काश्मिरबद्दल अरूंधती रॉय : अनर्गल?

विसुनाना's picture
विसुनाना in काथ्याकूट
20 Aug 2008 - 12:46 pm
गाभा: 

बुकर पारितोषक विजेत्या लेखिका आणि मानवी हक्क संरक्षण चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती अरुंधती रॉय यांनी दिलेल्या एका मुलाखतीत "काश्मिरी लोकांना भारतापासून स्वातंत्र्य हवे असून भारतालाही काश्मिरपासून स्वातंत्र्य हवे आहे" असे विधान केले.

भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत काश्मिरात स्वातंत्र्याचा धोशा लावला जातोय.परशूराम, शारदापीठ, सिंधू नदी, काश्मिरचे मुस्लिमकरण, श्रीनगर, भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणी, टोळीवाल्यांबरोबरचे युद्ध, महाराजा हरीसिंग यांची शरणागती, काश्मिरची फाळणी आणि विलिनीकरण, प्रत्यक्ष ताबा रेषा, युनोतील ठराव, घटनेतील ३७०वे कलम, पाकिस्तानबरोबरची युद्धे, दहशतवादी हल्ले, हजरतबाल प्रकरण, काश्मिरी पंडितांचे शिरकाण आणि पलायन, भारतातील दहशतवादी हल्ले, कारगिल युद्ध, अमरनाथ यात्रा समिती भूभाग प्रकरण, जम्मू आणि काश्मिरमधील परस्परविरोधी उग्र निदर्शने, हुर्रियत नेते गिलानी यांचे पाकिस्तानात विलिन होण्याचे वक्तव्य या भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर अरुंधती रॉय यांचे हे वक्तव्य झालेले आहे.

काश्मिरातील परिस्थिती इतकी नाजूक आहे की गेल्या अनेक वर्षांचे प्रयत्न फोल ठरण्याची साधार भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत स्वतःला बुद्धीवादी म्हणवणार्‍या लोकांकडून असे वक्तव्य होणे हे समजण्यापलिकडचे आहे.अरुंधती रॉय यांचा मानसिक तोल गेल्याने त्यांनी असे वक्तव्य केलेले असावे असे वाटत नाही. असे वक्तव्य केल्याने आपण भारताचा नोएम चॉम्स्की होऊ असे कदाचित त्यांना वाटत असावे.

मिपाकर हे संवेदनाशील असून ते नव्या आणि जुन्या विचारांचे, तरूण आणि म्हातार्‍या वयाचे, हसर्‍या आणि गंभीर चेहर्‍यांचे, हलक्याफुलक्या आणि सखोल मनाचे प्रतिनिधीच आहेत.या निमित्ताने समस्त मिपाकरांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्यावे असे मनात आले.

१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?
२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?
३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?

या निमित्ताने यापेक्षा अन्य काही विचार समोर आले तर त्यांचे स्वागतच आहे.

प्रतिक्रिया

II राजे II's picture

20 Aug 2008 - 12:49 pm | II राजे II (not verified)

>>>रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?

मेंदुवर परिणाम झाला आहे तीच्या....... !

वाचल्यावर / टिव्हीवर पाहील्यावर प्रथम विश्वासच वाटला नाही की त्या अश्या म्हणाल्या...

ज्या ताटात खाले त्याच ताटात ... छे !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

वैद्य's picture

20 Aug 2008 - 12:56 pm | वैद्य (not verified)

सर्वप्रथम, जम्मू काश्मिर ह्या राज्याचे तीन भाग करावेत. जम्मू, कश्मीर, आणि लडाख. मग प्रत्येक राज्यात कुणाला कुठे जायचे आहे ते विचारावे.

किंवा पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकांना भारताचे नागरीकत्व द्यावे, आणि खर्‍या अर्थाने काश्मिर भारतात समाविष्ट करावे.

पण त्या आधी, ३७० रद्द करावे, आणि बिहारमध्ये राहणार्‍या सर्वांना तिकडे जाण्याचा आग्रह करावा.

अरुंधती रॉय ह्यांचा "इन व्हिच ऍनी गिव्ह्ज इट दोज वन्स" हा सिनेमा पाहिल्यानंतर, त्यांचे आजकालचे कुठलेच विधान राष्ट्रद्रोही वाटत नाही.

-- वैद्य

ऋषिकेश's picture

20 Aug 2008 - 11:24 pm | ऋषिकेश

सर्वप्रथम, जम्मू काश्मिर ह्या राज्याचे तीन भाग करावेत. जम्मू, कश्मीर, आणि लडाख. मग प्रत्येक राज्यात कुणाला कुठे जायचे आहे ते विचारावे.
किंवा पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकांना भारताचे नागरीकत्व द्यावे, आणि खर्‍या अर्थाने काश्मिर भारतात समाविष्ट करावे.

+१

३७० रद्द करावे


++++१

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चिन्या१९८५'s picture

21 Aug 2008 - 4:20 am | चिन्या१९८५

जम्मू, कश्मीर, आणि लडाख. मग प्रत्येक राज्यात कुणाला कुठे जायचे आहे ते विचारा

माझ्यामते असे करु नये. व काश्मिरी लोकांना स्वातंत्र्य अथवा पाकीस्तानात विलीनीकरण कुठल्याही परिस्थितीत करु देउ नये. हे आपल्या देशाचे बाल्कनीकरण रोखण्यासाठी आवश्यक आहे. आता समजा काश्मिरच्या जनतेला भारतात रहायच नाही म्हणुन त्यांना स्वातंत्र्य दिल तर,आता शांत असलेला पंजाबही खलिस्तानची मागणि करेल्.शेवटी तिथे दहशतवाद्यांविरुध्दचे युध्द फक्त शस्त्रांच्या बळावर जिंकलेले आहे. तिथे अजुनही खलिस्तानवाद भडकु शकतो.भिंद्रनवालेला उघडपणे एकही पंजाबी नेता विरोध करु शकत नाही.काश्मिरनंतर पंजाबही जाईल आणि त्यानंतर आधीच फुटीरवादाची लढाई लढणार्‍या मणीपुर्,आसाम व इतर नॉर्थ्-ईस्ट राज्यांनाही स्वातंत्र्य द्यावे लागेल्.अशा पध्दतीने देशाचे भाग पडल्यावर मग मागास राज्ये स्वातंत्र्याची मागणी करतील कारण ते म्हणतील की आम्हाला भारत देशाने मागास ठेवले आणि मग प्रगत राज्येही म्हणतील की आम्ही इतका पैसा दिल्लीला देतो आणि आम्हाला वापस काहीच मिळत नाही वगैरे.यात सध्याचा भाषिक प्रांतवाद कधी फुटीरवादाचे रुप घेईल हेही कळणार नाही. त्यामुळे काश्मिरला स्वातंत्र्य अथवा पाकिस्तानला देणे म्हणजे आत्महत्या ठरेल्.त्यांच्या स्वातंत्र्याचा आपल्यावर लगेच काही परीणाम झाला नाही तरी काही दशकांमधे नक्कीच होईल्.दुसर म्हणजे काश्मिरमधल्या मानवाधिकारांचा हननास तेही बर्‍याच अर्थानी जबाबदार आहेत्.तेथील मानवाधिकारांचे हनन सशस्त्र सेना दलांमुळे होते असे त्यांचे म्हणने आहे. पण सेनादल काश्मिरमधे ठेवावी लागतात कारण याच काश्मिरी मुस्लिमांनी तिथे दहशतवाद आणला आहे.त्यांनी दहशतवादाला नाकारल की सेनादलांची तिथे फारश गरज रहाणार नाही.

अरुंधती राय वगैरे मंडळी याचा विचार बहुतेक करत नाहीत्.त्यांना वाटते की काश्मिरींवर अत्याचार होतात ना मग द्या त्यांना स्वातंत्र्य्. नक्षलवाद्यांविरुध्द सरकारनी कारवाई करु नये असेही त्यांचे म्हणने आहे.थोडक्यात म्हणजे सरकारने कुणावरही कठोरपणे कारवाई करु नये.पण जर सरकारचे महत्व कमी केले तर या देशाची शकले पडतील आणि मग ती आपापसात युध्द करुन कित्येक करोडो लोक मरु शकतील याचा हे लोक विचार करत नाहीत. शिवाय समाजवादी टाईपचा एक वर्ग आहे तो अरुंधती राय वगैरे लोकांना डोक्यावर घेतो.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नीलकांत's picture

20 Aug 2008 - 1:05 pm | नीलकांत

१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?

- हे त्यांचं व्यक्तीगत मत आहे असं माझं मत आहे. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात शिर्षस्थानावर पोहोचला म्हणजे त्याची सर्वच क्षेत्रातील मते बरोबरच असतील असं मला वाटत नाही. मी या वक्तव्याला विशेष महत्व देत नाही. माझ्या देशातील कुणी असं म्हणतंय याबद्दल मला खेद वाटतोय.

२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?
- सदर व्यक्ती देशद्रोही वगैरे वाटत नाही. ते त्यांचं मत आहे. संवैधानिक मार्गाने त्या मांडताहेत.

३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
- काश्मिर हा स्वतंत्र भारताचा भाग आहे. त्याच्या या दर्जाबाबत शंकाच नाही. तेथील परिस्थिती बदलण्यास काही करता येईल का ते बघायला हवे.

४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
- ते भारतात नाही राहीले तर देश म्हणून ताबडतोब फरक पडेल आणि हळूहळू तो झिरपून मला व्यक्तीगत पातळीपर्यंत जाणवेल. याचे अनेक आयाम असतील. सामरीक घ्या अथवा एका गटाचे पुन्हा तुष्टीकरण केले म्हणून म्हणा. याचा परिणाम हा पडेलच. धार्मीक अनुशंगाने पडेलच.

५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
- बोटचेपे धोरण सोडावे. कलम ३७० रद्द करावे. काश्मिरात आर्थि़क सुधारणा घडवून आणाव्यात. जमल्यास सर्वात आधी आमचे वर्तमान केंद्रीय गृहमंत्री बदलावे. :)

६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
असा कुठलाच भाग नाही. अश्या कल्पनेचा सुध्दा निषेध !

७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
- भारत स्वतंत्र झाल्यावर जेव्हा सर्व संस्थाने यात विलीन करण्यात आली तेव्हा भारताला राज्यांचा संघ असे संबोधण्यात आले आहे. या लोकशाही गणतंत्रात सहभागी झालेल्या राज्यांना सहभागी झाल्यानंतर विलग होण्याचा अधिकार असणार नाही अशी तरतुद होती. त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे. जखम झाल्यास ती चिघळण्याआधी तिच्यावर इलाज करावा.अशी आमची जनता म्हणून मागणी आहे.
८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?
-- मुळीच नाही. उलट ३७० रद्द करून तेथे अन्य भारतातील जनतेला नागरीकतेचे हक्क द्या. एका दशकात काश्मिर सुध्दा वन्दे मातरम म्हणायला लागेल. हुर्यीयत कॉन्फरन्सवाले एकतर पाकीस्तानचे मुजाहिर बनतील किंवा देश सोडून जातील.

काश्मिर प्रकरणी थोडा कणखरपणा दाखवायची वेळ आलेली आहे असं माझं मत आहे.त्या प्रदेशाला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा तात्काळ प्रभावाने प्रयत्न केला गेला पाहिजे.

नीलकांत

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 1:18 pm | आनंदयात्री

बहुतांश सहमत !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2008 - 4:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि जमल्यास सर्वात आधी आमचे वर्तमान केंद्रीय गृहमंत्री बदलावे या विधानाशी २००% सहमत!

प्राजु's picture

20 Aug 2008 - 6:09 pm | प्राजु

निलकांत,
सडेतोड प्रतिसाद आवडला.
१००% मान्य आहेत तुझी मते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

20 Aug 2008 - 1:12 pm | अनिल हटेला

काश्मिर प्रकरणी थोडा कणखरपणा दाखवायची वेळ आलेली आहे असं माझं मत आहे.त्या प्रदेशाला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा तात्काळ प्रभावाने प्रयत्न केला गेला पाहिजे

नीलकांत शी पूर्णपणे सहमत !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 1:22 pm | यशोधरा

नीलकांत यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

अवलिया's picture

20 Aug 2008 - 7:18 pm | अवलिया

१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?

एकदोन पुस्तके लिहुन वांझ झालेल्या लेखकांबद्दल काहि विशेष आपुलकी नाही की त्यांच्या मतांची आपण किंमत केली पाहीजे हेही नाही
लेखकांनी (नवयुगीन) असे कोणतेही कार्य केले नाही की त्यांच्यामुळे जनमानसावर त्यांच्या विचारांचा काही परीणाम होवु शकेल.
अत्रे किंवा सावरकर किंवा गांधी किंवा नेहरु काय म्हणतात, लिहितात या वर लोक आपले मत बनवत. अरुंधती रोय हे नाव भारतातील किती हजार लोकांना माहित असेल ही औत्सुक्याची बाब राहु शकते.

२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?

रस्त्यात वेडा बरळत चालतो
काही पण अंगविक्षेप करतो
कित्येक गोष्टी अशा करतो ज्या तुम्ही आम्हि केल्या तर खटला दाखल होवु शकतो
आजपर्यत कुणीही वेड्यावर खटला दाखल केल्याचे ऐकिवात नाही
जास्त झाले तर पळ रे म्हणुन हाकलुन दिले जाते

३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?

काश्मिरि लोकांना स्थैर्य मिळुन ते सुखाने जगावे
दहशतवाद समाप्त होवुन शांतता यावी
शांतता भारतातच मिळेल किंवा पाकिस्तानातच मिळेल असे नाही
योग्य तोडगा निघावा

४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?

मी एक कट्टर हिंदु आहे. मला हे नाव सिंधु नदीवरुन पडले. ती सिंधु अंतरली तरी माझ्या आयुष्यात फरक पडला नाही. मी आज ही हिंदुच आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काश्मिर नसले तर फरक पडणार नाही पण काश्मीर संभाळू न शकणे हा भारताचा राजकीय पराभव असेल असे मी मानतो

५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
फार कठोर उपाय आहे पण भारताच्या आजच्या राज्यकर्त्यांकडे ना तेवढी दुरदृष्टी ना तेवढी कुवत

६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?

स्वातंत्र्य देण्यालायक - एकपण नाही

७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?

कशाला ‍?
आधीच समस्या का कमी आहेत त्या अजुन वाढवायच्या?

८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?

नाही नाही नाही

(मागच्या चर्चेवरुन पुणे मान्य :O )

(काश्मिरी पंडीत) नाना चेंगट

क्लिंटन's picture

20 Aug 2008 - 7:04 pm | क्लिंटन

>>काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?

नक्कीच नाही. मागे दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावर काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली होती.त्यात मी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांनी एका भाषणात मांडलेल्या मुद्द्याविषयी लिहिले होते. (दिनांक १६ मे २००७) दुसर्‍या संकेतस्थळावरील झालेल्या चर्चेतील मी लिहिलेला भाग परत येथे चिकटवत आहे. अर्थात ते लिखाण माझेच असल्यामुळे मिसळपावावरील कॉपीराईटविषयक नियमांचे उल्लंघन होणार नाही असे वाटते. तसे उल्लंघन होत असल्यास दुसर्‍या संकेतस्थळावरील दुवा देण्यास माझी अजिबात हरकत नाही.

"लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्ये संघराज्यातून गुलामगिरीच्या प्रश्नावरून फुटून निघायच्या बेतात होती. दक्षिणेकडील राज्यांनी रिचमंड येथे राजधानी असलेले ' Confederate' संघराज्य स्थापन केले होते. तरीही लिंकन यांनी यादवी युध्दाचा धोका पत्करून अमेरिकेची एकात्मता टिकवली. जर जनतेची आकांक्षा हा एकच मुद्दा असता तर त्याच न्यायाने लिंकन यांनी जनतेच्या आकांक्षांची पायमल्ली करून देशाची एकात्मता टिकवली. आजच्या काळात दक्षिणेतील फ्लॉरिडा, जॉर्जिया इतकेच काय तर रिचमंड राजधानी असलेल्या व्हर्जिनिया राज्यातील लोक न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन सारख्या उत्तरेतील राज्यातील लोकांप्रमाणेच स्वत:ला 'अमेरिकन' म्हणवतात. ते स्वतःला 'Confederate' म्हणवत नाहीत. त्याचप्रमाणे काश्मीरच्या संदर्भात धर्माच्या नावावर आणि भारताला त्रास द्ययच्या उद्देशाने पाकिस्तान काश्मीरींना भडकविण्याचे काम करत आहे हे उघड आहे.समजा असे आपण धरून चाललो की काश्मीरींना भारतात राहायचे नाही तरीही लिंकनप्रमाणे खंबीर पावले उचलून काश्मीरला भारतातच ठेवावे. भविष्यकाळात पाकिस्तानचा खरा डाव लक्षात येताच काश्मीरी लोक स्वतःला अभिमानाने 'भारतीय' म्हणवतील."

माझा या मुद्द्याला पाठिंबा आहे. काश्मीरी लोकांना भारतात राहायचे नाही असे वरकरणी दिसत आहे म्हणून काश्मीरचे पाकिस्तानात विलीनीकरण अजिबात मान्य करू नये.

>>काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?

नक्कीच पडेल. स्वतःच्या मातृभूमीचे शीर कापल्यानंतर आपल्याला काहीही फरक पडत नाही असे म्हणणारे लोक कपाळकरंटे आहेत असे म्हटले तर काय चुकले?ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमधून हद्दपार केल्यानंतर सुमारे २००० वर्षे ते जगभर निर्वासिताचे जीणे जगत होते.तरीही प्रत्येक शनिवारच्या प्रार्थनेच्या शेवटी 'माझी पुढील शनिवारची प्रार्थना जेरूसलेममध्ये होईल' हे वाक्य असायचे असे वाचनात आले आहे. ज्यू लोकांनी जेरूसलेमचा २००० वर्षे ध्यास धरला तेव्हा त्यांचे इस्त्राएल हे राष्ट्र स्थापन झाले.त्या देशाच्या ध्येयधोरणांविषयी अनेक मतभेद असू शकतात पण सांगायचा मुद्दा म्हणजे असा ध्यास धरला तर एकनाएक दिवस (भले त्याला २००० वर्षे लागोत) पाकव्याप्त काश्मीरच काय तर पाकिस्तान आणि बांगलादेश सुध्दा आपण जिंकून घेऊ शकू. अशी सावरकरगिरी सोडून काश्मीर असले काय आणि नसले काय माझ्यात काय फरक पडतो (मला काय त्याचे?) अशी बेफिकीरी आपण का दाखवतो?

>>रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का?

नक्कीच्.काश्मीर घशात घालून पाकिस्तान गप्प बसेल अशा भ्रमात अजिबात राहू नये. हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान
असे ध्येय असलेले आपले शेजारी राष्ट्र काश्मीर मिळाल्यावर जांभया देत शांत बसेल असे नक्कीच समजू नको या. उलट काश्मीर ताब्यात आल्यावर चेकाळलेले पाकिस्तानी भारतात अधिकाधिक दहशतवादी कारवाया करतील. तेव्हा हे वक्तव्य नक्कीच अश्लाघ्य आहे असे मला वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

विकास's picture

20 Aug 2008 - 7:55 pm | विकास

सर्व प्रथम सर्व प्रथम सर्वच प्रतिसाद आवडले. विशेष करून नीलकांत, नाना चेंगट आणि क्लिंटन यांचे. येथील सर्वजण काश्मीरच्या आणि म्हणून पर्यायाने भारताच्या बाबतीत बर्‍यापैकी समविचारी आहेत हे पाहून "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यावीना राष्ट्रगाडा न चाले" असे का म्हणतात ते समजले.

असो. अरूंधती रॉय प्रमाणेच आज आलेल्या माहीती प्रमाणे अंगना चॅटर्जी, Associate Professor, Department of Social and Cultural Anthropology, California Institute of Integral Studies, ह्या सूडोसेक्यूलर्सच्या डार्लिंगने युएन च्या ह्युमन राईट्सच्या जस्टीसेस कडेच धाव घेतली आहे. त्यांचे संपूर्ण पत्र येथे वाचता येईल. पण काही ठळक गोषवारा तसाच्या तसा इंग्रजीत देतो. त्यातील मराठीतील "कॉमेंट्स" माझ्या आहेत:

आत्ताच्या प्रसंगाची सुरवात कशी झाली ते न सांगता...The situation in Jammu, where the Muslim minority is facing violence on a scale that can be described as ethnic cleansing, is alarming...The Government of India and the military and paramilitary forces have shown themselves unable and/or unwilling to take any effective action, either to end the blockade or to stop the violence against Muslims in Jammu. Meanwhile, military and paramilitary forces have opened fire on counter-demonstrators in Kashmir, using live bullets and mortar. A communiqu (कोण ते सांगत नाही) from the Kashmir Valley states that:
"...The target is only the Kashmiri Muslims and some sources ("some" म्हणजे कोण?) from Jammu say that it is the outsiders who have come to Jammu and are doing such attacks on the Muslims and it is quite evident that the Hindu fundamentalist groups viz. BJP, RSS VHP, etc., are all sponsoring the planned attacks onto the Kashmiris like it was done in Gujarat (ह्याचा इथे काय संबंध? मूळ कारण काश्मिर सरकार ज्यांनी निर्णय घेतले आणि बदलले . नंतर केंद्र सरकार जे काहीच करत नाही आहे - दोन्हीत भाजप नाही. हे त्यांची बाजू घेण्यासाठी नाही पण दिशाभूल कशी केली जाते हे दाखवण्यासाठी. गुजरातचा काय संबंध? मग काश्मिरी पंडीतांबद्दल काही बोलणे का नाही?) Here in Kashmir we feel the history seems to be being repeated by the Hindu fundamentalists who had earlier in 1947 killed about 250,000 Muslims in Jammu."
...

...About 95-97 percent of the population of the Valley is Muslim, while Muslims are a minority in India. This has made Kashmir the target of increasingly aggressive campaigns by Hindu nationalist groups since 1947, (ब्रिटीश स्वातंत्र्य कायद्याप्रमाणे संस्थानिकाचा हक्क होता की त्याचे संस्थान कुठे विलीन करायचे अथवा नाही त्याचा. कश्मिर त्या कायद्या अंतर्गत अधुनिक भारतात विलीन झाले. त्यामुळे काश्मिरवर सैन्य पाकीस्तानने आणले. ) despite guarantees of autonomy written into the Indian Constitution. The Government of India has failed to take measures to prevent these campaigns, consisting of marches and demonstrations, and culminating in the current blockade. Since 1989 there has been an armed pro-independence struggle in Kashmir, together with other ("other" म्हणजे कुठल्या?) and non-violent movements for self-determination....यात काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काहीच नाही?

तर असे हे आपले बुद्धीवादी की बुद्धीभेदी? यात कृपया कुठेही हा प्रश्न कोणीच हिंदू-मुसलमान म्हणून पाहू नये. मी स्वतःला हिंदूत्ववादी समजतो म्हणूनच "सर्वधर्मसमभाव" मानणारा या अर्थाने "सेक्यूलर" पण समजतो आणि हा प्रश्न फक्त एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून सोडवला जावा,त्यात जो काही दहशतवाद आहे तो दहशतवाद म्हणून ठेचला जावा असे वाटते. जर बाहेरील शत्रू कुरघोडी करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देणे पण गरजेचे समजावे असे वाटते.

पण मग हे स्वतःला सेक्यूलर्स समजणारे बुद्धीवादी सातत्याने प्रत्येक गोष्ट ही हिंदू-मुसलमान या चष्म्यातून का पहातात? तुम्हाला तसे योग्य वाटते का?

आता राहता राहीला या चर्चेच्या सुरवातीस विचारलेला एक प्रश्न: काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?

त्याचे उत्तर देताना मला आईनस्टाईनचे एक वाक्य आठवते: The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it. काय म्हणता?

चिन्या१९८५'s picture

21 Aug 2008 - 4:01 am | चिन्या१९८५

वरील पत्र अतिशय चुकीच आहे.अशी खोटारडी विधाने करणारे हिंदु आहेत हेच या देशाच दुर्दैव आहे

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

लिखाळ's picture

21 Aug 2008 - 2:59 pm | लिखाळ

भारतीयांच्या या अश्या स्वत्वहीन वृत्तीमुळेच बहुधा निरनिराळ्या आक्रमकांनी इथे यथेच्छ राज्य केले.

पण मग हे स्वतःला सेक्यूलर्स समजणारे बुद्धीवादी सातत्याने प्रत्येक गोष्ट ही हिंदू-मुसलमान या चष्म्यातून का पहातात? तुम्हाला तसे योग्य वाटते का?
नक्की भारतीयत्व काय आहे याचबाबतीत आपल्याकडे बुद्धीभेद करुन कारभार चालतो..त्यामुळे त्याची ही अशी फळे भोगायलाच लागतात.

त्याचे उत्तर देताना मला आईनस्टाईनचे एक वाक्य आठवते: The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it. काय म्हणता?
हे अगदी पटले. जे के रोलींग यांचे हार्वड येथील भाषण मला पुन्हा आठवला. त्या सुद्धा असेच म्हणतात, स्वतः जरी सरळ सरळ दुष्कृत्य केले नाही तरी त्याबद्दलच्या आपल्या निर्मम स्थितप्रज्ञतेतून आपण तशी कृत्य करणाऱ्यांचे साथीदार बनत असतो.

अरंधती रॉय यांचे विधान निंदनीय आहे. अश्या गोष्टींकडे समाजाने, राज्यकर्त्यांनी गंभीरपणे पहाणे आवश्यक आहे. त्या लेखिका म्हणून कीती मोठ्या आहेत हा मुद्दा येथे कमी महत्वाचा आहे तर त्या एक प्रसिद्ध नागरीक आहेत आणि त्यांनी अशी विधाने करणे हिताचे नाही हेच खरे.
--लिखाळ.

भास्कर केन्डे's picture

22 Aug 2008 - 12:31 am | भास्कर केन्डे

पूर्वीच्या काळी एकमेकांना शह देण्यासाठी राजे विषकन्यांचा वापर करत. त्यासाठी त्या विषकन्यांना बालपणापासूनच थोडे-थोडे करुन विष पाजून विषारी बनवत व बर्‍याच वर्षांच्या प्रयत्नांनी या विषकन्यांचा वापर करून प्रतिस्परर्धी राजांचा काटा काढत.

रॉय काय किंवा अंगना चॅटर्जी काय (दुर्दैवाने अशी शेकडो/हजारो नावे देता येतील) या सगळ्या विषकन्या व त्यांचा गोतवाळा हे भारताच्या सार्वभौमत्वाचा काटा काढायला निघालेल्या तथाकथित सेक्यूलर तसेच साम्यवादी देशद्रोह्यांनी बौद्धिक स्लो-पॉयझनिंग तयार केलेल्या बुद्धिभेदाचे परिणाम आहेत.

अरुंधतींना लगेचच जागतिक स्तरावर कोणी फारसे गांभिर्याने घेईल असे नाही. परंतू थेट युएनला पत्र म्हणजे जरा अतिच झाले! या प्रकारांचा भारतविरोधी लोक चपलख वापर करून घेत जगात भारतविरोधी मत तयार करतात. व अगोदरच खूप कमी मित्र असलेल्या आपल्या देशाला एकटे पाडायला मदत करतात. अर्थात या चर्चेत उहापोह झालेले बाकीचे तोटे तर आहेतच.

आपला,
(उदविग्न) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मुशाफिर's picture

20 Aug 2008 - 10:35 pm | मुशाफिर

१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?

ह्या वक्तव्यावर चर्चा करणे म्हणजे उगीचच त्याला महत्व देणे. अरूंधती रॉयसारख्यांच्या वक्तव्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात फार मोठी किंमत नाही, हे त्या स्वतःही जाणून असतीलच. उगीचच काहीतरी वादग्रस्त बोलून स्वतःचे (नसलेले) महत्व वाढवून घ्यायचा हा प्रयत्न दिसतो.

२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?

'भाषण स्वातंत्र्य' हे देशाच्या आणि सार्वजनिक हिताआड येत नसेल तोपर्यंत(च) ठिक आहेत असे घटनेतच म्हटले आहे. हे विचार राष्ट्रद्रोहि आहेत का हे न्यायसंस्थाच निश्चित करू शकेल.

३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?

आजिबात नाही!

४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?

होय. मी एका षंढ देशात आणि समाजात जन्माला आलो ह्याचं आयुष्यभर दुखः वाटेल!

५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?

होय. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन आणि काश्मिरी मुस्लिमांना मुख्य भारतीय भूभागाशी जोडण्यासाठी विविध उपाय. उदा. तिथे गुंतवणूक करणार्‍या खाजगी उद्योगांना विशेष सोयी आणि सवलती. केवळ सरकारी अनुदान देवुन काही उपयोग नाही. ते काश्मिरी जनतेपर्यंत कधीच पोहोचत नाही. तसेच, इतर भारतातील नागरिकांना काश्मिरमध्ये स्थलांतर करण्यास परवानगी आणि त्यांना/ त्यांच्या कुटूंबियांना सुरक्षित भविष्याची हमी (अतिरेक्यांनाही त्यांच्या संघटना त्यांच्या कुटूंबियांच्या भविष्याची हमी देतात आणि ती ते पाळतात असे अविनाश धर्माधिकारी याच्यां व्याख्यानात ऐकले आहे, मग आपण ते का करू शकत नाही?)

६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?

कोणताही नाही. भारत एकसंध राहिला पाहिजे. आज एक भाग वेगळा झाला, तर उद्या शंभर भाग वेगळे व्हायला वेळ लागणार नाही.

७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?

नाही.

८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?

अजिबात नाही.

मनीषा's picture

21 Aug 2008 - 12:03 am | मनीषा

हा विषय अतिशय संवेदनाशील झाला आहे... त्यावर इतकं रक्त सांडलं गेलं आहे कि काही वेळा असे वाटणे सहाजिक आहे कि कसही करुन हा प्रश्न संपवावा. एखादा हात किंवा पाय शस्त्रक्रिया करुन कापवा लागेल असे कळल्यावर त्या रुग्णाला काय वाटत असेल? पण तरीही तो निर्णय घ्यावाच लागतो कारण त्या मुळे जीव तर वाचणार असतो. अर्थात याचा अर्थ असा नाही काश्मिर भारता पासून वेगळे करावे... पण प्रश्न सोडवण्यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यात हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे असे मला वाटते.

. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?
अनर्गल नाही वाटत.. पण फारसे महत्व देउ नये असे वाटते. रॉय या एक संवेदनाशील लेखिका आहेत्...या विधानामागे त्यांची स्वतःची काही भूमिका असणारच ती समजून घ्यावी
२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?
नाही .. कारण रॉय या देशद्रोही नाहीत याची पूर्ण खात्री आहे...
३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
नाही
४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
नाही फरक पडणार नाही पण ती एक बोच कायम जाणवेल.. जसं पाकिस्तान निर्मितीची कारणे वाचताना सारखे वाटत कि काही गोष्टी टाळल्या असत्या आणि काही केल्या असत्या तर आज पाकिस्तानच नसते... त्या मुळे काश्मिर प्रश्न ही नसता..
५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
नाही --उपाययोजना -असण्यासाठी बराच आभ्यास करणे जरुरी आहे, पण आज पर्यन्त जे वाचले आणि ऐकले आहे त्या वरुन वाटते कि काश्मिर बद्दल निर्णय घेताना "व्होट बॅक " चा विचार कोणत्याच पक्षाने करु नये ... आणि सेनादलाला जरुर तेव्हढे निर्णय स्वातंत्र्य घेउ द्यावे.
६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
कुठालाच नाही उलट चीन ने आणि पाक ने जो आपला भाग घेतला आहे तो परत जिंकून घ्यावा
७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
नाही आता तो प्रश्नच उद्भवत नाही १९४७ मधे ते केले होतेच कि आणि नंतरच भारत स्वतंत्र गणराज्य झाला होता.
८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?
नाही

इतक्या गहन प्रश्नावर/विषयावर लिहिण्याचे धाडस केले आहे ... कारण एक भारतीय म्हणून मला तो तितकाच 'माझा " वाटतो..

बबलु's picture

21 Aug 2008 - 3:10 am | बबलु

आजकाल अरुंधती रॉयचं मानसिक संतुलन फारच बिघडलेलं दिसतंय.
तिच्या मताला फारसं महत्व देण्याचं काही कारण नाही.

....बबलु-अमेरिकन

स्वप्निल..'s picture

21 Aug 2008 - 3:20 am | स्वप्निल..

१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?
>>नक्कीच. आपले सरकार काहीच करत नाही त्याचाच हा परीणाम. असे वक्तव्य करणारयावर कडक कारवाई झाली पाहीजे. मग ती रॉय असो कींवा तो हुरियत चा नेता असो कींवा ते पाकीस्तानी ध्वज फडकवणारे असो. ते देशद्रोहीच. या सर्वांना अटक करुन लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहीजे हे माझे मत आहे.

२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?
>>हो. देशद्रोहीच.

३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
>>कदापी नाही. तो भारताचाच एक भाग आहे आणि राहणार.

४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
>>नक्कीच पडेन. आज काश्मिरचा प्रश्न आहे.उद्या अजुन दुसरया राज्यांचा प्रश्न तयार होइल. पाकीस्तान थांबणार तर नाहीच अजुन कारवाया वाढवेन. त्याचा फरक आज नाही तर उद्या नक्कीच जाणवेल.

५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
>> मनीषा च्या उत्तराशी पुर्णपणे सहमत.

६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
>>कोणताच नाही. असा विचार करणारा भारतात राहण्याच्या लायकीचा नाही असेच मी म्हणेन.

७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
>>नाही. मग भारताचे अस्तित्वच राहणार नाही.

८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?
>>नाही.

स्वप्निल..

हर्षद आनंदी's picture

21 Aug 2008 - 8:33 am | हर्षद आनंदी

काश्मिर हा भारताचा अविभाज्य असा घटक आहे. तो भारतापासून तोडण्याचा प्रयन्तसुध्दा सुद्यांनी करु नये.
अन्यथा जगातील ३ र्‍या क्रमांकाचे सैन्य भारत पदरी बाळ्गून आहे, याची नोंद घ्यावी

|| दुध मांगा खीर देंगे, काश्मिर मांगा चिर देंगे ||
हे फक्त काश्मिर नाही, अगदी बिहारला सुध्दा लागु होते.

अरुधंती रॉय, यांच्या [मिपाची सभ्यता सांभाळायची म्हणून यांच्या, ३ पीढ्यांचा उउध्दार कट्ट्यावर कालच केलाय] वक्तव्याची दखल सुध्दा घेतली जाऊ नये, असे मला वाटते.
या बाबतीत नानांशी सहमत !!

असा मधुन मधुन पाकीस्तान वा मुसलमानांचा पूळका येणारी लोकं भारतात कमी नाहीत. अश्या लोकांना सर्व नितीमत्ता, लोकशाही, मानवता गुंडाळुन ठेवुन, हिंदु समाजाने चांगलाच धडा शिकवला पाहीजे. अगदी वाळीत टाकले तरी चालेल.

काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?

असे पश्न विचारण्याची हिम्मत करणार्‍याला, भारताच्या प्रतिज्ञेतील पहीले वाक्य समजुन घेण्याचा प्रयत्न करा इतकेच सांगावेसे वाटते.

असे टुकार, फालतू, अमंळ राष्ट्र् विरोधी विचार मांडणार्‍याचा जाहीर निषेध*!! [*हे भारतीय राजकरण्यांचे आवडते शब्द, नपूंसक साले]

विसुनाना's picture

21 Aug 2008 - 12:12 pm | विसुनाना

आतापर्यंत झालेल्या चर्चेत भाग घेतलेल्यांचे मनःपूर्वक आभार.
प्रातिनिधिक प्रतिसाद पाहता-
काही जणांना अरुंधती रॉय यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आणि दुर्लक्ष करण्याजोगे वाटते तर काही जण त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवावा या मताचेही आहेत.
अरुंधती रॉय यांनी यापूर्वी 'मोहम्मद अफझल' याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याची मुक्तता करावी यासाठी दिल्लीत बैठा सत्याग्रह केला होता, याची या निमित्ताने आठवण करून द्यावीशी वाटते.
अरुंधती रॉयना भारतातली सामान्य जनता फारशी ओळखत नसली तरी बुकर विजेती लेखिका हा नावलौकिक जगाला पुरेसा आहे. मते बनवण्यासाठी जगातले लोक अशा लेखकांना मानतात हे विसरून चालणार नाही.
अरुंधती रॉय यांनी केलेले वक्तव्य = सलमान रश्दी यांचे सॅटानिक व्हर्सस = तस्लीमा नसरीन यांचे लज्जा असेही समिकरण मांडता येऊ शकते.
तसेच घटनेच्या ३७०व्या कलमाच्या अन्वये काश्मिरमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल केवळ तेथील सरकार (राज्य सरकार) खटला दाखल करू शकते. त्यामुळे गिलानी आणि रॉय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणत्या काश्मिरी सरकारकडे असेल हा प्रश्न आहेच.

काश्मिरचा भूगोल पाहिला तर स्वातंत्र्यपूर्व (राजा हरिसिंग यांच्या अधिपत्त्याखालील) पूर्ण काश्मिर राज्याचा १/३ भाग (भारतीय नकाशातील चोच) अगोदरच पाकव्याप्त अथवा आझाद आहे. अक्साई चीन (भारतीय नकाशातील तुरा)चीनने बळकावलेला आहे. जम्मू आणि लद्दाख सोडल्यास उरते ते काश्मिरचे खोरे! ते एकूण भूभागाच्या १/६ असेल. त्यातलाच १/३ भाग काश्मिरी पंडितांनी मागितलेला आहे. काहीनी सुचवल्याप्रमाणे ज आणि का राज्याचे तीन किंवा चार (= पनुन काश्मिर + लद्दाख + जम्मू +उर्वरीत काश्मिर खोरे ) भाग करून मग त्यात स्वमताधिकार देणे हा एक पर्याय असू शकतो.
परंतु भारतातील इतर पूर्वोत्तर राज्यांची परिस्थिती पाहता असा निर्णय आत्मघाती ठरण्याची शक्यता आहे.

आणखी प्रतिसादांच्या प्रतिक्षेत आहे.

भारत माझा देश असला तरी काश्मिरी लोक तसे जोवर समजत नाहीत, मी काश्मिरात माझी स्वतःची झोपडी बांधू शकत नाही तोवर काश्मिर माझे आहे असे मी कसे म्हणू शकेन? बाकी हे प्रश्न टुकार, फालतू वाटले तरी भावना भडकवण्याइतके समर्थ आहेत हेही नसे थोडके! ;)

अवलिया's picture

21 Aug 2008 - 12:35 pm | अवलिया

अरुंधती रॉयना भारतातली सामान्य जनता फारशी ओळखत नसली तरी बुकर विजेती लेखिका हा नावलौकिक जगाला पुरेसा आहे. मते बनवण्यासाठी जगातले लोक अशा लेखकांना मानतात हे विसरून चालणार नाही.

देश कुणापासुन बनतो विसुनाना? सामान्य माणसांपासुनच ना?
विदेशातील लोकांना काय वाटते याचा विचार आपण का करायचा?
आणि विदेशातील लोकांनी काय मते बनविली यावर आपला आचार विचार आपण का ठरवायचा? कशासाठी?
उद्या ते म्हणतील गणपतीला मोदक नाहि चिकनचा नैवेद्य दाखवा ... आपण तसे करणार का?
त्यांचे विचार काहिपण असो ...त्यांना लखलाभ.... आपण त्यांची दखल घ्यायची काय जरुर?
काश्मिर भारताच भाग होता ....आहे ... राहिल...

सुर्य मावळत नव्हता ज्यांच्या साम्राज्यावर त्यांना याच सामान्य जनतेने हाकलुन दिले ना?
जगाचा विचार तेव्हा केला का?
मग आताच का करायचा?

ती तसली मा की असली मा आज रानोमाळ भटकती का झाली?
सलमान रश्दिचे काय झाले?
सामान्य लोकांपासुन स्वतःला हटके दाखविणारे पार पाचोळ्यागत फेकुन दिले जातात हे का तुम्ही जाणत नाही?

अरुंधतीने काहिही बरळले व उर्वरीत जगाने कितीही तिची प्रशंसा केली तरी आम्ही मात्र तिच्याकडे, तिच्या सारख्या इतरांकडे पुर्ण दुर्लक्ष करणार हे नक्की

मुशर्रफ पाय उतार होणे पाकिस्तानचे राजकीय अस्तित्व संपण्याकडे महत्वाचे दिशादर्शन आहे असे मी मानतो

काश्मिर प्रश्न संपणार हे निश्चित
काल येत्या .. अं .... दशकात....

विकास's picture

21 Aug 2008 - 6:54 pm | विकास

काहीनी सुचवल्याप्रमाणे ज आणि का राज्याचे तीन किंवा चार (= पनुन काश्मिर + लद्दाख + जम्मू +उर्वरीत काश्मिर खोरे ) भाग करून मग त्यात स्वमताधिकार देणे हा एक पर्याय असू शकतो.

  1. वास्तवीक स्वतंत्र भारतात (आधी म्हणल्याप्रमाणे) "ब्रिटीश इंडीया इंडिपेन्डन्स ऍक्ट", ज्या कायद्यांतर्गत आपल्यास स्वातंत्र्य मिळाले, त्या अंतर्गत, मताधिकार हा फक्त संस्थानिकांनाच होता सामान्य माणसांना नव्हता. हे कलम काँग्रेस आणि मुस्लीम लिगने स्वातंत्र्यापूर्वी मान्य केले होते. तसा स्वमताधिकाराचा हक्क पाकीस्तानातील हिंदूंना आणि भारतातील मुसलमानांना मिळाला नाही. तेंव्हा काश्मिर बाबत तसे करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
  2. तरी देखील नेहरूंच्या ("निष्पाप" असेल ,पण तरीही) चुकीमुळे(च) त्या वेळेस म्हणजे १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर आपण (म्हणजे भारत सरकारने) काश्मिर मध्ये स्वमताधिकार करू असे म्हणले.
  3. ते म्हणताना स्वमताधिकार हा संपूर्ण काश्मिरमध्ये करायचा असा भाग होता. याचा अर्थ स्पष्ट केला गेला होता, की पाकीस्तानने त्यांचे सैन्य आणि कब्जा हा आझाद काश्मिर मधून हटवायचा. तो भाग भारतातला आहे असे मान्य करायचे आणि मग त्यांना स्वमताधिकार देयचा.
  4. अर्थातच तसे पाकीस्तानने तेंव्हा केले नाही आणि त्यांनी करार मोडला. त्यामुळे नंतर स्वमताधिकार करण्याची जबाबदारी पुढील सर्वच भारतीय सरकारांनी नाकारली.
  5. आणि म्हणून स्वमताधिकाराचा आता प्रश्न उद्भवत नाही.

बाकी विसूनाना: आपल्या प्रश्नांबाबत आपली उत्तरे काय आहेत ते समजून घेयला आवडेल :-)

विसोबा खेचर's picture

21 Aug 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर

जमणार नाही...

काश्मिर भारताचं आहे आणि भारतातचंच राहील!

दूध मांगोगे तो खीर देंगे,
काश्मिर मांगोगे तो चीर देंगे!

तात्या.

चित्रा's picture

22 Aug 2008 - 12:41 am | चित्रा

अरूंधती रॉयना देशद्रोही म्हणण्यासारखा पुरावा नाही, म्हणून देशद्रोही म्हणणार नाही. शिवाय घटनेने त्यांना जे काही विचार आणि आचार स्वातंत्र्य दिले आहे ते उपभोगण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे हे दोन मुद्दे बाद.

बाकी हल्ली देशांच्या सीमा इतक्या पुसट झाल्या आहेत, दुनियेचे मोठे ग्लोबल व्हिलेज झाले आहे, त्यात काश्मिर भारताकडे असले काय नसले काय, काही फरक पडत नाही. काश्मिरी जनतेला स्वत: कुठे जाणार हे ठरवण्याचा हक्क त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, किंबहुना सीमेवरील प्रत्येक राज्याने तसे ते ठरवले पाहिजेच. सरकारची जबाबदारी फक्त सर्वमताच्या निवडणुका घडवून आणण्याची. पुढे सगळे एकोप्याने नांदतीलच.

कोलबेर's picture

22 Aug 2008 - 1:25 am | कोलबेर

बाकी हल्ली देशांच्या सीमा इतक्या पुसट झाल्या आहेत, दुनियेचे मोठे ग्लोबल व्हिलेज झाले आहे, त्यात काश्मिर भारताकडे असले काय नसले काय, काही फरक पडत नाही

भास्कर केन्डे's picture

22 Aug 2008 - 1:46 am | भास्कर केन्डे

अरूंधती रॉयना देशद्रोही म्हणण्यासारखा पुरावा नाही.
-- भारतीय घटनेनुसार काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. तो भारताला/भरतीय लोकांना नको आहे असे भारताच्या वतीने सांगण्याचा अशिकार यांना कोणी दिला? होय, त्या देशद्रोहीच आहेत.

बाकी हल्ली देशांच्या सीमा इतक्या पुसट झाल्या आहेत, दुनियेचे मोठे ग्लोबल व्हिलेज झाले आहे...
- - हा हा हा. अंमळ विनोद! कधी एखाद्या देशाची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करुन बघा. आणि हो, तुम्हाला पारपत्राची वा व्हिसाची तर आवश्यकता नसेलच तेव्हा त्या व्यतिरिक्त जाऊन बघा. तुमचे विमान एका दणक्यात जमिनीवर उतरेल.

त्यात काश्मिर भारताकडे असले काय नसले काय, काही फरक पडत नाही.
-- वरील प्रतिसाद वाचलेत तर आपल्या लक्षात येईल की त्याने देशाची शकले पडतील. आज काश्मिर, मग त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उद्या पंजाब, नंतर मेघालय, अरुणाचल, मिझोराम, आसाम... अनेक देश निर्माण होतील व आपापसात लढाया करायला लागतील. लाखो करोडो लोकांचे रक्त सांडेल. तरीही काहीच फरक नाही का पडत?

आपला,
(स्तंभित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

कोलबेर's picture

22 Aug 2008 - 2:01 am | कोलबेर

कधी एखाद्या देशाची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करुन बघा. आणि हो, तुम्हाला पारपत्राची वा व्हिसाची तर आवश्यकता नसेलच तेव्हा त्या व्यतिरिक्त जाऊन बघा

भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळ येथे जाण्यासाठी पारपत्र/व्हिसा काहीही लागत नाही. (निदान काही वर्षांपूर्वी तरी लागायचे नाही)

ग्लोबल व्हिलेज वैगेरे कल्पना सगळ्या तंत्रज्ञान/शिक्षण/कला/क्रिडा ह्यांच्या देवघेवीसाठी सोयिस्कर आहेत. देशांच्या सीमा ह्या फक्त पुस्तकात किंवा व्याख्यानात पुसट असतात, एरवीच्या व्यवहारात नाही!
हा विचार आत्मघातकी आहे! आपल्याच सुजाण लोकांचे असे विचार ऐकून मला धक्काच बसला आहे! :(

"तिबेटमध्ये गवताची काडीही उगवत नाही चीनकडे गेले तर गेले" - ही घोडचूक आदरणीय पं. नेहेरुंनी केली आणि त्याची फळे आपण भोगली! (सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या द्रष्ट्या माणसाच्या सावधगिरीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन कायमची डोकेदुखी ओढवून घेतली.)

इतिहासापासून आपण इतकेही शिकणार नसलो तर आपल्यासारखे करंटे आपणच!

चतुरंग

धनंजय's picture

22 Aug 2008 - 2:30 am | धनंजय

अर्थात
> सरकारची जबाबदारी फक्त सर्वमताच्या निवडणुका घडवून आणण्याची.
सरकारची (म्हणजे पर्यायाने लोकशाहीत आपली) निवडणुकांपेक्षा खूप अधिक जबाबदारी असते या अर्थी. वगैरे, वगैरे, बरोबर?

देशद्रोहाची घटनात्मक व्याख्या काय आहे, ती शोधतो आहे - अजून सापडली नाही - पण त्या व्याख्येत अरुंधती राय यांचे मतप्रदर्शन येत नसावे, असे वाटते.

हल्लीच मुलायम सिंह यांनी म्हटले की अणूकराराविरुद्ध जो मतप्रदर्शन करेल तो देशद्रोही. त्यांचे म्हणणे (कायदेशीररीत्या) खरे असेल तर कदाचित राय यांचे म्हणणेही देशद्रोह असू शकेल.

एकूण परराष्ट्रधोरणाच्या बाबतीत कोणाच्याही ठाम मताविरुद्ध मत असणे म्हणजे देशद्रोह, असे मानण्यास जागा आहे (म्हणजे त्या कायद्याचा मसुदा सापडेपर्यंततरी...)

घटनेत "मूलभूत कर्तव्ये" म्हणून काहीतरी सापडते. त्यात "भारताची सार्वभौमता, एकात्मता, आणि अविभाज्यतेचे समर्थन आणि संरक्षण करणे" असे एक मूलभूत कर्तव्य म्हणून येते.
पण त्यात "वैज्ञानिक विचारसरणी वाढवीन" वगैरे अदंडनीय कर्तव्येही दिली आहेत. मला वाटते, ही मूलभूत कर्तव्ये पाळली न पाळली तरी दंडनीय नाहीत. थोडक्यात दंडनीय द्रोह काय हे घटनेत सांगितलेले नाही. (अमेरिकेच्या संयुक्त राज्यांच्या घटनेत तशी व्याख्या आहे...)

भारतात दंडनीय कृतींच्या व्याख्या दंडसंहितेत सापडतात.

तर भारतीय दंडसंहितेत हे सापडते :
Section 121. Waging, or attempting to wage war, or abetting waging of war, against the Government of India

Whoever wages war against the 1[Government of India], or attempts to wage such war, or abets the waging of such war, shall be punished with death, or 2 [imprisonment for life] 3[and shall also be liable to fine].

इथे अर्थात 1[Government of India] हे "राणी"च्या ठिकाणी कायदेशीररीत्या बदलून घातलेले आहे. या ठिकाणी "भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे" म्हणजे नेमके काय? "हल्लीचे भारत सरकार भलतेच वैट्ट आहे" असे म्हणणे नसावे. त्याअधिक काही असावे.

तसाच "सेडिशन"विरुद्ध कायदाही दंडसंहितेत सापडतो.
[124A Sedition

Whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. 2[* * *] the Government established by law in 3[India], 4[* * *] shall be punished with 5[imprisonment for life], to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine.

Explanation 1-The expression "disaffection" includes disloyalty and all feelings of enmity.

Explanation 2-Comments expressing disapprobation of the measures of the attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.

Explanation 3-Comments expressing disapprobation of the administrative or other action of the Government without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section

यात स्पष्टीकरणे २ आणि ३ संदर्भाला धरून आहेत असे वाटते. वकिलाला विचारले पाहिजे, पण चित्रा यांचा पहिला परिच्छेद कायद्याला धरून असावा. दुसरा परिच्छेद अर्थातच विनोदात लिहिलेला आहे, असे दिसते.

कोलबेर's picture

22 Aug 2008 - 2:41 am | कोलबेर

दुसरा परिच्छेद अर्थातच विनोदात लिहिलेला आहे, असे दिसते.

जर एखाद्या राज्यातील लोकांना (बहुमताने) आपल्या देशापासुन प्रचंड दुर्लक्षीत वाटत असेल तर त्यांना वेगळी चूल मांडण्याची मुभा असू नये का?माझ्या मते चित्रा ताईंना हेच म्हणायचे आहे. कोणी कोठे जायचे/रहायचे हे लोकांना निष्पक्ष निवडणुकांतुन ठरवु दे. तीच स्थिती उत्तर पूर्व राज्यांची. तिथुन शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना, नेपाळ्या/चिंक्या असे (त्यांच्याच देशात) उघड हिणवले जाताना मी स्वतः पाहिले आहे. मग अशा परिस्थितीत त्यांना वेगळे व्हावेसे वाटले तर( तटस्थ नजरेतुन पाहिले असता) त्यात वावगे ते काय?

धनंजय's picture

22 Aug 2008 - 3:31 am | धनंजय

दुसरा परिच्छेद विनोदी आहे की नाही ते चित्रा ताईच सांगतील.

तटस्थ नजरेतून : वेगळी चूल मांडण्यासाठी कुठला राजमार्ग असणे बहुधा अव्यहार्य असावे. घटनेत फक्त आणखी भूभाग समाविष्ट करण्याबद्दल उल्लेख आहे (उदाहरणार्थ : सिक्किम), पण जोडलेले भाग सोडण्याची मुभा नाही. बहुतेक देशांच्या राज्यघटनांमध्ये असेच असावे.

अमेरिकेनेही (संयुक्त राज्ये - यूएसए) स्वतंत्र होताना "आम्ही जमले असते तर ब्रिटनचे कायदे मानले असते, पण हे असह्य होत आहे, म्हणून विभक्त होतो" अशी काही भूमिका घेतली होती. फुटतानाही विघटन हा राजमार्ग नव्हे असे सरळसरळ कबूलच केले होते.

उठसूट कोणी स्वातंत्र्य मागू नये, म्हणून असा सोपा विभाजनाचा कायदा व्यवहार्य नाही. पण देशाशी बांधिलकीच नसेल तर एखाद्या प्रदेशातील लोक कायद्याबाहेरील वाट शोधतील. अगदीच असह्य चळवळ झाली, तर अशा विघटनासाठी लोकशाही राज्ये विशेष कायदे करतात. "इंडिपेन्डन्स ऑफ इंडिया ऍक्ट" हा ब्रिटिश कायदा साम्राज्याच्या विघटनासाठी झाला, आणि भारतातही तो कायदा म्हणून मान्यच आहे. तसे करण्यापूर्वी बहुधा ब्रिटन किंवा ब्रिटिश इंडिया, कुठेही असे विघटन होण्यास कायदेशीर राजमार्ग नसावा. तरी ब्रिटनने तसा कायदा केला, आणि मानला. भारताने मानला.

पण विघटनाची परिस्थिती येऊ नये म्हणून ज्यांना एकत्रित राहायचे आहे, त्यांनी घटनेने दिलेले मार्ग, आणि मानवतेला लांछन न देणारे सर्व मार्ग वापरावेत.

कोलबेर's picture

22 Aug 2008 - 4:00 am | कोलबेर

दुसरा परिच्छेद विनोदी आहे की नाही ते चित्रा ताईच सांगतील.

ओक्के! नो कमेण्ट्स..

उठसूट कोणी स्वातंत्र्य मागू नये, म्हणून असा सोपा विभाजनाचा कायदा व्यवहार्य नाही.

विभाजन हा राजमार्ग निश्चितच नाही परिस्थितीनुसार केलेली तडजोड म्हणू हवे तर!

पण विघटनाची परिस्थिती येऊ नये म्हणून ज्यांना एकत्रित राहायचे आहे, त्यांनी घटनेने दिलेले मार्ग, आणि मानवतेला लांछन न देणारे सर्व मार्ग वापरावेत.

घटनेने दिलेले सगळे मार्ग वापरुनही प्रश्न तसाच चिघळतच राहणार असेल तर?

ह्याबाबत श्री.स्वामीनाथन ह्यांचा हा लेख नविन ह्यांच्यामुळे आताच वाचायला मिळाला. मला जे म्हणायचे आहे ते स्वामीनाथन ह्यांनी नेमक्या शब्दात फारच छान मांडले आहे.

स्वामीनाथन ह्यांच्या लेखातुन साभार :

काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचे वचन आपण सहा दशकांपूर्वी दिले होते. आता ते घेऊ आणि त्यांना तीन पर्याय देऊ : स्वातंत्र्य, पाकिस्तानात विलिनीकरण, भारतात विलिनीकरण. यातून काश्मिरी लोक स्वातंत्र्यच निवडतील हे जवळजवळ नक्की आहे. जम्मू आणि बहुतेक लडाख भारतात राहण्याचा निर्णय घेतील. काश्मीर विषयी राजकारणी आणि लष्कराच्या ऐवजी काश्मीरच्या लोकांना निर्णय घेऊ दे.

चित्रा's picture

22 Aug 2008 - 4:51 am | चित्रा

नीलकांत, विकास इत्यादींचे पहिले काही माहितीपूर्ण प्रतिसाद आल्यावर बराच वेळ झाला तरी लेखाला अधिक प्रतिसाद येत नव्हते - म्हणून खास प्राचीन मार्ग निवडला... यशस्वी झाला का नाही? काही खंदे वीर लढायला बाहेर आलेच :-)

धनंजय म्हणतात त्याप्रमाणे माझ्या प्रतिसादाचा दुसरा भाग विनोदी/उपहासात्मकच आहे. तरी भास्कर, आणि चतुरंग, गैरसमज नसावेत. ( बुद्धीबळ खेळणार्‍यांनी एवढे कसे वरवरचे अर्थ घ्यावेत, हा प्रश्न पडतो). सर्वांनी ह. घ्या.
आता पुढचा प्रतिसाद आहे तो विडंबन / विनोद नाही.

मोठ्या, वैश्विक पातळीवरून पाहिले तर मी जे उपहासाने जे लिहीले ते योग्यच आहे. म्हणजे "विश्वची माझे घर" प्रमाणे. आणि आपल्याला रोजच्या आयुष्यात त्याचे अनुभव आपल्यापुरते येतही असतात. पण जर ही स्थिती माझ्याच मनात आहे आणि दुसर्‍याच्या नाही, तर स्वतःला वैश्विक पातळीवरून क्षुद्र पातळीवर आणणे भाग पडते. या अर्थाने सीमा पुसट आहेत हेही खरे नाही आणि त्या तशा नाहीत हेही पूर्णतः खरे नाही. मग आपण आपल्या पूर्वानुभव आणि काही भविष्यवादी विचार असे एकत्र करून कसे वागायचे त्याचा निर्णय घेतो.

तरी कोलबेर यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या लिहीण्याचा अर्थ नाही, हे जरी असले तरी त्यांच्या सीमेवरील प्रदेशांच्याबद्दलच्या म्हणण्याचा अर्थ मला मनापर्यंत जाऊन पोचतो. पण असे जरी असले, तरी हे प्रदेश आत्तातरी भारताचेच आहेत आणि ते अगदी फुटले तरी उद्या मदत कोणाकडून घेणार? पाकिस्तान आणि चीन? म्हणजे आगीतून फुफाट्यात. हा विचार तेथील सूज्ञ लोकांनीही केला पाहिजे आणि भारतीय राजकारणात वजन असलेल्यांनी देखील हे प्रांत आपल्याशी जोडलेल्या स्थितीत ठेवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व केले पाहिजे.

अरूंधती रॉयबद्दल माझे फारसे चांगले मत नाही - तिला मतांची अनेक शिंगे आहेत. तिचे ऐकणारे लोक अनेक आहेत त्यामुळे तिचे मत काय आहे ह्याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे. एवढेच माझे सध्याचे तिच्यासंबंधीचे मत आहे.

चतुरंग's picture

22 Aug 2008 - 9:27 am | चतुरंग

धनंजय म्हणतात त्याप्रमाणे माझ्या प्रतिसादाचा दुसरा भाग विनोदी/उपहासात्मकच आहे. तरी भास्कर, आणि चतुरंग, गैरसमज नसावेत. ( बुद्धीबळ खेळणार्‍यांनी एवढे कसे वरवरचे अर्थ घ्यावेत, हा प्रश्न पडतो). सर्वांनी ह. घ्या.

आपल्या खुलाशाबद्दल धन्यवाद!
बुद्धीबळे खेळणारा असल्यानेच आपली मूळ प्रतिक्रिया गांभीर्याने घेतली. चाल नंतर साधी निघाली तर हरकत नाही पण जर गंभीरपणाने केलेली असेल तर दुर्लक्ष व्हायला नको हा हेतू! :)
असो. मतांतरे असायचीच.

चतुरंग

विसुनाना's picture

22 Aug 2008 - 12:51 pm | विसुनाना

चर्चेत अनेकांनी मोलाची भर टाकल्याबद्दल आभार. (चित्रा यांचे विशेष आभार :))

ही चर्चा उपस्थित करण्यामागे काश्मिरबाबत आणि पर्यायाने पूर्ण भारताच्या भौगोलिक एकतेबाबत मिपाकर कितपत सजग आहेत हे जाणून घ्यायचे होते.

एकाच व्यक्तीत एकावेळी अनेक व्यक्तिमत्वे वास करतात. भूमिकेप्रमाणे माणसाची मतेही बदलतात. येथील एका सदस्यांनी पूर्वी म्हटल्याप्रमाणे - एखाद्या सदस्याचे आंतरजालावरील भासमान अस्तित्व त्या व्यक्तीच्या खर्‍या व्यक्तित्वासारखे असेलच असे नाही.तरीही 'मिपा' सुशिक्षित मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करते असे मानायला जागा आहे. त्यामुळे या वर्गात या प्रश्नाबद्दल काय मतमतांतरे आहेत याचे प्रातिनिधिक चित्र या चर्चेत पहायला मिळाले.

हीच चर्चा आत्मग्लानीत मग्न असलेल्या उच्चवर्गियांमध्ये किंवा स्वत्व विसरून गेलेल्या निम्नवर्गियांमध्ये (एकाच पंक्तीत सर्वांना बसवल्याबद्दल क्षमस्व.. अपवाद असू शकतात) झाली असती किंवा नाही? झाली असती तर त्यांची याबाबत जागरुकता कितपत आहे? त्यांची मते काय आहेत हे जाणून घेणे अवघड आहे.

ताकाला जाऊन भांडे लपवण्याऐवजी हे स्पष्ट करतो की माझी मते काहींना जहाल वाटू शकतील -

१. रॉय यांचे हे वक्तव्य अनर्गल आहे असे आपणास वाटते का? या वक्तव्याला कितपत महत्त्व द्यावे?
-नाही. हे वक्तव्य अनर्गल नाही. अरुंधती रॉय यांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे समजून, उमजून केलेले आहे. अरुंधती रॉय यांचे विचार अशा प्रकारच्या विचारांचे प्रतिक आहे. असा विचार करणारे काही लोक भारतात आहेत. अरुंधती रॉय प्रकारच्या मंडळींनी असा आवाज उठवायला सुरुवात केली तर ते महाग पडेल. या वक्तव्याला महत्त्व दिलेच पाहिजे.

२. सदर वक्तव्य देशद्रोही आहे असे तुम्हाला वाटते काय? की ते 'भाषण स्वातंत्र्य' या भारतीय घटनेतील मूलभूत हक्काला धरूनच आहे?
- सदर वक्तव्य देशद्रोही आहे की भाषण स्वातंत्र्य? हा कायद्याचा कीस काढणारा मुद्दा होईल. पण 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो' या न्यायाने आज त्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे अनेकांची तोंडे धरणे अवघड होईल. गिलानी, रॉय यांच्यावर खटले भरावेत.

३. काश्मिर हा भारताचा भाग स्वतंत्र व्हावा अथवा पाकिस्तानात जावा असे आपणास वाटते का?
- केवळ अशक्य.

इंदिरा गांधी यांनी इतिहासातील अनेक चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. (त्यांनी स्वतः काही चुका केल्या हे नाकारत नाही.) बांगला देश निर्मितीचा बडगा दाखवल्याबरोबर शेख अब्दुल्ला यांनी नमते धोरण घेतले आणि १९७४ साली भारत सरकारशी करार केला. तहच म्हणता येईल. त्यातील कलम २ नुसार काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणेही देशद्रोह ठरू शकतो. जम्मू आणि काश्मिरच्या घटनेतच "जम्मू आणि काश्मिर' हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहिल" हे अपरिवर्तनीय कलम आहे.

४. काश्मिर भारतात राहिले नाही तर तुमच्या आयुष्यात काही फरक पडेल काय?
-होय. एक भारतीय म्हणून माझे मनोधैर्य खच्ची होईल. माझी मान शरमेने झुकेल. अशासाठी की अनेक सैनिकांचा आणि लष्करी अधिकार्‍यांचा बळी देऊन, अनेक युद्धात अपरिमित हानी सोसून, शर्थीने राखलेला प्रदेश केवळ मी काहीच केले नाही म्हणून हातचा गेला ही जाणीव कायमची कुरतडत राहील.
पुढे फुटिरतावाद्यांचे फावून देशविघातक कारवाया वाढतील . त्याने अंतर्गत शांती नाश पावेल. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कष्ट निर्माण होतील हे खरे, पण त्याहीपेक्षा मनोभंग वाईट.

५. काश्मिर भारतातच रहावे असे आपणास वाटत असेल तर तसे होण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहे काय?
- होय आहे. जम्मूकाश्मिरमध्ये आणिबाणी लागू करावी. (प्रत्यक्षात ती परिस्थिती आहेच.) प्रसार माध्यमांना भडकाऊ बातम्या देण्यापासून रोखावे. ज्या नेत्यांनी उघडपणे स्वातंत्र्याची मागणी केली आहे अशांना (गिलानी/अरुंधती/ अंगना/ भारतातले इंग्रजाळलेल्या वृत्तपत्रांचे संपादक अशांसह) अटकेत टाकावे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले भरावेत.
त्याबरोबरच जम्मूतील अमरनाथ संघर्ष समितीच्या नेत्यांना अटक करावी. ज्यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे फक्त त्यांच्याशी वाटाघाटी सुरू ठेवाव्यात.
भारताचा कायमचा लष्करी तळ बनवण्याचा मिषाने अमरनाथ जवळचा मोठा भूभाग ताब्यात घ्यावा. तेथे सैन्याच्या कायमच्या प्रचंड बराकी बांधाव्यात. 'पनून काश्मिर' भागात पक्क्या घरांच्या वसाहती बनवून काश्मिरी पंडितांचे तेथे पुनर्वसन करवे. तेथे त्यांच्या निर्वाहासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करावी. या सर्व भागाला सैन्याचे कायमचे संरक्षण असावे. पनून काश्मिरचा नकाशा आणि प्रत्यक्ष ताबारेषेवरील काटेरी कुंपण पाहता हे शक्य आहे असे वाटते.
काश्मिरचा प्रश्न भारताच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून ३७०वे कलम रद्द करण्याची मागणी रेटावी. यापुढच्या संसदेत घटनादुरुस्ती करून ३७०वे कलम सैल बनवावे. उदा. काश्मिर खोर्‍याच्या विकासाच्या दृष्टीने 'बांधा, चालवा, हस्तांतर करा' तत्त्वावर भारतातील कंपन्या काही काळापुरते (२० वर्षे) तेथे स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊ शकतील. किंवा काश्मिर खोरे सोडून इतरत्र कोणीही भारतीय कायमचा रहिवासी होऊ शकतो. किंवा काश्मिर खोर्‍यात सातत्याने १० वर्षे निवास करणार्‍या भारतीयांना नागरिकाचे सर्व अधिकार मिळतील इ.

अर्थात सध्याचे राजकारणी हे सर्व करू धजतील का? हे वेगळे.
माझ्यापुरते बोलायचे झाल्यास जितके लोक माझ्या संपर्कात येतात त्यांच्याशी मी ही चर्चा करतो. त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. सध्यातरी इतकेच!

६. भारतातील काही भाग भारतापासून स्वातंत्र्य देण्यालायक आहे असे तुम्हाला वाटते का? असेल तर कोणकोणता ?
- मुळीच वाटत नाही.

७. भारतातील प्रत्येक भागास स्वतंत्र जनादेश घेऊन भारतात रहायचे की नाही हे ठरवू द्यावे काय?
- उलट काश्मिर आणि इतर फुटीरतावादी चळवळींविरुद्ध जनादेश घ्यावा. संपूर्ण भारताचे या चळवळींबाबत काय मत आहे (केवळ राजकारण्यांचे नाही) हे जगाला एकदा ओरडून सांगावे. म्हणजे अरुंधती प्रभृतींची तोंडे आपोआप बंद होतील.

८. 'काश्मिर घ्या, पण बरोबर यू.पी./ बिहार घ्या असे (१ + २ फ्री)' असे विनोदाने म्हणणेही आपल्याला मान्य आहे का?
-विनोदाने ठीक आहे. पण काश्मिरबरोबरच इतरही प्रांतांची परिस्थिती बदलण्याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे.

ऋषिकेश's picture

22 Aug 2008 - 9:45 pm | ऋषिकेश

काश्मिरचा प्रश्न हल्लीची स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली नेतृत्वे इ त(दोन्हीकडील) काळाच्या पडद्याआड गेल्याशिवाय सुटायचा नाहि असे वाटते.
नवी विटी नवे राज्य आले की हे जुने प्रश्न नव्या दृष्टीने पाहिल्यासरशी सुटतील असा कयास आहे (नवे निर्माण होतील हा भाग निराळा). वरील प्रतिसादांवरून असेही जाणवले की स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढीला काश्मिरमधे वैयक्तीक भावनात्मक गुंतवणूक नाहि. या पिढीची भुमिका "माझ्या मातृभुमीचा अविभाज्य भाग" इतक्या राजकीय मर्यादेत आहे. ती राष्ट्रवादाची भुमिका असेल (आणि तशी हवीही) पण त्याला आपण केलेल्या जुन्या चुकांना झाकण्याचा आटापिटा कमी आहे.

नाहितरी पृथ्वीचा राजकीय नकाशा स्वाभाविक नकाश्याच्या कैकपट वेगाने बदलतो ते काहि उगाच नव्हे!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश