खेल कबड्डी

रुस्तुम's picture
रुस्तुम in जनातलं, मनातलं
25 Oct 2016 - 10:40 pm

नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :)

"जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया,
प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!"

टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी .. कबड्डी हा आपण जगाला दिलेला खेळ पण आपल्या कडेच मागे पडत चालला होता (परदेश सारख्या एखाद्या सिनेमात स्वयंवर म्हणून हिरो हा खेळ खेळला होता . तेवढीच काय ती कबड्डीशी राहिलेली ओळख). प्रोकबड्डी लीगने ह्या खेळाला संजीवनी दिली आणि क्रिकेट इतका नाही तरी कबड्डी बऱ्यापैकी लोकप्रिय झाला.

माझी कबड्डीशी आत्मीयता साधारण शालेय जीवनापासून म्हणजे पाचवी - सहावी पासून आहे ..म्हणजे शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धात कबड्डी आणि खो-खो हे दोन सांघिक खेळ असायचे आणि ह्या खेळाचे विजेतेपद म्हणजे फुकटचा भाव खायला मिळायचा..त्यामुळे दर वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नापास कोण झालेय ह्याकडे आमचे लक्ष असायचे म्हणजे एखादा धटिंगण वगैरे नापास झाला असेल तर त्यास संघात सामील करून विजेतेपदाकडे डोळे लागायचे आणि असे दोघे तिघे एकदम गचकले तर बास, आमची गाडी हवेतूनच चालायची..मी कबड्डीच्या संघात नव्हतो कारण शाळेत असताना मी अगदी पाप्याचे पितर होतो (पाप्याचे पितर कबड्डीत का चालत नाहीत हे थायलंडचे इंडिया-इराण ह्यांच्या बरोबरचे सामने पाहून कळले असेलच) पण चीअर लीडर म्हणून आपली खास ओळख होती.खास आमंत्रण असायचे तेव्हा अशा सामन्यांना चीअरउप करण्यासाठी . तेव्हा चाळीत राहायचो आम्ही ...त्या चाळीच्या गच्चीवर बाकीच्या बऱ्याच गेम्स सोबत कबड्डीही चालायची ...लॉबी, हाल्फ लाईन, टच लाईन , बोनस लाईन असे काही नियम असायचे त्या खेळात , फक्त सर्विस आणि पकड एवढंच .पण त्यात ही खूप मजा वाटायची ..मग गच्चीच्या खालच्या मजल्यावरचे लोकं तक्रारी करायला लागले आवाजाच्या वगैरे आणि मग गच्चीवरचे खेळ संपले ..मग जवळच्या मैदानात आम्ही जायला लागलो पण तिथे एकमेव खेळ चालायचा क्रिकेट!!!

शाळा संपली तसं बाकीच्या बऱ्याच गोष्टींसोबत कबड्डीही संपली ...डिप्लोमाला फारसं आठवत नाही की कबड्डी असायची की नाही कारण तेव्हा मी हुशार मुलांच्या संगतीत होतो आणि क्रीडास्पर्धा पाहायला डोंबिवली वरून ठाण्याला येतील ही अशक्यकोटीतली गोष्ट.आणि मी ही एकटा जायचा कंटाळा करायचो.

पुढे डिग्रीला क्रिकेट हाच वार्षिक स्पर्धांमधला marqee इवेंट होता (under-arm आणि over-arm) आणि त्या खालोखाल Volleyball. कबड्डीही असायची पण नावडतीचे पोर , त्यात आमच्या बॅचमध्ये कोणी कब्बडीपटू नसल्याने कोणी ढुंकून ही जायचं नाही कबड्डी सामन्यांना. कारण निकाल माहीत असायचाच.

त्यानंतर तर कबड्डी पार विस्मृतीत गेला. क्वचित पेपरच्या क्रीडा सदरात ओझरता उल्लेख असायचा..पण तो ही दुर्लक्षितच.अचानक कबड्डीने लक्ष वेधून घेतले ते आम्ही ऑफिसचे मित्र पिकनिकला जात असताना .नुकतीच प्रोकबड्डी लीग चालू झालेली .. टोनी दा ढाबा वर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो.टीव्ही वर कबड्डीचा सामना चालू होता ..यू मुंबा विरुद्ध कोणीतरी आणि फार उत्कंटावर्धक सामना झाला तो ..त्यात ज्या पॅशनने ते खेळत होते व पॉईंट घेतल्यावरच त्यांचे सेलेब्रेशन ..वाह ..मजा आली बघताना..त्यानंतर मात्र प्रो कबड्डी लीग मी सतत फॉलो करतोय

प्रो कबड्डी लीग मध्ये एकापेक्षा एक भारतीय खेळाडू आहेतच पण इराण आणि कोरियाचे ही सर्वोत्तम खेळाडू आहेत.अशातच कबड्डी विश्वचषकाची घोषणा झाली आणि फार उत्सुकता वाढली, संघ निवडीपासून ते पुढे draw आणि वेळापत्रक सर्वच बाबतीत. खरी उत्सुकता होती संघ निवडीची .कारण साधारण 100 उत्कृष्ठ खेळाडूंमधून 14 सर्वोत्कृष्ठ खेळाडू निवडायचे ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही भारतीय कबड्डी महासंघाने व्यवस्थित निवड केली होती .नाव ठेवायला जागा नव्हती . जगातल्या 6 खंडातले 12 संघ होते.surgical strike मुळे पाकिस्तानच्या सहभागाबाबत मात्र खात्री नव्हती .शेवटी त्यांना काही स्पर्धेत थारा दिला गेला नाही.त्यांना बाहेर काढल्यावर ते सवयीप्रमाणे बरळलेच "कबड्डी विश्वचषक हा पाकिस्तानशिवाय विश्वचषक असूच शकत नाही". तरी आत्तापर्यंत झालेल्या 2 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते धडक मारू शकले नाहीत की 2014 सालच्या आशियाई गेम्स मध्ये ही ते अंतिम फेरीत पोहोचले नव्हते . आपल्याला खरं आव्हान होतं इराणचे.. 2014 सालच्या अंतिम सामन्यात ही त्यांनी वर्चस्व गाजवले होते ते ही इतपत की तेव्हाच आपला कर्णधार राकेश कुमार सामन्यानंतर म्हणाला देखील की हा सामना इराणनेच जिंकायला हवा होता आणि आता आपल्याला ह्या पुढे खरा धोका असेल इराण कडूनच ! साहजिकच ते 2014 चा वचपा काढायला उतरले होते.आणि draw हे असे होते की इराण आणि आपण अंतिम सामन्यातच भेटलो असतो

स्पर्धेला सुरवात मात्र अनपेक्षित आणि सनसनाटी निकालाने झाली ..कोरियाने आपल्याला हरवले साधारण 36 मिनिट्स आपण आघाडीवर होतो पण शेवटच्या 4 मिनटात कोरियाने बाजी पालटवली.आपण आघाडीवर असताना सामना किल नाही केला .आपण उगाच बचावात्मक पवित्रा घेतला ...आणि पहिल्या सामन्यात कदाचित अंतिम 7 जणांची निवड चुकली असावी .अजय ठाकूर हा रेडर बाहेरच होता किंवा जसवीर सिंग संघात असणे वगैरे .ह्या पराभवानंतर आपला पूर्ण संघ stunned झाला होता .त्यांचे चेहरेच सगळं काही सांगून जात होते .त्या पराभवानंतर मात्र आपला संघ जखमी वाघाप्रमाणे चवताळून उठून अंतिम फेरी पर्यंत प्रत्येक संघाला दयामाया ना दाखवता दे माय धरणी ठाय करून सोडले. तिथे आपण पहिल्या सामन्यात हरल्याने इराण आपल्याला उपांत्य फेरीतच आडवा आला असता .पण त्यांना ही कदाचित आपण उपांत्य फेरीत नको असल्याने ते पोलंड विरुद्धचा सामना हरले असावेत (शक्यता व्यक्त करतोय कारण पुरावे काही नाहीत)

अंतिम सामना मात्र खूपच उत्कंठावर्धक झाला . इराण बदलाच्या आगीत होरपळत होतेच आणि अंतिम सामन्याचे आपल्याला ही दडपण आले असावे.त्या मुळेच पहिल्या सत्रात इराणने आपल्याला लोण देऊन आघाडी ही घेतली ..मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सकारात्मक सुरवात केली.अजय ठाकूर आणि तोमरने एक सो एक चढाया केल्या आणि आपला डिफेन्स ही कडक पकडी करत गुण मिळवायला लागला .सुरजीत , सुरिंदर , संदीप ह्यांनी उत्कृष्ट पकडी केल्या आणि इराण वर दोनदा लोण चढवले आणि अप्रतिम असा comeback करत आपण इराणचे आव्हान 38-29 ने परतवून लावले आणि जीत ली दुनिया!!!

जाता जाता खेळाडूंविषयी थोडेसे :-

अनुप कुमार (कर्णधार)
:- Captain cool ही उपाधी खूप चपखल बसते.गेल्या 4 प्रो कबड्डीच्या seasons मध्ये त्याला एकदा ही desperate झालेले पाहिलेले नाही.game अचूक रीड करतो आणि खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरी करवून घेतो .माझा वैयक्तिकरित्या आवडता खेळाडू
आणि भारतीय कबड्डीचा पोश्टर बॉय!!

सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर (डावा - उजवा कॉर्नर) - भारतीय कॉर्नरचे भवितव्य, ह्यांची जोडी एवढी डेडली आहे की बस्स. एकवेळ डॉन पकडला जाऊ शकेल पण ह्यांच्या पकडीतून सुटणे नामुनकीनआणि दोघांचा ताळमेळ खूपच अप्रतिम. त्यातून नाडाचा ankle hold एवढा प्रभावी की HOLD IT LIKE NADA असेच म्हणावेसे वाटते.चिल्लर हा प्रो कबड्डी लीग मधला सर्वात महागडा खेळाडू अन दोघे ही माझे आवडते!


प्रदीप नरवाल, अजय ठाकूर आणि राहुल चौधरी
- पहिले दोघेही उत्कृष्ट रेडर. प्रदीपने पाटणाला एक हाती विजेतेपद मिळवून दिले ह्या वर्षी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अजय ठाकूर विषयी माझे मत फारसे चांगले नव्हते आणि तो आमच्या arch rivals कडून खेळतो म्हटल्यावर तर शक्यच नाही. पण अंतिम सामन्याचा खरा शिल्पकार तोच! खास करून प्रदीप आणि राहुल चौधरी चालत नसताना पट्ठ्याने खरंच कमाल केली. राहुल चौधरीच खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि प्रो कबड्डीचा सगळ्यात यशस्वी रेडर ही पण मला ओव्हररेटेड वाटतो.

मनजीत चिल्लर, संदीप नरवाल (all- rounders) आणि सुरजीत (डिफेंडर) - संदीपने कॉर्नर म्हणून चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात आपले गुणांचे खाते त्यानेच उघडले होते .डॅश मध्ये ही कडक आहे . मनजीतचा तर खूप दबदबा आहे. Thigh hold आणि block ही त्याची वैशिष्ट्ये.अंतिम सामन्यात दुर्दैवाने तो चालला नाही पण अशा वेळी चालला तो सुरजीत विश्वचषकातील unsung हिरो .अंतिम सामन्यातील त्यांच्या पकडी बघण्यासारख्या होत्या.

दीपक हुडा, जसवीर , परमार , चेरलाथन आणि तोमर - पहिले दोघे रेडर, दुसरे दोघे डिफेंडर तर तोमर all -rounder , ह्यातल्या तोमरला बदली खेळाडू म्हणून स्पर्धेत यशस्वीरित्या खेळवले आणि त्यानेही प्रत्येक संधीचे सोने केले.अंतिम सामन्यात ही त्याने मोक्याच्या क्षणी चढायांवर गुण मिळवून दिले. हुडा हा एक चांगला खेळाडू आहे आणि चेरलाथन ही. परमार का संघात होता माहित नाही आणि जसवीर कदाचित पूर्व पुण्याईवर!

आणि

भारतीय प्रशिक्षक बलवान सिंग
- खूप नावाजलेले खेळाडू आणि प्रशिक्षक . अनुभवी तसेच उत्साही. त्यांच्या देहबोलीवरूनच जाणवत होते की हा विश्वचषक त्यांना 'उरी' तील शहिदांसाठी जिंकायचा आहे आणि तसे ते वागले आणि करून ही दाखवले.

कबड्डी ह्या आपल्या खेळात आपला दबदबा कायम राखत विश्वविजेतेपद कायम राखल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!

proud 2 say

"जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!"

क्रीडाविचार

प्रतिक्रिया

फारच छान. अंतिम सामना मध्यंतरानंतर निराशेने पाहायचा टाळले होते. पण थोड्या वेळाने पुन्हा टीव्हीसमोर बसलो. भारत जिंकल्याचा फार आनंद झाला. जियो!