Skip to main content

अंबरनाथ ते म्हसा ०९/०४/१७ सायकल भ्रमंती

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 11/04/2017 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलिंग च्या सुरवातीच्या दिवसांत , सायकल बदलण्यापुर्वी जीला अनेक वेळा त्रास देउन , अनेक चौकशा करुन भंडाउन सोडलं ती , सीएफयू( सी एफ यू= कॅम्प फायर अनलिमिटेड नावाचा व्हाटस App गृप) ची एक लेडी सायकलिस्ट नंदिनी जोशी (बदलापूर ) चा एक मेसेज होता सात / आठ तारखेला .. " या रवीवारी जर राईड करणार असाल तर मला कळवा " मला ही यायचय तुमच्याबरोबर. हा रवीवार मला ही मोकळा होता , कल्याण सायकलिस्ट ची राईड होती कल्याण ते व्हिवियाना मॉल ठाणे अशी .. म्हणजे सिमेंट च्या जंगलातुन सिमेंट च्या रस्त्याने सिमेंट च्या कोअर फॉरेस्ट मध्ये जायचे ते ही अनेक वाहन चालकांच्या रागाला तोंड देत . त्यामुळे गृप चांगला असुनही नाही जावेसे वाटले . त्या पेक्षा ,निसर्गाच्या सहवासात जाऊ कुठेतरी असे ठरवले .नंदिनीला हा परिसर चांगला माहीत आहे , मूळची ट्रेकर , पक्षी / प्राणी/ सर्प मीत्र . अनेक सर्पाना पुन्हा जंगलात सोडायची कामगिरी करताना या भागात अनेक वेळा गेलेली . तीलाच सांगितले , रुट तुच निवड , किती लांब जायचे ते ही तुच ठरव . फक्त दूर पर्यंत जायचे असेल तर त्या प्रमाणात लवकर निघू. मग रुट ठरला अंबरनाथ , बदलापूर, म्हसा व वाटलं तर पूढे हुतात्मा भाई कोतवाल यांच्या समाधी पर्यंत जायचं. पहाटे साडेचार ला घर सोडले . वैशाली सीनेमा पाशी नंदिनी येणार होती पाच पर्यंत . सोसायटीचा वॉचमन गेट चा बंदोबस्त करुन सुस्त होता ,त्यात दोन तीन मिनीटे गेली . ९ /१० किमी चे अंतर कापायला ३५/४० मीनीटे लागली . जेव्हा पोहोचलो तेव्हा नंदिनी घरी परत जायच्या विचारात होती , कारण माझा फोन ही लागत नव्हता , नेटवर्क मिळत नव्हतं. वैशालीपाशी चहा घेउन निघायच असा बेत होता पण चहावाल्याचा ही रवीवार असावा , सर्व सामसुम होती . मग अजिबात वेळ न दवडता पूढे निघालो . कूठे आणी कसं जायच हे नंदीनीलाच ठाउक होतं , त्यामुळे वळण , चौक तीठा अस काही लागल कि थांबून , योग्य इशारा मिळताच पूढे जात होतो . माझी आई नेहमी सांगत्ये .. चैत्र पालवी फुटली कि हवेत थोडा गारवा येतो पहाटेच्या वेळेला .. त्याचा इतका छान प्रत्यय येत होता कि जणू कूणी २२/२३ डिग्री च सेटिंग लाउन सर्व रस्त्यावर एसी लावलाय अस वाटत होतं. पाटा विकेट पाहून जसा फलंदाज रंगात येतो , तसा मस्त रस्ता , रहदारी नाहीच ,मग वेग घ्यावासा वाटणारच .. एक दोन चढ सहज पार केले व मग लक्षात आलं , अंतर वाढतय दोघांमधलं , एक चढाव पार करुन थांबलो. आता हेड लाईट शिवाय ही थोडे थोडे दिसु लागले होते . नंदीनी आल्यावर तहान लाडू भूक लाडू किती आहेत एक मेकांकडे याची चर्चा व चर्वण ही झालं. नंदिनी ने एक छान पेय आणलं होतं, काकडी ,लिंबू व आलं, रात्री पाण्यात भिजत टाकून ,सकाळी त्यातलं फक्त पाणी गाळून घ्यायचं , हा तिचाच शोध आहे,. उन्हात फिरायचे असेल तर फक्त पाणी पिण्या ऐवजी हा प्रकार छान आहे. थोड्या गप्पा ही झाल्या . तेव्हा समजले कि नंदिनी ला कालच एक छोटासा अपघात झालाय , तीने आणलेली सायकल तीची नाहीच , सेम मेक ची सेम साईज ची मैत्रीणीची सायकल ती घेउन आल्ये , तीची सायकल ॲडमिट आहे . पाच सहा महीन्यांच्या दिर्घ गॅप नंतर ती आज सायकलिंग करत होती . काल सायकल ची किरकोळ देखभाल करायला नेत असतानाच एका रिक्षेने किरकोळ धडक देउन सायकल जास्तच जायबंदी झाली होती , तीला ही थोडा मार लागला होता . आता जास्त अंतर न ठेवता पूढे जाउया असं ठरवुन निघालो .. आता आसपास ची झाडं ओळखता येतील इतपत दिसू लागलं होतं.. एसी इफेक्ट मात्र कायम होता .. व रस्त्याचा दर्जा ही . वेग मर्यादितठेवायचा असल्याने मस्त पैकी झाडं निरखत जात होतो . शेवरीला आलेली कोवळी पालवी छान दिसत होती , पानं म्हणजे जणू हाताची बोटं , सुर्य किरणांचा झेल घ्यायला सज्ज झाल्येत असे काहीसे विचार मनात येत होते .. या रस्त्याला कुड्याची बर्यापैकी मोठी झूडपे आहेत व सर्व पांढऱ्या फुलानी लगडली आहेत सध्या .. ही एकदा पाण्यातुन काढुन मग मिठाच्या पाण्यात टाकायची व सावलीत सुकवायची , बरणीत भरुन ठेवली कि सांडगा तयार . केव्हा ही थोडी फूल कढल्यात तेल टाकून तळली कि मस्त लागतात ..पोटाचे विकार ही होत नाहीत वर्ष भर अधुन मधून खाल्ली कि . इतक्यात एका कुंभ्या ने लक्ष वेधून घेतले , पांढरी फुले व मडक्याच्या आकाराची हीरवीगार फळे मिरवत होता .. फोटोचा मोह झालाच .. कुंभा फळे कुंभा https://lh3.googleusercontent.com/h_DgiZNHLdAdo_HC1exZQBvLqieBQnMGbwcER… कुंभी ची फळे नंदिनी फळांचा ,फुलांचा , स्वताचा , व मागोमाग येणाऱ्या नंदिनीचा असे सर्वांचे फोटो काढले . थोडं पुढे गेल्यावर एका झाडाने लक्ष वेधून घेतले , एकमेकात गुंतलेल्या वळणदार फांद्या व त्यावर छोटी पांढरी फूले , झाड काही ओळखता आले नाही मला . एक दोन फोटो घेतले , सवडीने जाणकाराना विचारू म्हणून. घरी आल्यावर दोन जणांनी एकच नाव सांगितले. चंद्रशेखर मराठे व प्रशांत आवळे सर, यांना विचारलं आणि झाडं वेली पक्षी प्राणी यांची माहिती मिळाली नाही असं कधी होत नाही. खरे जाणकार. ( Tamilnadia Uliginosa ) मी याच्या वेड्या वाकड्या फांद्या म्हणजे तमिळ लिपी व त्यावरून, तमीळनाडीया असे लक्षात ठेवणारे आता . tamilnadiya Uliginosa आज स्ट्राव्हा अजुन तरी नीट चालले होते . आज एक नवीन फायदा लक्षात आला सायकलिंग चा .. चालताना होतो तेव्हढाही आवाज होत नाही त्यामुळे पक्षी ही छान निरखता येतात .. त्याना आपला सुगावा लागे पर्यंत आपण त्याना पाहीलेले असते .. भारद्वाज, कोतवाल , बुलबुल, शिंजीर, दिसले होते अत्तापर्यंत .. म्युझीक प्लेअर ही मंद आवाजात सुरु केला आता .. एक (मला )अनोळखी पक्षांची जोडी माझा सुगावा लागताच थोडा निषेधाचा सुर काढत उडाली .. आणि त्याच वेळा " क्यू शिकन डालते हो माथेपर , भूल कर आ गये हम जाते है " असे शब्द मेहदीच्या खर्जातल्या आवाजात कानावर पडले ...किती सार्थ होते हे शब्द . जणू माझ्या मनातलेच विचार बोलत होता .. पण ते ऐकायला न थांबता पक्षी केव्हाच दुर निघून गेले होते .. भाताच्या उडव्या , लाकडाचे भारे ,कोंबड्या , खळी असं सर्व दिसू लागले . बोराडपाडा हे गाव आले होते . एका नुकत्याच उघडलेल्या छोट्याशा हॉटेल समोर थांबलो .. चहा आहे का विचारले .. होतोय तयार दोन मिनीटात ..थांबा .. थांबलो . दोन चहा घेतले .. चहा व पाणी रस्त्यावर न ओतता , पहीला चहा आम्हाला मिळाला .. मला भेटलेला रस्त्यावर चहा पाणी न ओतणारा हा पहीलाच चहा वाला होता .. कधीच ओतत नाही का ? असे विचारले . अन्न आहे , अंधश्रद्धेपोटी असं अन्न वाया घालवू नये असं सांगतात सद्गुरू.. अस छान उत्तर मिळाले .. मनातल्यामनात हात जोडले .. रस्ता माहीत होताच तरी थोडी जुजबी चौकशी करुन , येताना परत येउ अस सांगुन निघालो . थोड्याच वेळात एक तिठा आला .. थांबलो , डावीकडे वळा असा इशारा होताच सुसाट निघालो , रस्ता होताच तसा , भरपूर रुंद , काळा कुळकूळीत व छान उतार असलेला .. रहदारी नाहीच .. उतार संपला .. डाव्याबाजुला एक भला थोरला पिंपळ व त्यावर भली मोठी मधाची पोळी , चांगली १५/२० तरी असावित .. मनातल्यामनात मोजत पुढे जातोय तो गाव आले .. कूठे फलक दिसेना म्हणून विचारले म्हसा किती लांब इथून ? ह्योच म्हसा ... आता बाजार भरेल आठवड्याचा इथे .. नंदिनी ही आलीच मागोमाग.. मग समोरच दिसणाऱ्या गुरुप्रसाद कडे मोर्चा वळवला .. छान स्वच्छ हॉटेल होते .. गरम काय अस विचारताच डोसा, उत्तपा, इडली अशा मुळमुळीत पदार्थांची नावे आधी घेत मग बटाटा भजी वडा उसळ इथपर्यंत येउन गडी थांबलाच .. मिसळ आहे का असे शेवटी विचारलन नंदीनी ने तेव्हा हो आहे असे म्हणाला एकदाचा .. मग जरा करुया गन्मत म्हणत त्याला सुनावले . समोरच्या टेबलावर एक छोटा ट्रेकर्स गृप होता , तीकडे बोट दाखवले व सांगीतले असे ट्रेकर्स , सायकल वाले , मोटर बाइक वाले आले कि आधी मिसळ ,रस्सावडा, भजी, मिरची भजी ही नावं सांगुन मग डोसे घालायचे कळलं... हो हो आणतो भजी व मिसळ असे सांगत पळाला गडी ... बटाटा भजी छान गरम व एका आकाराची होती .. पाठोपाठ मिसळ ही आली .. भूक तर छानच लागली होती, मगाचच्या लेक्चर चा परिणाम झाला असावा , रस्सा आणू का असे आपणहुन विचारलन .. नको कोण म्हणतो लेकाचा येउ दे कि .. पोटोबा झाल्यावर आता काय करायचे .. जायचे पुढे कि फिरायचे ? मी तर मुळगावं वरुनच परत फिरायचा विचार करत होत्ये .. आज बास ,इती नंदीनी . परत येउ नक्की या रुट ला असं ठरवून परतीच्या प्रवासाला लागलो . अर्थात नंदीनी पक्की ट्रेकर व सायकलिस्ट आहे ,पण सध्या घरी आधी आजी व आता आईची रुग्ण सेवा सुरु आहे , व त्यात कालचा छोटासा अपघात, दिर्घ काळाने केलेली आजची राईड यामूळे मी जास्त आग्रह केला नाही . मगाशी जो भन्नाट उतार मिळाला त्याची सव्याज फेड आता भरल्या पोटी करायची होती. एका वेळी एक पॅडल म्हणत सर्व चढाई पार करुन एका मस्त सावलीत थांबलो .. नंदिनी ही आलीच लगेचच .. मान लिया म्हणत लगेच पूढे निघालो . आता मात्र एसी इफेक्ट संपला होता .. बोराडपाड्याला आलो . चहा घेतला होता तेथेच ताक होते , अमुल चे मस्ती वाले .. "आलात पण "चहावाल्याने आपुलकिने विचारले . नेहमी सारखीच सायकलींची चौकशी व कौतुक सोहळा झाला उपस्थित गावकर्यांकडून. ताक संपताच सटकलो . सकाळी प्रथम जेथे थांबलो त्या जागी पोहोचलो .. ही जागा उंचावर आहे , उजव्या बाजूला बारवी धरणाकडे जाणारा रस्ता आहे, उतार सुरु होण्यापुर्वी समोर पाहीले तो बदलापूर च्या सिमेंट जंगलाचा विस्तार नजरेत भरला .. चला संपली या आठवड्याची निसर्ग भेट .. बारवी धरण रस्ता मुलाकात का वक्त खत्म हुवा .. असं बजावत पॅडल मारले ते थेट बदलापूर शहराच्या सीमेवर थांबलो . पूढे गर्दी असेल त्यामुळे निरोप घेता येणार नाही इथेच निरोप घेउया म्हणून दोघांचा फोटो काढायची विनंती केली एकाला त्याने ती मानली. मग पूढच्या राईड चा बेत करुया . असे म्हणत एक मेकांचे आभार मानत निरोप घेतला . निरोप नंदिनी मूळे आज मला एक छान सायकल रुट माहीत झाला होता . उरलेले ९/१० किमी अंतर पटापट मारत घरी पोहोचलो . छोटी म्हणता म्हणता चांगली ६०/६५ किमी ची राइड झाली होती आज .

वाचने 4128
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

फोटोचा गणेशा झाला आहे. ट्रिप मस्तच !!! (अवांतर : बबन चा वडापाव आहे का अजून अंबरनाथला? खूप पूर्वी खाल्ला होता. )

In reply to by राघवेंद्र

आता हि मिळतो अस ऐकलय . टेस्ट नाही केला, सध्या स्वामी समर्थ चौकात संध्याकाळी, एका गादीवर मात्र छान मिळतो , कधी कधी मका patis हि मस्त मिळतो त्याच गाडीवर , चटणी तर खासच आहे हिरवी गार जबरी तिखट.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

वडापाव आणि मक्याचा चिवडा -चटणी असे कॉम्बिनेशन होते

आपल्या नशिबात सध्या तरी हे सुख नाही कारण सायकल नाही...

कंजूस सर धन्यवाद , फोटो प्रकरण अजून जमत नाही , काल मला दिसत होते. मला वाटलं आता दिसतील सर्वाना.

गणेशा झालाय

मस्तच पण एप्रीलमधे कसा उत्साह राहतो सायकल राइडला ईथे वाचून पण घाम फुटतो.

मस्तच पण एप्रीलमधे कसा उत्साह राहतो सायकल राइडला ईथे वाचून पण घाम फुटतो.