Skip to main content

उजाड!!

लेखक नीधप यांनी रविवार, 14/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं. कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्‍या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4909
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

खरंच ओसाड .... ह्यावर एक छोटासा प्रभावी लेख होऊन गेला असता :) आमच्या गावी एक पडका वाडा होता .. लहाणपणी लपाछपी खेळता खेळता कधीकाळी तिकडं गेलो तर जाम भिती वाटे त्या भव्य चिंचेच्या झाडाची .. त्या झाडावर भुतं रहातात असा पक्का समज त्यावेळी होता :) त्याची आठवण झाली

सुरेख फोटो. लहानपणी आजोळच्या शेजारच्या घराची आठवण झाली. ते घर बेवारस होते. आम्ही दर उन्हाळ्यात जायचो तेव्हा त्या घराची मागच्या वर्षीपेक्षा थोडी आणखी पडझड झालेली दिसे. तुमच्या फोटोतील घर नुकतेच सोडून दिलेले असल्याने त्याचे स्वरूप चांगले आहे त्यामुळे उजाडपणा जास्त उठून दिसतो. खराटा (रंग माझा वेगळा)

खंडहर बता रहे है, हवेली कितनी बुलंद थी... छायाचित्र प्रभावी आहे. किती तरी गावं डोळ्यांसमोरून गेली. काही उठतानाच, घरं उतरवातानाच पाहिली आहेत, ते सारे अनुभव जागे करून गेलं हे छायाचित्र. या (आता अस्तित्त्वात नसलेल्या) गावात एकच छायाचित्र मिळालं? शक्य नाही. इतर कुठं आहेत? मला तीही पहायची आहेत. तिथली घरं उठली, झाडांचं काय झालं? त्यावर जीवन अवलंबून असलेल्यांचं (फक्त माणसंच नव्हे तर पक्षी वगैरेही) काय झालं? लिहि त्यावर वेळ काढून.

In reply to by श्रावण मोडक

बाकी छायाचित्र आहेत. काही मी काढलेली काही नवर्‍याने काढलेली. बाकी गावाची कथा मी अजून पूर्ण समजून घेतली नाहीये. आणि लेख लिहिण्याचं धाडस माझ्यात नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

चित्र पाहून वाईट वाटलं ,कुठेतरी आत पोटात तुटलं.. स्वाती

घरात कुणी नसलं की चांगलं घर सुद्धा असच वाटत मला. असो, आपल्या पेक्षा ज्याचे ते घर आहे त्याला/ काय वाटले असेल? कल्पना करवत नाही. :( आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मलाही वाईट वाटलं. पण एवढं काय झालं गाव सोडून जायला? पाण्याचा प्रश्न ? की अजून काही? रेवती

भीषण आणि भयाण आहे. नक्की काय झालं या गावाचं? का लोक गाव आणि घरं सोडून निघून गेले? नक्की काय घडलं? पूर की आणखी काही? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

गेले नाहीयेत. घालवण्यात आले आहेत. MI Tank चा प्रकल्प आहे. बांधाचं काम चालू आहे. लवकरच ही जागा पाण्याने भरून जाईल. प्रचंड मोठा परीसर आहे या तलावाचा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by प्राजु

याच्या कैक पटीने तिलारी डॅमच्या साठी झालेलं विस्थापन होतं. ५ गावं पूर्ण उठली. बर तिलारी डॅम झाला महाराष्ट्रात, विस्थापित झाले महाराष्ट्राचे नागरीक आणि पाणी बरचसं मिळालं गोवा राज्याला. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

त्या विस्थापित केल्या गेलेल्या लोकांना भरपाई तरी मिळाली असावी अशी प्रार्थना (कारण ती ही खात्री नाहीच!) :( प्रगती व्हावी हे खरं पण ती सदैव कुणाचा तरी इस्कोट करूनच व्हायला पाहिजे का? :(

In reply to by पिवळा डांबिस

ह्म्म तपशील माहीत नाहीत पण कधीच कुठेच पुनर्वसन झालेल्यांना समाधानी पाह्यलं नाही. अश्याच कारणांमुळे मग 'माते नर्मदे' खोटं वाटायला लागतं. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by पिवळा डांबिस

अहो आज ४० वर्षांनंतरही कोयनेचे विस्थापित शब्दशः अजून बुडितखाती आहेत! गावं धरणाच्या पायात गेली. अख्य्ख्या महाराष्ट्राला वीज देणारं हे धरण कुशीतल्या गावाला चार दिवट्या लावायला वीज देऊ आणि शेतीला पाणी देऊ शकत नाही हा कुठला न्याव म्हनायचा? (विश्वास पाटलांचं एक पुस्तक मला वाटतं - झाडाझडती - ह्यावरंच असावं चूभूदेघे). (विस्थापित)चतुरंग

फोटो व त्याचे वर्णन पाहून उदास केलेत. पण नीधप तुम्ही ह्या गावाची एक कहाणी लिहायला हवी होती हे नक्की, १००% उदास करण्यात यशस्वी झाला आहात. :-( चला असे समजतो की ह्या गावातुन बाहेर पडणे हे त्या गावातील नवीन पिढीसाठी "बेस्ट पॉसीबल थिंग टू हॅपन" व्हावे. मनापासून सदिच्छा!

In reply to by सहज

"बेस्ट पॉसीबल थिंग टू हॅपन" ? सर्वसाधारणपणे अशा गोष्टी म्हणजे आयुष्यावरचा कायमचा चरा असतात. देअर इज नोव्हेअर एल्स टु गो बट अप फ्रॉम हिअर.

खरच फोटो बघुन उदास व्हायला होत. मध्ये कुठेतरी 'आधी पुनर्वसन आणी मग कामाला सुरुवात' असा सरकारने नवीन आदेश काढल्याचे वाचले होते. तो सर्व ठिकाणी नेहमीप्रमाणेच धाब्यावर बसवलेला दिसत आहे. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

छायाचित्र बघितल्या बघितल्याच कळलं काय असणार ते... चरकवून गेलं एकदम. मग खालचं लिहिलेलं वाचलं. भकास!!! अ पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्डस!!! फार काही लिहिलं नाहीस हेच बरं. छायाचित्राचा प्रभाव गेला असता. बिपिन कार्यकर्ते

हिरवळली तरि उदास झाडे, भकास गढी अन् अगतिक माती उडले छप्पर, खचल्या भिंती, इथे कधी का वस्ती होती? क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

प्रसन्न करणारि चित्रे टाकल्यास आनंद होइल

In reply to by मराठी_माणूस

हे वास्तव आहे. वास्तव लोकांच्यापर्यंत पोचणं महत्वाचं आहे. उजाड हा शब्द बघून खरेतर तुम्ही बघायलाच नको होता हा धागा. उजाड शब्द आनंददायी नाही हे तुम्हाला माहीत असेलच. बघून भकास, उजाड वाटावं हाच माझा उद्देश आहे. आनंद देण्याचा नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

टेमघर धरणातलं सगळं पाणी दुरुस्तीसाठी काढून टाकलंय म्हणे. त्यामुळे पाण्याखाली गेलेली गावं, किंबहुना त्यांचे अवशेष वर आलेत. त्याचे फोटोही असेच भकास आहेत.

वाईट वाटलं! स्वतंत्र भारतात, स्वकियांशीच असा झगडा करत जगायचं ....