पडघम २०१४-भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
पडघम २०१४-भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली
भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश
सुरवातीला पंजाबमध्ये २००७ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.
तक्ता क्रमांक १
तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात
१. पंजाबमधील निवडणुकांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष/आघाडीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फरक फार नसतो.
२. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत पंजाबमधील प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारने सव्वादोन वर्षे पूर्ण केली होती.हा काळ सरकारविरूध्द प्रस्थापितविरोधी मते फिरण्यास पुरेसा असतो.तसेच मुळात दोन आघाड्यांना मिळालेल्या मतांमध्ये फार फरक नसल्यामुळे थोडी मते फिरली तरी निवडणुकांमधील विजयी पक्ष बदलू शकतो. २००९ मध्ये तसेच झाले. २००४ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही तत्कालीन अनुक्रमे कॉंग्रेस आणि अकाली दल+भाजप सरकारला अशा प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसला होता.
तक्ता क्रमांक २ मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दिले आहेत. सोयीसाठी २००७ च्या विधानसभा निवडणुकांचे निकालही परत एकदा त्याच तक्त्यात दिले आहेत.
तक्ता क्रमांक २
तक्ता क्रमांक २ वरून आपल्याला खालील गोष्टी कळतात:
१. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचा पराभव होणे हा कल अगदी १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बघायला मिळाला होता.पण २०१२ मध्ये तो मोडला गेला आणि अकाली दल+भाजप सरकार परत एकदा सत्तेवर आले. असे का झाले याचे एक कारण आहे.मार्च २०११ मध्ये निवडणुकांना एक वर्ष बाकी असताना मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे मनप्रीतसिंग बादल यांनी अकाली दलातून बाहेर पडून स्वत:चा पीपल्स पार्टी ऑफ पंजाब हा पक्ष स्थापन केला.या पक्षाने अनेक मतदारसंघात अकाली दलापेक्षा कॉंग्रेसचे जास्त नुकसान केले. राज्यपातळीवर असे दिसते की या पक्षाने अकाली दल-भाजपचे जास्त नुकसान केले. पण एकेका मतदारसंघाचे विश्लेषण केल्यास समजते की ज्या मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसला विजयाची चांगली शक्यता होती त्या मतदारसंघांमध्ये या पक्षाने कॉंग्रेसची मते जास्त खाल्ली. उदाहरणार्थ अमलोह, बालाचूर, बुधलादा,खरार,लांबी,मुकेरिअन,फगवाडा या सारख्या अनेक मतदारसंघांमध्ये या पक्षाने अकाली-भाजपपेक्षा कॉंग्रेसचे जास्त नुकसान केले. या पक्षाने अकाली-भाजपचे नुकसान केले असे नाही पण जास्त नुकसान कॉंग्रेसचे केले.यामुळे अकाली दल-भाजप युतीला परत सत्तेत यायला मिळाले. आता हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला आहे आणि मनप्रीतसिंग बादल बठिंडा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहेत.
तक्ता क्रमांक ३ मध्ये २०१२ च्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी दिली आहे.
तक्ता क्रमांक ३
तक्ता क्रमांक ३ वरून आपल्याला कळते की कॉंग्रेसला ३ मतदारसंघात (लुधियाना, पतियाळा आणि संगरूर) आघाडी मिळाली आणि इतर १० मतदारसंघांमध्ये अकाली दल-भाजप युतीला आघाडी मिळाली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकाही मतदारसंघात ही आघाडी १०% पेक्षा जास्त नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे अंदाज
माझे अंदाज पुढील गृहितकांवर आधारीत आहेत:
१. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अकाली-भाजप सरकारला सव्वादोन (खरे तर सव्वासात) वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे पंजाबातील परंपरेप्रमाणे प्रस्थापितविरोधी मतांचा सामना करावा लागेल.
२. पीपल्स पार्टी ऑफ पंजाब आता कॉंग्रेसबरोबर असल्यामुळे तो फायदा कॉंग्रेसला नक्कीच होईल. पण आम आदमी पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत ते प्रस्थापितविरोधी मतांमध्ये काही प्रमाणात फूट पाडतील. विशेषत: लुधियाना सारख्या मतदारसंघात आआपने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींविरोधात लढणारे हरविंदरसिंग फुलका यांना उमेदवारी दिली आहे. तिथे हा परिणाम प्रकर्षाने जाणवेल. तरीही आम आदमी पक्षाची संघटना, कार्यकर्ते आणि ओळखीचे चेहरे पंजाबमध्ये नाहीत त्यामुळे या पक्षाला ८-१०% मते मिळाली तरी ती मते लोकसभेची जागा जिंकायला नक्कीच पुरेशी नसतील.
या पार्श्वभूमीवर मला वाटते की राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील:
१. अमृतसर: या मतदारसंघात भाजपचे अरूण जेटली आणि कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग उमेदवार आहेत.अमृतसरमध्ये भाजप बराच बळकट पक्ष आहे (२००९ मध्ये भाजपने राज्यात एकच जागा जिंकली आणि ती होती अमृतसर). तसेच अरूण जेटली हा लोकांच्या ओळखीचा उमेदवार भाजपाने दिला आहे. अमरिंदरसिंग कॉंग्रेसचे नक्कीच मोठे नेते आहेत.पण ते मुळातले पतियाळाचे आहेत.अमृतसरमध्ये त्यांचाही फार बेस नाही.तसेच ते सुरवातीला अमृतसरमधून लढण्यास अनुत्सुक होते अशा बातम्याही आल्या होत्या.तसेच प्रकाशसिंग बादल यांनी अरूण जेटली यांची ओळख "भारताचे भावी उपपंतप्रधान" म्हणून एका सभेत करून दिली होती.तेव्हा आपले मत भावी उपपंतप्रधानाला (किमान महत्वाच्या मंत्र्याला) दिले जावे या भावनेतून अरूण जेटली जास्त मते घेतील. तेव्हा या मतदारसंघात चुरशीची लढत झाली तरी भाजपचे अरूण जेटली निवडून येतील असे वाटते.
२. गुरदासपूर: या मतदारसंघात भाजपचे विनोद खन्ना आणि कॉंग्रेसचे खासदार प्रतापसिंग बाजवा यांच्यात लढत आहे. २००९ मध्ये प्रतापसिंग बाजवा यांनी विनोद खन्ना यांचा थोडक्यात (०.९% मतांनी) पराभव केला होता.यावेळी देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता बाजवा यांना निवडणुक तितकी सोपी जाणार नाही.मला वाटते या मतदारसंघात भाजपचे विनोद खन्ना जिंकतील.
३. पतियाळा: या मतदारसंघात अकाली दलाचे दिपेन्दसिंग धिल्लन आणि कॉंग्रेसच्या प्रीनीत कौर यांच्यात लढत आहे.प्रीनीत कौर या अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.तसेच पतियाळा हा अमरिंदरसिंग यांचा बालेकिल्ला आहे.इथून कॉंग्रेसचा पराभव होणे कठिणच आहे.
४. बठिंडा: या मतदारसंघात अकाली दलाकडून प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाई (आणि सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी) हरसिमरत कौर बादल विरूध्द कॉंग्रेसचे मनजीतसिंग बादल यांच्यात लढत आहे. म्हणजे लढत बादल कुटुंबियांमध्येच आहे.या मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाईंना त्यांच्या सासऱ्यांच्या सरकारविरूध्द प्रस्थापितविरोधी मताचा फटका बसेल असे वाटते.तेव्हा बठिंडामध्ये कॉंग्रेस येईल असे वाटते.
तेव्हा मला वाटते की पंजाबमध्ये पुढीलप्रमाणे निकाल लागतील:
| पंजाब | २००७ | २००९ | २००७ | २००९ | २००७ | २००९ | |
| मते % | मते % | मतांमधील फरक | विधानसभा जागा | विधानसभा जागा आघाडी | लोकसभा जागा आघाडी | लोकसभा जागा | |
| अकाली दल+भाजप | ४५.४% | ४४.०% | -१.४% | ६७ | ५२ | ११ | ५ |
| कॉंग्रेस | ४०.९% | ४५.२% | ४.३% | ४४ | ६५ | २ | ८ |
| बसपा | ४.१% | ५.७% | १.६% | ० | ० | ० | ० |
| इतर | ९.६% | ५.१% | -४.५% | ६ | ० | ० | ० |
| पंजाब | २०१२ | २००७ | ||||
| मते % | विधानसभा जागा | लोकसभा जागा आघाडी | मते % | विधानसभा जागा | लोकसभा जागा आघाडी | |
| अकाली दल+भाजप | ४१.९% | ६८ | १० | ४५.४% | ६७ | ११ |
| कॉंग्रेस | ४०.१% | ४६ | ३ | ४०.९% | ४४ | २ |
| बसपा | ४.३% | ० | ० | ४.१% | ० | ० |
| पीपल्स पार्टी ऑफ पंजाब | ५.०% | ० | ० | |||
| इतर | ८.७% | ३ | ० | ९.६% | ६ | ० |
| लोकसभा मतदारसंघ | अकाली+भाजप | कॉंग्रेस | पीपल्स पार्टी ऑफ पंजाब | बसपा | इतर | एकूण | आघाडी पक्ष | आघाडी % |
| अमृतसर | ४८.६% | ३९.४% | ०.७% | १.०% | १०.३% | १००.०% | अकाली+भाजप | ९.१% |
| आनंदपूर साहिब | ३७.३% | ३६.६% | ८.४% | १२.५% | ५.१% | १००.०% | अकाली+भाजप | ०.६% |
| बठिंडा | ४२.२% | ३९.३% | ९.०% | २.०% | ७.५% | १००.०% | अकाली+भाजप | २.९% |
| फरिदकोट | ४२.९% | ४१.४% | ७.७% | १.७% | ६.३% | १००.०% | अकाली+भाजप | १.५% |
| फतेहगड साहिब | ३९.४% | ३८.२% | १२.८% | ३.८% | ५.७% | १००.०% | अकाली+भाजप | १.१% |
| फिरोझपूर | ३७.९% | ३७.७% | ४.५% | २.४% | १७.५% | १००.०% | अकाली+भाजप | ०.२% |
| गुरदासपूर | ४५.२% | ४२.५% | ०.८% | १.४% | १०.१% | १००.०% | अकाली+भाजप | २.७% |
| होशियारपूर | ४२.९% | ३६.७% | ३.४% | ८.५% | ८.५% | १००.०% | अकाली+भाजप | ६.३% |
| जालंधर | ४३.२% | ३७.९% | २.३% | १२.७% | ३.९% | १००.०% | अकाली+भाजप | ५.२% |
| खंडूर साहिब | ४७.४% | ४३.३% | १.२% | १.०% | ७.१% | १००.०% | अकाली+भाजप | ४.०% |
| लुधियाना | ३८.४% | ३९.८% | ३.०% | ३.२% | १५.५% | १००.०% | कॉंग्रेस | १.४% |
| पतियाळा | ३८.५% | ४४.४% | २.९% | २.९% | ११.३% | १००.०% | कॉंग्रेस | ५.८% |
| संगरूर | ४२.०% | ४३.३% | ७.८% | २.९% | ४.०% | १००.०% | कॉंग्रेस | १.३% |
| एकूण | ४१.९% | ४०.१% | ५.०% | ४.३% | ८.७% | १००.०% |
| एकूण जागा | १३ |
| कॉंग्रेस | ८ |
| अकाली दल+भाजप | ५ |
Book traversal links for पडघम २०१४-भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
हे विश्लेषण चुकावं अशी इच्छा
अंदाज चुकवा असंच वाटत असला