Skip to main content

शिवसेनेतील बंडखोरी..

लेखक योगी९०० यांनी गुरुवार, 24/09/2009 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर सदा सरवरणकरांना काँग्रेसने आपल्याकडे खेचलेच... यावेळी सत्ता मिळण्याची संधी असताना उद्धव ठाकरे यांनी आदेश बांदेकरसारख्या काल परवा सेनेत आलेल्या माणसाला माहिमचे तिकीट देऊन काय साधले? मिळणारी एक जागा आपणहून काँग्रेसला ( किंवा मनसेला) दिल्यासारखे आहे. या निम्मित्ताने एक गोष्ट विचारावी वाटते. काहीही राजकीय अनुभव नसलेल्या कलाकारांची लोकप्रियता कॅश करण्यासाठी बरेचसे पक्ष ( प्रामुख्याने भाजपा) त्यांना उमेदवारी देते. या कलाकारांचा राजकीय performance (मराठी प्रतिशब्द..?) काय असतो ? एखादा दुसरा कलावंत सोडला तर बाकीचे बहुतेक शोभेचे बाहूले म्हणूनच राहतात आणि त्या पक्षाचे सच्चे कार्यकर्ते फक्त आयूष्यभर पक्षाचे मरमर काम करत राहतात. हेच उदाहरण मोठ्या नेत्यांच्या मुलांनाही लागू होते. त्या पुनम महाजन, अमित देशमूख आणि नितेश राणे यांचे असे काय कर्तुत्व आहे? खरं सांगायचे झाले तर पुनम महाजनचे नाव प्रमोद महाजन गेल्यावरच मला कळले. त्या आधी प्रमोद महाजनांना मुलगी आहे हे सुद्धा माहीत नव्हते. स्वतः उद्धव ठाकरे ही ह्या घराणेशाहीमुळेच पुढे आलेत. (पण त्यांनी थोड्याफार प्रमाणात स्वतःचे कर्तुत्व दाखवले आहे). त्यामुळे त्यांना आदेश बांदेकरांना तिकीट देण्यास काहीच वाटले नसेल. मिलिंद वैद्य आणि सरवणकर यांच्या मधला तोडगा असे म्हणून "बांदेकर" ( काय पण ऑप्शन आहे..?), तोडफोड, हल्ले करणारांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेत वाईट संदेश जाईल, अशी खात्री पटल्यानेच सरवणकर यांना तिकीट नाकारण्यात आले. हा वर खुलासा. माझ्यामते "सर्वनाशे समुत्पने अर्धे त्यजन्ति पंडितः" या न्यायाने वैद्य किंवा सरवणकर यांच्यापैकी कोणातरी शिवसेनेने ठेवायला हवे होते. आता तर दोघेही नाराज झालेत. तसेच कालपरवा आलेल्यांना संधी मिळत आहे हे पाहून इतर शिवसैनिक सुद्धा नाराज होत आहेत. तसे सरवणकरांना काही तासात तिकिट मिळाल्याने तेथील आस लावून बसलेले काँग्रेसचे उमेदवार ही नाराजच आहेत. त्यामुळे चुरशीची लढत होणार हे नक्की. याचा फायदा मनसे घेतोय का ते कळेलच. (एक फक्त आपले दादा (कोंडके) होते, त्यांनी कोठलीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेचा प्रचार केला. बांदेकरांनी सुरुवातीला तरी निदान हे करायला पाहिजे होते. ) खादाडमाऊ

वाचने 5741
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

श्रीकांत सरमळकर पुन्हा शिवसेनेत गेले म्हणे हे येणे जाणे चालूच राहणार

आजकाल "राजकीय विचारसरणी" असे काही नाहीच. फक्त स्वत:चा स्वार्थ आणि खुर्ची म्हणूनच इकडून तिकडे उडक्या मारणे चालू आहे. जनतासुद्धा राजकीय विचारसरणी पेक्षा व्यक्तीपूजेला महत्व देते. म्हणूनच हे सारे चालू आहे व चालू रहाणार. प्रत्येकाने विचारसरणी ला म्हणजेच पक्षाला मत द्यावे व्यक्तीला देऊ नये. ह्या कोलांट्या बंद होतील.

' विनाशकाले विपरीत बुध्दी ' हेच खरे -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सध्या नक्कि कोण कोणत्या पक्षात आहे हे त्या उमेदवाराला पण माहीती नसेल . प्रचार करतना पण प्रोब्लेम आहे :) मजेदार विदुषक

In reply to by विदुषक

प्रचार करतना पण प्रोब्लेम आहे
तसे काही होत नाही आपल्या येथे. कालपरवापर्यंत जीवाच्या आकांताने हिंदूत्वाचे गोडवे गाणारा एकाएकी काँग्रेसमध्ये जाऊन त्या पक्षाच्या तथाकथित सर्वधर्मसमभावाचा प्रचार व प्रसार त्याच आवेशाने करू लागतो. पण त्याच्या समर्थकांना, त्याच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, आणि मुख्य म्हणजे त्याच्या 'फिएफडम' (मराठी प्र. श.?) मधल्या तमाम मतदारांना ह्यात काहीही खटकत नाही.

In reply to by प्रदीप

सहमत... हीच तर मला गंमत वाटते की तमाम मतदारांना काहीच खटकत नाही. ह्याचा अर्थ आपणच सगळे मतदार दोषी आहोत. खादाडमाऊ

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

शेवटी काय...सगळेच आपापला स्वार्थ बघतात...पण शिवसेनेचे हे वागणे मुळीच नाही आवडले. सरवणकर नाही तर निदान दुसर्‍या कोणा शिवसैनिकाला तरी संधी द्यायची होती... खादाडमाऊ

राज ठाकरेंचा अधिकार डावलुन उध्दवना गादी देण्याचे काही एक कारण नव्हते.परवा टीव्हीवर त्याची मुलाखत पाहिली,आपल्या पोराचे आदित्य ठाकरेचे तोंड फाटे पर्यंत त्याचे कवतिक केले आहे. वेताळ

सर्वसाधारणपणे निष्ठा ही एखाद्या पक्षाच्या विचारसरणीशी असते की एखादया व्यक्तीपुरतीच ती मर्यादित असते हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न.........एखाद्याशी तात्विक मतभेद असणे वेगळे आणि पक्षांतर करताच ज्या मुळ पक्षात उभी हयात घालवली त्याच पक्षावर व नेत्यांवर आगपाखड करणे हे कितपत उचित आहे ..? हा प्रश्न फक्त सेनेपुरताच नाही तर सगळ्याच राजकिय पक्षांना व त्याच्या तथाकथित कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडुन असे कारण देत पक्षांतर करणार्‍या प्रत्येक व्यक्ती संदर्भात लागु होतो......सरवणकर काँग्रेसमधे गेले लगेच त्यांना नारायणाच्या कृपेने माहिम मतदार संघातुन काँग्रेसची उमेदवारी देखिल मिळाली......काँग्रेसकडुन उमेदवारी मिळवताना आपल्यासारख्या उपट्सुंभाला तिकिट देताना मुळच्या एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्यावर आपल्यामुळे अन्याय झाला असेल असा विचार सरवणकरांना करावासा वाटला नाही का?आदेशला संधी देऊन सेनेने व पर्यायाने नेत्यांनी सरवणकरांवर अन्याय केला हा निकष जर सरवणकर स्वतः संदर्भात लावत आसतील तर तोच न्याय त्या अन्याय झालेल्या काँग्रेसकार्यकर्त्याच्या बाबतित देखिल लागु पडतोच ....तसेच पंताच्या घरावर हल्ला झाल्यावर हल्ला करणारे माझे समर्थक नव्हते असे स्पष्टिकरण त्यांनी त्याच दिवशी वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना दिलेले असताना ....फक्त शेजारी नारायणराव उभे आहेत म्हणुन त्यांच्याच प्रमाणे पोपट्पंची करत उद्धवने तो हल्ला करायला संगितला असे विधान करत आपल्या हलक्या मनोवृत्तीचे दर्शन घडवत मतदारांसमोर स्वतःच स्वतःला उघडे पाडण्याच फार मोठा पराक्रमच सरवणकरांनी केला म्हणायचा? "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

हल्ली निष्ठा व्यक्तीपूजक-कार्यकर्तापूजक- पक्षपूजक -सत्तापूजक अशी होता होता स्वार्थपूजक बनते! तिकिटापुढे स्वार्थापोटी भाऊबंदकी, बंडखोरी,लाथाळी ,लाचारी -सर्व मार्ग अवलंबलेले दिसतात.

पार्ल्यातुन जाताना रमेश प्रभू ह्यांच्या घराकडे नजर गेली. मनसे चा झेंडा दिसला. बाजुलाच शिरिष पारकर ह्यांना निवडून द्या चा बोर्ड्.प्रभु बहुदा बर्‍याच काळापासुन सेनेत होतें. माझ्या अंदाजानुसार ७० च्या दशकापासुन तरी होतेच. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

आम्हि मत कोणाला द्यायचे?

एक फासा आणि एक नाणे घेवून जावे हे उत्तम. फासा कुठला पक्ष ते ठरवण्यासाठी आणि नाणे बंडखोर की अधिकृत उमेदवार ते ठरवण्यासाठी. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by योगी९००

'सभा भरवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत' असे सांगणाऱ्या शिवसैनिकाची उमेदवारीच शिवसेनेने रद्द केल्याचा अजब प्रकार घडला आहे. अजिबात आश्चर्यकारक नाही. खरं म्हणजे सभेसाठी येणार्‍या प्रचारकाचा येण्याजाण्याचा खर्च आणि सभेचा खर्च उमेदवाराने सोसायचा असतो असा बहुतेक राजकीय पक्षात नियमच आहे! आता उमेदवार विदर्भातील असेल तर उद्धवराव मुंबईवरून हेलिकॉप्टरने जाणार हे नक्किच..! पण जर उमेदवाराकडेच पैसे नाहीत म्हटल्यावर ते जाऊ शकणार नाहीत आणि सभाही होणार नाही.. मग सभा रद्द करण्यापेक्षा उमेदवारच रद्द केला तर काय बिघडले असा विचार येथे झाला असावा.. :) --सुहास

In reply to by सुहास

ह्याचा अर्थ ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडणूकीला उभा राहील.... व पैसे टाकून प्रचारक.. व नंतर मते मिळवेल ! बढिंया है.... यही तो इंडिया है ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

पुर्वीचाच आहे. सध्य लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर २ कोटी रुपये खर्च येतो.निवडणूक हा जुगारच असल्याने त्यात काळा पैसा वापरला जातो. ज्याच्याकडे काळा पैसा जास्त त्याला साहजिकच प्राधान्य दिले जाते. येत्या निवडणूकीत निवडून आलेल्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे हे मुख्य कारण आहे. जे आधीच निवडून आले आहेत अश्या लोकांकडे काळा पैसा बराच असतो. निवडून आल्यावर रियल ईस्टेट,परमिट बार्स्,वेश्या व्यवसाय्,पेट्रोल पंप्स,मोठे व्यापारी अशा क्षेत्रातील लोकांना प्रथम सत्ता वापरुन वश करुन घेतले जाते. कारण काळा पैशाचे मुख्य स्त्रोत हे व्यवसाय असतात. निवडणूक आली की मग दलालांमार्फत हा पैसा काढून निवडणूकीत वापरला जातो. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न