Skip to main content

मतदार यादीमध्ये बदल करण्यासंबंधी

मतदार यादीमध्ये बदल करण्यासंबंधी

Published on 12/10/2017 - 17:02 प्रकाशित
आजच्या वर्तमानपत्रात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रकाशित करण्यात आलेली हि जाहिरात बघितली. आधीच्या निवडणूक ओळखपत्राचा क्रमांक माहित असल्याने आणि आधार कार्ड जवळ असल्याने आणखी काही गोष्टींची गरज लागणार नाही असे आधी वाटले होते. बऱ्याच आधीपासुन हे काम करायचे बाकी असल्यामुळे दुपारी वेळ काढुन मोठ्या अपेक्षेने माहितीसाठी त्यात दिलेले संस्थळ उघडले. सगळयात पहिले लक्षात आलेली गोष्ट म्हणणे हे संस्थळ सुरक्षित नाही. प्रत्यक्ष भारतीय निवडणूक आयोगाचे संस्थळसुध्दा असुरक्षित बघुन धन्य झालो. आणि मोदी तिकडे डिजिटल इंडिया करायला निघाले आहेत. हेच का ते डिजिटल इंडिया? नंतर वाचलेल्या माहितीवरून आपल्याला फॉर्म ६ भरावा लागेल हे लक्षात आले. फॉर्म वाचत असताना ४ क्रमांकाच्या 'पुरावा म्हणून जोडायच्या कागदपत्रांपाशी' अडखळलो. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालणार असल्याचे वाचून हायसे वाटले. पण नंतर पत्त्याचा पुरावा म्हणून दिलेल्या यादीत आधार कार्डाचे नाव नसल्याचे बघुन चकित झालो. माझ्याकडे त्यावेळी पासपोर्ट नसल्यामुळे आत्ता आपल्याला हे काम करणे शक्य नाही हे लक्षात आले. वयाचा पुरावा म्हणून पॅनकार्ड किंवा आधार कार्ड चालते मग पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड का चालत नाही हे मला समजले नाही. माझ्याकडे आधीपासूनच असलेले पॅनकार्ड वयाचा पुरावा म्हणून दाखवायचे असेल आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालणार नसेल तर मग त्या आधार कार्डाचा उपयोग काय? तिकडे जेटली प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्डाची सक्ती करत सुटले आहेत. पण तेच आधार कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून का चालू शकत नाही? या अश्या असुरक्षित संस्थळावर वैयक्तिक माहिती देणे आणि पुराव्याची सगळी कागदपत्रे जोडणे धोक्याचे आहे हि साधी गोष्टसुध्दा निवडणूक आयोगाच्या लक्षात येऊ नये का?

याद्या 1788
प्रतिक्रिया 3
बरोबर. आधार हे ओळखपत्र आणि एक विशेष क्रमांक आहे हे सरकारने प्रतिज्ञापत्रात कोर्टाला सांगितलं आहे. पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्या नावाचे घराचे करारपत्र/भाडेपावती/टेलिफोन बिल/ विज बिल बिल लागेल. तुमच्या वडलांच्या/नवय्राच्या नावे असल्यास रेशनकार्डावरचा उतारा आणि त्यावर तुमचे नाव हवे. लग्नाचे सर्टिफिकेटही संबंध दाखवेल. आधार आल्यापासून स्टेटबँकेत पत्तापुरावा म्हणून घेत नव्हते.

आधार कार्ड हा एक जैविक व्यक्ति-ओळख पत्र आहे. त्याच्या वर जन्म तारीख आहे व पत्ताही. तरीही ते फक्त तुमची जीवमात्रांच्या जगातील ओळख एवढेच सांगते. ते पत्त्याचा पुरावा म्हणून कायदेशीर नाही असे केन्द्र सरकारने वा सुप्रिम कोर्टाने म्हटल्याचे आठवत आहे. आता काही माणसे पत्ता बदलला की घाईघाईने आधारकार्डावर नवीन पत्ता बदण्यासाठी रांगेत विनाकारण उभी रहात आहेत .

सरकारी वेबसाईट हे सरकारी कार्यालयाप्रमाणे वेगळं प्रकरण आहे, या अनागोंदीचा मी रोज अनुभव घेत असतो. कुठल्याही सरकारी वेबसाईटवर अर्ज भरताना असंख्य अडचणी येतात. आता परिवहन विभागाच्या वेबसाईटचेच उदाहरण घ्या ना, आमचा ठाणे जिल्हा विभागून काही तालुके नव्या पालघर जिल्ह्यात आले, आमचा वाडा तालुकाही त्यातील एक. पण या वेबसाईटवर अजूनही वाडा तालुका ठाणे जिल्ह्यात दाखवला जातोय त्यामुळे आम्हाला पत्ता नोंद करताना अडचणी येतात. बरं ठाणे जिल्हा तर ठाणे जिल्हा म्हणत पत्ता नोंदवला तरी आर टी ओ ऑफिस आमचे अर्ज ग्राह्य नाही धरत. याचा अर्थ जोपर्यंत सरकारच्या डोक्यात प्रकाश पडत नाही तोपर्यंत आम्ही वाडा तालुक्यातल्या जनतेने लायसन्स काढायचे नाही असा समजायचं कि काय कळत नाही.