काही दीवसांपुर्वी आलेल्या मॉल संस्कृति धाग्यावर बर्याचजणांनी मॉलमधून भाजी न घेता रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून आपण का खरेदी करतो / करावी याची कारणे दीली आहेत.
माझ्या माहीतीतले बरेच लोकही त्याच मताचे आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की हेच लोक आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतो हे कंटाळा येईपर्यंत सांगत असतात. पण फेरीवाल्यांमुळे कायदेशीरपणे दुकान चालवणार्या दुकानदारावर होणारया अन्यायाचे भागीदार असतात.
बाकी फेरीवाल्यांकडील मालाचा दर्जाची काही खात्री नसणे, फेरीवाल्यांमुळे वाढणारा शहराचा बकाल पणा, त्यांनी केलेल्या घणीमुळे वाढणारी रोगराई, ती निस्तरताना पालीका, शासन यंत्रंणा यांचावर येणारा ताण, शासनाचा बुडणारा महसुल, करदात्यांच्या पैशाचा होणारा अपव्यय, लोकांची होणारी गैरसोय, परप्रांतीयांचे वाढणारे लोंढे, त्या अनुशंगाने वाढणारी झोपडपट्टी अशा समस्या असतातच.
मग या सगळ्याला कारणीभुत असलेल्या फेरीवाल्यांना सहानुभुती आणि उत्तेजन देउन आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत नाही का?
आपल्याला वाचणारे आपले थोडेसे पैसे या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहेत का? आपण जर वाढलेल्या रोगराईला बळी पडून, किंवा गाडीवरचे खाउन एकदा जरी आजारी पडलो आणी डॉक्टरकडे गेलो व सुट्टी घेउन घरी बसलो तर वाचवलेल्या सर्व पैशांपेक्षा जास्त पैसे घालवणार नाही का?
मग खरोखरच फेरीवाल्यांकडून खरेदी करणे गरजेचे (/वर्थ) आहे का?
प्रतिक्रिया
22 Oct 2013 - 6:19 pm | अनिरुद्ध प
मॉल किवा तथाकथीत सुपर मार्केट हे फक्त शहरांपुरते मर्यादीत आहेत्,अजुनही माझ्या माहीती प्रमाणे ६०% जनता खेडेगावात रहाते त्यांचे काय ? आणि सगळेच मॉल हे कर पुर्णता भरतात असे आपण खात्रीपुर्वक सान्गु शकता काय? कारण बर्याच मॉल मध्ये सुद्धा मी सणासुदीला छोटे स्टॉल लावलेले बघीतले आहेत्,ज्याची काहि पावती मिळत नाही,तसेच गरीब माणसे मॉल मध्ये खरेदी करण्याची क्षमता नसलेले असतात,बर्याच अंशी आपला लेख हा एकान्गी वाटत आहे.
23 Oct 2013 - 11:37 am | नेत्रेश
केवळ मॉलच नाही,केवळ मॉलच नाही तर फेरीवाले सोडून इतर कायदेशीर दुकानात, मंडईत खरेदी करता येउ शकते.
लेखामध्ये मॉल/ दुकान/ मंडई असच उल्लेख करायला हवा होता.
22 Oct 2013 - 6:52 pm | गवि
शहरांबाबत बोलायचं झालं तर, मॉलमधे खालील वस्तू खरेदी कराव्यातः
१. अखाद्य वस्तू (ब्रश, पेस्ट, फिनाईल, दाढीची ब्लेडे, साबण, डिओ)
२. खाद्य कोरड्या वस्तू (बिस्किटे, फरसाण, पॅक्ड कोरडे स्नॅक्स)
३. इलेक्ट्रॉनिक वस्तू
४. ग्लासेस, कटलरी
५. मासे आणि इतर फ्रोझन पदार्थ.
६. मोठ्या यादीच्या रुपातले सामान (जे एकाच ठिकाणी एकाच बिलावर घेण्यात निव्वळ सोय आहे)
इथे महत्वाची टिपणी: बर्याच जणांना असं वाटतं की रस्त्यात बसलेल्या कोळणींकडून जास्त "ताजे" मासे मिळतात. पण ९९ टक्के फिश मार्केट्सबाबत हा गैरसमज आहे. कोंकणात समुद्राच्या जवळ असलेल्या - नुसत्या बीचच्या जवळ नव्हे तर प्रत्यक्ष कोळीवाड्याच्या जवळ असलेल्या माम्यांचा अपवाद सोडता - अन्यत्र शहरांत ज्या बायका टोपलीत भरुन मासे आणतात त्यांचे शेल्फ लाईफ आधीच संपलेले असते. समुद्रातून मासा बाहेर काढणे आणि आपण तो विकत घेणे या दोन घटनांमधलं अंतर अशा बाजारात नक्कीच कमी असतं. पण मॉलमधे बर्फात ठेवलेले मासे किंवा बर्फाच्या लादीतच पॅक केलेले फ्रोझन मासे / झिंगे वगैरे हे जास्त काळाने आपल्याकडे येत असले तरी ते "खराब झालेले नसणे" अशा अर्थाने जास्त ताजे आणि आरोग्यदायी असतात.
याचं कारणः
टोपलीतून रस्त्याकडेला येणारे मासे जुजबी प्रमाणात असमान बर्फाचा चुरा टाकून आणलेले असतात. ते डिस्प्लेसाठी ठेवताना बर्फ पूर्ण काढला जातो. टोपलीत जो काही थोडा असतो तो लगेचच वितळतो. बाहेर रस्त्यावर ऊन, उष्णता आणि धूळ वगैरे घटक असल्याने मांस लवकर खराब व्हायला सुरुवात होते. मूळ माश्यापेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या माश्या त्यावर घोंघावत असतात. त्या माश्या काँटॅमिनेशनचे काम तातडीने करतात. कितीही हाकलले तरी मांजरे तोंड लावायची राहात नाहीत.
मॉलमधे येणारे (विशेषतः ब्रँडेड) मासे तसेच नुसते गोठवलेले मासेही सोर्समधेच बर्फाळवलेले असतात आणि त्यांची वाहतूक बंद फ्रीझर वाहनांतून प्रमाणित पद्धतीने होण्याची शक्यता बरीच जास्त असते. मॉलचे फ्रीझ दिवसदिवस बंद पडत नाहीत. त्यामुळे भले चार दिवस जुने मासे असतील पण ते पूर्णपणे हायजेनिक आणि तशा अर्थाने "ताजे" राहिलेले असतात.
रस्त्यातल्या बाजारातले मासे पाण्यातून काढून आपल्या हाती इतके ताजे नसतातच. तेही एखाददुसरा दिवस जुनेच असतात. आणि ते एकदोन दिवस अत्यंत वाईट पद्धतीने स्टोअरेज आणि हाताळणी झाल्याने ऑलरेडी शिळे झालेलेच असतात.
सबब मासे मॉलमधून घ्यावेत. हाच मुद्दा गोद्रेज रियलगुड चिकन, आणि अन्य मांसाहाराला लागू होतो.
पालेभाज्या मात्र रस्त्याकडेला चांगल्या मिळतात. मॉलमधे फ्रोझन पालेभाज्या फारशा ठेवत नसल्याने त्या माना टाकून निस्तेज पडलेल्या दिसतात. बाकीच्या फळभाज्या, ज्या दोनचार दिवस टिकू शकतात त्याही मॉल्समधून घेण्याला प्राधान्य.
मॉलमधे काय घेऊ नये:
ताजे बनवून खाण्याचे पदार्थ, ओले खाद्यपदार्थ (सँडविच, भेळ, पॅटिस इ इ)
बाकी वडापाव, सामोसापाव वगैरे अबरट चबरट खाणं रस्त्यावर चांगलं मिळतं कारण तिथल्यातिथे बनवून गरम देतात.
मॉलमधे हे पदार्थ थंडगार आणि सकाळी बनवलेले संध्याकाळी तसेच पडलेले असतात.
फेरीवाल्यांना उत्तेजन हा या धाग्यातला अॅंगलही विचार करण्यासारखा आहेच.
अर्थात इथे लीगल फेरीवाले इल्लीगल फेरीवाले हा एक वेगळाच विषय झाला. वर दिलेला प्रतिसाद हा सगळेच फेरीवाले इल्लिगल नसतात आणि त्यापैकी मंडईत किंवा नगरपालिकेच्या निर्देशित मासळीबाजारात कट्ट्यावर बसणारे परवानाधारक असतात त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे असं समजावं. हेही रस्त्यावरचेच समजले पाहिजेत. मॉलप्रमाणे स्वच्छ आणि प्रमाणित वातावरण मंडईत तयार झाले तर तेही मॉल समजावेत.
22 Oct 2013 - 6:57 pm | ग्रेटथिन्कर
धागाकर्त्याशी सहमत.
22 Oct 2013 - 8:43 pm | बाळ सप्रे
मॉल वि. फेरीवाले/ पथारीवाले या ऐवजी ..
मॉल/ दुकान/ मंडई यासारख्या जागा वि. फेरीवाले/ पथारीवाले /तत्सम जागा (ज्यामुळे गावाला/ शहराला बकालपणा येतो, वहातुकीला त्रास होतो अशा) असं वर्गीकरण हवं..
23 Oct 2013 - 11:30 am | नेत्रेश
लेखामध्ये मॉल/ दुकान/ मंडई असच उल्लेख करायला हवा होता.