Skip to main content

दुष्काळात तेरावा महिना

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 13/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच बातमी आली - म्हणे चलनवाढ, महागाई गेल्या अनेक वर्षांतील निचांकावर! सगळे काही स्वस्तच स्वस्त आणि पुढच्या वर्षी ही वाढ १% वर येणार. आधीच मालकवर्ग आम्हाला 'मंदी', घटता नफा, घटती उलाढाल, नोकरकपात वगैरेचा बागुलबुवा दाखवुन घाबरवत आहे आणि आता ही बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. हातात कोलीत मिळालेल्या माकडागत आता मालक लोक सांगणार, अरे लेको दरवाढ खल्लास, स्वस्ताई येत्त्ये; मग तुम्हाला पगारवाढ सोडाच, पगारकपात करायला हवी! महागाई घटली म्हणजे नक्की काय झाले? काय स्वस्त झाले? कटिंग, वडापाव, भाज्या, धान्य सगळे आहे तसे आहे. नाही म्हणला इंधन स्वस्त झाले पण वाहतुक दर वा भाडी छदामभरही घटली नाहीत. दरवाढ वा घट निश्चित करताना नक्की काय बघतात? सामान्य माणसाच्या क्रयव्यवहारात कोणते घटक किती प्रमाणात आहेत हे बघीतले जाते का? मोटारी/ नवी बांधकामे स्वस्त झाली, मॉल नी काही भेटी देऊ केल्या वा सूट देऊ केल्या तर त्याचा अर्थ महागाई घटली असा होतो का? सर्वसामान्य माणसाचा रुपया खर्च होतो तेव्हा त्यात अन्न, वस्त्र, वाहतुक, संपर्कसाधन,वीज, पाणी, कर, बचत,घर्खरेदी , मोटार खरेदी, चैनीच्या वस्तु वगैरे घटकांचा त्यातला हिस्सा किती असतो? रुपयातले किती पैसे जीवनावश्यक वस्तूंवर, किती सुखसोयींवर आणि किती चैनीवर / नफाजनक गुंतवणुकीवर खर्च होतात याचे काही कोष्टक आहे का? अन्न धान्य दर घटले नाहीत, भाडे घटले नाही, वीज महागत आहे, कर आहेत तसेच आहेत, मग महागाई निर्देशांक निचांकाला उतरला यात कितपत तथ्य आहे? की हे सर्व मतदारांना भुलविण्याचे उद्योग? अर्थतज्ज्ञ मिपाकरांनी समजावुन सांगितले तर मेहेरबानी होईल.

वाचने 4175
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त लेख सर्वसाक्षीजी आमचा मालक असेच म्हनतो बाबांनो पगारवाढ नाहि आता पगार कपात करतो :( ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

खरेच प्रकाश टाकून हवाय का? खराटा (रंग माझा वेगळा)

राजकार्नी काय काय कमी करतील इलेक्शन पर्यन्त बघुया त्या माकड चेस्टा

अगदी योग्य निरिक्षण.. सगळा खेळ ह्या राजकारण्यांच्याच हाती. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

खरा महागाई दर हा 10.4% आहे. फक्त भारतात महागाई दर हा WPI(Wholesale Pricing Index)ने मोजतात. WPI हा ३% च्या खाली आला आहे. परंतु खरी माहागई हि CPI(Consumer Pricing Index) ने मोजतात. आणि CPI अजूनही १०.४% आहे.

महागाइ आणि महागाइवाढीचा दर यात फरक आहे. कमी होतोय तो महागाईवाढीचा दर. मागील वर्षात तो १३ टक्क्यांवर गेला होता. आता ३ टक्क्यावर आला आहे. एक वर्षापूर्वी १०० रु ना मिळणारी वस्तू आज किती रुपयांना मिळते? तो फरक म्हणजे महागाईवाढीचा दर. म्हणजे ती ११३ रुपयांना मिळत असेल तर महागाईवाढीचा दर १३% आणि जर १०३ रुपयाना मिळत असेल तर ३%. दोन्ही केसमध्ये भाव मागील वर्षापेक्षा जास्तच आहे. दर कमी होणे म्हणजे महागाईवाढीचा दर ऋण (निगेटीव्ह) होणे. अजून तरी तो पॉझिटिव्हच आहे. तो ऋण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात एकाच वस्तूच्या किंनतीवरून हा दर काढला जात नाही. तर अनेक नित्योपयोगी वस्तूंच्या किंमतीतील बदलांचा आढावा घेऊन हा दर ठरवला जातो. प्रत्येक वस्तूला एक वेटेजही असते. (महागाईवाढीच्या दरालाच चलनवाढीचा दर असेही म्हणतात). वर 'कोहलिया'ने म्हटल्याप्रमाणे हा होलसेल प्राईस इंडेक्स वरून काढलेला असतो. किरकोळ बाजारातील किंमतीवरून हा दर काढत नाहीत कारण तो देशभर एकच असत नाही. (मुंबई पेक्षा पुण्यात आणि बीड मध्ये तो निरनिराळ्या ठिकाणी वेगळा असतो). तशा प्रकारची माहिती ही निरनिराळ्या माध्यमातून मिळते. कन्झ्यूमर प्राईस इण्डेक्स हा शहरनिहाय वेगळा प्रकाशित केला जातो. त्यातही तो औद्योगिक कामगारांसाठी व शेतकी कामगारांसाठी वेगळा असतो. अवांतरः जेव्हा ग्रोथ असते तेव्हा महागाईवाढ ही असतेच. किंबहुना महागाईवाढ आहे म्हणूनच ग्रोथ होत्ये असेही म्हणायला हरकत नाही. ग्रोथरेट ९% व महागाईवाढ २% असे कधीही (भारतात तरी) होऊ शकणार नाही. याहून अधिक माहिती मिपावरचे इकॉनोमिस्ट देऊ शकतील. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

खराटा यांनी दिलेल्या प्रकारचीच माहिती आज सह्याद्रीवरील मराठी बातम्यांत आज आलेल्या पाहुण्यांनी सांगितली. पण सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारचे ते वाटले नाही. तसेच संतुलित (की स्थिर) चलनवाढीची गरज आहेच असे त्यांचे म्हणणे होते. त्याचा उद्देश नाही कळला. ह्याबद्दलही जाणकारांनी सांगावे.

खराटा महाशय, आपण म्हणताय ते बरोबर आहे, किरकोळ बाजारातील किमतीवरुन दर ठरत नाही, तो शहरागणीक वेगळा असतो. घाऊक बाजाराचा दर विचारात घेतला जातो हेही योग्य. पण प्रश्न असा आहे की कोणत्याही बाजारात ग्राहकोपयुक्त वस्तुंचे दर १०% उतरलेले नाहीत. महागाई भत्ता हा या निर्देशांकानुसार ठरविला जात असतो तर निर्देशांक हा दैनंदिन गरजेच्या व मुख्यत्वे जीवनावश्यक वस्तुंवर आधारीत असणे आवश्यक आहे. यानिमित्ताने अनेक उत्पादनांच्या फसव्या जाहिरातींकडेही लक्ष वेधावेसे वाटते. एका नामांकित चहाच्या जहिरातीत ग्राहक स्त्री चहाच्या पुड्याची किंमत कमी झालेली पाहुन हरखुन जाते व दुकानदारही होकारार्थी मुद्र करतो. यात सत्य असे आहे की त्या चहाच्या पुड्याचे वजन २०% कमी केले आहे! म्हणजे किंमत नगाची कमी झाली १०-१५ टक्क्यांनी आणि नगाचे वजब घटवले गेले २०% नी. ही स्वस्ताई की महागाई?

मी काही महाशय वगैरे नाही. महागाईवाढीचा दर उतरला आहे. हा दर कमी झाला आहे. वस्तूचे दर नव्हे. इन्फ्लेशन रेट मध्ये जीवनावश्यक वस्तूंचाच मुख्यत्वे विचार केलेला असतो जाहिरातीत काय सांगतात त्याबद्दल न बोललेलेच बरे. अवांतरः अनेकदा पॅक्ड वस्तूंच्या किमती विशिष्ट असणे कधी कधी आवश्यक असते. जसे कुरकुर्‍याचे पाकीट ५ रुपयाला असणे आवश्यक असते. जेव्हा उत्पादकाला त्याची किंमत वाढवायची असते तेव्हा तो ती ५ रु २५ पैसे करू शकत नाही. म्हणून तो त्या पॅकचे वजन कमी करतो. तुम्ही दिलेले उदाहरण ही सरळ फसवणूक आहे. पण तेथेही उत्पादक किंमत कमी केली आहे असे कधीही म्हणत नाही. उदा: मनचाही सफेदी अब सिर्फ २ रुपयेमें अशा टाईपची जाहिरात करतो. अतिअवांतरः 'नाइन्टीन एटीफोर' नावाची जॉर्ज ऑर्वेलची कादंबरी होती. त्यात सरकार रेशनचा कोटा १५ किलो वरून १२ किलो करते. त्यानंतर काही दिवसांनी रेडिओवर बातमी दिली जाते. "सरकारने रेशनचा कोटा नुकताच १२ किलोपर्यंत वाढविला आहे". अशा अर्थाचा उल्लेख आहे. खराटा (रंग माझा वेगळा)

आधी महागाई वाढीचा दर१०% होता आणि आता तो ३% ने वाढतोय... म्हणजे त्याच्यात (-)७% फरक पडलाय....मग किंमती कमी का होत नाहीत? असा प्रश्न आहे. म्हणजे काय तर आधी १०० रुपयांवर १० रुपये वाढत होते आता ते ३ रुपयेच वाढतात. पण ग्यानबाची मेख इथेच आहे. आधी १०% ने वाढलेले १०० रुपये ११० झाले आता ते ३%ने वाढणार..हे तीन टक्के ११० रुपयांवर वाढलेत म्हणजे ३.३०रुपयांनी वाढून ११३.३० पैसे होणार. मग मला सांगा किंमत कमी कशी होईल? जेव्हा महागाईवाढीचा दर उलट दिशेने म्हणजे अधिक च्या ऐवजी वजाबाकीच्या दिशेने होईल तेव्हाच किंमती कमी होण्याची शक्यता आहे. अर्थात तशा त्या होतीलच किंबहुना उत्पादक त्या कमी करतीलच ह्याची खात्री नाही देता येत. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

जोपर्यंत आपले केंद्रीय बजेट घाट्याचे (डेफिसिट फायनान्सिंग)आहे तोपर्यंत महागाई कधीही कमी होणार नाही. आपले उत्पन्न वाढवण्याचा विचार करा.

In reply to by हेरंब

डेफिसिट फायनान्सिंग हे मागणी वाढवण्याचे एक अस्त्र आहे. अमेरिकन सरकार सध्या जे स्टिम्युलस पॅकेजेस देत आहे तशाच स्वरूपाचे हे अस्त्र आहे. यात सरकारकडे पैसा नसला तरी अधिक खर्च सरकार करते त्यामुळे काही प्रमाणात कृत्रिमरित्या मागणी वाढवली जाते. यामुळे अर्थातच दरवाढ होते. पण अर्थसंकल्प तुटीचा असो वा नसो, ग्रोथ आणि महागाई हे हातात हात घालूनच जातात. तसेच बेकारी व महागाई हे नेहमी विरुद्ध असतात. महागाई कमी झाली की बेकारी वाढते (कारण तेव्हा मंदीचा माहौल असतो म्हणूनच महागाई कमी झालेली असते). ग्रोथ उत्तम म्हणून बेकारी कमी आणि तरीही महागाई कमी असे कधीच होऊ शकत नाही. खराटा (रंग माझा वेगळा)