Skip to main content

शतशब्दकथा - शिवी

लेखक एस यांनी सोमवार, 18/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा गुंठामंत्री. काय त्यो रुबाब, त्ये अंगावरलं मणभर सोनं, काळ्या काचंवाली कार्पियो, ह्याप्पी बड्डेवाले फ्लेक्श. जिमिनीचा पयसा पान्यागत वहातोया." विचारात गढलेल्या त्याला धूळ उडवीत येणार्‍या गाडीनं जागं केलं. लगबगीनं बंगल्याचं फाटक उघडलं गेलं. गाडीतून टक्कल उतरलं. मागून एक पोरगी आणि काही माणसं. बाकीची मंडळी ढोसायला बाहेर गेली. "लिलावात उचलली. धा हजारात." पुसटसं ऐकलं त्यानं. रात्र वाढली तसा तो त्याच्या खोपटात पडला. ते आवाज ओळखीचे होते त्याला. मध्ये पडायची हिंमत नव्हतीच कधी. दिवस उजाडला. टक्कल तांबारलेल्या डोळ्यांनी स्कॉर्पियोत बसून निघून गेलं. कालची माणसं आता परत आली. चादरीत गुंडाळलेल्या तिला दोघांनी उचलून गाडीत टाकली. धूळ पुन्हा उडाली. ओरडला तो. "मा***द". मनातल्या मनात. (सत्यघटनेवर आधारीत)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7316
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

(सत्यघटनेवर आधारीत) हे वाचून घटना महाराष्ट्रातली असावी असे वाटते. संताप व्यक्त करण्यास शब्द सुचत नाहीयेत...

सत्यकथा.... असायला नको पण ती असणारच!

अशा घटना म्हणजे जगरहाटीच झालीय. मनुष्य तस्करीतला एक हिस्सा. ह्यावर असीम सरोंदेंचे एक भाषण ऐकले होते त्याची आठवण झाली.

सत्य घटना तुम्हाला जर माहिती आहे तर ते पत्रकारांपर्यंत का नाही पोहचवत.

............

:(

म्हणून वास्तव थोडीच नाकारता येते. सत्ता-पैसा-सत्ता=माज आणि कायद्यालाच वाकवणारे

???? भयंकर प्रकार हा, सुन्न करून टाकणारा. जनावराची जात बरी, गरज असेल तेव्हाच लचके तोडते ती, ही असल्या माणसांची जात वाईट, वासनेच्या आगीत सगळं जाळायला तयार असतात. आजूबाजूला अशी भरुपूर दिसून येतात. कोणी करंत कोणी फक्त चिंतीतं. त्याला शिक्षणाचा किवा पैशाचा संबंध नसतो. कधी कधी असं जनावर आपल्यातही डोकावताना दिसतं. भीती वाटते मग आपली सुद्धा त्या क्षणापुरती. असंच एक पुस्तक वाचण्यात आलं होतं खूप दिवसांपूर्वी, “पारध” नावाचं. माणूस ह्या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी कायमचा बदलला त्या दिवशी. अशावेळी, अगतीकता आवळून जाते आणि, सहन न होऊन दुर्लक्ष करण्यापलीकडे काहीच राहत नाही आपल्या हातात.

अजून खूप काही जाणवलं, जे सगळंच शब्दात पकडणं कठीण आहे. असले माजोरडे म्हणजे सगळ्या समाजालाच शिवी आहेत. हजार मरणं मरायलाच जन्माला आलेली ती, या प्रसंगाचा मूक बळी. आणि साक्षीदाराचा वांहोटा संताप. हा वांझोटा संताप बाहेर पडतो तोही 'तिच्या'वरून दिलेल्या शिवीनेच.. आजच बिकाने लिहिलेल्या लेखातल्या शेवटच्या ओळी पुन्हा ठसठशीतपणे समोर आल्या इथे.
लेकीचा गं जलम, घातला कुण्या येड्याने, माझे सखे मैनाबाई, बैल राबती भाड्याने!

In reply to by पैसा

हा वांझोटा संताप बाहेर पडतो तोही 'तिच्या'वरून दिलेल्या शिवीनेच..
खरंच मर्म पकडलंस पै ताई तू. फार च अस्वस्थ केलं या कथेने :(

दादांच्या इतकी मनी आणी मसल पॉवर असेल, आणी समाज, कायदा, पोलिस, देव, नरक ईत्यादीचे भय नसेल तर.... वांझोटा संताप व्यक्त करणार्‍यांपैकी कीती तरी लोक दादाला पण मागे काढतील!

:-(

नडतो फक्त आपला नकर्तेपणा. मनी पावर मसल पावर ह्या पळवाटा झाल्या.

:(

वाटते की अश्या लोकन्ना पण समर्थक असतात.. त्यांना हिच परीस्थीती स्वतहा वर यावी हिच प्रार्थना!

शक्यतो आपण आपल्या धाग्यावर वाचकांचे आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍यांचे शेवटी आभार मानत असतो, अशी एक चांगली परंपरा आहे. ह्या धाग्याच्या बाबतीत मात्र मी आभार मानणे थोडेसे टाळेनच. चौदाशेच्या आसपास वाचने होऊनही त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले नाहीत असा विचार करण्यात काही अर्थ नाही. खफवरील चर्चेत श्रीरंग_जोशी यांनी लिहिल्याप्रमाणे अशा धाग्यांना मिळालेल्या प्रतिसादांपेक्षा त्यांच्या वाचनसंख्येला जास्त महत्त्व आहे, हा दृष्टिकोनही स्वागतार्ह आहे. नकारात्मक घटना, त्यांसंबंधीचे साहित्य हे कोणालाच पुनःपुन्हा अनुभवणे नकोसे वाटते हे नैसर्गिक आहे. याचे कारण असे, की ते वाचल्यावर आपल्या आत कुठेतरी इतका पिळा पडतो की एक प्रकारचे वैफल्य येते, चांगुलपणाच्या अस्तित्त्वाच्या मनातील विश्वासावर प्रश्नचिन्हाचा ओरखडा पडतो, असहाय्यतेची भावना माणसाला अस्वस्थ करते, क्वचित प्रसंगी निराशही करते. त्यातही अशा भयानक गोष्टींचा स्वतःस अनुभव आलेला असेल किंवा आजूबाजूला तसे काही पाहिले असेल तर या नैराश्याची, रागाची तीव्रता फार बोचकारणारी असते. ही घटना जशीच्या तशी इथे मांडलेली नाही. ही एक कथा आहे त्यावर बेतलेली. शतशब्दकथाप्रकाराची निवड करण्यामागचे कारण हेच होते की किमान शब्दांत शब्दांच्याही पलिकडले जे सांगायचे होते, व्यक्त करायचे होते ते मांडता यावे, वाचकांपर्यंत पोहोचवता यावे. यात ही विशिष्ट घटना, अशाच स्वरूपाच्या घडणार्‍या अनेक घटना, त्या घडण्यामागची कारणे, आजूबाजूची वस्तुस्थिती, एकीकडे पैशाचा मत्तवालपणा आणि आपण मानवी मूल्यांना विकत घेऊ शकतो ही वृत्ती, तर दुसरीकडे असहाय्यतेची परिसीमा घडवणारी वाईट परिस्थिती, गरिबी या दोन्ही बाजू मिळून होणारा कार्यकारणभाव, त्यात मूक दर्शक किंवा नेणिवेच्या गर्तेत गर्क असणारी मध्यमवर्गीय मनःस्थिती... हे सारेच मला मांडायचे होते. तसे या कथेत पात्रे आहेत बरीच, पण खरी पात्रे आहेत तीन. एक ती असहाय्य मुलगी, जिचा एक गुन्हा म्हणजे ती मुलगी म्हणून जन्माला आली आणि दुसरा गुन्हा ती अत्यंत गरिबीत तरूण झाली. हा वस्तुस्थितीचा एक पदर झाला. दुसरा तो अत्याचारी. ज्याचा विवेक हा पैशाच्या आणि सत्तेच्या मदांधतेत इतका लोप पावला आहे की स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीवर त्याची वासना जाते, एवढेच नव्हे तर पैसे मोजलेत म्हणजे तिच्या शरीराचे वाटेल तसे लचके तोडायचा अधिकारच त्याला प्राप्त झालाय असे वाटते, तो सैतान. आणि तिसरा म्हणजे या कथेचा वाचक. हा वाचक हे तिसरे पात्र आहे. ज्याचे डोळे एकीकडे दिपतातही आणि एकीकडे मूकपणे आक्रोशही करतात. जो आपल्याआपणच स्वतःभोवती ओढून घेतलेल्या कुचकामी निष्क्रियतेच्या, डोळे बंद करून जगरहाटीकडे बघण्याच्या पाशात सापडला आहे. कुणी विचारेल की ही कथा लिहिण्याचा माझा उद्देश काय होता? नक्की कोणावर ताशेरे ओढले आहेत? असहाय्यतेवर, मदांधतेवर की निष्क्रियतेवर? कदाचित सर्वच गोष्टींवर. पहिला उद्देश हाच होता की आपल्याच आजूबाजूला असंही काहीतरी भयंकर घडत असते हे सांगणे. दुसरे सात्विक संतापाच्या वांझोटेपणाला उघडे पाडणे. आणि तिसरे म्हणजे माझी स्वतःची तगमग व्यक्त करणे. इथे एखाद्या प्रतिसादात व्यक्त झाल्याप्रमाणे माझ्या प्रतिक्रियेबाबत प्रश्नचिन्हही उमटू शकेल. पण ते सांगत बसण्यात काही अर्थ ह्या कथेपुरता आणि ती लिहिण्याच्या उद्देशापुरता असेल असे वाटत नाही. हीच नाही, तर अशा अनेक घटना घडताहेत, निष्पाप बळी त्यात जाताहेत. आणि काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके लोक त्याविरुद्ध संघर्षही करताहेत. ह्यूमन ट्रॅफिकींग किंवा मानवी तस्करीच्या भयावहतेची एक बाजू इथे किलकिली करून दाखवली आहे. आत अजूनच अंधार आहे. हतबलता आहे. पण कुठेतरी एखादी पणतीही स्वतःला पेटती ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहे. इतर पणत्यांना ज्योत देते आहे. इकडेही पाहिले पाहिजे. एकीकडे मानवी मूल्यांच्या चिता पेटत असल्या तरी क्वचित कुठे आधाराची सुखद रिमझिमही असेलच. हा विश्वास कायम राहिला पाहिजे. तुमच्या मनात आणि माझ्याही. तरच ह्या कथेचे सार्थक झाले असे म्हणता येईल. धन्यवाद!

In reply to by एस

स्वॅप्स, पार्श्वभूमी सांगितली नाही तरीही कळेल इतका मूळ कथाविषय अगदी ठळक आहे. पण वाचल्यावर कमालीचा तिरस्कार निर्माण होतो आणि पुन्हा नको वाचायला असं वाटणं हेच कथेचं यश आहे. मला स्वतःला या 'दादा' जमातीबद्दल कमालीचा तिरस्कार असल्याने कसलाच प्रतिसाद द्यायला नको वाटला इतकंच. प्रतिसादाच्या संख्येसाठी आपण थोडंच लिहीत असतो? अन्यथा शतशब्दकथा म्हणजे आमचा वीक पॉईन्ट.

In reply to by सूड

अगदी हेच लिहिणार होतो प्रतिसाद वाचुन अशा कथा / लेख वाचले की काय प्रतिसाद द्यावा समजत नाही. अजुनच नैराश्य, हतबलता येते. अशा विषयावरचे किंवा एकंदरच अस्वस्थ करणारे चित्रपट्सुद्धा या कारणामुळेच कमी बघतो. लिहित रहा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

याच कारणासाठी काही धाग्यांवर प्रतिसाद देता येत नाही

In reply to by एस

स्वैप्स तुमचा दृष्टिकोण समजला. पण मला एक सांगा प्रतिसाद दिले म्हणजेच कथेचे सार्थक का? मला विचाराल तर संताप चीड़ घृणा आणि अगतिकता या भवनंपुढे काही प्रतिसादच् उमटत नाही. आपल्या रोजच्या जगातच काय पण आभासी जगात सुद्धा अशी माणस पाहतो आपण। मग ती शब्दान,झुंडिने असाच आवाज रहित हल्ला करतात। निदान त्यावेळी जो कुणी त्याला प्रतिकार करतो त्याला मदत करा। निदान अश्या वेळी आवाज उठवा। सगळेच झोपडित झापड़ घालून बंगल्याची राखनदारी करत राहतात।

काय प्रतिसाद देणार हो? मन सुन्न होउन जातं हे एक कारण आणी मनात आलेल्या शिव्या प्रतिसादात इथे देता येणार नाहित हे दुसरं !!

काय बोलू . . दुसरं काहीच सुचत नाहीये . मिपाच्या पहिल्या पानावरून कधी हे मागे जातं असं झालं होतं . . कथा वाईट म्हणून नाही . . पण ते परत परत बघून डोकं फिरतं म्हणून . . इथे शिव्या देऊन काहीच फायदा नाही . म्हणून इतका वेळ प्रतिसाद दिला नवता . दहा हजार . . तिच्या , तिच्या घरच्यांच्या , अक्ख्या आयुष्याची किमत . . फक्त दहा हजार . . इतक्या राजरोसपणे हे करून पण उजळ माथ्याने फिरायला मदत करणारा षंढ कायदा आहे आपला . .

सुन्न करणारी कथा . देशाला स्वातंत्र्य मिळुनही काहींचे पारतंत्र्य कायम आहे .

ही शशक वाचायची राहून गेली होती. परिणामकारक आहे. वाचली नसती तर बरं झालं असतं - असं वाटायला लावणारी कथा आहे.

मा***द (हा एकच प्रतिसाद मनात उमटला ही सत्यकथा वाचुन)