पल काढून चालायला गेलं. पिक्चर मध्ये समुद्रवजवळच्या मोठ्या खडकांचे सीन असायचे ना तेव्हा इतके आवडायचे ते खडक. स्पेशली जेव्हा एखादा हिरो किंवा हिरॉईन अशा मोठ्या खडकावर विचार करीत बसलेले असत तेव्हा बघताना वाटायचं किती मस्त निवांत बसलेत, कोणी नाही त्यांना हाकलून लावायला कि डिस्टर्ब करायला. आपल्याच तंद्रीत मस्त वारा खात निवांत बसायचं. आता लहानपणी जायचो त्या लिमिटेड समुद्र किनाऱ्यावर असे मोठे खडक मला तरी दिसले नाहीत. आणि कधी दिसले तर ते आमच्यापासून खूप लांब असायचे. मग मोठी माणसं कधी जाऊन देत नसत. मोठी होऊन नोकरीला मुंबईला आले. मुक्काम ठाण्याला त्यामुळे इथेही समुद्र तसा लांबच. मैत्रिणींबरोबर गेट वे ऑफ इंडियाला जाऊन समुद्र बघितला, जुहूला जाऊन बघितला, वरळीला सी फेस बघितला, दादरला जाऊन आले. प्रत्येक ठिकाणी हा वेगळाच वाटला मला. वरळीचा एकदम सोफिस्टिकेटेड, तर जुहूचा अगदी सगळ्यांना सामावून घेणारा किनारा असणारा, तर गेट वे ऑफ इंडिया म्हणजे विविधतेत एकता चे दर्शन घडवणारा टिपिकल टुरिस्ट प्लेस. दादरचा बीच बघितल्यावर मला शंकाच आली कि काय हे? अरे किनाराच नाही त्याला. मग कसला हा समुद्र ? अतिक्रमण इतकं कि बिचारा किनाराच गायब. नाही म्हणायला बँड स्टॅन्ड बघायला जरा बरं वाटलं. तिथे लगतच्या सी सी डी मध्ये बसून कॉफी पीत मैत्रिणींशी गप्पा मारत घालवलेली संध्याकाळ छानच लक्षात आहे. पण तरीही मला वाटणारी ओढ या समुद्राची नक्कीच नव्हती. इथे मला कधीही छान तास च्या तास घालवावेत असं कधीही वाटलं नाही. इथे छान मोठे मोठे खडक होते पण त्यावर लोक इतकी होती कि काय विचारता ? शिवाय कोणी ना कोणी फेरीवाला येऊन हटकून जायचाच . छे हे काही पिक्चर मध्ये दाखवतात तसं छान नाहीये असं जाणवलं . मध्यंतरी ताईच लग्न झालं नि कोळथरे या सुंदर गावी ती राहायला गेली . इथे समुद्र मात्र अगदी मनासारखा अनुभवायला मिळाला. ताईकडे आलं कि संध्याकाळची समुद्रावरची फेरी कधी चुकली नाही. मी खरं तर ४ वाजताच जाऊ का जाऊ का करत असते. आणि ताई वेळ आहे अजून म्हणून थांबवून ठेवते. मला सूर्यास्त होईल याची भीती असते. पण नारळी पोफळीच्या आड लपलेला सूर्य समुद्रावर गेलं कि चांगलाच वर असायचा. आरामात वाळूत बसून गप्पा मारायच्या, कधी चप्पल काढून मस्त वाळूत फेऱ्या मारायच्या किंवा कधी मनसोक्त पाण्यात डुंबायचं. हा समुद्र मला खूप जवळचा वाटायला लागला. स्वच्छ, सुंदर आणि मोठा मस्त समुद्र किनारा आणि किनाऱ्यालगत नारळी पोफळीच्या बागा. बाग आणि किनार्याच्या मध्ये केवड्याचे बन हद्दीसारखं. खूप मस्त वाटतं अजूनही तिथे गेलं कि. तिथे अजूनही मोबाईल नेटवर्क नाही. आमच्यासारख्या लोकांना ते खूप बरं वाटतं. अगदी काळोख होईपर्यंत किनाऱ्यावर बसून गप्पा मारायच्या. अस्तास जाणारा सूर्य कितीतरी वेळा डोळ्यात साठवून घेतलाय मी इथे. एकटी जेव्हा केव्हा आलेय इथे कितीतरी वेळा खूप बोललेय समुद्राशी. गप्प राहण्याचा स्वभाव नाही. पण मग कोणी बरोबर नसताना काय करणार ?मग समुद्रालाच सांगायच्या मनातल्या गोष्टी. तो न्यूट्रल असतो. ना माझ्या बाजूने बोलतो ना माझ्या विरुद्ध. आश्चर्य म्हणजे घर कि मुर्गी दाल बराबर याचा प्रत्यय इथे आला. गावातले क्वचितच कोणी समुद्रवर फिरकतात. आहे काय रोज त्यात बघण्यासारख असा वर प्रश्न ?मी तर डोक्याला हात लावले. एकदा मी नि श्रीनिवास सकाळी सकाळी उठून समुद्रावर निघालो. तर ताईच्या सासूबाई विचारतात , "काय गो एवढं तिथे जाऊन बघता ? त्या लाटा काय ? एकदा पुढे येणार एकदा मागे जाणार . त्यात काय बघायचं ?" आम्ही दोघेही निशब्द. तरी यांचं माहेर गुहागर म्हणजे समुद्रकिनारीच आणि इथे त्यांच्या सासरीदेखील समुद्र. पण नाही बाई त्यांना त्यात काही खास वाटत. ताई मात्र आम्ही आलो कि न चुकता येते समुद्रावर. त्या निमीत्ताने येणं होत म्हणते. एरवी कोणी तिला अडवत नाही. पण एकटीनं येणं तिच्या स्वभावात नाही. मग तिला कोणी आलं कि बरं वाटत. इकडच्या तिकडच्या फिरण्यात रत्नागिरीचा बीच, आरेवारे बीच, गुहागर बीच, जयगड, अंजनवेल,आंजर्ले बीच,कर्दे बीच, आचरा बीच, कुणकेश्वर बीच, देवगड हि गावंसुद्धा पालथी घालून झाली. इथेही समुद्र वेगवेगळ्या रूपात भेटत होता. पण जास्त आवडला तो कोळथरचाच. माझं लग्न झालं नि मी पहिल्यांदा आमच्या अर्थात वेळणेश्वर गावी आले. वेळणेश्वरला याआधी भेट दिलेली पुसटशी आठवत होती. माझ्यासाठी आवडती गोष्ट म्हणजे इथे असणारा समुद्र. अगदी पहिल्या दिवशी काही कार्यक्रमासाठी गेल्याने समुद्रावर जात आलं नव्हतं. पण मग एकदा निवांत गेलो. तशी आता हि पण टुरिस्ट प्लेस झाल्याने थोडीफार गर्दी असतेच. पण तरीही हा समुद्र मला आवडला. आपला वाटला. श्रीनिवास नि मी रात्री समुद्रावर फिरायला आलो. आधी रात्री समुद्रावर फिरायला जाणे हि पिक्चर मधलीच कल्पना वाटलेली. पण खरंच आम्ही गेलो समुद्रावर. त्याच्यासाठी लहानपणापासूनचिच सवय असल्याने काही वेगळं वाटत नव्हतं. पण माझ्यासाठी एक नुसतीच कल्पनेत असलेली गोष्ट साकारत होती. रात्री किनार्यावर कोणी नव्हते. किनाऱ्यावर बसण्यासाठी बाकडी टाकलेली आहेत तिथेच बसलो. निरव शांतता, लाटांचा आवाज, आकाशभर पसरलेल्या चांदण्या आणि हवाहवासा जोडीदार. अविस्मरणीय अशी रात्र होती ती. नंतर देखील अश्या कितीतरी रात्री आम्ही समुद्रावर घालवल्या. कधी दोघंच, कधी दीर भावजय. ती दोघं असली कि विषय पुरायचे नाहीत बोलायला. कधी रुसवे फुगवे, कधी गमती जमती, खूप सारा मोकळेपणा, बरोबरीची आणि जिवाभावाची माणसं आणि सोबतीला अखंड साथ देणारा समुद्र. रात्रीच्या वेळच एक वेगळच रूप समुद्राने दाखवून दिलंन. एक दोन वेळा तर चक्क समुद्रात हिरव्या रंगाच्या चमकत्या लाटा दिसल्या. जेली फिश किनाऱ्यालगत आल्याने लाटांना असा रंग येतो असं कळलं. हाही एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला. दुर्दैवाने इथे देखील समुद्र हळूहळू आत घुसायला सुरवात झाली आहे . दर पावसाळ्यात किनाऱ्यालगतची एखाद दोन नारळीची झाड किनाऱ्यावर आडवी पडतायत. समुद्र भरतीला आत आत घुसू पाहतोय. एखाद्या ठिकाणी भर घातली तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या कुठेतरी सुद्धा होणारच. नियमच आहे तो. नंतर आजूबाजूच्या गावात देखील तिथल्या किनाऱ्यांवर जाऊन आलो . जस कि बुदल, कारुळ, बोऱ्या, हेदवी, तवसाळ,अंजनवेल यांचेही शांत निवांत स्वच्छ सुंदर किनारे मन भरेपर्यंत पहिले. अजूनही भटकंतीला जाताना बीच हि आमची पसंती असते. दोघांनाही समुद्राचं आकर्षण आहे. श्रीनिवास लहानपणापासून समुद्राच्या सहवासात वाढला तरी ते कमी झालं नाही आणि मला ते आकर्षण उशिरा वाटायला लागल्याने अजूनही नवीन म्हणून. अजूनही समुद्र बोलावतोय, खुणावतोय. अजून बरेच किनारे पालथे घालायचेत. बघू कसे कुठे कधी ते ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
7064 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

अरे किती छान लिहिलं आहे.

कंजूस
Sun, 11/24/2019 - 06:10 नवीन
अरे किती छान लिहिलं आहे. ------ लहानपणी मुंबईत गेलं. टिवी नव्हते, नोकरीवाली लोकं साडेपाच सहालाच घरी पोहोचत. मग शनिवारी रविवारी बागा आणि गिरगाव/जुह//दादर चौपाट्या आलटुन पालटून. महालक्ष्मी मंदिरामागचा स्पेशल. ते खडक, भरतीवेळी सपाकन लाट आपटणार मजा पण जाता येत नसे. मग भरती नसतानाची वेळ पाहून जाणे. मुगभजी वडे घेऊन खडकावर बसणे. मज्जा. वारंवार जायला मिळायचं. कोकण पर्यटनात मग एकच संध्याकाळ मिळायची. पुढे समुद्राचं आकर्षण डोंगरांत बदललं.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. .

मुक्त विहारि
Sun, 11/24/2019 - 13:51 नवीन
माझा आवडता समुद्र किनारा म्हणजे गुहागरचा. रात्री 9 नंतर कुणीही नसते. 1998 ते 2006 कोकणातले काही समुद्र किनारे बघीतले. पण गर्दी नसलेला हा गुहागरचा किनारा फारच आवडला.
  • Log in or register to post comments

निवती, भोगवे नक्की करा.

यशोधरा
Sun, 11/24/2019 - 14:19 नवीन
निवती, भोगवे नक्की करा.
  • Log in or register to post comments

अगदी काळोख होईपर्यंत

जॉनविक्क
Sun, 11/24/2019 - 14:34 नवीन
अगदी काळोख होईपर्यंत किनाऱ्यावर बसून गप्पा मारायच्या
सुर्यास्ताला समुद्रात डुंबने अतिशय सुखद अनुभव असतो, आणी वाळूत रेंगाळणेही... समुद्र किनारा विश्वाच्या भव्यतेचे दरवाजे आहेत असेच वाटत राहते
  • Log in or register to post comments

खूप सुरेख लिहिलंय.

पद्मावति
Sun, 11/24/2019 - 14:41 नवीन
खूप सुरेख लिहिलंय.
  • Log in or register to post comments

अगदी काळोख होईपर्यंत

कंजूस
Sun, 11/24/2019 - 15:02 नवीन
अगदी काळोख होईपर्यंत किनाऱ्यावर बसून गप्पा मारायच्या हो , पण डास हाकलतात.
  • Log in or register to post comments

जिव्हाळ्याचा विषय

मायमराठी
Sun, 11/24/2019 - 15:23 नवीन
केळशीचा किनाराही छान आहे. खूप विस्तीर्ण आहे. गर्दी तशी कमी असते. हिवाळ्यात किनाऱ्यावरील फ्लेमिंगो हे एक खास आकर्षण असते.
  • Log in or register to post comments

फ्लेमिंगो

MipaPremiYogesh
Mon, 11/25/2019 - 13:05 नवीन
हिवाळ्यात फ्लेमिंगो येतात केळशीच्या किनाऱ्यावर? साधारण ता कधी येतात, किती दिवस असतात आणि किती जवळ पंगू शकतो..? फोटो असल्यास पाठवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मायमराठी

खूप छान

सुमो
Sun, 11/24/2019 - 15:27 नवीन
लिहिलं आहे. आवर्जून जाण्याचं ठिकाण म्हणजे सागरकिनार्‍याचं कोकण.आणि सगळ्यात आवडते ती समुद्राची घनगंभीर गाज.....
  • Log in or register to post comments

वा ! सुंदर लिहीलंय .

उगा काहितरीच
Sun, 11/24/2019 - 18:41 नवीन
वा ! सुंदर लिहीलंय .
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलंय

श्वेता२४
Sun, 11/24/2019 - 19:33 नवीन
मलाही समुद्रकिनारी फिरायला खूप आवडतं. पण तुलनेनं योग कमी आले. आताही मुंबईत चौपाट्या असल्या तरी तीथे गर्दीमुळे जावेसे वाटत नाही. गोव्यातील कानकोन येतील पाळेमुळे बीच माझा आतापर्यंत चा सगळ्यात आवडता. खूप रम्य आठवणी आहेत तिथल्या
  • Log in or register to post comments

+ पाळेमुळे नाही

श्वेता२४
Sun, 11/24/2019 - 19:34 नवीन
पाळेलोम बीच
  • Log in or register to post comments

पाळेलोम नाही

हणमंतअण्णा शंक…
Mon, 11/25/2019 - 12:37 नवीन
पाळोळें बीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

सुंदर लिखाण

MipaPremiYogesh
Mon, 11/25/2019 - 13:07 नवीन
खूपच सुंदर लिहिले आहे. आम्ही तर पुणेकर तुम्हाला त्यातल्या त्यात जवळ ☺️.. कोळथर चा समुद्र खरच अप्रतिम आहे..तसाच मालगुंड चा पण अप्रतिम आहे..गोव्यापेक्षाही..
  • Log in or register to post comments

समुद्राशी नाळ जन्माला

खिलजि
Mon, 11/25/2019 - 16:43 नवीन
समुद्राशी नाळ जन्माला आल्यापासूनच जुळलेली आहे .. मला आठवतंय सातवी आठवीला फारच धैर्य वाढलेले .. श्रीकृष्ण रामायण महाभारत पौराणिक मालिका बघून अजूनच वलय प्राप्त झाले होते .. काहीतरी वेगळे सध्या करायचे तर तपश्चर्या करायला हवी म्हणून थेट समुद्र गाठायचो .. आता आठवले तरी हसायला येते .. चांगला दोन एक तास मी आत खडकात समुद्राजवळ बसून स्तोत्र घोकत राहायचो .. असेच करत करत हळूहळू समुद्र म्हणजे काय ते उलगडत गेले .. समुद्र , त्याला ओळखायचं असेल तर सतत त्याला बघत राहा .. त्याच्या लाटा मोजत राहा .. त्या लाटांमध्येच तो दडलेला आहे .. खवळायचं असेल तर तो कधीही आततायीपणा करत नाही .. हळूहळू त्याच्या लाटांची उंची वाढवत नेतो आणि एका मर्यादेनंतर तो अफाट होतो एखाद्या अनाम विरावानी. मग फक्त तोच असतो , दुसरं कुणीही नाही .. असो .. मला सध्यातरी एकाच अनुभव इथे टाकावासा वाटतो माझ्या ठेवणीतला .. ( पूर्वार्ध :: वरळी समुद्रकिनाऱ्यावर अजूनही एक अशी जागा आहे कि ज्या जागेने बर्याच नगरसेवकांना तुंबळ पैसे कमावून दिले .. दार वर्षी त्या जागेच्या बांधकामाचा खर्च बघून आमचे तर डोळे पांढरे व्हायचे .. पण गेले काहीएक वर्षे आता त्या जागेचे बांधकाम निसर्गाला मान देऊन केलेले आहे , त्यामुळे सध्यातरी ती समस्या उद्भवलेली नाही आहे .. दूध डेरी आणि सध्याचा सीलिंक यादरम्यान एक ठराविक जागा आहे जिथे समुद्र पावसाळ्यात तो कठडा पूर्णपणे नेस्तनाबूत करतो .. मोठाली भगदाडे पडतो .. लाटा उसळून त्याबरोबर बरेचशे दगडीगोटे बाहेर रस्त्यावर आणून टाकतो .. त्या जागेत दरवर्षी स्थानिक नगरसेवक बांधकाम करायचे पण आता समुद्राचा मान ठेवून तिथे पूर्णपणे चौकोन घेऊन त्याला तिथे धडकण्याची मुभा दिलेली आहे .. त्यामुळे सध्यातरी हे सर्व थांबलेले आहे ..) मी आणि माझे मित्र ( वरळी येथील ) चिक्कू , तुषार , बाबू , चिमु एकदम जिवलग .. मी हळूहळू दिसेनासा झाल्यावर त्यांनी संध्याकाळी गाठून मला त्याबद्दल विचारले .. मी त्यांना सहज सांगितले कि मी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून असतो (अर्थात स्तोत्र पुराण लपवून, बरे का .. ).. मग सुरु झाले त्यांचेही येणे जाणे माझ्यासोबत .. मी ते सर्व असताना फक्त निरीक्षण करायचो आणि बराच वेळ बसून नंतर आम्ही माघारी परतायचो .. काही दिवसांनी पावसाचा मौसम जवळ आला .. समुद्र हळूहळू वेगळाच भासायला लागला ... भीती वाटायची त्याची .. एक्दातर आम्ही सर्व पार त्याच्या तोंडाशी बसलेलो होतो .. मी सहज मागे बघितले तर समुद्राच्या पाण्याने आम्हाला चक्क वेढले होते .. आता आली कि नाही पंचाईत .. कसे बसे त्या मोठाल्या खडकांतून ठेचकाळत वाट काढली आणि किनाऱ्यावर आलो .. त्या धक्क्यातून सावरत होतो आणि आम्ही किनाऱ्यावर येऊन बघितलं तर समुद्र पार जवळ आला होता .. चारपाच मोठ्या माणसांनी भरपूर खडसावलं यावरून .. काहीएक दिवसांनी ती दिवस जवळ आला , ज्याने मी कानाला खडा लावला .. पुन्हा समुद्राच्या जवळ जाणे नको .. कितीही पोहणारा असला तरी या दिसणाऱ्या देवाला आव्हान नको .. बळेच तर मुळीच नको .. आषाढात असाच धोधो मुसळधार पाऊस पडला सकाळी .. दुपारपर्यंत जोर कमी झाला होता .. आम्ही सर्वानीच मक्याची कणसे आणि सॅन्डविच खाऊया आणि निवांत हादडूया म्हणून बेत आखला .. ठरल्याप्रमाणे आम्ही त्या पूर्वार्धात सांगितलेल्या जागेवर गेलो ... मोठे भगदाड पडलेलंच होत त्यामुळे समुद्र किनारा गाठायला वेळ नाही लागला .. मला तिथे बसून बसून समुद्राच्या लाटांचा जरा अंदाज आला होताच .. (नाममात्र अनुभव त्याकाळचा , ते म्हणतात ना , वासरात लंगडी गाय शहाणी ) त्यानुसार मला समुद्र जरा खवळला आहे असे का कुणास ठाऊक पण वाटत होते .. मी मित्रांना सांगितलेही पण कोणीच ऐकायला तयार नव्हते .. हळूहळू लाटांची उंची वाढत चालली होती आणि समुद्र आम्हाला मागे रेटत होता .. आम्ही मागे येत होतो मागे येत होतो .. आणि अचानक दूरवर मोठी लाट चाल करून येतांना दिसली.. तिची उंचीच एवढी भयानक होती कि त्सुनामी म्हणजे काय असेल याची कल्पनाच ना केलेली बरी.. ती एवढ्या वेगात येत होती आणि उंची तासिधाराही कमी होत नव्हती ते बघून सर्वानीच धावत किनारा गाठायचं ठरवलं .. आम्ही सर्व जण वेगात मागे पळत सुटलो .. कसला किनारा आणि कसलं काय .. आम्ही जेमतेम वीसेक पावलं कट्ट्यापासून लांब असू , तिने आम्हाला गाठलंच .. आयुष्यात पाहिल्यान्दाच असा सपाटून दगडधोंड्यांचा मार पडला होता .. तुम्हाला सांगू , शक्तिशाली लाट , बरेच दगड गोटे आपल्यासंगे त्याच वेगात वाहत आणते , आणि आपल्यालाहि दगडगोट्याप्रमाणेच किनाऱ्याला धडकवते .. तिथे काही स्थानिक लोक आणि अरब ( परदेशी पर्यटक ) यांनी ती लाट गेल्यावर पटापट त्या बोळातून खाली उतरले आणि एकेकाला बकोटीला धरून बाहेर काढलं .. सर्वात वाईट अवस्था चिक्कूची झालीहोती .. बिच्चारा दोन महिने पाय गळ्यात घेऊन बसला होता .. चिमूचा हात आणि पाय चांगलाच फाटला होता .. माझ्या डोक्याला दगड लागून जखम झाली होती आणि बाकीच्यांनाही किरकोळ जखमा झाल्या होत्या .. आम्हाला लागले होते म्हणून आम्ही वाचलो नाहीतर लोकांनी ठोकूनच काढले असते .. तर असा हा समुद्र ,, कधी हवाहवासा तर कधी नकोनकोसा .. आजही समुद्रावर जातो पण वाळू असलेले किनारे शोधतो .. खडकाळ दगडी किनारे नकोसे वाटतात ..
  • Log in or register to post comments

अग्नी आणि समुद्र

मुक्त विहारि
Tue, 11/26/2019 - 15:36 नवीन
ह्यांच्या बरोबर दूर राहूनच मैत्री करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

अर्रर्ररारा खतरनाक...

जॉनविक्क
Mon, 12/02/2019 - 22:44 नवीन
बस उपरवाला मेहरबान इसिलिए गधा पेहलवान हेच खरंय यार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

धन्यवाद !

मालविका
Tue, 12/03/2019 - 08:05 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा