Skip to main content

'किल्ले जंजिरा': तिथले तथाकथित गाइड आणि त्यांचं ज्ञान!

लेखक बाबय
Published on सोमवार, 01/11/2010
नमस्कार मंडळी! किल्ले जंजिरा इथला एक अनुभव 'शेअर' करतो... काही दिवसांपूर्वी जंजिरा किल्ला बघायला गेलो होतो. बरोबर कंपनीमधले मराठी/अमराठी, किल्ला पुर्वी बघितलेले / न बघितलेले असे लोक होते. मी हा किल्ला तिसरयांदा बघत होतो. पण यावेळी बरेच जण होतो आणि होडीवाल्याने 'गाइड' बनायची तयारी दाखवली म्हणून पहिल्यांदाच 'गाइड' घेतला. आणि आमची 'गाइडेड टुर' सुरु झाली. गाइड बर्यापैकी माहिती देत होता. किल्ल्याचा उल्लेख वारंवार 'अजिंक्य' असा करत होता. मला ते थोडं खटकलं, पण म्हटलं ऐकू तर काय काय सांगतोय.... नंतर त्याने शिवाजी, संभाजी यांनी किल्ला जिंकायचे केलेले अनेक अयशस्वी प्रयत्न इ. सांगितले...बोलता बोलता त्याने 'चिमाजी' (अप्पा, पहिल्या बाजीरावाचा शूर भाऊ)चे पण नाव घेतले आणि चक्क ठोकून दिले की त्याला पण हा किल्ला जिंकता आला नाही!! आता मात्र गप्प राहणे अशक्य झालं. मी त्याला थांबवून म्हटलं की आम्ही तर असे शिकलो आहे की चिमाजी अप्पा ने हा किल्ला मराठ्यांतर्फे पहिल्यांदा जिंकला! (माझ्या आठवणी प्रमाणे: इ. सहावी चा इतिहास). पण तो काही ऐकायला तयार नव्हता! मी म्हटलं तुझं खरं की पुस्तकातलं? त्याच्याशी पैज मारली की पुस्तक आणून दाखवीन! नंतर त्याच्याच होडीतून परत आलो, त्याने किंवा मी तो विषय पुढे नेला नाही :) पण तुम्हाला काय वाटतं? आपण आपल्या इतिहासाबद्द्ल जागरूक राहायला नको??

वाचन संख्या 4510
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

इतिहासाबद्दल जागरूक रहायलाच हवं ! पण मला आठवणऱ्या माहितीप्रमाणे चिमजीअप्पाने वसई चा किल्ला जिंकला होता ना ?

अहो बाबय महाराज, जंजिरा हा शेवटपर्यंत अजिंक्यच होता. चिमाजीअप्पांनी जंजिरा नव्हे तर वसईचा अजेय किल्ला जिंकला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही पुस्तकात जंजिरा पेशव्यांनी घेतल्याचा उल्लेख नाहीये. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशव्यांनी जंजिरा घेण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण अपयशच आले. अर्थात सिद्दींनी पण प्रथम आदिलशाही, मग मोंगल व त्यानंतर इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करून त्यांच्याशी वैर पत्करले नाही व किल्ला शेवट्पर्यंत म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अजिंक्यच ठेवला. शेवटी शेवटचा सिद्दी मुहंमद खान याच्या कारकिर्दीत जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतात विलीन झाले. अवांतरः मिपावर जंजिर्‍याच्या तुमच्या भेटीविषयी फोटोसहित वर्णन येउ द्यात.

In reply to by प्रचेतस

जंजिर्‍याचा किला मूळचा कोळी लोकांचा. तिथे आधी छोटाच किल्ला होता पण भौगोलिक परिस्थितीमुळे तो ही अजिंक्य होता. राम पाटील हा तिथल्या कोळ्यांचा पुढारी होता. शिद्द्यांनी समेट करायला म्हणून त्या किल्ल्यात येऊन त्या आनंदाप्रीत्यर्थ त्या कोळ्यांना भरपूर दारू पाजली व सगळे नशेत तर्र झाल्यावर त्यांच्यावर हल्ला करून बेटाचा ताबा घेतला. संभाजी महाराजांनी त्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी समुद्रात भराव टाकून सेतू बांधायला सुरुवात केली खरी पण नंतर औरंगजेब दक्षिणेत उतरल्यामुळे ही मोहीम अर्धी सोडून जावे लागले होते. असो.

हॅ हॅ हॅ . इतिहासाबद्दलचे ज्ञान खरोखर सगळ्यांनाच वाढवले पाहिजे. जंजिरा जिंकण्याचे मराठ्यांनी शेकडो प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी स्वतः कित्येक स्वार्‍या केल्या. संभाजी महाराजांनी अनेको मोहिमा काढल्या. सर्वात यशस्वी प्रयत्न बाजीरावाने केला. त्याने युद्ध जिंकत आणले होते. जंजिर्‍याची सर्व बाजुंनी कोंडी केली होती. परंतु त्याच वेळेस निजामाने स्वराज्यावर स्वारी केली त्यामुळे त्याला मोहीम अर्धवट ठेवुन परत फिरायला लागले.

होय जंजिरा शेवट पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होइपर्यंत कोणालाहि जिंकता आला नाही. आणि चिमाजि अप्पांनी जिंकला तो किल्ला वसईचा होता.