धोनीला साष्टांग नमस्कार

शेखर काळे क्रिडा जगत
पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना जिंकल्याबद्दल. त्याने नेहरा व मुनाफ पटेलला संघात का घेतले या सामना सुरु होण्यापुर्वी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. तो सामना सुरु होण्यापुर्वी म्हणाला की नेहरा संघात असला की बरेच पर्याय असतात. त्या वेळेला समलोचकांनी आणि आमच्यासारख्या (अनेक .. किंबहुना सर्वच) अडाणी लो़कांनी त्याला शिव्या घातल्या व सामना आता हरलाच ही खात्री मनाशी बाळगुन, जीव मुठीत धरून, सामना बघायला लागलो. हा पर्याय, जेव्हा पाकी फलंदाज नेहराच्या गोलंदाजीवर सहज खेळत होते, तेव्हा अगदी नापास पर्याय दिसायला लागला. दूरदर्शनच्या पडद्यावर डोळे अश्विनला शोधायला लागले. पण त्यात काही अर्थ नव्हता, नेहरा मैदानात होता, संघात होता. पण धोनीचे डोके थंड होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यातून धडा घेतला होता. यावेळेस धोनीने आपल्या गोलंदाजांना अगदी व्यवस्थीत हाताळले. त्याला यावेळेस रैना किंवा सघिन (आणखी एक नमस्कार) यांच्या गोलंदाजीची आवश्यकता भासली नाही. याची कारण असेही असू शकते की पाकी फलंदाज आणि द.आ.चे फलंदाज यात फरक आहे. महादेव सचिन आणि त्यांची प्रतिकृती विरेन्दर यांनी नेहेमीप्रमाणे दणदणीत सुरुवात केल्यावर असे वाटले की ३०० धावा आपण ४०व्या षटकांतच पार करू. पण गौतम, विराट आणि युवी यांनी तो बेत हाणून पाडला. शेवटी रैनाच्या खेळीमुळे आणि उमर गुल याने मनापसून मदत केल्यामुळे २६० धावांपर्यंत कसेबसे पोचलो. असाच आणखी एक प्रश्न होता - रैनाला संघात का घेतले असावे ? त्याचे ऊत्तर रैनाने एक अत्यंत जबाबदार आणि विश्वासू खेळी करून दिले. पाकी संघाने या धावसंख्येस आपल्याकडून होईल तेव्हढा .. नव्हे त्याहुनही जास्तच हातभार लावला .. किंबहुना .. हात लावला नाही. अहो किती ते झेल सोडायचे ? शेवटी सचिनला लाज वाटायला लागली. मला नको जा असे रडीच्या डावाने केलेले शतक .. असे म्हणून तो स्वतःहूनच बाद झाला. आता .. २६० ही काही फार मोठी धावसंख्या नाही. पण आपल्या(?) मनमोहनसिंगांनी सांगून ठेवले होते - मैदानावर मला माझा गेम कयानीला दाखवता आला पाहिजे. शिवाय राहुलही आला होता आपल्या आईचा पदर धरून. या सगळ्यांचा पाकी फलंदाजांवर फार फार दबाव आला. शिवाय नेहरा आणि पटेल ..शिवाय युवराज यांचे चेंडू आपल्यापर्यंत कधी पोचतील, याची वाट बघून बघून कंटाळून पाकी फलंदाज सगळे बाद झाले. मिसबा तर शेवटी रूसून धावाच घेत नव्हता... कप्तान करा, मगच मी धाव काढीन असे त्याने खुणांनी सांगीतले. पण उत्तर येइपर्यंत सामना संपला होता ! यापुढे, आपण सर्वांनी अशी शपथ घ्यावी की धोनीने कुणालाही संघात घेतले, तरी निमुटपणे मान्य करावे.
वर्गीकरण

4 टिप्पण्या 10,715 दृश्ये

Comments

विकास नवीन

आंतर्जालावर जावद हुसैन नामक एका एक्सपर्टने भारत पाकीस्तानच्या विरुद्ध का जिंकू शकणार नाही याचे पाच कारणे देणारे विश्लेषण केले होते ते वाचनीय आहे. त्यातील पहीले कारण महत्वाचे वाटले: Unpredictability Factor of Pakistan Cricket Team. आणि ते अगदी खरेच ठरले! फक्त उलट अर्थाने! ;)

रमताराम नवीन

मायला या धोनीच्या. फुकटचा श्रेय लाटायला काय जातेय त्याचे. ब्याटिंगला येताला त्याने डायपर लावून आला असता तर बरे झाले असते असे वाटत होते. काय पण खेळत होतं बेणं. आपण काही मिपाकरांबरोबर एका हाटिलात दुसर्‍या डावात लुफ्त घेतला. 'एक वडा दोन पाव xxxx xxxx' ही आणी यासारख्या हिणकस घोषणा खच्चून, अगदी बेंबीच्या देठापासून ओरडलो. शेवटी सार्‍याचे चीज झाले. साले पाकडे हरले, पण देवाच्या कृपेने, सालं हे धोणी कुठं आलं आयत्या पिठावर रेघोट्या मारायला?

गणपा नवीन

In reply to by रमताराम

जाउ दे रे रारा.. रिझल्ट महत्वाचा एका विषयात केटी लागली तरी वरच्या वर्गात गेलो ना आपण. ;) पण आजच्या मॅन ऑफ द मॅच चे खरे हकदार उमर गुल आणि मिसबाह (द इनसाईडर).

स्पंदना नवीन

In reply to by रमताराम

नाय तर काय ? अगदी रमत गमत खेळत होती सारी जण , च्या मारी आमच रक्त इथ चहा उकळल्या सारख उकळतय अन ही रडत राउ साधी ३०० पर्यंत नाही पोहोचली. आता मी तुमच्या पेक्षा कसा शहाणा हे दाखविण्या साठी पाक पण त्यावर रडत राउ खेळल हा भाग वेगळा!! एक्व्हढे वाइड? किती कॅचेस सोडले.. त्यामुळे आपण जिंकण्या पेक्षा ते हरले हेच खर.