पडघम २०१४-भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये
पडघम २०१४-भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये
यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली
भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश
भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड
भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये
आता या भागात आपण पूर्व भारतातील राज्यांविषयीचे अंदाज बघू.
ओरिसा
ओरिसा राज्यात २१ जागा आहेत.राज्यात नवीन पटनायक यांचे बीजू जनता दलाचे सरकार गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत आहे.राज्यात मुख्य लढत बीजद आणि कॉंग्रेस यांच्यात आहे. राज्यात नवीन पटनायक यांचा निर्विवाद अंमल आहे.मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते भुपिंदर सिंग, पक्षाचे दुसरे नेते अनूप साई आणि इतर काही नेते बीजदमध्ये सामील झाले आहेत.(महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते नारायण राणे स्वत: कॉंग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेला जसा झटका बसला होता तसा झटका ओरिसात कॉंग्रेसला बसला आहे). राज्यात भाजप विशेष बळकट नाही.तरीही राज्याच्या पश्चिम भागात पक्षाचे काही प्रमाणावर स्थान आहे.राज्यात नेते सोडून गेल्यामुळे कॉंग्रेस काही प्रमाणावर कमजोर झाली आहे.त्याचा फायदा भाजपला नक्कीच मिळेल असे वाटते. भाजपने राज्यात सुंदरगढ, बालासोर, कालाहंडी अशा २-३ जागा जिंकल्या तर मला विशेष आश्चर्य वाटणार नाही. मला वाटते राज्यात पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये ४२ जागा आहेत.राज्यात तृणमूल कॉंग्रेसचे ममता बॅनर्जींचे सरकार गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे परिस्थिती होती:
तर २०११ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती होती:
राज्यात मुख्य लढत तृणमूल कॉंग्रेस विरूध्द डावी आघाडी अशी आहे. कॉंग्रेसचे काही पॉकेट्समध्ये (जांगीपूर, मालदा इत्यादी) बळ आहे. राज्यात भाजपला विशेष स्थान नाही (२००९ मध्ये दार्जिलिंगमधून जसवंतसिंग गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट च्या पाठिंब्यावर निवडून आले होते).यावेळी भाजप राज्यात आपली मतांची टक्केवारी नक्कीच वाढवेल पण ती लोकसभेची जागा जिंकण्याइतपत असेल असे वाटत नाही.राज्यातील अलीपूरदुआर्स, आरामबाग, बोलपूर, बांकुरा, विष्णूपूर, बरद्वान-दुर्गापूर, कूचबिहार, पुरूलिया यासारख्या आपल्या बालेकिल्ल्यातून डावी आघाडी नक्कीच जिंकेल. मालदा उत्तर आणि दक्षिण, रायगंज आणि जांगीपूर या ४ जागांवर कॉंग्रेसचा विजय व्हायला हरकत नसावी. मला वाटते की राज्यात पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल
बिहार
बिहारमधले अंदाज मतदारसंघनिहाय वर्तवता येणे मला शक्य नव्हते याचे कारण म्हणजे १९९६ पासून असलेली जदयु आणि भाजप यांच्यातील युती गेल्या वर्षी तुटली.१९९९६,१९९८,१९९९,२००४ आणि २०००९ अशा पाच निवडणुका या दोन पक्षांनी युती करून लढविल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात दोन पक्षांची स्वतंत्र ताकद किती आहे हे समजणे तसे कठिणच.
२००९ मध्ये राज्यात पुढीलप्रमाणे परिस्थिती होती:
तर २०१० च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राज्यात पुढीलप्रमाणे परिस्थिती होती:
यावेळी भाजप आणि रामविलास पासवानांच्या लोकजनशक्ती पक्षांची युती आहे.तर लालूंचा राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस यांची युती आहे. नितीश कुमारांचा जनदा दल (संयुक्त) स्वबळावर निवडणुक लढवत आहे.
बिहारविषयी जी काही थोडीफार माहिती मला आहे त्यावरून मला वाटते की कॉंग्रेस सासारामची जागा नक्की जिंकेल (मीरा कुमार). तर भाजप मधुबनी (हुकुमदेव नारायण यादव), कटिहार (निखिल कुमार चौधरी), दरभंगा (किर्ती आझाद), सारण (राजीव प्रताप रूडी), भागलपूर (सय्यद शाहनवाझ हुसेन), पाटणा साहिब (शत्रुघ्न सिन्हा), बक्सार (अश्वनी कुमार चौबे) या जागा नक्कीच जिंकेल.तसेच लोकजनशक्ती हाजीपूर (रामविलास पासवान), समस्तीपूर (रामचंद्र पासवान) आणि जमुई (चिराग पासवान) या जागा नक्कीच जिंकेल. राष्ट्रीय जनता दलाला अरारीया (महंमद तस्लिमुद्दिन), दरभंगा (महंमद अली अश्रफ फातमी), वैशाली (रघुवंश प्रसाद सिंग), महाराजगंज (प्रभुनाथ सिंग) या जागा जिंकणे जड जाऊ नये.
राज्यात भाजपची साथ सोडल्याचा फटका नितीश कुमार यांना नक्कीच बसेल. ज्या कारणासाठी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली (नरेन्द्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केल्यामुळे अल्पसंख्यांकांच्या मतांचा फटका बसेल) ते पूर्ण होताना दिसत आहे असे वाटत नाही.उलट अल्पसंख्यांकांची मते लालूंच्या राष्ट्रीय जनता दलामागे जातील. राज्यात उच्चवर्णीयांची संख्याही उल्लेखनीय आहे.हा समाज भाजपच्या मागे उभा राहिल (यात ज्येष्ठ नेते अश्वनी चौबे यांचा प्रभावही कारणीभूत असेल).नितीश कुमारांमागे त्यांची कुर्मी (आणि कोयरी) समाजाची तसेच पासवान समाज वगळता मागासवर्गीय मते (ज्यांना नितीश कुमार यांनी महादलित म्हटले होते) मिळतील (त्यातही भाजप काही मते आपल्याकडे वळवेल असे वाटते). तर यादव आणि अल्पसंख्यांक मते लालू-कॉंग्रेस युतीकडे जातील तसेच यादवेतर ओबीसी मते भाजपकडे जातील. तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमार समर्थकांची मते अधिक प्रमाणात भाजपकडे जातील (२०१५ मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी ही मते नितीश कुमार यांच्याकडे परत जातील) असे वाटते. तेव्हा राज्यात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते:
झारखंड
राज्यात डिसेंबर २००९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.त्यानंतर भाजप-झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार सत्तेत आले.सुरवातीला शिबू सोरेन मुख्यमंत्री झाले.एप्रिल २०१० मध्ये लोकसभेत भाजपने आणलेल्या कपातसूचनेवर मतदान करायला भाजपने शिबू सोरेन यांना दिल्लीला येणे भाग पाडले (त्यावेळी शिबू सोरेन लोकसभेचे सदस्य होते).१९९९ मध्ये वाजपेयी सरकार एका मताने पडले त्यावेळी कॉंग्रेसने ओरिसाचे मुख्यमंत्री गिरीधर गामांग यांना दिल्लीला आणून जो डाव खेळला तो डाव भाजपला उलटवायचा होता.पण शिबू सोरेन यांनी कॉंग्रेसलाच मत दिले आणि भाजपचा चांगलाच मुखभंग झाला.त्यानंतर भाजपने शिबू सोरेन यांच्याकडून राजीनामा घेऊन आपल्या अर्जुन मुंडांना मुख्यमंत्री केले.पुढे हे सरकार पडले.काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार सत्तेत येऊन हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. या सगळ्या प्रकाराचा राज्यातील जनतेला वीट आला नसेल तर नवलच.नरेंद्र मोदींनी रांचीमध्ये केलेल्या भाषणात नेमका हाच मुद्दा मांडला आणि त्याला लोकांचे समर्थन मिळत आहे असे चित्र नक्कीच आहे.
झारखंडमधून १४ पैकी भाजपने १९९६ मध्ये ११, १९९८ मध्ये १२ तर १९९९ मध्ये १३ (त्यावेळी झारखंड हा बिहारचा भाग असताना) जागा जिंकल्या होत्या.पुढे २००४ मध्ये अवघी एक तर २००९ मध्ये ८ जागा जिंकल्या.मला वाटते यावेळी भाजपला १४ पैकी १२ जागा जिंकणे जड जाऊ नये. एक जागा (कोदरमा) माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाला तर एक जागा झारखंड मुक्ती मोर्चाला मिळेल असे मला वाटते.
छत्तिसगड
राज्यात लोकसभेच्या ११ जागा आहेत.तर डिसेंबर २००३ पासून भाजपचे रमणसिंग मुख्यमंत्री आहेत.२००४ आणि २००९ मध्ये भाजपने राज्यात ११ पैकी १० जागा जिंकल्या होत्या. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे परिस्थिती होती:
राज्यातील ११ पैकी ६ (दुर्ग, जांगजीर-चंपा, महासमंद, रायगढ, रायपूर आणि राजनंदगाव) मधून भाजपला तर उरलेल्या ५ (बस्तर, बिलासपूर, कांकेर, कोर्बा आणि सरगुजा) मधून कॉंग्रेसला आघाडी होती.छतिसगडविषयी मतदारसंघनिहाय अंदाज व्यक्त करावेत इतकी माहिती मला या राज्याची नाही.तेव्हा निकाल राज्यपातळीवरच लिहित आहे.
मला वाटते की बसपा आणि इतरांना मिळालेल्या १८.७% फ्लोटिंग मतांपैकी १०% मते भाजप आणि कॉंग्रेसकडे जातील.यात भाजप अर्ध्याहून जास्त मते खाईल तर कॉंग्रेस थोडी कमी.आआपही आदिवासी क्षेत्रांमध्ये मते खाईलच.तरीही भाजपचे पारडे जड राहिल.असे असले तरी २००४ आणि २००९ ची कामगिरी परत एकदा करता येणे पक्षाला थोडे कठिणच जाईल. मला वाटते की राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील:
आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्ये
आसामात १४ जागा आहेत.राज्यात मे २००१ पासून कॉंग्रेसचे तरूण गोगोई मुख्यमंत्री आहेत.राज्यात पक्षाचे वर्चस्व आहेच.आसाम गण परिषदेचा प्रभाव कमी झाल्यानंतर ती पोकळी भाजपने प्रभावीपणे भरून काढली आहे.यातून गुवाहाटी, सिल्चर, मंगलदोई यासारख्या ३-४ जागा भाजपला जिंकायला जड जाऊ नये.आसामात ए.यु.डी.एफ हा अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे.तर कोक्राझारसारख्या ठिकाणी ब्वितमुझियारींसारखे अपक्ष उमेदवार असतात.तेव्हा इतर २ जागा जिंकतील तर कॉंग्रेसला ८ जागा मिळतील असे वाटते.
अरूणाचल प्रदेशात दोन जागा आहेत.या राज्यात नरेंद्र मोदींनी दोन सभा घेतल्या आहेत.माजी मुख्यमंत्री गेगॉंग अपॉंग परत एकदा भाजपत आले आहेत.२००४ मध्ये भाजपने त्यांच्या मदतीने राज्यातील दोनही जागा जिंकल्या होत्या.निवडून गेलेले खासदार त्या भागात बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत (विशेषत: तपीर गाओ). त्यांनी २००९ मध्येही चांगलीच लढत दिली होती. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पूर्ण धुव्वा उडाला पण लोकसभा निवडणुकांमध्ये कामगिरी नक्कीच चांगली झाली.मला वाटते की यावेळी भाजप २००४ ची कामगिरी परत करणार आणि दोन्ही जागा जिंकणार.
उत्तर पूर्वेतील इतर राज्यांमध्ये ९ जागा आहेत.तिथले लहानसहान अनेक पक्ष एन.डी.ए मध्ये आले आहेत.तिथल्या राजकारणाची मला तेवढ्या प्रमाणावर माहिती नाही.तेव्हा या ९ पैकी एन.डी.ए २ तर युपीए ४, सिक्कीममधील एक जागा सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि त्रिपुरातील दोन्ही जागा डावी आघाडी जिंकेल असे धरतो.
तेव्हा पूर्व भारतात पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असे मला वाटते.
| ओरिसा | |
| एकूण जागा | २१ |
| बीजद | १४ |
| भाजप | ३ |
| कॉंग्रेस | ४ |
| पश्चिम बंगाल-२००९ | जागा | मते% |
| तृणमूल कॉंग्रेस+कॉंग्रेस | २६ | ४५.६% |
| डावी आघाडी | १५ | ४३.३% |
| भाजप | १ | ६.१% |
| इतर | ० | ५.०% |
| एकूण | ४२ | १००.०% |
| पश्चिम बंगाल-२०११ | जागा | मते% |
| तृणमूल कॉंग्रेस+कॉंग्रेस | २२७ | ४८.४% |
| डावी आघाडी | ६२ | ४१.१% |
| भाजप | ० | ४.१% |
| इतर | ५ | ६.४% |
| एकूण | २९४ | १००.०% |
| पश्चिम बंगाल | जागा |
| तृणमूल कॉंग्रेस | २५ |
| डावी आघाडी | १३ |
| कॉंग्रेस | ४ |
| बिहार-२००९ | जागा | मते% |
| एन.डी.ए | ३२ | ३८.०% |
| कॉंग्रेस | २ | १२.०% |
| राजद+लोक जनशक्ती | ४ | २५.९% |
| इतर | २ | २४.१% |
| एकूण | ४० | १००.०% |
| बिहार-२०१० | जागा | मते% |
| एन.डी.ए | २०६ | ३९.१% |
| कॉंग्रेस | ४ | ८.४% |
| राजद+लोक जनशक्ती | २५ | २५.६% |
| इतर | ८ | २६.९% |
| एकूण | २४३ | १००.०% |
| झारखंड | |
| एकूण जागा | १४ |
| भाजप | १२ |
| झामुमो | १ |
| झाविमो | १ |
| छत्तिसगड | |
| एकूण जागा | ११ |
| भाजप | ९ |
| कॉंग्रेस | २ |
| एन.डी.ए | युपीए | जदयु | झाविमो | झामुमो | डावी आघाडी | तृणमूल | बीजद | इतर | एकूण | |
| बिहार | २१ | १४ | ५ | ४० | ||||||
| झारखंड | १२ | १ | १ | १४ | ||||||
| पश्चिम बंगाल | ४ | १३ | २५ | ४२ | ||||||
| ओरिसा | ३ | ४ | १४ | २१ | ||||||
| छत्तिसगड | ९ | २ | ११ | |||||||
| आसाम | ४ | ८ | २ | १४ | ||||||
| अरूणाचल प्रदेश | २ | ० | २ | |||||||
| उत्तर पूर्वेतील इतर राज्ये | २ | ४ | २ | १ | ९ | |||||
| एकूण | ५३ | ३६ | ५ | १ | १ | १५ | २५ | १४ | ३ | १५३ |
Book traversal links for पडघम २०१४-भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@क्लिंटनजी,तुम्ही जी माहिती
गालमध्ये भाजपा चंचूप्रवेश करू
लहान राज्ये