Skip to main content

म.टा.मधील वैतागवाणी शीर्षके आणि भाषा

लेखक शाल्मली यांनी शुक्रवार, 12/06/2009 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी महाराष्ट्र टाईम्स चाळत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतले-'पुलं'च्या जयंतीनिमित्त उद्या कार्यक्रम- शीर्षक वाचूनच काहीतरी खटकले. कारण १२ जून म्हणजे पुलंचा स्मृतीदिन हे मला पक्के आठवत होते. म्हणून साशंकतेनेच बातमी उघडली. तर त्यातील पहिलेच वाक्य- ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाऊंडेशनतफेर् 'पु. ल. एक आनंदयात्रा' हा कार्यक्रम... असे दिसले. 'मटा' सारख्या नावाजलेल्या आणि भरपूर वाचकसंख्या असलेल्या वृत्तपत्रात अशी मोठी चूक व्हावी हे काही पटले नाही. या निमित्ताने अजून एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे मटामधे वापरली जात असलेली भाषा. उदाहरण म्हणून ही बातमी पाहू. या बातमीत असलेले काही शब्द जसे 'असल्याचं', 'उघडं झालं', 'त्यानं' इ. -जे आपण अनौपचारिक - बोली भाषेत वापरतो ते शब्द वृत्तपत्रात- जेथे औपचारिक भाषा वापरली जाते तिथे हे शब्द खटकतात. त्याऐवजी 'असल्याचे','उघडे झाले', 'त्याने'- असे शब्द वाचायला बरे वाटतात. 'झालंय' हा असा अजून एक शब्द, जो मटामधे अनेकदा आढळतो. त्याऐवजी 'झाले आहे' असा शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतो, असे मला वाटते. वरील बातमीमधे असे अनेक शब्द आहेत की ज्याला मराठी रुळलेले प्रतिशब्द सहज उपलब्ध असताना उगाचच इंग्रजी शब्दांचा भडिमार केलेला जाणवतो. वरील बातमी उदाहरणादाखल दिली आहे. मटातील बहुतेक बातम्यांमधे पुष्कळ इंग्रजी शब्दांचा विनाकारण केलेला वापर नेहमी खटकतो. 'कॅप्टन कुल ढोणीही गरम झाला' हे वाक्य विशेष मजेदार वाटले. वृत्तपत्रांतली भाषा योग्य असणे ही त्यांची जबाबदारी नाही का? --शाल्मली.

वाचने 4612
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

अरेरे! काय ही दुर्दशा! किती लोक वाचतात हो म.टा.? (हा पम्या तर नाही ना "रिपोर्टर" इथे? ;) )

अगं शाल्मली, वृत्तपत्रांची नक्की जबाबदारी काय आहे हेच विसरले आहेत की काय अशी शंका येते. म . टा. सहसा वाचला जात नाही पण 'सकाळ' वाचताना अश्या चुका फारश्या जरी लक्षात आल्या नसल्या तरी एक चांगली बातमी देतील तर शपथ ....किंवा वाईट बातम्या वाचायची सवय झाल्याने म्हणा, सगळीकडे अंदाधुंदी माजलेली आहे असे वाटते. चांगली बातमी आली की त्यातही काही राजकारण असेल काय अशी शंका येते. जनतेला सतत घाबरलेल्या अवस्थेत ठेवायचा विडा उचललाय असं वाटतं. अगदी साध्या बातम्यांची शीर्षके आकर्षक करायच्या नादात वाचकांची दिशाभूल करतात असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. आपण (मी लिहिते ;))अनौपचारीक जसं लिहितो तसं मात्र वृत्तपत्रात येऊ नये असं वाटतं. रेवती

तुमची कळकळ योग्य आहे. अलीकडे मटा ने बोलीभाषेत लिहिण्याची स्टाईल (शैली) स्वीकारली आहे. ती फक्त ई-आव्रुतीपुरती आहे. छापील मटा पूर्वीसारखा राहिला नसला, तरी बोलीभाषेत बातम्या लिहिण्याची पद्धत तिथे आलेली नाही. ई-आव्रुत्तीचे वाचक झटकन बातमी वाचतात नि पटकन साइटही बंद करतात किंवा दुसरीकडे वळतात. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी ही शैली वापरली जात असावी. बोलीभाषेत लिहायचं म्हटलं, की झालं, केलं, होतंय' हे येणारच. तशी भाषा जास्त संवादी वाटते. बाकी, `मटा' वरील `सेक्स टॉक', `हॉट फोटो फीचर', हॉट फोटो यांकडे तुमचं लक्ष गेलेलं दिसत नाही!

In reply to by आपला अभिजित

ती फक्त ई-आव्रुतीपुरती आहे. छापील मटा पूर्वीसारखा राहिला नसला, तरी बोलीभाषेत बातम्या लिहिण्याची पद्धत तिथे आलेली नाही.
ह्म्म! छापील मटा पाहिला नाही इतक्यात.
ई-आव्रुत्तीचे वाचक झटकन बातमी वाचतात नि पटकन साइटही बंद करतात किंवा दुसरीकडे वळतात.
हो.. कारण तसाही मटा उघडला आणि एखाद-दुसरी बातमी वाचली की दिशाभूल करणारी शीर्षके आणि धेडगुजरी भाषा यामुळे आपोआपच चिडचिड होऊन ती साईट बंद केली जाते. :) सकाळ आणि लोकसत्ता वाचायला नक्कीच बरा वाटतो त्यापेक्षा! --शाल्मली.

....आणि `महाराष्ट्र टाईम्स' नाही बरं...! `महाराष्ट्र टाइम्स'!!!

वरील बातमीमधे असे अनेक शब्द आहेत की ज्याला मराठी रुळलेले प्रतिशब्द सहज उपलब्ध असताना उगाचच इंग्रजी शब्दांचा भडिमार केलेला जाणवतो. वरील बातमी उदाहरणादाखल दिली आहे. मटातील बहुतेक बातम्यांमधे पुष्कळ इंग्रजी शब्दांचा विनाकारण केलेला वापर नेहमी खटकतो. 'कॅप्टन कुल ढोणीही गरम झाला' हे वाक्य विशेष मजेदार वाटले. खरं आहे. अलिकडे मटामध्ये भारंभार विंग्रजी शब्दांचा वापर विनाकारणच केलेला आढळतो.. तात्या.

मटा मधे एवढंच खटकलं तुम्हाला? अहो ही तर मायनर गोष्ट झाली. एकुणातच मटा आता लवकरच संध्यानंद शी स्पर्धा करेल असं वाटायला लागलंय. अपवादात्मक चांगलं म्हणजे जयंत पवार लिहितात ते बाकी सगळं भयाण आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

एकुणातच मटा आता लवकरच संध्यानंद शी स्पर्धा करेल असं वाटायला लागलंय.
+१ असंच वाटायला लागले आहे. --शाल्मली.

आमच्या लहान पणी घरी यायचा तो म्.टा, त्यातील लेखनाचा दर्जा, पुरवण्या, सम्पादकीय हे सगळे एखाद्या शालिन, खानदानी स्त्री प्रमाणे होता. सध्याचा इ- म.टा, काय किम्वा छापील म. टा. काय हे दोन्ही बाजरबसवी सारखेच नखरेल. वाचायचा कधी सोडला.

खरं आहे. मटाचा दर्जा भलताच खालावला आहे. हे भरतकुमार राउत तर एकदम बकवास लिहितात. (दर रविवारी). चित्रपट परीक्षण तर भयाणच असते. (माचकर काय लिहायचे !). भरीत भर म्हणुन पहीले किंवा शेवटचे पान भरुन जाहिराति असतात. दर रविवारच्या पुरवणीत केसरी टुरचा रतिब असतो (अर्ध पान भरुन). कोण लेकाचा युरोप आणि अमेरिकेच्या ट्रीपला जातोय. त्यासाठी सामान्या वाचकाचे अर्धे पान खर्ची पडते. सोलापुरला मिळते त्या पुणे आव्रत्तीत एक एक पान भरुन मुंबईच्या समस्यांची माहीती असते. मंबईतले कोणते नाले तुंबलेत आणि कोणत्या स्टेशनावरची स्वछताग्रुह अस्वछ आहेत याचे बाकीच्यांना काय ? त्यातली त्यात प्रताप असबे बरे लिहितात. मी तरं म्हणतो मिपावरील लिखाण मटापेक्षा खुपच उजवं असतं.

खप वाढवण्यासाठी असते.वाटेल ते करुन खप वाढवणे आणि पैसा मिळवणे हे टाईम्स ग्रुपचे एकमेव ध्येय आहे.बेंगळुरुच्या टाईम्स ऑफ इंडिया मध्ये लागलेल्या एकाने सांगितले की व्यवस्थापनातले लोक ठराविक पध्धतीचे लेख छापुन आणण्यासाठी दबाव आणतात्.उ.दा. दोन आठवड्यातून एकदा सेक्स संबंधीत बातमी ३र्‍या पानावर छापून आणलीच पाहिजे.ती बातमी म्हणजे सेक्स सर्वे असु शकेल किंवा ती बातमी बार बालांच्या जीवनावर असु शकेल. गोविंद तळवलकरांसारखे व्यासंगी संपादक असताना म्.टा.तल्या बातम्या चांगल्या दर्जाच्या असत. ऐतिहासिक संदर्भ असलेले त्यांचे अग्रलेख वाचनिय असत.आयफेल टॉवर्/धावते जग वगैरे स्तंभ वाचनिय असायचे. ९४ च्या सुमारास कुमार केतकर संपादक झाल्यावर म्.टा. स्मार्ट मित्र झाला.आणि अधुन मधुन इंग्रजी शब्दांची उधळण चालु झाली.तरीही दर्जा थोडाफार टिकुन होता.केतकरांचे गांधी घराण्याचे प्रेम सोडले तर त्यांचेही लेख वाचनिय होते.!! सध्या तर दर्जा अगदीच घसरलाय.'आम्ही वाचकांना जे पाहिजे ते देतो' असे म्हट्ल्यावर वाद घालण्याचा प्रश्नच उरत नाही. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

मी मटा वाचत नाही, सकाळ, लोकसत्ता बरा वाटतो, तरी वृत्तपत्रांमधे भाषा व्यवस्थितच वापरली गेली पाहिजे आणी शक्यतो ईंग्रजी व ईतर भाषीय शब्द टाळले पाहिजेत हेच खरे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

हे हे हे आजकाल मटा आणी पिवळे पुस्तक यात विशेष फरक उरलेला नाहिये. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मटा चा दर्जा आता खालावलेला आहे, मला इ सकाळचे नवे रुपही आवडले नाही. त्यातला त्यात लोकसत्ताच सध्या बरा आहे.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

स्वातीशी सहमत. वृत्तपत्रीय भाषा व विषय समाजावरच संस्कार करत असतात. पण चालवणार्‍यांच्या दृष्टीने तो एक व्यवसाय असतो. काय करणार.

अगदी सहमत.. यालाच वैतागून गेल्यावर्षीपासून मटाशी असणारे जवळजवळ १५-१६ वर्षांचे नाते सोडून रामराम ठोकला :( ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

म.टा.मधील वैतागवाणी शीर्षके आणि भाषा अहो, भाषेचे काय घेऊन बसलाय..? कधी-कधी बातम्यासुध्दा बिनबुडाच्या असतात.. आठवा, २६ नोव्हेंबर २००८ ची मराठी बोलणार्‍या अतिरेक्यांबद्द्लची बातमी, जी फक्त म.टा. ऑनलाईन वरच होती.. (सध्या लिन्क सापडत नाही..) --सुहास

म.टा. ला बर्‍याच दिवसांपूर्वीच टाटा केले आहे. त्यामुळे उगीच होणारी चिडचिड थांबते असा स्वानुभव आहे. ;)

कलच्या म्.टा. मधिल अरविंद इनामदारांचा लेख विदारक सत्य मांडणारा आहे