अलक १
ट्रेकिंगच्या निमित्ताने अनवट वाटा शोधणारा बिनधास्त असा तो सरांच्या खास मर्जीतला होता. हिची ट्रेकिंग ची पहिलीच वेळ. जरुरीपेक्षा जास्त सामान घेऊन आलेली. सरांचे वटारलेले डोळे बघताच हिचे डोळे भरून आले. मग तिचं समान घ्यायला तोच पुढे आला. कधी कठीण चढावर हात धरताना, ती मागे राहिली म्हणून तिच्यासाठी थांबायला असं करत पहिल्याच ट्रेकमध्ये छान ओळख झाली.
आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरी राहायचं सोडून ही त्याच्याबरोबर ट्रेकला आलेली. पहाटे त्याने इतरांना सोडून हळूच तिला उठवलं आणि गडाच्या एका टोकावर जाऊन दोघ बसले. तिथून दिसणार दृश्य पाहून ती अगदी हरखून गेली. विरळ होत जाणार काळोख, सर्वत्र पसरलेलं धुकं, पण तरीही त्यातून डोकावणाऱ्या आजूबाजूच्या डोंगररांगा, मधूनच गावातून दिसणारे फटाक्यांचे लुकलुकणारे दिवे, आकाशातील एकमेव तरीही ठळक असा तारा. अविस्मरणीय असा अनुभव होता तो. हळूहळू प्रकाश वाढून सूर्योदय झाला आणि आपण ट्रेकला येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा तिला आनंद झाला. अभूतपूर्व अशी सकाळ ती अनुभवत होती. मनात साठवून ठेवत होती आणि साक्षीला होता तो. "माणसं सोडून कधी निसर्गाच्या जवळ जाऊन बघ, परतावंसं वाटणार नाही" हे त्याचे शब्द तिला आठवत होते आणि ती तिच्याही नकळत त्याच्याकडे ओढली गेली. आणि तो.. तो तर एकटक तिच्याचकडे बघत होता. दिवाळीचा सूर्योदय त्यांच्या आयुष्यातदेखील नवीन पहाट, एक नवीन सुरुवात घेऊन आला होता.
अलक २
दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गाडी घ्यायची असं मे महिन्यातच नक्की केलं त्यांनी. त्यानुसार पैशांची जमवाजमवदेखील करायला सुरुवात केली. मूलं तर खूप उत्साहात होती. कोणताही हट्ट न करता गाडीसाठी पैसे साठवण्यात आई-बाबांना मदत करत होती. पण अचानक महापूर आला. यांचं जरी काही नुकसान झालं नसलं, तरी इतरांकडे बघताना वाईट वाटत होतं. घरातली चौघेही जण वेगवेगळ्या ठिकाणी मदतीला जात होते. रात्री परतत होते, तेव्हा आपले अनुभव सांगत असताना त्यांना आवाज दाटून येई.
आणि दिवाळीच्या आधी गाडी बुकिंग करायला जाताना मुलांनी एक निर्णय घेतला. "आई, बाबा, गाडी पुढच्या वर्षी घेऊ. या वर्षी आपण या पैशांनी पूरग्रस्तांना मदत करू या. त्यांचीही दिवाळी आनंदाची झाली पाहिजे." मुलांच्या या निर्णयामुळे आईवडिलांना अर्थातच आनंद झाला. मुलांना प्रत्यक्ष पुरानंतर काम करण्याचा अनुभव मिळाला आणि त्यांची बदललेली दृष्टी याचा त्यांना अभिमान वाटला.
अलक ३
कोरोनाने एक वर्षभर सगळंच बंद. शाळा बंद, काम घरून चालू. अजूनही पुढचं वर्ष आलं तेही तसंच. परत शाळा नाही हे मे महिन्यात कळल्यावर त्याने मुलांसह गाव गाठलं. कधीतरी सुट्टीसाठी जाणारी सगळी गावात खूप दिवसंकरिता राहायला आली. त्याने मुलांना आपलं शेत दाखवलं. नुसतंच दाखवलं नाही, तर गडीमाणसांबरोबर त्यांना शेतात कामालादेखील लावलं. सुरुवातीला जरा कुरकुर केली मुलांनी, पण मग त्यांना त्यातली मजा कळायला लागली. भातशेती कशी करतात हे केवळ पुस्तकात वाचलेलं ज्ञान समोर कृतीत बघताना छान वाटत होतं. नांगरणी, पेरणी करताना वेगळा अनुभव मिळाला. लावणीच्या वेळी तर चिखलात मनसोक्त खेळले.
आता दिवाळी आली. शेतातला भात कापणीला तयार झाला. हे थोडं जास्त कसरतीचं काम त्यांना अवघड गेलं. पण स्वतःच्या मेहनतीवर पोरं खूश होती. या दिवाळीला नुसतेच नवीन कपडे घेऊन फटाके फोडण्यापेक्षा दारच्या गडी माणसांना फराळ आणि कपडे वाटप करून मिळणारा आनंद त्यांना जास्त समाधान देऊन गेला.
वाचने
957
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया