काकतियांचे वरंगळ

कंजूस भटकंती
*** *** *** *** *** कंजूस  यांचे सर्व लेखन इथे पाहा *** *** *** *** ***
काकतियांचे वरंगळ बाराव्या ते चौदाव्या शतकात एक राजघराणे गोदावरी आणि कृष्णा नदी पूर्व समुद्रास मिळते त्यामधल्या भागात राज्य करत होते. चालुक्यांचे(पश्चिमी) प्रतिनिधित्व करत नंतर स्वतंत्र झाले. तेराव्या शतकात अल्लादिन खिलजिच्या सैन्याकडून पराभव झाल्यावर मांडलिक झाले होते. काही राजांनी मात्र चांगलाच अमल ठेवला होता ते हे एकशिलानगर/ओरुगलु अथवा आताचे वरंगळ/ वारंगळ तेलंगणा राज्यात आहे. दोन अडिचशे वर्षांत काही देवळे,किल्ले,मंदिरं बांधली गेली ती पाहण्याचा योग डिसेंबरच्या दुसय्रा आठवड्यात पुरी-भुबनेश्वर जाताना वाटेत थांबून घेतला त्यातले काही फोटो देत आहे. कुठे आहे, जावे कसे हैदराबाद शहरापासून १४० किमिवर गुंटूर रोडवर /रेल्वेमार्गावर वरंगळ स्टेशनही आहे. इथून १० किमिवरचे अगोदरचे काजिपेट जंक्शन आणि हे वरंगळ या दोन्हीठिकाणी सर्व एक्सप्रेस गाड्या थांबतात. रेल्वेमार्ग पश्चिम-पूर्व आहे. स्टेशनच्या उत्तरेस वरंगळ - काजिपेट रोड आहे त्या रोडवरच सात किमिवर हनमकोंडा चाररस्ता स्टॅापजवळ थाउंजड पिलर टेंपल आहे, अगोदर पाच किमिवर भद्रकाली मंदिर आणि तलाव आहे. बसेस भरपूर आहेत आणि त्या स्टेशनसमोरच्याच स्टँडवरून सुटतात. ऑटोही भरपूर आहेत परंतू दीडशे दोनशे रुपये वनवे असाच दर सांगतात. दोन्हीमिळून लागणारा अपेक्षित वेळ दीड तास. स्टेशनच्या दक्षिणेला दोन किमिवर वरंगळ फोर्ट आहे. इकडे बस जात नाहीत. ऑटो वनवे दीडशे रु सांगतात,सत्तरला तयार होतात. वरंगळमधली हीच मुख्य जागा. मोठ्या आवारात किल्ल्याचे अवशेष मांडून ठेवले आहेत. चार दिशांची चार उंच दगडी प्रवेशद्वारे आहेत त्या अखंड स्थितीत जागेवरच आहेत. तेच आता तेलंगणा राज्याचे सांस्कृतिकचिन्ह झाले आहे. आतमध्ये वाडा आणि चार देवळे होती त्यांपैकी एक सुस्थितीत असले तरी ते त्या काळातले वाटत नाही. एक शिलालेख फरशीवर आहे. किल्ला तेव्हा फारच सुंदर असणार हे अवशेषांवरून दिसते. जावे कसे हैदराबादमध्ये राहात असाल तर सकाळी ७:१० ला सिकंद्राबादहून सुटणारी गुंटूर इंटरसिटी एक्सप्रेसने ( 12706 ) वरंगळला दहा वाजता येता येईल वरील तीन ठिकाणे पाहून परत १८:४५ ची हीच गाडी (12705)वरंगळला मिळेल. ती सिकंद्राबादला दहाला पोहोचते. रोड ट्रिप १४०+१४० किमि होईल. परंतू नवीन शहरांतील वाहतुकीचा अंदाज नसल्याने रेल्वेच बरी. इतर पर्याय: मुंबईहून कोणार्क एक्सप्रेस (11019)ने थेट इथे १०:३०ला येऊन मुक्काम करून दुसरे दिवशी १२:५०च्या ईस्ट कोस्ट एक्सप्रेसने (18646)/ भुबनेश्वर गाठता येईल खाणे,राहाणे सर्व हॅाटेलस वरंगळ - काजिपेट रस्ता, स्टेशनजवळचा पोस्ट ओफिस रोड (पाच मिनिटांवर) येथे आहेत. बाजार, याच रस्त्यावर आहेत. विशेष पर्यटक केंद्र नसल्याने हॅाटेलस/रेस्टारंटसकडून फार अपेक्षा धरू नये. एकदोन थ्री स्टार्सही जवळच आहेत. स्टेशनच्या दक्षिण /किल्ला भागात काही नाही. वरंगळ शहर उत्तर भागातच आहे. विकिलेख :- काकतीय Kakatiya लिंक:https://en.wikipedia.org/wiki/Kakatiya_dynasty २) विकिलेख :- वरंगळ किल्ला Warangal fort लिंक:https://en.wikipedia.org/wiki/Warangal_Fort फोटो १ ) वारंगळ स्टेशन प्रवेशद्वार


_______________________

शहरातील इतर ठिकाणे.

फोटो २) हजार खांबी मंदिर आता मोडकळीस आलेले.


फोटो ३)पाटी


फोटो ४)आवारातले दुसरे मंदिर


फोटो ५) नंदी


_________________________

वारंगळ किल्ला परिसर

फोटो ६)पाटी वारंगळ किल्ला


फोटो ७)किल्ला नकाशा


फोटो ८)काकतीय राजा आणि सिंह


फोटो ९)वारंगळ अवशेष


फोटो १०) मारुती.


फोटो ११)सिंह आणि तोरण


फोटो १२)वारंगळ किल्ला शिल्प


फोटो १३) भैरव


फोटो १४)एक शिल्प


फोटो १५)वारंगळ किल्ला आवाराबाहेरचा शिताबखान महाल. ( हे खरेतर थडगे असावे.)


फोटो १६)पाटी शिताबखान महाल.


फोटो १७)दोन शिलालेख कोपय्रात टाकले आहेत.


फोटो १८)शिलालेख


____________________ आपणास काही माहिती असेल तर अवश्य लिहा.

22 टिप्पण्या 11,157 दृश्ये

Comments

पगला गजोधर नवीन

मिपा गदारोळात कंजूसजींचा हा चांगला लेख मागे राहिला... "चालुक्य" म्हणजेच गुजरातचे "सोळंकी" नं ? त्यांचा प्रभाव पूर्व समुद्रकिनाऱ्यापर्यंत होता हे वाचून विस्मय वाटला. शिवाय वरंगळ हा नक्षल प्रभावित एरिया आहे का ? फॅमिली ट्रिप तिथे नेण्यास काही प्रॉब्लेम नाही न ?

कंजूस नवीन

In reply to by पगला गजोधर

हा भाग नक्षलप्रभावित नाही. महाराष्ट्रातला गोंदिया - चंपा, उडिशातला -राइगढ -झारसगुडा - संबलपूर हा हिराकूड धरणाभोवतालचा भाग नक्षली भाग आहे. फोटो हिराकूड धरणाभेवती नागपूरमार्गे जाणारी गाडी फिरते.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भव्य आणि कोरीव प्रवेशद्वार खास आवडले. काकतिय उत्कर्षकालात ते प्रजा, मित्रपक्ष आणि शत्रूपक्ष या सर्वांवर जबदस्त मानसिक प्रभाव पडत असणार !

एस नवीन

किल्ल्यातील अवशेष निदान चांगले जतन करण्याचा प्रयत्न पुरातत्त्व विभागाने केला आहे हे पाहून बरे वाटले. या परिसराचा कच्चा नकाशा देता येईल का?

कंजूस नवीन

कच्चा नकाशा स्क्रीनशॅाट पूर्व - पश्चिम रेल्वे ट्रॅक, वरंगळ स्टेशनसमोरच्या बस स्टँडहून काजिपेट रोडवरच्या ' हणमकोंडा चाररस्ता स्टॅाप' पर्यंत सात किमि०चे रूट ट्रेस, ५ किमि० मार्कच्या खाली दिसतोय तो भद्रकाली तलाव. ( येथे दुर्गंधी येते. गटारचे पाणी तलावात जाते.) दक्षिणेला दोन किमिवर वरंगळ किल्ला भाग दिसतो आहे. फोटो पाटी

मनिमौ नवीन

त्रोटक वाटतोय. अजून काही माहीती असेल तर लिहा की

कंजूस नवीन

In reply to by मनिमौ

>>त्रोटक वाटतोय>> मुद्दामहून इथे कुणी जाणार नाही. हैदराबादमध्ये एखादा दिवस मिळाल्यास पाहता येईल अशी जाण्यायेण्याची माहिती दिली आहे. इतिहासाबद्दल जे काही उपलब्ध आहे ते विकिलेखांत आणि त्यातल्या इतर लिंक्समध्ये दिले आहेच ते पुनर्लेखन टाळले आहे. ऐतिहासिक अधिक पुरातन इमारती,लेणी,देवळे पाहण्याची आवड असणारे कमीच असतात. या गुंटूर एक्सप्रेसने गुंटूरला गेल्यास तिथून 'अमरावति' ही नवीन आन्ध्रची राजधानी पाहता येईल. इथे काही बौद्धकालीन लेणी आहेत.

सुनील नवीन

काकतीय आणि देवगिरीचे यादव यांच्या संबंधातील इतिहासावर कुणी प्रकाश टाकल्यास उत्तम. कारण दोघेही समकालीन आणि शेजारी.

प्रचेतस नवीन

In reply to by सुनील

चालुक्य राजवट कमजोर होत असतानाच इकडे भिल्लम पाचवा हा हळूहळू प्रबळ होऊ लागला, त्याच सुमारास म्हणजे साधारण इस.११५० च्या आसपास चालुक्यांच्या काकतीय सामंत रुद्रदेव ह्यानेही काकतीयांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली. साहजिकच यादव आणि काकतीय ह्यांच्यात प्रादेशिक वर्चस्वावरुन हळूहळू युद्धांना सुरुवात होऊ लागली. हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत जैतुगीने तिल्लंग देशाचा (तेलंगणा) अधिपती रौद्र ह्याची अहुती दिली असे म्हटले आहे. काकतीय राजा रौद्राच्या मृत्युनंतर काकतीय राजवटीत काहीसे अराजक निर्माण झाले, रौद्राचा धाकटा भाऊ महादेव सत्तेवर येऊन त्याने महाराष्ट्रात आक्रमण केले व खुद्द देवगिरीलाच वेढा घातला पण ह्याच वेढ्यात जैतुगीने महादेवालाही ठार करुन त्याचा पुत्र गणपती काकतीयास बंदी बनविले. जेतुगीने 'तेलंगरायशीर्षकमलमूलोप्ताटन' (तेलंग राजाचे मस्तक उखडून टाकणारा) असे बिरुद धारण केले व नंतरच्या यादव राजांनीही हीच पदवी स्वतःला लावून घेतली. ह्याच जैतुगीने नंतर गणपतीला बंदीमुक्त करुन परत काकतीयांच्या राजसिंहासनावर बसविले. जैतुगीच्या काळात काकतीय राजवट ह्या दुर्दैवी परिस्थितीतून जात असताना काकतीयांचा पराक्रमी सेनापती ह्याने वारंगळला काकतीय राजवटीची घडी नीट बसविली, बळजोर होत असलेल्या सामंतांचे निर्दालन केले. गणपतीच्या सुटकेनंतर यादव व काकतीय ह्यांत काहीसे मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले, अर्थत यादवांचा यात वरचष्मा होताच. नंतरच्या राजांमध्येही युद्धे घडू लागली मात्र यादवांचे मुख्य शत्रू बनले ते द्वारसमुद्रचे होयसळ. सिंघण दुसरा, महादेव यादव व रामचंद्रदेव ह्यांची काकतीयांबरोबर पुढेही काही युद्धे झाली, महादेवाने खुद्द वरंगळलाच वेढा घातला होता व गणपतीची कन्या रुद्रम्मा हीने ह्याचा सूड घेण्यासाठी परत देवगिरीवर आक्रमण करुन महादेवाकडून एक कोटीची सुवर्णानाण्यांची खंडणी वसूल केली असे काकतीयांच्या काही वर्णनात आहे जे फारसे विश्वासार्ह नाही. अर्थात यादवांच्या स्रोतांतही काही वर्णने अतिरंजित आहेत हे नक्की.

कंजूस नवीन

हो, काकतीय आणि देवगिरीचे यादव समकालीनच. भारतातली हिंदू राजघराणी सुलतानांच्या आणि नंतर मोगलांच्या काळातील हा एक मोठा चर्चेचा विषय नक्कीच आहे. गुप्तकाळानंतर मोठे राजे संपले किंवा अगदी थोडाकाल सत्ता ठेवू शकले. वीस हजारापेक्षा अधिक खडे सैन्य बाळगणारे किती राजे असतील? सुलतान /मोगल लाखाची फोज आणायचे त्यांपुढे इकडचे किती टिकणार एकएकटे? आणि शेजाय्राचे वैर विसरून त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले नाहीत.

सिरुसेरि नवीन

वरंगळ मधील एका प्रसिद्ध प्राचीन मंदीरामधे वर्षम या चित्रपटातील "इ वर्षम साक्षीगा " या गाण्याचे चित्रीकरण झाले होते अशी माहिती एक तेलुगु मित्राने दिली होती .

कंजूस नवीन

In reply to by सिरुसेरि

फोटो घरच्या संगणक अथवा मोबाइलवर दिसले पाहिजेत. फेसबुकवरचे आहेत.

दुर्गविहारी नवीन

खुपच अप्रतिम धागा. मला हैद्राबादला जायचे होते. आता या धाग्यामुळे दोन दिवस वाढ्वून घेईन. आंध्र प्रदेशात किंवा तेलंगणामधे बहुतेकदा हैद्राबाद आणि विशाखापट्टण सोडले तर पर्यटक फारसे बाकी ठिकाणे पहात नाहीत, पण या धाग्यामुळे वारंगळ रडारवर आले. फोटोही छान काढले आहेत. अश्या ठिकाणांबध्दल लिहिण्यासठी धन्यवाद.

समर्पक नवीन

धन्यवाद... खास 'दुर्गविहारी' सिफारीश : भाग्यनगरहुन वरंगळ च्या वाटेवर असलेला 'भोंगीर' (भुवनगिरी) किल्ला अर्ध्या दिवसात पाहण्यासारखा आहे. सूर्योदय-सूर्यास्त समय विशेष. http://siaphotography.in/blog/bhongir-fort-historical-place/ (गुगल काकूंचे आभार) प्रचेतस यांच्यासाठी : इथून आणखी तासभर पुढे होयसळ मंदिरांच्या तोडीचे कोरीवकाम असलेली शिल्पे मिरवणारे 'रामप्पा' मंदिर चुकवू नये इतके विशेष उल्लेखनीय आहे. Little known but already on tentative list of UNESCO World Heritage. https://en.wikipedia.org/wiki/Ramappa_Temple

दुर्गविहारी नवीन

In reply to by समर्पक

मनापासून धन्यवाद समर्पकजी! या माहितीचा ट्रिपचे प्लॅनिंग करताना नक्कीच विचार केला जाईल. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील किल्ले पाहिले नाहीत पण बकेट लिस्टमधे आहेत. आणि हो मला मंदिरे पहाण्याची आवड आहे. ;-) वल्लीदांचा तो विषय असल्याने आणि ते या विषयावर उत्तम लिहीत असताना मी त्या प्रदेशात शिरलो नाही, पण जमेक तसे लिहीत असतोच.

कंजूस नवीन

रामप्पा मंदिर थोडे पुढे म्हणजे वरंगळपासून ७७ किमि अंतरावर असल्याने गेलो नाही. भोन्गिरचा किल्ला रेल्वे रुळाजवळच भोन्गिर स्टेशनपाशीच आहे तो अगदी छोट्याशा डोंगरावर आहे.

मदनबाण नवीन