"Mindfulness And Mone" हे "Kulanand & Domnic Houlde" या लेखकद्वयीचे पुस्तक परत वाचले. नावावरुन लक्षात आलेच असेल "पैसा" या विषयाची बुद्ध धर्माच्या शिकवणीशी सांगड घालणारे हे पुस्तक आहे. याविषयी एक लेख लिहीला होता पण त्याच्यात अधिक भर घालून हा लेख लिहीते आहे.
बुद्धधर्मात भवचक्र अर्थात संसार/कालचक्र महत्त्वपूर्ण मानले आहे. या कालचक्राच्या भागांची आणि एक लहानसा आर्थिक निर्णय घेताना, मारीया नामक एका काँप्युटर प्रोग्रॅमरच्या मनोकायीक स्थित्यंतराची घातलेली रोचक सांगड या पुस्तकात वाचावयास मिळते. ती मांडण्याचा प्रयत्न करते. पुस्तकाचा पूर्ण गाभा मला कळला आहे असा माझा दावा नाही.तसेच लेखकाकडून देखील काही तृटी राहीलेल्या असू शकतात.
वरती आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका अजस्त्र प्राण्याच्या मुखामध्ये हे चक्र दिसते. हा प्रणी अन्य कोणी नसून प्रत्यक्ष "यम" आहे.यमाने गिळंकृत केलेले हे चक्र ४ भागात (Concentric वर्टुळांमध्ये) विभागले आहे.
पैकी सर्वात बाहेरचे वर्तुळ आर्यांनी ६ भागात विभागलेले दिसते. एका भागात देवयोनीतील जीव गायन-वादनादि कलांचा आस्वाद घेण्यात रममाण झालेले दिसत आहेत.
तर त्यालगतच्या भागात राक्षस योनीतील लोक हिंसा व लढाई करण्यात मष्गुल झालेले दिसतात.
एक भाग पशूयोनीतील जीवांच्या क्रीडा दाखवितो ज्यात नाना प्रकारचे पशूपक्षी ऊन खात पहुडले आहेत तर काही भक्ष्याच्या शोधार्थ रानावनात भटकत आहेत. काही शिकार करत आहेत तर काही निद्राधीन झाले आहेत.
सर्वात खालच्या भागात नरकयोनीतील जीव व त्यांच्या यातना पहावयास मिळतात ज्यात यमदूत काहीजणांना उकळत्या तेलामध्ये फेकत आहेत तर काही जणांना तापलेल्या सळईचे डाग देत आहेत.
नंतर येते पिशाच्च्योनीचे जग.यामध्ये अतृप्त वासना राहीलेले जीव भटकताना दिसत आहेत.
व शेवटी मानवांचे जग आहे ज्यात कोणी कामावर जात आहे तर कोणी अभ्यास करत आहे, कोणी विश्रांती घेत आहे तर कोणी खेळ खेळत आहे.
लेखकाने पुढे मारीयाचे उदाहरण देऊन हे मांडले आहे की या साही सृष्टी बाह्य जगतात अस्तित्वात नसून आपण मनोव्यापारांच्या पातळीवर सतत यापैकी कोणती ना कोणती सृष्टी अनुभवत असतो. कधीकधी तर एका दुपारीत या साही जगातून आपण फेरफटका मारून येतो. कसे ते मारीयाच्या उदाहरणातून लेखक स्पष्ट करतो.
मारीयाची कहाणी पाहू. मारीया जिममधून नुकतीच घरी परतली आहे. आज वर्काआऊट चांगले झाल्याने ती स्वतःवरच बरीच खूष आहे. मारीया काँप्युटर प्रोग्रॅमर आहे. ८ तास बैठे काम करून करून आखडलेल्या स्नायूंना पूर्ववत करण्यासाठी मारीया नेहमी जिममध्ये जाते. तिचा तो आवडता छंद आहे. खरं तर तिचा बॉयफ्रेंड आज कामानिमित्त दुसर्या गावी गेल्याने मारीया एकटी आहे आज ती फक्त पिझ्झा-बीअर चापून झोपू शकते. अरे हे काय मारीयाला आठवले की तिने आजच एक नवीन सँडल्सचा जोड घेतला आहे. ती पिशवीतून तो जोड बाहेर काढून निरखू लागते. पण ती खूष का दिसत नाही? या महीन्यातला तिचा तीसरा जोड आणि एकूण संग्रहातला ३२ वा. बाप रे! तिला स्वतःलाच शंका येते की तिला खरेदीची OCD आहे की काय? दर वेळेला हे असेच होते नवीन जोड ती विकत घेते खरी पण घरी आल्यानंतर त्या जोडाचे आकर्षण, नावीन्य ओसरून गेलेले असते. कधी तिला टाच फार ऊंच वाटते तर कधी रंग अनाकर्षक वाटू लागतो. गंमत म्हणजे या तृटी दुकानात तिच्या लक्षात येत नाहीत. आजही तेच घडलं आहे. साधारण अशाच फॅशनचा जोड तिच्याकडे आहे असे तिचे दुसरे मन सांगू लागले आहे. हेच $९५ तिने जर एखाद्या गरजू व्यक्तीला दिले असते तर? तिचे मन तिला खात आहे. रोज तर कोपर्यावर अनवाणी भिकारी तिला दिसतो.गुन्हेगारी भावनेने घेरलेली मारीया उठून कपडे वॉशींग मशीनमध्ये टाकते व परत कॉप्युटर उघडून मेल्स पाहू लागते.
कमी पगाराची ही नोकरी तिने केवळ फ्लेक्झिबल तासांकरता स्वीकारली आहे. पण सध्या कंपनीत कामाचा ताण इतका आहे की तिला दिवसाचे ८ तासही कमी पडत आहेत वर पगार कमी तो कमीच व पगारी रजाही कमी आहेत. कालच तिने तिच्या टीम लीडर सहकार्याला टोनीला पगारवाढीसंदर्भात विनंतीवजा मेल पाठवली. मारीयाच्या हाताची बोटी, मनगटही आजकाल दुखते. नक्की कार्पेल टनेलची लक्षणे. अरे हे काय ... टोनीने मेलला उत्तर तर पाठविले आहे पण पगारवाढ तर सोडाच त्याने तिला कामात चूका टाळण्याबद्दल ताकीद दिली आहे. नालायक आहे टोनी. लायकी नसताना लीडर झाला आहे. कंपनीदेखील बकवास आहे. कामा करणार्या लोकांची शोषण करणारी ही कंपनी खरं तर तोट्यात गेली तर बरं होईल. आता मारीयाचा रागाचा पारा वाढू लागला आहे. ती या पिळवणूकीविरुद्ध कंपनीला कोर्टात खेचणार आहे, नाही नको त्यापेक्षा असे शोषण होणार्या पीडीतांची वेबसाईटच ती सुरु करेल. मग कंपनीची लक्तरे काढून पैसे मिळवेल. छे छे काहीतरी केलेच पाहीजे. मारीया रागाच्या तीरमीरीत घराबाहे पडते व नेहमीच्या बागेच्या दिशेने निघते.
पण थंडगार वार्याने तिचा संताप हळूहळू निवळत चालला आहे. हिरवी झाडे, पक्षी, बागेत खेळणारी लहान मुले तिला प्रसन्न करु लागली आहेत. कदाचित मगासचा राग अनाठायी होता. घरी गेल्यावर मैत्रिणीला फोन करण्याचे मारीया ठरवते. या मैत्रिणीची साईट आहे. मारीया स्वतः काढलेली चित्रे या साईटवर प्रदर्शित करु शकेल. तिच्या चित्रकल्च्या छंदातून वरकमाईही होईल व समाधानही मिळेल. वा काय सुरेख बेत आहे. मारीया आशावादी मनस्थितीत परत घराकडे वळते.
वरील उदाहरणात मारीयाचा प्रवास साही लोकातून कसाकसा होत गेला ते आता पाहू. ८ तास काम करून मेंदू आणि शरीर बधीर झालेली मारीया थकून गेलेली होती. तिला इतकी मरगळ आलेली होती की पिझ्झा खाणे व झोपणे यापलीकडे विचारही ती करू शकत नव्हती. ही तिची मनस्थिती "पशूलोकाचे" प्रतिनिधीत्व करते. पशूंना आहार, मैथुन, निद्रा यपलीकडे गरजा नसतात. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणे व नंतर खाऊन पीऊन निवांत झोपणे यापलिकडचा विचार मारीयाला शिवत नव्हता.
आपला पशूलोकात वावर असण्याची चिन्हे -
(१)दिवस दिवस कामाचा रगाडा उपसण्यात जीवनातील आनंदास मुकणे
(२) सुट्टीच्या दिवशी बधीरपणे बाजारहाट करून उरलेला काळ खाणे व झोपणे यात घालविणे
(३) घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे राबणे
पिशच्चलोक - ३१ सँडल्स असतानाही दुपारी मारीयाने अजून एक जोड खरेदी केला व नंतर पस्तावली ही तिची मानसिक अवस्था पिशच्च्लोकाचे प्रतीकच आहे.
"वखवख" हा पिशाच्चांचा स्थायीभाव असतो. थुलथुलीत पोटाची व बारीक मानेची, भकास डोळ्यांची पिशच्चे जे काही खातात पीतात त्याचे राखेत अथवा घाणीत रुपांतर होते. कधीही तृप्ती न मिळणारे हे जीव समाधानाच्या शोधात भटकत राहतात.
आपला पिशाच्च्लोकात वावर असण्याची चिन्हे -
(१)गरज नसताना केवळ सेल लागला आहे म्हणून किंवा साथवायच्या हेतूने वस्तू जमवित बसणे
(२)उधळपट्टीवर संयम ठेवायचा तर आहे पण काही केल्या जमत नाही.
(३)कोणत्याही प्लॅनींगशिवाय अचानक आपण मोठे खर्च काढतो, हुक्की आली खर्च केला असे वारंवार होते.
(४)बचत करण्याचा रोज निश्चय तर करतो पण तो पूर्ण कधीच होत नाही.
नरकलोक - मारीया भिकार्याचा विचार करीत जेव्हा स्वतःला दूषणे देते, स्वताडन करते, गुन्हेगार वाटून घेते तेव्हा तिचे मनोव्यापार हे नरकलोकाचे प्रतिनिधीत्व करतात. तिला खूप यातना होत असतात पण ती काहीच करू शकत नाही.
आपला नरकलोकात वावर असण्याची चिन्हे-
(१) मानसिक छळ होणार्या प्रकल्पावर आपण काम करत असतो.
(२)कामापासून सुटका मिळावी अशी तीव्र इच्छा आपल्याला सतत होते
(३)केवळ दारीद्र्याच्या काल्पनिक भीतीपोटी आपण काम करत राहतो.
(४)छळवादी बॉस/सहकार्यांना रोज तोंड द्यावे लागते, कामावर असमाधान असते.
असुरलोक - जेव्हा मारीयामध्ये सूडबुद्धीचा प्रदुर्भाव झाला व सूडभावनेने तिचे मन पोखरुन निघाले तेव्हाची मारीयाची मनस्थिती असुरलोकाचे प्रतिनिधीत्व करते.
राक्षस हे देवांचे स्पर्धी. अमृतातील वाटेकरी पण जिथे देवे हे प्रयत्नांनी अमृत मिळवू पाहतात तिथे राक्षस नुसतेच इर्ष्येने व हिंसक वृत्तीने विरोध करतात्.स्पर्धा, मत्सर, सूड, हिंसा आदि नकारात्मक भावनांनी पछाडलेले जीव फक्त देवांचे अमृत हिसकवू इच्छितात.
आपण राक्षसलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
(१)नोकरीचे ठीकाणी अन्य सहकार्यांचे पाय खेचत बढती मिळवण्याचे प्रयत्न आपण करतो
(२)आपल्याला इतरांची प्रगती बघवत नाही
(३)भीतीचा बडगा दाखवत व्यवस्थापन करण्याकडे आपला कल असतो
(४)आपल्याला प्रतिष्ठेचा बडेजाव करणार्या वस्तू वापरायला आवडते.
देवलोक - फिरता फिरता मारीया परत शांत झाली , तिला पक्ष्यांचा, मुलांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला, ती निसर्गाचा आस्वाद घेऊ शकली. ही तिची क्षणभंगुर पण आनंदी मनस्थिती देवलोकाचे प्रतिनिधीत्व करते.
देवयोनीतील लोक हे पॅसिव्ह गायनवादनादि कलांचा उपभोग घेण्यात मग्न असतात. पण ही स्थिती फार काळ टिकू शकत नाही.
आपण देवलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
(१)केवळ आकर्षक वाटली म्हणून सौंदर्यासक होऊन आपण एखादी वस्तू विकत घेतो
(२)आपले काम(व्यवसाय)आपल्याला निरंतर आनंद देते
(३)काम करून आपल्याला एक प्रकारची तृप्ती, आनंद मिळतो
मनुष्यलोक-मनुष्यलोकाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सुख-दु:ख यांचे संतुलन असते. या मिश्र भावना आपल्याला अनुभवण्यास मिळतात. विवेक आणि निर्णयाचे स्वातंत्र्य आपल्याला असते. मारीया जेव्हा मैत्रिणीच्या साईटवर स्वतःची चित्रे टाकण्याचा "निर्णय" घेते तेव्हा ती मनुष्यलोकात भ्रमण करत असते.
आपण आपल्या आर्थिक व्यवहारासंबंधी मनुष्यलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
(१)आपली आर्थिक स्थिती आनंद व दु:ख अशा मिश्र भावनांना जन्म देते
(२) ना आपण सुखाने भ्रमित होतो ना दु:खाने बावरून जातो
(३)काम आणि फावला वेळ दोहोंचा समन्वयाने उपभोग आपल्याला घेता येतो
(४)आपले सहकार्यांशी मित्रत्वाचे संबंध असतात. आपल्या व्यवसायातून आपली क्षितीजे विस्तारतात
(५)आपल्या पैशाचा विनियोग आप्त, स्नेही, समाज सार्यांसाठी केला जातो
प्रतिक्रिया
2 Jan 2013 - 4:51 pm | इनिगोय
वाचनखूण साठवली आहे.
(पण हे आधी वाचल्यासारखं का वाटतंय..?)
2 Jan 2013 - 6:26 pm | शुचि
इनिगोय प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
हे मी पहील्यांदा काहीशा त्रोटक लेखामध्ये मांडले होते. यावेळेस अधिक विस्तृत मांडले आहे.
खरं तर मला या चित्रातील केंद्र व सर्वात बाहेरच्या वर्तुळातील १२ वेढ्यांच्या वासनरज्जुबद्दलही लिहायचे आहे. पण १२ वेढ्यांचा वासनरज्जु आणि मनोकायीक स्थित्यंतरे हा विषय मलाच समजायला क्लिष्ट गेला आहे.
पण जेवढे समजले तेवढे पुढील भागात लिहीन.
2 Jan 2013 - 7:51 pm | चित्रा
रोचक पुस्तक दिसते आहे.
पण मनुष्यलोकाबद्दल शंका आहेत. मनुष्यांना मनुष्यलोकाबद्दल वर म्हटलेली चिन्हे मिळवण्यासाठी (विशेष करून सुख दु:खाचे संतुलन) विशेष प्रयत्न करावे लागतात असे दिसते. जवळजवळ योग्यांची जी लक्षणे असतील तीच मनुष्यलोकाची व्यवच्छेदक लक्षणे आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही, पण केवळ पुस्तकी शंका: ह्याला मूळ बौद्ध विचारांमध्ये पाठिंबा आहे काय?
2 Jan 2013 - 7:59 pm | शुचि
याला म्हणजे कशाला चित्रा? कारण बौद्ध धर्मामध्ये "संसारचक्र" असावे. आतापर्यंत बौद्ध धर्मावर मी जी पुस्तके चाळली आहेत त्यांतील काही पुस्तकात तरी मला हे चक्र सापडले.
बाकी घटना आणि त्यांचे "इन्टरप्रिटेशन" आणि सामान्य मनुष्याच्या आर्थिक व्यवहाराशी सांगड बहुधा लेखकाची आहे.
3 Jan 2013 - 3:10 am | चित्रा
याला म्हणजे असे की सुख दु:खे संतुलन असलेल्या लोकास मनुष्यलोक म्हटले आहे. माझ्या मते ज्यांना सुख दु:खे समान वाटू शकतील असे लोक प्रयत्नाने ही स्थिती साध्य करत असावेत. मनुष्यलोकाचे ते लक्षण कसे होऊ शकते हे मला कळले नाही.
मी लेखकाच्याच (शुचि यांच्या नाही) इंटरप्रीटेशनबद्दल बोलते आहे.
लेखाचा विषय वेगळा आहे ह्याची कल्पना आहे, तेव्हा अवांतर वाटल्यास येथे उत्तर दिले नाही तरी चालेल.
2 Jan 2013 - 8:44 pm | माझीही शॅम्पेन
एक्दम हुच्च लेख , वाचनखूण साठवली आहे
____/|\_____
2 Jan 2013 - 8:50 pm | शुचि
पुस्तक छान आहे. एकदा बार्न्स अँड नोबल्स या द्कानात सहज चालले होते. तेव्हापासून मनात घर करुन राहीले. मला आवडलेला आणखी एक उतारा -
Excerpt from "Money and Mindfulness - The buddhist path to abundance"
Have you ever felt that there is something,just out of reach, that will make your life complete if only you had it?That sense that there is something vast but something indefinably missing,in our lives is an essential part of the basic human experience.Sometimes that hole is scarily yawning open before us.Sometimes we are half aware of it
We will do everything we can to fill that void.For thousands of years,misuse of alcohol and other drugs from opiates to cigarettes have featured as solutions. Most of us have hoped that a loved one or the vocation will fill the hole and give us - in a literal sense fulfillment.
Sometimes we avoid that sense of incompleteness by keeping us busy.There is nothing like a hectic family life or a demanding job, to take the edge off the incompleteness.
And of course there is money.Money provides the power to reach out and make almost anything ours.It's so easy for us to promise ourselves that this will make our life complete. But it doesn't.
At this point buddhism has something to say that isn't easy.It's a message that strikes right at the heart of problem of incompleteness.
"Money will not make your life complete, in fact nothing will!"
9 Jan 2013 - 12:41 pm | विटेकर
अरेच्चा , हेच तर ईशावास्य उपनिषिदात सांगितले आहे !
माझा फार अभ्यास नाही पण जाणकारांनी प्रकाश टाकावा.
यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद विजानतः।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ॥७॥
When a man realises that all beings are but the Self, what delusion is there, what grief, to that perceiver of oneness?
2 Jan 2013 - 9:01 pm | मदनबाण
ह्म्म... साला संसारचक्रात "मनुष्य प्राणी" एव्हढा गुरफटलेला असतो... तरी सुद्धा त्याची हौस काही फिटत नाही ! परत परत त्याला या चक्रात एन्ट्री मारावी वाटते.बर यम महाराज हे आपल्या कधीतरी गिळणार हे वैष्विक सत्य माहित असुन सुद्धा प्रत्येक जण आपल्या धुंदीतच जगतो,जस काही सेंच्युरी मारल्या शिवाय आपण काही रेड्यावर बसणार नाही याची खात्रीच प्रत्येकाला असावी. तो पर्यंत चक्रात गुरफटणे चालुच हवे असते...चक्राच्या बाहेर पडण्याचा विचार किंवा कुठल्याच चक्रात परत न येण्याचा विचार देखील करावासा वाटत नाही, हे मला विशेष वाटते.
लेख अर्धाच वाचला आहे... त्या मुळे वरील विचार कितपत पूर्ण आहे ते ठावूक नाही.
2 Jan 2013 - 9:14 pm | शुचि
जगणे कितीही यातनामय, रौद्र असले तरी अतिशय सुंदरदेखील आहे. काही क्षण इतके हृदयस्पर्शी अनुभवले आहेत की या संसारचक्रात ते क्षण उपभोगण्यासाठी परत नक्की येईन. काही लोकांवर इतके प्रेम आहे की ते जर परत संसारचक्रात आले तर त्यांची गाठभेट व्हावी म्हणून नक्की परत येईन. या लोकांना सोडून मोक्ष मिळाला तर चक्क नको आहे..... यालाच माया/भ्रम वगैरे म्हणत असावेत. पण ही माया जीवघेणी सुंदर आहे. काही कविता वाचण्यासाठी, गणिताची जादू परत अनुभवण्यासाठी, काही जणांच्या ओझरत्या अथवा कायमच्या भेटीसाठी परत परत जन्म घेतला तरी अपुरा आहे.
आणि हे सांगताना कसलीही खंत वा लाज तर नाहीच. शेवटी प्रत्येक जण वेगवेगळ्या मुशीतून घडतो.
2 Jan 2013 - 9:43 pm | इनिगोय
हेच.. अगदी हेच म्हणेन.
2 Jan 2013 - 9:44 pm | मदनबाण
शेवटी प्रत्येक जण वेगवेगळ्या मुशीतून घडतो.
ह्म्म... खरयं म्हणुनच तर प्रत्येकाच्या जगण्याची फिलॉसॉफि कदाचित वेगळी असावी.
पण ही माया जीवघेणी सुंदर आहे.
महत्वाचा मुद्दा ! ;)
या वाक्यावरुन मला नारदाची कथा आठवली ती परत इथे थोडक्यात द्यावी वाटते...
तिन्ही लोकात भ्रमण करणारे नारदमुनी एकदा "मत्युलोकात" म्हणजे पॄथीवर भ्रमण करत असतात... त्यावेळी त्यांना एक कुटुंब दिसते. देखणा पुरुष,त्याची रुप सुंदर पत्नी आणि त्यांची गोंडस मुले.नारद मायेच्या प्रभावाखाली येतात आणि त्यांच्या मनात विचार येतो. आहाहा... काय आनंद आहे ! माझे सुद्धा असेच कुंटुंब असायला हवे होते.हा विचार भगवान विष्णुंना कळतो आणि नारदाची संसार पडण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नारदास मनुष्य योनीत पाठवतात. सगळ अगदी व्यवस्थित चालु असतं ! मानव रुपातल्या नारदाचे कुटूंब अगदी आनंदात असतं...मुले बाळे आणि संसार यात नारदमुनी रममाण झालेले असतात... एके दिवशी काय होत्,नारद ज्या ठिकाणी रहात असतो तिथल्या नदीला पुर येतो... गावतल्या इतर घरां प्रमाणेच नारदाचे घर देखील वाहु लागते ! सगळीकडे हाहा:कार माजलेला असतो... तेव्हढ्यात नारदाला दिसते की त्याची बायको आणि मुले नदीच्या ओढ्यात वाहुन जाउ लागली आहेत, तो ओरडते अरे माझी पत्नी... माझी मुले. पण काहीही होत नाही. तेव्हढ्यात त्यांच्यावरील मोहाचा प्रभाव संपतो आणि त्यांना "आत्मभान" होते. कोण बायको अन् कोण मुले ? ज्यांचा मी कधी नव्हतोच त्यांच्या बद्धल मी दु:ख का करतो ?
अर्थात :--- ही माया जीवघेणी सुंदर आहे या वाक्याशी संपूर्णपणे सहमत ! ;)
4 Jan 2013 - 11:29 pm | इन्दुसुता
मदनबाण,
ही कथा मी थोड्या फरकानी ऐकली होती..म्हणजे असे की,नारद एकदा भगवान विष्णुंना माया म्हणजे काय असे विचारतात. भगवान विष्णु त्यांना शंका निरसनाची हमी देतात. चालत चालत ते दोघे एका ठिकाणी येतात आणि भगवान विष्णु नारदांना पिण्यासाठी पाणी आणावयास पाठवतात. नारद जवळच्या गावात जातात..तेथे एका घरात पाणी मागत असताना एक सुरेख युवती त्यांना दिसते आणि आवडते, त्या दोघांचा विवाह होतो ई. ई. बारा वर्षे निघून जातात. मग तुमच्या कथेप्रमाणेच प्रलय होतो तेव्हा देवाचा धावा करतांना त्यांना अचानक भगवान विष्णुंची तहान आठवते आणि माया म्हणजे काय हे उमगते. एकूण काय, सारांश एकच.
माया सुंदर आहे की नाही हे माहीत नाही, परंतु सोडवत नाही हे मात्र खरे!
3 Jan 2013 - 12:52 pm | बॅटमॅन
हम्म...इन अ सेन्स, हे अध्यात्म वैग्रे अनैसर्गिक आहे असे म्हटले तर कसे?? ज्या गोष्टी नैसर्गिक असतात त्या करायला त्रास होतच नै, उलट आतून उतावीळपणा येतो. त्याउलट अध्यात्म, ही मोहमाया जिंकणे, आत्मभान, वैग्रे गोष्टी करताना जितका त्रास होतो ते पाहता या गोष्टी अनैसर्गिकच असाव्यात, नैका?
अनैसर्गिक असण्याने त्या तोट्याच्या आहेत असेही नाही. अर्थात, अनैसर्गिक म्हंजे तरी नक्की काय, हा प्रश्नच आहे. जे अन्य प्राण्यांत नै पण आपल्यात आहे ते अनैसर्गिक, अशी सर्वसाधारण व्याख्या केली जाते. नैतर अनैसर्गिक असे काही उरतच नै =)) अर्थात ही फंक्शनॅलिटी आत्ता अनैसर्गिक वाट्टेय ती पुढे कदाचित नैसर्गिकदेखील होईल, काय माहिती?
4 Jan 2013 - 11:37 pm | इन्दुसुता
त्याउलट अध्यात्म, ही मोहमाया जिंकणे, आत्मभान, वैग्रे गोष्टी करताना जितका त्रास होतो ते पाहता या गोष्टी अनैसर्गिकच असाव्यात, नैका?
असे वाटत नाही.. यावर चर्चा करण्यासारखे बरेच आहे आणि दुसर्या धाग्यावर त्यावर थोडी चर्चा झाली आहे आधीच म्हणून येथे अधिक लिहीत नाही.
4 Jan 2013 - 11:59 pm | बॅटमॅन
ओक्के.
3 Jan 2013 - 1:30 pm | ऋषिकेश
अश्या कल्पना/सिद्धांतावर फारसा विश्वास नसला किंवा त्यावर फारसा विचार करत नसलो तरी "कवट्यांचा मुकुट घातलेला यम" ही कल्पना आणि चित्र दोन्ही आवडले.
3 Jan 2013 - 2:22 pm | दादा कोंडके
शेम हिअर.
आणि कवट्या अंमळ गोड हसतायत. :)
3 Jan 2013 - 2:36 pm | बॅटमॅन
होय, जरा अंमळ क्यूटच दिसतायत :)
9 Jan 2013 - 12:24 pm | पैसा
मला तर मारिओ गेमची आठवण झाली!
9 Jan 2013 - 12:30 pm | बॅटमॅन
अगदी!! मारिओ, डेव्ह, बीएम, वुल्फ, प्रिन्स, अलादीन, रोड्रॅश, या गेम्सनी आमचे बालपण अजून समृद्ध केले. मारिओची ती कासवे, ती विषारी झाडे.......वावावा काय गेम्स होते ते, सध्याच्या कौंटरस्ट्रैक, एजॉफ एंपायर्स पेक्षाही काहीवेळेस मी ते गेम्स खेळणे अजून पसंत करतो.
6 Feb 2013 - 8:50 am | निनाद
हे पटले :)
येथे चित्र का दिसत नाहीये?
कुठे पाहायला मिळेल?
6 Feb 2013 - 10:17 am | परिकथेतील राजकुमार
शुचिमामी कशाला गं हे असले काही 'अकाली वृद्धत्व आणणारे आणि चिंतातूर बनवणारे' वाचत बसतेस ?
6 Feb 2013 - 2:52 pm | शिलेदार
खुपच मस्त लिहीलय कथानकातुन खुप काही कळून येत
लीहीत रहा!
खुप खुप शुभेछा!!!
6 Feb 2013 - 11:20 pm | अग्निकोल्हा
एलिस इन वंडरलँड जास्त प्रबोधन्कारक आहे!
7 Feb 2013 - 11:20 am | राही
"दि टाइम हॅज कम्,द वॉल्रस सेड्,टु टॉक ऑव्ह मेनी थिंग्ज,
ऑव्ह शिप्स अँड सेल्स अँड ओपन एअर,अँड ऑव्ह कॅबेजिस अँड किंग्ज" !!