मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुंतवणूक करावी कुठे ?

रामदास · · काथ्याकूट
आषाढीच्या वारकर्‍यांचं वारं आता मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्स लागलं आहे असं मला काही दिवस वाटत आहे. ग्यानबा म्ह्टल्यावर दोन पावलं पुढे आणि तुकाराम म्हटल्यावर एक पाऊल मागे. सेन्सेक्स पंधरा हजाराच्या जवळ जाउन मागे येतो आणि पुढे जातो आहे. बाजारातले अस्सल मंदीवाले रामदेव अगरवाल आणि शंकर शर्मा यांच्या सारखी मंडळी ही नव्या तेजीची सुरुवात आहे असं म्हणायला लागले आहेत.(हा सापळा तर नाही ना ?) चार्टीस्ट मंडळी पण येत्या तीन वर्षात तीस हजाराचा इंडेक्स नक्की असं छातीठोक सांगायला लागले आहेत. अशा वेळी सामान्य गुंतवणूकदारानी काय करावे? हा चर्चा विषय मी आपल्यासमोर ठेवतो आहे . यासोबत मी माझी निरीक्षणे लिहीतोच आहे पण मिपावरच्या अनुभवी बाजारवाल्यांनी आपली मते मांडावी अशी मनिषा आहे. माझे निरीक्षण : १ मंदीचा पहीला तडाखा सहन केला असला तरी मंदी (व्यापारी मंदी / औद्योगीक मंदी ) अजून तरी संपल्या सारखी वाटत नाही आहे. २ पहील्या तीन महीन्याचे निकाल यावर प्रकाश टाकू शकतील .गुंतवणूकदारांनी तोपर्यंत थांबावे का ? ३ मान्सूनला उशीर झाला आहे हे म्हणणे फार तोकडे ठरेल अशी आताची स्थिती आहे . ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा हालचाल करीत आहे त्यावरून असे वाटते की सरकार दुष्काळ गृहीत धरून चालले आहे. ४ इराकचे युध्द एक अनिर्णीत कुस्ती आहे. त्यावरचा खर्च बंद झाल्याशिवाय अमेरीकेत शिलकी अंदाजपत्रक येणार नाही . बेकारीचा दर कमी होणार नाही.(ऐकीव बातमी) नुकताच एक लेख वाचला त्यात असे लिहीले होते की खर्च होणार्‍या अमेरीकन डॉलरचा अर्धा हिस्सा कर्जातून आलेला आहे.अशी स्थिती अमेरीकेत दुसर्‍या महायुद्धानंतर पहील्यांदाच आली आहे. भारतीय बाजापेठेवर याचा काय परीणाम होईल. यामुळे अमेरीकेत किंवा युरोपात वांशिकवाद उसळी मारेल का ? भारतीय संगणक उद्योगावर याचा काय परीणाम होईल ? ५ नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत जो खर्च झाला आहे तो सरकार कसा भरून काढणार आहे ? सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर तत्कालीक रुपये २९००० हजार कोटीचा बोजा पडलेला आहे परंतू यापेक्षा महत्वाचे असे की दरवर्षी रुपये १७००० भार वाढलेल्या वेतनामुळे पडणार आहे .त्यासाठी सरकारी कंपन्या विकणे हाच आता रोखीचा सौदा दिसतो आहे. या विक्रीत सामान्य गुंतवणूकदारानी पैसा टाकावा का ? सन्माननीय सदस्यांनी या चर्चेत भाग घेऊन आपली मते मांडावीत अशी नम्र विनंती.

वाचने 6864 वाचनखूण प्रतिक्रिया 15

सुनील 28/06/2009 - 17:32
जाणकारांनी लवकर प्रकाश टाकावा. वाट पाहात आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंता 29/06/2009 - 09:47
मंदी अजून आपला प्रभाव टिकवून आहेच. सबब गुंतवणूकदारांनी बाजाराच्या आहारी पुर्णत: जावू नये. पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर बाजाराचा रोख स्पष्ट होईलच. शिवाय आपली शेतीप्रधान अर्थव्यवस्था मॉन्सूनच्या लहरीवर अवलंबून असल्याने पाऊस कसा पडतोय यावर बहुतांश शेअरबाजाराची वाटचाल ठरावी. अल्पकालीन नफा काढून घ्यावा. त्यातही गुंतवणूक करायचीच झाली तर दीर्घकालीन करावी. नव्या आय.पी.ओ.च्या फंदात न पडणे उत्तम. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

सहज 29/06/2009 - 10:16
>सामान्य गुंतवणूकदारानी काय करावे? म्हणजे फक्त शेयरबाजारात असलेल्या किंवा शेयरबाजाराकडे बघत असलेल्या लोकांबद्दल म्हणत आहात का? त्यांनी आपापल्या अभ्यास व जबाबदारीवर त्यांना योग्य वाटते तेथे गुंतवणूक करावी. पण जर जनरल/सर्वसाधारण सर्व खर्च वळगता शिल्लक राहीलेले पैसे भविष्यासाठी कुठे गुंतवावे असे म्हणत असाल तर १) प्रत्येकाने आपापले रिस्क प्रोफाइल पहावे २) साधारण किती रक्कम कुठल्या कारणासाठी लागणार आहे (जसे उच्चशिक्षण, लग्न, घर इ इ ) ते ठरवावे ३) गुंतवणुकीचा कालावधी शक्यतो मोठा ठेवावा जसे १० ते २० वर्षे ४) पीपीएफ, पोस्टऑफीस इ नेहमीच्या सरकारी बचत योजनांचा लाभ जरुर घ्यावा ५) तुम्ही नुकतीच नोकरीस सुरवात केली असेल (तरुण वय - गुंतवणुक कालावधी १०-२० वर्षे ) तर शेयरबाजारात जरुन सहभागी व्हा. एसआयपी (SIP) मार्गाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे. ६) एक टर्म इन्शुर्न्स पॉलीसी काढावी की अकाली जाण्याने/अपघातग्रस्त होण्याने आपल्यावर अवलंबुन असलेल्यांच्या किमान ५ वर्षेच्या खर्चाची /गृहकर्ज घेतले असल्यास ते कर्ज फिटेल अशी सोय व्हावी ७) मेडीकल इन्शुरन्स असावा. टर्म व मेडीकल इन्शुरन्स शक्यतो नोकरीला लागताच काढावे हप्ता कमी व कव्हर जास्त असते. ८) घर घेताना हप्ता शक्यतो पगाराच्या २५% असावा जेणे करुन नोकरी गेल्यास, दुसरी नोकरी मिळे पर्यंत बिकट परिस्थीती होउ नये. ९) शक्यतो ८ महीन्याचा खर्च निघेल इतके पैसे फिक्स डिपॉझीट मधे असु द्यावे. १०) आवक - जावक शक्यतो पॉझीटीव्ह रक्कम असावी किमान २५% ११) लग्न शक्यतो साधेपणाने, जास्त खर्च न करता केले तर नव्या घराच्या डाउन पेमेंटची सोय होते :-) १२) थोडासा पैसा शक्यतो जोडधंदा किंवा स्वताची स्कील्स अपग्रेड करायला वापरला तर ती देखील एक उत्तम गुंतवणूक ठरेल. अजुन काही आठवल्यास लिहीन. इतर लोकांनी अजुन यादीत भर टाकावी. बाकी जास्त चिंता करु नये. ज्यांचे लग्न अजुन झाले नाही त्यांनी वधु/वर बघताना ह्या आर्थीक व्यवस्थापन या विषयावर जरुर बोलावे आपल्या भावी जोडीदाराशी. तसेच लग्नानंतर दोघांनी मिळून आर्थीक नियोजन करावे. रामदाससरांनी उपस्थीत केलेले प्रश्न त्यांनीच उत्तर द्यावे. वांशीकवाद उसळी मारेल न मारेल, अमेरिका पैसे कुठून तरी उभे करेलच. भारत सरकार पैसे कसे उभे करेल व खर्च करेल हे मात्र माहीत नाही पण बुडीत खात्यातील कंपन्या नफ्यात आणता येत नसतील तर अंग काढून घेणे उत्तम. थोडा थोडा पैसा १० ते २० वर्ष कालावधीसाठी शेयरबाजारात टाकायला हरकत नसावी अर्थात हे माझे मत.

गणा मास्तर 29/06/2009 - 12:21
रामदासशेठ उत्तम धागा. १. सहजरावांच्या सल्ल्यांशी सहमत. २. पीपीएफ चा व्याजदर चांगला आहे. ८%चक्रव्याढ व्याज. पण बर्‍याच जणांना याची काहीच माहिती नसते. कुठलीही जोखिम नसणार्‍या योजनांमध्ये सर्वोत्तम परतावा देणारी दीर्घकालीन योजना आहे. ३. शेअर मार्कॅटात गुंतवणुक करणार असाल तर कोणाच्याही टीप्सवर अवलंबुन राहु नका. स्वत:च अभ्यास करा. ४.फालतु खर्च टाळणे ही पण चांगली गुंतवणुक आहे. वर्षाला ३ वेळा मोबाईल बदलू नका. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

गणा मास्तर 29/06/2009 - 13:06
शेअरमार्केटमधल्या घडामोडींचे विश्लेषण करणारे काही ब्लॉग्ज. १.http://stock-mkts.blogspot.com/ २.http://stock-mkts.blogspot.com/ ३.http://ajayshahblog.blogspot.com/ ४.http://www.stockanalysisonline.com/ शेअरमार्कॅट्मधील गुंतवणुक मोठी जोखमीची आणि स्वतः काळजीपूर्वक विचार करुन करायची गुंतवणुक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

धमाल मुलगा 29/06/2009 - 21:07
रेलिगेअरमध्ये काम करणार्‍या एका मित्रानं बोलता बोलता सांगितलं की जे काही हातात साठून आहे ते सध्या काढून टाक. जुलैमध्ये करेक्शन येणार. त्यावेळी परत स्टॉक कव्हर करुन घे. ह्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे, बजेट जुलैमध्ये येणार म्हणुन अशी बातमी आहे की पावसामुळे की ही फक्त अफवा? अवांतरः सहजराव, उत्तम सल्ला. अतिशय आवडले मुद्दे. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

दशानन 01/07/2009 - 09:17
>>> रेलिगेअरमध्ये काम करणार्‍या एका मित्रानं बोलता बोलता सांगितलं की जे काही हातात साठून आहे ते सध्या काढून टाक. जुलैमध्ये करेक्शन येणार. त्यावेळी परत स्टॉक कव्हर करुन घे. :) बरोबर... =)) थोडेसं नवीन !