Skip to main content

माहिती तंत्रज्ञान (आयटी)

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 13/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, भारत हा एक प्रगतीशील देश आहे आणी होणारी प्रगती आपण सर्व पहातच आहोत. हळुहळु आपण आर्थिक सुबत्ता आणी उच्च जीवनशैली कडे वाटचाल करत आहोत. जागोजागी चालु असलेले बांधकाम, मोटारींची वाढलेली संख्या, उच्चशिक्षणाकडे लोकांचा कल, वाढलेल्या रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टी प्रगतीची साक्ष्च देत आहेत. जागतिकीकरणाच्या शर्यतीत आपण फारच वेगाने पुढे चाललो आहोत आणी याचाच एक भाग म्हणुन आपल्याकडे बाहेरच्या देशातील काम आउट्सोर्सिंग होऊ लागले आणी आयटी (माहिती व तंत्रज्ञान) सारख्या क्षेत्रामधे रोजगारांच्या खुप संधी निर्माण झाल्या. भरपूर मॅनपॉवर आणी करंसी कमी असल्यामुळे भरगोस पगार देऊन उच्चशिक्षित तरुणांना आकर्षित केले जाउ लागले आणी तरुणांनी या संधीचे सोने केले हे निश्चित. बलाढ्य पगार असल्यामुळे सगळ्या ईच्छा पुर्ण करयला तरुण/तरुणीना वाव मिळाला. कितीतरी जण आईवडिलाना परदेशी फिरवयास नेऊ शकले, पुर्ण सुखसोयी असलेल्या जीवन्शैलीकडे वाटचाल करु शकले. भारतात उत्पादन वाढले यामुळेच आणखी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. आयटीमुळे बरेच लोक आयुष्याचे सोने करु शकले. अर्थात याला अपवाद आहेतच. कमी वयात जास्त पैसे हातात पडल्याने अफाट खर्च करायची काहे तरुणांना सवय लागली. ३०-४० हजार दरमहा उत्पन्न असताना सुद्धा क्रेडिट कार्ड, लोन, इतर देणी जाउन पुन्हा महिन्याच्या १५-२० तारखेपर्यंत मित्राकडे हात पसरणारे महाभाग मी पाहिले आहेत. असो... माझ्या मनात हा प्रश्न नेहमी निर्माण होतो कि काही लोकाना आयटी बद्दल भयानक राग आहे. एखादा अतिरेकी मारला गेला कि जस मन सुखावतं तसं एखाद्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली कि काही लोक सुखावतात. जागतिक मंदी सुरु आहे, आणी परिस्थिती बिकट आहे त्याचे त्याना काही घेणे देणे नाही पण आयटी च्या लोकांच्या नोकर्‍या गेल्या आणी त्यांचे पगार कमी झाले कि ह्या लोकाना बरं वाटतं. मुंबई पुण्यात फ्लॅट च्या किमती वाढल्या, वस्तु महाग झाल्या, भाजी महाग झाली कि या सर्वाला आयटी वाले जबाबदार, हे गणित मला काही अजुन सुटले नाही. "आयटी ला एवढे पगार नसावेत. एक लाख कुठे पगार असतो का? काहीतरीच" अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात. बेंगलोर मधे रिक्शावाला सुद्धा आयटी वाला दिसला कि उरलेले पैसे द्यायचे टाळतो, ह्याला काय म्हणावे. अगदी सुशिक्षित लोकंसुद्धा "आयटी मुळे महागाई वाढली असे म्हणतात." बिचारे ईंजीनीर एकतर मर मर अभ्यास करुन चांगले गुण मिळवतात. त्यानंतर आयटी मधे प्रवेश काय खुप सोपा वाटला का लोकाना? ऍप्टीटुड टेस्ट, कॉमुनिकेशन स्किल्स, ऍनालायटिकल स्किल्स या सगळ्या कडक प्रवेशप्रक्रियांमधुन उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळते. आणी कोणतीही कंपनी फुकट बसायचा पगार देत नाही. जेवढा पगार असतो त्याच्या चारपट काम करावे लागते. त्या पगारावर त्यांचा हक्क नाही का? आणी त्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागतो आहे त्याकडे दुर्लक्ष का लोकांचे? असो हे सगळं चालायचच. हा लेख मी नॉन आयटी लोकांबद्दल लिहिलेला नाही कृपया गैरसमज करुन घेऊ नये. हा एक अनुभव आहे आणी मी माझे विचार मांडले, तुमच्या अनुभवांचे व विचारांचे स्वागत आहे. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

वाचने 5699
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आयटी मुळे महागाई वाढली असे म्हणतात ...हे माझ्यामते तरी मुळीच खरे नाही... नासकॉम वरील हा दुवा पहावा... http://www.nasscom.org/Nasscom/templates/NormalPage.aspx?id=53615 २००९ साली आय. टी. , आय टी.आय. एस., बी.पी.ओ. यात मिळून एकूण 2,236,614 लोक(च) नोकरी करत आहेत. सरासरी ५०,००० /- द. मा. जरी पगार धरला तरी हा एकूण पगार भारतीय जी.डी.पी. च्या मानने तसा कमीच. त्यामुळे याचा एकूण महागाईवरचा परिणाम तसा नगण्यच. शब्देय.

पुन्हा सुरू. मी खूप काळ साधी नोकरी करून नंतर आय टी त घुसलेला. दोन्ही जगांचा अनुभव घेतलेला आहे. चालू द्या. प्रतिसाद नंतर देईन. खराटा (रंग माझा वेगळा)

मेट्रो सिटी मध्ये मात्र शहराच्या ग्राहकसेवेच्या उलाढालीत आयटी वाल्यांचे प्रमाण मोठे आहे.
"आयटी मुळे महागाई वाढली असे म्हणतात."
विशिष्ट क्षेत्रातील महागाई वाढली. ती मागणी आणि पुरवठा यातील गुणोत्तरीत प्रमाणामुळे वाढली. पुण्यातील फ्लॅटच्या किमती वाढण्यात आयटीचा 'हातभार' मोठा आहे तो बँकेने दिलेल्या सुलभ कर्जामुळे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हे हात सैल सोडून खर्च करण्यामागील कारण असते. ते लोक ज्या गोष्टीवर खर्च करतील त्यांचा पुरवठा कमी पडला तर तिची किंमत वाढणारच, मग तो धनलाभ लॉटरीमुळे झालेला असो, जाहिरातीत किंवा सिनेमात काम करण्यामुळे खूप पैसे मिळणे असो किंवा आईवडिलांच्या तुलनेत मोठा पगार मिळणे हे असो. पूर्वी सिव्हिल इंजिनियरांची चंगळ होती, त्यापूर्वी वकीलांची असायची, आज आयटीवाल्यांची असेल. ती आता कमी होण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत. दुसर्‍याच्या यशाबद्दल असूया वाटणे हा कांही माणसांचा स्वभावच असतो. मग तो कोणीही असो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

आयटी च्या लोकांच्या नोकर्‍या गेल्या आणी त्यांचे पगार कमी झाले कि ह्या लोकाना बरं वाटतं
१००% सहमत.'ही अशी वेळ येणारच होती' असे म्हणत त्यान्च्या चेहेर्यावर आनन्द ओसन्डुन वाहत असतो.गेल्या १५ वर्षात आय्.टी. च विस्तार भारतात मोठ्या प्रमाणावर झाला.अगदि १९८५ साली सन्गणकि करणाची भाषा चालु झाल्यावर चक्क लोकसभेत पण विरोधक 'सन्गणकामुळे नोकर्या जातिल आणि भारत बुडेल' असे म्हणायचे. वाजवि भाव,अपेक्षेप्रमाणे काम आणि रुपयाची किंम्मत यामुळे झाले उलटेच्!!.फायदे दिसु लागल्यावर सरकारने पण चान्गली धोरणे अवलम्बिली. I.T.Parks/STPI,करात,जमीनीत सूट वगैरे धोरणे आखुन आय्.टी.स प्रोत्साहन दिले.कर्मचारी,आय्.टी. कम्पन्या आणी सरकार असा सर्वाना फायदा होवु लागला.इतर ठिकाणी मात्र अशि परिस्थिती नव्हती. Mech.Engineer la दरमहा ४०००रुपये तर software engineer la दरमहा १२,००० रुपये अशी तफावत सुरवातिस होती.२/३ वर्षे काम केल्यावर software engineer पगार डॉलरमध्ये मोजायचा आणि H1-B कधी मिळतो हे बघायचा.वर्षाला ६५,००० व्हिसा असलेला अमेरिकाचा H1-B म्हणजे अक्षरश: सुरवातिच्या(९४-२०००) काळात लॉटरी होती! पैसा बर्यापैकी आल्यामुळे भारतातले/अनिवासि( H1-B वाले)सन्गणक अभियन्ते ह्यान्ची भारतात खर्च करण्याची कुवत वाढ्ली. परिणामी मीडियाने पण आय्.टी.ला डोक्यावर घेतले.भारताचे भवितव्य आता आय्.टी.च आहे /आय्.टी.शिवाय गत्यन्तर नाही असा अतिप्रचार चालु झाला.'आम्ही भारतिय जन्मजात गणितात उत्तम आहोत,शुन्याचा शोध भारतात लागला म्हणुन आम्ही सर्व भारतिय सन्गणकात विद्वान आहोत' अशी मान्डणी करणारे महाभाग पण होते. पुर्वि साखर कारखान्याच्या समारम्भाना हजेरी लावणारे राजकारणी आता आय्.टी.पार्क ला हजेरी लावु लागले.ज्याना शक्य होते (बिल्डर्/राज़कारणी/हॉटेल्वाले/ब्यान्का) त्यानी ह्यात हात धुवुन घेतले.इतर क्षेत्रात मात्र चलबिचल्/थोडासा जळ्फळाट चालु झाला. ह्या लोकाना आता नोकर्या जात असल्यामुळे थोडासा आनन्द होत आहे.'आता आलात ना जमीनीवर' अशी एक भावना त्यान्च्यात आहे. महागाइला केवळ आय्.टी. जबाब्दार नाही.आय्.टी.त काळा पैसा नाही.इतर उद्योगान्मधे (हॉटेल्स्,बिल्डर्,लहान मोठी दुकाने,छोटे/मोठे व्यापारी,लघु उद्योग) प्रचन्ड काळा पैसा आहे.पैसा प्रचन्ड मिळ्वायाचा पण कर अगदी कमी भरायचा हे त्यान्चे धोरण आहे.काळ्या पैशाची ही समान्तर अर्थ्व्यवस्था गेले अनेक वर्षे चालु आहे. आय्.टी. सम्बन्धीत महागाई ४/५ शहरान्पुरति मर्यादित आहे.जागान्चे भाव्,जराशी महाग झालेली होटेल्स इथ्पर्यन्त्च त्याचे स्वरुप आहे.

मराठमोळ्या, हा मिपा करांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ;) . त्यामुळे आधी ह्या विषयावर इथे आणि इथे रग्गड चर्चा झालेली आहे.

In reply to by विंजिनेर

त्यामुळे आधी ह्या विषयावर इथे आणि इथे रग्गड चर्चा झालेली आहे. हे माहीत नव्हते. असे असेल तर चर्चा थांबवुयला हरकत नाही. पण नविन काही अनुभव आणी विचार असतील तर मांडुदेत लोकाना. विशेषतः नविन मिपाकरांना. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

अगोदर म्हटल्याप्रमाणे मी पुष्कळ वर्षे (सुमारे २०) साधी नोकरी करून आय टी मध्ये आलेला आणि आता ४-५ वर्षे आय टी क्षेत्रात असलेला माणूस. दोन्ही जगांचा पुरेसा अनुभव घेतल्यामुळे दोन्हीकडचे खाचखळगे माहीती झालेला. म्हणून माझे हे दोन पैसे. भारतात अचानक लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या देणारी दोन क्षेत्रे निर्माण झाली आहेत. एक खरोखरीचे आय टी. आणि दुसरे कॉल सेण्टर- बी पी ओ. यातील बी पी ओ क्षेत्रात फारसे शिक्षण नसलेल्याला फ्ल्यूएण्ट इंग्रजी बोलता येणे इतक्याच भांडवलावर तेवढे शिक्षण असलेल्या इतरांच्या चौपट पगार मिळतो. वर मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे 'मर मर अभ्यास' वगैरे काही लागू नसते. इतकेच काय टॅलेण्ट सुद्धा फार लागत नाही. या क्षेत्रातील जास्त पगाराचा पाया: त्या कंपनीचे ग्राहक परदेशी असतात त्या देशातील स्टॅण्डर्डच्या मानाने येथील कर्मचार्‍यांना खूप कमी डॉलर पगार मिळतो तो पगार इथल्या स्टॅण्डर्डच्या मानाने तरीसुद्धा अव्वाच्या सव्वा असतो. हा आहे म्हणजे बिहारमध्ये एखाद्या मजुराला २० रु दिवसाची मजुरी मिळते. तो मुंबईत त्याच कामाची मजुरी १०० रु असते. आता ही मजुरी रिमोटली करण्याची सोय असेल तर आपण ते काम त्याला बिहारमध्येच बसवून त्याचे त्याला ५० रु दिले तर आपले ५० रु वाचतात पण त्याला बिहारमधील स्टॅण्डर्डच्या मानाने अडीचपट पगार मिळतो. तेव्हा बिहारमधला नॉर्मल मजूर भाजी घेताना ५ रुपये द्यायला का-कू करत असेल तर आपला रिमोट काम करणारा मजूर त्याच भाजीला ७ रु मागितले तरी सहज काही न बोलता देऊन टाकेल. आपले कॉलसेण्टरवाले हे असले रिमोट काम करणारे मजूरच आहेत. वर काही आकडेवारी देऊन अशाने महागाई वाढत नाही असा दावा केला आहे. ओवरऑल बिहारमधील महागाई त्याने वाढत नाही हे तर खरेच. पण अशा रिमोट काम करणार्‍यांची संख्या काही थोड्या पॉकेट्समध्ये लक्षणीय असेल तर त्या पॉकेट्समध्ये हा भाववाढीचा परिणाम प्रकर्षाने दिसेल. तिथल्या सामान्य लोकांचे 'यांच्या'मुळे भाव वाढले हे मत रास्तच असेल. आज आय टी क्षेत्र मुख्यत्वे पुणे, हैदराबाद, बेंगालुरु, गुरगाव या शहरांत एकवटलेले आहे त्या विशिष्ट भागात हा परिणाम जाणवतोच आहे. आता आपण खर्‍या आय टी कडे वळू. आय टी बद्दल असूया असलीच तर ती नॉन आय टी इंजिनिअर्सना वाटत असेल आणि ती वाटणे स्वाभाविकच आहे. कारण फक्त कॉम्प्युटर्/सॉफ्टवेअर इंजिनिअरच फक्त मर मर अभ्यास करतात असे काही नाही. ऍप्टीट्यूड टेस्ट, ऍनालिटिकल ऍबिलिटी वगैरे टेस्ट साधारण चांगल्या अशा कोणत्याही नॉन आय टी कंपनीतही घेतल्या जातातच. आय टी मध्येही या टेस्ट प्रत्येक वेळी घेतल्या जातातच असे नाही. या टेस्ट पहिल्या नोकरीच्या वेळीच जनरली घेतल्या जातात. (आय टी क्षेत्रातल्या नोकर्‍या मुख्यत्वे नेटवर्कच्या माध्यमातून मिळतात) आय टी मधील जास्त पगाराची कारणे आणि कॉलसेण्टरमधील जास्त पगाराची कारणे ही साधारण सारखीच आहेत त्यात आवश्यक कौशल्ये असलेल्या मनुष्यबळाची मागणीच्या मानाने कमतरता हे आणखी एक कारण आहे (अडला हरी गाढवाचे...). बाकी दिलेल्या पगाराच्या चारपट काम (मिपा खेळायला वेळ कसा मिळतो?) हे सर्वच क्षेत्रात असते. आजच्या घडीला डेडलाईन्स नसणे, त्या पाळण्याचे बंधन नसणे आज करणे आवश्यक असलेले काम उद्या केलेले चालणे वगैरे सरकारी नोकरी सोडून इतर कोणत्याही नोकरीत चालत नाही. लेखात लिहिल्याप्रमाणे आय टी वाल्याच्या नोकर्‍या जाण्याचा आनंद कोणाला होत असेल असे वाटत नाही कारण आजघडीला सर्वच क्षेत्रातल्या नोकर्‍या धोक्यात आहेत. (अवांतरः आय टी क्षेत्रात न येणार्‍याला 'आपण संधी घालवली तर नाही?' अशी एक सुप्त टोचणी असते. आय टी वाल्याची नोकरी गेल्यावर त्याला आपण या भानगडीत पडलो नाही तेच बरे असे वाटून कदाचित आनंद वाटत असेल) आय टी क्षेत्रात काळा पैसा नाही हे जरा धाडसी विधान आहे. पूर्वीच्या चर्चांमधूनही आय टी वाल्यांच्या लिखाणात एक श्रेष्ठत्वाचा टोन होताच. इथेही 'देशाची प्रगती' 'पगारावर हक्क' यातून तो दिसतोच आहे. आय टी ची नोकरी आरामाची असे कुणाला वाटत असेल तर ते मात्र पूर्ण खरे नाही. (मजुराचे मालकांकडून होणारे शोषण तसेच आहे. पगाराच्या चारपट काम असे म्हटलेच आहे. फक्त मजूर ते त्या जास्त पगाराच्या गाजरामुळे ते निमूट सहन करतात). असो. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

अतिशय सुंदर विवेचन. तेही सोप्या भाषेत.
पूर्वीच्या चर्चांमधूनही आय टी वाल्यांच्या लिखाणात एक श्रेष्ठत्वाचा टोन होताच.
हेच वाक्य "पूर्वीच्या चर्चांमधूनही आय टी वाल्यांच्या लिखाणात एक माज होताच." असे म्हटले असते तर आय टी विरुद्ध नॉन आयटी असा रंग आला असता. म्हणुनच प्रतिसाद संतुलित वाटला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by नितिन थत्ते

संतुलीत प्रतिसाद. फक्त माझे दोन पैसे टाकतो. आयटीचा पगार जास्त असल्याने सगळे टॅलेन्ट तिकडे आकर्षित होउ लागले. त्यामुळे आयटी सोडुन इतर अभियांत्रिकी कंपन्यांनी टॅलेन्ट आकर्षुन घेण्यासाठी जास्त पगार द्यायला सुरुवात केली. उदा. टाटा मोटर्स मध्ये पुर्वी(१९९५ च्या आसपास) अभियांत्रिकीच्या नवीन (फ्रेशर) उमेदवारांना १६,००० मासिक पगार होता, २००६ मध्ये तो ३५,००० झाला. हा इतर क्षेत्रांमध्ये झालेला सकारात्मक बदल होता. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by गणा मास्तर

उदा. टाटा मोटर्स मध्ये पुर्वी(१९९५ च्या आसपास) अभियांत्रिकीच्या नवीन (फ्रेशर) उमेदवारांना १६,००० मासिक पगार होता, २००६ मध्ये तो ३५,००० झाला.
हम्म् ... टाटा मोटर्सच्या इंजिनीयर्सना मिळणारा "सीटीसी" आणि प्रत्येक्षात हातात मिळणारा "पैसा" ह्यात प्रचंड तफावत आहे ... आपल्याला आकडा जरी प्रत्येक्षात ३५००० वगैरे दिसत असला तरी हातात साधारणता २००००-२२००० मिळतात ... त्यामुळे "हातातला पैसा" हा रुपयाच्या क्रयशक्तीच्या तुलनेत तितकासा वाढलेला नाही ... टाटाचे इंजिनीयर्स अजुनही आजच्या काळात "गरिब" कॅटॅगिरीत मोजले तरी हरकत नाही ... बाकीच्या आयटी / बिपीओ मध्ये पगारात एवढी तफावत नसते ... त्यामुळे त्यांचा सीटीसी जर टाटाच्या इंजिनीयर एवढा असला तर प्रत्येक्षात हातात जास्त पैसा येतो व खर्च करण्याची शक्ती थोडी जास्तच असते. असो. हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही पण विषय निघाला म्हणुन लिहले ... >> हा इतर क्षेत्रांमध्ये झालेला सकारात्मक बदल होता. ह्याच्याशी सहमत ...!!! ------ (विश्लेषक ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by नितिन थत्ते

अतिशय उत्तम आणि चपखल विवेचन. बिहारी मजूराचे उदाहरण अगदी योग्य दिले आहे. आव्हानं सर्वच क्षेत्रात कमीजास्त प्रमाणात सारखीच असतात. आयटी क्षेत्रात मात्र मोबदल्याचा मूळ स्त्रोत बहुतांशी बाहेरून येत असल्यामुळे विनिमय दराचा फायदा झाला आणि पगार मोठमोठे मिळायला लागले. पण कोलॅटरल डॅमेज सारखे कोलॅटरल इम्पॅक्ट असा की बाकीच्या क्षेत्रातही बर्‍यापैकी पगार वाढले. बिपिन कार्यकर्ते

जिकडे ही लोक आहेत, तिकडे सगळ्या बार मध्ये दारू महाग झाली आहे..
चान्गले आहे. दारु तशी वाईटच.