अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३
(महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पावसाच्या दुर्घटनांसाठी चर्चा धागा.)
हल्ली काही वर्षांत पावसाळा सात जूनला सुरू होत नाही आणि मग एक जुलैच्या आसपास मान्सूनचे ढग गोळा होतात. पाऊस एक तर वेळेवर येत नाही आणि मग चिडून आल्यासारखा कोसळतो.
मागच्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रचंड पाऊस अगदी थोड्या तासांत कोसळून पूर आले. तेवढे पाणी जलद नदीमधून वाहून जात नाही आणि शहरांतील सखल भागांत घुसते. तेच झाले आणि दिल्ली यमुनेच्या पाण्यात बुडून आहे. पाणीच पाणी चहूकडे आणि पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था झाली. कारण पाणी शुद्धीकरण संयंत्रे बुडाली आहेत.