नुकताच झालेला इटालीमधला भूकंप हा तेथील २००-२५० लोकांचे बळी घेऊन गेल्याचे बहुतेकांनी वाचले असेल. याआधी अनेकांना आठवतील ते भूज आणि लातूरचे भूकंप तर हजारोंचे बळी घेऊन गेले. लातूर येथील भूकंपात जवळजवळ आठ-दहा हजार लोक मृत्यू पावले, ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आणि भूज येथील भूकंपात सुमारे २०,००० लोक मृत्युमुखी पडले, ३ लाख इमारतींची हानी तसेच वित्तहानीही प्रचंड झाली असे सांगितले जाते. याखेरीज येथील पशुधनाचा (गाई/शेळ्या/मेंढ्या/कोंबड्या) मोठ्या प्रमाणावर नाश झाला आणि त्यामुळे या प्राण्यांवर ज्या लोकांचे पोटपाण्याचे उद्योग अवलंबून असतात अशा लोकांचेही अतीव नुकसान झाले असे ऐकले आहे.
चक्रिवादळे, पूर हल्लीच्या काळात बरीचशी पूर्वसूचना देऊन येतात, म्हटले तर लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी थोडा का होईना, वेळ असतो. पण भूकंपाच्या बाबतीत मात्र आपण बेसावधच पकडले जातो. वास्तविक पाहता पृथ्वीच्या पोटात चाललेल्या अनेक प्रक्रियांमुळे अनेकदा जमिनीचे स्तर हलतात. ही प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात सर्वत्र आणि सतत चालत असली तरी तिचे परिणाम दरवेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहणार्या लोकांना/प्राण्यांना जाणवतातच असे नाही. काही ठिकाणी हे परिणाम जास्त जाणवतात याचे कारण ह्या घडामोडी जमिनीच्या किती खोलवर चालू आहेत तसेच जमिनीच्या वेगवेगळ्या थरांची रचना कशी आहे इत्यादींवर हे अवलंबून असते. पृथ्वीच्या ज्या भागांत भूकंपांची शक्यता जास्त असते अशा भागांना भूकंपप्रवण "क्षेत्रे" (जागा) म्हणतात. भूकंप कशा प्रकारे जाणवतो, यावरून भूकंपाच्या वेगवेगळ्या तीव्रता ठरवल्या गेल्या आहेत.
पण भूकंपाच्या परिणामांमध्ये सर्वात मनाला बोचते ती मनुष्य/प्राणहानी. बोचण्याचे कारण असे की ही मनुष्यहानी बरेचदा नुसतीच भूकंपाच्या तीव्रतेवर (स्केलवर) अवलंबून नसते, तर अनेकदा भारतासारख्या देशातली प्राणहानी ही विशेषतः बरेचदा चुकीच्या पद्धतीने राहण्याच्या इमारती बांधल्या गेल्याने तसेच हानी टाळण्याच्या इतर मार्गांकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे होते असे वाटते. असे दिसून येते की, जेव्हा भूकंप हे विकसित देशात होतात, तेव्हा ही हानी अत्यंत कमी होते, किंवा कधीकधी होतही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इमारतींच्या रचनेचे आणि प्रकारांमधले प्रमाणीकरण, आणि इमारती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित करण्याची धडपड. आपल्याकडे दुर्दैवाने ही जाणीव विशेष दिसत नाही. तरीही माझ्या माहितीप्रमाणे काही प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः आय आय टी कानपूर आणि काही सरकारी संस्था यांनी मिळून अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. पण याबद्दल नंतर कधीतरी.
हे सर्व नुकतेच आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच झालेला इटलीतील भूकंप. आठवते त्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रात रत्नागिरी, तसेच कोयनानगर भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तेव्हाचे हे धक्के बर्यापैकी सौम्य स्वरूपाचे असल्याने विशेष हानी झाली नाही, परंतु हानीकारक तीव्र भूकंप सांगून होत नाहीत आणि अचानक आलेल्या संकटाला कसे सामोरे जायचे याची कसलीही कल्पना नसल्याने जे नुकसान व्हायचे ते होऊन जाते हे अशा भूकंपांनंतरच लक्षात येते.
ही हानी टळावी यासाठी आपण दरवेळी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहणे योग्य नाही तर भविष्यात हानी होऊ नये किंवा कमीत कमी व्हावी यासाठी जे आपल्या कक्षेत आहे ते आपण करू शकतो. अमेरिकेतील फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने (फीमा) अमेरिकेत भूकंप झाल्यास होणारी हानी कमीतकमी होईल यासाठी जनतेने जी खबरदारी घेतली पाहिजे त्यासंबंधी त्यांच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचना माहिती असल्यास लक्षात ठेवून प्रसंगावधान दाखवून आयत्या वेळी सहज पाळता येण्यासारख्या आहेत.
याचा अर्थ आपल्याकडे ही माहिती नाही असा नाही. अशाच सूचना अत्यंत चांगल्या पद्धतीने भारत सरकारनेही तयार केल्या आहेत, पण त्या सूचना लोकांपर्यंत पोचवण्याचे कितपत प्रयत्न झाले आहेत किंवा ते यशस्वी झाले आहेत ह्याची कल्पना नाही. तसेच स्थानिक पातळीवर पुणे महापालिकेच्या जिन्यावर लोकांना दिसेल अशा ठिकाणी एका फळ्यावर हीच माहिती लिहीलेली मी पाहिली आहे, परंतु तो फळा अशा उंच ठिकाणी लावला आहे की मुद्दाम थांबून ती माहिती वाचायचे कष्ट कोणी घेईल असे वाटत नाही.
यासाठी इथे अशाच एका पुस्तिकेचा (हिंदी) संदर्भ देते. पुस्तिका हिंदीतली असली तरी समजायला कठीण नाही.
http://www.ndmindia.nic.in/EQ_G_H_Dwellers_Bilingual.pdf
या वीस पानी पुस्तिकेतील इतर माहितीसोबतच नागरिकांच्या दृष्टीने मुख्य महत्त्वाचे भाग म्हणजे भूकंपाआधी, भूकंप सुरू असताना आणि भूकंपानंतर काय केले पाहिजे हे आहेत. या पुस्तिकेतील "भूकंप के दौरान क्या किया जाये?" हे पान अशा आपत्का़ळी उपयोगी यावे म्हणून विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. काही सूचना साध्या सोप्या भाषेत दिल्या आहेत. "Drop", "Cover", "Hold" ( "वाका", "लपवा" आणि "धरा"). घरातील लहान मुलांनाही अशी माहिती देऊन ठेवावी. अधिक माहिती वरील दुव्यावरील पीडीएफ फाईलमध्येच वाचायला मिळू शकते.
संदर्भ आणि अधिक माहितीसाठी -
http://www.nicee.org/Killari.php
http://www.nicee.org/Bhuj.php
http://pubs.usgs.gov/fs/1999/fs151-99/
http://www.fema.gov/hazard/earthquake/index.shtm
http://www.ndmindia.nic.in/
टीपः ही माहिती मी लेख स्वरूपात मागे एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी दिली होती, पण त्यांनी छापण्याचे कष्ट घेतले नव्हते! माझ्याकडे मराठीकरण केलेली बरीच माहिती आहे, पण देणार नाही, त्यानिमित्ताने पीडीएफ उघडून वाचण्याचे कष्ट घ्यावे लागतील असा उदात्त हेतू आहे.
वाचने
17248
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती उपयुक्त
अत्यंत उपयुक्त महिती.
चांगली
चित्राताई,
याआधी
शुभ बोल..
In reply to याआधी by विसोबा खेचर
खूपच छान माहिती
मी एका
उपयुक्त
हे वाचत असताना
चांगली माहिती
भुकंपात आमची मदत
आभार
सोप्या
In reply to आभार by चित्रा
चित्राताई,
छान माहिती
पैसा वाचवण्यासाठी पैसा खर्च करणे गरजेचे असते