Skip to main content

लव्ह.. आज कल!

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 06/08/2009 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
("लव्ह.. आज कल" हा इम्तियाज अलि दिग्दर्शीत चित्रपट नुकताच पाहण्यात आला. त्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार.) पुर्वीच्या काळी चित्रपटात कसे असायचे की नायिकेची 'सगाई' ठरल्याची बातमी आली तरी नायकाचा चेहरा पांढराफटक पडायचा. :S मग ही सगाई होवू नये, आणि यदाकदाचित झालीच तर 'शादी'पर्यंत जाऊ नये यासाठी सगळा आटापिटा चालायचा. नायिकेचे पालक हेच अनेकदा व्हिलन असायचे. काळ नेहमी पुढे जात असतो. त्यामुळे नंतर नंतर नायिकेची लग्नघटिका समीप येईपर्यंत नायक निर्धास्त राहू लागले. आणि मग ऐनवेळी लग्नात जाऊन नियोजीत वराला कधी प्रेमाने (कुकुहोहै) तर कधी जबरदस्तीने (दिचाहै) बाजूला करून स्वतः बोहल्यावर चढू लागले. 'लव्ह आज कल' च्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. इथे नायक-नायिका नायिकेच्या लग्नानंतर साधारण एक दोन वर्षांनी एकत्र आलेले दाखवले गेले आहेत. 'प्रेयसीचे लग्न झाले म्हणजे सर्व काही संपले' असा भारतीय प्रियकराला अनेक युगांपासून जो एक न्यूनगंड होता, तो दूर होण्यास या चित्रपटामुळे मदत झाली आहे. :X कथा थोडक्यात अशी- सदर चित्रपट म्हणजे जय (सैफ अलि खान) आणि रिया (दीपिका पदुकोण) या अल्ट्रामॉडर्न युगुलाची प्रेमकथा आहे. दोन्ही फक्त नावाने आणि शरीरामुळे भारतीय वाटतात. बाकी 'सर्व'काही आंग्लाळलेले आहे. डेटींग, प्री -मरायटल शरीरसंबंध (तेही पहिल्याच भेटीत!) वगैरे गोष्टी, आपण दात घासतो तितक्या सहजपणाने करणारी ही मंडळी इथल्या वातावरणात लोकांना डायजेस्ट होणार नाहीत, असे दिग्दर्शकाला वाटल्यामुळे कथा विदेशात घडते. जय आणि मीराला दोन वर्षाच्या कोर्टशिपनंतर अचानक आपले करीयर महत्वाचे वाटल्याने ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात. वेगळे होण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ 'ब्रेक अप पार्टी'ही देतात! इथपर्यंतची कथा काहीशी पटण्यासारखी आहे. मीरा भारतात परतते. तिला आल्याआल्या सुयोग्य वर मिळतो. जय ला तिकडे एक म्हातारा सरदारजी वीर सिंग (ऋषि कपूर) भेटतो. तो त्याला त्याच्या परीने प्रेमाची महती सांगतो. त्याच्या सांगण्यावरून जय भारतात येऊन मीराला पुन्हा भेटतो. अगदी सहज.. मित्रासारखा! तोपर्यंत सुयोग्य वर (राहुल खन्ना) मीराला मागणी घालतो. मग जय-मीराचा परत 'मानसीक' ब्रेक अप होतो. =(( मीराचे लग्न ठरते. जय येतो. लग्न लागते. जय जातो. जयला त्याचा ड्रीम प्रोजेक्ट मिळतो. आता खरं तर दोघांच्या आयुष्यात परत काही घडण्यासारखे राहिलेले नाही असे आपल्याला वाटेल. पण नाही.. इथेच तर 'लव्ह आज कल' ची गंमत आहे. मीराला हनिमूनवर गेल्यानंतर बेडवर बसल्यावर अचानक 'काही तरी चुकल्याची' जाणीव होते. आपल्यात आणि जयमधे 'काहीतरी' राहून गेले आहे असे वाटते. ती सुयोग्य वराला तसे सांगून एकटे राहण्याचा आणि आयुष्यभर जयची वाट पाहण्याचा निर्णय घेऊन टाकते. सुयोग्य वर हा खरोखरीच सुयोग्य वर असल्याचे सिद्ध करत थोडीशी कुरबूर करून राजी होतो. (किती हा समजुतदारपणा!) तिकडे जयला (पहिल्या ब्रेक अप नंतर जवळपास तीन वर्षांनी आणि मीराच्या लग्नानंतर साधारण दीड वर्षाने) आपल्या प्रेमाची जाणीव होते. नंतर काय होते, हे सांगायलाच हवे का?? आता हे सर्व पाहिल्यावर काही प्रश्न पडतात- १)'आज कल' चे लव्ह खरोखर असे असते का? २) आजकालच्या तरुणाईला 'आपण एकमेकांवरच प्रेम करतो' हे पटकन कळत का नाही? (संदर्भासाठी बघावेत- जाने तू या जाने ना आणि जब वी मेट) ३)मुला- मुलींना स्वातंत्र्य असावे म्हणजे किती असावे? ४) म्हातारा ऋषि कपूर हा तरूणपणी सैफ अली खान सारखा कसा दिसू शकतो? ५) जय- मीराच्या आईवडीलांचे अस्तित्व का जाणवत नाही? ६) आपण असे चित्रपट का पाहतो? अर्थात, कथेत एवढे सगळे दोष असून चांगल्या हाताळणीमुळे चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. कुठेही कंटाळवाणा होत नाही. संवाद, विशेषतः सैफच्या तोंडचे सुरेख जमलेत. त्याचा अभिनयही वाखाणण्याजोगा. कथा एकाच वेळी प्रेझेंट आणि फ्लॅशबॅकमधे (वीर सिंगची प्रेमकथा) चालते. हा प्रयोगही दाद देण्यासारखा.

वाचने 3553
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

छान परिक्षण! नर्मविनोदी कोपरखळ्या सही! :) >>'प्रेयसीचे लग्न झाले म्हणजे सर्व काही संपले' असा भारतीय प्रियकराला अनेक युगांपासून जो एक न्यूनगंड होता, तो दूर होण्यास या चित्रपटामुळे मदत झाली आहे =)) >>म्हातारा ऋषि कपूर हा तरूणपणी सैफ अली खान सारखा कसा दिसू शकतो? =))

>>> इथल्या वातावरणात लोकांना डायजेस्ट होणार नाहीत अश्या लोकांचे समुपदेशन केले म्हणजे सगळे व्यवस्थित डायजेस्ट होईल! हवी तर तय आयुर्वेद वाल्या तांब्यांची गाण्याची सीडी देता येईल मोफत! समुपदेशन के साथ सीडी फुकट! अवांतरः परीक्षण वाचून हा सिनेमा पाहण्यात काही अर्थ नाही असे वाटतेय!

In reply to by यशोधरा

नर्मविनोदी आणि हलकेफुलके परिक्षण आवडले. असेच अजुन येऊद्यात ... >>अवांतरः परीक्षण वाचून हा सिनेमा पाहण्यात काही अर्थ नाही असे वाटतेय! +१, सहमत आहे. पिक्चर खास थेटरात जाऊन ( आणि गोल्ड क्लासची तिकीटे काढुन ) पाहण्यात अर्थ नाही असेच म्हणतो. फुकटात डिव्हिडी अथवा डाऊनलोड मारुन पहावा .. ------ (चोर बझारी मध्ये रंगबिरंगा पानी पिणारा )छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

( आणि गोल्ड क्लासची तिकीटे काढुन ) पाहण्यात अर्थ नाही असेच म्हणतो. गोल्ड क्लासचा अजुन एक उपयोग असतो...तो विसरलात का डान भौ....झोपा काढण्यासाठी......!!!! त्यामुळे ह्यो शिणेमा....गोल्ड क्लासची तिकीटे काढुनच बघणार हे नक्की...!!! चला झोप पुर्ण करायला अजुन एक शिणेमा मिळाला..... (वाइट सिनेमे सुद्धा गोल्ड क्लासची तिकीटे काढुन झोपा काढणारी) राधा!!!

१+ इथे होत नाही. मला नाही वाटत.

लय भारी लिहीलंय रे ... काल रात्री लावला पिक्चर ... पण पहिल्या २० मिनिटात बोर झालो ...
डेटींग, प्री -मरायटल शरीरसंबंध (तेही पहिल्याच भेटीत!) वगैरे गोष्टी, आपण दात घासतो तितक्या सहजपणाने करणारी ही मंडळी
इथे एक बदल सुचवू शकतो ... असे डायरेक्ट शब्द वापरण्यापेक्षा , आपण दात घासतो तितक्या सहजपणाने चंदन घासणारी ही मंडळी हे कसं वाटतं बघा !! बाकी सैफ अलि मला तरी गे वाटतो .. :) पादिका दिपुकोण च्या अभिनयाचा आणंद म्हणजे जणू शरदिनी ताईंची कविता वाचणे , आणि सैफ चे एक्सप्रेशन्स म्हणजे कोदांचे रत्नालंकारित निबंधच जणू !! - टारझन

चित्रपट बघितला परिक्षण छान लिहिले आहे... पण चित्रपत नसता बघितला तरी चालण्या सारखे आहे.. निखिल ================================

खरच छान लिहिले आहे परी़क्षण.. मी चित्रपट बघितला नाहीये..पण आता बघायची इच्छा सुद्धा राहीली नाही...

In reply to by मिहिर

मीरा पंडित. स्वारी, लिवतांना टंग ऑफ स्लीप झाली. :SS "Great Power Comes With Great Responssibilities"

अरे काय चित्रपट परिक्षण आहे का घरचा अभ्यास आहे :) चालू द्या..

मी गेल्याच आठवड्यात हा चित्रपट पाहिला. एका शब्दात वर्णन करायचं झालं तर मला
फा ल तू
हाच शब्द आठवतो. फक्त आवडलेला एकच विनोद म्हणजे सैफ अली खानच्या तोंडी असलेलं वाक्य - "हम सब आम लोग हैं, मँगो पीपल"...