Skip to main content

गांधारेश्वर

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 21/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
चिपळूणला गांधरेश्वर नावाच शंकराच देउळ आहे.मूळ शहरापासून जरा बाजूलाच आहे.वाशिष्ठी नदीकिनारी हे वसलय.माझ एक आवडत देउळ.खर तर देउळ साधास आणि छान आहे.पण त्याभोवतीचा परिसर जास्त रम्य आहे. शंकरच देउळ असल्याने सहाजिकच सोमवारी इथे जरा गर्दी असायची आणि श्रावण सोमवार असेल तर जास्तच.नदीकिनारी असल्याने नदीत उतरायला छोटासा घाट आहे.७/८ पायरया असतील जांभया दगडाच्या.तिथून मस्त नदीच रुंद अस पात्र दिसत.पायरया उतरुन नदीत पाय धुवायचे आणि मग देवाच्या दर्शनाला जायच अस आमच ठरलेल असे.देवळात गेल की आधी छान मांडव आणि मग समोर आधी नंदी आहे.त्याला नमस्कार करून पुढ ४ पायरया उतरुन मग गाभारा आहे.आत शंकराची कळिभोर पिंड आहे.अर्थतच इतर बर्याच देवळांप्रमाणे इथे देखील गाभर्यात स्त्रियाना प्रवेश नाही.देवळाच्या प्रवेशद्वारपासून थोड्याच जवळ २/४ बाकडी टाकाली होती बसण्यासाठी.शहरापासून जरा बाजूला असलयाने खूपच निवांत असायच इथल वातावरण.खूप शांतता,देवळाचा रम्य परिसर.नदीच्या पलिकडे चिपळूण च रेल्वे स्टेशन.आता गाड्यांची सख्या वाढली तशी सुरवातीला नव्हती,त्यामुळे तिथे खूपच शांत वाटायच.मधूनच एखादी गाडी गेली तरी ते सुध्हा चित्रातल्याप्रमाणे किंवा गोष्टीप्रमाणे वाटायच. रेल्वे स्टेशन झाल्यावर सहाजिकच माणसांची गर्दी वाढली.देवळाजवळचा पूल हे माझ मोठ आकर्षण होत.मी आणि माझी मैत्रिण केतकी,आम्ही रोज संध्याकाळी पुलावर जायचो.पुलाच्या दोन्ही बाजूला फूटपाथ आहेत.गाडी कडेला ठेवून आम्ही तिथेच गप्पा मारत बसायचो.संध्याकाळी खूपच मस्त वाटायच तिथे.सगळे पक्षी थव्याने घरट्याकडे परतत असायचे,संधिप्रकाशाचे रंग आकाशात खुलून यायचे,सूर्य अस्ताला जणायची तयारी करू लागायचा आणि अशा वेळी सुंदर सुखद असा वारा सुटायचा.केवळ अप्रतिम हाच शब्द त्या वेळेला योग्य असू शकतो.बर्याच वेळेला आम्ही दोघी निशब्द बसून रहायचो.काही न बोलता फक्त अनुभव साठवत रहायचो.खाली नदीच पाणी पण इतक संथ असायच की जणू दिवस मावळला तर आपल वाहण्यच काम देखील संपल अशा थाटात नदी देखील आराम करीत आहे अस वाटायच.तेव्हा पुलावर फारशी गर्दी नसायची.मधूनच कोणीतरी देवळात आल की घंटेच आवाज यायचा.संध्याकाळी ७ वाजता देवळता आरती व्ह्यायची तेव्हा आरती आणि घंटा यांचा इतका सुंदर आवाज त्या वातावरणाला आणखी प्रसन्न करायचा. कधी आम्ही नुसतीच देवळाजवळच्या बाकड्यांवर बसायचो.तिथून मग संध्यकाळची एखादी रेल्वे जाताना दिसायची.तिची शिट्टी सुध्हा अगदी तेव्हा छान वाटायची.स्टेशन अगदीच जवळ असल्याने तिथल्या सूचना सुध्हा ऐकू यायच्या.एखादी रेल्वे येऊन गेली की तेवढ्यापुरती माणसांची आणि रिक्षांची गर्दी व्ह्यायची की परत शांतता.सूर्य हळूहळू मावळला आणि संधिप्रकाश देखील अगदी कमी होऊन अंधाराच्या जवळपास पोचला की मग आम्ही निघायचो.जाताना पश्चिमेकडे एक ठळक असा तारा उगवलेला असायचा.त्याचा निरोप घायचो. केतकी च घर तिथून अगदीच ५ मिनिटांवर होत.त्यामुळे बर्याच वेळेला मी तिच्याकडे दुपारी अभ्यासाला जायचे आणि मग संध्याकाळी देवळात जाउन,पुलावर जाउन मग आम्ही घरी परतायचो. मी मुंबई ला नोकरीला गेल्यावर सहाजिकच पुलावर जाण थांबल.सुट्टिसाठी आले तरी बरोबर कोणी मैत्रिणी नसल्याने पुलावर जाण होतच नसे.पण रेल्वे ने ये जा होत असल्याने त्या पुलावरून निदान जाता येताना एक खेप व्हायची आणि न चुकता लांबूनच पण देवाला हात जोडले जायचे.आणि मनाच समाधान व्ह्यायच. आता आजकाल तो पूल म्हणजे कपल्स पॉइंट झाला आहे.गावाबाहेर असल्याने प्रेमी युगुलाना आयतच स्थान मिळाल.नशीबाने देवळाजवळ गर्दी नसते.मात्र या गर्दी मुळे भेळपुरीच्या गाद्या सुध्हा सहाजिकच तिथे डेरा टाकून बसल्या आणि माझ्या अनमोल जागेचा निवांतपणा घालवून बसल्या .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2687
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान आठवण आहे. शहरातील बर्‍याचशा जागांची असलीच परिस्थीती झाली आहे. पुर्णविरामचिन्ह दिल्यानंतर लिहीलेले वाचनासाठी आपल्या नजरेने, श्वासाने तसेच पुढील वाक्य लिहीण्यासाठी बोटांनीही थोडा विराम विराम घेतला पाहीजे. असो. मी पयला.

In reply to by खटपट्या

आपल्या मताचा आदर आहेच. पण.... प्रत्येक अनुभवाचा पुन:प्रत्यय घेण्यासाठी फोटो, छायाचित्र घेणे हा पर्याय असू शकतो पण तेच (फोटो/ छायाचित्र) अंतिम धेय्य नसावे. लेखिकेच्या मनाच्या कप्यात त्या घटनास्थळाबाबत अनेकविध स्मृती गुंफल्या गेलेल्या आहेत. नदी, त्याकाठी असलेले शांत वातावरणातील मंदीर, तो घंटेचा नाद, हळूवार पणे कधीतरी त्या नजरेच्या टप्यात येणारी रेल्वे, रस्त्यातून पुलावरून लगबग करीत जाणारे प्रवासी, शांत कमी वाहतूक असणारा रस्ता, अस्ताला जाणारा सुर्य, त्याच्या किरणांची आकाशात झालेली सरमिसळ, तो संधीप्रकाश नदीच्या पाण्यात प्रतिबिंबीत होवून निर्माण झालेले गुढरम्य वातावरण अन तेथे उपस्थीत असलेली जिवाभावाची मैत्रीण, तिच्याशी मारलेल्या गप्पा असल्या काव्यमय वातावरणाची अनुभूती छायाचित्रचा डोळा फारच तोकडा असेल. वर लेखात असलेले भावरम्य वातावरण रंगविण्यासाठी छायाचित्राऐवजी चित्रकला हा पर्याय होवू शकतो. त्याचा कॅनव्हास छायाचित्रापेक्षा कधीही मोठा तसेच कलेचे अधिष्ठान असलेला आहे. छायाचित्र ही यंत्रधिष्ठीत कला (??) आहे. त्याच्या वापराला काही मर्यादा निश्चित आहेत. जेथे काव्याचे नाते एखाद्या घटनेशी जडले जाते तेव्हा छायाचित्र असणे गरजेचे नसते, व त्याची उपस्थिती जेव्हा होते तेव्हा केवळ घटनेचे वृत्तांकन होते. जेथे एखादी घटना काव्यमय, हळूवार, मनाच्या जवळ होते तेव्हा त्या घटनेचे छायाचित्र असणे गरजेचे नसते, व त्याची* उपस्थिती (कॅमेरा/ छायाचित्र) जेव्हा होते किंवा त्याची* गरज भासते तेव्हा त्या घटनेचे वृत्तांकन केवळ होते. लेखिकेच्या मनाच्या फिल्मवर (आताच्या युगातील कॅमेर्‍याच्या तुलनेत 'मेमरी कार्डवर') चिपळूणच्या गांधारेश्वरच्या परिसराचे जे (छाया)चित्र रेखाटले गेले आहे त्याची सर जगातल्या कोणत्याही अत्यूच्य कामगिरी करणार्‍या कॅमेर्‍यात छायाचित्राच्या माध्यमातून बंदीस्त करणे अशक्य आहे.

In reply to by पाषाणभेद

@जेथे एखादी घटना काव्यमय, हळूवार, मनाच्या जवळ होते तेव्हा त्या घटनेचे छायाचित्र असणे गरजेचे नसते, व त्याची* उपस्थिती (कॅमेरा/ छायाचित्र) जेव्हा होते किंवा त्याची* गरज भासते तेव्हा त्या घटनेचे वृत्तांकन केवळ होते. लेखिकेच्या मनाच्या फिल्मवर (आताच्या युगातील कॅमेर्‍याच्या तुलनेत 'मेमरी कार्डवर') चिपळूणच्या गांधारेश्वरच्या परिसराचे जे (छाया)चित्र रेखाटले गेले आहे त्याची सर जगातल्या कोणत्याही अत्यूच्य कामगिरी करणार्‍या कॅमेर्‍यात छायाचित्राच्या माध्यमातून बंदीस्त करणे अशक्य आहे.>>>> +++++++++११११११११११११ भेदकपाषाण यांचेशी अत्यंत सहमत!

तुमी पन चिपलूनच्या? आम्ही ८ वर्षे लोट्याला होतो.त्यामुळे चिपळूण म्हटले की, मनाचा एक कोपरा हळवा होतो. आस्वाद मधली "कुर्मा-पुरी" आणि दीपक मधले जेवण अजुन पण आठवते. विंध्यवासिनी आणि पेट्रोलपंपा जवळचा नवसाला पावणारा गणपती.(माझ्या अंदाजाने त्यालाच तळ्यातला गणपती, म्हणत असावेत) नाट्के बघीतली खूप पण मनापासून नाटक एंजॉय केले ते चिपळूणलाच. शिवाय आपले मंदिर म्हणजे, लो.टि.स्मा. वाचनालय. ताई, परत एकदा माझे मन चिपळूणला जावून आले.त्याबद्दल धन्यवाद.बराच फिरलो पण डोंबोली, चिपळूण, खेड आणि वलसाड म्हटले की मन टवटवीत होते.