मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणे कट्टा रविवार २१ डिसेंबर २०२५

स्वधर्म ·

प्रचेतस 19/12/2025 - 15:14
अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर पुणे कट्टा, यायला आवडलंच असतो, किंबहुना आलोच असतो पण आजच संध्याकाळो विदर्भात एका अल्पपरिचित ठिकाणी जंगलात भटकण्यासाठी निघत आहे. त्यामुळे येणे शक्य होणार नाही.

चामुंडराय 19/12/2025 - 16:40
येतो ! येतो ! Winter Solstice चा मुहूर्त आहे आणि सध्या पुणे मुक्कामी आहे. हा "मिसळ-पाव" असा दुग्धशर्करा योग असल्या कारणाने कट्ट्यास येण्याचे योजिले आहे.

In reply to by स्वधर्म

चौथा कोनाडा 20/12/2025 - 14:48
व्यनि दिसत नाहीत ... नविन लेखन सुद्धा गंडलेलं दिसतयं ... कट्ट्याला येण्याची इच्छा होतीच पण याच दिवशी दुसरा कार्यक्रम असल्याने पुण्यात असून सुद्धा येता येणार नाही याचे शल्य आहे. असो. २१ च्या कट्ट्यास मनःपुर्वक शुभेच्छा !

टर्मीनेटर 20/12/2025 - 12:35
"स्थळः वाडेश्वर, डेक्कन वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६."
इसे लॉक किया जाएं? की,
"जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे."
हाच उद्देश प्रमाण मानून कोणाला वेळेत काही बदल सुचवायचे आहेत? कारण कोणा एकाच्या सोयीसाठी (अर्थात मीच तो 😀) ठरवलेली वेळ अनेकांसाठी गैरसोयीची ठरणार असेल तर ती बदलणे नक्कीच श्रेयस्कर आहे! सकाळची वेळ पाळायला नाहीच जमले तर अभ्याशेठ किंवा भक्ती ह्यांच्यापैकी कोणालातरी व्हिडीओ कॉल करून व्हर्चुअल उपस्थितीचा पर्याय मला उपलब्ध आहेच.

In reply to by अभ्या..

टर्मीनेटर 21/12/2025 - 11:48
'नवसाला पावणारे' हे अ‍ॅडवायचे राहिले का 😀 अर्थात ह्या 'जागृत देवस्थाना'बद्दल मला पण काल तुझ्याकडूनच समजले, माझा आधी पाताळेश्वर आणि वाडेश्वर मध्येच गोंधळ झाला होता...

स्वधर्म 21/12/2025 - 12:58
मिपा नीट दिसत नाही त्यामुळे काही लोकांना नंतरचे प्रतिसाद दिसले नाहीत तरी ज्नायां शक्य आहे त्यांनी अवश्य या ही आग्रहाची विनंती.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 21/12/2025 - 21:16
माझ्याकडे फक्त 3 फोटोज आहेत त्यातला हा एक... 1 डावीकडून... चामुंडराय, कुमार सर, अमरेंद्र बाहुबली, अभ्या.., स्वधर्म, अतुल (भक्ती ताईंचे मिस्टर) पुढच्या रांगेत रामचंद्र, भक्ती, आणि त्यांची कन्या गिरीजा...

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 21/12/2025 - 21:33
BTW.. कट्टेकर्‍यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो ते कोणाचे आहे हे मला आणि अभ्याला नंतर समजले, ती पण एक गंमतच आहे...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 21/12/2025 - 21:48
च्यामारी ज्या मामेबहिणीकडे जाऊन चेंज करून कट्ट्याला यायचे होते, तिच्या भाच्याच्या सासऱ्यांचे आहे :)

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 21/12/2025 - 22:07
येस... जरूर करू... मागच्या डिसेंबर मध्ये 14 तारखेला कट्टा झाला होता, ह्या डिसेंबर मध्ये 21 ला झाला, आता पुढचा 28 डिसेंबर 2026 ला करूया :)

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 21/12/2025 - 21:47
या वाडेश्वरची मूळ संस्थापक शाखा म्हणजे बाजीराव रोडची. त्याच्या निर्मितीसंबंधीची एक 'कथा' मी सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी ऐकली होती. आता प्रस्तुत वाडेश्वर हे त्याच मालकांचे आहे की अन्य कोणी चालवते याची मला कल्पना नाही. :)

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 21/12/2025 - 21:44
सर्वांचे खरंच धन्यवाद. उद्या निवांत नेमक्या शब्दांत सांगते :) तूर्तास कट्टयातील महत्वाची छान गोष्ट सांगते -शेवटी कुमार सरांनी नारीशक्तीसाठी तेंडुलकरांचे सादर केलेले शब्द, खुपच छान वाटले _/\_ त्यासाठी विशेष धन्यवाद!!

हेमंतकुमार 21/12/2025 - 22:02
आज दुपारी चारची वेळ आणि रविवार . . . त्यामुळे वाहतूक थोडी तरी बरी असेल अशा आशेने रिक्षाने घरून निघालो. परंतु टिळक रोड - अलका चौक आणि डेक्कनचा परिसर नेहमीचसारखाच गाड्यांच्या रांगांनी भरलेला. हॉटेलजवळ येताच रिक्षातून उतरताना कसेबसे पाय ठेवायला जागा मिळाली आणि वाडेश्वराच्या दारावर दाखल झालो. एका उंच्यापुऱ्या व्यक्तीने हात करून, “तुम्हीच ते कुमार काय?“ असे विचारले आणि कट्ट्याला सुरुवात झाली आहे याची झलक मिळाली ! हेच ते चामुंडराय. त्यांची व माझी भेट 2020 साली झालेल्या खास कोविड स्पेशल मिपाच्या ऑनलाइन झूमवरील आंतरराष्ट्रीय कट्ट्यात आभासी रूपाने झालेली होती. आज दोघांनी एकमेकांना याची देही याची डोळा पाहिल्याने अगदी तृप्त झालो. भोवताली नजर फिरवताच एका कोपऱ्यात दबा धरून आणि हातात मिपा कट्टा असा फलक धरून बसलेले स्वधर्म आणि अभ्या नजरेस पडले मग दोघांनाही त्या कृतीबद्दल सलाम ठोकत आम्ही दोघे त्यांच्यात सामील झालो. बघता बघता क्रमाने इतर कट्टेकरी दाखल झाले आणि रविवारच्या रस्त्यावरील आणि हॉटेलातील तुडुंब गर्दीत आम्ही खुष्कीच्या मार्गाने शिरत दोन टेबले पकडली. बाकीचा वृत्तांत उद्या . . . शुभरात्री !

रामचंद्र 21/12/2025 - 23:29
कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात गेला. बहुतेक सर्वच मला नवीन असूनही अगदी चिरपरिचित असल्यासारखी मजा आली. खुसखुशीत गप्पांच्या जोडीला भक्तीताईच्या चटपटीत पालकवड्या, ताजा, घरच्या तिळाचा तिळगूळ आणि चामुंडराय सरांनी सढळ हाताने वाटलेल्या 'बाटल्या' (मला Remy Martin मिळाली.) यामुळे आणखीनच मजा आली.

In reply to by रामचंद्र

टर्मीनेटर 22/12/2025 - 05:30
मी थोडा उशिराने कट्टास्थळी पोचल्याने त्या पालकवड्या 'सुगरण भक्तीने' आणल्या होत्या हे तुमचा प्रतिसाद वाचून समजले...

In reply to by रामचंद्र

हेमंतकुमार 22/12/2025 - 13:34
भक्तीताईच्या चटपटीत पालकवड्या, ताजा, घरच्या तिळाचा तिळगूळ
मेथी ऐवजी पालक असल्याने मी तर विशेष आवडीने खाल्ली. एकदम चविष्ट ! बाटली >>> मी चामुंडराय यांच्या शेजारीच बसलो असल्याने थोडा वशिला लावून सर्वात सौम्य डोसवाले ‘बाटली चॉकलेट’ आधी काढून घेतले. ते खात असताना त्यातील अल्पस्वल्प ‘तीर्थप्राशनाने’ क्षणभर मजा आली ! त्याचा आकार तर अगदी मोहकच.

In reply to by रामचंद्र

हाहा! कट्टा एक नंबर झाला, गप्पा गप्पा नी नुसत्या गप्पा! आधी शंका होती वाडेश्वर वगैरेत जागा मिळेल का वगैरे पण पट्टीच्या मिपाकरानी २ तास वेळ मागून २ टेबल हॉटेलवाल्याशी तह करून मिळवले! तर झाले असे की शनिवारी रायगडावर टकमक टोकावर दुपारी ३ वाजता उभा असताना व्हॉट्सअप वर रामचंद्र काकांचा खलिता येऊन पडला, “कट्ट्याला येणे करावे.” ५ वाजेपर्यंत किल्ला पाहून रायगड रोपवेच्या मेण्याने गड उतरलो, नि खाली पार्क ह्युंडाई कोरियन कंपनीच्या घोड्याने पुण्याकडे कूच केले, भर रात्री ताम्हिणी घाट ओलांडून पुण्यात प्रवेशलो, दुसऱ्या दिवशी २ वाजता मंडईतून रामचंद्र काकाना उचलून पुस्तक प्रदर्शनात गेलो, काका पुस्तके पाहत होते तो पर्यंत चकटफू मिळत असलेले आनंदमठ घेऊन इकडे तिकडे भटकत असताना एक ओळखीचा चेहरा मोबाईल मध्ये बघत बसलेला दिसला, हा तोच का? हा अंदाज लावत होतो, हिंमत करून विचारलेच आणी काय? त्या मिपाकर भक्तीताईच होत्या, मग काय भक्तीताई त्यांचे मिस्टर आणी मुलगी गिरिजा ह्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या. ह्यात अर्धा पाऊण तास गेला तोच ४ वाजले मग रामचंद्र काका, मी आणी ताई वाडेश्वरच्या दिशेने निघालो, मध्ये अभ्याना व्हॉट्सअप वर संपर्क केला नी misalpaav.com कट्टा असा फलक हातात घेतलेले स्वधर्म नी इतर तिघे ह्यांची भेट घडली, मग काय टेबल पटकाऊन गप्पाच गप्पा, सर्वानी सुरुवातीला इंट्रो दिले, स्वधर्म, चामुंडराय, कुमार १ काका, अभ्या, टर्मिनेटर अशे एकापेक्षा एक दिग्गज सोबत भक्तीताई, रामचंद्र काका हे आधी भेटलेले मिपाकर विविध विषय, माहिती, गप्पा, विनोद. ताईने आणलेल्या अतिशय चविष्ट वड्या नी थेट कॅनडाहून चामुंडराय सरानी आणलेले बाटलीवाले चॉकलेट, साखर सोडलेली असूनही ती मोहक बाटली खायची इच्छा आवरू शकलो नाही, अतिशय छान चव! वाडेश्वरचे सॅन्डविच, चहा, कॉफी, वाडेश्वरची वेळ संपली तरीही बाहेर उभे राहून आणखी १ तास गप्पा झाल्या असाव्यात.

हेमंतकुमार 22/12/2025 - 15:04
स्वधर्म, रामचंद्र, अभ्या आणि भक्ती व कुटुंबीय यांची प्रथमच भेट झाली. अबा ची भेट पूर्वी पाताळेश्वरावर झालेली होती. टर्मिनेटर व माझ्या तर आतापर्यंत भेटीच भेटी झालेल्या असल्याने परिचयाची पातळी ओलांडून आम्ही कधीच मैत्रीच्या प्रांतात विहार करीत आहोत. सर्वांनी आपापला परिचय अतिशय उत्तम रीतीने करून दिल्याने सर्वांना व्यवस्थित जाणून घेता आले. आनंद वाटला. घराकडे परतीच्या प्रवासात चामुंडराय व मी एका रिक्षाने आल्याने आम्हा दोघांचाही वीस मिनिटांचा छानसा निवांत गप्पांचा कट्टा झाला जो खूप आनंददायी होता. माझ्या पूर्वीच्या शनिवारवाडा आणि पाताळेश्वर येथील कट्ट्यांप्रमाणेच हा कट्टा देखील रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.

कंजूस 22/12/2025 - 15:11
न येण्याचे कारण संध्याकाळी पुण्यातील कट्टा करून परत जाणे अशक्य असते. पाताळेश्वरला सवा नऊला हजर राहून परत साडेतीनच्या गाडीने जाऊ शकतो. तिकडे तीनवेळा येऊन गेलो आहे. तिकडे झाडाखाली उभ्या उभ्याही कट्टा करता येतो. छोटा वृत्तान्त आवडला.

Bhakti 22/12/2025 - 15:42
रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ ४ ते ६ होती पण पुस्तक प्रदर्शनात ३ वाजताच अबा भेटला. आमचा कट्टा एक तासच अगोदर सुरु झाला . मी आबाला कौतुकाने खरेदी केलेल्या पुस्तकांची भरलेली पिशवी दाखवली . तर आमचे हे आणि अबा रखरखीत खान्देश आणि मराठवाड्याचे पाणी ,उद्योगांवर चर्चा करत होते ;) आबा म्हणाला मी रामचंद्र काकांना शोधून आणतो आणि तो अर्ध्या तासाने परत आला. रामचंद्रकाका आल्यावर आम्ही फर्ग्युसन महाविद्यालय ते वाडेश्वरला गाडीतून वाट काढत निघालो.रस्त्यात ब्रिटिश लायब्ररी (जुनी),टाइम्सचे कार्यालय,रानडे इन्स्टिट्यूट याची इमारत कामकाज सांगितलं ... एक हेरिटेज वॉकच यानिम्मिताने झाला. वाडेश्वरला पोहचल्यावर स्वधर्म मिसळपाव.कॉम चा फलक घेऊन उत्साहाने उभे होते हे छान वाटले. टर्मिनेटर सोडता बाकी सर्व मिपाकर कट्ट्यासाठी हाजीर होते.स्वधर्म,कुमार १ यांचे छायाचित्र आधी पाहिल्याने ते ठाऊक होते पण यापैकी अभ्या आणि चामुंडराय याना प्रथम पाहिले . आता आम्ही टर्मिनेटर यांची वाट पाहत होतो. काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक टेबल मिळाल्यावर मिसळपाव कट्टा रंगायला सुरु झाला. आणि मग थोड्याच वेळात टर्मिनेटर यांचे आगमन झाले...आता जे येणार त्यापैकी सर्वजण आले पण 'येऊ शकतो' यातले 'किल्लेदार' मिपाकर राहिले हे समजले. सर्वांच्या ओळखी सुरु झाल्या . मला तेव्हा समजले आजचे सर्वच मिपाकर आपल्या व्यावसायिक क्षेत्रातही धुरंधर आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाचे क्षेत्रातले अनुभव ऐकण्यासारखे होते. मधेच वेटर मिसळपाव. कॉम फलक पाहून मिसळपावचे ऑर्डर देणार का हे गंमातीने म्हणाला आणि एकाच हशा पिकला ... हायला पुण्याचे वेटरही हजरजबाबी आहेत कि अस मला वाटलं :) पलिकडच्या टेबलाची चर्चा मला ऐकू नव्हती ,पण कुमार १ ,चामुंडराय ,स्वधर्म यांच्याशी मी त्यांच्या -माझ्या लेखनाविषयी ,मतांविषयी अल्प बातचीत केली. मग आंतरजालावरच्या इतर चांगल्या गोष्टींची चर्चा झाली ,सर्वात सुंदर ,वापरायला सुंदर संस्थळ मिपाच आहे याबाबत सर्वांना मिपाकर असल्याचा आनंद समाधान आहे हे जाणवलं पण सर्व्हर ,इथली कमी लोकसंख्या अनेकदा रसोभंग करतो याबाबत थोडी नाराजी वाटते हेही एकमत झाले. सॅन्डविचवर माझ्या लेकीने चांगला ताव मारला ,स्वधर्म यांचेही सँडविच तिने फस्त केले. चामुंडराय यांनी आणलेलया 'तीर्थ' मिश्रित चॉकलेट बाटल्या भारीच दिसत होत्या. पाच वर्षांपूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचा सुरु वाईनचा प्रोजेक्ट होता तेव्हा मी आणि मैत्रिणी सॅम्पल टेस्टिंग नावाखाली चढेपर्यंत वाईन प्यायलो होतो.पण आज अहोंसमोरच हे तीर्थ पिताना आता घरी निदान वाईनची बाटली आणायला हरकत नाही असे वाटतंय :) मी आणलेली पालक शंकरपाळी,तिळगुळ वड्या व माझ्या इतरहि अनेक पाककृतींचे सर्वानी कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. मी मटार करंज्याही बनवून आणल्या होत्या पण घरी पुण्यात त्या सगळ्यांना आवडल्याने संपुन गेल्या.. इकडे आमच्या यांना आधीच तंबी दिल्याने त्यांनी श्रोता होण्याचे स्वीकारले :) गिरीजाला मात्र हे काका मला कसे ओळखतात याचे आश्चर्य वाटत राहिले. अखेर कट्टा समारोपाकडे वळाला तेव्हा कुमार १ यांनी तेंडुलकरांचे स्त्रीचे आयुष्यातले मोलाचे स्थान अशा आशयाचे खूप सुंदर शब्दांचे सादरीकरण केले ... हळू हळू आम्ही डेक्कनच्या गर्दीत कट्ट्याच्या आठवणी घेत विरून गेलो... जय मिपा :) चामुंडराय ,कुमार १,अबा,टर्मिनेटर,अभ्या,रामचंद्र ,स्वधर्म,अतुल,मी,छोटी गिरिजा 1 पुणे बुक फेस्टला अबा,मी (भक्ती),रामचंद्र .. 2 हाच तो खाऊ बातलि विथ चकणा 3

जुइ 23/12/2025 - 04:23
झक्कासं कट्टा आणि खादाडीचे फोटो आवडले! बर्‍याच काळानंतर पुण्यात जाहीर कट्टा झाला ते पाहूण चांगले वाटले.

टर्मीनेटर 23/12/2025 - 12:06
रामचंद्र, कुमार१, अमरेंद्र बाहुबली, भक्ती ह्या कट्टेकर्‍यांचे लघु, मध्यम, दिर्घ अशा विविध स्वरुपातले 'कट्टा वृत्तांत' वाचुन प्रत्यक्ष कट्ट्याएवढीच मजा आली 👍 आता उत्सवमुर्ती 'स्वधर्म, चामुंडराय आणि अभ्या' ह्या त्रिमुर्तींच्या वृत्तांतांची वाट बघतोय. मलाही चार(?) ओळी लिहायची इच्छा आहेच, परंतु माझा 'टंकन वेग' गिनेस किंवा गेला बाजार लिमका बुक्ने तरी दखल घ्यावी इतका जास्ती असल्याने अत्ता लिहायला घेतला तर संध्याकाळ्/रात्री पर्यंत कदचित तो लिहुन पुर्ण होईल असा प्रथमिक अंदाज आहे 😀

अभ्या.. 23/12/2025 - 12:41
दिग्गज व्हायला बहुतेक मिपावर एका आयडी ने एक तप तरी पूर्ण करावे लागते म्हणे. तपपूर्तीनंतर दोन तीन वर्षांनीही कुणी मिपावर दिग्गज म्हणून संबोधन देईना तेव्हा म्हणाले एक कट्टा करावाच. तसे आधीही तीन चार पाताळेश्र्वर वगैरे स्थाने कट्टा निमित्ताने पाहिलेले होती. तेव्हा सोलापूर हून येण्याचा उत्साह होता. पुण्यात आल्यानंतर काही पिंची करांच्या गाठीभेटी होत राहिल्या पण अधिकृत मीपा कट्टा मात्र पुणे सोडल्यानंतर योग आला. असो. स्वधर्म शेठ सोत्री नानाला भेटल्यानंतर भारतात डिसेंबरात भेटू म्हणाले. तेव्हा बऱ्याच अडचणी चालू होत्या. पण शनिवारी रात्री पुण्यात आलो आणि रविवारच्या कट्ट्याला येणे जमेल असे वाटू लागले. सौदागराला गणेशाला भेटलो पण साहेब बीजी असल्याने एकटाच फर्गसन रोडला निघालो. प्रचेटस सर काही अनवट ठिकाणी जायचे आहे म्हणून कट्ट्याल टांग मारीत झाले. बाकी मिपावर अधून सर्वर नाराज असल्याने कट्ट्याची प्रसिद्धी होते आहे नाही हा विचार आलेला. विरोधी पक्षाचे तीनचार लोक असल्यानं मिपाने माईक बंद करण्याची संसदीय नीती वापरली की काय असाही दुष्ट विचार मनी आला पण संविधानतकीच श्रद्धा नीलकांत मालकावर असल्याने तो विचार झटकला. आधी घड्याळाला कोलायची सवय जर्मनीत मात्र सोडावी लागली होती तेव्हा शार्प 3.55 ला वाडेहश्वर समोर उभे राहून स्वधर्म यांना कॉल केला व पार्किंग प्लस हॉटेलात जागा मिळते का ह्याची चिंता व्यक्त केली. तेही सांगलीकर पुणेकर आणि लंडन कर असे फिरलेले असल्याने म्हणाले करू आपण मानेज. मिसळपावाचा कट्टा असे ए 4 प्रिंटआउट घेऊन उभे असता कुमार डॉक्टर दिसले. त्यांना आधीच्या कट्टा फोटोमुळे ओळखत होतोच. त्यांच्यासोबत चामुंडाराय् होतेच. इतक्या वेळात टर्मिनेटर लोणावळ्याला आलोय. शिवाजी नगर ला बसलोय, शनिवार पेठेत जाऊ म्हणतोय असा उपदेत देत होतेच त्याचेही आगमन झाले. बाहुबली संपर्कात होते ते येताना रामचंद्र काका आणि भक्ती ताई ह्यांना घेऊनच आले. भक्तीताईची गोंडस कन्या आणि साहेब सोबत होतेच. भावकीतले रेफरन्स थोडेसे उकरले आणि 6 अधिक 4 अशा दहा खुर्च्या व दोन टेबल इतक्या जागेवर कट्टा सुरू झाला. स्वधर्म ह्यांनी ओळखीचा प्रस्ताव मांडला व सुरुवात माझ्यापासून करावी लागली. भक्तीताईनी सोबत आणलेल्या पालक मठरी आणि तीळ वड्या वाटप केल्या. चामुणदराय ह्यांनी सुंदर वाइन चॉकलेट्स आणलेली होती. हळूहळू टेबलाच्या दोन्ही साइडला दोन गट पडून दोन चर्चा सुरू झाल्या. माझ्या बाजूला बाहुबली रामचंद्र काका आणि समोर टर्मिनेटर असल्याने फारसा राजकीय चर्चेला वाव ठेवलाच नाही. समोरही तीच परिस्थिती होती. बाहुबली ह्यांची युरोपाबद्दल उत्सुकता, रामचंद्र काकांचा दांडगा अनुभव आणि चौफेर ज्ञान पहाता जेवढे जमेल तितके बोलणे पत्करले. समोर ज्ञान सागर कुमार डॉक्टर आणि तितकाच अनुभव असणारे चामुंदराय होते. स्वधर्म शेठ चामुंदराय ह्यांची वेगळ्याच क्षेत्रातली मुशाफिरी चकित करणारी होती. भक्ती ताईंनी बहुधा पुस्तक प्रदर्शनाचे डिटेल्स दिल्या पण तेव्हा आमची ऑर्डर देण्यासंबंधी चर्चा चालू होती. थोडासा अल्पोपहार करून सांगता करताना कुमार डॉक्टरांनी सुंदर कविता ऐकवून एकप्रकारे भक्तीताईना मिपातर्फे मानवंदना दिली. बाहेर फोटोसेशन करताना (जो सगळ्यात नावडता भाग माझा) एकमेकांना विनंत्या करून मोबाईल आडवे केले गेले आणखी निरोप समारंभ सुरू झाला. स्वधर्म शेठ काही कामानिमित्त पटकन निघाले. बाकी एकेक निघताना ही बरेच खुमासदार डिटेल्स निघत गेले. शेवटी राहिलेल्या टर्मिनेटर भाऊंना पद्मावती ला सोडण्याची जबाबदारी पत्करून आम्हीही प्रस्थान केले. कट्ट्याच वृत्तांत द्यावा म्हणाले तर मिपावर सर्वर डाऊन. हळूहळू तोही पूर्व स्थितीत आल्यावर एकेकेक वृत्तांत वाचले. म्हणले नवीन काय लिहावे पण आता इतक टायपल ते वाया जायला नको म्हणून .......... a

In reply to by अभ्या..

अभ्या.. 30/12/2025 - 13:05
फोटोतले डावीकडून अमरेन्द्रा बाहुबली, टर्मिनेटर, डॉ. कुमार, चामुंडराय, स्वधर्म, श्रीयुत भक्ती, भक्तीपुत्री गिरिजा, भक्तीताई, रामचन्द्रकाका, अस्मादिक....

झकास झाला की कट्टा!! घरी पाव्हण्यांबरोबर बार्बेक्यु चा कार्यक्रम ठरल्याने सामान आणणे व ईतर लुडबुड करण्यात वेळ गेल्याने कट्ट्याला येता आले नाही. पण व्रुत्तांत वाचुन छान वाटले.

प्रचेतस 24/12/2025 - 09:56
पुणे कट्ट्याला ह्यावेळी प्रथमच मुकलो. ह्यावेळी पूर्वनियोजित कामांमुळे पुस्तक महोत्सव घाईघाईत एकदाच थोडासा बघता आला. तसेच कट्ट्यालाही येता आले नाही. पण मिपाकरांचा कट्टा मात्र जोरदार झालेला दिसतोय. चामुंडराय ह्यांना प्रथमच पाहिले. सर्वच कट्टेकर्‍यांचे कौतुक. लवकरात लवकर पुन्हा कट्टा घडवून आणा. उपस्थिती राहिलच.

स्वधर्म 24/12/2025 - 21:12
सुगंधी कट्टा नावाचा सिनेमा होता म्हणे. पण आपला दिवस सुगंधी करणारा कट्टा आपल्या ऑनलाईन घसटीतल्या लोकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवण्याचा सोनेरी योग रविवार २१ डिसेंबरला २०२५ आला. जालावर आपल्याला मर्यादित माणूस कळतो पण तासाभराच्या प्रत्यक्ष गप्पांमध्ये प्रत्येक मिपाकर आपआपल्या क्षेत्रात किती पोचलेला आहे हे समजले. एकेका आसामीबद्दल केवढे तरी लिहिता येईल अशी बहुमोल माणसे भेटली. आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात आपला मिपा मित्र असणार असे वाटण्याएवढी जवळीक या दोन तासांनी दिली. आपण सगळेच धाग्यावर केवढे तरी बौध्दिक पाहतो पण ही सगळी मधुर माणसे आहेत आपल्याशी त्यांचे ऋणानुबंधा जुळलेच हे फिलींग सुखद आहे. बाकी ठळक बातम्या आधीच दिलेल्या आहेत आणि मला कामं उरकण्याची गडबड असल्याने वृत्तांत लिहायला जरा उशीर झालाय पण सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे कट्ट्याचे हायलाईटस दिलेच आहेत. काही खास मिपाकर पुणेकर जरी येऊ शकले नाहीत तरी पुन्हा जिथे संधी मिळेल तिथे त्यांना भेटायची इच्छा नक्की पूर्ण करणार. जय मिपा, जय मिपाकर.

चामुंडराय 25/12/2025 - 19:05
केवळ एका धाग्यावर आणि स्थळ, काळ, वेळ ह्या बद्दल कोणतीही भवती न भवती होता, अतिशय शॉर्ट नोटिसवर पुणेरी कट्टा यशस्वीरीत्या पार पडला. कट्टा आयोजनासाठी स्वधर्म ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे आभार. मी पहिलटकर (first time) कट्टेकरी असल्याने आणि कुठल्याच मिपाकरास व्यक्तिगतरित्या ओळखत नसल्याने थोडासा साशंक होतो परंतु सगळ्यांनी लगेचच आपलेसे केले आणि जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा सुरु झाल्या. मिपा सदस्यत्व घेण्याच्या आधी पासूनच कट्टा किंवा गटग बद्दल नेहेमी उत्सुकता होती परंतु प्रत्यक्ष कट्ट्यात सहभाग घेतला नव्हता. नाही म्हणायला चीनच्या वूहान व्हायरसच्या कोविड काळात एका ऑन-लाईन कट्ट्यास उपस्थिती लावली होती. नेमके त्या दरम्यान मिपा साईटला काही प्रॉब्लेम असल्याने संपर्क होत नव्हता परंतु स्थळ आणि वेळ लक्षात होती तेव्हा अंदाजाने उपस्थित मिपाकरांची संख्या लक्षात घेऊन वाडेश्वर देवस्थानाकडे कूच केले. चारचाकी रथ घेतला तर कट्ट्यास उशीर होईल हे लक्षात आल्याने पुतण्याने द्विचाकी स्वयंचलित अश्व भरधाव फेकला आणि अस्मादिक त्यावर पिलीयन रायडर म्हणून स्थानापन्न झाले. इंच इंच लढवत आणि असंख्य वेडीवाकडी वळणे घेत वेळेवर वाडेश्वरी पोहोचलो (दोन, तीन आणि चार चाकी वाहने हाकण्याचे पुणेकरांचे कौशल्य वादातीत आहे) परंतु मिपाकर सदृश्य कोणी दिसेना, आत एक चक्कर मारली. बाहेर एक शुभ्र दाढीधारी सद्गृहस्थ बऱ्याच वेळ भ्रमणध्वनीवर बोलत उभे होते. त्यांचे बोलणे झाल्यावर त्यांच्या कडे मिसळपाव कट्ट्याबद्दल पृच्छा केली तर ते मला चांगली मिसळपाव मिळणाऱ्या हॉटेलचा पत्ता सांगायला लागले. त्यांना कट्ट्याबद्दल सांगितल्यावर त्यांनी मी येथील व्यवस्थापक आणि वेटर्सना ओळखतो, त्यांच्या कडे चौकशी करतो असे सांगितले. एक पुणेकर एव्हढ्या आस्थेने मदत करतो आहे हे बघून माजी पुणेकर असलेल्या मला खरेतर आश्चर्यच वाटले परंतु तेथे कोणासही कट्ट्याबद्दल कल्पना नाही असे निष्पन्न झाले. मी त्या सद्गृहस्थांचे आभार मानले परंतु माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. इतकावेळ माझा पुतण्या तेथे थांबला होता. आधी कधीच न भेटलेल्या, न ओळखणाऱ्या लोकांना मी भेटणार आहे हे ऐकल्यावर त्याला कुतूहल मिश्रित आश्चर्य वाटले होते. कोणीतरी मिपाकर येईल अशा प्रतीक्षेत मी वाडेश्वरच्या दरवाजाजवळ उभा होतो. FC रोडच्या साईडवॉकवर (मराठीत फुटपाथ) प्रचंड गर्दी होती. असंख्य बुरखेधारी व्यक्ती दिसत होत्या ते बघून प्रदूषणाच्या दुष्परिणामांची कल्पना आली आणि मला आनंदाला पारखे करणाऱ्या प्रदूषणाचा तीव्र संताप आला. तेव्हढ्यात एक दुचाकीस्वार तेथे थांबून असलेल्या माझ्या पुतण्याकडे काही विचारणा करताना दिसला. दुचाकी पार्क करून तो कोठेतरी गेला आणि थोड्यावेळाने दुसरा एक मोटार सायकल स्वार एव्हढ्या तुफान ट्रॅफिकमध्ये कौशल्याने "रिव्हर्स" येताना आणि पहिला दुचाकीस्वार त्याला "आन्दे, आन्दे" अशी साद घालत मार्गदर्शन करताना दिसला. दुसऱ्या मोटार सायकलस्वाराने मोटारसायकल पार्क केल्यावर हे दोघे मिपाकर तर नसतील अशी शंका आली परंतु त्यांनी तोपर्यंत "मिपा कट्टा" चा बॅनर काढला नव्हता. तेव्हढ्यात मला कुमार१ सर येताना दिसले. कट्ट्यातील फोटोंमध्ये त्यांना बराच वेळा बघितले असल्याने तात्काळ ओळखले आणि कट्टा होणार असल्याची खात्री पटली. पुतण्याला आता तू घरी जा असे सांगून वळलो तर "मिपा कट्टा" A4 साईझचे बॅनर घेतलेले दोघे दिसले. ते वर उल्लेख केलेले दोन दुचाकीस्वार - स्वधर्म आणि अभ्या.. आहेत अशी ओळख झाली. हा कट्टा पूर्व वृत्तांत, बाकीचा वृत्तांत इतर मिपाकरांनी दिला आहेच. कुमार१ सरांनी आग्रहाने प्रत्येकाला ओळख करून द्यायला लावली. मिपाकर आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून, उच्चशिक्षित आणि प्रथितयश आहेत हे लक्षात आले आणि सगळ्यांना भेटून आनंद वाटला. नेमके किती मिपाकर येणार आहेत ह्याची कल्पना नसल्याने मद्यधारक चॉकलेट्स कमी पडली आणि स्वधर्म ह्यांना मिळाले नाही. भक्ती ताईंची मुलगी येणार असल्याची कल्पना नव्हती त्यामुळे साधे चॉकलेट्स आणले नव्हते त्या बद्दल क्षमस्व. भक्ती ताईंच्या पालक शंकरपाळ्या, तिळगुळ वड्या आणि वाडेश्वरच्या फिल्टर कॉफीची चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळत राहील ह्यात शंका नाही. मिपा सारख्या साईट्स वर आपण बोलण्याऐवजी लिहीत असतो त्यामुळे "तिळगुळ घ्या आणि गोड गोड लिहा" असे म्हणायला हरकत नसावी. इथे तुम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील मित्र मिळतात हा एक महत्वाचा फायदा. कट्टा झाल्यावर कार्यबाहुल्यामुळे आणि त्यात इंडिगो व दिल्लीतील धुरक्याच्या (smog) प्रदूषणाच्या काळजीची भर पडल्याने वृत्तांत लगेचच लिहायला वेळ मिळाला नाही. जवळपास ३६ तासांच्या होम-टू-होम टॉर्चरअ्स प्रवासानंतर घरी पोहोचल्यावर लगेचच वृत्तांत लिहून काढला (ह्यातील बराचसा भाग "पारी" विमानतळावरच्या लेओव्हरच्या काळात लिहून वेळ सत्कारणी लावला!). पुढच्या पुणे भेटीत कट्ट्यात सहभागी होण्याची संधी मिळो ही सदिच्छा. यदा यदा हि नॉस्टेल्जीक होतसे अस्मादिक । भेटण्या आप्त, मित्रानाम् सम्भवामि वर्षे वर्षे ॥ ह्या नोट वर आपली रजा घेतो. आपला दर्शनाभिलाषी - चामुंडराय

In reply to by चामुंडराय

रामचंद्र 25/12/2025 - 22:52
खमंग आणि खुसखुशीत! आणि मला आनंदाला पारखे करणाऱ्या प्रदूषणाचा तीव्र संताप आला.> 'रसिक'राज चामुंडराय!

कट्टा छान झालाय ! मी मिस केला . कट्ट्याला यायला आणि मेम्बरांना भेटायला नक्कीच आवडलं असतं . खरं तर त्या वेळी मी पुस्तक महोत्सवामध्येच होतो . पण काही गाठी भेटी बाकी होत्या . त्यामुळे नाईलाज होता . खूप अवघड वाटत होतं . कारण तिथून दोन चौक तर पलीकडे वाडेश्वर . पुन्हा कधी . काही जणांना पहिल्यांदाच भेटता आलं असतं . अबा आणि कुमार सोडता सगळे नवीन खास म्हणजे छोटी गिरीजा

टर्मीनेटर 01/01/2026 - 21:19
स्वधर्म, चामुंडराय आणि अभ्या ह्या तीनही उत्सवमूर्तींचे वृत्तांत, त्यातले मर्म आणि पंचेस लै भारी 👍 माझ्याही चार (की चारशे) ओळी लिहून झाल्या आहेत, पण 'कैच्याकै' लांबलचक असा टेराबाईटी झालेला वृत्तांत त्यात थोडी काटछाट करून 'गिगाबाईटी' (कुमारसरांच्या शब्दात 'प्रबंध') स्वरूपात खाली पेस्टवतो 😀

टर्मीनेटर 01/01/2026 - 21:52
चॅप्टर १ - "द फ्रुट ऑफ फेथ" सप्टेंबर महिन्यात सोकाजीनानांच्या 'लंडनस्थित मिपाकर' ह्या धाग्यावरील चर्चेदरम्यान 'स्वधर्म' साहेबांनी डिसेंबरमधल्या 'पुणे कट्ट्याचे' सूतोवाच करताना अभ्याही त्यावेळी पुण्यात असेल असे लिहिले होते. त्यांच्या ह्या कट्टा प्रस्तावास कर्नलतपस्वी आणि चौथा कोनाडा आदी मान्यवरांनी अनुमोदनही दिले होते. डिसेंबरच्या सुरुवातीला राजेंद्र मेहेंदळे साहेबांनी कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाणाविषयी पृच्छा केल्यावर जवळपास महिन्याभराने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला. गेल्या महिन्यात एका लहानशा अपघातात आमच्या पिताश्रींचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्यावर केलेल्या तपासण्यांचे अहवाल,अस्थिभंगाचे स्वरूप, रुग्णाचे वय आणि हवामान असे विविध घटक विचारात घेऊन "त्यांना पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे राहाण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल" असा निष्कर्ष त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अस्थिरोग तज्ज्ञांनी जाहीर केला. अचानक उद्भवलेल्या ह्या परिस्थितीला सामोरे जात नोव्हेंबरच्या मध्यापासून ते वर्षअखेर आणि नववर्षस्वागत निमित्ताने आधी ठरवलेले व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित सर्व दौरे रद्द केले होते. त्यामुळे दुपारची वेळ ठरल्यास तीन-चार तासांचा प्रवास करून २० किंवा २१ डिसेंबरला होणाऱ्या कट्ट्यास उपस्थित राहणे शक्य असल्याने मी पण कट्ट्याला येऊ शकत असल्याचे कळवले आणि भक्तीताईं पण "जमल्यास चक्कर मारते" असे म्हणाल्या होत्या. १९ डिसेंबर रोजी 'हा' धागा आला आणि त्यात, स्थळः वाडेश्वर, डेक्कन वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६. अशी पुणे कट्ट्याच्या तारीख, वार आणि वेळेची अधिकृत घोषणा झाली! "अरे बापरे... हा जंगली माणूस पण येणार आहे का? ह्याला भेटण्यापेक्षा खरोखरच्या वन्यजीवांना भेटायला विदर्भातल्या एखाद्या जंगलात गेलेले बरे" असा विचार करून मला टाळण्यासाठी प्रचेतसबुवांनी त्वरित आपली अनुपस्थिती नोंदवल्याची बातमी काही '(अ)विश्वसनीय सूत्रांकडून' लगेचच माझ्यापर्यंत आली होती, पण तिच्या सत्यतेविषयीची खातरजमा मात्र अद्याप झालेली नाही 😀 ह्यातला गमतीचा भाग बाजूला ठेऊ, पण मला प्रचेतस ह्यांचा प्रामाणिक स्वभाव चांगला माहिती आहे आणि मुळातच डिसेंबर हा सुट्ट्यांचा महिना असल्याने अनेकांचे पूर्वनियोजित कार्यक्रम खूप आधीपासून ठरलेले असतात ह्याची पूर्ण कल्पना असल्याने केवळ तेच नाहीत तर बाकीही काही मिपाकर इच्छा असूनही कट्ट्याला उपस्थित राहू शकले नसावेत हे समजू शकतो. प्रचेतस येणार नसल्याचे कळल्यावर आता 'वाडेश्वर' लेण्यांचा इतिहास, तिथल्या शिल्पांची सविस्तर माहिती मिळण्याला आपण मुकणार अशा विचाराने थोडे निराशेचे मळभ आले होते पण पुढे आपल्या दर्जेदार लेखनातून परिचयाचे झालेले 'योगाचार्य' चामुंडराय आणि 'रॉय'बहादूर किल्लेदार हे दोघेही येणार असल्याचे कळल्यावर कट्टा आता कल्पनेपेक्षा जास्त रंगतदार होणार ह्याची खात्री पटत गेली! कट्ट्याचे स्थळ-काळ-वेळ सगळे ठरले होते आणि किमान ७-८ मिपाकर तरी कट्ट्याला उपस्थित राहाणार असा ठाम विश्वास निर्माण झाला होता, चॅप्टर २ - "स्ट्रेंजर इन द लँड ऑफ लेजेंड्स" कट्ट्याचे स्थळ-काळ-वेळ सगळे ठरले होते आणि किमान ७-८ मिपाकर तरी कट्ट्याला उपस्थित राहाणार असा ठाम विश्वास निर्माण झाला होता, पण... कट्ट्याविषयीचे काय अपडेट्स आहेत हे बघायला मिपावर यायचो तेव्हा... '500' आणि '504' हे अधून-मधून शिफ्ट ड्युटीवर येणारे मिपाचे 'नंबरकरी' द्वारपाल प्रवेश नाकारायला सज्ज असायचे. त्यातला 504 नंबरी जरासा सहृदय होता, त्याला एक-दोन वेळा 'टॅब रिफ्रेश'ची विनंती केल्यास तो आत तरी जाऊ द्यायचा. पण 500 नंबरी मात्र एकदम पाषाणहृदयी होता. कुठल्याही वशिल्याला दाद न देता निर्दयीपणे तो कोणालाच आत प्रवेश करू देत नसल्यामुळे नवीन काही कळायलाच मार्ग नव्हता. २० तारखेला रात्री 'सगळे ठरल्याप्रमाणे आहे ना?' हे विचारायला अभ्याला फोन केल्यावर सगळे काही तसेच असून तो आणि स्वधर्म चारच्या काही मिनिटे आधीच कट्टास्थळी पोचणार असल्याचे कळले,'वाडेश्वर' आणि 'पाताळेश्वर' मध्ये माझा झालेला संभ्रमही मिटला आणि 'वाडेश्वर' हे मंदिर/लेणी नसून 'रेस्टोरंट' आहे हे समजल्यावर माझा एक गोड गैरसमजही दूर झाला! २१ तारखेचा पूर्ण दिवस बाहेर रहावे लागणार असल्याने तात्पुरते परावलंबित्व आलेल्या वडलांच्या मदतीसाठी भाच्याला बोलावून घेतले होते त्यामुळे सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते. मी सांगितलेल्या वेळी पद्मावतीला पोचलो तर त्यावेळी तिथून जवळच असलेल्या बिबवेवाडीहुन अभ्या मला पिकअप करेल आणि मला पोचायला उशीर झाला तर मी रिक्षा किंवा कॅबने वाडेश्वरला येईन असे आमचे ठरले होते. कुमार सर पुण्याबाहेर असल्याचे माहिती असल्याने उद्या सकाळी निघण्याआधी मेसेज किंवा फोन करून त्यांच्या उपस्थितीविषयी विचारू असा विचार केला होता पण सकाळी सात वाजता त्यांचाच मेसेज आला आणि ते काल रात्री उशिरा पुण्याला परतल्याचे आणि कट्ट्याला येणार असल्याचेही कळले होते. सी.एस.एम.टी. ते खोपोली थेट लोकल ट्रेनला बराच वेळ होता म्हणून कर्जतपर्यंत एक आणि कर्जतहून तिला कनेक्टेड दुसरी लोकल ट्रेन पकडून साडेबाराला खोपोलीला पोचलो. नेमके त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या २००+ नगरपालिका/परिषदांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्याने खोपोली स्टेशनबाहेर विजयी उमेदवारांच्या रस्ता अडवणाऱ्या मिरवणुकांमधून वाट काढत एकदाचा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आलो आणि एकाच प्रवाशासाठी आधी बसलेल्या बाकीच्या प्रवाशांचा खोळंबा करत थांबलेल्या वडापच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरने दीडच्या थोडेसे आधीच लोणावळा स्टेशनला पोचलो. आतापर्यंत सर्वकाही अपेक्षेप्रमाणे चालले होते पण इथून पुढे वेळेचे गणित बिघडण्यास सुरुवात झाली. स्टेशनवर लोकल आणि एक्स्प्रेसची वेळापत्रके बघितली तर लोणावळा-पुणे लोकल २:५० आणि एक्स्प्रेस ३:१० ला असल्याचे दिसले. दीडेक तास तिथे थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता म्हणून परत बाहेर येताना अभ्याला फोन करून मी लोणावळ्याला पोचलो असून आधी ठरलेल्या वेळेवर पद्मावती-बिबवेवाडीला पोचू शकत नसल्याचे कळवले. बाहेर पडल्यावर पी.एम.पी.एल.च्या निगडीहुन लोणावळा स्टेशनला नुकत्याच आलेल्या मिनीबसमधून उतरणारे प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टर दिसले. कंडक्टरकडे चौकशी केल्यावर त्याने अर्ध्या तासाने पुन्हा निगडीला जाणार असलेल्या ह्या बसनी भक्ती-शक्ती चौकापर्यंत जाऊन तिथून कात्रजमार्गे जाणाऱ्या ४२ क्रमांकाच्या बसने मला पद्मावतीला जाता येईल अशी माहिती तर दिलीच, वर सदर बस तळेगाव रेल्वे स्टेशन वगैरे करत फिरत फिरत जाणार असल्याने पोचण्याची घाई असेल तर लोणावळा एस.टी. स्टँडवरून स्वारगेटला जाणारी एखादी जलद बस पकडा किंवा हायवेवरून दुसरे कुठले वाहन मिळते का बघा असा चांगला सल्लाही दिला! वरीलपैकी कुठलाही पर्याय निवडला तरी आपण चार वाजेपर्यंत कट्टास्थळी पोहोचू शकत नसल्याचे लक्षात आले होते पण ते म्हणतात ना, "कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है" ह्याची प्रचिती येत स्वारगेटहून प्रवासी घेऊन आलेले एक रिक्षावाले काका 'स्वारगेट-शिवाजीनगर?... स्वारगेट-शिवाजीनगर?' असे विचारत शेजारी येऊन थांबले. वेळ महत्वाची असल्याने अजून कुठल्या पर्यायाचा विचार करत न बसता त्या रिक्षानेच पुण्यनगरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. लोणावळ्यातून बाहेर पडेपर्यंतचा प्रवास मात्र फारच कंटाळवाणा झाला. त्या संपूर्ण रस्त्यात ठिकठिकाणी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या मिरवणुकांत नाचणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी, लांबलचक फटाक्यांच्या माळा वगैरेंमुळे रस्त्यावर वाहने कमी असूनही वाहतुकीचा खोळंबा होत होता, परंतु पूर्वी 'मिरवणूक आणि गुलाल' असे जे समीकरण होते त्यात झालेला एक मोठा बदल ठळकपणे जाणवला. आता राजकीय विजयी मिरवणुकांमध्ये उधळला जाणारा तथाकथित 'गुलाल' हा लालसर गुलाबी रंगाचा राहिला नसून त्यालाही उमेदवाराची धार्मिक पार्शवभूमी किंवा राजकीय विचारसरणीनुसार भगवा, निळा, हिरवा, पिवळा अशा विविध रंगछटा प्राप्त झाल्याचे खोपोली आणि लोणावळ्यात दिसले. असो... रस्त्यात मधेच कुठेतरी बसलेल्या एका प्रवाशाला उतरवण्यासाठी रिक्षा वाकडेवाडी बस स्टँडवर थांबली असताना अभ्याचा कुठपर्यंत पोचलो हे विचारायला फोन आला. मी शिवाजीनगरला पोचलो असून आता आधी ठरवल्याप्रमाणे पद्मावतीला जाऊन मग डेक्कनला येतो असे त्याला सांगितल्यावर, मला इथून तिथे जाऊन परत यायलाच सहा वाजून जातील असे त्याचे मत पडले. आमच्या ह्या वार्तालापातले माझे बोलणे रिक्षावाल्या काकांनीही ऐकल्याने त्यांनी सुद्धा हेच मत मांडले आणि "मी तुम्हाला शनिवार पेठेत सोडतो, तिथून दुसऱ्या रिक्षेने तुम्ही डेक्कनला लवकर पोहोचाल" असा सल्ला दिला. एकूणच माझे पुण्याविषयीचे भौगोलिक ज्ञान पुलंच्या भाषेत "ती पानपताची लढाई म्हणतात ती पुण्यात नक्की कुठेशी झाली हो?" अशा 'अगाध' वगैरे पातळीवरचे असल्याने आणखीन काही आगाऊपणा न करता निमूटपणे ह्या दोन 'माहितगार' मंडळींचे ऐकून त्याप्रमाणेच करायचे ठरवून शनिवार पेठेत एका रिक्षेतून उतरत समोरच्या दुसऱ्या रिक्षेत बसत 'कॉल लॉग'च्या अनुसार फायनली चार वाजून सदोतीस मिनिटे झाली असताना वाडेश्वरला पोचलो... चॅप्टर ३ - "द नोबल पीपल ऑफ मिपा" वर म्हंटल्याप्रमाणे ४:३७ला तुडुंब भरलेल्या रेस्टोरंटच्या बाहेरून कुमारसरांना मी अड्ड्यावर पोचलो असून धूळ-माती खात केलेल्या प्रवासातले कपडे इथे कुठे बदलता येतील हे विचारायला कॉल केल्यावर ते बाहेर आले आणि 'आधी आपण वॉशरूम कशी आहे ते बघू आणि मग काय ते ठरवू' म्हणाले. बाहेरून वॉशरूम बऱ्यापैकी मोठी वाटल्याने आपले काम होईल असे आधी वाटले होते पण तिची 'मल्टीपर्पज' अंतर्गत रचना आणि ओलेकच्च फ्लोरिंग बघितल्यावर ते अशक्य असल्याचे लक्षात आल्याने तो विचार बाजूला सारत सरळ गप्पांमध्ये रममाण झालेल्या मिपाकरांचे टेबल गाठले. ह्याठिकाणी जमलेल्या मान्यवरांपैकी कुमार१, भक्ती आणि गिरीजा ह्यांना आधी प्रत्यक्ष भेटलो होतो आणि अभ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून व्य.नि, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर संपर्कात होतो, अबा, स्वधर्म आणि रामचंद्र साहेबांना आधी फोटोत पाहिले होते त्यामुळे भक्तीताईंचे मिस्टर 'अतुल' आणि केवळ लेखनातून परिचयाचे असलेले 'चामुंडराय' हे प्रत्यक्षात किंवा फोटोत पाहिले नसलेले दोन चेहरे तेव्हढे माझ्यासाठी नवीन होते. . चॅप्टर ४ - "स्नॅक्स अँड लिकर चॉकलेट्स" भक्तीताईंनी आणलेल्या पालकवड्या आणि तिळगुळाच्या वड्यांचा आस्वाद घेत गप्पांमध्ये रममाण झालेल्या ह्या सर्व मंडळींशी भेट झाल्यावर कुमारसरांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येकाने आपली छान ओळख करून दिली ज्यातून इथे जमलेले सगळे मिपाकर वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असल्याचे समजले आणि प्रत्येकाच्या बोलण्यात आलेल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी थेट रिलेट होता आल्याने नव्याने भेटलेल्या सर्वांशी सूरही पटकन जुळले. एकीकडे वेगवेगळ्या विषयांवरील गप्पांना सुरुवात होत असताना दुसरीकडे अभ्या आणि अबाचे ऑर्डर काय द्यायची ह्या गहन विषयावर एकमत होऊन ती दिली जात असताना चामुंडराय साहेबांनी एका सुंदरश्या पिशवीतून आणलेली 'लिकर चॉकलेट्स' प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली. एकतर 'व्हाईट असो कि डार्क', चॉकलेटचा कुठलाही प्रकार मला प्रचंड आवडतो, त्याला लिकर चॉकलेट अपवाद असूच शकत नाही. परंतु ते खाल्ल्यानंतर उफाळून येणारी पुढची 'तृष्णा' कट्ट्याच्या ठिकाणी शांत होणे अशक्य असल्याने ते आत्ता खाऊ कि नको अशा विचारात पडल्याने आधी बराचवेळ हातात धरून ठेवले होते आणि नंतर सँडविच संपेपर्यंत समोरच्या प्लेटमध्येच ठेवले होते ते चहा प्यायल्यानंतर तोंडात टाकून कचाकच चावून त्यातले 'गर्भीत द्रव्य' चवीने अनुभवले आणि पुन्हा गप्पांमध्ये सहभागी झालो... चॅप्टर ५ - "फ्री डायलॉग" एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे वेगवेगळे विषय निघत होते आणि त्यावर माहितीपूर्ण परिसंवाद घडत होते. मध्येच रेस्टोरंटमध्ये नव्याने प्रवेशकर्ता झालेला कोणी उभ्या उभ्या इकडेतिकडे बघताना दिसला की "हा कोणी उशिरा पोचलेला मिपाकर असावा काय" असा प्रश्न उपस्थित व्हायचा आणि ऐनवेळी धागा वाचून अचानक कोणी पुण्यातला मिपाकर ४ ते ६ ह्या कट्ट्याच्या ठरलेल्या वेळेत हजर होण्याची शक्यता असल्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या. बाकी 'येऊ शकतो' असे कळवलेले एक 'किल्लेदार' तेवढे अजून आलेले नव्हते पण ते उशिरा आले, आणि चेहरे अनोळखी असले तरी Gucci Flora चा सुगंध ओळखणारा हा 'गंधप्रेमी' मिपाकर बरोब्बर कट्टेकऱ्यांच्या टेबलला येईल ह्याची खात्री होती! बँकिंग प्रणालीतला AI चा वापर, कॉम्प्रेसर, पंपिंग सिस्टम्स, वाहन आणि त्यासाठी लागणाऱ्या सुट्याभागांचा निर्मिती उद्योग आणि त्यावर आधारित ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था, पवनचक्क्या, त्यांची देखभाल, एक्स्प्रेस ग्रुप अशा अनेक विषयांच्या जोडीला एवढे मिपाकर एकत्र जमलेत म्हंटल्यावर मिपाचा, तिथल्या लेखनाचा, तांत्रिक समस्यांचा विषय निघाला नसता तरच नवल होते. विषय भरपूर होते पण त्यावरच्या 'बैठ्या' चर्चेसाठी वेळ मात्र कमी पडला... चॅप्टर ६ - "द वॉकवे चॅट्स" एकतर रविवारची संध्याकाळ, त्यात तिथून जवळच सुरु असलेल्या पुस्तक महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने पुणेकर आणि खास तिथल्या प्रदर्शनासाठी लांब-लांबच्या ठिकाणांहून आलेल्या वाचनप्रेमींची तुफान गर्दी, असे असूनही मिपा कट्ट्यासाठी चार ते सहा अशा दोन तासांसाठी दोन टेबले वाडेश्वरच्या मालक/व्यवस्थापकांकडून मिळवण्यात स्वधर्म साहेबांनी यश मिळवले हे फार आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे! कट्ट्यासाठी आम्हाला मिळालेली वेळ संपली होती आणि बाहेर टेबल रिकामे होण्याची प्रतीक्षा करत उभ्या असलेल्या ग्राहकांची गर्दीही दिसत होती त्यामुळे 'आता उठा' असे खास पुणेरी शैलीत कोणीतरी सांगायला यायच्या आत आम्ही सगळेजण बाहेर पडलो. त्यानंतरच्या फोटोसेशन बद्दल अभ्याने आधीच लिहिले असल्याने पुनरावृत्ती टाळतो. कट्ट्याला खूप मजा आली. आतमध्ये बसून झालेल्या गप्पांना विषय भरपूर असले तरी वेळ मात्र कमी पडल्याने आत अर्धवट राहिलेल्या आणि काही नवीन विषयांवर बाहेर उभ्या उभ्या गप्पासत्र सुरु झाले. अख्ख्या कट्ट्याचे 'फलित' ह्या गप्पासत्रात सामावलेले आहे ते म्हणजे अबांनी म्हणजेच अमरेंद्र बाहुबली ह्यांनी ते आता राजकीय चर्चांमध्ये भाग घेत नसून आता ललित लेखनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले, हे खूपच आनंददायक आहे! चॅप्टर ७ - "लिव्हिंग द व्हेन्यू - द नेक्स्ट स्टेप" आप-आपली डेस्टिनेशन्स योग्यवेळी गाठण्यासाठी 'आता मात्र निघालेच पाहिजे' असे फर्मान एकेकांच्या मेंदूकडून येईपर्यंत सुमारे सव्वा ते दीड तास हे 'खडे' गप्पासत्र चालले. शेवटी अबा आणि रामचंद्र साहेब मंडईच्या दिशेने आणि मी आणि अभ्या त्याच्या बुलेटवरून पद्मावतीच्या दिशेने निघालो. रेस्टोरंटपासून पद्मावतीपर्यंतचा रस्ता ह्या माजी पुणेकराला माहिती नसल्याने एखाद दोन किलोमीटर नंतर एके ठिकाणी गुगल मॅप सुरु करावा लागला तेव्हा त्यावर पुढे नऊ किलोमीटरचा प्रवास असल्याचे दाखवत होते. बुलेटच्या आणि आजूबाजूच्या रहदारीच्या आवाजावर ताण करत आमच्या काही वेगळ्याच विषयांवर गप्पा सुरु असल्याने माझे फोनकडे लक्षच नसायचे आणि बहुतेक ओलांडलेल्या प्रत्येक वळणानंतर मॅपला री रूट करून दाखवावे लागत होते. आपणही आपल्या को-ड्रायव्हर/रायडरवर मॅप कडे लक्ष नसल्याबद्दल वैतागतो पण असे वागणे किती चुकीचे आहे ह्यावर आमचे दोघांचे एकमत झाले. घरी पोचायला मध्यरात्र/पहाटेचे किती का वाजेनात मला त्याची काही पर्वा नव्हती पण... "दुपारी तीन-सव्वातीन पर्यंत तुझ्याकडे येतोय" असे काल रात्रीच सांगून ठेवल्यामुळे अजून वाट बघत बसलेल्या मामेबहिणीकडे पाच मिनिटांसाठी का होईना पण तोंड दाखवून मग स्वारगेटहून ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरीने परतीच्या प्रवासाला लागायचे होते... चॅप्टर ८ - "माइल्स बिटवीन, मेमरीज विदीन" माझ्यासारखा होपलेस नेव्हीगेटर लाभल्याने पद्मावती पर्यंतच्या प्रवासाला गरजेपेक्षा किमान १५ मिनिटांनी तरी जास्त वेळ खर्ची पडला त्यामुळे सिटी प्राईडच्या समोर पोचल्यावर तिथून रस्ता माहितीचा असल्याने बहिणीला फोन करून "आता वर यायला वेळ नाही तेव्हा तूच खाली सोसायटीच्या गेटवर ये आणि मला स्वारगेटला सोडायला भाच्यालाही बरोबर घेऊन ये" असे सांगितले. गेटच्या जवळच सुमारे दहा-बारा मिनिटे उभ्या-उभ्याच वार्तालाप झाल्यावर तिने घरी द्यायला दिलेले कसलेतरी पार्सल सॅक मध्ये टाकत एकमेकांचा निरोप घेऊन अभ्या त्याच्या मुक्कामाच्या दिशेने आणि मी आणि भाचा स्वारगेट्च्या दिशेने मार्गस्थ झालो. शेवटची शिवनेरी साडे दहाची होती आणि स्वारगेटला पोचलो तेव्हा वाजले होते पावणे नऊ. पुण्याच्या हवेत भूकही रोजच्यापेक्षा लवकर लागण्याची चिन्हे जाणवू लागली होती, मग आहे वेळ हातात तर आधी जेवून घेऊ आणि मग निघू असा विचार करून भाच्याला मला समोरच्या 'नटराज'मध्ये सोडायला सांगून घरी पाठवून दिले. नटराजमध्ये स्थानापन्न झालो. चामुंडरायांच्या लिकर चॉक्लेटमुळे 'शेर के मुह मी खून तो लग ही गया था' मग तृष्णाशांती साठीची ऑर्डर दिली आणि "साडे दहापर्यंत इथून निघून दोन-अडीच वाजेपर्यंत येतो" असे कळवायला घरी फोन केला तर कशाला एवढ्या लेट येतो त्यापेक्षा उद्या सकाळी उठून ये आरामात, मी थांबतो तू येईपर्यंत असे भाच्याने सांगितल्यावर "बघतो इथून निघायला किती वाजतात ते कंटाळा आला तर मग उद्या येतो." असे सांगून फोन ठेवला. हेडसेटवर आवडीची गाणी ऐकत व्होडकाचे दोन पेग्ज आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण होईस्तोवर सव्वा दहा वाजले होते. आता मात्र प्रवासापेक्षा आराम हवासा वाटू लागल्याने इथेच रूम घेऊन ताणून द्यावी आणि उद्या सकाळीच निघावे असे ठरवले. त्यांच्याकडे रूम उपलब्ध नसल्याने व्यवस्थापकानेच सुचवलेल्या जवळच्याच हॉटेल अवंती मध्ये मुक्काम ठोकला. रुमध्ये आराम चांगला मिळाला पण पहाटेपर्यंत झोप काही लागायला तयार नव्हती. पहाटे साडेपाचच्या सुमारास मिपावर एक प्रतिसाद दिला त्यानंतर कधीतरी झोप लागल्यावर डायरेक्ट सकाळी साडे-दहालाच उठलो. अकराच्या सुमारास चेक-आऊट करून न्याहारीसाठी नटराजच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो. तिथे चहा-नाश्ता उरकून स्वारगेट स्टँडवर आलो तर कळवामार्गे ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरीला अजून वीस-पंचवीस मिनिटे बाकी असल्याचे कळले. त्याआधी खोपोली किंवा कर्जत अशा सेंट्रल लाईनवरच्या स्टेशनजवळ जाणारी कुठली बस आहे का अशी चौकशी केल्यावर जुन्या हायवेवरून खोपोली फाटा मार्गे पालीला जाणारी बस मागच्या बाजूला लागल्याचे समजले. मागे जाऊन बघितले तर खरंच बस उभी होती आणि बऱ्यापैकी रिमामी असल्याने विंडोसीटही मिळाली. धुरंधरचे 'इष्क जलाकर' हे गाणे रिपीट मोडवर ऐकत, खिडकीतून बाहेरची दृश्ये बघत प्रवास मजेत सुरु होता. कासारवाडीला 'अ‍ॅटलास काँपको आणि अल्फा लवल' ह्या कंपन्या दृष्टीस पडल्यावर काल संध्याकाळी चामुंडराय, रामचंद्र, अभ्या आणि अबाच्या बोलण्यात ह्या दोन कंपन्यांचा स्पष्ट नामोल्लेख आला असल्याने कट्ट्यावरच्या गप्पांची क्षणचित्रे डोळ्यांसमोर तरळू लागली आणि घरी पोहोचल्यावर देखील त्यात खंड पडला नाही...

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 02/01/2026 - 01:14
टर्मिनेटर यांनी काय काय प्रयास केले आहेत हे थोडक्यात कट्ट्याच्या टेबलावर कळले होते, पण हे इतके सारे करून हा माणूस केवळ मिपाकरांना भेटण्यासाठी इतके कष्ट घेतो हे वाचून अक्षरश: थक्क व्हायला झाले. बरं कट्ट्याचा वृत्तांतही अगदी तपशीलवार, की ज्यांना जमले नाही त्यांना वाटावे खरंच आपणसुध्दा जमवायला हवे होते. टर्मिनेटर भाऊंना दं ड व त _/\_

In reply to by स्वधर्म

अरे वा! मस्त डिटेल्ड लिहीलय, सर्वानी अशाच प्रकारे लिहिले असते तर कट्टा प्रत्येकाच्या दृष्टीने पाहताना वेगळीच मजा आली असती.

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र 02/01/2026 - 23:02
घसघशीत आणि रसरशीत! टर्मिनेटर म्हणजे फसफसून, फेसाळून, ओसंडून वाहणारा उत्साह अशी त्यांचं लेखन वाचून प्रतिमा तयार झाली होतीच, प्रत्यक्ष दर्शनाने खात्री पटली.

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 03/01/2026 - 17:48
एकदम जबरदस्त, कडक, जोमदार, धारदार वृत्तांत. तुमच्या सायासांना हॅट्स ऑफ. कट्टा हुकल्याची प्रचंड खंत वाटते आहे.

चामुंडराय 02/01/2026 - 21:18
टर्मिनेटर भाऊंना दं ड व त _/\_ : स्वधर्म टर्मिनेटर तुस्सी ग्रेट हो!! : Bhakti १०० +++ असेच म्हणतो. टर्मीनेटर तुम्ही लिहिलेला प्रदीर्घ कट्टा वृत्तांत वाचला. कट्ट्याला उपस्थिती लावण्यासाठी तुम्ही केलेली "यातायात" (हिंदी आणि मराठी - दोन्ही भाषेतील अर्थांप्रमाणे) खरंच भलतीच भारी होती. हॅट्स ऑफ टू यू , कुडोज् , ब्राव्हो , सॅल्यूट - शब्दच अपुरे आहेत !

मदनबाण 03/01/2026 - 10:45
कट्टा वृत्तांत आवडला. टर्मिनेटर चे प्रवास वर्णन वाचुन ते Hasta la vista, baby मोड मध्ये दिसले! :) @ टर्मिनेटर तुमच्या आयडीमुळे आणि एकंदर लिहलेल्या प्रवासाच्या डिटेल्समुळे मला उगाच The Arrival [ Terminator 2: Judgement Day ] आठवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

कट्टा एकदम जोरदार झालेला दिसतोय. तपशीलवार वृत्तांत वाचून कट्ट्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यासारखे वाटले. सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन.

टर्मिनेटर सिम्पली ग्रेट ! बापरे - काय प्रवास केला तुम्ही , तेही मिपा कट्ट्यासाठी मी समजत होतो की तुम्ही पुण्यात असता . तुम्ही इतकी वाट वाकडी करून आला होता - आपली भेट राहून गेली याची खंत आहे वृत्तांत मस्त ! खरंच मी कट्टा मिस केला @ अभ्या आपलं मागे बोलणं झालं होतं - विचारपूस मध्ये आपलीही भेट राहून गेली सारे वृत्तांत लै भारी आहेत !

गवि 04/01/2026 - 21:53
कट्टा वृत्तांताइतक्याच प्रतिक्रिया आणि उपवृत्तांतही भन्नाट. बाकी आमच्या टर्मिनेटर साहेबांनी थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? असा विचार आला. कोणत्याही गावातून पुण्याला थेट कनेक्शन असायला कठीण नसावे. कदाचित साहसाची गंमत घ्यायची असेल.. उत्तम वर्णन.

In reply to by गवि

टर्मीनेटर 04/01/2026 - 23:18
"थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? "
हा प्रश्न कोणा ऐऱ्या गैऱ्या नत्थू खैऱ्याला पडला असता तर 'बिना पुरा पढेही आ जाते हैं कोईभी मुंह उठाके' असा विचार करून हसून दुर्लक्ष केले असते 😀 पण साक्षात आमच्या गविशेठना हा प्रश्न पडला म्हंटल्यावर एका वाक्यात का होईना पण 'संत शिरोमणी इम्रान हाश्मींच्या' शैलीत उत्तर देणे अगत्याचे ठरते.... "रास्ते की परवाह करता... तो मंजिल बुरा मान जाती..."

In reply to by टर्मीनेटर

गवि 05/01/2026 - 04:28
सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते.
हम पूरा पढकेइच पूछा टर्मिनेटर सेठ.. बुकिंग शिवाय थेट पुणे बस मिळणे कठीण असावे तुमच्या इथून असे दिसते आहे. किंवा फ्रीकवेंसी कमी असेल. असो. एकूण प्रवास थरारक झाला तर..

In reply to by गवि

टर्मीनेटर 05/01/2026 - 09:21
"किंवा फ्रीकवेंसी कमी असेल."
येस सर... देअर यु आर! सकाळी १०:३० पर्यंत आणि संध्याकाळी ४ नंतर महाराजा, पिंकबस, कोंडुस्कर, मोरया, AR ग्रुप आणि तत्सम डेली सर्विसच्या इतक्या बस आहेत की तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रवासी तरी मिळत असतील का? असा प्रश्न पडावा. एका टूर ऑपरेटरची सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने एक 'इनोव्हा' ची सर्वात आरामदायक आणि जलद सेवाही आहे पण ती फक्त कोथरूडपर्यंतच आहे. तीच गत रेल्वेची. दहा-साडेदहा पर्यंत बऱ्याच गाड्या आहेत पण नंतर पुढचे दोन अडीच तास मात्र ठणठण गोपाळ... खोपोली-लोणावळा-पुणे असा हायब्रीड प्रवास आधीही यशस्वीरीत्या करून झाला आहे. हा थोडा वेळखाऊ प्रकार असला तरी प्रवास व्यवस्थित बसून होत असल्याने गर्दी, चेंगराचेंगरी अशा त्रासदायक गोष्टी टाळता येतात त्यामुळे माझ्यासाठी सोयीस्कर ठरतो! ह्या प्रकाराने आधीही कधी दगा दिला नाहीये आणि खरंतर ह्यावेळीही तो फारकाही त्रासदायक वगैरे वाटला नाही, त्या मिरवणूका वगैरेंमुळे होणाऱ्या वाहतूक खोळंब्याचा वैताग आला होता खरा पण काहीसा उशिराने का होईना पण कट्टास्थळी म्हंटलं तर योग्य वेळेत पोचलो ह्याचे समाधान जास्त आहे. मला वाटतं आता अधून-मधून असे वेडेवाकडे प्रवास मुद्दाम करावेत, त्यातही एक वेगळीच 'किक' आहे 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 06/01/2026 - 09:18
तुमच्या रिक्षेत बसून 'तिकडेही' फिरून आलो 😂 मला हा धागा आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचेही आठवत होते, पण हा लेख तुमचा होता की जेम्स वांड ह्यांचा होता हे लक्षात येत नव्हते, कारण त्यांचाही अशाप्रकारे करावा लागलेल्या प्रवासावरचा एक धागा होता त्यामुळे बहुधा थोडा कंफ्युज झालो होतो! असो... आज पुन्हा त्या 'महान' प्रवासावरचा लेख आणि प्रतिसाद वाचून मजा आली! "देख रही हो ना भक्ती... हम ढाई साल पेहले जैसे थे, वैसेही आज भी हैं". बिलकुल भी बदले नही हैं 😀

In reply to by गवि

अभ्या.. 06/01/2026 - 11:04
गविराज हे गगनविहारी असल्याने त्यांना सगळी अंतरे एरियल डिस्टन्स दिसतात. त्यांनी friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हा प्रवास 12 घड्याळी तासाचा सागितलं असता. प्रत्यक्षात माझे चार दिवस गेले तेही ट्रेन, विमान , कॅब , बस आणि बाईक अशी वाहने ही गोष्ट वेगळी.. . म्हणून आम्ही सांगतच नाही. ;)

In reply to by अभ्या..

गवि 06/01/2026 - 11:09
friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हा
अहो अभ्याशेठ, आम्ही कसले अंतर आणि वेळ सांगणार? तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार. तुमची जर्मन शब्दरचना म्हणजे श्वास न घेता लावलेली शब्दांची आगगाडी. ;-)

In reply to by गवि

टर्मीनेटर 06/01/2026 - 11:45
तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार
अगदी अगदी! आम्हालाही त्याने वरील प्रमाणे 'फ्राइड राईस हाफ इन' अशी फोड करुन त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगीतल्याने ते थोडे सोपे गेले 😀

टर्मीनेटर 06/01/2026 - 09:36
कैच्याकै लांबलचक असुनही कट्टा वृत्तांत वाचणार्‍या आणि तो आवडल्याचे कळवणार्‍या सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ बिपीन सुरेश सांगळे
आपली भेट राहून गेली
आज ना उद्या आपल्याही भेटीचा योग जुळून येईलच 👍

किल्लेदार 06/01/2026 - 20:55
कट्ट्यासाठी इतके सायास करून पुण्यास आलेल्या धुरंधर टर्मिनेटर यांना साष्टांग दंडवत. पुण्यातल्या पुण्यात असूनही येऊ शकलो नाही याबद्दल आता फारच चुटपुट लागून राहिली आहे. धुरंधर स्टाईल कट्टा वृत्तांत अत्यंत आवडल्या गेलेला आहे. पुढच्या कट्ट्यानंतर तृष्णातृप्तीचा एक एक्सटेंडेड कट्टा सुद्धा प्लॅन करून टाकू.

प्रचेतस 19/12/2025 - 15:14
अरे वा...! खूप दिवसांनी जाहीर पुणे कट्टा, यायला आवडलंच असतो, किंबहुना आलोच असतो पण आजच संध्याकाळो विदर्भात एका अल्पपरिचित ठिकाणी जंगलात भटकण्यासाठी निघत आहे. त्यामुळे येणे शक्य होणार नाही.

चामुंडराय 19/12/2025 - 16:40
येतो ! येतो ! Winter Solstice चा मुहूर्त आहे आणि सध्या पुणे मुक्कामी आहे. हा "मिसळ-पाव" असा दुग्धशर्करा योग असल्या कारणाने कट्ट्यास येण्याचे योजिले आहे.

In reply to by स्वधर्म

चौथा कोनाडा 20/12/2025 - 14:48
व्यनि दिसत नाहीत ... नविन लेखन सुद्धा गंडलेलं दिसतयं ... कट्ट्याला येण्याची इच्छा होतीच पण याच दिवशी दुसरा कार्यक्रम असल्याने पुण्यात असून सुद्धा येता येणार नाही याचे शल्य आहे. असो. २१ च्या कट्ट्यास मनःपुर्वक शुभेच्छा !

टर्मीनेटर 20/12/2025 - 12:35
"स्थळः वाडेश्वर, डेक्कन वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६."
इसे लॉक किया जाएं? की,
"जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे."
हाच उद्देश प्रमाण मानून कोणाला वेळेत काही बदल सुचवायचे आहेत? कारण कोणा एकाच्या सोयीसाठी (अर्थात मीच तो 😀) ठरवलेली वेळ अनेकांसाठी गैरसोयीची ठरणार असेल तर ती बदलणे नक्कीच श्रेयस्कर आहे! सकाळची वेळ पाळायला नाहीच जमले तर अभ्याशेठ किंवा भक्ती ह्यांच्यापैकी कोणालातरी व्हिडीओ कॉल करून व्हर्चुअल उपस्थितीचा पर्याय मला उपलब्ध आहेच.

In reply to by अभ्या..

टर्मीनेटर 21/12/2025 - 11:48
'नवसाला पावणारे' हे अ‍ॅडवायचे राहिले का 😀 अर्थात ह्या 'जागृत देवस्थाना'बद्दल मला पण काल तुझ्याकडूनच समजले, माझा आधी पाताळेश्वर आणि वाडेश्वर मध्येच गोंधळ झाला होता...

स्वधर्म 21/12/2025 - 12:58
मिपा नीट दिसत नाही त्यामुळे काही लोकांना नंतरचे प्रतिसाद दिसले नाहीत तरी ज्नायां शक्य आहे त्यांनी अवश्य या ही आग्रहाची विनंती.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 21/12/2025 - 21:16
माझ्याकडे फक्त 3 फोटोज आहेत त्यातला हा एक... 1 डावीकडून... चामुंडराय, कुमार सर, अमरेंद्र बाहुबली, अभ्या.., स्वधर्म, अतुल (भक्ती ताईंचे मिस्टर) पुढच्या रांगेत रामचंद्र, भक्ती, आणि त्यांची कन्या गिरीजा...

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 21/12/2025 - 21:33
BTW.. कट्टेकर्‍यांनो ज्या हॉटेल मध्ये आपण बसलो होतो ते कोणाचे आहे हे मला आणि अभ्याला नंतर समजले, ती पण एक गंमतच आहे...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 21/12/2025 - 21:48
च्यामारी ज्या मामेबहिणीकडे जाऊन चेंज करून कट्ट्याला यायचे होते, तिच्या भाच्याच्या सासऱ्यांचे आहे :)

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 21/12/2025 - 22:07
येस... जरूर करू... मागच्या डिसेंबर मध्ये 14 तारखेला कट्टा झाला होता, ह्या डिसेंबर मध्ये 21 ला झाला, आता पुढचा 28 डिसेंबर 2026 ला करूया :)

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 21/12/2025 - 21:47
या वाडेश्वरची मूळ संस्थापक शाखा म्हणजे बाजीराव रोडची. त्याच्या निर्मितीसंबंधीची एक 'कथा' मी सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी ऐकली होती. आता प्रस्तुत वाडेश्वर हे त्याच मालकांचे आहे की अन्य कोणी चालवते याची मला कल्पना नाही. :)

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 21/12/2025 - 21:44
सर्वांचे खरंच धन्यवाद. उद्या निवांत नेमक्या शब्दांत सांगते :) तूर्तास कट्टयातील महत्वाची छान गोष्ट सांगते -शेवटी कुमार सरांनी नारीशक्तीसाठी तेंडुलकरांचे सादर केलेले शब्द, खुपच छान वाटले _/\_ त्यासाठी विशेष धन्यवाद!!

हेमंतकुमार 21/12/2025 - 22:02
आज दुपारी चारची वेळ आणि रविवार . . . त्यामुळे वाहतूक थोडी तरी बरी असेल अशा आशेने रिक्षाने घरून निघालो. परंतु टिळक रोड - अलका चौक आणि डेक्कनचा परिसर नेहमीचसारखाच गाड्यांच्या रांगांनी भरलेला. हॉटेलजवळ येताच रिक्षातून उतरताना कसेबसे पाय ठेवायला जागा मिळाली आणि वाडेश्वराच्या दारावर दाखल झालो. एका उंच्यापुऱ्या व्यक्तीने हात करून, “तुम्हीच ते कुमार काय?“ असे विचारले आणि कट्ट्याला सुरुवात झाली आहे याची झलक मिळाली ! हेच ते चामुंडराय. त्यांची व माझी भेट 2020 साली झालेल्या खास कोविड स्पेशल मिपाच्या ऑनलाइन झूमवरील आंतरराष्ट्रीय कट्ट्यात आभासी रूपाने झालेली होती. आज दोघांनी एकमेकांना याची देही याची डोळा पाहिल्याने अगदी तृप्त झालो. भोवताली नजर फिरवताच एका कोपऱ्यात दबा धरून आणि हातात मिपा कट्टा असा फलक धरून बसलेले स्वधर्म आणि अभ्या नजरेस पडले मग दोघांनाही त्या कृतीबद्दल सलाम ठोकत आम्ही दोघे त्यांच्यात सामील झालो. बघता बघता क्रमाने इतर कट्टेकरी दाखल झाले आणि रविवारच्या रस्त्यावरील आणि हॉटेलातील तुडुंब गर्दीत आम्ही खुष्कीच्या मार्गाने शिरत दोन टेबले पकडली. बाकीचा वृत्तांत उद्या . . . शुभरात्री !

रामचंद्र 21/12/2025 - 23:29
कट्ट्यावरचा वेळ अगदी आनंदात गेला. बहुतेक सर्वच मला नवीन असूनही अगदी चिरपरिचित असल्यासारखी मजा आली. खुसखुशीत गप्पांच्या जोडीला भक्तीताईच्या चटपटीत पालकवड्या, ताजा, घरच्या तिळाचा तिळगूळ आणि चामुंडराय सरांनी सढळ हाताने वाटलेल्या 'बाटल्या' (मला Remy Martin मिळाली.) यामुळे आणखीनच मजा आली.

In reply to by रामचंद्र

टर्मीनेटर 22/12/2025 - 05:30
मी थोडा उशिराने कट्टास्थळी पोचल्याने त्या पालकवड्या 'सुगरण भक्तीने' आणल्या होत्या हे तुमचा प्रतिसाद वाचून समजले...

In reply to by रामचंद्र

हेमंतकुमार 22/12/2025 - 13:34
भक्तीताईच्या चटपटीत पालकवड्या, ताजा, घरच्या तिळाचा तिळगूळ
मेथी ऐवजी पालक असल्याने मी तर विशेष आवडीने खाल्ली. एकदम चविष्ट ! बाटली >>> मी चामुंडराय यांच्या शेजारीच बसलो असल्याने थोडा वशिला लावून सर्वात सौम्य डोसवाले ‘बाटली चॉकलेट’ आधी काढून घेतले. ते खात असताना त्यातील अल्पस्वल्प ‘तीर्थप्राशनाने’ क्षणभर मजा आली ! त्याचा आकार तर अगदी मोहकच.

In reply to by रामचंद्र

हाहा! कट्टा एक नंबर झाला, गप्पा गप्पा नी नुसत्या गप्पा! आधी शंका होती वाडेश्वर वगैरेत जागा मिळेल का वगैरे पण पट्टीच्या मिपाकरानी २ तास वेळ मागून २ टेबल हॉटेलवाल्याशी तह करून मिळवले! तर झाले असे की शनिवारी रायगडावर टकमक टोकावर दुपारी ३ वाजता उभा असताना व्हॉट्सअप वर रामचंद्र काकांचा खलिता येऊन पडला, “कट्ट्याला येणे करावे.” ५ वाजेपर्यंत किल्ला पाहून रायगड रोपवेच्या मेण्याने गड उतरलो, नि खाली पार्क ह्युंडाई कोरियन कंपनीच्या घोड्याने पुण्याकडे कूच केले, भर रात्री ताम्हिणी घाट ओलांडून पुण्यात प्रवेशलो, दुसऱ्या दिवशी २ वाजता मंडईतून रामचंद्र काकाना उचलून पुस्तक प्रदर्शनात गेलो, काका पुस्तके पाहत होते तो पर्यंत चकटफू मिळत असलेले आनंदमठ घेऊन इकडे तिकडे भटकत असताना एक ओळखीचा चेहरा मोबाईल मध्ये बघत बसलेला दिसला, हा तोच का? हा अंदाज लावत होतो, हिंमत करून विचारलेच आणी काय? त्या मिपाकर भक्तीताईच होत्या, मग काय भक्तीताई त्यांचे मिस्टर आणी मुलगी गिरिजा ह्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या. ह्यात अर्धा पाऊण तास गेला तोच ४ वाजले मग रामचंद्र काका, मी आणी ताई वाडेश्वरच्या दिशेने निघालो, मध्ये अभ्याना व्हॉट्सअप वर संपर्क केला नी misalpaav.com कट्टा असा फलक हातात घेतलेले स्वधर्म नी इतर तिघे ह्यांची भेट घडली, मग काय टेबल पटकाऊन गप्पाच गप्पा, सर्वानी सुरुवातीला इंट्रो दिले, स्वधर्म, चामुंडराय, कुमार १ काका, अभ्या, टर्मिनेटर अशे एकापेक्षा एक दिग्गज सोबत भक्तीताई, रामचंद्र काका हे आधी भेटलेले मिपाकर विविध विषय, माहिती, गप्पा, विनोद. ताईने आणलेल्या अतिशय चविष्ट वड्या नी थेट कॅनडाहून चामुंडराय सरानी आणलेले बाटलीवाले चॉकलेट, साखर सोडलेली असूनही ती मोहक बाटली खायची इच्छा आवरू शकलो नाही, अतिशय छान चव! वाडेश्वरचे सॅन्डविच, चहा, कॉफी, वाडेश्वरची वेळ संपली तरीही बाहेर उभे राहून आणखी १ तास गप्पा झाल्या असाव्यात.

हेमंतकुमार 22/12/2025 - 15:04
स्वधर्म, रामचंद्र, अभ्या आणि भक्ती व कुटुंबीय यांची प्रथमच भेट झाली. अबा ची भेट पूर्वी पाताळेश्वरावर झालेली होती. टर्मिनेटर व माझ्या तर आतापर्यंत भेटीच भेटी झालेल्या असल्याने परिचयाची पातळी ओलांडून आम्ही कधीच मैत्रीच्या प्रांतात विहार करीत आहोत. सर्वांनी आपापला परिचय अतिशय उत्तम रीतीने करून दिल्याने सर्वांना व्यवस्थित जाणून घेता आले. आनंद वाटला. घराकडे परतीच्या प्रवासात चामुंडराय व मी एका रिक्षाने आल्याने आम्हा दोघांचाही वीस मिनिटांचा छानसा निवांत गप्पांचा कट्टा झाला जो खूप आनंददायी होता. माझ्या पूर्वीच्या शनिवारवाडा आणि पाताळेश्वर येथील कट्ट्यांप्रमाणेच हा कट्टा देखील रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.

कंजूस 22/12/2025 - 15:11
न येण्याचे कारण संध्याकाळी पुण्यातील कट्टा करून परत जाणे अशक्य असते. पाताळेश्वरला सवा नऊला हजर राहून परत साडेतीनच्या गाडीने जाऊ शकतो. तिकडे तीनवेळा येऊन गेलो आहे. तिकडे झाडाखाली उभ्या उभ्याही कट्टा करता येतो. छोटा वृत्तान्त आवडला.

Bhakti 22/12/2025 - 15:42
रविवारच्या मिपा कट्ट्याची वेळ ४ ते ६ होती पण पुस्तक प्रदर्शनात ३ वाजताच अबा भेटला. आमचा कट्टा एक तासच अगोदर सुरु झाला . मी आबाला कौतुकाने खरेदी केलेल्या पुस्तकांची भरलेली पिशवी दाखवली . तर आमचे हे आणि अबा रखरखीत खान्देश आणि मराठवाड्याचे पाणी ,उद्योगांवर चर्चा करत होते ;) आबा म्हणाला मी रामचंद्र काकांना शोधून आणतो आणि तो अर्ध्या तासाने परत आला. रामचंद्रकाका आल्यावर आम्ही फर्ग्युसन महाविद्यालय ते वाडेश्वरला गाडीतून वाट काढत निघालो.रस्त्यात ब्रिटिश लायब्ररी (जुनी),टाइम्सचे कार्यालय,रानडे इन्स्टिट्यूट याची इमारत कामकाज सांगितलं ... एक हेरिटेज वॉकच यानिम्मिताने झाला. वाडेश्वरला पोहचल्यावर स्वधर्म मिसळपाव.कॉम चा फलक घेऊन उत्साहाने उभे होते हे छान वाटले. टर्मिनेटर सोडता बाकी सर्व मिपाकर कट्ट्यासाठी हाजीर होते.स्वधर्म,कुमार १ यांचे छायाचित्र आधी पाहिल्याने ते ठाऊक होते पण यापैकी अभ्या आणि चामुंडराय याना प्रथम पाहिले . आता आम्ही टर्मिनेटर यांची वाट पाहत होतो. काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक टेबल मिळाल्यावर मिसळपाव कट्टा रंगायला सुरु झाला. आणि मग थोड्याच वेळात टर्मिनेटर यांचे आगमन झाले...आता जे येणार त्यापैकी सर्वजण आले पण 'येऊ शकतो' यातले 'किल्लेदार' मिपाकर राहिले हे समजले. सर्वांच्या ओळखी सुरु झाल्या . मला तेव्हा समजले आजचे सर्वच मिपाकर आपल्या व्यावसायिक क्षेत्रातही धुरंधर आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाचे क्षेत्रातले अनुभव ऐकण्यासारखे होते. मधेच वेटर मिसळपाव. कॉम फलक पाहून मिसळपावचे ऑर्डर देणार का हे गंमातीने म्हणाला आणि एकाच हशा पिकला ... हायला पुण्याचे वेटरही हजरजबाबी आहेत कि अस मला वाटलं :) पलिकडच्या टेबलाची चर्चा मला ऐकू नव्हती ,पण कुमार १ ,चामुंडराय ,स्वधर्म यांच्याशी मी त्यांच्या -माझ्या लेखनाविषयी ,मतांविषयी अल्प बातचीत केली. मग आंतरजालावरच्या इतर चांगल्या गोष्टींची चर्चा झाली ,सर्वात सुंदर ,वापरायला सुंदर संस्थळ मिपाच आहे याबाबत सर्वांना मिपाकर असल्याचा आनंद समाधान आहे हे जाणवलं पण सर्व्हर ,इथली कमी लोकसंख्या अनेकदा रसोभंग करतो याबाबत थोडी नाराजी वाटते हेही एकमत झाले. सॅन्डविचवर माझ्या लेकीने चांगला ताव मारला ,स्वधर्म यांचेही सँडविच तिने फस्त केले. चामुंडराय यांनी आणलेलया 'तीर्थ' मिश्रित चॉकलेट बाटल्या भारीच दिसत होत्या. पाच वर्षांपूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याचा सुरु वाईनचा प्रोजेक्ट होता तेव्हा मी आणि मैत्रिणी सॅम्पल टेस्टिंग नावाखाली चढेपर्यंत वाईन प्यायलो होतो.पण आज अहोंसमोरच हे तीर्थ पिताना आता घरी निदान वाईनची बाटली आणायला हरकत नाही असे वाटतंय :) मी आणलेली पालक शंकरपाळी,तिळगुळ वड्या व माझ्या इतरहि अनेक पाककृतींचे सर्वानी कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. मी मटार करंज्याही बनवून आणल्या होत्या पण घरी पुण्यात त्या सगळ्यांना आवडल्याने संपुन गेल्या.. इकडे आमच्या यांना आधीच तंबी दिल्याने त्यांनी श्रोता होण्याचे स्वीकारले :) गिरीजाला मात्र हे काका मला कसे ओळखतात याचे आश्चर्य वाटत राहिले. अखेर कट्टा समारोपाकडे वळाला तेव्हा कुमार १ यांनी तेंडुलकरांचे स्त्रीचे आयुष्यातले मोलाचे स्थान अशा आशयाचे खूप सुंदर शब्दांचे सादरीकरण केले ... हळू हळू आम्ही डेक्कनच्या गर्दीत कट्ट्याच्या आठवणी घेत विरून गेलो... जय मिपा :) चामुंडराय ,कुमार १,अबा,टर्मिनेटर,अभ्या,रामचंद्र ,स्वधर्म,अतुल,मी,छोटी गिरिजा 1 पुणे बुक फेस्टला अबा,मी (भक्ती),रामचंद्र .. 2 हाच तो खाऊ बातलि विथ चकणा 3

जुइ 23/12/2025 - 04:23
झक्कासं कट्टा आणि खादाडीचे फोटो आवडले! बर्‍याच काळानंतर पुण्यात जाहीर कट्टा झाला ते पाहूण चांगले वाटले.

टर्मीनेटर 23/12/2025 - 12:06
रामचंद्र, कुमार१, अमरेंद्र बाहुबली, भक्ती ह्या कट्टेकर्‍यांचे लघु, मध्यम, दिर्घ अशा विविध स्वरुपातले 'कट्टा वृत्तांत' वाचुन प्रत्यक्ष कट्ट्याएवढीच मजा आली 👍 आता उत्सवमुर्ती 'स्वधर्म, चामुंडराय आणि अभ्या' ह्या त्रिमुर्तींच्या वृत्तांतांची वाट बघतोय. मलाही चार(?) ओळी लिहायची इच्छा आहेच, परंतु माझा 'टंकन वेग' गिनेस किंवा गेला बाजार लिमका बुक्ने तरी दखल घ्यावी इतका जास्ती असल्याने अत्ता लिहायला घेतला तर संध्याकाळ्/रात्री पर्यंत कदचित तो लिहुन पुर्ण होईल असा प्रथमिक अंदाज आहे 😀

अभ्या.. 23/12/2025 - 12:41
दिग्गज व्हायला बहुतेक मिपावर एका आयडी ने एक तप तरी पूर्ण करावे लागते म्हणे. तपपूर्तीनंतर दोन तीन वर्षांनीही कुणी मिपावर दिग्गज म्हणून संबोधन देईना तेव्हा म्हणाले एक कट्टा करावाच. तसे आधीही तीन चार पाताळेश्र्वर वगैरे स्थाने कट्टा निमित्ताने पाहिलेले होती. तेव्हा सोलापूर हून येण्याचा उत्साह होता. पुण्यात आल्यानंतर काही पिंची करांच्या गाठीभेटी होत राहिल्या पण अधिकृत मीपा कट्टा मात्र पुणे सोडल्यानंतर योग आला. असो. स्वधर्म शेठ सोत्री नानाला भेटल्यानंतर भारतात डिसेंबरात भेटू म्हणाले. तेव्हा बऱ्याच अडचणी चालू होत्या. पण शनिवारी रात्री पुण्यात आलो आणि रविवारच्या कट्ट्याला येणे जमेल असे वाटू लागले. सौदागराला गणेशाला भेटलो पण साहेब बीजी असल्याने एकटाच फर्गसन रोडला निघालो. प्रचेटस सर काही अनवट ठिकाणी जायचे आहे म्हणून कट्ट्याल टांग मारीत झाले. बाकी मिपावर अधून सर्वर नाराज असल्याने कट्ट्याची प्रसिद्धी होते आहे नाही हा विचार आलेला. विरोधी पक्षाचे तीनचार लोक असल्यानं मिपाने माईक बंद करण्याची संसदीय नीती वापरली की काय असाही दुष्ट विचार मनी आला पण संविधानतकीच श्रद्धा नीलकांत मालकावर असल्याने तो विचार झटकला. आधी घड्याळाला कोलायची सवय जर्मनीत मात्र सोडावी लागली होती तेव्हा शार्प 3.55 ला वाडेहश्वर समोर उभे राहून स्वधर्म यांना कॉल केला व पार्किंग प्लस हॉटेलात जागा मिळते का ह्याची चिंता व्यक्त केली. तेही सांगलीकर पुणेकर आणि लंडन कर असे फिरलेले असल्याने म्हणाले करू आपण मानेज. मिसळपावाचा कट्टा असे ए 4 प्रिंटआउट घेऊन उभे असता कुमार डॉक्टर दिसले. त्यांना आधीच्या कट्टा फोटोमुळे ओळखत होतोच. त्यांच्यासोबत चामुंडाराय् होतेच. इतक्या वेळात टर्मिनेटर लोणावळ्याला आलोय. शिवाजी नगर ला बसलोय, शनिवार पेठेत जाऊ म्हणतोय असा उपदेत देत होतेच त्याचेही आगमन झाले. बाहुबली संपर्कात होते ते येताना रामचंद्र काका आणि भक्ती ताई ह्यांना घेऊनच आले. भक्तीताईची गोंडस कन्या आणि साहेब सोबत होतेच. भावकीतले रेफरन्स थोडेसे उकरले आणि 6 अधिक 4 अशा दहा खुर्च्या व दोन टेबल इतक्या जागेवर कट्टा सुरू झाला. स्वधर्म ह्यांनी ओळखीचा प्रस्ताव मांडला व सुरुवात माझ्यापासून करावी लागली. भक्तीताईनी सोबत आणलेल्या पालक मठरी आणि तीळ वड्या वाटप केल्या. चामुणदराय ह्यांनी सुंदर वाइन चॉकलेट्स आणलेली होती. हळूहळू टेबलाच्या दोन्ही साइडला दोन गट पडून दोन चर्चा सुरू झाल्या. माझ्या बाजूला बाहुबली रामचंद्र काका आणि समोर टर्मिनेटर असल्याने फारसा राजकीय चर्चेला वाव ठेवलाच नाही. समोरही तीच परिस्थिती होती. बाहुबली ह्यांची युरोपाबद्दल उत्सुकता, रामचंद्र काकांचा दांडगा अनुभव आणि चौफेर ज्ञान पहाता जेवढे जमेल तितके बोलणे पत्करले. समोर ज्ञान सागर कुमार डॉक्टर आणि तितकाच अनुभव असणारे चामुंदराय होते. स्वधर्म शेठ चामुंदराय ह्यांची वेगळ्याच क्षेत्रातली मुशाफिरी चकित करणारी होती. भक्ती ताईंनी बहुधा पुस्तक प्रदर्शनाचे डिटेल्स दिल्या पण तेव्हा आमची ऑर्डर देण्यासंबंधी चर्चा चालू होती. थोडासा अल्पोपहार करून सांगता करताना कुमार डॉक्टरांनी सुंदर कविता ऐकवून एकप्रकारे भक्तीताईना मिपातर्फे मानवंदना दिली. बाहेर फोटोसेशन करताना (जो सगळ्यात नावडता भाग माझा) एकमेकांना विनंत्या करून मोबाईल आडवे केले गेले आणखी निरोप समारंभ सुरू झाला. स्वधर्म शेठ काही कामानिमित्त पटकन निघाले. बाकी एकेक निघताना ही बरेच खुमासदार डिटेल्स निघत गेले. शेवटी राहिलेल्या टर्मिनेटर भाऊंना पद्मावती ला सोडण्याची जबाबदारी पत्करून आम्हीही प्रस्थान केले. कट्ट्याच वृत्तांत द्यावा म्हणाले तर मिपावर सर्वर डाऊन. हळूहळू तोही पूर्व स्थितीत आल्यावर एकेकेक वृत्तांत वाचले. म्हणले नवीन काय लिहावे पण आता इतक टायपल ते वाया जायला नको म्हणून .......... a

In reply to by अभ्या..

अभ्या.. 30/12/2025 - 13:05
फोटोतले डावीकडून अमरेन्द्रा बाहुबली, टर्मिनेटर, डॉ. कुमार, चामुंडराय, स्वधर्म, श्रीयुत भक्ती, भक्तीपुत्री गिरिजा, भक्तीताई, रामचन्द्रकाका, अस्मादिक....

झकास झाला की कट्टा!! घरी पाव्हण्यांबरोबर बार्बेक्यु चा कार्यक्रम ठरल्याने सामान आणणे व ईतर लुडबुड करण्यात वेळ गेल्याने कट्ट्याला येता आले नाही. पण व्रुत्तांत वाचुन छान वाटले.

प्रचेतस 24/12/2025 - 09:56
पुणे कट्ट्याला ह्यावेळी प्रथमच मुकलो. ह्यावेळी पूर्वनियोजित कामांमुळे पुस्तक महोत्सव घाईघाईत एकदाच थोडासा बघता आला. तसेच कट्ट्यालाही येता आले नाही. पण मिपाकरांचा कट्टा मात्र जोरदार झालेला दिसतोय. चामुंडराय ह्यांना प्रथमच पाहिले. सर्वच कट्टेकर्‍यांचे कौतुक. लवकरात लवकर पुन्हा कट्टा घडवून आणा. उपस्थिती राहिलच.

स्वधर्म 24/12/2025 - 21:12
सुगंधी कट्टा नावाचा सिनेमा होता म्हणे. पण आपला दिवस सुगंधी करणारा कट्टा आपल्या ऑनलाईन घसटीतल्या लोकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवण्याचा सोनेरी योग रविवार २१ डिसेंबरला २०२५ आला. जालावर आपल्याला मर्यादित माणूस कळतो पण तासाभराच्या प्रत्यक्ष गप्पांमध्ये प्रत्येक मिपाकर आपआपल्या क्षेत्रात किती पोचलेला आहे हे समजले. एकेका आसामीबद्दल केवढे तरी लिहिता येईल अशी बहुमोल माणसे भेटली. आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात आपला मिपा मित्र असणार असे वाटण्याएवढी जवळीक या दोन तासांनी दिली. आपण सगळेच धाग्यावर केवढे तरी बौध्दिक पाहतो पण ही सगळी मधुर माणसे आहेत आपल्याशी त्यांचे ऋणानुबंधा जुळलेच हे फिलींग सुखद आहे. बाकी ठळक बातम्या आधीच दिलेल्या आहेत आणि मला कामं उरकण्याची गडबड असल्याने वृत्तांत लिहायला जरा उशीर झालाय पण सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे कट्ट्याचे हायलाईटस दिलेच आहेत. काही खास मिपाकर पुणेकर जरी येऊ शकले नाहीत तरी पुन्हा जिथे संधी मिळेल तिथे त्यांना भेटायची इच्छा नक्की पूर्ण करणार. जय मिपा, जय मिपाकर.

चामुंडराय 25/12/2025 - 19:05
केवळ एका धाग्यावर आणि स्थळ, काळ, वेळ ह्या बद्दल कोणतीही भवती न भवती होता, अतिशय शॉर्ट नोटिसवर पुणेरी कट्टा यशस्वीरीत्या पार पडला. कट्टा आयोजनासाठी स्वधर्म ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे आभार. मी पहिलटकर (first time) कट्टेकरी असल्याने आणि कुठल्याच मिपाकरास व्यक्तिगतरित्या ओळखत नसल्याने थोडासा साशंक होतो परंतु सगळ्यांनी लगेचच आपलेसे केले आणि जुनी ओळख असल्यासारख्या गप्पा सुरु झाल्या. मिपा सदस्यत्व घेण्याच्या आधी पासूनच कट्टा किंवा गटग बद्दल नेहेमी उत्सुकता होती परंतु प्रत्यक्ष कट्ट्यात सहभाग घेतला नव्हता. नाही म्हणायला चीनच्या वूहान व्हायरसच्या कोविड काळात एका ऑन-लाईन कट्ट्यास उपस्थिती लावली होती. नेमके त्या दरम्यान मिपा साईटला काही प्रॉब्लेम असल्याने संपर्क होत नव्हता परंतु स्थळ आणि वेळ लक्षात होती तेव्हा अंदाजाने उपस्थित मिपाकरांची संख्या लक्षात घेऊन वाडेश्वर देवस्थानाकडे कूच केले. चारचाकी रथ घेतला तर कट्ट्यास उशीर होईल हे लक्षात आल्याने पुतण्याने द्विचाकी स्वयंचलित अश्व भरधाव फेकला आणि अस्मादिक त्यावर पिलीयन रायडर म्हणून स्थानापन्न झाले. इंच इंच लढवत आणि असंख्य वेडीवाकडी वळणे घेत वेळेवर वाडेश्वरी पोहोचलो (दोन, तीन आणि चार चाकी वाहने हाकण्याचे पुणेकरांचे कौशल्य वादातीत आहे) परंतु मिपाकर सदृश्य कोणी दिसेना, आत एक चक्कर मारली. बाहेर एक शुभ्र दाढीधारी सद्गृहस्थ बऱ्याच वेळ भ्रमणध्वनीवर बोलत उभे होते. त्यांचे बोलणे झाल्यावर त्यांच्या कडे मिसळपाव कट्ट्याबद्दल पृच्छा केली तर ते मला चांगली मिसळपाव मिळणाऱ्या हॉटेलचा पत्ता सांगायला लागले. त्यांना कट्ट्याबद्दल सांगितल्यावर त्यांनी मी येथील व्यवस्थापक आणि वेटर्सना ओळखतो, त्यांच्या कडे चौकशी करतो असे सांगितले. एक पुणेकर एव्हढ्या आस्थेने मदत करतो आहे हे बघून माजी पुणेकर असलेल्या मला खरेतर आश्चर्यच वाटले परंतु तेथे कोणासही कट्ट्याबद्दल कल्पना नाही असे निष्पन्न झाले. मी त्या सद्गृहस्थांचे आभार मानले परंतु माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. इतकावेळ माझा पुतण्या तेथे थांबला होता. आधी कधीच न भेटलेल्या, न ओळखणाऱ्या लोकांना मी भेटणार आहे हे ऐकल्यावर त्याला कुतूहल मिश्रित आश्चर्य वाटले होते. कोणीतरी मिपाकर येईल अशा प्रतीक्षेत मी वाडेश्वरच्या दरवाजाजवळ उभा होतो. FC रोडच्या साईडवॉकवर (मराठीत फुटपाथ) प्रचंड गर्दी होती. असंख्य बुरखेधारी व्यक्ती दिसत होत्या ते बघून प्रदूषणाच्या दुष्परिणामांची कल्पना आली आणि मला आनंदाला पारखे करणाऱ्या प्रदूषणाचा तीव्र संताप आला. तेव्हढ्यात एक दुचाकीस्वार तेथे थांबून असलेल्या माझ्या पुतण्याकडे काही विचारणा करताना दिसला. दुचाकी पार्क करून तो कोठेतरी गेला आणि थोड्यावेळाने दुसरा एक मोटार सायकल स्वार एव्हढ्या तुफान ट्रॅफिकमध्ये कौशल्याने "रिव्हर्स" येताना आणि पहिला दुचाकीस्वार त्याला "आन्दे, आन्दे" अशी साद घालत मार्गदर्शन करताना दिसला. दुसऱ्या मोटार सायकलस्वाराने मोटारसायकल पार्क केल्यावर हे दोघे मिपाकर तर नसतील अशी शंका आली परंतु त्यांनी तोपर्यंत "मिपा कट्टा" चा बॅनर काढला नव्हता. तेव्हढ्यात मला कुमार१ सर येताना दिसले. कट्ट्यातील फोटोंमध्ये त्यांना बराच वेळा बघितले असल्याने तात्काळ ओळखले आणि कट्टा होणार असल्याची खात्री पटली. पुतण्याला आता तू घरी जा असे सांगून वळलो तर "मिपा कट्टा" A4 साईझचे बॅनर घेतलेले दोघे दिसले. ते वर उल्लेख केलेले दोन दुचाकीस्वार - स्वधर्म आणि अभ्या.. आहेत अशी ओळख झाली. हा कट्टा पूर्व वृत्तांत, बाकीचा वृत्तांत इतर मिपाकरांनी दिला आहेच. कुमार१ सरांनी आग्रहाने प्रत्येकाला ओळख करून द्यायला लावली. मिपाकर आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून, उच्चशिक्षित आणि प्रथितयश आहेत हे लक्षात आले आणि सगळ्यांना भेटून आनंद वाटला. नेमके किती मिपाकर येणार आहेत ह्याची कल्पना नसल्याने मद्यधारक चॉकलेट्स कमी पडली आणि स्वधर्म ह्यांना मिळाले नाही. भक्ती ताईंची मुलगी येणार असल्याची कल्पना नव्हती त्यामुळे साधे चॉकलेट्स आणले नव्हते त्या बद्दल क्षमस्व. भक्ती ताईंच्या पालक शंकरपाळ्या, तिळगुळ वड्या आणि वाडेश्वरच्या फिल्टर कॉफीची चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळत राहील ह्यात शंका नाही. मिपा सारख्या साईट्स वर आपण बोलण्याऐवजी लिहीत असतो त्यामुळे "तिळगुळ घ्या आणि गोड गोड लिहा" असे म्हणायला हरकत नसावी. इथे तुम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील मित्र मिळतात हा एक महत्वाचा फायदा. कट्टा झाल्यावर कार्यबाहुल्यामुळे आणि त्यात इंडिगो व दिल्लीतील धुरक्याच्या (smog) प्रदूषणाच्या काळजीची भर पडल्याने वृत्तांत लगेचच लिहायला वेळ मिळाला नाही. जवळपास ३६ तासांच्या होम-टू-होम टॉर्चरअ्स प्रवासानंतर घरी पोहोचल्यावर लगेचच वृत्तांत लिहून काढला (ह्यातील बराचसा भाग "पारी" विमानतळावरच्या लेओव्हरच्या काळात लिहून वेळ सत्कारणी लावला!). पुढच्या पुणे भेटीत कट्ट्यात सहभागी होण्याची संधी मिळो ही सदिच्छा. यदा यदा हि नॉस्टेल्जीक होतसे अस्मादिक । भेटण्या आप्त, मित्रानाम् सम्भवामि वर्षे वर्षे ॥ ह्या नोट वर आपली रजा घेतो. आपला दर्शनाभिलाषी - चामुंडराय

In reply to by चामुंडराय

रामचंद्र 25/12/2025 - 22:52
खमंग आणि खुसखुशीत! आणि मला आनंदाला पारखे करणाऱ्या प्रदूषणाचा तीव्र संताप आला.> 'रसिक'राज चामुंडराय!

कट्टा छान झालाय ! मी मिस केला . कट्ट्याला यायला आणि मेम्बरांना भेटायला नक्कीच आवडलं असतं . खरं तर त्या वेळी मी पुस्तक महोत्सवामध्येच होतो . पण काही गाठी भेटी बाकी होत्या . त्यामुळे नाईलाज होता . खूप अवघड वाटत होतं . कारण तिथून दोन चौक तर पलीकडे वाडेश्वर . पुन्हा कधी . काही जणांना पहिल्यांदाच भेटता आलं असतं . अबा आणि कुमार सोडता सगळे नवीन खास म्हणजे छोटी गिरीजा

टर्मीनेटर 01/01/2026 - 21:19
स्वधर्म, चामुंडराय आणि अभ्या ह्या तीनही उत्सवमूर्तींचे वृत्तांत, त्यातले मर्म आणि पंचेस लै भारी 👍 माझ्याही चार (की चारशे) ओळी लिहून झाल्या आहेत, पण 'कैच्याकै' लांबलचक असा टेराबाईटी झालेला वृत्तांत त्यात थोडी काटछाट करून 'गिगाबाईटी' (कुमारसरांच्या शब्दात 'प्रबंध') स्वरूपात खाली पेस्टवतो 😀

टर्मीनेटर 01/01/2026 - 21:52
चॅप्टर १ - "द फ्रुट ऑफ फेथ" सप्टेंबर महिन्यात सोकाजीनानांच्या 'लंडनस्थित मिपाकर' ह्या धाग्यावरील चर्चेदरम्यान 'स्वधर्म' साहेबांनी डिसेंबरमधल्या 'पुणे कट्ट्याचे' सूतोवाच करताना अभ्याही त्यावेळी पुण्यात असेल असे लिहिले होते. त्यांच्या ह्या कट्टा प्रस्तावास कर्नलतपस्वी आणि चौथा कोनाडा आदी मान्यवरांनी अनुमोदनही दिले होते. डिसेंबरच्या सुरुवातीला राजेंद्र मेहेंदळे साहेबांनी कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाणाविषयी पृच्छा केल्यावर जवळपास महिन्याभराने पुन्हा हा विषय ऐरणीवर आला. गेल्या महिन्यात एका लहानशा अपघातात आमच्या पिताश्रींचा डावा पाय फ्रॅक्चर झाल्यावर केलेल्या तपासण्यांचे अहवाल,अस्थिभंगाचे स्वरूप, रुग्णाचे वय आणि हवामान असे विविध घटक विचारात घेऊन "त्यांना पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे राहाण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल" असा निष्कर्ष त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अस्थिरोग तज्ज्ञांनी जाहीर केला. अचानक उद्भवलेल्या ह्या परिस्थितीला सामोरे जात नोव्हेंबरच्या मध्यापासून ते वर्षअखेर आणि नववर्षस्वागत निमित्ताने आधी ठरवलेले व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित सर्व दौरे रद्द केले होते. त्यामुळे दुपारची वेळ ठरल्यास तीन-चार तासांचा प्रवास करून २० किंवा २१ डिसेंबरला होणाऱ्या कट्ट्यास उपस्थित राहणे शक्य असल्याने मी पण कट्ट्याला येऊ शकत असल्याचे कळवले आणि भक्तीताईं पण "जमल्यास चक्कर मारते" असे म्हणाल्या होत्या. १९ डिसेंबर रोजी 'हा' धागा आला आणि त्यात, स्थळः वाडेश्वर, डेक्कन वेळः रविवार २१ डिसेंबर २०२५ दुपारी ठीक ४ ते ६. अशी पुणे कट्ट्याच्या तारीख, वार आणि वेळेची अधिकृत घोषणा झाली! "अरे बापरे... हा जंगली माणूस पण येणार आहे का? ह्याला भेटण्यापेक्षा खरोखरच्या वन्यजीवांना भेटायला विदर्भातल्या एखाद्या जंगलात गेलेले बरे" असा विचार करून मला टाळण्यासाठी प्रचेतसबुवांनी त्वरित आपली अनुपस्थिती नोंदवल्याची बातमी काही '(अ)विश्वसनीय सूत्रांकडून' लगेचच माझ्यापर्यंत आली होती, पण तिच्या सत्यतेविषयीची खातरजमा मात्र अद्याप झालेली नाही 😀 ह्यातला गमतीचा भाग बाजूला ठेऊ, पण मला प्रचेतस ह्यांचा प्रामाणिक स्वभाव चांगला माहिती आहे आणि मुळातच डिसेंबर हा सुट्ट्यांचा महिना असल्याने अनेकांचे पूर्वनियोजित कार्यक्रम खूप आधीपासून ठरलेले असतात ह्याची पूर्ण कल्पना असल्याने केवळ तेच नाहीत तर बाकीही काही मिपाकर इच्छा असूनही कट्ट्याला उपस्थित राहू शकले नसावेत हे समजू शकतो. प्रचेतस येणार नसल्याचे कळल्यावर आता 'वाडेश्वर' लेण्यांचा इतिहास, तिथल्या शिल्पांची सविस्तर माहिती मिळण्याला आपण मुकणार अशा विचाराने थोडे निराशेचे मळभ आले होते पण पुढे आपल्या दर्जेदार लेखनातून परिचयाचे झालेले 'योगाचार्य' चामुंडराय आणि 'रॉय'बहादूर किल्लेदार हे दोघेही येणार असल्याचे कळल्यावर कट्टा आता कल्पनेपेक्षा जास्त रंगतदार होणार ह्याची खात्री पटत गेली! कट्ट्याचे स्थळ-काळ-वेळ सगळे ठरले होते आणि किमान ७-८ मिपाकर तरी कट्ट्याला उपस्थित राहाणार असा ठाम विश्वास निर्माण झाला होता, चॅप्टर २ - "स्ट्रेंजर इन द लँड ऑफ लेजेंड्स" कट्ट्याचे स्थळ-काळ-वेळ सगळे ठरले होते आणि किमान ७-८ मिपाकर तरी कट्ट्याला उपस्थित राहाणार असा ठाम विश्वास निर्माण झाला होता, पण... कट्ट्याविषयीचे काय अपडेट्स आहेत हे बघायला मिपावर यायचो तेव्हा... '500' आणि '504' हे अधून-मधून शिफ्ट ड्युटीवर येणारे मिपाचे 'नंबरकरी' द्वारपाल प्रवेश नाकारायला सज्ज असायचे. त्यातला 504 नंबरी जरासा सहृदय होता, त्याला एक-दोन वेळा 'टॅब रिफ्रेश'ची विनंती केल्यास तो आत तरी जाऊ द्यायचा. पण 500 नंबरी मात्र एकदम पाषाणहृदयी होता. कुठल्याही वशिल्याला दाद न देता निर्दयीपणे तो कोणालाच आत प्रवेश करू देत नसल्यामुळे नवीन काही कळायलाच मार्ग नव्हता. २० तारखेला रात्री 'सगळे ठरल्याप्रमाणे आहे ना?' हे विचारायला अभ्याला फोन केल्यावर सगळे काही तसेच असून तो आणि स्वधर्म चारच्या काही मिनिटे आधीच कट्टास्थळी पोचणार असल्याचे कळले,'वाडेश्वर' आणि 'पाताळेश्वर' मध्ये माझा झालेला संभ्रमही मिटला आणि 'वाडेश्वर' हे मंदिर/लेणी नसून 'रेस्टोरंट' आहे हे समजल्यावर माझा एक गोड गैरसमजही दूर झाला! २१ तारखेचा पूर्ण दिवस बाहेर रहावे लागणार असल्याने तात्पुरते परावलंबित्व आलेल्या वडलांच्या मदतीसाठी भाच्याला बोलावून घेतले होते त्यामुळे सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते. मी सांगितलेल्या वेळी पद्मावतीला पोचलो तर त्यावेळी तिथून जवळच असलेल्या बिबवेवाडीहुन अभ्या मला पिकअप करेल आणि मला पोचायला उशीर झाला तर मी रिक्षा किंवा कॅबने वाडेश्वरला येईन असे आमचे ठरले होते. कुमार सर पुण्याबाहेर असल्याचे माहिती असल्याने उद्या सकाळी निघण्याआधी मेसेज किंवा फोन करून त्यांच्या उपस्थितीविषयी विचारू असा विचार केला होता पण सकाळी सात वाजता त्यांचाच मेसेज आला आणि ते काल रात्री उशिरा पुण्याला परतल्याचे आणि कट्ट्याला येणार असल्याचेही कळले होते. सी.एस.एम.टी. ते खोपोली थेट लोकल ट्रेनला बराच वेळ होता म्हणून कर्जतपर्यंत एक आणि कर्जतहून तिला कनेक्टेड दुसरी लोकल ट्रेन पकडून साडेबाराला खोपोलीला पोचलो. नेमके त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या २००+ नगरपालिका/परिषदांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्याने खोपोली स्टेशनबाहेर विजयी उमेदवारांच्या रस्ता अडवणाऱ्या मिरवणुकांमधून वाट काढत एकदाचा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आलो आणि एकाच प्रवाशासाठी आधी बसलेल्या बाकीच्या प्रवाशांचा खोळंबा करत थांबलेल्या वडापच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरने दीडच्या थोडेसे आधीच लोणावळा स्टेशनला पोचलो. आतापर्यंत सर्वकाही अपेक्षेप्रमाणे चालले होते पण इथून पुढे वेळेचे गणित बिघडण्यास सुरुवात झाली. स्टेशनवर लोकल आणि एक्स्प्रेसची वेळापत्रके बघितली तर लोणावळा-पुणे लोकल २:५० आणि एक्स्प्रेस ३:१० ला असल्याचे दिसले. दीडेक तास तिथे थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता म्हणून परत बाहेर येताना अभ्याला फोन करून मी लोणावळ्याला पोचलो असून आधी ठरलेल्या वेळेवर पद्मावती-बिबवेवाडीला पोचू शकत नसल्याचे कळवले. बाहेर पडल्यावर पी.एम.पी.एल.च्या निगडीहुन लोणावळा स्टेशनला नुकत्याच आलेल्या मिनीबसमधून उतरणारे प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टर दिसले. कंडक्टरकडे चौकशी केल्यावर त्याने अर्ध्या तासाने पुन्हा निगडीला जाणार असलेल्या ह्या बसनी भक्ती-शक्ती चौकापर्यंत जाऊन तिथून कात्रजमार्गे जाणाऱ्या ४२ क्रमांकाच्या बसने मला पद्मावतीला जाता येईल अशी माहिती तर दिलीच, वर सदर बस तळेगाव रेल्वे स्टेशन वगैरे करत फिरत फिरत जाणार असल्याने पोचण्याची घाई असेल तर लोणावळा एस.टी. स्टँडवरून स्वारगेटला जाणारी एखादी जलद बस पकडा किंवा हायवेवरून दुसरे कुठले वाहन मिळते का बघा असा चांगला सल्लाही दिला! वरीलपैकी कुठलाही पर्याय निवडला तरी आपण चार वाजेपर्यंत कट्टास्थळी पोहोचू शकत नसल्याचे लक्षात आले होते पण ते म्हणतात ना, "कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है" ह्याची प्रचिती येत स्वारगेटहून प्रवासी घेऊन आलेले एक रिक्षावाले काका 'स्वारगेट-शिवाजीनगर?... स्वारगेट-शिवाजीनगर?' असे विचारत शेजारी येऊन थांबले. वेळ महत्वाची असल्याने अजून कुठल्या पर्यायाचा विचार करत न बसता त्या रिक्षानेच पुण्यनगरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. लोणावळ्यातून बाहेर पडेपर्यंतचा प्रवास मात्र फारच कंटाळवाणा झाला. त्या संपूर्ण रस्त्यात ठिकठिकाणी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या मिरवणुकांत नाचणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी, लांबलचक फटाक्यांच्या माळा वगैरेंमुळे रस्त्यावर वाहने कमी असूनही वाहतुकीचा खोळंबा होत होता, परंतु पूर्वी 'मिरवणूक आणि गुलाल' असे जे समीकरण होते त्यात झालेला एक मोठा बदल ठळकपणे जाणवला. आता राजकीय विजयी मिरवणुकांमध्ये उधळला जाणारा तथाकथित 'गुलाल' हा लालसर गुलाबी रंगाचा राहिला नसून त्यालाही उमेदवाराची धार्मिक पार्शवभूमी किंवा राजकीय विचारसरणीनुसार भगवा, निळा, हिरवा, पिवळा अशा विविध रंगछटा प्राप्त झाल्याचे खोपोली आणि लोणावळ्यात दिसले. असो... रस्त्यात मधेच कुठेतरी बसलेल्या एका प्रवाशाला उतरवण्यासाठी रिक्षा वाकडेवाडी बस स्टँडवर थांबली असताना अभ्याचा कुठपर्यंत पोचलो हे विचारायला फोन आला. मी शिवाजीनगरला पोचलो असून आता आधी ठरवल्याप्रमाणे पद्मावतीला जाऊन मग डेक्कनला येतो असे त्याला सांगितल्यावर, मला इथून तिथे जाऊन परत यायलाच सहा वाजून जातील असे त्याचे मत पडले. आमच्या ह्या वार्तालापातले माझे बोलणे रिक्षावाल्या काकांनीही ऐकल्याने त्यांनी सुद्धा हेच मत मांडले आणि "मी तुम्हाला शनिवार पेठेत सोडतो, तिथून दुसऱ्या रिक्षेने तुम्ही डेक्कनला लवकर पोहोचाल" असा सल्ला दिला. एकूणच माझे पुण्याविषयीचे भौगोलिक ज्ञान पुलंच्या भाषेत "ती पानपताची लढाई म्हणतात ती पुण्यात नक्की कुठेशी झाली हो?" अशा 'अगाध' वगैरे पातळीवरचे असल्याने आणखीन काही आगाऊपणा न करता निमूटपणे ह्या दोन 'माहितगार' मंडळींचे ऐकून त्याप्रमाणेच करायचे ठरवून शनिवार पेठेत एका रिक्षेतून उतरत समोरच्या दुसऱ्या रिक्षेत बसत 'कॉल लॉग'च्या अनुसार फायनली चार वाजून सदोतीस मिनिटे झाली असताना वाडेश्वरला पोचलो... चॅप्टर ३ - "द नोबल पीपल ऑफ मिपा" वर म्हंटल्याप्रमाणे ४:३७ला तुडुंब भरलेल्या रेस्टोरंटच्या बाहेरून कुमारसरांना मी अड्ड्यावर पोचलो असून धूळ-माती खात केलेल्या प्रवासातले कपडे इथे कुठे बदलता येतील हे विचारायला कॉल केल्यावर ते बाहेर आले आणि 'आधी आपण वॉशरूम कशी आहे ते बघू आणि मग काय ते ठरवू' म्हणाले. बाहेरून वॉशरूम बऱ्यापैकी मोठी वाटल्याने आपले काम होईल असे आधी वाटले होते पण तिची 'मल्टीपर्पज' अंतर्गत रचना आणि ओलेकच्च फ्लोरिंग बघितल्यावर ते अशक्य असल्याचे लक्षात आल्याने तो विचार बाजूला सारत सरळ गप्पांमध्ये रममाण झालेल्या मिपाकरांचे टेबल गाठले. ह्याठिकाणी जमलेल्या मान्यवरांपैकी कुमार१, भक्ती आणि गिरीजा ह्यांना आधी प्रत्यक्ष भेटलो होतो आणि अभ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून व्य.नि, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर संपर्कात होतो, अबा, स्वधर्म आणि रामचंद्र साहेबांना आधी फोटोत पाहिले होते त्यामुळे भक्तीताईंचे मिस्टर 'अतुल' आणि केवळ लेखनातून परिचयाचे असलेले 'चामुंडराय' हे प्रत्यक्षात किंवा फोटोत पाहिले नसलेले दोन चेहरे तेव्हढे माझ्यासाठी नवीन होते. . चॅप्टर ४ - "स्नॅक्स अँड लिकर चॉकलेट्स" भक्तीताईंनी आणलेल्या पालकवड्या आणि तिळगुळाच्या वड्यांचा आस्वाद घेत गप्पांमध्ये रममाण झालेल्या ह्या सर्व मंडळींशी भेट झाल्यावर कुमारसरांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येकाने आपली छान ओळख करून दिली ज्यातून इथे जमलेले सगळे मिपाकर वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असल्याचे समजले आणि प्रत्येकाच्या बोलण्यात आलेल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी थेट रिलेट होता आल्याने नव्याने भेटलेल्या सर्वांशी सूरही पटकन जुळले. एकीकडे वेगवेगळ्या विषयांवरील गप्पांना सुरुवात होत असताना दुसरीकडे अभ्या आणि अबाचे ऑर्डर काय द्यायची ह्या गहन विषयावर एकमत होऊन ती दिली जात असताना चामुंडराय साहेबांनी एका सुंदरश्या पिशवीतून आणलेली 'लिकर चॉकलेट्स' प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली. एकतर 'व्हाईट असो कि डार्क', चॉकलेटचा कुठलाही प्रकार मला प्रचंड आवडतो, त्याला लिकर चॉकलेट अपवाद असूच शकत नाही. परंतु ते खाल्ल्यानंतर उफाळून येणारी पुढची 'तृष्णा' कट्ट्याच्या ठिकाणी शांत होणे अशक्य असल्याने ते आत्ता खाऊ कि नको अशा विचारात पडल्याने आधी बराचवेळ हातात धरून ठेवले होते आणि नंतर सँडविच संपेपर्यंत समोरच्या प्लेटमध्येच ठेवले होते ते चहा प्यायल्यानंतर तोंडात टाकून कचाकच चावून त्यातले 'गर्भीत द्रव्य' चवीने अनुभवले आणि पुन्हा गप्पांमध्ये सहभागी झालो... चॅप्टर ५ - "फ्री डायलॉग" एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे वेगवेगळे विषय निघत होते आणि त्यावर माहितीपूर्ण परिसंवाद घडत होते. मध्येच रेस्टोरंटमध्ये नव्याने प्रवेशकर्ता झालेला कोणी उभ्या उभ्या इकडेतिकडे बघताना दिसला की "हा कोणी उशिरा पोचलेला मिपाकर असावा काय" असा प्रश्न उपस्थित व्हायचा आणि ऐनवेळी धागा वाचून अचानक कोणी पुण्यातला मिपाकर ४ ते ६ ह्या कट्ट्याच्या ठरलेल्या वेळेत हजर होण्याची शक्यता असल्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या. बाकी 'येऊ शकतो' असे कळवलेले एक 'किल्लेदार' तेवढे अजून आलेले नव्हते पण ते उशिरा आले, आणि चेहरे अनोळखी असले तरी Gucci Flora चा सुगंध ओळखणारा हा 'गंधप्रेमी' मिपाकर बरोब्बर कट्टेकऱ्यांच्या टेबलला येईल ह्याची खात्री होती! बँकिंग प्रणालीतला AI चा वापर, कॉम्प्रेसर, पंपिंग सिस्टम्स, वाहन आणि त्यासाठी लागणाऱ्या सुट्याभागांचा निर्मिती उद्योग आणि त्यावर आधारित ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था, पवनचक्क्या, त्यांची देखभाल, एक्स्प्रेस ग्रुप अशा अनेक विषयांच्या जोडीला एवढे मिपाकर एकत्र जमलेत म्हंटल्यावर मिपाचा, तिथल्या लेखनाचा, तांत्रिक समस्यांचा विषय निघाला नसता तरच नवल होते. विषय भरपूर होते पण त्यावरच्या 'बैठ्या' चर्चेसाठी वेळ मात्र कमी पडला... चॅप्टर ६ - "द वॉकवे चॅट्स" एकतर रविवारची संध्याकाळ, त्यात तिथून जवळच सुरु असलेल्या पुस्तक महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने पुणेकर आणि खास तिथल्या प्रदर्शनासाठी लांब-लांबच्या ठिकाणांहून आलेल्या वाचनप्रेमींची तुफान गर्दी, असे असूनही मिपा कट्ट्यासाठी चार ते सहा अशा दोन तासांसाठी दोन टेबले वाडेश्वरच्या मालक/व्यवस्थापकांकडून मिळवण्यात स्वधर्म साहेबांनी यश मिळवले हे फार आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे! कट्ट्यासाठी आम्हाला मिळालेली वेळ संपली होती आणि बाहेर टेबल रिकामे होण्याची प्रतीक्षा करत उभ्या असलेल्या ग्राहकांची गर्दीही दिसत होती त्यामुळे 'आता उठा' असे खास पुणेरी शैलीत कोणीतरी सांगायला यायच्या आत आम्ही सगळेजण बाहेर पडलो. त्यानंतरच्या फोटोसेशन बद्दल अभ्याने आधीच लिहिले असल्याने पुनरावृत्ती टाळतो. कट्ट्याला खूप मजा आली. आतमध्ये बसून झालेल्या गप्पांना विषय भरपूर असले तरी वेळ मात्र कमी पडल्याने आत अर्धवट राहिलेल्या आणि काही नवीन विषयांवर बाहेर उभ्या उभ्या गप्पासत्र सुरु झाले. अख्ख्या कट्ट्याचे 'फलित' ह्या गप्पासत्रात सामावलेले आहे ते म्हणजे अबांनी म्हणजेच अमरेंद्र बाहुबली ह्यांनी ते आता राजकीय चर्चांमध्ये भाग घेत नसून आता ललित लेखनावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले, हे खूपच आनंददायक आहे! चॅप्टर ७ - "लिव्हिंग द व्हेन्यू - द नेक्स्ट स्टेप" आप-आपली डेस्टिनेशन्स योग्यवेळी गाठण्यासाठी 'आता मात्र निघालेच पाहिजे' असे फर्मान एकेकांच्या मेंदूकडून येईपर्यंत सुमारे सव्वा ते दीड तास हे 'खडे' गप्पासत्र चालले. शेवटी अबा आणि रामचंद्र साहेब मंडईच्या दिशेने आणि मी आणि अभ्या त्याच्या बुलेटवरून पद्मावतीच्या दिशेने निघालो. रेस्टोरंटपासून पद्मावतीपर्यंतचा रस्ता ह्या माजी पुणेकराला माहिती नसल्याने एखाद दोन किलोमीटर नंतर एके ठिकाणी गुगल मॅप सुरु करावा लागला तेव्हा त्यावर पुढे नऊ किलोमीटरचा प्रवास असल्याचे दाखवत होते. बुलेटच्या आणि आजूबाजूच्या रहदारीच्या आवाजावर ताण करत आमच्या काही वेगळ्याच विषयांवर गप्पा सुरु असल्याने माझे फोनकडे लक्षच नसायचे आणि बहुतेक ओलांडलेल्या प्रत्येक वळणानंतर मॅपला री रूट करून दाखवावे लागत होते. आपणही आपल्या को-ड्रायव्हर/रायडरवर मॅप कडे लक्ष नसल्याबद्दल वैतागतो पण असे वागणे किती चुकीचे आहे ह्यावर आमचे दोघांचे एकमत झाले. घरी पोचायला मध्यरात्र/पहाटेचे किती का वाजेनात मला त्याची काही पर्वा नव्हती पण... "दुपारी तीन-सव्वातीन पर्यंत तुझ्याकडे येतोय" असे काल रात्रीच सांगून ठेवल्यामुळे अजून वाट बघत बसलेल्या मामेबहिणीकडे पाच मिनिटांसाठी का होईना पण तोंड दाखवून मग स्वारगेटहून ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरीने परतीच्या प्रवासाला लागायचे होते... चॅप्टर ८ - "माइल्स बिटवीन, मेमरीज विदीन" माझ्यासारखा होपलेस नेव्हीगेटर लाभल्याने पद्मावती पर्यंतच्या प्रवासाला गरजेपेक्षा किमान १५ मिनिटांनी तरी जास्त वेळ खर्ची पडला त्यामुळे सिटी प्राईडच्या समोर पोचल्यावर तिथून रस्ता माहितीचा असल्याने बहिणीला फोन करून "आता वर यायला वेळ नाही तेव्हा तूच खाली सोसायटीच्या गेटवर ये आणि मला स्वारगेटला सोडायला भाच्यालाही बरोबर घेऊन ये" असे सांगितले. गेटच्या जवळच सुमारे दहा-बारा मिनिटे उभ्या-उभ्याच वार्तालाप झाल्यावर तिने घरी द्यायला दिलेले कसलेतरी पार्सल सॅक मध्ये टाकत एकमेकांचा निरोप घेऊन अभ्या त्याच्या मुक्कामाच्या दिशेने आणि मी आणि भाचा स्वारगेट्च्या दिशेने मार्गस्थ झालो. शेवटची शिवनेरी साडे दहाची होती आणि स्वारगेटला पोचलो तेव्हा वाजले होते पावणे नऊ. पुण्याच्या हवेत भूकही रोजच्यापेक्षा लवकर लागण्याची चिन्हे जाणवू लागली होती, मग आहे वेळ हातात तर आधी जेवून घेऊ आणि मग निघू असा विचार करून भाच्याला मला समोरच्या 'नटराज'मध्ये सोडायला सांगून घरी पाठवून दिले. नटराजमध्ये स्थानापन्न झालो. चामुंडरायांच्या लिकर चॉक्लेटमुळे 'शेर के मुह मी खून तो लग ही गया था' मग तृष्णाशांती साठीची ऑर्डर दिली आणि "साडे दहापर्यंत इथून निघून दोन-अडीच वाजेपर्यंत येतो" असे कळवायला घरी फोन केला तर कशाला एवढ्या लेट येतो त्यापेक्षा उद्या सकाळी उठून ये आरामात, मी थांबतो तू येईपर्यंत असे भाच्याने सांगितल्यावर "बघतो इथून निघायला किती वाजतात ते कंटाळा आला तर मग उद्या येतो." असे सांगून फोन ठेवला. हेडसेटवर आवडीची गाणी ऐकत व्होडकाचे दोन पेग्ज आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण होईस्तोवर सव्वा दहा वाजले होते. आता मात्र प्रवासापेक्षा आराम हवासा वाटू लागल्याने इथेच रूम घेऊन ताणून द्यावी आणि उद्या सकाळीच निघावे असे ठरवले. त्यांच्याकडे रूम उपलब्ध नसल्याने व्यवस्थापकानेच सुचवलेल्या जवळच्याच हॉटेल अवंती मध्ये मुक्काम ठोकला. रुमध्ये आराम चांगला मिळाला पण पहाटेपर्यंत झोप काही लागायला तयार नव्हती. पहाटे साडेपाचच्या सुमारास मिपावर एक प्रतिसाद दिला त्यानंतर कधीतरी झोप लागल्यावर डायरेक्ट सकाळी साडे-दहालाच उठलो. अकराच्या सुमारास चेक-आऊट करून न्याहारीसाठी नटराजच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो. तिथे चहा-नाश्ता उरकून स्वारगेट स्टँडवर आलो तर कळवामार्गे ठाण्याला जाणाऱ्या शिवनेरीला अजून वीस-पंचवीस मिनिटे बाकी असल्याचे कळले. त्याआधी खोपोली किंवा कर्जत अशा सेंट्रल लाईनवरच्या स्टेशनजवळ जाणारी कुठली बस आहे का अशी चौकशी केल्यावर जुन्या हायवेवरून खोपोली फाटा मार्गे पालीला जाणारी बस मागच्या बाजूला लागल्याचे समजले. मागे जाऊन बघितले तर खरंच बस उभी होती आणि बऱ्यापैकी रिमामी असल्याने विंडोसीटही मिळाली. धुरंधरचे 'इष्क जलाकर' हे गाणे रिपीट मोडवर ऐकत, खिडकीतून बाहेरची दृश्ये बघत प्रवास मजेत सुरु होता. कासारवाडीला 'अ‍ॅटलास काँपको आणि अल्फा लवल' ह्या कंपन्या दृष्टीस पडल्यावर काल संध्याकाळी चामुंडराय, रामचंद्र, अभ्या आणि अबाच्या बोलण्यात ह्या दोन कंपन्यांचा स्पष्ट नामोल्लेख आला असल्याने कट्ट्यावरच्या गप्पांची क्षणचित्रे डोळ्यांसमोर तरळू लागली आणि घरी पोहोचल्यावर देखील त्यात खंड पडला नाही...

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 02/01/2026 - 01:14
टर्मिनेटर यांनी काय काय प्रयास केले आहेत हे थोडक्यात कट्ट्याच्या टेबलावर कळले होते, पण हे इतके सारे करून हा माणूस केवळ मिपाकरांना भेटण्यासाठी इतके कष्ट घेतो हे वाचून अक्षरश: थक्क व्हायला झाले. बरं कट्ट्याचा वृत्तांतही अगदी तपशीलवार, की ज्यांना जमले नाही त्यांना वाटावे खरंच आपणसुध्दा जमवायला हवे होते. टर्मिनेटर भाऊंना दं ड व त _/\_

In reply to by स्वधर्म

अरे वा! मस्त डिटेल्ड लिहीलय, सर्वानी अशाच प्रकारे लिहिले असते तर कट्टा प्रत्येकाच्या दृष्टीने पाहताना वेगळीच मजा आली असती.

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र 02/01/2026 - 23:02
घसघशीत आणि रसरशीत! टर्मिनेटर म्हणजे फसफसून, फेसाळून, ओसंडून वाहणारा उत्साह अशी त्यांचं लेखन वाचून प्रतिमा तयार झाली होतीच, प्रत्यक्ष दर्शनाने खात्री पटली.

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 03/01/2026 - 17:48
एकदम जबरदस्त, कडक, जोमदार, धारदार वृत्तांत. तुमच्या सायासांना हॅट्स ऑफ. कट्टा हुकल्याची प्रचंड खंत वाटते आहे.

चामुंडराय 02/01/2026 - 21:18
टर्मिनेटर भाऊंना दं ड व त _/\_ : स्वधर्म टर्मिनेटर तुस्सी ग्रेट हो!! : Bhakti १०० +++ असेच म्हणतो. टर्मीनेटर तुम्ही लिहिलेला प्रदीर्घ कट्टा वृत्तांत वाचला. कट्ट्याला उपस्थिती लावण्यासाठी तुम्ही केलेली "यातायात" (हिंदी आणि मराठी - दोन्ही भाषेतील अर्थांप्रमाणे) खरंच भलतीच भारी होती. हॅट्स ऑफ टू यू , कुडोज् , ब्राव्हो , सॅल्यूट - शब्दच अपुरे आहेत !

मदनबाण 03/01/2026 - 10:45
कट्टा वृत्तांत आवडला. टर्मिनेटर चे प्रवास वर्णन वाचुन ते Hasta la vista, baby मोड मध्ये दिसले! :) @ टर्मिनेटर तुमच्या आयडीमुळे आणि एकंदर लिहलेल्या प्रवासाच्या डिटेल्समुळे मला उगाच The Arrival [ Terminator 2: Judgement Day ] आठवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

कट्टा एकदम जोरदार झालेला दिसतोय. तपशीलवार वृत्तांत वाचून कट्ट्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यासारखे वाटले. सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन.

टर्मिनेटर सिम्पली ग्रेट ! बापरे - काय प्रवास केला तुम्ही , तेही मिपा कट्ट्यासाठी मी समजत होतो की तुम्ही पुण्यात असता . तुम्ही इतकी वाट वाकडी करून आला होता - आपली भेट राहून गेली याची खंत आहे वृत्तांत मस्त ! खरंच मी कट्टा मिस केला @ अभ्या आपलं मागे बोलणं झालं होतं - विचारपूस मध्ये आपलीही भेट राहून गेली सारे वृत्तांत लै भारी आहेत !

गवि 04/01/2026 - 21:53
कट्टा वृत्तांताइतक्याच प्रतिक्रिया आणि उपवृत्तांतही भन्नाट. बाकी आमच्या टर्मिनेटर साहेबांनी थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? असा विचार आला. कोणत्याही गावातून पुण्याला थेट कनेक्शन असायला कठीण नसावे. कदाचित साहसाची गंमत घ्यायची असेल.. उत्तम वर्णन.

In reply to by गवि

टर्मीनेटर 04/01/2026 - 23:18
"थेट पुणे बस किंवा वाहन न पकडता सोळाव्या सतराव्या शतकातल्यासारखी मजल दरमजल करत पुणे का गाठले? "
हा प्रश्न कोणा ऐऱ्या गैऱ्या नत्थू खैऱ्याला पडला असता तर 'बिना पुरा पढेही आ जाते हैं कोईभी मुंह उठाके' असा विचार करून हसून दुर्लक्ष केले असते 😀 पण साक्षात आमच्या गविशेठना हा प्रश्न पडला म्हंटल्यावर एका वाक्यात का होईना पण 'संत शिरोमणी इम्रान हाश्मींच्या' शैलीत उत्तर देणे अगत्याचे ठरते.... "रास्ते की परवाह करता... तो मंजिल बुरा मान जाती..."

In reply to by टर्मीनेटर

गवि 05/01/2026 - 04:28
सकाळी तो येईपर्यंत मला घराबाहेर पडणे शक्य नव्हते. नाईट ड्रायव्हिंग आता बंद केल्याने आपले वाहन घेऊन जाण्याचा पर्यायही बाद झाला होता आणि सकाळी निघायची नक्की वेळच माहिती नसल्याने रेल्वे किंवा बसचे बुकिंगही आधीपासून केलेले नव्हते. अचानक एकट्यानेच पुण्याला जायचा प्रसंग ह्याआधीही २-३ वेळा आला होता तेव्हा वापरलेला प्रवासाचा एक 'हायबब्रिड' प्रकार आताही वापरून दुपारी तीन-सव्वातीन वाजेपर्यंत पद्मावतीला राहणाऱ्या मामेबहिणीकडे जाऊन, कपडे बदलून कट्टास्थळी पोचतो असे अभ्याला सांगितले होते.
हम पूरा पढकेइच पूछा टर्मिनेटर सेठ.. बुकिंग शिवाय थेट पुणे बस मिळणे कठीण असावे तुमच्या इथून असे दिसते आहे. किंवा फ्रीकवेंसी कमी असेल. असो. एकूण प्रवास थरारक झाला तर..

In reply to by गवि

टर्मीनेटर 05/01/2026 - 09:21
"किंवा फ्रीकवेंसी कमी असेल."
येस सर... देअर यु आर! सकाळी १०:३० पर्यंत आणि संध्याकाळी ४ नंतर महाराजा, पिंकबस, कोंडुस्कर, मोरया, AR ग्रुप आणि तत्सम डेली सर्विसच्या इतक्या बस आहेत की तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रवासी तरी मिळत असतील का? असा प्रश्न पडावा. एका टूर ऑपरेटरची सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने एक 'इनोव्हा' ची सर्वात आरामदायक आणि जलद सेवाही आहे पण ती फक्त कोथरूडपर्यंतच आहे. तीच गत रेल्वेची. दहा-साडेदहा पर्यंत बऱ्याच गाड्या आहेत पण नंतर पुढचे दोन अडीच तास मात्र ठणठण गोपाळ... खोपोली-लोणावळा-पुणे असा हायब्रीड प्रवास आधीही यशस्वीरीत्या करून झाला आहे. हा थोडा वेळखाऊ प्रकार असला तरी प्रवास व्यवस्थित बसून होत असल्याने गर्दी, चेंगराचेंगरी अशा त्रासदायक गोष्टी टाळता येतात त्यामुळे माझ्यासाठी सोयीस्कर ठरतो! ह्या प्रकाराने आधीही कधी दगा दिला नाहीये आणि खरंतर ह्यावेळीही तो फारकाही त्रासदायक वगैरे वाटला नाही, त्या मिरवणूका वगैरेंमुळे होणाऱ्या वाहतूक खोळंब्याचा वैताग आला होता खरा पण काहीसा उशिराने का होईना पण कट्टास्थळी म्हंटलं तर योग्य वेळेत पोचलो ह्याचे समाधान जास्त आहे. मला वाटतं आता अधून-मधून असे वेडेवाकडे प्रवास मुद्दाम करावेत, त्यातही एक वेगळीच 'किक' आहे 😀

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर 06/01/2026 - 09:18
तुमच्या रिक्षेत बसून 'तिकडेही' फिरून आलो 😂 मला हा धागा आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचेही आठवत होते, पण हा लेख तुमचा होता की जेम्स वांड ह्यांचा होता हे लक्षात येत नव्हते, कारण त्यांचाही अशाप्रकारे करावा लागलेल्या प्रवासावरचा एक धागा होता त्यामुळे बहुधा थोडा कंफ्युज झालो होतो! असो... आज पुन्हा त्या 'महान' प्रवासावरचा लेख आणि प्रतिसाद वाचून मजा आली! "देख रही हो ना भक्ती... हम ढाई साल पेहले जैसे थे, वैसेही आज भी हैं". बिलकुल भी बदले नही हैं 😀

In reply to by गवि

अभ्या.. 06/01/2026 - 11:04
गविराज हे गगनविहारी असल्याने त्यांना सगळी अंतरे एरियल डिस्टन्स दिसतात. त्यांनी friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हा प्रवास 12 घड्याळी तासाचा सागितलं असता. प्रत्यक्षात माझे चार दिवस गेले तेही ट्रेन, विमान , कॅब , बस आणि बाईक अशी वाहने ही गोष्ट वेगळी.. . म्हणून आम्ही सांगतच नाही. ;)

In reply to by अभ्या..

गवि 06/01/2026 - 11:09
friedrichshafen ते वाडेश्वर पुणे व्हाया म्युनिक आणि सोलापूर हा
अहो अभ्याशेठ, आम्ही कसले अंतर आणि वेळ सांगणार? तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार. तुमची जर्मन शब्दरचना म्हणजे श्वास न घेता लावलेली शब्दांची आगगाडी. ;-)

In reply to by गवि

टर्मीनेटर 06/01/2026 - 11:45
तुमच्या friedrichshafen च्या उच्चाराच्या शोधातच आमचे बारा तास जाणार
अगदी अगदी! आम्हालाही त्याने वरील प्रमाणे 'फ्राइड राईस हाफ इन' अशी फोड करुन त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगीतल्याने ते थोडे सोपे गेले 😀

टर्मीनेटर 06/01/2026 - 09:36
कैच्याकै लांबलचक असुनही कट्टा वृत्तांत वाचणार्‍या आणि तो आवडल्याचे कळवणार्‍या सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ बिपीन सुरेश सांगळे
आपली भेट राहून गेली
आज ना उद्या आपल्याही भेटीचा योग जुळून येईलच 👍

किल्लेदार 06/01/2026 - 20:55
कट्ट्यासाठी इतके सायास करून पुण्यास आलेल्या धुरंधर टर्मिनेटर यांना साष्टांग दंडवत. पुण्यातल्या पुण्यात असूनही येऊ शकलो नाही याबद्दल आता फारच चुटपुट लागून राहिली आहे. धुरंधर स्टाईल कट्टा वृत्तांत अत्यंत आवडल्या गेलेला आहे. पुढच्या कट्ट्यानंतर तृष्णातृप्तीचा एक एक्सटेंडेड कट्टा सुद्धा प्लॅन करून टाकू.
या धाग्यावर चर्चा झाल्यामुळे पुण्यात कट्टयाचा प्रस्ताव एका नवीन धाग्यात देत आहे. भक्ती ताई यांनी जमल्यास व अभ्या यांनी नक्की येतो असे सांगितले आहे. टर्मिनेटर यांचा उत्साह तर भारीच आहे. ते उशीरा भेटायचे असेल तर येतो म्हणालेत म्हणून दुपारची वेळ सुचवत आहे. जास्तीत जास्त लोकांना जमावे म्हणून रविवारचा मुहूर्त काढला आहे. मागे कर्नल तपस्वी यांनी पण पुणे कट्टा केल्यास भेटू म्हटले होते. तर खालील स्थळ आणि वेळ सुचवत आहे.

तर्क का चुकतात?

उपयोजक ·

TIME... T = TIME, पुरेसा वेळ मिळाला नाही तर... अर्धवट वाचन करून किंवा अर्धवट ऐकून ... I= Information, पुरेशी माहिती मिळाली नाही तर ... M = Money, पुरेसा पैसा नसेल तर E = Employee, ज्याला माहिती गोळा करायला सांगीतली आहे, ती व्यक्तीच फितुर असेल तर ... अर्थात, हा माझा दृष्टिकोन आहे, इतरांची मते वेगळी असतीलच ...

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 19/02/2022 - 20:43
हेच हेच. लेखक सी एस ल्युईस नाही, ल्युईस कॅरॉल. (दोघे लहान मुलांच्या फॅन्टसी कथांचे लेखक {नार्निया आणि ऍलिस इन वंडरलँड} आहेत, कन्फ्युजन झाले.)

In reply to by कॉमी

पुस्तकाची तोंड ओळख वाचली मस्ट रीडच्या बकेट लिस्ट मध्ये Add केले आहे ... सध्या फुकटचंबू बाबूराव, असल्याने फुकटात PDF मिळाली तर बघतो...

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 19/02/2022 - 21:18
ही घ्या लिंक. लीगल आहे, प्रताधिकारमुक्त पुस्तक आहे. https://www.gutenberg.org/ebooks/4763 (PDF नाही, EPUB फाईल आहे, ती lithium reader मध्ये उघडू शकाल.)

सर टोबी 19/02/2022 - 19:50
सहसा आपण फार मोठ्या यशाची अपेक्षा करतो आणि त्या तुलनेत मिळालेलं कमी यश अथवा अपेक्षा न केलेला धक्कादायक परिणाम याची कारणमीमांसा आपल्याला अपेक्षित असावी. पण या उलट देखील झाल्याची उदाहरणं आहेत. कलेच्या क्षेत्रात तर अशी बक्कळ उदाहरणं आहेत. जेमतेम कर्जफेड व्हावी म्हणून काढलेला सीआयडी हा गुरुदत्तचा सिनेमा, वॉल्ट डिस्ने ची कार्टून्स यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं आहे. औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत कधी कधी एखादं बाय प्रॉडक्ट मुळ उत्पादनापेक्षा जास्त यशस्वी होतं तर बऱ्याच वेळेला एखादं उत्पादन काळाच्या बरेच पुढे असते. याचे उदाहरण म्हणजे सॅमसंग चा फार वर्षापूर्वी आलेला एक मायक्रोवेव्ह अवन. त्यामध्ये सेल्फ डाग्नोसिस ची फीचर होती ज्या द्वारे तो सर्व्हिस रिक्वेस्ट तयार करून कस्टमर केअरला पाठवू शकायचा असे काहीसं वाचलेलं आठवतं. मोबाईल नियंत्रित घरगुती उपकरणे असलेली घरे काही वर्षापूर्वी गेरा वगैरे विकसक पुण्यात विकत होती. आता ती वैशिष्ठ्य एकतर सर्वसाधारण झाली असावी किंवा फार लोकप्रिय नसावी. निसर्गात कोणतीही मानवनिर्मित गोष्ट जशी न तशी पुनः निर्मित होत नाही. यालाच गुणवत्ता नियंत्रण पद्धतीत एक विशिष्ठ संज्ञा आहे. तात्पर्य म्हणजे आडाखे चुकणे हे नैसर्गिकच आहे असे वाटते. कल्पणांचं व्यावसायिक यश कसे असू शकेल याचं आपण थोडे फार विश्लेषण करू शकतो एवढाच काय तो आपला कंट्रोल.

In reply to by सर टोबी

सोनीने मार्व्हलचे फक्त स्पायडर मॅन, हेच कॅरेक्टर खरेदी केले. आज Avengers धुमाकुळ घालत आहे आणि पुढील किमान 20-25 वर्षे तरी Avengers धुमाकुळ घालतील अशीच गोष्ट, हॅरी पाॅटर बाबतीत... मनोरंजनाचा धंदा करतांना, लहान मुलांना काय आवडते? ही बाब लक्षांत घेतली की, धंदा बुडीत खात्यात जात नाही पाॅपीन्स, जेम्स, लिची, बबलगम, खेळणी, ह्यांना मरण नाही ठकी ते बार्बी आणि लाकडी बस ते रिमोटची गाडी, ही उदाहरणे पुरेशी आहेत

Trump 20/02/2022 - 13:17
संगणकाने तर्क करण्याच्या पध्द्दतीमध्ये बरीच प्रगती झाली. शक्य तेवढे मानवी वर्तणुक संगणकामध्ये कशी आणतात येईल आणि तर्क / अंदाज कसे मांडता येतील, यासाठी machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प्रतिशब्द?) बघुया घ्या. त्यात पुर्ण प्रक्रिया लिहीली आहे.

In reply to by Trump

सर टोबी 20/02/2022 - 15:32
तर्काची मीमांसा करताना अनिश्चितता, परिस्थितीचे पूर्ण आकलन नसणे आणि आयत्या वेळेस होणारे आणि आपल्या तर्काची पूर्ण वाट लावणारे घटक कारणीभूत असतात. अनिश्चित घटकांची प्रॉबेबिलिटी आणि पोस्ट मोर्टेम पध्द्तीने नव्याने आकलन झालेले घटक यांना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा पुढच्या अंदाज वर्तवण्याच्या वेळेस वापरता येऊ शकते. परंतु तिसरा घटक हा सर्वांना भारी पडतो आणि किती आकलन झालेले घटक विचारात घ्यायचे हा सर्वस्वी मानवाचा निर्णय असतो. त्यामुळे ज्ञात असणाऱ्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता फारशी उपयोगी नाही असे वाटते. खूप किचकट परीक्षण जसे कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही ते तपासणे आणि खूप माहितीचे परीक्षण जसे संशयास्पद आर्थिक देवाण घेवाण होत आहे का ते तपासणे या कामात आपण म्हणता त्या तंत्राचा वापर योग्य आणि खात्रीशीर आहे.

In reply to by सर टोबी

Trump 20/02/2022 - 15:57
हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence चा भाग झाला.
तर्काची मीमांसा करताना अनिश्चितता, परिस्थितीचे पूर्ण आकलन नसणे आणि आयत्या वेळेस होणारे आणि आपल्या तर्काची पूर्ण वाट लावणारे घटक कारणीभूत असतात. अनिश्चित घटकांची प्रॉबेबिलिटी आणि पोस्ट मोर्टेम पध्द्तीने नव्याने आकलन झालेले घटक यांना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा पुढच्या अंदाज वर्तवण्याच्या वेळेस वापरता येऊ शकते. परंतु तिसरा घटक हा सर्वांना भारी पडतो आणि किती आकलन झालेले घटक विचारात घ्यायचे हा सर्वस्वी मानवाचा निर्णय असतो. त्यामुळे ज्ञात असणाऱ्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता फारशी उपयोगी नाही असे वाटते.
https://machinelearningmastery.com/different-results-each-time-in-machine-learning/ machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प्रतिशब्द?) मध्ये आलेली नवीन माहिती वापरुन तर्क बदलतो. https://machinelearningmastery.com/different-results-each-time-in-machine-learning/ https://towardsdatascience.com/how-to-apply-continual-learning-to-your-machine-learning-models-4754adcd7f7f

मदनबाण 20/02/2022 - 14:14
सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत असे वाटले तरी तर्क करताना काही गृहीतक करणे राहणे. भावना, अहं इं इं इं यांचा तर्क करताना मानवी मनावर असलेला प्रभाव. अश्या अनेक गोष्टी असतात ज्यावर मनुष्य प्राण्याचे कधीच नियंत्रण नसते त्या तर्क करताना विचारात घेतल्या जात नाहीत. जाता जाता :- एक तर्क करुन पाहतो... रशिया आणि युक्रेन यांच्यात जर युद्ध झाले तर फ्लॅश पॉइंट Donbass असेल. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jawan Hai | Vaishali Samant | Sagarika Music

बाजीगर 20/02/2022 - 18:30
जर कुणाला आपण फार तर्क महापंडित आहोत वाटत असेल तर पुन्हा विचार करा, जेव्हा अनंत शक्यता आणि प्रत्येक शक्यतेची पुन्हा अनेक शक्यता असल्या तर मानवी मेंदूचा 'दही काला ' होणार ना राव. तळाची लिंक बघावी. शतरंज खेळण्याचा कार्यक्रम सी मध्ये लिहिलेला होता आणि एआयएक्स ऑपरेटिंग सिस्टम अंतर्गत चालविला जात होता. हे प्रति सेकंद 200 दशलक्ष पोझिशन्सचे मूल्यांकन करण्यास सक्षम होते, जे 1996 च्या आवृत्तीपेक्षा दुप्पट होते. 1997 मध्ये डीप ब्लू पुन्हा श्रेणीसुधारित केले. जून 1997 मध्ये, टॉप 500 च्या यादीनुसार डिप ब्लू 259 वा सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर होता, त्याने हाय-परफॉरमेंस लाइनपॅक बेंचमार्कवर 11.38 जीएफएलओपीएस प्राप्त केले. - https://mr.atlantida-pedia.org/804152-deep-blue-chess-computer-FZYZGK

sunil kachure 20/02/2022 - 19:29
कारण तर्क तुमचे असले तरी ते विविध घटक,विविध स्थित्यंतर,परिस्थिती ह्या वर अवलंबून असतात तुमचे काय कोणाचेच त्या वर नियंत्रण नसते. ते तुमच्या तर्काला अनुकल राहतीलच ह्याची झीरो शास्वती असते .अगदी सुपर कॉम्प्युटर वापरला तरी हीच स्थिती असणार. म्हणून तर्क चुकतं

चित्रगुप्त 20/02/2022 - 21:48
तर्क चुकू नये म्हणून काय काय करता येईल ?
....... उगाच काहीतरी तर्कटे रचित बसू नये. धीराने वाट बघत बसावे. योग्य वेळ आली की काय ते कळतेच. धीर धरारे धीरापोटी फळे रसाळ गोमटी. मात्र धीराने वाट बघत बसायला, रसाळ गोमटी फळे चाखत बसायला एक खाटले तेवढे हवेच ... "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी". तस्मात एका खाटल्याची सोय करून ठेवावी म्हणजे झाले. हाकानाका. .

TIME... T = TIME, पुरेसा वेळ मिळाला नाही तर... अर्धवट वाचन करून किंवा अर्धवट ऐकून ... I= Information, पुरेशी माहिती मिळाली नाही तर ... M = Money, पुरेसा पैसा नसेल तर E = Employee, ज्याला माहिती गोळा करायला सांगीतली आहे, ती व्यक्तीच फितुर असेल तर ... अर्थात, हा माझा दृष्टिकोन आहे, इतरांची मते वेगळी असतीलच ...

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 19/02/2022 - 20:43
हेच हेच. लेखक सी एस ल्युईस नाही, ल्युईस कॅरॉल. (दोघे लहान मुलांच्या फॅन्टसी कथांचे लेखक {नार्निया आणि ऍलिस इन वंडरलँड} आहेत, कन्फ्युजन झाले.)

In reply to by कॉमी

पुस्तकाची तोंड ओळख वाचली मस्ट रीडच्या बकेट लिस्ट मध्ये Add केले आहे ... सध्या फुकटचंबू बाबूराव, असल्याने फुकटात PDF मिळाली तर बघतो...

In reply to by मुक्त विहारि

कॉमी 19/02/2022 - 21:18
ही घ्या लिंक. लीगल आहे, प्रताधिकारमुक्त पुस्तक आहे. https://www.gutenberg.org/ebooks/4763 (PDF नाही, EPUB फाईल आहे, ती lithium reader मध्ये उघडू शकाल.)

सर टोबी 19/02/2022 - 19:50
सहसा आपण फार मोठ्या यशाची अपेक्षा करतो आणि त्या तुलनेत मिळालेलं कमी यश अथवा अपेक्षा न केलेला धक्कादायक परिणाम याची कारणमीमांसा आपल्याला अपेक्षित असावी. पण या उलट देखील झाल्याची उदाहरणं आहेत. कलेच्या क्षेत्रात तर अशी बक्कळ उदाहरणं आहेत. जेमतेम कर्जफेड व्हावी म्हणून काढलेला सीआयडी हा गुरुदत्तचा सिनेमा, वॉल्ट डिस्ने ची कार्टून्स यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं आहे. औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत कधी कधी एखादं बाय प्रॉडक्ट मुळ उत्पादनापेक्षा जास्त यशस्वी होतं तर बऱ्याच वेळेला एखादं उत्पादन काळाच्या बरेच पुढे असते. याचे उदाहरण म्हणजे सॅमसंग चा फार वर्षापूर्वी आलेला एक मायक्रोवेव्ह अवन. त्यामध्ये सेल्फ डाग्नोसिस ची फीचर होती ज्या द्वारे तो सर्व्हिस रिक्वेस्ट तयार करून कस्टमर केअरला पाठवू शकायचा असे काहीसं वाचलेलं आठवतं. मोबाईल नियंत्रित घरगुती उपकरणे असलेली घरे काही वर्षापूर्वी गेरा वगैरे विकसक पुण्यात विकत होती. आता ती वैशिष्ठ्य एकतर सर्वसाधारण झाली असावी किंवा फार लोकप्रिय नसावी. निसर्गात कोणतीही मानवनिर्मित गोष्ट जशी न तशी पुनः निर्मित होत नाही. यालाच गुणवत्ता नियंत्रण पद्धतीत एक विशिष्ठ संज्ञा आहे. तात्पर्य म्हणजे आडाखे चुकणे हे नैसर्गिकच आहे असे वाटते. कल्पणांचं व्यावसायिक यश कसे असू शकेल याचं आपण थोडे फार विश्लेषण करू शकतो एवढाच काय तो आपला कंट्रोल.

In reply to by सर टोबी

सोनीने मार्व्हलचे फक्त स्पायडर मॅन, हेच कॅरेक्टर खरेदी केले. आज Avengers धुमाकुळ घालत आहे आणि पुढील किमान 20-25 वर्षे तरी Avengers धुमाकुळ घालतील अशीच गोष्ट, हॅरी पाॅटर बाबतीत... मनोरंजनाचा धंदा करतांना, लहान मुलांना काय आवडते? ही बाब लक्षांत घेतली की, धंदा बुडीत खात्यात जात नाही पाॅपीन्स, जेम्स, लिची, बबलगम, खेळणी, ह्यांना मरण नाही ठकी ते बार्बी आणि लाकडी बस ते रिमोटची गाडी, ही उदाहरणे पुरेशी आहेत

Trump 20/02/2022 - 13:17
संगणकाने तर्क करण्याच्या पध्द्दतीमध्ये बरीच प्रगती झाली. शक्य तेवढे मानवी वर्तणुक संगणकामध्ये कशी आणतात येईल आणि तर्क / अंदाज कसे मांडता येतील, यासाठी machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प्रतिशब्द?) बघुया घ्या. त्यात पुर्ण प्रक्रिया लिहीली आहे.

In reply to by Trump

सर टोबी 20/02/2022 - 15:32
तर्काची मीमांसा करताना अनिश्चितता, परिस्थितीचे पूर्ण आकलन नसणे आणि आयत्या वेळेस होणारे आणि आपल्या तर्काची पूर्ण वाट लावणारे घटक कारणीभूत असतात. अनिश्चित घटकांची प्रॉबेबिलिटी आणि पोस्ट मोर्टेम पध्द्तीने नव्याने आकलन झालेले घटक यांना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा पुढच्या अंदाज वर्तवण्याच्या वेळेस वापरता येऊ शकते. परंतु तिसरा घटक हा सर्वांना भारी पडतो आणि किती आकलन झालेले घटक विचारात घ्यायचे हा सर्वस्वी मानवाचा निर्णय असतो. त्यामुळे ज्ञात असणाऱ्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता फारशी उपयोगी नाही असे वाटते. खूप किचकट परीक्षण जसे कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही ते तपासणे आणि खूप माहितीचे परीक्षण जसे संशयास्पद आर्थिक देवाण घेवाण होत आहे का ते तपासणे या कामात आपण म्हणता त्या तंत्राचा वापर योग्य आणि खात्रीशीर आहे.

In reply to by सर टोबी

Trump 20/02/2022 - 15:57
हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence चा भाग झाला.
तर्काची मीमांसा करताना अनिश्चितता, परिस्थितीचे पूर्ण आकलन नसणे आणि आयत्या वेळेस होणारे आणि आपल्या तर्काची पूर्ण वाट लावणारे घटक कारणीभूत असतात. अनिश्चित घटकांची प्रॉबेबिलिटी आणि पोस्ट मोर्टेम पध्द्तीने नव्याने आकलन झालेले घटक यांना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा पुढच्या अंदाज वर्तवण्याच्या वेळेस वापरता येऊ शकते. परंतु तिसरा घटक हा सर्वांना भारी पडतो आणि किती आकलन झालेले घटक विचारात घ्यायचे हा सर्वस्वी मानवाचा निर्णय असतो. त्यामुळे ज्ञात असणाऱ्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता फारशी उपयोगी नाही असे वाटते.
https://machinelearningmastery.com/different-results-each-time-in-machine-learning/ machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प्रतिशब्द?) मध्ये आलेली नवीन माहिती वापरुन तर्क बदलतो. https://machinelearningmastery.com/different-results-each-time-in-machine-learning/ https://towardsdatascience.com/how-to-apply-continual-learning-to-your-machine-learning-models-4754adcd7f7f

मदनबाण 20/02/2022 - 14:14
सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत असे वाटले तरी तर्क करताना काही गृहीतक करणे राहणे. भावना, अहं इं इं इं यांचा तर्क करताना मानवी मनावर असलेला प्रभाव. अश्या अनेक गोष्टी असतात ज्यावर मनुष्य प्राण्याचे कधीच नियंत्रण नसते त्या तर्क करताना विचारात घेतल्या जात नाहीत. जाता जाता :- एक तर्क करुन पाहतो... रशिया आणि युक्रेन यांच्यात जर युद्ध झाले तर फ्लॅश पॉइंट Donbass असेल. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jawan Hai | Vaishali Samant | Sagarika Music

बाजीगर 20/02/2022 - 18:30
जर कुणाला आपण फार तर्क महापंडित आहोत वाटत असेल तर पुन्हा विचार करा, जेव्हा अनंत शक्यता आणि प्रत्येक शक्यतेची पुन्हा अनेक शक्यता असल्या तर मानवी मेंदूचा 'दही काला ' होणार ना राव. तळाची लिंक बघावी. शतरंज खेळण्याचा कार्यक्रम सी मध्ये लिहिलेला होता आणि एआयएक्स ऑपरेटिंग सिस्टम अंतर्गत चालविला जात होता. हे प्रति सेकंद 200 दशलक्ष पोझिशन्सचे मूल्यांकन करण्यास सक्षम होते, जे 1996 च्या आवृत्तीपेक्षा दुप्पट होते. 1997 मध्ये डीप ब्लू पुन्हा श्रेणीसुधारित केले. जून 1997 मध्ये, टॉप 500 च्या यादीनुसार डिप ब्लू 259 वा सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर होता, त्याने हाय-परफॉरमेंस लाइनपॅक बेंचमार्कवर 11.38 जीएफएलओपीएस प्राप्त केले. - https://mr.atlantida-pedia.org/804152-deep-blue-chess-computer-FZYZGK

sunil kachure 20/02/2022 - 19:29
कारण तर्क तुमचे असले तरी ते विविध घटक,विविध स्थित्यंतर,परिस्थिती ह्या वर अवलंबून असतात तुमचे काय कोणाचेच त्या वर नियंत्रण नसते. ते तुमच्या तर्काला अनुकल राहतीलच ह्याची झीरो शास्वती असते .अगदी सुपर कॉम्प्युटर वापरला तरी हीच स्थिती असणार. म्हणून तर्क चुकतं

चित्रगुप्त 20/02/2022 - 21:48
तर्क चुकू नये म्हणून काय काय करता येईल ?
....... उगाच काहीतरी तर्कटे रचित बसू नये. धीराने वाट बघत बसावे. योग्य वेळ आली की काय ते कळतेच. धीर धरारे धीरापोटी फळे रसाळ गोमटी. मात्र धीराने वाट बघत बसायला, रसाळ गोमटी फळे चाखत बसायला एक खाटले तेवढे हवेच ... "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी". तस्मात एका खाटल्याची सोय करून ठेवावी म्हणजे झाले. हाकानाका. .
अनेकदा काही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला तर्क करावे लागतात. तर्क करुन निर्णय घ्यावे लागतात. पण दरवेळी हा तर्क बरोबर येईलच असे होत नाही. तर्क न चुकण्याची शक्यता कमीतकमी करण्यासाठी तर्क करण्याच्या क्षमतेत सुधारणा करावी लागेल. त्यासाठीच हा धागा. तर्क का चुकतात? तो चुकू नये म्हणून काय काय करता येईल? भावनांचा तर्क करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो? तर्क किती ताणावा? किती ताणू नये? तर्क करण्याची क्षमता सुदृढ करण्यासाठी काय करता येईल? सराव कसा करावा? तुमचा एखादा तर्क चुकला असेल तर तो का चुकला? कोणते मुद्दे निसटले विचारप्रक्रियेतून? सांगण्यासारखे असेल तर जरुर लिहा. _/\_

नर्सरी ऍडमिशन आणि मनस्ताप !

स्वतन्त्र ·

खेडूत 17/12/2020 - 17:13
अमुक शाळा हवी ही पालकांची गरज आहे, तोच शाळेचा मोठा फायदा आहे.. RTE मधल्या मुलांचा तथाकथित खर्च काढायला फी वाढवावी लागते. Random प्रवेश ही धूळफेक असते. आतून सगळे सेटिंग झालेले असते. चांगली मुले आणि शिक्षक मिळून शाळेला मोठे करतात. एरवी शाळा एकटीच मोठी नसते.

In reply to by खेडूत

स्वतन्त्र 17/12/2020 - 18:48
कोणतीही शाळा वाईट कधीच नसते.एक विद्यार्थी म्हणून आपण ज्या शाळेत जातो ती आपल्याला नक्कीच प्रिय असते. 'सेटिंग' बद्दल हळू हळू सहमत होत आहे. फक्त लोंकांचा फुकट वेळ शाळां प्रशासनाने घालवू नये ! शाळा कोणतीही चालेल पण घराजवळ असावी हीच अपेक्षा आहे. घरापासून २-४ कि मी अंतरावर जवळ पास ५ शाळा आहेत,पण एकही शाळेत अजूनही नंबर लागलेला नाही. लांब राहणाऱ्या पालकांच्या हट्टामुळे जवळच्या मुलांना प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिती आहे.

जे काही वर्णन वाचलं त्यावरुन ही शाळा तथाकथित ईंग्रजी माध्यम शिकवणारी मिशनरी शाळा असावी. शेवटी आपल्याला सुद्धा जवळच्या दुसऱ्या कुठल्या शाळेत जायचा पर्याय आहेच. असे पालक काहीही झालं तरी आपल्या पाल्याला याच शाळेत घालावं म्हणून अट्टाहास करतात. भरपूर पैसे मोजायला तयार असतात म्हणुनच तर त्यांचे फ़ावते. गंमत म्हणजे आपल्याकडे लोक अश्या " इण्टरनॅशनल " शाळेत मुलांना टाकायला जीवाचा आटापिटा करतात. पण उत्तम ईन्टरनॅशनल शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक पारितोषिक मिळवतो. ते ही अश्या शाळांतील शिक्षक स्पर्धेत असतांना ! धन्य त्या शाळा आणि धन्य ते शिक्षक !

In reply to by सामान्यनागरिक

स्वतन्त्र 17/12/2020 - 18:43
कोणतीही शाळा वाईट कधीच नसते.आणि इंटरनॅशनल स्कूल किंवा अमुक बोर्डाचंही अट्टहास नाहीये. अपेक्षा इतकीच आहे कि शाळा घराजवळ हवी. आणि सादर शाळा हि मिशनरी नसून मराठी लोकांनी चालवलेली शाळा आहे.

In reply to by सामान्यनागरिक

Bhakti 18/12/2020 - 09:54
मला तर मुलीला सध्या online /Offline अभ्यास कर म्हणावच वाटत नाही..२-३ महिने अजून मनसोक्त खेळ म्हणाव वाटत!!पण शाळेत समाजात वावरण्याच बाळकडू मिळत.मित्र मैत्रिणी मिळतात ना! :)

In reply to by सामान्यनागरिक

साहना 18/12/2020 - 12:40
मिशनरी शाळांना RTE लागू होत नाही. RTE च काय पण इतर कुठलाही शिक्षण विषयक कायदा लागू होत नाही. तसेच ह्या शाळा वाट्टेल तो निकष लावून ऍडमिशन देऊ शकतात. त्यामुळे हि शाळा मिशनरी शाळा नाही, हिंदू लोकांनी चालवलेली असावी. > पण उत्तम ईन्टरनॅशनल शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक पारितोषिक मिळवतो. ते ही अश्या शाळांतील शिक्षक स्पर्धेत असतांना ! उगाच ठाऊक नसताना लोकांना नवे ठेवू नयेत. एक कुठल्या शिक्षकाला पारितोषिक मिळाले म्हणून सर्वच जिल्हापरिषदेच्या शाळा चांगल्या असतात किंवा सर्वच शिक्षक चांगले असतात असे नाही. तसेच लोकांना उगाच पैसे मोजायची हौस सुद्धा नसते. बहुतेक पालकांना शाळेचा विनाकारण मनस्ताप नको असतो. एक १० हजार जास्त मोजावे लागले असले तरी रांगेत उभे राहा, फॉर्म भर असल्या फंदात पडायचे नसते. पालक त्यामुळे जवळची शाळा, कमी मनस्ताप असलेली शाळा आणि ज्याशाळेंत आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्थरातील मुले जातात अश्या शाळांत मुलांना पाठवतात. सर्व पालक मूर्ख आहेत आणि निव्वळ हौस म्हणून इंटरनॅशनल शाळांना प्राधान्य देतात हा आपला गैरसमज आहे. पालकांना पारितोषिक प्राप्त शिक्षक नको आहेत. शाळा जवळ असावी, प्रवास आणि शालेय वातावरण सुरक्षित असावे, फी परवडणारी असावी आणि काही तरी विद्या मुलांच्या पदरात पदवी इतकीच माफक अपेक्षा असते. बाकी मुलाची बुद्धिमत्ता पाहून नंतर ट्युशन वगैरे लावले जाऊ शकते. बहुतेक वेळा जिल्हा परिषदेच्या शाळा हि अपेक्षा सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. शाळा दूर असते, शिक्षक येत नाहीत, कारभार गलथान असतो, गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले, शिक्षक आणि पालक असतात, प्रिन्सिपॉल साधी शिस्त सुद्धा ठेवू शकत नाहीत आणि शाळेचे छप्पर पावसांत गळते अशी परिस्थिती असते. RTE कायद्याने शाळा आणि समाज ह्यांचे नाते कायमचे तोडून ठेवले आहे. समजा सदर शाळा लेखकाच्या आजोबानी सुरु केली होती किंवा लेखकाचे स्वतःचे वडील इथे प्रिन्सिपॉल होते किंवा लेखकाने १० वर्षे आधी शाळेला १० लाखांची देणगी दिली होती, तरी सुद्धा शाळेला लेखकाच्या पाल्याला ऍडमिशन देणे कायद्याचे उल्लंघन ठरते. त्यामुळे कुठलाही शहाणा माणूस आजुबाजुंच्या शाळांत आर्थिक किंवा भावनिक गुंतवणूक करायच्या भानगडीत पडत नाही. पण इंटरनॅशनल स्कुल जे बहुतेक वेळा "अल्पसंख्यांक" चालवतात त्यांना RTE लागू होत नाही त्यामुळे इथे अश्या प्रकारची गुंतवणूक फायदेशीर ठरते.

Rajesh188 17/12/2020 - 19:37
शाळेला देणगी ही देणे बंधनकारक आहे पण कायदेशीर मार्गाने नाही आताच्या नियम नुसार. मुल हुशार नसतील तरी चालेल पण पालक सक्षम आहेत का ह्याचा अंदाज घेण्यासाठी पालकांना बोलवले जाते.

चौकटराजा 17/12/2020 - 20:02
माझ्या पालकाना ( मी ६७ पूर्ण आहे )चांगली शाळा वाईट शाळा असे काही पहाण्याचे सुचले नाही ! मुलगा घरी नाही शाळेत कोणत्या तरी यत्तेत शिकत आहे याचे समाधान त्याना होते. इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सान्गतो चांगल्या शाळेत वाईट विद्यार्थी हीअसतात व जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम विधार्थीही असतात !ज्याचात एकलव्य बनण्याची आकांक्षा व पात्रता आहे तो कुठूनही ज्ञान मिळवत जातो. चांगल्या शाळेची फार तर व्याख्या अशी करता येईल जिथे वाचायला भरपूर काही आहे ! उत्तम प्रतोगशाळा आहे व अगदीच फालतू शिक्षक नाहीत ! बाकी इमारत ,मैदान याना काही अर्थ नाही ! एक शंभर टक्के सत्य आहे की वाचनाची आवड,संशोधनाची आवड,पालकांशी संवाद करण्याची आवड ही दैववशात देणगी आहे ! तिचा कुठे मॉल नाही ! माझ्या एका तरूण मित्राने मुलीला शाळेत न पाठवता स्वतः च तिचा विकास करायचा अगदी वेगळ्या पद्धतीने असे ठरवले आहे ! मला हवे ते मला शिकायचे आहे सरकार व राजकीय पक्षाना हवे ते नाही हा खर्‍या शिक्षणाचा गाभा आहे ! न न म य य गणानी मालिनी व्रुत्त होते याचा मला आयुष्यात विकसाच्या सन्दर्भात काही फायदा झाला नाही कारण ते शिक्षण सरकारने माझ्यावर लादलेले होते !

In reply to by चौकटराजा

साहना 18/12/2020 - 12:44
आपल्या काळाची परिस्थिती वेगळी होती. दारिद्र्यांत पिचणाऱ्या देशांत काहीही संधी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे चांगल्या व्यक्ती शिक्षक बनल्या आज काल त्या बुद्धिमत्तेचे लोक अभियंते आणि डॉक्टर होतात. अश्या शाळांत बसायला बाकडा नसेल तर सुद्धा शाळा चालते. त्याशिवाय फक्त काहीच लोक शिक्षण ह्या विषयाला गाम्भीर्यने घेत होते त्यामुळे अश्या लोकांचीच मुले शाळेत जात होती. मेट्रिक होऊन सरकारी नोकरी मिळाली तर बास होते. लिहायला वाचायला आले तर पुरेसे होते आणि शिक्षकाने कानशिलात लावली तर घरी आणखी दोन खायला मिळायच्या. आज काळ बदलला आहे. प्रचंड लोकसंख्येमुळे शिक्षणाला खूप डिमांड आहे आणि वरून प्रचंड सरकारी नियंत्रण ह्यामुळे गुंड किंवा निर्ल्लज किंवा मिशनरी शाळाच आज देशांत शिक्षण देत आहेत. अश्या स्थितीत चांगली शाळा आणि वाईट शाळा हा फरक दुर्दैवाने करावाच लागतो.

In reply to by साहना

चौकटराजा 18/12/2020 - 13:05
चांगली शाळा व वाईट शाळा फरक जरूर करावा पण आपला पाल्य चांगला ,जिज्ञासू ,अभ्यासू , संवेदनशील विद्यार्थी नसेल तर चांगली शाळा ही एक डेड इन्वेस्टमेन्ट आहे हे पक्के ध्यानात असू द्या ! कारण चांगल्या शाळेतील वाईट विद्यार्थ्याचा अनुभव मी स्वतः अगदी जवळून घेतला आहे !!!

In reply to by साहना

चौकटराजा 18/12/2020 - 20:22
वाईट विद्यार्थी हा वाईट चालीचा विद्यार्थी असे मी म्हणालो नाही तो अभ्यासू नसणे , जिज्ञासू नसणे ,सन्वेदन्शील नसणे ,पालकाशी मुक्त संवाद साधणारा नसणे हा माझ्या व्याख्येत वाईट विधार्थी आहे त्यात विद्यार्थीनीही आल्या ! वाईट चालीचा वा चालीची म्हण्जे नक्की कसावा कशी ते कायदा ठरवतोच की ! विद्यार्थी वरील गुण असतील व जरा गबाळा असेल तर तो माझ्या नजरेत उत्तम विद्यार्थीच असेल !

साहना 18/12/2020 - 12:28
मला पडलेले प्रश्न :- > -जर रँडम ऍडमिशन देणार आहात तर पालकांचा वेळ का घालवता ? डायरेक्ट लिस्ट काढून मोकळे का नाही होत ? रँडम लिस्ट काढायला शाळेला अजिबात इंटरेस्ट नसतो. पदरचे पैसे खर्चून शाळा काढायची वर ३०% सीट्स फुकट सरकारला द्यायची. मग त्या ३० सीट्स चा खर्च ७०% मुलांकडून वसूल करायचा असतो. मग हि ७०% मुले गरीब असली तरी मग शाळा चालवायची कशी ? रँडम ऍडमिशनला म्हणून अर्थ नाही पण RTE अंतर्गत हिंदू लोकांची चालवलेल्या शाळांना फक्त रँडम पद्धतीने ऍडमिशन द्यायचा अधिकार आहे. मला वाटते "प्रिन्सिपॉल ऍड्रेस" ह्या गोष्टी कुठला पालक खरोखर सिरीयस आहे हे पाहण्यासाठी करतात आणि नंतर गुपचूप आपल्याला हवे त्याला ऍडमिशन देतात. अर्थांत इथे शाळांची चूक नाही. बिचार्यांना हा देखावा करावाच लागतो. > शाळा लिस्ट काढताना अंतर का लक्षात घेत नाहीत.जवळ राहणाऱ्या मुलांनी लांब शाळेत जायच आणि लांब राहणाऱ्यांना पण दूरच जायच. म्हणजे दोन्ही केसेस मध्ये त्रास आहेच. माझ्या माहितीप्रमाणे शाळा हिंदू लोकांनी चालवली असेल तर असा निकष RTE अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. (का हे विचारू नका). फक्त अंतर ह्या निकषावर दाखल द्यायचा असता तर पालकांनी वाट्टेल तो पत्ता टाकला असता. मग त्या पत्याचे वेरिफिकेशन करायची जबाबदारी शाळेवर आली असती. मिशनरी शाळा आहे तर पहा जवळपास, किमान मनस्ताप तरी वाचेल.

In reply to by साहना

स्वतन्त्र 18/12/2020 - 12:43
ऍड्रेस वेरिफिकेशन साठी शाळेने राहत्या घराची टॅक्स पावती,आधार कार्ड,वीज बिल घेतलेले आहे.त्यामुळे शाळांना वेगळे वेरिफिकेशन करण्याची गरज नसावी !

In reply to by स्वतन्त्र

साहना 18/12/2020 - 13:47
हो पण त्यावरून अंतर काढून सॉर्टींग करायचे असेल तर वेगळा पुरावा लागेल. त्याशिवाय पत्त्याला इतके महत्व असेल तर मग खोटी कागदपत्रे करून देणारे एजेंट लोक सुद्धा आपोआप तयार होतील. बेंगलोर मध्ये हे सर्रास चालू आहे.

स्वतन्त्र 25/12/2020 - 16:51
पुण्याच्या एका कन्नड भाषिक संघाने चालवलेल्या शाळेत जिथे RTE कोटा नसल्यामुळे सीट्स जास्त होते.तिथे ऍडमिशन झालेली आहे.

चलत मुसाफिर 05/01/2021 - 21:16
शाळा केवळ शासनसंचालितच असाव्यात. बारावीपर्यंतचे शिक्षण संपूर्णपणे मोफत व सक्तीचे असावे. खाजगी शाळा, अल्पसंख्य शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा अशा थेरांवर बंदी आणावी. एक सुरुवात म्हणून सर्व सरकारी नोकरांच्या मुलांना जो शालेय शुल्काचा परतावा किंवा शिक्षण भत्ता मिळतो, तो केवळ सरकारी शाळांसाठीच मिळेल असा नियम करावा.

एक मिनिट लेख वाचताना गेला एक महिना दोळ्यासमोर आला.. तुम्ही लिहिलेल्या दोन्ही शाळा कुठ्ल्या ते कळल्या.. माझ्या मुलीला सुद्धा कन्नड सन्घ शाळेमध्ये प्रवेश मिळाला..

1. मला शाळेचा काहीही फायदा झाला नाही. मी दहावी पास झालो ते, वडीलांनी, शेवटचे 15 दिवस शिकवले म्हणून. 2. मोठ्या मुलाला, मी शिकलो त्याच शाळेत शिकायला पाठवले. SSC बोर्ड, अनुदानित शाळा. सेमी इंग्रजी. मुलगा, इंजिनियर झाला आणि सध्या नौकरी करतो. 3. धाकट्या मुलाला, माझ्या सारखीच, शालेय शिक्षणात रस न्हवता.अपेक्षा नसतांना, एका फटक्यात, दहावी पास झाला. नंतर 12वी काॅमर्स पण एका फटक्यात पास झाला. पुढच्या शिक्षणात रस न्हवता. म्हणून 2 वर्ष काहीही केले नाही. फक्त 3 गोष्टी मनापासून केल्या. भरपूर व्यायाम...मनसोक्त खाणे आणि सिनेमा... दोन वर्षांनी, त्याचे त्यानेच ठरवले की, फ्रेंच भाषा शिकायची. आता फ्रेंच भाषेचे क्लासेस घेतो. आणि साईड बाय साईड, Bachelor of Management Studies शिकत आहे. तो त्याच्या पायावर उभा राहील. 4. बायको, कशीबशी BA झाली. लग्न झाल्यावर, जर्मन शिकली. आता जर्मन भाषा, घरबसल्या शिकवते. 5. माझा जिवलग मित्र, काॅपी करून दहावी झाला. 11वीला नापास झाला. पुढे काकांना व्यवसायात मदत केली आणि नंतर स्वतःचा धंदा चालू केला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी, 100% निवृत्ती घेतली. त्यामुळे, ज्याला मनापासून अभ्यास करायचा आहे, त्याच्या साठी शाळा योग्य आहे. आमच्या सारख्या, अभ्यासात रस नसणार्या मंडळींनी, जे पटेल ते शिक्षण घेणे उत्तम. समाजात सगळे लागतात... चपला शिवणारा पण लागतो आणि केस कापणारा पण लागतो...

In reply to by मुक्त विहारि

एकाच शाळेत शिकणारा, एकाच शिक्षकांच्या हाताखालून जाणारा एक विद्यार्थी उत्तम गूण मिळवतो तर दुसरा नापास होतो... एकच एक फूटपट्टी, सजीवांना लागू होत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे...

खेडूत 17/12/2020 - 17:13
अमुक शाळा हवी ही पालकांची गरज आहे, तोच शाळेचा मोठा फायदा आहे.. RTE मधल्या मुलांचा तथाकथित खर्च काढायला फी वाढवावी लागते. Random प्रवेश ही धूळफेक असते. आतून सगळे सेटिंग झालेले असते. चांगली मुले आणि शिक्षक मिळून शाळेला मोठे करतात. एरवी शाळा एकटीच मोठी नसते.

In reply to by खेडूत

स्वतन्त्र 17/12/2020 - 18:48
कोणतीही शाळा वाईट कधीच नसते.एक विद्यार्थी म्हणून आपण ज्या शाळेत जातो ती आपल्याला नक्कीच प्रिय असते. 'सेटिंग' बद्दल हळू हळू सहमत होत आहे. फक्त लोंकांचा फुकट वेळ शाळां प्रशासनाने घालवू नये ! शाळा कोणतीही चालेल पण घराजवळ असावी हीच अपेक्षा आहे. घरापासून २-४ कि मी अंतरावर जवळ पास ५ शाळा आहेत,पण एकही शाळेत अजूनही नंबर लागलेला नाही. लांब राहणाऱ्या पालकांच्या हट्टामुळे जवळच्या मुलांना प्रवेश मिळत नाही अशी परिस्थिती आहे.

जे काही वर्णन वाचलं त्यावरुन ही शाळा तथाकथित ईंग्रजी माध्यम शिकवणारी मिशनरी शाळा असावी. शेवटी आपल्याला सुद्धा जवळच्या दुसऱ्या कुठल्या शाळेत जायचा पर्याय आहेच. असे पालक काहीही झालं तरी आपल्या पाल्याला याच शाळेत घालावं म्हणून अट्टाहास करतात. भरपूर पैसे मोजायला तयार असतात म्हणुनच तर त्यांचे फ़ावते. गंमत म्हणजे आपल्याकडे लोक अश्या " इण्टरनॅशनल " शाळेत मुलांना टाकायला जीवाचा आटापिटा करतात. पण उत्तम ईन्टरनॅशनल शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक पारितोषिक मिळवतो. ते ही अश्या शाळांतील शिक्षक स्पर्धेत असतांना ! धन्य त्या शाळा आणि धन्य ते शिक्षक !

In reply to by सामान्यनागरिक

स्वतन्त्र 17/12/2020 - 18:43
कोणतीही शाळा वाईट कधीच नसते.आणि इंटरनॅशनल स्कूल किंवा अमुक बोर्डाचंही अट्टहास नाहीये. अपेक्षा इतकीच आहे कि शाळा घराजवळ हवी. आणि सादर शाळा हि मिशनरी नसून मराठी लोकांनी चालवलेली शाळा आहे.

In reply to by सामान्यनागरिक

Bhakti 18/12/2020 - 09:54
मला तर मुलीला सध्या online /Offline अभ्यास कर म्हणावच वाटत नाही..२-३ महिने अजून मनसोक्त खेळ म्हणाव वाटत!!पण शाळेत समाजात वावरण्याच बाळकडू मिळत.मित्र मैत्रिणी मिळतात ना! :)

In reply to by सामान्यनागरिक

साहना 18/12/2020 - 12:40
मिशनरी शाळांना RTE लागू होत नाही. RTE च काय पण इतर कुठलाही शिक्षण विषयक कायदा लागू होत नाही. तसेच ह्या शाळा वाट्टेल तो निकष लावून ऍडमिशन देऊ शकतात. त्यामुळे हि शाळा मिशनरी शाळा नाही, हिंदू लोकांनी चालवलेली असावी. > पण उत्तम ईन्टरनॅशनल शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेचा शिक्षक पारितोषिक मिळवतो. ते ही अश्या शाळांतील शिक्षक स्पर्धेत असतांना ! उगाच ठाऊक नसताना लोकांना नवे ठेवू नयेत. एक कुठल्या शिक्षकाला पारितोषिक मिळाले म्हणून सर्वच जिल्हापरिषदेच्या शाळा चांगल्या असतात किंवा सर्वच शिक्षक चांगले असतात असे नाही. तसेच लोकांना उगाच पैसे मोजायची हौस सुद्धा नसते. बहुतेक पालकांना शाळेचा विनाकारण मनस्ताप नको असतो. एक १० हजार जास्त मोजावे लागले असले तरी रांगेत उभे राहा, फॉर्म भर असल्या फंदात पडायचे नसते. पालक त्यामुळे जवळची शाळा, कमी मनस्ताप असलेली शाळा आणि ज्याशाळेंत आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्थरातील मुले जातात अश्या शाळांत मुलांना पाठवतात. सर्व पालक मूर्ख आहेत आणि निव्वळ हौस म्हणून इंटरनॅशनल शाळांना प्राधान्य देतात हा आपला गैरसमज आहे. पालकांना पारितोषिक प्राप्त शिक्षक नको आहेत. शाळा जवळ असावी, प्रवास आणि शालेय वातावरण सुरक्षित असावे, फी परवडणारी असावी आणि काही तरी विद्या मुलांच्या पदरात पदवी इतकीच माफक अपेक्षा असते. बाकी मुलाची बुद्धिमत्ता पाहून नंतर ट्युशन वगैरे लावले जाऊ शकते. बहुतेक वेळा जिल्हा परिषदेच्या शाळा हि अपेक्षा सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. शाळा दूर असते, शिक्षक येत नाहीत, कारभार गलथान असतो, गुन्हेगारी प्रवृत्तीची मुले, शिक्षक आणि पालक असतात, प्रिन्सिपॉल साधी शिस्त सुद्धा ठेवू शकत नाहीत आणि शाळेचे छप्पर पावसांत गळते अशी परिस्थिती असते. RTE कायद्याने शाळा आणि समाज ह्यांचे नाते कायमचे तोडून ठेवले आहे. समजा सदर शाळा लेखकाच्या आजोबानी सुरु केली होती किंवा लेखकाचे स्वतःचे वडील इथे प्रिन्सिपॉल होते किंवा लेखकाने १० वर्षे आधी शाळेला १० लाखांची देणगी दिली होती, तरी सुद्धा शाळेला लेखकाच्या पाल्याला ऍडमिशन देणे कायद्याचे उल्लंघन ठरते. त्यामुळे कुठलाही शहाणा माणूस आजुबाजुंच्या शाळांत आर्थिक किंवा भावनिक गुंतवणूक करायच्या भानगडीत पडत नाही. पण इंटरनॅशनल स्कुल जे बहुतेक वेळा "अल्पसंख्यांक" चालवतात त्यांना RTE लागू होत नाही त्यामुळे इथे अश्या प्रकारची गुंतवणूक फायदेशीर ठरते.

Rajesh188 17/12/2020 - 19:37
शाळेला देणगी ही देणे बंधनकारक आहे पण कायदेशीर मार्गाने नाही आताच्या नियम नुसार. मुल हुशार नसतील तरी चालेल पण पालक सक्षम आहेत का ह्याचा अंदाज घेण्यासाठी पालकांना बोलवले जाते.

चौकटराजा 17/12/2020 - 20:02
माझ्या पालकाना ( मी ६७ पूर्ण आहे )चांगली शाळा वाईट शाळा असे काही पहाण्याचे सुचले नाही ! मुलगा घरी नाही शाळेत कोणत्या तरी यत्तेत शिकत आहे याचे समाधान त्याना होते. इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सान्गतो चांगल्या शाळेत वाईट विद्यार्थी हीअसतात व जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम विधार्थीही असतात !ज्याचात एकलव्य बनण्याची आकांक्षा व पात्रता आहे तो कुठूनही ज्ञान मिळवत जातो. चांगल्या शाळेची फार तर व्याख्या अशी करता येईल जिथे वाचायला भरपूर काही आहे ! उत्तम प्रतोगशाळा आहे व अगदीच फालतू शिक्षक नाहीत ! बाकी इमारत ,मैदान याना काही अर्थ नाही ! एक शंभर टक्के सत्य आहे की वाचनाची आवड,संशोधनाची आवड,पालकांशी संवाद करण्याची आवड ही दैववशात देणगी आहे ! तिचा कुठे मॉल नाही ! माझ्या एका तरूण मित्राने मुलीला शाळेत न पाठवता स्वतः च तिचा विकास करायचा अगदी वेगळ्या पद्धतीने असे ठरवले आहे ! मला हवे ते मला शिकायचे आहे सरकार व राजकीय पक्षाना हवे ते नाही हा खर्‍या शिक्षणाचा गाभा आहे ! न न म य य गणानी मालिनी व्रुत्त होते याचा मला आयुष्यात विकसाच्या सन्दर्भात काही फायदा झाला नाही कारण ते शिक्षण सरकारने माझ्यावर लादलेले होते !

In reply to by चौकटराजा

साहना 18/12/2020 - 12:44
आपल्या काळाची परिस्थिती वेगळी होती. दारिद्र्यांत पिचणाऱ्या देशांत काहीही संधी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे चांगल्या व्यक्ती शिक्षक बनल्या आज काल त्या बुद्धिमत्तेचे लोक अभियंते आणि डॉक्टर होतात. अश्या शाळांत बसायला बाकडा नसेल तर सुद्धा शाळा चालते. त्याशिवाय फक्त काहीच लोक शिक्षण ह्या विषयाला गाम्भीर्यने घेत होते त्यामुळे अश्या लोकांचीच मुले शाळेत जात होती. मेट्रिक होऊन सरकारी नोकरी मिळाली तर बास होते. लिहायला वाचायला आले तर पुरेसे होते आणि शिक्षकाने कानशिलात लावली तर घरी आणखी दोन खायला मिळायच्या. आज काळ बदलला आहे. प्रचंड लोकसंख्येमुळे शिक्षणाला खूप डिमांड आहे आणि वरून प्रचंड सरकारी नियंत्रण ह्यामुळे गुंड किंवा निर्ल्लज किंवा मिशनरी शाळाच आज देशांत शिक्षण देत आहेत. अश्या स्थितीत चांगली शाळा आणि वाईट शाळा हा फरक दुर्दैवाने करावाच लागतो.

In reply to by साहना

चौकटराजा 18/12/2020 - 13:05
चांगली शाळा व वाईट शाळा फरक जरूर करावा पण आपला पाल्य चांगला ,जिज्ञासू ,अभ्यासू , संवेदनशील विद्यार्थी नसेल तर चांगली शाळा ही एक डेड इन्वेस्टमेन्ट आहे हे पक्के ध्यानात असू द्या ! कारण चांगल्या शाळेतील वाईट विद्यार्थ्याचा अनुभव मी स्वतः अगदी जवळून घेतला आहे !!!

In reply to by साहना

चौकटराजा 18/12/2020 - 20:22
वाईट विद्यार्थी हा वाईट चालीचा विद्यार्थी असे मी म्हणालो नाही तो अभ्यासू नसणे , जिज्ञासू नसणे ,सन्वेदन्शील नसणे ,पालकाशी मुक्त संवाद साधणारा नसणे हा माझ्या व्याख्येत वाईट विधार्थी आहे त्यात विद्यार्थीनीही आल्या ! वाईट चालीचा वा चालीची म्हण्जे नक्की कसावा कशी ते कायदा ठरवतोच की ! विद्यार्थी वरील गुण असतील व जरा गबाळा असेल तर तो माझ्या नजरेत उत्तम विद्यार्थीच असेल !

साहना 18/12/2020 - 12:28
मला पडलेले प्रश्न :- > -जर रँडम ऍडमिशन देणार आहात तर पालकांचा वेळ का घालवता ? डायरेक्ट लिस्ट काढून मोकळे का नाही होत ? रँडम लिस्ट काढायला शाळेला अजिबात इंटरेस्ट नसतो. पदरचे पैसे खर्चून शाळा काढायची वर ३०% सीट्स फुकट सरकारला द्यायची. मग त्या ३० सीट्स चा खर्च ७०% मुलांकडून वसूल करायचा असतो. मग हि ७०% मुले गरीब असली तरी मग शाळा चालवायची कशी ? रँडम ऍडमिशनला म्हणून अर्थ नाही पण RTE अंतर्गत हिंदू लोकांची चालवलेल्या शाळांना फक्त रँडम पद्धतीने ऍडमिशन द्यायचा अधिकार आहे. मला वाटते "प्रिन्सिपॉल ऍड्रेस" ह्या गोष्टी कुठला पालक खरोखर सिरीयस आहे हे पाहण्यासाठी करतात आणि नंतर गुपचूप आपल्याला हवे त्याला ऍडमिशन देतात. अर्थांत इथे शाळांची चूक नाही. बिचार्यांना हा देखावा करावाच लागतो. > शाळा लिस्ट काढताना अंतर का लक्षात घेत नाहीत.जवळ राहणाऱ्या मुलांनी लांब शाळेत जायच आणि लांब राहणाऱ्यांना पण दूरच जायच. म्हणजे दोन्ही केसेस मध्ये त्रास आहेच. माझ्या माहितीप्रमाणे शाळा हिंदू लोकांनी चालवली असेल तर असा निकष RTE अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. (का हे विचारू नका). फक्त अंतर ह्या निकषावर दाखल द्यायचा असता तर पालकांनी वाट्टेल तो पत्ता टाकला असता. मग त्या पत्याचे वेरिफिकेशन करायची जबाबदारी शाळेवर आली असती. मिशनरी शाळा आहे तर पहा जवळपास, किमान मनस्ताप तरी वाचेल.

In reply to by साहना

स्वतन्त्र 18/12/2020 - 12:43
ऍड्रेस वेरिफिकेशन साठी शाळेने राहत्या घराची टॅक्स पावती,आधार कार्ड,वीज बिल घेतलेले आहे.त्यामुळे शाळांना वेगळे वेरिफिकेशन करण्याची गरज नसावी !

In reply to by स्वतन्त्र

साहना 18/12/2020 - 13:47
हो पण त्यावरून अंतर काढून सॉर्टींग करायचे असेल तर वेगळा पुरावा लागेल. त्याशिवाय पत्त्याला इतके महत्व असेल तर मग खोटी कागदपत्रे करून देणारे एजेंट लोक सुद्धा आपोआप तयार होतील. बेंगलोर मध्ये हे सर्रास चालू आहे.

स्वतन्त्र 25/12/2020 - 16:51
पुण्याच्या एका कन्नड भाषिक संघाने चालवलेल्या शाळेत जिथे RTE कोटा नसल्यामुळे सीट्स जास्त होते.तिथे ऍडमिशन झालेली आहे.

चलत मुसाफिर 05/01/2021 - 21:16
शाळा केवळ शासनसंचालितच असाव्यात. बारावीपर्यंतचे शिक्षण संपूर्णपणे मोफत व सक्तीचे असावे. खाजगी शाळा, अल्पसंख्य शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा अशा थेरांवर बंदी आणावी. एक सुरुवात म्हणून सर्व सरकारी नोकरांच्या मुलांना जो शालेय शुल्काचा परतावा किंवा शिक्षण भत्ता मिळतो, तो केवळ सरकारी शाळांसाठीच मिळेल असा नियम करावा.

एक मिनिट लेख वाचताना गेला एक महिना दोळ्यासमोर आला.. तुम्ही लिहिलेल्या दोन्ही शाळा कुठ्ल्या ते कळल्या.. माझ्या मुलीला सुद्धा कन्नड सन्घ शाळेमध्ये प्रवेश मिळाला..

1. मला शाळेचा काहीही फायदा झाला नाही. मी दहावी पास झालो ते, वडीलांनी, शेवटचे 15 दिवस शिकवले म्हणून. 2. मोठ्या मुलाला, मी शिकलो त्याच शाळेत शिकायला पाठवले. SSC बोर्ड, अनुदानित शाळा. सेमी इंग्रजी. मुलगा, इंजिनियर झाला आणि सध्या नौकरी करतो. 3. धाकट्या मुलाला, माझ्या सारखीच, शालेय शिक्षणात रस न्हवता.अपेक्षा नसतांना, एका फटक्यात, दहावी पास झाला. नंतर 12वी काॅमर्स पण एका फटक्यात पास झाला. पुढच्या शिक्षणात रस न्हवता. म्हणून 2 वर्ष काहीही केले नाही. फक्त 3 गोष्टी मनापासून केल्या. भरपूर व्यायाम...मनसोक्त खाणे आणि सिनेमा... दोन वर्षांनी, त्याचे त्यानेच ठरवले की, फ्रेंच भाषा शिकायची. आता फ्रेंच भाषेचे क्लासेस घेतो. आणि साईड बाय साईड, Bachelor of Management Studies शिकत आहे. तो त्याच्या पायावर उभा राहील. 4. बायको, कशीबशी BA झाली. लग्न झाल्यावर, जर्मन शिकली. आता जर्मन भाषा, घरबसल्या शिकवते. 5. माझा जिवलग मित्र, काॅपी करून दहावी झाला. 11वीला नापास झाला. पुढे काकांना व्यवसायात मदत केली आणि नंतर स्वतःचा धंदा चालू केला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी, 100% निवृत्ती घेतली. त्यामुळे, ज्याला मनापासून अभ्यास करायचा आहे, त्याच्या साठी शाळा योग्य आहे. आमच्या सारख्या, अभ्यासात रस नसणार्या मंडळींनी, जे पटेल ते शिक्षण घेणे उत्तम. समाजात सगळे लागतात... चपला शिवणारा पण लागतो आणि केस कापणारा पण लागतो...

In reply to by मुक्त विहारि

एकाच शाळेत शिकणारा, एकाच शिक्षकांच्या हाताखालून जाणारा एक विद्यार्थी उत्तम गूण मिळवतो तर दुसरा नापास होतो... एकच एक फूटपट्टी, सजीवांना लागू होत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे...
सध्या २०२१-२२ वर्षासाठी सगळीकडे नर्सरी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे.या वर्षी covid च्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्याच शाळांनी सुदैवाने online प्रवेश प्रक्रियेचा घाट घातला आहे.नाहीतर आदल्यादिवशी पासूनच पालकांनी फॉर्म च्या रांगेत उभे राहावे लगत होते.यंदा माझ्या मुलाचा देखील प्रवेश घ्यायचा असल्यामुळे ह्या अनुभवातून जावे लागत आहे.आणि आत्ता प्रवेश घेतल्यावर १० पर्यंत चिंता नाही त्यामुळे पालक म्हणून देखील प्रवेशा चा गांभीर्याने विचार करत आहे. पुण्यातल्या एका नामांकित शाळेचा माझा अनुभव आणि व्यथा इथे मांडत आहे. शाळेत एकूण १२० जागा भरायच्या होत्या,त्यातल्या ३० जागा आधीपासूनच (RTE - Right to educati

अभ्यास तर्काचा!

उपयोजक ·

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती? ’तर्क हाच मूळी एखादी गोष्ट आहे की नाही, या विषयी शंका उपस्थित करुन काढले जाणारे मत असल्यामुळे तर्काला कोणताही विशिष्ट असा अनुभव नसतो त्यामुळे तर्क चूकतात. ( असे वाटते) २. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का? स्मरणशक्ती आनि तर्क यांचा काहीही संबंध नाही असे वाटते. ते एक अंदाजपंचे क्यालक्युलेशन आहे. ( असे वाटते) ३. एखाद्या विषयातल्या आकलनसंबंधाने "मी ऐकतो आणि विसरुन जातो,मी पाहतो आणि माझ्या लक्षात राहतं,मी करतो आणि मला समजतं" ही चिनी म्हण पुढं केली जाते.यात कितपत तथ्य आहे? या तथ्य आहे. पन्नास पन्नास टक्के ( असे वाटते ) ४...... भावनिकतेचा आणि तर्काचा काहीही संबंध नाही. पण भावनिकतेने घेतलेले निर्णय चूकण्याची शक्यता असते. ५. कॉमनसेन्स.... कॉननसेन्स ही व्यक्तीसापेक्ष अशी सतत निरंतर चालणारी विकासाची प्रक्रिया आहे, तर्क आणि कॉमनसेन्स यात फरक आहे, कॉमनसेन्स हा अनुभवावर आधारित असतो. ( असे वाटते) ६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा? तर्काच्या काही मर्यादा नाही. प्रचंड चूकीच्या निष्कर्षाकडे वाटचाल म्हणजे तर्काचा अतिरेक आहे. ( असे वाटते) ७. केंद्रगामी (Convergent) आणि बहिर्गामी (Divergent) या विचारांच्या अजून दोन उपपध्दती. पास डोक्याचं खोबरं करणारा प्रश्न आहे. ( असे वाटते) ८.स्पर्धा परीक्षांमधे विचारली जाणारी कोडी सोडवणं याचा किती उपयोग होऊ शकतो? फक्त अभ्यास करा, अभ्यासाने यश मिळते. माणूस यशस्वी होतो. (असे वाटते) -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

सोपी प्रश्नपत्रिका काढत चला राव. मिळालेल्या सुटीचा भूगा होऊन जातो. ;) बाय द वे, हे तर्काच्या चर्‍हाटाचं विश्लेषण नक्की करा. खरं तर काही उत्तर दात्यांना प्रश्नावली पाठवून काही निष्कर्ष काढता आले असते. डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, मिपाकर, पडिक मिपाकर, स्त्री, पुरुष, गे, अशा वेगवेगळ्या लोकांना एक प्रश्नावली द्यायला पाहिजे होती. अवांतर : अनाहिता बंद आहे का ? काही भांडकुदळ महिला दिसेनात सध्या. ( संबंधितांनी हलकेच घ्यावे, प्रेमाने आठवण आली इतकाच आशय आहे ) :( -दिलीप बिरुटे (काड्या टाकायचा नाद असलेला)

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती? (१) तर्क करणारा प्रामाणिक असला तर... त्याला मिळालेली माहिती अपूर्ण आणि/अथवा चूक असल्यास आणि/किंवा त्याच्या तर्कपद्धतीत कमी असल्यास तर्काचा निष्कर्ष चुकू शकतो. (२) तर्क करणारा अप्रामाणिक असला तर... बहुतेक वेळेस, तो अगोदर त्याला आवडणारा/सोईचा/त्याचे हितसंबंध राखणारा निष्कर्ष ठरवतो आणि नंतर ...(अ) त्याच्या निष्कर्षाला पूरक असलेले पुरावे फुगवून सांगतो, आणि/किंवा ...(आ) त्याच्या निष्कर्षाला पूरक असलेले कपोलकल्पित पुरावे निर्माण करतो, आणि/किंवा ...(इ) त्याच्या निष्कर्षाला पूरक नसलेले पुरावे हेतूपुर्रसर दुर्लक्षित करतो, आणि/किंवा ...(उ) त्याच्या निष्कर्षाला पूरक नसलेल्या पुराव्यांवरून इतरांचे लक्ष विचलित होईल असे पुरावे/कल्पित कथा/असंबंधीत कथा उगाळत बसतो. थोडक्यात, असा तर्क चूक होता असे भविष्यात सिद्ध झाला तरी, अशी व्यक्ती प्रामाणिकपणाच्या बुरख्याखाली हेतूपुर्सरपणे अप्रामाणिक विचारप्रणाली वापरत असते... त्यामुळे, अशा कृतीतून निघालेल्या निष्कर्षाला चूक म्हणण्यापेक्षा, तो निष्कर्ष काढताना "बनेलपणाची कृती" केली होती असेच म्हणावे लागेल. तुमच्या या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत ! :)

In reply to by उपयोजक

वैयक्तिक समस्येसाठी तर्क वापरताना स्वार्थीपणा नक्कीच केला जाणार नाही. हा भोळेपणाचा विचार आहे असे विनयाने नोंदवत आहे ! :) (ज्यांच्यासठी जग बहुदा भोळसट/विचित्र/तर्कट अश्याप्रकारची शेलकी विशेषणे वापरते असे) काही सन्माननिय अपवाद वगळता, इतर सर्व "तथाकथित तार्किक" कृती वैयक्तिक हितसंबंधांचा (व त्या कृतीने हितसंबंधांवर होणार्‍या बरावाईट परिणामांचा) विचार केल्याशिवाय होत नाही... अर्थातच वैयक्तिक समस्येचाबद्दलचा मनातला प्रामाणिक निष्कर्ष आणि प्रत्यक्षातली कृती यात बराच (कधी कधी जमीनअस्मानाचा) फरक असू शकतो. याची मुख्य कारणे, माणसाचा लोभ आणि भिती (greed and fear) या सर्वावर हावी होणार्‍या भावना आहेत... त्यांच्यावर मात करणे वाटते तितके सोपे नसते. उदा: १. संबंध नसलेल्या परक्याने, स्वत:च्या सुहृदाने किंवा खुद्द स्वतः केलेल्या एकसमान मोठ्या गुन्ह्यात सगळ्यांना समान शिक्षा असावी हा झाला सर्वसामान्य प्रामाणिक तर्क. पण तसे प्रत्यक्षात करावे असे म्हणणारी व्यक्ती फार फार विरळा दिसते, आणि २. तो निष्कर्ष मनात मान्य असला तरी तो उघडपणे अथवा संबधित व्यक्तीच्या तोंडावर बोलून दाखवण्याचे प्रामाणिक धैर्य किती जणांत दिसते ?! केस क्लोज्ड ! ================= बघा, या प्रतिसादात, तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची पूरेपूर काळजी घेण्यासाठी माझे सर्वात पहिले वाक्य, "हा भोळेपणाचा विचार आहे असे विनयाने नोंदवत आहे ! :)" असे साखरेत घोळवून लिहिलेले आहे. प्रत्यक्ष ओळख नसलेल्या, न भेटलेल्या आणि केवळ जालिय व्यवहारातील व्यक्तीशी केलेल्या व्यवहारात जर स्पष्टोक्तीला इतकी मुरड घालण्याची राजकीय अचूकता (political correctness) पाळावी लागते, तर जवळचे/गुंतलेले (वैयक्तिक/सामाजिक/व्यावसायिक) हितसंबंध सांभाळायला, काय काय करावे लागते, हे उलगडून सांगायची गरज आहे काय ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपयोजक 19/02/2018 - 18:59
मुद्दा कळला.हे झालं गुन्हा आणि त्यातून स्वत:कडे कमीत कमी निर्दोषत्व घेणे किंवा समोरच्याला न दुखावता संवाद होण्याच्या दृष्टीने केलेले बदल. पण हे सगळीकडे कसं लागू होईल? म्हणजे समजा मी एक अभियंता/तंत्रज्ञ आहे.एक मशिन बंद पडलेलं आहे.कामे थांबलेली आहेत.आता ते मशिन का बंद पडलंय यासाठी मला तर्क वापरुन बंद पडण्याचं कारण शोधून ते मशिन दुरुस्त कसं होईल यावर विचार करावा लागेल.इथे मला कोणाशीही संवाद साधायचा नाहीये किंवा स्वत:च्या फायद्याचे निष्कर्ष काढूनही उपयोग नाही. ते मशिन दुरुस्त होऊन पुढील काम सुरु होणं माझ्यासाठी महत्वाचं.इथे मला तटस्थपणेच कारण शोधावं लागेल.तरच ते यंत्र दुरुस्त होईल.यंत्रासारख्या निर्जीव वस्तूला 'सांभाळून घेण्याचा' प्रश्नच उद्भवत नाही. जिथे मी कोणाला जबाब द्यायला बांधील नाहीे अशा वैयक्तिक समस्येबाबत मी तटस्थपणे तर्क मांडला तरच मला उत्तर मिळेल आणि समस्यामुक्ती होईल असं वाटत नाही का? यंत्रासारखी निर्जीव वस्तू दुरुस्त करण्यामधे बायस्ड विचार कसा काय होऊ शकतो?

In reply to by उपयोजक

आपल्या चर्चेची दिशा आदर्शवादावर अबलंबून आहे की वास्तववादावर, यावर चर्चेची दिशा ठरेल. मी वास्तव जमेस धरून बोलत आहे, कारण तर्कशास्त्राच्या प्रक्रियेत वास्तवाचा प्रामाणिकपणे उपयोग करण्याला दुसरा पर्याय नसतो. ते मशीन दुरुस्त करण्याची प्रामाणिक इच्छा असण्यापर्यंत ठीक आहे. पण, वास्तवात, त्या घटनेमुळे झालेल्या नुकसानाची तात्विक, नैतीक आणि अर्थिक जबाबदारी कशी टाळता येईल (आणि शक्यतो ती आपल्यापासून दूर आणि शक्य असल्यास दुसर्‍यावर कशी ढकलता येईल) असा न विचार करणारे लोक अत्यंत अल्पसंख्य असतात. दुसर्‍या शब्दांत, चूक स्वतःची असली तरी, केवळ तत्वासाठी ते मान्य करणारे (पक्षी : जगाच्या भाषेत स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड घेणारे) लोक अत्यंत अल्पसंखेने असतात... हे सर्व जगभरचे, सर्वकालीक सत्य आहे. मलासुद्धा, हे सर्व जग आदर्शवादी असावे असे प्रकर्षाने वाटते, पण तरीही त्याचबरोबर, अतीभावनिक न होता (जे तर्काविरुद्ध होईल), "हे जग आदर्शवादी कधीच नव्हते, आतासुद्धा नाही आणि भविष्यातही नसणार", हे सत्यही मान्य करावेच लागते... कारण हे सत्य मूळ मानवी मानसिकतेचा (बेसिक ह्युमन सायकॉलॉजीचा) गुणधर्म आहे. ही लोभ व भिती यावर अवलंबून असणारी मानवी मानसिकता एक दुधारी तलवार आहे... जगातले अनेक मानवी दुर्गुण तिच्यामुळेच आस्तित्वात आले आहेत; पण, तिच्यामुळेच गेली दोन लाख वर्षे, मानव या जगात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तगून राहिला आहे आणि याच मानसिकतेचा परिणाम म्हणून एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत अधिकाधिक विकसित होत गेला आहे. केवळ आदर्शवादी तत्वांचा विचार करून बघायचे झाले तर, सद्या चर्चेत असलेले बँक घोटाळे करणार्‍यांनी "त्यांनी पैशाचा अपहार करून चूक केली" हे सुरुवातीलाच मान्य करायला हवे होते... किंबहुना, तशी अफरातफर करण्याचा विचारही मूळात त्यांच्या मनातही यायला नको होता, नाही का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हरवलेला 20/02/2018 - 07:18
अतिशय तर्कसंगत प्रतिसाद. कारण क्रमांक २ मधील अ, आ, इ आणि उ यांचा प्रत्यय वेळोवेळी मिपा वर चर्चा / प्रतिसाद वाचताना येत असतो.

Nitin Palkar 19/02/2018 - 15:10
कोडी सोडवण्याचा पहिला फायदा म्हणजे मनोरंजन. कोणतंही कोडं सोडवल्याने मनोरंजन नक्कीच होते. धारदार सुरी देखील न वापरता तशीच ठेवली तर ती बोथट होते तसच मेंदूचं असावं, न वापरल्याने तो बठ्ठड होत असावा असं वाटतं. कोडी सोडवत राहिल्याने मेंदू कार्यक्षम राहण्यास मदत होत असावी.

माहितगार 19/02/2018 - 17:14
८) मी व्यक्तीशः भावना प्रधान असण्यापेक्षा तर्क प्रधान होण्या मागे शालेय वयातील स्कॉलरशीप परी़क्षातून घेतले जाणारे बुद्धीमत्त्ता चाचणीचे सराव, गणितातून घेतल्या जाणार्‍या सिद्धतांचे सराव , वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास , ललितेतर सामान्य ज्ञान, अग्रलेख वाचनाची , वाद-विवाद आणि समिक्षणे वाचनाची आवड पण एवढ सगळही पुरेसे नाही, लॅटरल थिंकींग, नाण्याच्या सर्व बाजू पहाण्याची जिज्ञासा , यू अ‍ॅटीट्ञूड आणि मनाचा खुलेपणा स्विकारण्याचा मनोमन प्रयत्न हे ही महत्वाचे असावेत असे वाटते. म्हणजे हे बाकीचे नसेल तर निव्वळ कोडी सोडवणे अंशतः मनोरंजनात्मक अंशतः तर्काचा सराव ठरु शकण्याची शक्यता वाटते. ७) सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने लॉजीक कसे काम करते हे पहाण्याच्या दृष्टीने अरूण जोशींनी त्यांच्या तर्क म्हणजे काय लेखातून मांडलेली 'माहौलीक सत्याची (कि भ्रमाची?) संकल्पना ' परिपूर्ण नाही पण रोचक आहे. तुमच्या शब्दात ती केंद्रगामी पद्धत आहे. जो पर्यंत एखादा भ्रम भंग होत नाही आणि भंग करण्याची आवश्यकता मन स्विकारत नाही तो पर्यंत ते ते भ्रम त्या त्या व्यक्तीसाठी सत्य असतात. एखादा भ्रम भंग झाला तर तेवढ्यापुरते अ‍ॅडस्टमेंट करुन त्याच्या माहौलीक सत्याच्या दुनियेत सर्वसामान्य माणूस जगत असतो. सर्वसाधारण पणे इथे तर्क प्रधानतेपेक्षा भावना प्रधानतेला अधिक मुल्य असते.
असा बहिर्गामी विचार करता येण्यासाठी समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असते.नेमकं तेच काम या पध्दतीत अवघड आहे.काही लोकांना हे जमतं.हे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येण्यासाठी,जमण्यासाठी काय बरं करता येईल?
अंशतः उत्तर क्रमांक ८च्या उत्तरासोबत आलेले असावे. महत्वाचे म्हणजे हे सर्व सरसकट पी हळद आणि हो गोरी असे नक्कीच नसावे, बहुसंख्येने भावना प्रधान मानवास तर्कप्रधान अगदी सहजतेने बनवता आले असते तर मानवी जग कुठल्या कुठे गेले असते. लॅटरल थिंकींगची उदाहरणे सांगता येतात पण संबंधीत सराव ज्या त्या व्यक्तीने स्वतः करावा लागतो. त्या साठी मनाचा खुले पणा सॉलीड प्रमाणात लागतो, फुट सॅलड मध्ये टोमॅटॉ कांद्या सहीत सर्व पर्यायांचा विचार -भावना प्रधान न होता- करुन तर्क पूर्ण पद्धतीने टोमॅटॉ कांदा टाकणे तर्कपूर्ण नाही हे लक्षात घेतले तर लॅटरल थिंकीग आणि तर्कपूर्णता सोबत सोबत पूर्ण जमू शकतात आणि कॉमन सेन्सला खर्‍या अर्थाने पूर्णत्व येते. हि लेव्हल बहुसंख्य भावना प्रधान लोकांना सहज साध्य नसते हे कुठेतरी स्विकारावे लागते. बहुसंख्य लोकांना त्यांच्या माहौलीक भ्रमातून बाहेर काढणारी माहिती सोशल मार्केटींगच्या तत्वाने म्हणजे त्या नव्या माहिती स्विकारण्याने त्याला नेमके काय फायदे आहेत ह्या स्वरुपात द्यावी लागते . अशा पद्धतीने माहितीचे अधिकाधीक वितरण होऊन काळाच्या ओघात समुदायाच्या मनात त्याच्या मौहोलीक सत्याच्या गोळा बेरजेत सहसा अत्यंत सावकाश झिरपते. कार्पोरेट मध्ये जाणीवपूर्वक शक्यतेवढे शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेनिंग्स दिल्या जातात पण कॉर्पोरेट ट्रेनिंग्स मधून नेमकी ट्रेनींग्स ची गरज असलेली नेमकी मंडळी सर्व प्रयत्न करुन निसटताना दिसतात . अशा वस्तुस्थिती स्विकारण्या शिवाय बर्‍याचदा पर्याय नसतो.

माहितगार 19/02/2018 - 17:17
६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा?
चांगला प्रश्न आहे. विचार करुन उत्तर देतो तुर्तास रुमाल टाकून ठेवतो.

माहितगार 19/02/2018 - 17:31
२. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का?(असावी असं मला तरी वाटतं.चुकत असल्यास कृपया गैरसमज दूर करावा!) कारण तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्दे,माहिती असणं आवश्यक असतं.आपण सर्व मुद्दे विचारात घेतलेत की काही मुद्दे विचारात घेतलेलेच नाहीत हे नेमकं कसं कळावं? यावर उपाय काय? तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्यांची किमान तोंड ओळख असणे नक्कीच गरजेचे पण मुख्य म्हणजे नाण्याच्या सर्व बाजू शोधण्याची आणि तपासण्याची जिज्ञासा आणि त्या जिज्ञासेस पूर्ण वाव देईल असा मनाचा खुलेपणा महत्वाचे. माहित असलेल्या बाजूंचे स्मरण यासाठी उपयूक्त असले तरी अत्यूत्तम स्मरणशक्ती तर्क प्रधानतेला नेहमी उपकारक ठरेलच असे सांगता येत नाही काही किंबबहूना बर्‍ञाच वेळेस अपकारक ठरु शकते. स्मरणशक्ती चांगली नसेल तर तर्कपूर्ण विचारावर भर द्यावा लागतो त्या दृष्टीने स्मरण शक्ती अत्यूत्तम नसणे जिज्ञासूपणा आणि मनाचा खुलेपणा असल्यास वरदान ठरते . अत्युत्तम स्मरणशक्ती इतरांनी पुर्वी केलेले तर्कांचे प्रोग्रामींग जसेच्या तसे स्विकारत जाते, त्यातही तर्क असला तरी तो पुर्व्वी कुणीतरी करुन ठेवला आहे आणि तर्क ही गोष्ट पुन्हा पुन्हा घासून पहाण्याची आहे याचे मात्र चांगली स्मरणशक्ती असलेल्यांना चांगलेच विस्मरण होत असू शकते. मला वाटते बाकी प्रश्नांची उत्तरे विचार अभ्यास करुन द्यावी लागतील . त्यासाठी अधिक अवधी घेईन.

उपयोजक 19/02/2018 - 19:10
फक्त एक विनंती की आपल्या मुद्द्यांसोबतच तो मुद्दा स्पष्ट करणारी व्यवहारातील उदाहरणे देऊ शकलात तर अधिक सहज आकलन होईल.

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती? ’तर्क हाच मूळी एखादी गोष्ट आहे की नाही, या विषयी शंका उपस्थित करुन काढले जाणारे मत असल्यामुळे तर्काला कोणताही विशिष्ट असा अनुभव नसतो त्यामुळे तर्क चूकतात. ( असे वाटते) २. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का? स्मरणशक्ती आनि तर्क यांचा काहीही संबंध नाही असे वाटते. ते एक अंदाजपंचे क्यालक्युलेशन आहे. ( असे वाटते) ३. एखाद्या विषयातल्या आकलनसंबंधाने "मी ऐकतो आणि विसरुन जातो,मी पाहतो आणि माझ्या लक्षात राहतं,मी करतो आणि मला समजतं" ही चिनी म्हण पुढं केली जाते.यात कितपत तथ्य आहे? या तथ्य आहे. पन्नास पन्नास टक्के ( असे वाटते ) ४...... भावनिकतेचा आणि तर्काचा काहीही संबंध नाही. पण भावनिकतेने घेतलेले निर्णय चूकण्याची शक्यता असते. ५. कॉमनसेन्स.... कॉननसेन्स ही व्यक्तीसापेक्ष अशी सतत निरंतर चालणारी विकासाची प्रक्रिया आहे, तर्क आणि कॉमनसेन्स यात फरक आहे, कॉमनसेन्स हा अनुभवावर आधारित असतो. ( असे वाटते) ६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा? तर्काच्या काही मर्यादा नाही. प्रचंड चूकीच्या निष्कर्षाकडे वाटचाल म्हणजे तर्काचा अतिरेक आहे. ( असे वाटते) ७. केंद्रगामी (Convergent) आणि बहिर्गामी (Divergent) या विचारांच्या अजून दोन उपपध्दती. पास डोक्याचं खोबरं करणारा प्रश्न आहे. ( असे वाटते) ८.स्पर्धा परीक्षांमधे विचारली जाणारी कोडी सोडवणं याचा किती उपयोग होऊ शकतो? फक्त अभ्यास करा, अभ्यासाने यश मिळते. माणूस यशस्वी होतो. (असे वाटते) -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

सोपी प्रश्नपत्रिका काढत चला राव. मिळालेल्या सुटीचा भूगा होऊन जातो. ;) बाय द वे, हे तर्काच्या चर्‍हाटाचं विश्लेषण नक्की करा. खरं तर काही उत्तर दात्यांना प्रश्नावली पाठवून काही निष्कर्ष काढता आले असते. डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, मिपाकर, पडिक मिपाकर, स्त्री, पुरुष, गे, अशा वेगवेगळ्या लोकांना एक प्रश्नावली द्यायला पाहिजे होती. अवांतर : अनाहिता बंद आहे का ? काही भांडकुदळ महिला दिसेनात सध्या. ( संबंधितांनी हलकेच घ्यावे, प्रेमाने आठवण आली इतकाच आशय आहे ) :( -दिलीप बिरुटे (काड्या टाकायचा नाद असलेला)

१. तर्क केव्हा चुकतो?त्यामागची कारणं कोणती? (१) तर्क करणारा प्रामाणिक असला तर... त्याला मिळालेली माहिती अपूर्ण आणि/अथवा चूक असल्यास आणि/किंवा त्याच्या तर्कपद्धतीत कमी असल्यास तर्काचा निष्कर्ष चुकू शकतो. (२) तर्क करणारा अप्रामाणिक असला तर... बहुतेक वेळेस, तो अगोदर त्याला आवडणारा/सोईचा/त्याचे हितसंबंध राखणारा निष्कर्ष ठरवतो आणि नंतर ...(अ) त्याच्या निष्कर्षाला पूरक असलेले पुरावे फुगवून सांगतो, आणि/किंवा ...(आ) त्याच्या निष्कर्षाला पूरक असलेले कपोलकल्पित पुरावे निर्माण करतो, आणि/किंवा ...(इ) त्याच्या निष्कर्षाला पूरक नसलेले पुरावे हेतूपुर्रसर दुर्लक्षित करतो, आणि/किंवा ...(उ) त्याच्या निष्कर्षाला पूरक नसलेल्या पुराव्यांवरून इतरांचे लक्ष विचलित होईल असे पुरावे/कल्पित कथा/असंबंधीत कथा उगाळत बसतो. थोडक्यात, असा तर्क चूक होता असे भविष्यात सिद्ध झाला तरी, अशी व्यक्ती प्रामाणिकपणाच्या बुरख्याखाली हेतूपुर्सरपणे अप्रामाणिक विचारप्रणाली वापरत असते... त्यामुळे, अशा कृतीतून निघालेल्या निष्कर्षाला चूक म्हणण्यापेक्षा, तो निष्कर्ष काढताना "बनेलपणाची कृती" केली होती असेच म्हणावे लागेल. तुमच्या या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत ! :)

In reply to by उपयोजक

वैयक्तिक समस्येसाठी तर्क वापरताना स्वार्थीपणा नक्कीच केला जाणार नाही. हा भोळेपणाचा विचार आहे असे विनयाने नोंदवत आहे ! :) (ज्यांच्यासठी जग बहुदा भोळसट/विचित्र/तर्कट अश्याप्रकारची शेलकी विशेषणे वापरते असे) काही सन्माननिय अपवाद वगळता, इतर सर्व "तथाकथित तार्किक" कृती वैयक्तिक हितसंबंधांचा (व त्या कृतीने हितसंबंधांवर होणार्‍या बरावाईट परिणामांचा) विचार केल्याशिवाय होत नाही... अर्थातच वैयक्तिक समस्येचाबद्दलचा मनातला प्रामाणिक निष्कर्ष आणि प्रत्यक्षातली कृती यात बराच (कधी कधी जमीनअस्मानाचा) फरक असू शकतो. याची मुख्य कारणे, माणसाचा लोभ आणि भिती (greed and fear) या सर्वावर हावी होणार्‍या भावना आहेत... त्यांच्यावर मात करणे वाटते तितके सोपे नसते. उदा: १. संबंध नसलेल्या परक्याने, स्वत:च्या सुहृदाने किंवा खुद्द स्वतः केलेल्या एकसमान मोठ्या गुन्ह्यात सगळ्यांना समान शिक्षा असावी हा झाला सर्वसामान्य प्रामाणिक तर्क. पण तसे प्रत्यक्षात करावे असे म्हणणारी व्यक्ती फार फार विरळा दिसते, आणि २. तो निष्कर्ष मनात मान्य असला तरी तो उघडपणे अथवा संबधित व्यक्तीच्या तोंडावर बोलून दाखवण्याचे प्रामाणिक धैर्य किती जणांत दिसते ?! केस क्लोज्ड ! ================= बघा, या प्रतिसादात, तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची पूरेपूर काळजी घेण्यासाठी माझे सर्वात पहिले वाक्य, "हा भोळेपणाचा विचार आहे असे विनयाने नोंदवत आहे ! :)" असे साखरेत घोळवून लिहिलेले आहे. प्रत्यक्ष ओळख नसलेल्या, न भेटलेल्या आणि केवळ जालिय व्यवहारातील व्यक्तीशी केलेल्या व्यवहारात जर स्पष्टोक्तीला इतकी मुरड घालण्याची राजकीय अचूकता (political correctness) पाळावी लागते, तर जवळचे/गुंतलेले (वैयक्तिक/सामाजिक/व्यावसायिक) हितसंबंध सांभाळायला, काय काय करावे लागते, हे उलगडून सांगायची गरज आहे काय ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उपयोजक 19/02/2018 - 18:59
मुद्दा कळला.हे झालं गुन्हा आणि त्यातून स्वत:कडे कमीत कमी निर्दोषत्व घेणे किंवा समोरच्याला न दुखावता संवाद होण्याच्या दृष्टीने केलेले बदल. पण हे सगळीकडे कसं लागू होईल? म्हणजे समजा मी एक अभियंता/तंत्रज्ञ आहे.एक मशिन बंद पडलेलं आहे.कामे थांबलेली आहेत.आता ते मशिन का बंद पडलंय यासाठी मला तर्क वापरुन बंद पडण्याचं कारण शोधून ते मशिन दुरुस्त कसं होईल यावर विचार करावा लागेल.इथे मला कोणाशीही संवाद साधायचा नाहीये किंवा स्वत:च्या फायद्याचे निष्कर्ष काढूनही उपयोग नाही. ते मशिन दुरुस्त होऊन पुढील काम सुरु होणं माझ्यासाठी महत्वाचं.इथे मला तटस्थपणेच कारण शोधावं लागेल.तरच ते यंत्र दुरुस्त होईल.यंत्रासारख्या निर्जीव वस्तूला 'सांभाळून घेण्याचा' प्रश्नच उद्भवत नाही. जिथे मी कोणाला जबाब द्यायला बांधील नाहीे अशा वैयक्तिक समस्येबाबत मी तटस्थपणे तर्क मांडला तरच मला उत्तर मिळेल आणि समस्यामुक्ती होईल असं वाटत नाही का? यंत्रासारखी निर्जीव वस्तू दुरुस्त करण्यामधे बायस्ड विचार कसा काय होऊ शकतो?

In reply to by उपयोजक

आपल्या चर्चेची दिशा आदर्शवादावर अबलंबून आहे की वास्तववादावर, यावर चर्चेची दिशा ठरेल. मी वास्तव जमेस धरून बोलत आहे, कारण तर्कशास्त्राच्या प्रक्रियेत वास्तवाचा प्रामाणिकपणे उपयोग करण्याला दुसरा पर्याय नसतो. ते मशीन दुरुस्त करण्याची प्रामाणिक इच्छा असण्यापर्यंत ठीक आहे. पण, वास्तवात, त्या घटनेमुळे झालेल्या नुकसानाची तात्विक, नैतीक आणि अर्थिक जबाबदारी कशी टाळता येईल (आणि शक्यतो ती आपल्यापासून दूर आणि शक्य असल्यास दुसर्‍यावर कशी ढकलता येईल) असा न विचार करणारे लोक अत्यंत अल्पसंख्य असतात. दुसर्‍या शब्दांत, चूक स्वतःची असली तरी, केवळ तत्वासाठी ते मान्य करणारे (पक्षी : जगाच्या भाषेत स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड घेणारे) लोक अत्यंत अल्पसंखेने असतात... हे सर्व जगभरचे, सर्वकालीक सत्य आहे. मलासुद्धा, हे सर्व जग आदर्शवादी असावे असे प्रकर्षाने वाटते, पण तरीही त्याचबरोबर, अतीभावनिक न होता (जे तर्काविरुद्ध होईल), "हे जग आदर्शवादी कधीच नव्हते, आतासुद्धा नाही आणि भविष्यातही नसणार", हे सत्यही मान्य करावेच लागते... कारण हे सत्य मूळ मानवी मानसिकतेचा (बेसिक ह्युमन सायकॉलॉजीचा) गुणधर्म आहे. ही लोभ व भिती यावर अवलंबून असणारी मानवी मानसिकता एक दुधारी तलवार आहे... जगातले अनेक मानवी दुर्गुण तिच्यामुळेच आस्तित्वात आले आहेत; पण, तिच्यामुळेच गेली दोन लाख वर्षे, मानव या जगात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तगून राहिला आहे आणि याच मानसिकतेचा परिणाम म्हणून एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत अधिकाधिक विकसित होत गेला आहे. केवळ आदर्शवादी तत्वांचा विचार करून बघायचे झाले तर, सद्या चर्चेत असलेले बँक घोटाळे करणार्‍यांनी "त्यांनी पैशाचा अपहार करून चूक केली" हे सुरुवातीलाच मान्य करायला हवे होते... किंबहुना, तशी अफरातफर करण्याचा विचारही मूळात त्यांच्या मनातही यायला नको होता, नाही का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हरवलेला 20/02/2018 - 07:18
अतिशय तर्कसंगत प्रतिसाद. कारण क्रमांक २ मधील अ, आ, इ आणि उ यांचा प्रत्यय वेळोवेळी मिपा वर चर्चा / प्रतिसाद वाचताना येत असतो.

Nitin Palkar 19/02/2018 - 15:10
कोडी सोडवण्याचा पहिला फायदा म्हणजे मनोरंजन. कोणतंही कोडं सोडवल्याने मनोरंजन नक्कीच होते. धारदार सुरी देखील न वापरता तशीच ठेवली तर ती बोथट होते तसच मेंदूचं असावं, न वापरल्याने तो बठ्ठड होत असावा असं वाटतं. कोडी सोडवत राहिल्याने मेंदू कार्यक्षम राहण्यास मदत होत असावी.

माहितगार 19/02/2018 - 17:14
८) मी व्यक्तीशः भावना प्रधान असण्यापेक्षा तर्क प्रधान होण्या मागे शालेय वयातील स्कॉलरशीप परी़क्षातून घेतले जाणारे बुद्धीमत्त्ता चाचणीचे सराव, गणितातून घेतल्या जाणार्‍या सिद्धतांचे सराव , वैज्ञानिक दृष्टीकोणाचा विकास , ललितेतर सामान्य ज्ञान, अग्रलेख वाचनाची , वाद-विवाद आणि समिक्षणे वाचनाची आवड पण एवढ सगळही पुरेसे नाही, लॅटरल थिंकींग, नाण्याच्या सर्व बाजू पहाण्याची जिज्ञासा , यू अ‍ॅटीट्ञूड आणि मनाचा खुलेपणा स्विकारण्याचा मनोमन प्रयत्न हे ही महत्वाचे असावेत असे वाटते. म्हणजे हे बाकीचे नसेल तर निव्वळ कोडी सोडवणे अंशतः मनोरंजनात्मक अंशतः तर्काचा सराव ठरु शकण्याची शक्यता वाटते. ७) सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने लॉजीक कसे काम करते हे पहाण्याच्या दृष्टीने अरूण जोशींनी त्यांच्या तर्क म्हणजे काय लेखातून मांडलेली 'माहौलीक सत्याची (कि भ्रमाची?) संकल्पना ' परिपूर्ण नाही पण रोचक आहे. तुमच्या शब्दात ती केंद्रगामी पद्धत आहे. जो पर्यंत एखादा भ्रम भंग होत नाही आणि भंग करण्याची आवश्यकता मन स्विकारत नाही तो पर्यंत ते ते भ्रम त्या त्या व्यक्तीसाठी सत्य असतात. एखादा भ्रम भंग झाला तर तेवढ्यापुरते अ‍ॅडस्टमेंट करुन त्याच्या माहौलीक सत्याच्या दुनियेत सर्वसामान्य माणूस जगत असतो. सर्वसाधारण पणे इथे तर्क प्रधानतेपेक्षा भावना प्रधानतेला अधिक मुल्य असते.
असा बहिर्गामी विचार करता येण्यासाठी समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असते.नेमकं तेच काम या पध्दतीत अवघड आहे.काही लोकांना हे जमतं.हे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येण्यासाठी,जमण्यासाठी काय बरं करता येईल?
अंशतः उत्तर क्रमांक ८च्या उत्तरासोबत आलेले असावे. महत्वाचे म्हणजे हे सर्व सरसकट पी हळद आणि हो गोरी असे नक्कीच नसावे, बहुसंख्येने भावना प्रधान मानवास तर्कप्रधान अगदी सहजतेने बनवता आले असते तर मानवी जग कुठल्या कुठे गेले असते. लॅटरल थिंकींगची उदाहरणे सांगता येतात पण संबंधीत सराव ज्या त्या व्यक्तीने स्वतः करावा लागतो. त्या साठी मनाचा खुले पणा सॉलीड प्रमाणात लागतो, फुट सॅलड मध्ये टोमॅटॉ कांद्या सहीत सर्व पर्यायांचा विचार -भावना प्रधान न होता- करुन तर्क पूर्ण पद्धतीने टोमॅटॉ कांदा टाकणे तर्कपूर्ण नाही हे लक्षात घेतले तर लॅटरल थिंकीग आणि तर्कपूर्णता सोबत सोबत पूर्ण जमू शकतात आणि कॉमन सेन्सला खर्‍या अर्थाने पूर्णत्व येते. हि लेव्हल बहुसंख्य भावना प्रधान लोकांना सहज साध्य नसते हे कुठेतरी स्विकारावे लागते. बहुसंख्य लोकांना त्यांच्या माहौलीक भ्रमातून बाहेर काढणारी माहिती सोशल मार्केटींगच्या तत्वाने म्हणजे त्या नव्या माहिती स्विकारण्याने त्याला नेमके काय फायदे आहेत ह्या स्वरुपात द्यावी लागते . अशा पद्धतीने माहितीचे अधिकाधीक वितरण होऊन काळाच्या ओघात समुदायाच्या मनात त्याच्या मौहोलीक सत्याच्या गोळा बेरजेत सहसा अत्यंत सावकाश झिरपते. कार्पोरेट मध्ये जाणीवपूर्वक शक्यतेवढे शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेनिंग्स दिल्या जातात पण कॉर्पोरेट ट्रेनिंग्स मधून नेमकी ट्रेनींग्स ची गरज असलेली नेमकी मंडळी सर्व प्रयत्न करुन निसटताना दिसतात . अशा वस्तुस्थिती स्विकारण्या शिवाय बर्‍याचदा पर्याय नसतो.

माहितगार 19/02/2018 - 17:17
६. तर्क कुठपर्यंत ताणावा? कुठे थांबावं? तर्काचा अतिरेक कसा अोळखावा?
चांगला प्रश्न आहे. विचार करुन उत्तर देतो तुर्तास रुमाल टाकून ठेवतो.

माहितगार 19/02/2018 - 17:31
२. तर्क आणि त्यातून निष्कर्ष यासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही मुख्य गरज आहे का?(असावी असं मला तरी वाटतं.चुकत असल्यास कृपया गैरसमज दूर करावा!) कारण तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्दे,माहिती असणं आवश्यक असतं.आपण सर्व मुद्दे विचारात घेतलेत की काही मुद्दे विचारात घेतलेलेच नाहीत हे नेमकं कसं कळावं? यावर उपाय काय? तर्कातून निष्कर्ष काढण्यापूर्वी समस्येसंबंधी सर्व मुद्यांची किमान तोंड ओळख असणे नक्कीच गरजेचे पण मुख्य म्हणजे नाण्याच्या सर्व बाजू शोधण्याची आणि तपासण्याची जिज्ञासा आणि त्या जिज्ञासेस पूर्ण वाव देईल असा मनाचा खुलेपणा महत्वाचे. माहित असलेल्या बाजूंचे स्मरण यासाठी उपयूक्त असले तरी अत्यूत्तम स्मरणशक्ती तर्क प्रधानतेला नेहमी उपकारक ठरेलच असे सांगता येत नाही काही किंबबहूना बर्‍ञाच वेळेस अपकारक ठरु शकते. स्मरणशक्ती चांगली नसेल तर तर्कपूर्ण विचारावर भर द्यावा लागतो त्या दृष्टीने स्मरण शक्ती अत्यूत्तम नसणे जिज्ञासूपणा आणि मनाचा खुलेपणा असल्यास वरदान ठरते . अत्युत्तम स्मरणशक्ती इतरांनी पुर्वी केलेले तर्कांचे प्रोग्रामींग जसेच्या तसे स्विकारत जाते, त्यातही तर्क असला तरी तो पुर्व्वी कुणीतरी करुन ठेवला आहे आणि तर्क ही गोष्ट पुन्हा पुन्हा घासून पहाण्याची आहे याचे मात्र चांगली स्मरणशक्ती असलेल्यांना चांगलेच विस्मरण होत असू शकते. मला वाटते बाकी प्रश्नांची उत्तरे विचार अभ्यास करुन द्यावी लागतील . त्यासाठी अधिक अवधी घेईन.

उपयोजक 19/02/2018 - 19:10
फक्त एक विनंती की आपल्या मुद्द्यांसोबतच तो मुद्दा स्पष्ट करणारी व्यवहारातील उदाहरणे देऊ शकलात तर अधिक सहज आकलन होईल.
जीवनात येणार्‍या बर्‍याचशा छोट्या-मोठ्या किचकट समस्या सोडवण्यासाठी तर्क (logic) या विचारपध्दतीचा उपयोग होतो.पण प्रत्येक व्यक्ती याचा उत्तम प्रकारे उपयोग करुन घेण्याइतपत हुशार असेलच नाही.पण उत्तमपैकी तार्किक विचार करता येणं ही काही जन्मजात देणगी नव्हे.बर्‍यापैकी अचूक तर्क कसा करायचा हे व्यवस्थित समजल्यास,थोडा अभ्यास केल्यास,सराव केल्यास यात बर्‍यापैकी प्रगती होऊ शकेल.अनेक समस्या सहज सुटू शकतील.समस्यांनी चिंताग्रस्त होऊन हतबल होण्याऐवजी आणि भावनेच्या भरात काहीवेळा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होण्याऐवजी तर्काने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलंच! याच अनुषंगाने खालील प्रश्न समोर येतात

काही शब्द अनाथ बालकांसाठी

माहीराज ·

माहीराज..... कोणाकडे पाहून जगावं? कोणाला माऊली म्हणावं? कोणाच्या कुशीत शिरून रडावं हसावं? कोणाकडे हट्ट करावा आणि कोणाला सांगावं की भुक लागली आहे,जेवायला दे!... Jenva jenva hya vishayacha vichar karte tenvha tenvha hech sagle prashna manaat yetat.....

माहीराज..... कोणाकडे पाहून जगावं? कोणाला माऊली म्हणावं? कोणाच्या कुशीत शिरून रडावं हसावं? कोणाकडे हट्ट करावा आणि कोणाला सांगावं की भुक लागली आहे,जेवायला दे!... Jenva jenva hya vishayacha vichar karte tenvha tenvha hech sagle prashna manaat yetat.....
कोण पालक या अजाण बालकांचा  .. या दिनकराच्या लख्ख प्रकाशाने उजळलेल्या अथांग सभागृहात अचानक कुट्ट काळोख पडावा असा अंधकार या निरागस जीवाच्या नशीबी का यावा? काय चुक आहे यांची? हे ईश्वरा, परमेश्वरा, ही सारी तुझीच लेकरं तरी एकाच्या मुखात तुप रोटी आणि दुसरा उपाशी पोटी असा भेदभाव का ? आणि कशासाठी? एखाद्या बीजाला अंकुर फूटतो तसा एखादा निरागस जीव जन्माला येतो.पण डोळ्यांना स्वप्न दिसण्याआधीच त्याला कुठल्या तरी कचऱ्याच्या डब्यात किंवा उकिरड्यावर फेकलं जातं, का? आपल्या नाजुक पायावर उभं राहण्याआधीच त्याच्या पायात या फुटक्या नशिबाच्या बेड्या का घातल्या जातात?

कलेवराचा उत्सव?

वेल्लाभट ·

अन्या दातार 06/10/2015 - 18:48
४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद नाही? वेल्ला, तुझ्याशी सहमत आहे. "मला एखादी गोष्ट पटली नाही मग ती अस्तित्वातच नाही" हा भाव खटकला लोकसत्तेतल्या लेखातला.

In reply to by अन्या दातार

मांत्रिक 13/10/2015 - 19:23
मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. वेल्लाभट, तुमचा मुद्दा पटतोय मला. मला देखील अशा टैपचं संगीत आवडतं. अगदी झिंग आणणारं, जग विसरून स्वतःच्या अस्तित्वात खोल खोल घेऊन जाणारं. हां,असं संगीत ऐकताना मी हेडफोनच वापरतो. कुणाला त्रास होऊ नये म्हणून एवढंच. पण मिरवणुका, जत्रा यातलं ढिंच्याक संगीत, त्याच्या तालावर जग विसरुन बेभानपणे नाचणारे लोक्स हे जग देखील मला आवडतं. जरी मी स्वतः असं वागत नसलो तरी. मला तर हा अंतरात्म्याशी संपर्क वाटतो अगदी सूफी पद्धतीने कैलेला.

तर्राट जोकर 06/10/2015 - 19:11
मूळ लेख वाचला, तुमची मते पटली. ते राजीव का संजीव खांडेकर यांना संगीत समजत नाही, माणूसही समजत नाही. काही किरीकीरी करणारी म्हातारी असतात तसले वाटलेत त्यांचे विचार. लोकांना स्वतः सामील नसलेल्या घटना त्रासदायक वाटतात. फूटपाथवर जेव्हा भाजी, सामान घेतो तेव्हा तो कन्विनियंस अस्तो एरवी न्युसन्स असतो. असलेच काही.

दत्ता जोशी 06/10/2015 - 19:14
"पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे." +१००० अजूनही या यादीत भर घालता येईल पण लेखाचा मुद्दा अधोरेखीत करण्यास इतके पुरेसे आहे.

दत्ता जोशी 06/10/2015 - 19:21
अर्थात याच मुद्द्याला बव्हतांशी "सु"शिक्षित, आधुनिक आणि अगदी विज्ञाननिष्ठ पुरोगामी लोकांचा विरोध होईल.... बघाच.. ;-).

सौंदाळा 06/10/2015 - 19:27
आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी सहमत १. पण त्यात संगीत नसते म्हणणे हा तद्दन मुर्खपणा आहे. २. ढोल वाजवणार्‍या मुलींबद्दल लेखकमहाशयांना इतका आकस का वाटतो देव जाणे. ३. पबला नावे ठेवणे पण त्यातच. पबमधला आवाज तुम्हाला तर ऐकु येत नाही ना मग गपगार बसा. विकेंडला नियमीत पबमधे जाणारी कितीतरी सिन्सियर मुले ओळखीची आहेत. ४. मुळ लेखाचे नाव अतिशय हीन दर्जाचे आहे.

बोका-ए-आझम 07/10/2015 - 01:25
यातच सगळं आलं. त्यांनी उन्माद दाखवण्यासाठी गणपती विसर्जनाचीच मिरवणूक निवडली. मोहरमच्या मिरवणुकांमध्येही उन्माद असतो. पण तो सगळ्यातच चूक, विकृत आणि भांडवलशाही कारस्थान पाहणा-या डाव्यांना दिसणं आणि मान्य करणं शक्य नाही. तर्राट जोकर (हा एक बाप आयडीे निवडलाय ) यांच्या प्रतिसादाशी सहमत. बद्धकोष्ठ झालेल्या लोकांना पक्वान्नांचा विचार केला तरी पोटात दुखतं, तशातली गत या डाव्या विचारजंतांची झालेली आहे.

भाकरी 07/10/2015 - 02:52
पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा, "कर्णककर्कश्श आवाजात सार्वजनिक ठीकाणी ढोल बडवणे, त्या आवाजाने बाकिच्याना किती त्रास होतोय याची तमा न बाळगता, आपल्या या ढोल बडवण्याने लोकाना कीती त्रास होतो हे माहीत असून, त्या त्रासापासून सुटका करून घ्यायचा त्यांच्याकडे काहीच उपाय नाहीये हे माहित असूनसुद्धा ध्वनिप्रदूषण करत रहाणे" याबद्दल वेल्लाभट तुझे काय विचार आहेत? ता.क. - आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.

In reply to by भाकरी

वेल्लाभट 07/10/2015 - 11:32
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे. बरं... आता बघा, की मिरवणुका ही आजची गोष्ट नव्हे. मात्र पुणेरी ढोल पथके गेल्या ४-५ वर्षात मशरूम सारखी उगवत गेली आहेत. मग स्पर्धा आली, मोठाल्या सुपा-या आल्या, राजकारणी हस्तक्षेप आले आणि चित्र बिघडत गेलं. याला माझ्या माहितीत उपाय नाही. आपल्याकडे कुठलीही गोष्ट अतिशय वेगाने 'नवीन प्रकार - क्रेझ - ट्रेंड - गरज - व्यसन - उन्माद' या अवस्थेतून ट्रान्झिट होते. ढोलपथकांचं असंच झालंय. कल्पना करा आज जी ५०० च्या वर पथकं आहेत पुण्यामुंबईत, ती ५० असती, तर त्याची मजा 'मजा' राहिली असती. ती सजा झाली नसती. हो की नाही? अती तिथे माती या म्हणीप्रमाणे आता आवाज आणि ढोलपथकांचा अतिरेक होतो आहे त्याला आपल्याकडे इलाज नाही. तरीही. जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे. आणिक एक विचार सांगतो. ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष. मग ठीक आहे की! दारू पिऊन लोळत नाचणा-या लोकांपेक्षा बरंच आहे की ते. आता एक दिवस मला जरा बरं नव्हतं, मी झोपलो होतो. माझं घर वाहत्या रस्त्यावर आहे. अव्याहत वाजणा-या हॉर्नचा रोजच होणारा त्रास त्या दिवशी मला सहन होत नव्हता. काचा लावूनही डोक्यात घण घातल्यासारखे हॉर्न वाजत होते. मी काय म्हणू मग याला? हॉर्न वाजवणारे हे स्वत:ची कसलीतरी भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आकसाने हॉर्न वाजवत तिला बाहेर काढतात.... असं काही? नाही ना! मला नाही वाटत याचा संबंध मानसिक आजाराशी लावला जाण्याइतकं हे भयंकर आहे. मूळ लेखकाचा युक्तिवाद निरर्थक आणि आकसजन्य आहे.

In reply to by वेल्लाभट

भाकरी 07/10/2015 - 17:02
वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद वैयक्तिक वाटेल पण तसं नाहिये. तुझ्यासारख्या आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना त्रास होउनसुद्धा न थांबणार्‍या सगळ्याना आहे. ----------------------------------------------
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.
हे म्हणजे "मला मधुमेह आहे हे मी मान्य करतोच, पण..." असं म्हणत एखाद्या मधुमेह्याने तो जिलब्या का खातोय याबद्दल बोलण्यासारखं आहे! आणि टाळणं कठीण का आहे? आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" सांगितलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल याचा विचार कर.
जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.
ऐकलेलं आहे? म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? आणि मला सांग, हॉस्पिटलपासनं ५० दूर जाउन वाजवलं की हॉस्पिटलपर्यंत आवाज पोचत नाही? आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?
ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष.
खरंच? आणि त्याआधी महिना-दोन महीने सराव चालतो तो बंद खोलीत केला जातो का? एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!

In reply to by भाकरी

वेल्लाभट 07/10/2015 - 17:17
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? हो बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" काहीही हं भाकरी म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? थांबतं. आणि लपवायचा प्रश्नच नाही. आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय? मी मला फसवत नाही. तुम्हीच सांगा काय करायचं. आणखी एक बॅन आणायचा का सरकारने? आवाजाचा, त्रासाचा विचार करूनच १० नंतर वादन बंद इत्यादी नियम आले. ते पाळले जातात (अ‍ॅट लीस्ट मी तरी ते पाळले जाताना बघतो बहुतेकदा). मग आता पुढे जाऊन उत्सवच बंद करावे लागतील नाही का! कारण अनेक गोष्टींचा त्रास होतो उत्सवांमुळे. आपला धर्म आपल्या घरी असा नियम करावा लागेल. त्यातही आक्षेप घेतीलच लोकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर म्हणा. एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!! अगेन, व्हेरी फनी. प्रतिसाद वैयक्तिक नव्हता तशी ही उत्तरंही वैयक्तिक नाहीत हे नमूद करू इच्छितो.

In reply to by भाकरी

वेल्लाभट 07/10/2015 - 11:33
आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.
तुम्हीच म्हणालात !

मदनबाण 07/10/2015 - 03:26
मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे संगीत नसावे या आशयाशी सहमत आहे, तसेच आपलेही मतप्रदर्शन योग्य वाटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

अंतरा आनंद 07/10/2015 - 09:48
मूळ लेखाचा आशय समजून न घेता केलेला प्रतिवाद आहे. स्रियांचा लेखात वारंवार उल्लेख आहे असं नाही वाटलं. मुलींनी ढोल वाजवणे चांगले का वाईट हा मुद्दा नाहीय तर या चुकीच्या प्रकारात मुलीही हिरीरीने का सहभागी होतात याचं माफक आश्चर्य आणि माफक मीमांसा आहे. स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्रियांवर पुढच्या पिढीची असलेली जबाबदारी याचा मेळ घालणं किती कठीण असतं हे एका वयात आलेल्या मुलीची (आतापर्यंत तरी स्वतंत्र विचारांची) आई म्हणून मी नक्की सांगू शकते. बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. अर्थात दोन्ही लेखांचा हा विषय नाहीच फक्त प्रतिवादात आणि इतर या प्रतिसादांत या मुद्द्याला अवाजवी महत्व दिलय म्हणून हे आलं. आता मूळ लेखावर... छातीत धडधड होईल एवढा प्रचंड आवाज करणारी ही ढोल पथके नुसता सराव करत असतानाही तिथून जाणं नको वाटतं तर फटाके, गाणी आणि ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज सहन होत नाही. पूर्वीच्या मिरवणूकाही पाहील्यात पण हा आवाज जास्त प्रचंड वाटतो. त्याचा उदो उदो करणं हे समजण्यापलीकडचं आहे. पण समजून घेता येइल का? याचा विचार मूळ लेखात केला आहे असं मला वाटतं ’स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे’ हे वाक्य विचित्र वाटतय ते लेखाच्या शब्द मर्यादेमुळे. लिंग हा शब्द शारिरिक अवयव म्हणून नाही तर एक मानसिक अवस्थेचं वर्णन म्हणून वापरलाय. सध्या प्रत्येकजण आपल्या क्षमता आभाळाला भिडतात या जाणिवेत मश्गूल असतो. सेल्फ-हेल्प बुक्स पासून अनेकानेक गुरुंपर्यंत हेच सांगत असतात. पण वास्तवाला भिडताना आपली कुवत नीटच कळत जाते. पण समाधान न मानता पुढे चला असं सध्याचं ब्रीदवाक्य आहे आणि काही प्रमाणात नाईलाजही. मग मनाला आलेली मरगळ, थकवा अश्या उन्मादी प्रकारात जिरवून टाकायचा. ही ईच्छा, सर्वाधिकार गाजवण्याची, मनमुक्त वागण्याची ईच्छा म्हणजेच "नसलेलं लिंग".
त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच.
कुमारजी किंवा शास्त्रिय संगीत ऐकून "हे काय रडं लावलय" म्हणणारे पाहिलेत, त्यांना कानात कापूस घालून त्यापासून स्वत:ला वाचवता येतं पण ज्यांना ढोल ताश्यांनी वैताग येतो त्यांना "आपण बहिरेच असतो तर बरं झालं असतं" असं वाटतं. कृपया, शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये.
निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे.
हे वाक्य पटलं पण हेच खांडेकरांच्या लेखाचं सार आहे. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार. तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्हाला त्याची सवय झालीय एवढंच म्हणावं लागेल आणि तेही प्रचंड खेदाने. त्याबाबतीत एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.

In reply to by अंतरा आनंद

वेल्लाभट 07/10/2015 - 11:45
ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार.
वाह. यावर मला काहीच म्हणायचं नाही. नो कमेंट्स.
मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.
हेही अतर्क्य आहे. मीही असं एक जिम लावलं होतं. तिथले 'सर' नावाचे एक वयस्कर गृहस्थ गाणी लावायला बंदी करायचे. लावलाच तर येऊन आवाज कमी करून टाकायचे एकदम. सोडलं मी ते जिम. बाहेरून गाण्यांचा ताल आत ओतल्याशिवाय मला व्हिगरसली वर्काउट करता यायचा नाही. माय फॉल्ट. काहीजण तरीही संथपणे बेंचप्रेस करताना अंतर्मुख होत असंत.
शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये
मी केलीच नाही. मी म्हटलं की कुणाला कुमारांची ती रचना ऐकून मंत्रमुग्ध होता येत असेल तर कुणी ढोल वाजवून होत असेल. चूक कुणीच नाही. आर डी बर्मन आले तेंव्हाही सेहगल ची गाणी कशी.... आणि ही आताची.. ढॅणढॅण नुसती. असं म्हणणारे लोक होते. माफ करा पण हा जो प्रकार आहे ना, तो चूक आहे. काळानुसार संगीत बदलत जातं, सगळंच बदलत जातं. असो. आणि काहीच म्हणायचं नाही. आपल्या मतांचा आदर आहे.

In reply to by अंतरा आनंद

+१०००० संपूर्ण प्रतिसाद अत्यंत योग्य आणि मुद्देसुद आहे 100% पटला जस्तित आवाज़ करण्याच समर्थन शक्यच नाही , ढोल पथक किंवा डॉल्बी किंवा अन्य कुठलही उच्च आवाज़ हे वाईटच !!!

अनुप ढेरे 07/10/2015 - 10:50
पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे.
यात काय ओंगळवाणं आहे? संगीतावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट 07/10/2015 - 11:48
उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 07/10/2015 - 12:19
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सगळ्याच पब्ज मध्ये नसते....आणि पब मध्ये या गोष्टी पब्जवालेच आणून देतात असा चुकीचा समज होउ शकतो वरील वाक्यातून...तसे बघायला गेलो तर ठाण्यात कितीतरी शाळांच्या आसपासच एम्डी पावडर मिळते असे ऐकून आहे आणि यात टिपिकल मराठी शाळांपासून हायफाय कॉन्व्हेंटपर्यंत सगळ्या शाळांची नावे ऐकून आहे

In reply to by वेल्लाभट

अनुप ढेरे 07/10/2015 - 12:28
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का? चांगल्या कंपनीबरोबर नाचणं यात मजा येते. एखाददोन घोट घेऊनपण. ती मजा घेण्यात काहीही गैर नाही.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट 07/10/2015 - 14:35
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?
टोकाचा निष्कर्ष. असो.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 07/10/2015 - 14:40
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सुध्धा टोकाचे नाही वाटत :)

लेखावर प्रतिक्रिया देतना ध्वनीप्रदुषणाविषयी मत देणे सोयिस्कर रितिने टाळले आहे. कदाचित लेखक स्वतः ढोल पथकात आहेत म्हणून असावे. पण ज्याला हा त्रास सहन करवा लागतो त्याच्या भावना कोण समजावून घेणार? दुसरा मुद्दा म्हणजे आवाजाची पातळी ही कायदेशीर मर्यादेपेक्षा खूपच आधिक असते. (आधिक्रुत मर्यादा ६० डेसिबेल पण आवाज असतो १०० डेसिबेल वर तेही लोग स्केलवर). सन्गीताचा आस्वाद घेताना कायदाही पाळावा. यावर लेखकाने मत मान्डावे... (अर्थात मोहर्रम / बान्गेचा आवाज हे नेहमीचे मुद्दे सोडून काही असेल तर..) आवाज प्रदूषणाला कन्टाळलेला व सर्व कायदेशीर मार्गाने अजुनही असफल प्रयत्न करणारा एक सामान्य मानव... (अक्षराला हसू नये)

सतिश गावडे 07/10/2015 - 12:42
माझे घर नदीकाठाला आहे. जुलैच्या मध्यापासून माझ्या घरापासून जवळच दोन ठिकाणी ढोलपथकांचा सराव चालू होतो. रोज संध्याकाळी सहा - साडे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे ढोलपथक प्रचंड मोठया आवाजात ढोल बडवत असतात. अगदी नकोसे होते या वेळी घरात बसणे. याचा लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. ढोल बडवणारांना आणि त्याचा पुरस्कार करणारांना काय त्याचे. उन्मादी अवस्थेत हे त्यांच्यापर्यंत पोहचत नसणार.

तर्राट जोकर 07/10/2015 - 12:54
---- सरावामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सहमत ---- साधारण दोन-तीन महिने हा त्रास असतो. यापेक्षा बंदीस्त, वस्तीपासून दूर जागी सराव केला तर लोकांना त्रास होणार नाही तसेच सतत ऐकून जे अप्रुप नाहीसे होते ते होणार नाही. आजकालचे ढोल हे फक्त आवाज करतात, जो चामड्याच्या ढोलात आहे तसा खरा नाद नाहिय्ये. अनुभवलेल्यांना माहित असेल ते. पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठेने परत आणले तर सगळे सुखी होतील.

दत्ता जोशी 07/10/2015 - 13:28
उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि प्रकृतीला घातक अशा आवाजाच्या पातळीचे कोणतेही समर्थन नाही. उलट या वर्षी ध्वनिक्षेपक आणि ढोल पथकाच्या आवाजी पातळीवर खूप कडक निर्बंध घातल्याचे ( आणि पाळल्याचे हि वाचले आणि ऐकले). अनेक जुन्या प्रसिद्ध ढोल पथकांनी आपल्या पथकांचा आकार आणि वाद्यांची संख्या कमी केल्याचे वाचले. विशेषतः टोल ( gong ) वर बंदी घातली आहे हे स्वागतार्ह आहे. मिरवणुकीला लागणारा वेळ आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च इत्यादी गोष्टी अजूनही कमी करता येईल. अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य. अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य. बाय द वे, बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.( खोचक प्रश्न नव्हे.) अंतरा ताई, बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. मान्य.मुलगी काय किंवा मुलगा काय, अपरीपक्व अशा त्या वयातही आपली सीमारेषा, मर्यादा आणि जबाबदारी समजून वागण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. ( आणि तुम्ही ते देत असणार यात शंका नाही) आजच्या जमान्यात मुला- मुलींवर अनावश्यक आणि अतिरिक्त बंधने घालणे शक्य नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर मुलींना आपल्या या संस्कार ( शिकवणूक) आणि त्यांच्या वर टाकलेल्या विशावासाच्या भरवशावरच आजच्या जगात वावरू द्यावे लागते. मुले किंवा मुली एकदा बाहेरच्या जगात मिसळली कि पालक म्हणून आपले व्यक्तिगत नियंत्रण कितपत राहते? ढोल पथका सारख्या (किमान) सांस्कृतिक, सामाजिक सहभागापेक्षा कितीतरी धोकादायक चाली रिती आज समाजात मान्यता आणि मूळ धरत आहेत, नको त्या सुविधा /गोष्टींची रेलचेल आहे. . सकाळ मधल्या ढोल वाजवणाऱ्या मुली बघून मला तरी त्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही. ज्यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही. ढोल पथकात भाग घेणाऱ्या मुली बेजबादारपणे वागून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात असे तुम्हाला म्हणयचे नव्हते असे मी गृहीत धरतो. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार अरे बापरे ! ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.( माझ्या दृष्टीने तरी हे जिवंतपणाचे लक्षण आहे) आणि अशी उर्जा जर योग्य रीतीने खर्ची घातली गेली नाही तर ती नको त्या मार्गाने खर्ची जावू शकते. समूह किंवा समाजाच्या जिवंतपणाची लक्षणे काय याची यादी केली तर काय काय आणि कोण कोणते मुद्दे येतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात त्यातले उपयोगी/ निरुपयोगी, विधायक/अविधायक कोणते आणि कोणते नाहीत यावर जोरदार मतभेदही होतील.

In reply to by दत्ता जोशी

सतिश गावडे 07/10/2015 - 13:39
अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य.
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. आता मी घरीच बसलोय. अगदी निरव शांतता आहे. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांच्या बोलण्याचा आवाज, एखाद-दुसर्‍या कारचा किंवा बाईकचा आवाज आणि नदीपात्रातील झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट एव्हढाच काय तो आवाज ऐकू येत आहे. सरावाचे दोन अडीच महिने याच ठिकाणी काय होते हे मी वर लिहिलेच आहे.
अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.
+१

In reply to by दत्ता जोशी

अंतरा आनंद 07/10/2015 - 14:38
बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.
पण तिथे न जाणे हा पर्याय मला उपलब्ध असतो. या रस्त्यांवर चालणार्^या मिरवणूकांमध्ये तो नाही.
ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.
नक्कीच. मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का? माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला तर मारुन घ्याल काय? मग शांतताप्रेमींनी हा तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांच्या उर्जेला वाट मिळावी म्हेणून सहन करावा का? "तोंड दाबून बुक्क्यांचा... " असं म्हणायचं कारण की कोणी मारलं तर जाउन तक्रार करु शकतो, पण या आवाजाबद्द्ल तक्रार करणं फार महागात पडतं (अर्थात यात ढोल ताशे पथकांचा आणि वाजवणार्^याचा दोष नाही.)

In reply to by दत्ता जोशी

वेल्लाभट 07/10/2015 - 14:39
अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच
तो उन्माद नसतो हो.... उन्माद ढोलाच्या वर्षातील काही दिवस होणा-या आवाजाचा असतो.

सर्वसाक्षी 07/10/2015 - 13:46
मोठा आवाज मलाही अस्वस्थ करतो. अनेकदा सुशिक्षित, उच्चभ्रु लोक राहात असलेल्या संकुलातही अती मोठ्या आवाजात गाणी लावणारे महाभाग आढळतात, सार्वजानिक कार्यक्रमात आपल्याच सह रहिवासींना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. वर 'एकच दिवस कार्यक्रम असतो, एक दिवस सहन करायला काय हरकत आहे?' असा दुराग्रहही असतो. कोणाला काय प्रकारचे संगीत आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र आपली आवड पुरवताना भान ठेवणे आवश्यक आहे. आपली हौस इतरांना उपद्रव ठरु नये. पबमध्ये आवाजबंद दाराआड कर्कश्श संगीत ऐकणारे परवड्ले. अनेकदा अशा मिरवणुका पाहताना मला असा प्रश्न पडायचा की ज्यांना हजार दोन हजार ही खूप मोठी रक्कम आहे असे लोक गणपती म्हणा देवी म्हणा अशा मिरवणुकी, वाजंत्री यावर आवाक्याबाहेरचा खरच का करतात? त्याच पैशात ते अन्य आवश्यक गरज भागवु शकतात. मग असे का? बहुधा ते असा विचार करत असावेत की हजार दोन हजार आयुष्याला पुरणार नाहीतच पण निदान या मिरवणुकीच्या बेहोषीत ते काही काळ तरी स्वत:चे दु:ख-दारिद्र्य, समस्या हे सगळं विसरुन जातात आणि त्यांना नवी उर्जा, नवी उमेद मिळते. बहुधा हा उन्माद काही व्यक्तिंना आवश्यक असावा. दुर्दैवाने समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत वरात काढुन फटाके फोडणारे असेच. जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.

प्यारे१ 07/10/2015 - 14:00
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/sandip/articleshow/49249967.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/dolby-crime/articleshow/49235349.cms

In reply to by धोणी

हताश व्हायला होते हे असले पाहून. पुण्यात पूर्वी फक्त द्यानप्रबोधिनी काय ते करत होती. शिवाय प्रत्येक मंडळाचे असे स्वतःचे काही खास ताल असत. आता नुसता भुगा झालाय सगळ्याचा. तारतम्य आणि सामाजिक भान सुटल्याची लक्षणे आहेत. कायदा असला तरी तो सगळ्यांच सारखा नाही आणि अंमलबजावणी करण्याची धमक ना पोलीसामध्ये आहे ना सरकारमध्ये आहे. मशिदी वरचे भोंगे आणि त्याला प्रत्युतर म्हणून पाहटे चालू होणार्या आरत्या हा तद्दन मुर्खपण आहे. पण एकाला शिक्षा होत नाही म्हणून मला का व्हावी असला प्रकार आहे. शिक्षित मंडळी पण उगाचच ढोलाचे कौतुक करतायत हे पाहून वैशम्य वाटले. खरे म्हणजे २ दिवस कायदा राजरोसपणे धाब्यावर बसवता येतो हे सगळ्यांना माहिती आहे बाकी काही नाही. त्यामुळे कायद्याची भीती नाही आणि मग राहतो काय तर उन्माद. तो उन्माद नुसता नसून उन्मत्तपण आहे हे कळत नाहीये किंवा कळून घेण्याची इच्छा नाहीये. पबवाले तुम्हाला त्रास देत नाही आणि तिथे जाने ऐच्छिक आहे इतकेही कळू नये काय? का तिथे आपल्याला जायला मिळत नाही किंवा योग्य वा चुकीच्या संस्कारमुळे जावेसे वाटते पण जाता येत नाही म्हणून असलेला राग असा बाहेर काढतायत?

राही 07/10/2015 - 15:05
शिवाय आता मुंबईत बाप्पांच्या आगमनसमयीसुद्धा मिरवणुका निघतात. तेव्हाही ढोलपथके दिसू लागली आहेत. शिवाय या मिरवणुका एकाच दिवशी नसतात. साधारण जन्माष्टमीपासून मूर्ती मंडपस्थानी आणल्या जातात. त्यामुळे पुढचे आठ-दहा दिवस कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक निघतच असते. याही मिरवणुका तशाच वेळकाढू, उन्मादी आणि आवाजी असतात. रस्ते अडवून आणि वाहतूकनियंत्रणाची जबाबदारी त्यातल्याच चार टग्या पोरांच्या हाती सोपवून पोलिस निवांत उभे असतात. त्यांना तसेच उभे राहाणे भाग असते. त्या टग्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल/होते हे सांगण्याची जरूर नाही.

दत्ता जोशी 07/10/2015 - 15:34
मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का अनेक आहेत कि. पण हा हे सुधा एक सेलेब्रेशन आहे ना! अतिरेक नको, दुसर्यांना त्रास होईल हे ना पाहणे गरजेचे हे मान्य. पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही. "माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला "... काय च्या काय.. तुमचा तर्क वाचून असंच वाटायला लागलाय मला. असुदे असुदे. मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.

दत्ता जोशी 07/10/2015 - 15:44
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. काहीही. म्हणून अशा ठिकाणी जास्ती आवाज नको असा लिहिलं आहे. बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.

अंतरा आनंद 07/10/2015 - 16:01
मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.
हेच ना. त्या आवाजात कोणाचेच मुद्दे कोणापर्यंत पोहोचत नाहीत.
पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.
मला आवडत नाही म्हणून नाही तर मलाच नाही अनेकांना प्रचंड त्रास होतो म्हणून.

सुनील 07/10/2015 - 16:04
बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही
हे अनावश्यक महापुरुष कोणते???

दत्ता जोशी 07/10/2015 - 16:20
"बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही." बाकी महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या अनावश्यक स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही. "अनावश्यक महापुरुष" नाही.

In reply to by तर्राट जोकर

अंतरा आनंद 07/10/2015 - 16:30
अहो, ते स्पीकरला अनावश्यक म्हणतायत तर तुम्ही का महापुरुषांच्या अनावश्यकतेवर घसरताय.(त्यानिमित्याने मोठ्या आवाजाला ते गोंगाट म्हणालेत हे ही नसे थोडके). आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?

बॅटमॅन 07/10/2015 - 16:59
लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी 07/10/2015 - 17:15
किती गडबड ओ मिरजकर ? ...वाचा कि जरा .. डॉल्बी काय, महापुरुष काय, सर्दी, खोकला काय, डॉक्टर काय , महापुरुष काय? विषय काय आहे माहिती आहे का? का परत एकदा एकदम बाबरी मशीद?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन 07/10/2015 - 17:46
वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ. घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली अशा आविर्भावात असणार्‍यांना काय त्याचे? द्या, अजून अभिनिवेशपूर्ण प्रतिसाद द्या आणि निव्वळ समोरचे गप्प झाले म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशा उन्मादात रहा. शुभेच्छा.

दत्ता जोशी 07/10/2015 - 17:07
अहो ताई, आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला? शांतपणे माझी ती पोस्ट संपूर्ण एकदा वाचा आणि काय लिहिलंय ते समजतंय का बघा. याउप्पर तुमची मर्जी. चालू दे तुमचं.

दत्ता जोशी 07/10/2015 - 17:59
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " विषय काय लिहिताय काय! वर सगळं वाचलं म्हणताय! मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते. काही माहिती नसताना काही संबंध नसतांना कशाला मध्ये पडता उगाच? का हौस आहे?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन 07/10/2015 - 18:02
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.
हे लिहून आपल्या रोचक विचारांचे जाहीर प्रदर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून.

In reply to by दत्ता जोशी

राही 07/10/2015 - 18:19
सभासदांना प्रतिसाद देण्याचा हक्क नाहीय की काय मिपावर? कशाला मध्ये पडताय म्हणजे काय?

दत्ता जोशी 07/10/2015 - 18:10
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत. काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी 07/10/2015 - 18:34
विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि. पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन 07/10/2015 - 19:26
माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते. बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)

काळा पहाड 07/10/2015 - 20:57
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन 07/10/2015 - 21:45
त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.

In reply to by काळा पहाड

नीलमोहर 07/10/2015 - 22:18
+१११११११११११११११११११११११११११ हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?

In reply to by नीलमोहर

अभ्या.. 08/10/2015 - 00:37
ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर. आवडले. काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते. तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट. मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.

In reply to by जातवेद

नाखु 16/09/2018 - 20:52
पहाडी आवाजात कडकड झालाय? सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु. इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले. त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.

या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का! कावळा लागला थुईथुई नाच करू तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची... ...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो... धन्यवाद!

ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला. एकदम सही

In reply to by दिवाकर कुलकर्णी

सह्यमित्र 08/10/2015 - 13:44
एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम.
ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त

रेवती 08/10/2015 - 02:24
माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्‍यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून? जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे. मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्‍यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते. पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.

In reply to by रेवती

भाकरी 08/10/2015 - 04:51
वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन 08/10/2015 - 12:27
वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.

तर्राट जोकर 08/10/2015 - 08:38
इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?

तर्राट जोकर 08/10/2015 - 10:09
म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---

In reply to by तर्राट जोकर

रेवती 08/10/2015 - 19:25
घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.

In reply to by रेवती

तर्राट जोकर 08/10/2015 - 19:37
तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.

वेल्लाभट 08/10/2015 - 14:37
एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं. आणि हा १०० वा प्रतिसाद. च्यामारी फुल टू उन्माद !

In reply to by वेल्लाभट

प्यारे१ 08/10/2015 - 14:40
संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो! एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये. एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

भीमराव 08/10/2015 - 15:58
पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो. ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत. किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच. हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे. का? काय म्हायत।

पैसा 08/10/2015 - 16:16
त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.

In reply to by पैसा

वेल्लाभट 08/10/2015 - 16:54
हे इनडोअर चांगलं वाटेल तै. भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको? हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही. रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.

In reply to by वेल्लाभट

पैसा 08/10/2015 - 19:41
माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार. राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे. आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.

चतुरंग 08/10/2015 - 17:52
खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच. तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो. सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल. अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.

In reply to by चतुरंग

प्यारे१ 08/10/2015 - 18:17
>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. फारच आशावादी ब्वा तुम्ही! (उपरोधानं लिहीतोय)

In reply to by चतुरंग

काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

In reply to by चैतन्य ईन्या

वेल्लाभट 08/10/2015 - 23:00
ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.
प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन
तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.

In reply to by चतुरंग

हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...

_मनश्री_ 08/10/2015 - 20:11
त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव एखाद्याचा जीव गेला तरी चालेल , पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात

In reply to by वेल्लाभट

ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी! ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल. तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला. म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली! तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात... कावळा लागला थुईथुई नाच करू आपण मोर आहोत असंच मनात समजून कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची! माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी! डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप! त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या! - कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____ बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून! धन्यवाद! Sandy

टवाळ कार्टा 09/10/2015 - 10:46
संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 09/10/2015 - 11:05
हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही. त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे. मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे. माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 09/10/2015 - 14:27
आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा 09/10/2015 - 15:44
मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत. तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.

कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे .. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ... आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ... परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!

श्रीगुरुजी 09/10/2015 - 13:55
"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे. सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत. खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.

धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते. त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो. गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो. टीप : ३०० होतील ना आता ?

In reply to by धर्मराजमुटके

तर्राट जोकर 10/10/2015 - 16:37
नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.
जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...

मोदक 13/10/2015 - 12:18
वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा. माझा एक जेन्युईन प्रश्न, तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार?? १९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते. सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते. इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत. तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.

In reply to by मोदक

वेल्लाभट 13/10/2015 - 13:42
व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी. मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी http://www.misalpav.com/comment/752417 या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना. सो; तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा. आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)

In reply to by वेल्लाभट

रेवती 13/10/2015 - 18:00
तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?

In reply to by रेवती

प्यारे१ 13/10/2015 - 18:05
कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय???? मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा. मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;) कळावे, आ. न. प्यारे पैलवान

In reply to by मोदक

अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर.. आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 13/10/2015 - 14:28
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना
मस्त. आवडले. हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 13/10/2015 - 15:07
मले काय ठावे बाबा.. तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.

अन्या दातार 06/10/2015 - 18:48
४३४ वाचने, आणि एकपण प्रतिसाद नाही? वेल्ला, तुझ्याशी सहमत आहे. "मला एखादी गोष्ट पटली नाही मग ती अस्तित्वातच नाही" हा भाव खटकला लोकसत्तेतल्या लेखातला.

In reply to by अन्या दातार

मांत्रिक 13/10/2015 - 19:23
मुद्दामच इथे जोडतोय प्रतिसाद. वेल्लाभट, तुमचा मुद्दा पटतोय मला. मला देखील अशा टैपचं संगीत आवडतं. अगदी झिंग आणणारं, जग विसरून स्वतःच्या अस्तित्वात खोल खोल घेऊन जाणारं. हां,असं संगीत ऐकताना मी हेडफोनच वापरतो. कुणाला त्रास होऊ नये म्हणून एवढंच. पण मिरवणुका, जत्रा यातलं ढिंच्याक संगीत, त्याच्या तालावर जग विसरुन बेभानपणे नाचणारे लोक्स हे जग देखील मला आवडतं. जरी मी स्वतः असं वागत नसलो तरी. मला तर हा अंतरात्म्याशी संपर्क वाटतो अगदी सूफी पद्धतीने कैलेला.

तर्राट जोकर 06/10/2015 - 19:11
मूळ लेख वाचला, तुमची मते पटली. ते राजीव का संजीव खांडेकर यांना संगीत समजत नाही, माणूसही समजत नाही. काही किरीकीरी करणारी म्हातारी असतात तसले वाटलेत त्यांचे विचार. लोकांना स्वतः सामील नसलेल्या घटना त्रासदायक वाटतात. फूटपाथवर जेव्हा भाजी, सामान घेतो तेव्हा तो कन्विनियंस अस्तो एरवी न्युसन्स असतो. असलेच काही.

दत्ता जोशी 06/10/2015 - 19:14
"पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे." +१००० अजूनही या यादीत भर घालता येईल पण लेखाचा मुद्दा अधोरेखीत करण्यास इतके पुरेसे आहे.

दत्ता जोशी 06/10/2015 - 19:21
अर्थात याच मुद्द्याला बव्हतांशी "सु"शिक्षित, आधुनिक आणि अगदी विज्ञाननिष्ठ पुरोगामी लोकांचा विरोध होईल.... बघाच.. ;-).

सौंदाळा 06/10/2015 - 19:27
आवाजाच्या बाबतीत मुळ लेखकाशी सहमत १. पण त्यात संगीत नसते म्हणणे हा तद्दन मुर्खपणा आहे. २. ढोल वाजवणार्‍या मुलींबद्दल लेखकमहाशयांना इतका आकस का वाटतो देव जाणे. ३. पबला नावे ठेवणे पण त्यातच. पबमधला आवाज तुम्हाला तर ऐकु येत नाही ना मग गपगार बसा. विकेंडला नियमीत पबमधे जाणारी कितीतरी सिन्सियर मुले ओळखीची आहेत. ४. मुळ लेखाचे नाव अतिशय हीन दर्जाचे आहे.

बोका-ए-आझम 07/10/2015 - 01:25
यातच सगळं आलं. त्यांनी उन्माद दाखवण्यासाठी गणपती विसर्जनाचीच मिरवणूक निवडली. मोहरमच्या मिरवणुकांमध्येही उन्माद असतो. पण तो सगळ्यातच चूक, विकृत आणि भांडवलशाही कारस्थान पाहणा-या डाव्यांना दिसणं आणि मान्य करणं शक्य नाही. तर्राट जोकर (हा एक बाप आयडीे निवडलाय ) यांच्या प्रतिसादाशी सहमत. बद्धकोष्ठ झालेल्या लोकांना पक्वान्नांचा विचार केला तरी पोटात दुखतं, तशातली गत या डाव्या विचारजंतांची झालेली आहे.

भाकरी 07/10/2015 - 02:52
पण खांडेकरांचा मुख्य मुद्दा, "कर्णककर्कश्श आवाजात सार्वजनिक ठीकाणी ढोल बडवणे, त्या आवाजाने बाकिच्याना किती त्रास होतोय याची तमा न बाळगता, आपल्या या ढोल बडवण्याने लोकाना कीती त्रास होतो हे माहीत असून, त्या त्रासापासून सुटका करून घ्यायचा त्यांच्याकडे काहीच उपाय नाहीये हे माहित असूनसुद्धा ध्वनिप्रदूषण करत रहाणे" याबद्दल वेल्लाभट तुझे काय विचार आहेत? ता.क. - आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.

In reply to by भाकरी

वेल्लाभट 07/10/2015 - 11:32
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे. बरं... आता बघा, की मिरवणुका ही आजची गोष्ट नव्हे. मात्र पुणेरी ढोल पथके गेल्या ४-५ वर्षात मशरूम सारखी उगवत गेली आहेत. मग स्पर्धा आली, मोठाल्या सुपा-या आल्या, राजकारणी हस्तक्षेप आले आणि चित्र बिघडत गेलं. याला माझ्या माहितीत उपाय नाही. आपल्याकडे कुठलीही गोष्ट अतिशय वेगाने 'नवीन प्रकार - क्रेझ - ट्रेंड - गरज - व्यसन - उन्माद' या अवस्थेतून ट्रान्झिट होते. ढोलपथकांचं असंच झालंय. कल्पना करा आज जी ५०० च्या वर पथकं आहेत पुण्यामुंबईत, ती ५० असती, तर त्याची मजा 'मजा' राहिली असती. ती सजा झाली नसती. हो की नाही? अती तिथे माती या म्हणीप्रमाणे आता आवाज आणि ढोलपथकांचा अतिरेक होतो आहे त्याला आपल्याकडे इलाज नाही. तरीही. जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे. आणिक एक विचार सांगतो. ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष. मग ठीक आहे की! दारू पिऊन लोळत नाचणा-या लोकांपेक्षा बरंच आहे की ते. आता एक दिवस मला जरा बरं नव्हतं, मी झोपलो होतो. माझं घर वाहत्या रस्त्यावर आहे. अव्याहत वाजणा-या हॉर्नचा रोजच होणारा त्रास त्या दिवशी मला सहन होत नव्हता. काचा लावूनही डोक्यात घण घातल्यासारखे हॉर्न वाजत होते. मी काय म्हणू मग याला? हॉर्न वाजवणारे हे स्वत:ची कसलीतरी भावना व्यक्त करता येत नाही म्हणून आकसाने हॉर्न वाजवत तिला बाहेर काढतात.... असं काही? नाही ना! मला नाही वाटत याचा संबंध मानसिक आजाराशी लावला जाण्याइतकं हे भयंकर आहे. मूळ लेखकाचा युक्तिवाद निरर्थक आणि आकसजन्य आहे.

In reply to by वेल्लाभट

भाकरी 07/10/2015 - 17:02
वेल्लाभट, हा माझा पुढचा प्रतिसाद वैयक्तिक वाटेल पण तसं नाहिये. तुझ्यासारख्या आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना त्रास होउनसुद्धा न थांबणार्‍या सगळ्याना आहे. ----------------------------------------------
ढोलाच्या मोठाल्या आवाजाचा त्रास होणे स्वाभाविक असून तो होतो हे मी मान्य करतोच. पण हे टाळणं कठीण आहे.
हे म्हणजे "मला मधुमेह आहे हे मी मान्य करतोच, पण..." असं म्हणत एखाद्या मधुमेह्याने तो जिलब्या का खातोय याबद्दल बोलण्यासारखं आहे! आणि टाळणं कठीण का आहे? आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" सांगितलं तर तुझी काय प्रतिक्रिया असेल याचा विचार कर.
जी खरोखर समाजभावना जपणारी ढोल पथकं आहेत, ती इस्पितळ इत्यादी ठिकाणी वादन थांबवतात असं ऐकलेलं आहे.
ऐकलेलं आहे? म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? आणि मला सांग, हॉस्पिटलपासनं ५० दूर जाउन वाजवलं की हॉस्पिटलपर्यंत आवाज पोचत नाही? आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय?
ढोल पथकं गणपतीपुरतीच जास्त कार्यरत असतात हो, बाकी वर्षभर तर नाही ना विशेष.
खरंच? आणि त्याआधी महिना-दोन महीने सराव चालतो तो बंद खोलीत केला जातो का? एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!!

In reply to by भाकरी

वेल्लाभट 07/10/2015 - 17:17
आपल्या ढोल वाजवण्याने लोकाना एव्हढा त्रास होतो हे कळूनसुद्धा तू एका ढोलपथकाचा सदस्य आहेस?? हो बसमधून बेदरकारपणे रस्त्यावर थुंकणार्‍या, लोकांच्या अंगावर पडेल न पडेल तमा न बाळगता, माणसाने तुला "तुमच्या अंगावर थुंकी पडली मान्य करतोच, पण ते टाळणं कठीण आहे" काहीही हं भाकरी म्हणजे तुझं पथक नाही थांबत? नसलं थांबत तर तू नाही सांगत? थांबतं. आणि लपवायचा प्रश्नच नाही. आणि 'समाजभावना जपणं' असा जरा भारदस्त शब्द वापरून स्वतःची फसवणूक का करतोयस? हॉस्पिटलपासून जरा पुढे गेल्यावर परत ढोल सुरू केल्यावर तिथल्या आजूबाजूच्या माणसाना जेव्हा त्रास होतो तेव्हा हा 'समाजभावना जपायचा' वसा उतला-मातला जातो त्याचं काय? मी मला फसवत नाही. तुम्हीच सांगा काय करायचं. आणखी एक बॅन आणायचा का सरकारने? आवाजाचा, त्रासाचा विचार करूनच १० नंतर वादन बंद इत्यादी नियम आले. ते पाळले जातात (अ‍ॅट लीस्ट मी तरी ते पाळले जाताना बघतो बहुतेकदा). मग आता पुढे जाऊन उत्सवच बंद करावे लागतील नाही का! कारण अनेक गोष्टींचा त्रास होतो उत्सवांमुळे. आपला धर्म आपल्या घरी असा नियम करावा लागेल. त्यातही आक्षेप घेतीलच लोकं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर म्हणा. एकंदरीत हा प्रकार म्हणजे एखाद्या पथ्य न पाळणार्‍या मधुमेह्याला डॉक्टरने "अरे मूर्खा, साखर कमी खा सांगून कळंत नाही का तुला?" असं म्हंटल्यावर त्याने साखर कमी खायचा विचार न करता, "डॉक्टर मला मूर्ख म्हणाला. त्याला गप्प बसायला सांगा" असं म्हणण्यासारखं आहे!! अगेन, व्हेरी फनी. प्रतिसाद वैयक्तिक नव्हता तशी ही उत्तरंही वैयक्तिक नाहीत हे नमूद करू इच्छितो.

In reply to by भाकरी

वेल्लाभट 07/10/2015 - 11:33
आय होप की "मोहरमच्या मिरवणूकीत गोंधळ घालतात मग आम्ही गणपतीउत्सवात ढोल का बडवू नये" असं काही नाही म्हणणार तू. असं ध्वनिप्रदूषण मोहरममधे, गल्लीतल्या सत्यनायायणाच्या उत्सवात, मोतमाउलीच्या जत्रेत वगैरे ठीकाणी होत असतं त्यामुळे त्याना पण हाच प्रश्न आहे.
तुम्हीच म्हणालात !

मदनबाण 07/10/2015 - 03:26
मूळ लेखातील कानठळ्या बसवणारे संगीत नसावे या आशयाशी सहमत आहे, तसेच आपलेही मतप्रदर्शन योग्य वाटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

अंतरा आनंद 07/10/2015 - 09:48
मूळ लेखाचा आशय समजून न घेता केलेला प्रतिवाद आहे. स्रियांचा लेखात वारंवार उल्लेख आहे असं नाही वाटलं. मुलींनी ढोल वाजवणे चांगले का वाईट हा मुद्दा नाहीय तर या चुकीच्या प्रकारात मुलीही हिरीरीने का सहभागी होतात याचं माफक आश्चर्य आणि माफक मीमांसा आहे. स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्रियांवर पुढच्या पिढीची असलेली जबाबदारी याचा मेळ घालणं किती कठीण असतं हे एका वयात आलेल्या मुलीची (आतापर्यंत तरी स्वतंत्र विचारांची) आई म्हणून मी नक्की सांगू शकते. बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. अर्थात दोन्ही लेखांचा हा विषय नाहीच फक्त प्रतिवादात आणि इतर या प्रतिसादांत या मुद्द्याला अवाजवी महत्व दिलय म्हणून हे आलं. आता मूळ लेखावर... छातीत धडधड होईल एवढा प्रचंड आवाज करणारी ही ढोल पथके नुसता सराव करत असतानाही तिथून जाणं नको वाटतं तर फटाके, गाणी आणि ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज सहन होत नाही. पूर्वीच्या मिरवणूकाही पाहील्यात पण हा आवाज जास्त प्रचंड वाटतो. त्याचा उदो उदो करणं हे समजण्यापलीकडचं आहे. पण समजून घेता येइल का? याचा विचार मूळ लेखात केला आहे असं मला वाटतं ’स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे’ हे वाक्य विचित्र वाटतय ते लेखाच्या शब्द मर्यादेमुळे. लिंग हा शब्द शारिरिक अवयव म्हणून नाही तर एक मानसिक अवस्थेचं वर्णन म्हणून वापरलाय. सध्या प्रत्येकजण आपल्या क्षमता आभाळाला भिडतात या जाणिवेत मश्गूल असतो. सेल्फ-हेल्प बुक्स पासून अनेकानेक गुरुंपर्यंत हेच सांगत असतात. पण वास्तवाला भिडताना आपली कुवत नीटच कळत जाते. पण समाधान न मानता पुढे चला असं सध्याचं ब्रीदवाक्य आहे आणि काही प्रमाणात नाईलाजही. मग मनाला आलेली मरगळ, थकवा अश्या उन्मादी प्रकारात जिरवून टाकायचा. ही ईच्छा, सर्वाधिकार गाजवण्याची, मनमुक्त वागण्याची ईच्छा म्हणजेच "नसलेलं लिंग".
त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच.
कुमारजी किंवा शास्त्रिय संगीत ऐकून "हे काय रडं लावलय" म्हणणारे पाहिलेत, त्यांना कानात कापूस घालून त्यापासून स्वत:ला वाचवता येतं पण ज्यांना ढोल ताश्यांनी वैताग येतो त्यांना "आपण बहिरेच असतो तर बरं झालं असतं" असं वाटतं. कृपया, शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये.
निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे.
हे वाक्य पटलं पण हेच खांडेकरांच्या लेखाचं सार आहे. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार. तुम्हाला ती आवडत असतील तर तुम्हाला त्याची सवय झालीय एवढंच म्हणावं लागेल आणि तेही प्रचंड खेदाने. त्याबाबतीत एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.

In reply to by अंतरा आनंद

वेल्लाभट 07/10/2015 - 11:45
ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार.
वाह. यावर मला काहीच म्हणायचं नाही. नो कमेंट्स.
मी पाचेक वर्षांपूर्वी जिमला जात होते. तिथे मोठ्याने गाणी लावत असत. मी सोडून कोणालाही त्या बद्दल आक्षेप नव्हता. मजा म्हणजे आठवड्यातून एक दिवस योगाचा असे. त्यात शेवटची २० मि. शवासनासाठी. त्यावेळी बाईंना सुचना देता याव्यात म्हणून गाणी बंद असायची पण शवासनाच्या वेळेस बाई आपल्या मोबाईलवर त्यांच्या दृष्टीने संथ गाणी लावून ठेवायच्या. म्हणजे आत काहीतरी बाहेरुन सतत ओतत रहायचं. आतल्या जाणीवा मरणपंथाला लागल्याची ही खूण असावी, आणि ही अशी ढोल पथकं म्हणजे त्यांचं दृष्य स्वरुप हेच मूळ लेखात म्हणायचं आहे.
हेही अतर्क्य आहे. मीही असं एक जिम लावलं होतं. तिथले 'सर' नावाचे एक वयस्कर गृहस्थ गाणी लावायला बंदी करायचे. लावलाच तर येऊन आवाज कमी करून टाकायचे एकदम. सोडलं मी ते जिम. बाहेरून गाण्यांचा ताल आत ओतल्याशिवाय मला व्हिगरसली वर्काउट करता यायचा नाही. माय फॉल्ट. काहीजण तरीही संथपणे बेंचप्रेस करताना अंतर्मुख होत असंत.
शास्त्रीय गायन न आवडणार्‍यांच्या वैतागाची बरोबरी ढोल-ताशांच्या हादरुन टाकण्याशी करु नये
मी केलीच नाही. मी म्हटलं की कुणाला कुमारांची ती रचना ऐकून मंत्रमुग्ध होता येत असेल तर कुणी ढोल वाजवून होत असेल. चूक कुणीच नाही. आर डी बर्मन आले तेंव्हाही सेहगल ची गाणी कशी.... आणि ही आताची.. ढॅणढॅण नुसती. असं म्हणणारे लोक होते. माफ करा पण हा जो प्रकार आहे ना, तो चूक आहे. काळानुसार संगीत बदलत जातं, सगळंच बदलत जातं. असो. आणि काहीच म्हणायचं नाही. आपल्या मतांचा आदर आहे.

In reply to by अंतरा आनंद

+१०००० संपूर्ण प्रतिसाद अत्यंत योग्य आणि मुद्देसुद आहे 100% पटला जस्तित आवाज़ करण्याच समर्थन शक्यच नाही , ढोल पथक किंवा डॉल्बी किंवा अन्य कुठलही उच्च आवाज़ हे वाईटच !!!

अनुप ढेरे 07/10/2015 - 10:50
पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे.
यात काय ओंगळवाणं आहे? संगीतावर नाचायला सगळ्यांनाच आवडतं. उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट 07/10/2015 - 11:48
उलट रस्त्यावर नाचण्यापेक्षा पबमध्ये नाचणं कधीपण चांगलं.
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 07/10/2015 - 12:19
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सगळ्याच पब्ज मध्ये नसते....आणि पब मध्ये या गोष्टी पब्जवालेच आणून देतात असा चुकीचा समज होउ शकतो वरील वाक्यातून...तसे बघायला गेलो तर ठाण्यात कितीतरी शाळांच्या आसपासच एम्डी पावडर मिळते असे ऐकून आहे आणि यात टिपिकल मराठी शाळांपासून हायफाय कॉन्व्हेंटपर्यंत सगळ्या शाळांची नावे ऐकून आहे

In reply to by वेल्लाभट

अनुप ढेरे 07/10/2015 - 12:28
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का? चांगल्या कंपनीबरोबर नाचणं यात मजा येते. एखाददोन घोट घेऊनपण. ती मजा घेण्यात काहीही गैर नाही.

In reply to by अनुप ढेरे

वेल्लाभट 07/10/2015 - 14:35
पबमध्ये जाणार्‍याची परिणीती ड्रग अ‍ॅडिक्टमध्ये होते असं म्हणताय का?
टोकाचा निष्कर्ष. असो.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा 07/10/2015 - 14:40
हो ना. नाचणं, मग त्यात पुढे अमली पदार्थ येतात, नशा येते, नशेत होणा-या गोष्टी येतात....
हे सुध्धा टोकाचे नाही वाटत :)

लेखावर प्रतिक्रिया देतना ध्वनीप्रदुषणाविषयी मत देणे सोयिस्कर रितिने टाळले आहे. कदाचित लेखक स्वतः ढोल पथकात आहेत म्हणून असावे. पण ज्याला हा त्रास सहन करवा लागतो त्याच्या भावना कोण समजावून घेणार? दुसरा मुद्दा म्हणजे आवाजाची पातळी ही कायदेशीर मर्यादेपेक्षा खूपच आधिक असते. (आधिक्रुत मर्यादा ६० डेसिबेल पण आवाज असतो १०० डेसिबेल वर तेही लोग स्केलवर). सन्गीताचा आस्वाद घेताना कायदाही पाळावा. यावर लेखकाने मत मान्डावे... (अर्थात मोहर्रम / बान्गेचा आवाज हे नेहमीचे मुद्दे सोडून काही असेल तर..) आवाज प्रदूषणाला कन्टाळलेला व सर्व कायदेशीर मार्गाने अजुनही असफल प्रयत्न करणारा एक सामान्य मानव... (अक्षराला हसू नये)

सतिश गावडे 07/10/2015 - 12:42
माझे घर नदीकाठाला आहे. जुलैच्या मध्यापासून माझ्या घरापासून जवळच दोन ठिकाणी ढोलपथकांचा सराव चालू होतो. रोज संध्याकाळी सहा - साडे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे ढोलपथक प्रचंड मोठया आवाजात ढोल बडवत असतात. अगदी नकोसे होते या वेळी घरात बसणे. याचा लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. ढोल बडवणारांना आणि त्याचा पुरस्कार करणारांना काय त्याचे. उन्मादी अवस्थेत हे त्यांच्यापर्यंत पोहचत नसणार.

तर्राट जोकर 07/10/2015 - 12:54
---- सरावामुळे होणार्‍या त्रासाबद्दल सहमत ---- साधारण दोन-तीन महिने हा त्रास असतो. यापेक्षा बंदीस्त, वस्तीपासून दूर जागी सराव केला तर लोकांना त्रास होणार नाही तसेच सतत ऐकून जे अप्रुप नाहीसे होते ते होणार नाही. आजकालचे ढोल हे फक्त आवाज करतात, जो चामड्याच्या ढोलात आहे तसा खरा नाद नाहिय्ये. अनुभवलेल्यांना माहित असेल ते. पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठेने परत आणले तर सगळे सुखी होतील.

दत्ता जोशी 07/10/2015 - 13:28
उच्च दाब ( हाय डेसिबल) आणि प्रकृतीला घातक अशा आवाजाच्या पातळीचे कोणतेही समर्थन नाही. उलट या वर्षी ध्वनिक्षेपक आणि ढोल पथकाच्या आवाजी पातळीवर खूप कडक निर्बंध घातल्याचे ( आणि पाळल्याचे हि वाचले आणि ऐकले). अनेक जुन्या प्रसिद्ध ढोल पथकांनी आपल्या पथकांचा आकार आणि वाद्यांची संख्या कमी केल्याचे वाचले. विशेषतः टोल ( gong ) वर बंदी घातली आहे हे स्वागतार्ह आहे. मिरवणुकीला लागणारा वेळ आणि त्यावर होणारा अनावश्यक खर्च इत्यादी गोष्टी अजूनही कमी करता येईल. अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य. अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य. बाय द वे, बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.( खोचक प्रश्न नव्हे.) अंतरा ताई, बेजबाबदारी आणि स्वातंत्र्य यामधली रेषा धुसर असते. मान्य.मुलगी काय किंवा मुलगा काय, अपरीपक्व अशा त्या वयातही आपली सीमारेषा, मर्यादा आणि जबाबदारी समजून वागण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. ( आणि तुम्ही ते देत असणार यात शंका नाही) आजच्या जमान्यात मुला- मुलींवर अनावश्यक आणि अतिरिक्त बंधने घालणे शक्य नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात तर मुलींना आपल्या या संस्कार ( शिकवणूक) आणि त्यांच्या वर टाकलेल्या विशावासाच्या भरवशावरच आजच्या जगात वावरू द्यावे लागते. मुले किंवा मुली एकदा बाहेरच्या जगात मिसळली कि पालक म्हणून आपले व्यक्तिगत नियंत्रण कितपत राहते? ढोल पथका सारख्या (किमान) सांस्कृतिक, सामाजिक सहभागापेक्षा कितीतरी धोकादायक चाली रिती आज समाजात मान्यता आणि मूळ धरत आहेत, नको त्या सुविधा /गोष्टींची रेलचेल आहे. . सकाळ मधल्या ढोल वाजवणाऱ्या मुली बघून मला तरी त्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही. ज्यांना बे जबाबदार पणे वागायचं त्यांना ( मुले आणि मुली) ढोल पथकाचीच गरज नाही. ढोल पथकात भाग घेणाऱ्या मुली बेजबादारपणे वागून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात असे तुम्हाला म्हणयचे नव्हते असे मी गृहीत धरतो. ही पथकं म्हणजे निष्प्राण समूहाचा आवाजी अविष्कार अरे बापरे ! ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.( माझ्या दृष्टीने तरी हे जिवंतपणाचे लक्षण आहे) आणि अशी उर्जा जर योग्य रीतीने खर्ची घातली गेली नाही तर ती नको त्या मार्गाने खर्ची जावू शकते. समूह किंवा समाजाच्या जिवंतपणाची लक्षणे काय याची यादी केली तर काय काय आणि कोण कोणते मुद्दे येतील याची कल्पनाच केलेली बरी. अर्थात त्यातले उपयोगी/ निरुपयोगी, विधायक/अविधायक कोणते आणि कोणते नाहीत यावर जोरदार मतभेदही होतील.

In reply to by दत्ता जोशी

सतिश गावडे 07/10/2015 - 13:39
अर्थात आपण फक्त एका उत्सवाविषयी बोलतो आहे. अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच. अति घनदाट वस्तीच्या ठिकाणी, हम रस्त्या शेजारी वगैरे राहणाऱ्या लोकांना हा रस्ते, वाहने, त्यांचे आकारण वाजणारे होर्न , स्टेशनजवळ- रेल्वे, काही ठिकाणी विमाने इत्यादी गोंगाट टाळता येणे अशक्य.
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. आता मी घरीच बसलोय. अगदी निरव शांतता आहे. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांच्या बोलण्याचा आवाज, एखाद-दुसर्‍या कारचा किंवा बाईकचा आवाज आणि नदीपात्रातील झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट एव्हढाच काय तो आवाज ऐकू येत आहे. सरावाचे दोन अडीच महिने याच ठिकाणी काय होते हे मी वर लिहिलेच आहे.
अश्या ठिकाणी अधिक गोंगाट आणि आवाज टाळण्यासाठी सराव थोडा दूरवर केलेला बरा हे मान्य.
+१

In reply to by दत्ता जोशी

अंतरा आनंद 07/10/2015 - 14:38
बंदिस्त थिएटर/ सिनेमा गृह, पब, डिस्को इ. ठिकाणी आवाजाची तीव्रता किती असते? हा खरच मला पडलेला प्रश्न आहे.
पण तिथे न जाणे हा पर्याय मला उपलब्ध असतो. या रस्त्यांवर चालणार्^या मिरवणूकांमध्ये तो नाही.
ढोल वाजवायला चांगल्यापैकी stamina नि शारीरिक क्षमता लागते. एक प्रचंड आंतरिक उर्मी आणि उर्जा लागते. हि उर्जा या वयात मुलामुलींमध्ये नैसर्गिकपणे उतू जात असते.
नक्कीच. मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का? माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला तर मारुन घ्याल काय? मग शांतताप्रेमींनी हा तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांच्या उर्जेला वाट मिळावी म्हेणून सहन करावा का? "तोंड दाबून बुक्क्यांचा... " असं म्हणायचं कारण की कोणी मारलं तर जाउन तक्रार करु शकतो, पण या आवाजाबद्द्ल तक्रार करणं फार महागात पडतं (अर्थात यात ढोल ताशे पथकांचा आणि वाजवणार्^याचा दोष नाही.)

In reply to by दत्ता जोशी

वेल्लाभट 07/10/2015 - 14:39
अकारण केला जाणारा गोंगाट दिवसातले १२-१४ तास ३६५ दिवस सुरु असतोच
तो उन्माद नसतो हो.... उन्माद ढोलाच्या वर्षातील काही दिवस होणा-या आवाजाचा असतो.

सर्वसाक्षी 07/10/2015 - 13:46
मोठा आवाज मलाही अस्वस्थ करतो. अनेकदा सुशिक्षित, उच्चभ्रु लोक राहात असलेल्या संकुलातही अती मोठ्या आवाजात गाणी लावणारे महाभाग आढळतात, सार्वजानिक कार्यक्रमात आपल्याच सह रहिवासींना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. वर 'एकच दिवस कार्यक्रम असतो, एक दिवस सहन करायला काय हरकत आहे?' असा दुराग्रहही असतो. कोणाला काय प्रकारचे संगीत आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र आपली आवड पुरवताना भान ठेवणे आवश्यक आहे. आपली हौस इतरांना उपद्रव ठरु नये. पबमध्ये आवाजबंद दाराआड कर्कश्श संगीत ऐकणारे परवड्ले. अनेकदा अशा मिरवणुका पाहताना मला असा प्रश्न पडायचा की ज्यांना हजार दोन हजार ही खूप मोठी रक्कम आहे असे लोक गणपती म्हणा देवी म्हणा अशा मिरवणुकी, वाजंत्री यावर आवाक्याबाहेरचा खरच का करतात? त्याच पैशात ते अन्य आवश्यक गरज भागवु शकतात. मग असे का? बहुधा ते असा विचार करत असावेत की हजार दोन हजार आयुष्याला पुरणार नाहीतच पण निदान या मिरवणुकीच्या बेहोषीत ते काही काळ तरी स्वत:चे दु:ख-दारिद्र्य, समस्या हे सगळं विसरुन जातात आणि त्यांना नवी उर्जा, नवी उमेद मिळते. बहुधा हा उन्माद काही व्यक्तिंना आवश्यक असावा. दुर्दैवाने समाजाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी रात्री उशीर पर्यंत वरात काढुन फटाके फोडणारे असेच. जेव्हा लोकांना सामाजिक भान येईल आणि आपला आनंद हा दुसयाचे दु:ख असू नये ही जाणीव होईल तो सुदीन.

प्यारे१ 07/10/2015 - 14:00
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/sandip/articleshow/49249967.cms http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/dolby-crime/articleshow/49235349.cms

In reply to by धोणी

हताश व्हायला होते हे असले पाहून. पुण्यात पूर्वी फक्त द्यानप्रबोधिनी काय ते करत होती. शिवाय प्रत्येक मंडळाचे असे स्वतःचे काही खास ताल असत. आता नुसता भुगा झालाय सगळ्याचा. तारतम्य आणि सामाजिक भान सुटल्याची लक्षणे आहेत. कायदा असला तरी तो सगळ्यांच सारखा नाही आणि अंमलबजावणी करण्याची धमक ना पोलीसामध्ये आहे ना सरकारमध्ये आहे. मशिदी वरचे भोंगे आणि त्याला प्रत्युतर म्हणून पाहटे चालू होणार्या आरत्या हा तद्दन मुर्खपण आहे. पण एकाला शिक्षा होत नाही म्हणून मला का व्हावी असला प्रकार आहे. शिक्षित मंडळी पण उगाचच ढोलाचे कौतुक करतायत हे पाहून वैशम्य वाटले. खरे म्हणजे २ दिवस कायदा राजरोसपणे धाब्यावर बसवता येतो हे सगळ्यांना माहिती आहे बाकी काही नाही. त्यामुळे कायद्याची भीती नाही आणि मग राहतो काय तर उन्माद. तो उन्माद नुसता नसून उन्मत्तपण आहे हे कळत नाहीये किंवा कळून घेण्याची इच्छा नाहीये. पबवाले तुम्हाला त्रास देत नाही आणि तिथे जाने ऐच्छिक आहे इतकेही कळू नये काय? का तिथे आपल्याला जायला मिळत नाही किंवा योग्य वा चुकीच्या संस्कारमुळे जावेसे वाटते पण जाता येत नाही म्हणून असलेला राग असा बाहेर काढतायत?

राही 07/10/2015 - 15:05
शिवाय आता मुंबईत बाप्पांच्या आगमनसमयीसुद्धा मिरवणुका निघतात. तेव्हाही ढोलपथके दिसू लागली आहेत. शिवाय या मिरवणुका एकाच दिवशी नसतात. साधारण जन्माष्टमीपासून मूर्ती मंडपस्थानी आणल्या जातात. त्यामुळे पुढचे आठ-दहा दिवस कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक निघतच असते. याही मिरवणुका तशाच वेळकाढू, उन्मादी आणि आवाजी असतात. रस्ते अडवून आणि वाहतूकनियंत्रणाची जबाबदारी त्यातल्याच चार टग्या पोरांच्या हाती सोपवून पोलिस निवांत उभे असतात. त्यांना तसेच उभे राहाणे भाग असते. त्या टग्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर काय होईल/होते हे सांगण्याची जरूर नाही.

दत्ता जोशी 07/10/2015 - 15:34
मग ही उर्जा वापरण्यासाठी ढोल पथकं हा एकमेव उपाय आहे का अनेक आहेत कि. पण हा हे सुधा एक सेलेब्रेशन आहे ना! अतिरेक नको, दुसर्यांना त्रास होईल हे ना पाहणे गरजेचे हे मान्य. पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही. "माझा stamina नि शारीरिक क्षमता वापरायचीय असं म्हणून एखादा तुम्हाला मारायला लागला "... काय च्या काय.. तुमचा तर्क वाचून असंच वाटायला लागलाय मला. असुदे असुदे. मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.

दत्ता जोशी 07/10/2015 - 15:44
दुसर्‍याने आपल्याकडे बोट दाखवल्यावर आपण तिसर्‍याकडे बोट दाखवणे बंद व्हायला हवे असे वाटते. काहीही. म्हणून अशा ठिकाणी जास्ती आवाज नको असा लिहिलं आहे. बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही.

अंतरा आनंद 07/10/2015 - 16:01
मी काय मुद्दा मांडला होता तो तुमच्या पर्यंत नाही पोचणार.
हेच ना. त्या आवाजात कोणाचेच मुद्दे कोणापर्यंत पोहोचत नाहीत.
पण मला आवडत नाही म्हणून कोणीच करायचं नाही हे पटत नाही.
मला आवडत नाही म्हणून नाही तर मलाच नाही अनेकांना प्रचंड त्रास होतो म्हणून.

सुनील 07/10/2015 - 16:04
बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही
हे अनावश्यक महापुरुष कोणते???

दत्ता जोशी 07/10/2015 - 16:20
"बाकी अनावश्यक महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही." बाकी महापुरुषांच्या जयंत्याना लागणाऱ्या अनावश्यक स्पिकरच्या भिंती, अश्लील गाणी, नृत्ये, रहदारीला होणारा अडथळा टाळला गेलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही. "अनावश्यक महापुरुष" नाही.

In reply to by तर्राट जोकर

अंतरा आनंद 07/10/2015 - 16:30
अहो, ते स्पीकरला अनावश्यक म्हणतायत तर तुम्ही का महापुरुषांच्या अनावश्यकतेवर घसरताय.(त्यानिमित्याने मोठ्या आवाजाला ते गोंगाट म्हणालेत हे ही नसे थोडके). आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला?

बॅटमॅन 07/10/2015 - 16:59
लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी 07/10/2015 - 17:15
किती गडबड ओ मिरजकर ? ...वाचा कि जरा .. डॉल्बी काय, महापुरुष काय, सर्दी, खोकला काय, डॉक्टर काय , महापुरुष काय? विषय काय आहे माहिती आहे का? का परत एकदा एकदम बाबरी मशीद?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन 07/10/2015 - 17:46
वाचलंय म्हणूनच लिहितोय ओ. घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली अशा आविर्भावात असणार्‍यांना काय त्याचे? द्या, अजून अभिनिवेशपूर्ण प्रतिसाद द्या आणि निव्वळ समोरचे गप्प झाले म्हणून आपला मुद्दा कसा बरोबर असल्याचे सिद्ध झाले अशा उन्मादात रहा. शुभेच्छा.

दत्ता जोशी 07/10/2015 - 17:07
अहो ताई, आणि त्यांनी का बरं डीजे लाउन डान्स करु नये? त्यांच्या उर्जेला वाट नको मिळायला? शांतपणे माझी ती पोस्ट संपूर्ण एकदा वाचा आणि काय लिहिलंय ते समजतंय का बघा. याउप्पर तुमची मर्जी. चालू दे तुमचं.

दत्ता जोशी 07/10/2015 - 17:59
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " विषय काय लिहिताय काय! वर सगळं वाचलं म्हणताय! मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते. काही माहिती नसताना काही संबंध नसतांना कशाला मध्ये पडता उगाच? का हौस आहे?

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन 07/10/2015 - 18:02
मिरजेत जिलबी चौकाच्या आसपास राहत होता काय? ताटात पडलं कि मग पुढ न बघता पहिले हाणायच मग शेवटी विचारायचं बारशाच होता का तेराव्याच ते.
हे लिहून आपल्या रोचक विचारांचे जाहीर प्रदर्शन घडवल्याबद्दल अनेक धन्यवाद. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून.

In reply to by दत्ता जोशी

राही 07/10/2015 - 18:19
सभासदांना प्रतिसाद देण्याचा हक्क नाहीय की काय मिपावर? कशाला मध्ये पडताय म्हणजे काय?

दत्ता जोशी 07/10/2015 - 18:10
"घरातल्या घाणीचा विषय निघाल्यावर अन्य घरांबद्दल बोलून समोरच्याची कशी जिरवली " आणि "लेख आणि प्रतिक्रिया वाचून प्रचंड करमणूक झाली. गणपतीतल्या डॉल्बीकडे लक्ष वेधले की मशिदीचे भोंगे आणि अनावश्यक महापुरुषांकडे मुद्दा डायव्हर्ट करायचा ही स्ट्रॅटेजी जुनी झाली आता. हसूही येत नाही. तापावर इलाज म्हणून गोळी घ्या असे डॉक्टर म्हणतोय तर त्यालाच "खोकला अन सर्दीची गोळी कोण तुझा बाप देणार का" असे विचारण्याने नक्की काय बरे होईल ते एक महाज्ञानी रुग्णच जाणोत. काही संबंध नसतांना तुम्हीच आलात विषयाशी असंबंध रोचक पोस्ट टाकायला, ओ राह्जे! आधी विचार करायचा होता, विषय काय लिहितोय काय ते. असेच बोलायचे शिक्षण दिले असावे बहुधा लहानपणापासून. हे मी म्हणायला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

दत्ता जोशी 07/10/2015 - 18:34
विषयाशी संबंधित तुमची मते मांडायला तुम्ही मोकळे आहात. कदाचित तुमची काही मते जेन्युइन असतील आणि पटतील हि. पण अहंपणाने अविचारी वैयक्तिक हल्ले करू नयेत. काहीच करण नाही. तिसरा अवतार वगैरे काही नाही. माझे नाव हि खरं आहे आणि मी हि. या पूर्वी किवा आताही माझा कोणताही पहिला दुसरा तिसरा..... अवतार किंवा आय डी मिपा वर नव्हता किंवा नाही. मिरजेचे आहात तेव्हा सोफ़्ट कॉर्नर नक्की आहे आणि राहील. माझ्यापेक्षा किमान १५-१६ वर्षांनी किंवा थोडे जास्तीच लहान दिसता. उत्तरा-उत्तर दाखल झालेल्या हाणामारीत बरेच काही बोललो. त्या बद्दल मनापासून क्षमस्व. तुमचे माझ्यावरचे वैयक्तिक प्रतिसाद आणि हल्ले मी मनावर न घेत विसरून जाणार आहे. ( शक्य असल्यास) तुम्ही पण विसरून जावे व कृपया मनात राग ठेवू नये. पण इथून पुढे असेच प्रतिसाद द्यायचे असतील तर तुमची इच्छा. माझी हरकत नाही.

In reply to by दत्ता जोशी

बॅटमॅन 07/10/2015 - 19:26
माझ्या प्रथम प्रतिसादातली अनेक विधाने तुम्ही स्वतःला लावून घेतलीत. असो. तुमचा प्रांजळपणा आवडला हे नमूद करणे अवश्य आहे. हे खूप क्वचित दिसते. बाकी रागबीग काही नाही. तस्मात क्षमस्व वगैरेची गरज नाही. :)

काळा पहाड 07/10/2015 - 20:57
ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन 07/10/2015 - 21:45
त्यात ते न्यू ईयर वगैरे राहिलं. नै म्हणजे "तुम्हांला फक्त धार्मिक सण दिसतात" असे कुणी म्हणायला नको.

In reply to by काळा पहाड

नीलमोहर 07/10/2015 - 22:18
+१११११११११११११११११११११११११११ हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मात उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या रस्त्यांवर साजरे केले जातात ?

In reply to by नीलमोहर

अभ्या.. 08/10/2015 - 00:37
ब्ल्याक माऊंटनभौ. लैच परफेक्ट उत्तर. आवडले. काही अल्पाक्षरी उत्तरे पाहिल्यावर उन्माद काय ते कळलेच होते. तुमचे हे उत्तर त्यासाठी परफेक्ट. मला तुमचा प्रतिसाद वाचून सारखी स्व. अशोक कामटेंची आठवण आली. ह्याच पध्दतीने त्यांनी सोलापूरची दंगल आटोक्यात आणली होती.

In reply to by जातवेद

नाखु 16/09/2018 - 20:52
पहाडी आवाजात कडकड झालाय? सहा सात मंगल कार्यालय कोंडाळ्यात दहा वर्षे रहिवासी डॉल्बी, ढोलताशांच्या आवाजाने अशरक्ष: भरलेला नाखु. इथल्या सारखा काहींनी जागा बदल करण्याचा सल्ला दिला होता. पण सतत विरोध पत्करून पत्रव्यवहार व समविचारी मंडळींना भेटून यथाशक्ति यथामति आवाय उठवत राहिलो आणि कशामुळे माहित नाही (अनधिकृत बांधकामे असल्याने) पाच मंगलकार्यालयांचा बाजार उठला,आणि दोन स्थलांतरित झाले. त्या उपद्रवापायी ज्यांनी माझ्यासारखं बैठे घर सोडून फ्लॅट मध्ये गेले त्यांना जबरदस्त हळहळ वाटते.

या लेखाच्या आशयाशी साधर्म्य असणारी कविवर्य मंगेश पाडगांवकरांची एक सुरेख कविता आहे, बघा पटतीये का! कावळा लागला थुईथुई नाच करू तेव्हा तुम्हाला असह्य चीड आली कावळ्याची... ...आता पुर्ण आठवत नाहिये. जमेल तशी आठवून किंवा शोधून मग देतो... धन्यवाद!

ते गणपती, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम वगैरे उत्सव घरात साजरे करा. एखादी रूम साऊंडप्रूफ करा आणि मग १९० डेसिबल नं डॉल्बी लावून मरा. रस्ता हा जाण्या येण्यासाठी असतो. तुम्ही संगीतातले किती दर्दी आहात हे लोकांना दाखवण्यासाठी नाही. एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम. तुमची उर्जा वगैरे उतू जात असेल तर रस्ते तयार करणं, स्वच्छ भारत, ट्रॅफिक ला शिस्त लावणं वगैरे मधे भाग घ्या किंवा एक बॉक्सिंग ची पंचींग बॅग विकत घ्या. डोक्याला दरवर्षी ताप च्यायला. एकदम सही

In reply to by दिवाकर कुलकर्णी

सह्यमित्र 08/10/2015 - 13:44
एकाही माणसाला जर आवाजाचा त्रास होत असेल तर तो उत्सव बंद करणंच उत्तम.
ह्याच न्यायाने सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाला हि अधून मधून काही जण विरोध करत असतात. कुठलाही सामाजिक उत्सव साजरा करताना त्याचा काही प्रमाणात उपद्रव हा होतच असतो. अर्थात तो सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ न देणे हे उत्सव करणार्यांचे कर्तव्य आहे पण त्याच बरोबर थोडा देखील उपद्रव झाल्यास त्याचा मोठा गवगवा करून हे सगळेच बंद करून टाका असे म्हणणे हे देखील तितकेसे बरोबर नहि. एकूणच दोन्ही बाजू कडून सामंजस्याची आवश्यकता आहे. विशेषतः उत्सवाचा जल्लोष करणार्यांनी जास्त

रेवती 08/10/2015 - 02:24
माझा पहिला प्रतिसाद गणरायाच्या कृपेनं गायबला. मूळ लेख, तुमचे पत्र वाचले. ढोल पथके वगैरेला कोणाचाही आक्षेप नाहीये तर आजकाल जे थैमान घातले गेलेय त्याला आक्षेप आहे. रस्ते हे फक्त गणेशमंडळांसाठी उत्सवाकरिता, जयंत्या, मयंत्यांकरिता नाहीत. ते ट्याक्सपेयर्सचे रस्ते आहेत (हो, खडबडीत असले तरी!). लोकांना सणाआधीही जगण्याचा अधिकार जास्त आहे. हां, आता ऐकून कोणी घेत नाही ते राहू द्या! यावर्षी ढोल, डॉल्बी, अजून काय दंगे असतील ते, यांनी वैताग आणलाय. माझ्या आईवडिलांची पिढी बर्यापेकी चालीरिती पाळाणारी (जरा देवभक्त क्याट्यागरी) आहे तरी त्यांच्या घराच्या चौकातील गणपतीत चाललेल्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवल्यावर दोघेही घरी न जेवता उपहारगृहात गेले. संध्याकाळी गाण्यांच्या आवाजाने आजारी पडले. ऐकू येईनासे झालेय. दुसर्‍यादिवशी पुण्याबाहेरील एका हॉटेलात रहायला गेले. इकडे आरत्या, भजने वगैरे चालूच होते. त्यांचे पाहून आणखी पंधराजण ओळखितले आपापली घरे, बसवलेल्या गणपतीसकट बंद करून हॉटेलात रहायला गेले. हॉटेलवाल्यांना रिक्वेस्ट करून सूप, खिचडी असा साधा आहार. कोणाला ताप, डोकेदुखी, दमा असे सुरु! जीव घाबरा होणे हेही झाले. मंडळांकडे तक्रारी केल्यास कोणीही ऐकून घेत नाही. कार्यकर्ते तर या दिवसात मस्तीतच असतात. यावर्षी म्हणे विदर्भातील दुष्काळाला सहानुभुती दाखवायची म्हणून (आसपासच्या रहिवाश्यांच्या कॉस्टवर) कोणतेही सेलेब्रिटी न बोलावता स्थानिक खेळ पथके, झिम्मा फुगडी पथके, लेझीम असे कार्य्क्रम १० दिवस होते. या कश्याच्याही विरुद्ध नाही पण या लोकांना जो उन्माद असतो ना, तो आवरण्यापलिकडे चाललाय. त्याचा अनुभव ३१ डिसेंबर २०१४ ला आम्ही घेतलाय. माझा मुलगा पुण्याच्या इस्पितळात उपचारासाठी गेला होता. रात्री बाहेर पडून आम्ही रिक्षा शोधत होतो तर एकही नाही. त्याचे औषध नाही. कारण विचारले तर दारू पिऊन लोक दुकानाचे नुकसान करतात. हा उन्मादच आहे! पुणे स्टेशनपर्यंत जाऊन औषधे आणावी लागली. आज काही लोकांची हॉटेलात जाऊन राहण्याची आर्थिक परिस्थिती आहे त्यांचे ठीक आहे. ज्यांना परवडत नाही त्यांनी हा त्रास सोसायचा? का म्हणून? जग बदलतय, दिवस बदलतायत म्हणून आपल्यात बदल घडवणारी आपली पिढी आज परंपरांमध्ये काहीही बदल घडवायला तयार नाही. ढोल ताशे, संगीताचे कार्यक्रम असतील चांगले पण आज ते कितपत योग्य आहेत? किती वाजेपर्यंत? या तक्रारी सरकारात जाऊन अमूक वेळेपर्यंत हे बंद झाले पाहिजे वगैरे हुकुमांना किती दाद दिली गेली? कोणाचेही न ऐकणे/न जुमानणे हा उन्मादच आहे. मुख्य रस्त्याच्या जवळ घर असणार्‍यांच्या नशिबात फक्त गणेशोत्सव, दहीहंडी, ताबूतरुपी दंगेच नसतात. रात्रीबेरात्री शिनेमे सुटल्यावर हॉर्न वाजवत जाणे, ओरडणे, दरमहिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी चंद्रोदयापर्यंत भजने (अगदी लताबाईंनी गायलेली, पंडीत भीमसेनांनी गायलेली), नंतर आरत्या व उशीरापर्यंत प्रसाद वाटण! झोपायचे कधी? शांतता कधी? तक्रार केली तर "अरे आम्ही काय सिनेमातली गाणी लावतो काय? आरत्या भजने लावलीत, आम्हाला कोणी हात नाही लावू शकत" ही उत्तरे उन्मादाचे नाहीतर कश्याचे लक्षण आहे. लताबाईंची भजने चांगली असली तरी रात्री झोपताना शांतताच हवी असते. पब संस्कृतीशी माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला काही घेणे देणे नाही. नको असेल तर त्या वाटेला नाही जात व त्यांच्याकडून आवाजाचा त्रास होत नाही.

In reply to by रेवती

भाकरी 08/10/2015 - 04:51
वरचा माझ्याबरोबरचा त्यांचा संवाद वाचा. सगळ्या मंडळातनं असे वेल्लाभट आहेत. त्याना जे करायचंय त्यामुळे लोकाना त्रास होत असेल तर त्याना काहिही फरक पडत नाहीये. तुम्ही आई-वडीलाना पुण्याबाहेर हॉटेलात ठेउ शकताय याबद्दल देवाचे आभार माना. तुम्ही-आम्ही या त्रासाबद्दल काहीही करू शकत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन 08/10/2015 - 12:27
वर आणि असे काही बोलले की लगेच "तुम्हांला त्यांचं काही दिसणार नाही" वगैरे सुरूच. असे बोलणार्‍यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाला म्हणजे कळेल.

तर्राट जोकर 08/10/2015 - 08:38
इथे टक्कू नावाच्या आयडीने दोन प्रतिसाद ७:४५ व ७:४६ ला दिलेले मोबाईलवर लॉग-इन नसतांना दिसत आहेत. क्म्प्युटर वर लॉगनि झाल्याव्र दिसत नाहीत. टक्कू हा वेल्लाभट यांचा डु-आयडी का?

तर्राट जोकर 08/10/2015 - 10:09
म्हणूनच मला मुख्य रस्त्यावरची घरं आवडत नाहीत. 'आमचं घर अगदी मेनरोडवर आहे' याचं लोकांना फार कौतुक असतं. जेव्हा त्रास होतो तेव्हा तेच न्युसन्स होतं. रस्ता आहेत तर आवाज होणारच, हॉर्न वाजणारच, मिरवणुका निघणारच. ज्यांना पटत नाही ते लोक आधीच योग्य निर्णय का घेत नाहीत? रस्त्यावरची घरं तर उलट महाग असतात. पण तेच >> कन्विनियन्स पाहिजे, न्युसन्स नको. मुख्य रस्त्यापासून आत असलेली घरं शांत, निवांत असतात. एकदा पैसे वाचवण्यासाठी म्हणून मुख्य रस्त्यावरचं अगदी महत्त्वाच्या चौकातलं एका खोलीचं घर भाड्याने घेतलं होतं. सकाळी चार पासून दुधाच्या गाड्या, ट्रक्स, सातपासून नोकरदारांच्या बाइक्स कार, ९ ते ११ आणि ६ ते ८ भयंकर वाहतूक कोंडी, आवाज, धूर. १० पर्यंत सामसूम झाल्यासारखं वाटत असतांना पार्ट्याहून परतणार्‍या कार्स, बाइक्स. रात्री हटकून १ ते ३ पर्यंत घराखालीच भरलेली कुत्र्यांची ग्रामसभा. त्यानंतर चारपासून दुसरा दिवस परत सुरू. त्या वर्षभर जो त्रास झाला, त्यानंतर दोन पैसे जास्त लागले तरी चालतील पण प्रशस्त आणि शांतता असलेल्या वस्तीतच घर घ्यायचं असं तत्त्व कायम पाळले. मुंबईत इतक्या ठिकाणी राहिलोय पण वरील प्रतिसादांमधले त्रास कधी झाले नाहीत. पण म्हणून ते अस्तित्वातच नाहीत असेही म्हणणार नाही. माझी आई माझ्या पिन्ड्रॉप-सायलेन्स प्रिय वृत्तीवर कायम चिडायची, तिचे एकच पालुपद --- मग जंगलात जाऊन र्‍हा ---

In reply to by तर्राट जोकर

रेवती 08/10/2015 - 19:25
घर मुख्य रस्त्यावर आहे याचं कौतुक नाही हो. घर घेतलं तेंव्हा रस्ता साधाच होता. नंतर नंतर त्यावरील वाहतुक व इतर प्रकार वाढत गेले. आजूबाजूच्या दुकानांमुळे कन्विनियन्स आहे हे नाकारत नाहीये व सकाळी व संध्याकाळी असलेली नोकरदार वर्गाची रहदारी याबद्दल तक्रार (निदान या धाग्यात) करत नाहीये. याशिवाय असलेले त्रास हे भरीचे असतात. सार्वजनिक गणपती हा पूर्वी अगदी लहानसा असे. नंतर नगरशेवकाच्या कृपेने हे सगळे झालेय. त्यानेच हळूहळू ताब्यात घेतलेली दुकाने, गणपती, दहीहंडीसारखे उत्सव, भाजीचे गाळे वगैरे. बरं, आम्ही तेथे रहायला गेलो त्यावेळी हा नगरशेवक कॉलेजात जाणारा मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न एका नामवंत राजकारण्याशी काय झाले, सगळेच बदलले! त्याचे फ्लॅटचे बांधकाम चालू होते तेंव्हा भाडेकरू म्हणून आमच्याच बिल्डिंगमध्ये रहात होते दोन वर्षं. नंतर एकाला एक असे तीन फ्ल्याट जोडलेले त्याचे आलीशान घर तयार झाले.

In reply to by रेवती

तर्राट जोकर 08/10/2015 - 19:37
तुमच्या प्रतिसादावर माझा रोख नव्हता. पण नेहमी जे लोकांकडून ऐकले तेच इकडे मांडले. एकदा ठाण्यात घर बघत होतो. अगदी तिठ्यावरल्या (तीन रोड एकत्र) मोठ्या २० वर्ष जुन्या बिल्डींगमधे ब्रोकर घेऊन गेला. त्या फ्लॅटच्या हॉल, किचन बेडरूममधून सगळा रस्ता व्यवस्थित दिसत होता. म्हणजे तो फ्लॅट एक्झॅक्टली तिठ्यावरच होता. ब्रोकर कौतुकाने सांगतो," अमुक नंबरची बस येते ते तुम्हाला इथूनच दिसेल.. हे ... ते..." भाडं कमी असून नाकारला तो फ्लॅट. एकतर मला बसची गरज नव्हती. दुसरं, रस्त्यावर घर मांडल्याचा फील परत एकदा नको होता. ब्रोकरला माझ्या नकाराचं कारण काही केल्या कळत नव्हतं.

वेल्लाभट 08/10/2015 - 14:37
एकूणच मूळ लेख, त्यातील तर्कटपणा, प्रतिक्रिया, त्याचा विपर्यास, विषयांतर, हे सगळं फार मनोरंजन करून गेलं. आणि हा १०० वा प्रतिसाद. च्यामारी फुल टू उन्माद !

In reply to by वेल्लाभट

प्यारे१ 08/10/2015 - 14:40
संस्कृती आपल्याच लोकांना त्रास देऊन जपली जाते तर. असो! एखादं सुनसान वाळवंट गाठून काय ते बडवत बसावेत.... ढोल ताशे. जनतेला त्रास देऊ नये. एकंदरच या उन्मादाबद्दल एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

भीमराव 08/10/2015 - 15:58
पत्र्याचे कडे व प्लास्टीक पानाचे १०० ढोल विरुद्ध लाकडी कडे अन चामडी पानाचा १ ढोल असा सामना ठेवला ना तरी लाकडी कड्याचा ढोलचं हवा करुन जाइल. ढोलपथक वाले भरपुर एनर्जी ने वाजवतात, तालाचा सराव करतात परंतु त्यामधे काहीतरी कमी आहे. पत्रा ढोलाचा नाद फक्त वाजवनारांमधे भिनत जातो पन ऐकनारांसाठी तो काही काळाने नुसता गोंगाट बनतो. ढोल, ताशा, हलगी, संबळ यांचे नाद जोडीला मस्त लेझीम सोबतच चालु असनारं " राडा राडा, लय भारी वाजतय" असली मिरवणुक म्हनजे वाजवनारे अन पाहनारे/ ऐकनारे या सगळ्यांमधे घुमनारे संगीत. किंवा एका रेशेमधे ढोलाला झेंडा लाऊन ऊभे असनारे ढोलवाले अन त्यांचं संथपने सुरु होनारं "ढिंपांग ढिढिंपांग" नकळत वेग घेत जातं. ऐकनार्याने कितीही दुर्लक्ष करन्याचा प्रयत्न करुदे तो मनाने ढोलाच्या लयी बरोबर जोडला जातोच. हे ही नको तर मग एकुलत्या एका ढोलावर एका बाजुला ढोलाची थाप न दुसरीकडे ताशा यांचा तालावर खेळले जानारे डाव किंवा गज्या हे बघा. ह्यात पन वाजवने आहे, नाद आहे,ऊन्माद आहे. बेदरकारी आहे तरीही हे भारी आहे. का? काय म्हायत।

पैसा 08/10/2015 - 16:16
त्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. एक ढोल हा खराच ऐकणार्‍याला वेडा करणारा असतो. तेच डफ, ताशा, हलगी यांचे. पण असे ५०/१०० ढोलांचे पथक का असते? एका ढोलाचे का नसते? एक ढोल आणि त्यासोबत ५० लेझीम हे फार सुंदर वाटेल ऐकणार्‍या बघणार्‍याला.

In reply to by पैसा

वेल्लाभट 08/10/2015 - 16:54
हे इनडोअर चांगलं वाटेल तै. भर रस्त्यात गोंगाटात एकाला पण ऐकू जायचं नाही. आणि शेवटी काहीही झालं तरी उत्सव आहे, तो ग्रँड नको? हां, ढोलांच्या संख्येवर निर्बंध आणले जाऊ शकतात. एका वेळी जास्तीत जास्त २५-३० जे काय असेल ते. पण काही सदात्रासिक लोकं बंदच करायचा युक्तिवाद करतात. तिथे पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. ढोल पथक, एका लयीत, एका तालात वाजणारे अनेक ढोल याला ग्रेस आहे. मग ती कुणाला संगीत वाटो किंवा न वाटो. आणि या गोष्टीला, उत्सवाला परंपरा आहे. याची आणि पब ची तुलनाच मुळात चुकीची आहे कारण दोहोंमागचा विचार हा परस्पर भिन्न आहे. उन्माद काय, मानसिक आजार काय, निष्प्राण समाज काय... लोक (मूळ लेखकासकट) वाट्टेल ते म्हणू लागले म्हणून माझी मतं मी वरील पत्रात मांडली. काहींना पटली त्याबद्दल आनंद आहे. नाही पटली त्यांच्याबद्दल दु:ख मुळीच नाही. रॅशनल युक्तिवाद केला तर रॅशनल सोल्यूशन्स निघू शकतात. नाहीतर मग 'काथ्याकूट'.

In reply to by वेल्लाभट

पैसा 08/10/2015 - 19:41
माहीत नाही. माझ्य आठवणीत रत्नागिरीतले सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे उत्तम नाटके, शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, भजन, भाषणे, एखाद दिवस ऑर्केस्ट्रा, ते सगळे आम्हाला ग्रँड वाटायचे. गणपती आणताना आणि पोचवताना माफक ढोल ताशे, खूप लेझीम खेळणारे आणि फटाके हे सगळे उभे राहून बघायला आवडत होते. आता ५० ढोल वाजत असताना किती वेळ बघू शकेन माहीत नाही. पुण्यात एकदा पाहिले होते. १०/१५ मिनिटे, ते छान वाटले. पण याहून जास्त वेळ नाही आवडणार. राधाकृष्णाच्या देवळात नवरात्राचा सार्वजनिक उत्सव असायचा, तेव्हा रोज शास्त्रीय गायकांच्या मैफिली असायच्या. मंजिरी आलेगावकर, रघुराम भट, मधुवंती दांडेकर वगैरे लोकांना तिथे ऐकले आहे. एका गणेशोत्सवात सुरेश वाडकरांचा कार्यक्रमही ऐकला आहे. आता हे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम बंद होऊन गरबा असतो असे ऐकले. गणेशोत्सवात कित्येक वर्षात जाऊ शकले नाही त्यामुळे काय परिस्थिती आहे माहीत नाही. मला वाटते, मार्केट ढकलते तशा ग्रँड काय याच्या कल्पना बदलत जातात.

चतुरंग 08/10/2015 - 17:52
खांडेकरांनी मांडलेला अतिउच्च आवाजाचा मुद्दा तर अमान्य करण्यासारखा नाहीच. त्यांनी फारच ताणून ढोल वाजवणार्‍या स्त्रिया, डोरा, पब वगैरे नको ते मुद्दे त्यात घुसडलेत याबद्दलही दुमत नाहीच. तरीही, तरीही, माझे म्हणणे असे आहे की ढोलपथके वगैरे आपल्या परंपरांचा आपण नवीन परिस्थितीनुसार विचार करायला नको का? शहरातून आधीच वाढत असलेले सर्व प्रकारचे प्रदूषण हे हाताबाहेर गेलेच आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश गणपतीतच अशी पथके असत त्यातल्या ढोलांची संख्या मर्यादित असे. आमच्या अहमदनगरच्या घरासमोरुन मुख्य रस्त्यावरुन गणपतीची मिरवणूक दरवर्षी जाते. मीही लहान असताना त्यात भाग घेतला आहे. ढोल वाजवलाय, लेझीम खेळलोय. आवाज बर्‍यापैकी सुसह्य होते. आणि वाजवणार्‍यांची संख्या अगदी मर्यादित होती. संपूर्ण मिरवणूकीत एखाददुसरे पथक असे आणि एकूण साताठजण असत. वाजवणेही नादपूर्ण आणि कमीवेळ असे. डॉल्बीच्या ढणढणाटाने हल्ली खिडक्या, दरवाजे बंद करुनही संपूर्ण बिल्डींग हादरत असते असे माझे आई-वडील सांगतात. दहा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे गेल्या जन्मीचे पाप फेडत आहोत की काय इतका त्रास होतो! गेल्या काही वर्षात दहीहंडीपासून ते दिवाळीपर्यंत सततच काही ना काही सुरु असते.शिवाय यातही व्यावसायीकरणाने व्यवस्थित प्रवेश केलाय त्यामुळे भरपूर पैसे मोजून अशी पथके तयार केली जातात आणि त्यांच्यात स्पर्धा आल्याने तुझा आवाज मोठा की माझा इथे सगळा घोळ सुरु होतो. या सगळ्यात सामान्य माणसांचा विचार की मुळात ज्यांच्या आनंदासाठी हे सगळे केले जाणे अपेक्षित आहे तो कुठच्याकुठे भिरकावला जातो. सूज्ञपणाने विचार आपण करणार आहोत की नाही? उपाय काय. तर ढोलांची संख्या मर्यादित करणे. त्यांच्या आवाजपातळीवर निर्बंध घालणे. एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त ढोल न वाजवणे. ढोल वाजवण्याच्या दोन ठिकाणांमध्ये किमान एक किमि. चे अंतर असणे, फक्त गणपतीतच ढोल असतील इतर वेळी नाही, डॉल्बीवापरुन ढोलाचा आवाज वाढवता येणार नाही असे निर्बंध घालता येऊन सामान्य माणसाचा विचार करता येऊ शकत नाही का? अशाने दोन्ही साध्य होऊ शकेल. अडेलतट्टूपणाने काहीच साध्य होणार नाही आणि एकेदिवशी सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. उन्मादी अवस्थेत जाऊन भरकटण्यापेक्षा वेळीच विवेकाने विचार होणे आवश्यक वाटते.

In reply to by चतुरंग

प्यारे१ 08/10/2015 - 18:17
>>> सामान्य लोकांच्या आंदोलनामुळे संपूर्णच बंद करावे लागेल. फारच आशावादी ब्वा तुम्ही! (उपरोधानं लिहीतोय)

In reply to by चतुरंग

काहीतरीच बुवा. इथे इतके लोक सांगतायत पण त्रास होवून ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये. मग होतंय काय कि माझ्यावर बंधने घालतंय म्हणून मी असून विरोध करणार असा सूर आहे. हा वैयक्तिक हल्ला समजू नये. कारण हि वृत्ती सगळीकडेच आहे. आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि तो पप्रमाणाबाहेर आहे हे कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. दुर्दैवाने दिसते काय कि आमच्या हिंदूंच्या सणांनाच तुमचा ओरडा असा सूर होतोय. मला पण ढोल आवडतो. आवर्जून रात्री ढोल वाजवलाय. पण त्यात किती फार तर १०-१२ ढोल असायचे. आता ५०-५० ढोल लक्ष्मी रोड येतात. सगळ्यांना सारखा नियम आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजेल. दुर्दैवाने फेस्टिवल आहे तो ग्रांड झाला पाहिजेल हा सूर विचित्र आहे. कदाचित वयाचा परिणाम. एकदा थोडे केस पांढरे झाले कि कदाचित लक्षात येईल. जोपर्यंत त्याचा त्रास स्वतःच्या घरात होत नाही, आपले जळत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही. डॉल्बीमुले एक घर उध्वस्त झालंय ह्याचे वाईट वाटते पण त्याचा घरट्यांचे हाल नंतर बघायला मिळत नाही. तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.

In reply to by चैतन्य ईन्या

वेल्लाभट 08/10/2015 - 23:00
ढोल संख्या कमी केली पाहिजेल हेच मान्य होत नाहीये.
प्रतिसाद नीट वाचा असं सांगेन
तेच आपल्या बाबतीत जेंव्हा होईल. आपल्या आई/वडिलांना आजीला हॉस्पिटल मध्ये नेता येत नाही असे जेंव्हा घडेल तेंव्हाच त्याची तीव्रता कळेल.
असो. मी माझी पातळी सोडू इच्छित नाही. तुम्ही सोडलीत, तुमची लेव्हल.

In reply to by चतुरंग

हा विषय आला कि परम्परा हा शब्द येतोच. ढोल हे वाद्य पारम्पारिक असेल पण १०० जणानी ढोल एकत्र वाजवायचा ही परम्परा आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे हा गेल्या फारतर ३० एक वर्षातला प्रकार आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा...

_मनश्री_ 08/10/2015 - 20:11
त्यांचा झाला जल्लोष; त्याला गमवावा लागला जीव एखाद्याचा जीव गेला तरी चालेल , पण उत्सव मात्र ग्रॅण्ड झाले पाहिजेत कारण तरुणांची ऊर्जा खर्च करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे , बाकीची जनता जाऊ दे खड्ड्यात

In reply to by वेल्लाभट

ओ वेल्लाभट... अहो अहो... जरा थां...बा... हाश्श... हुश्श्ह... ओहुहू.. दो..न... मिं...ट... हा... हा... जर्रा... दम... लाग्ला...य...पा... णी... पाणी देता... का कुणी! ग्ल्कक्क.... ग्लक्क.... गल्क्ककहा....हा...धन्यवाद! पाणी पिल्यावर जरा बरं वाटल. तर, मी काय सांगणार होतो की...जसं मी माझ्या आधीच्या या लेखावरच्या प्रतिक्रियेत म्हटलो होतो ना... ती पाडगावकरांची कविता... ती.. ती... आठवली का?? अहो तीच हो, मी म्हटलं होत ना... या लेखाच्या आशयाची जरा नात जुळतय तिच... ती...तीच आत्ता सापडली मला. म्हणजे बघा अशीतशी नाही... चांगल्या दोन दिवस दोन रात्रीच्या अभूतपूर्व, व्यापक अशा शोधमोहिमेनंतर (म्हणजे हेच आपल... जुन्या दोन तीन डाय-या, काही ड्रॉवर्स, कपाटाचा हात न जाणारा अगदी खालचा कप्पा अशा, रद्दी, काही मित्रांना केलेले फोन वगैर बाबी!) आज रात्री साडेअकराला एका कागदाच्या चिटो-यावर मीच मागे कधीतरी लिहिलेली सापडली! तर कवितेत कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात... कावळा लागला थुईथुई नाच करू आपण मोर आहोत असंच मनात समजून कावळ्यानं केलेलं हे मोराचं अनुकरण पाहून तुम्हांला असह्य चीड आली कावळ्याची! माझा नाच पहा असं कावळा मुळीच नव्हता म्हणाला त्याचा नाच पाहिलाच पाहिजे तुम्ही अशी कुठल्याही कायद्यान केली नव्हती तुमच्यावर सक्ती तुम्ही आपली दृष्टी केव्हाही अन्यत्र वळवू शकता ज्या आनंदातून उमलत नाचणं थुईथुई त्या आनंदाहून नाचणं वेगळं नसतच कधी! डोळ्यांना जे दिसतं ते त्या आनंदाच बाह्यरूप! त्या आनंदाला स्पर्श करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर हातात घ्या त्या दिवसाचं ताज वर्तमानपत्र आणि पंख्याखाली बसून निवांत वाचा खुनाच्या, बलात्काराच्या बातम्या! - कविवर्य मंगेश पाडगावकर ____/\____ बघा, कुणाला काही घेता आल तर या कवितेतून! धन्यवाद! Sandy

टवाळ कार्टा 09/10/2015 - 10:46
संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके होती आधीच्या काळी....आत्तासुध्धा संस्कृतीदर्शनासाठी ढोलपथके आहेत...मान्य पण अगदी ३० वर्षांपर्यंत वर्षभर काहीही कारणांमुळे वाजणारे डॉल्बी, प्यँप्यँ करत सारखे वाजणारे हॉर्न आणि आजच्या इतकी वाहने नव्हती त्यामुळे आधीच्या काळी ढोल १० असूदे किंवा ५० असूदे...चालून गेले आजच्या काळात जिथे "कार्यकर्त्यां"चे डोके रिकामे असते ते अगदी हॉस्पिटलच्या बाजूने जातानासुध्धा त्याच मोठ्ठ्या आवाजात ढोल वाजवत जातात ....वेल्लाभट ज्या ढोलपथकात आहे ते लोक ठाण्याच्या मुख्य रस्त्यातून बहुतेक मिरवणूक काढतात...पण तेसुध्धा प्रत्येक हॉस्पिटलच्या बाजूने जाताना आवाज थांबवत असतील? नक्कीच नाही....आणि कारण सुध्धा तयार असेल....इथे इतकी हॉस्पिटल्स आहेत...कुठे कुठे थांबणार...अशाने मग आम्ही ढोल मिरवणूक कुठे काढायची...आम्हीच का थांबवू "ते" आवाज करतात त्याचे काय?....आणि हे असेच सुरु रहाणार....आपल्या रहायच्या जागेचा उकिरडा आपणच करणार आहोत

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 09/10/2015 - 11:05
हा विषय काल एका डॉक्टर मित्रासोबत छेडला असता त्याने त्याचा ताजा अनुभव सांगितला. त्याचे क्लिनिक मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या चौकाच्या आतल्या गल्लीत आहे. क्लिनिक जरा आत असल्याने चौकातला गोंगाट तिथपर्यंत पोहचत नाही. त्याच्या क्लिनिकसमोरच शहरातील एक प्रख्यात बालरुग्णालय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक ढोलपथकवाली मिरवणूक त्याच्या क्लिनिकसमोरुन (आणि अर्थातच बालरुग्णालयासमोरुन) जात होती. मिरवणूक बालरुग्णालयासमोर आली. कुणीतरी आदेश दिला, चौकात वाहतुकीचा खोळंबा होईल; पोलिस नाचू देणार नाहीत म्हणून इथेच नाचायचे. मिरवणूक अर्धा तास बालरुग्णालयासमोरच ढोल बडवत नाचत होती. जोडीला कानठल्या फोडणारा डीजे. माझा डॉक्टर मित्र हताशपणे समोरच्या रुग्णालयातील बालरुग्णांवर या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचा काय परिणाम होत असेल याचा विषण्ण मनाने विचार करत बसला होता. विरोध केला तर काय परिणाम होतील याची जाणिव असल्याने असे हताशपणे बसण्यापलिकडे तो काही करुही शकत नव्हता. दिवस खुप वाईट आले आहेत. ज्या सुशिक्षितांनी या सार्‍याला विरोध करायचा तेच संस्कृतीच्या नावाखाली चालू असलेल्या उन्मादाचे आंधळे समर्थन करत आहेत.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 09/10/2015 - 14:27
आणि असे बोलले की हिंदूद्वेष्टे वगैरे लेबले लावायची. काहीजण म्हणतात त्याप्रमाणेच, असे होऊ नये पण यांच्या घरातल्या लोकांन त्रास झाला की कळेल मग. तोवर कळणार नाही आणि कळालं तरी कळून घेणार नाहीत.

In reply to by बॅटमॅन

अस्वस्थामा 09/10/2015 - 15:44
मित्र हो, हे एक लक्षात आलंय का की धागाकर्ता तसेच इतर समर्थन करणारे हे "त्रास होतो" वगैरे मुद्दे मान्य करत आहेत आणि त्याच बरोबर हे "असेच चालणार" यावर देखील ते ठाम आहेत. तेव्हा कितीही बोललात तरी या ठाम मतांत बदल होणार नाही (जोवर स्वतःवर अथवा जवळच्या कोणावर काही बेतत नाही तोवर कदाचित) मग आता पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचं ते.

कोणत्याही संगीत बदल करणाऱ्याला ' हे पूर्वी असे नव्हते' ऐकावे लागलेच ....पण म्हणून हे ऐकावे लागलेला प्रत्येक जण संगीत बदल करणारा क्रांतिकारी संगीतकार नव्हता ...हृदयनाथ आणि अपाचे इंडियन हे एकाच तागडीत तोलणे हा हक्क आहेच शहाणपणा नव्हे ....जानकारी तर नव्हेच नव्हे .. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये हि शिकवण मुळातच घरात दिली जात नाही हल्ली ...त्यापेक्षा "स्वतःला योग्य वाटते ते कर जग गेले उडत' हा विचार आधुनिक ठरतोय ...कायदेभंग हा इतिहासमान्य मार्ग आहे आपल्याकडे ... आपल्या बहुतांश सणांमध्ये "कोणताही कायदा , नियम, संकेत , सामाजिक भान, स्वच्छता, शिस्त, संयम हे इतरांनी पाळायच्या गोष्टी आहेत ...स्वत: नाही ..." असा काहीसा समज आहे ...दहीहंडीतील मूर्ख धाडस, सार्वजनिक गणपतीतील अनिष्ट प्रथा /गोष्टी, नवरात्रीतील धांगडधिंगा, दिवाळीतील फटाके आणि एकूणच आगीशी खेळ हे सगळेच अनाकलनीय आहे ... परंतु झुंडी पुढे शहाणपण नाही हेच शेवटी खरे जाता जाता : नृत्याकडे नेत नाही ते संगीत अस्त पावते असे म्हणणारी ती विदुषी ...आणि एक दिवस कोणत्याही साथीशिवाय ख्याल सादर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या किशोरी ताई .... असो !!!

श्रीगुरुजी 09/10/2015 - 13:55
"कलेवरांचा उत्सव" या लेखातील आशयाशी सहमत आहे. सार्वजनिक उत्सव हा प्रकार अत्यंत उपद्रवी झालेला आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बुद्ध पौर्णिमा, मोहरम, इतर काही नेत्यांची जयंती व पुण्यतिथी इ. चे स्वरूप अत्यंत उपद्रवी व त्रासदायक झाले आहे. त्याबरोबरीने रस्ता अडवून निघालेल्या लग्नाच्या मिरवणुका, तोरणाच्या मिरवणुका, मोहरमची डावी-उजवी हे रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व प्रकार अत्यंत त्रासदायक आहेत. निवडणुकीच्या वेळी रस्त्यावर घेतल्या जाणार्‍या सभासुद्धा त्रासदायक आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करायला हवेत. खरं सांगायचं तर रस्त्यावर साजरे केले जाणारे सर्व उपक्रम बंद व्हायला हवेत.

धाग्यावर अवांतर आहे पण हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांची संख्या व त्यानिमित्ताने निघणार्‍या मिरवणूका कमी कमी होत जाणार आहे असे माझे मन मला सांगते. त्याजागी तीच मंडळे नवरात्रोत्सवाचे धुमधडाक्यात आयोजन करतील आणी गणेशोत्सव मंडळांपेक्षा नवरात्र मंडळांची संख्या वाढत जाईल असे भाकीत वर्तवितो. गणपतीत जास्तीत जास्त २ दिवस नाचायला, वाजवायला भेटते पण नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो. टीप : ३०० होतील ना आता ?

In reply to by धर्मराजमुटके

तर्राट जोकर 10/10/2015 - 16:37
नवरात्रात नऊ दिवस + कोजागिरी असे १० दिवस मजा करायला मिळते. शिवाय त्यात पर्सनल टच जास्त असतो.
जेल प्रॉपलंट भरले आहे दोन शब्दात...

मोदक 13/10/2015 - 12:18
वेल्लाभट, प्रतिसादांचा धुरळा खाली बसला आहे म्हणून मुद्दाम आत्ता प्रतिसाद देतो आहे. शांतपणे विचार करा. माझा एक जेन्युईन प्रश्न, तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे. तर, "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" तरूणाई, पॅशन, रग वगैरे तुमचे मुद्दे बरोबर आहेत तसेच प्रतिपक्षाचेही मुद्दे तितकेच जेन्युईन आणि बरोबर आहेत, आणि हा वाद प्रतिवाद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आढळेल मग किती जणांना उत्तरे देत बसणार?? १९९८ च्या दरम्यान सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर वाचकांच्या पत्रव्यवहारात आणि साप्ताहिक सकाळ / लोकप्रभामध्ये "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" या अर्थाने लेख प्रसिद्ध झाले होते. त्याला पुन्हा लोकांनी उत्तरे दिली.. पुन्हा मूळ लेखकाने उत्तर दिले असे महिनाभर सुरू होते. सोन्याबापूंनी बुलेटचा धागा काढल्यावर त्यावरही असे "याची काय गरज आहे का आता?" टाईप्स प्रतिसाद आले होते. इथे मिपावरच सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्यावरून धुरळा उडाला होता आणि गिरीप्रेमीच्या लोकांनी "एव्हरेस्ट सर करून काय मिळवले?" असेही लेख आहेतच. मी त्यावेळी हिरीरीने प्रतिवाद केला होता (खिल्ली पण उडवली होती), पण नंतर असाही विचार डोक्यात आला की, त्या लोकांचा एक वेगळा, आपल्यापेक्षा सर्वस्वी विरूद्ध असा दृष्टीकोन आहे आणि "त्यांच्या दृष्टीने" ते बरोबर आहेत. तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे. त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती असणार आहेत त्यामुळे लोकांचे आक्षेप असणारच आहेत. मग प्रत्येक आक्षेपाला उत्तर देत तुम्ही तुमचा किती वेळ वाया घालवणार आणि त्याचा खरंच तुम्हाला काही उपयोग होणार आहे का? तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा झकास पैकी व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.

In reply to by मोदक

वेल्लाभट 13/10/2015 - 13:42
व्हॉट्सॅपचे मल्टिपल अंगठे तुमच्यासाठी. मी कितीवेळ आणि मुळात कशाला उत्तरं देऊ? असं म्हणूनच मी http://www.misalpav.com/comment/752417 या प्रतिसादानंतर थांबलो. आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना. सो; तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. सर्वात सेन्सिबल प्रतिसाद होता हा या लेखावरचा. आणि हो, इतर नमूद केलेल्या विषयांवर लिहीनच. :)

In reply to by वेल्लाभट

रेवती 13/10/2015 - 18:00
तुम्हाला प्रतिसाद देणं थांबवायचं असेल तर थांबा. तो हक्कच आहे, पण धागा तुम्ही सुरु केलायत म्हटल्यावर लोकंनी वाचावे व प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. नाहीतर त्या वृत्तपत्रातील महिलेलाच पत्र सदर पेपरात द्यायचे होते. ढोलांचा होणारा त्रास मान्य करूनही तुमची आवड पुढे रेटताय तेही ठीकच, मग दुसर्‍याला अकलेचे ढोल असे म्हणायचे होते तर धागा काढूच नये. सभ्य शब्दातला प्रतिसाद ही किमान अपेक्षा आहे पण माझ्या किंवा इतर अनेकांच्या प्रतिसादात तुम्हाला असभ्य शब्द वापरलेले कुठे दिसले कि तुम्ही अकलेचे ढोल म्हणावे? तुमच्या म्हणण्याला सपोर्ट करणारा प्रतिसाद हा सेन्सिबल व आमचे प्रतिसाद जरी सभ्य भाषेतील असले तरी ते विरुद्ध असल्याने सेन्सलेस होतात का? एरवी तुमचे धागे वाचून आवडल्यास तशा प्रतिक्रिया दिल्या जातात तेंव्हा आम्ही सेन्सिबल ठरतो असे आहे का? तुम्ही प्रतिसाद देणे जर थांबवले होते तर मोदकाचा प्रतिसाद आल्यावर लगेच मल्टिपल थम्स अपसाठी आलात त्याला काय म्हणावे?

In reply to by रेवती

प्यारे१ 13/10/2015 - 18:05
कसं बरं तुला जमतं, कित्ती कित्ती छान वगैरे 'स्तुतीसुमनांची अपेक्षा' ही लिंगनिरपेक्ष मानावी काय???? मुळात मोदकाचा प्रतिसाद हा मल्टीपल थम्प्स आहे का किंवा का आहे याबद्दल सखोल विचार करायला हवा. मोदककडे शालजोड्या भरपूर आहेत असं ऐकून आहे. ;) कळावे, आ. न. प्यारे पैलवान

In reply to by मोदक

अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर.. आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 13/10/2015 - 14:28
आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना
मस्त. आवडले. हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)

In reply to by पिलीयन रायडर

मोदक 13/10/2015 - 15:07
मले काय ठावे बाबा.. तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे.