आमच्याकडे घरात एक वाक् प्रचार मोठ्या गमतीदार रीतीने रूढ झाला होता - मिठाचे काय आहे!
त्याचे असे झाले, की एक दिवस वडील दौर्यावरून रात्री उशीरा परतले. त्याना आम्ही मुले काका म्हणत असू. जेवायला रात्री खूप उशीर झाला. साधाच बेत जेवायला - मुगाची खिचडी आणि कढी!
पहिला घास काकानी घेतला, आणि चेहर्यावरची घडीही न बदलता आईला म्हणाले, "जरा मिठाचे पाहू!"
आईला काय प्रकार झाला आहे ते लगेच लक्षात आले, नि ती म्हणाली,
"अय्या, मीठ घालायचेच राहिले!"
काका म्हणाले, "असू दे, वरून घेऊ, तसे काहीच बिघडले नाही; घाईघाईत होते असे कधीकधी!"
पण लक्षात असे आले, की वरून घेतले, तरी 'ती' मजा काही खिचडीला येईना! कढी असूनही!
आणि मग जेवणभर, एक मजेशीर विषय गप्पाना मिळाला. काकानीच सुरुवात केली, "बरं का शशिधर, मिठाचे काय आहे, की कमी पडले, तर अगदी मजा जाते. काही पदार्थात ते वरून घेतले की पुरते, पण काही पदार्थ मात्र काही केल्या सुधारत नाहीत. तेव्हा योग्य प्रमाणात मीठ पडणे फारच आवश्यक!
मग आईची पाळी! ती म्हणाली, "हो पण गम्मत म्हणजे, जास्त झाले, तरी मिठामुळे पदार्थ पार बिघडतो. "आणि मग," लगेच मोठा भाऊ उद्गारला "त्यात पाणी घालावे लागते - आमटी, पिठले वगैरे असले तर!"
"हो, पण खिचडीत पाणी कसे घालणार?" मी भावाला रास्त सवाल केला, पण त्याची नजर पाहून माझ्या पोटात गोळा उठला! ते काकाना बरोबर लक्षात आले. त्यानी माझी बाजू घेत म्हटले, "ते खरे आहे, पण खिचडीत मीठ जास्त झाले, तर त्याला काही तोंडी लावणे घेता येऊ शकते. सर्व पदार्थांत पाणी घालू शकत नाहीच आपण!"
आणि असे करत करत चर्चा जी रंगली त्याला काही तोडच नाही! जेवण होऊन हात वाळल्यावर खिचडीत आज मीठ कमी झाले की जास्त याचाही आम्हाला विसर पडला होता, आणि फार मौलिक चर्चा केल्याचे समाधान गाठीशी आले होते!
एकूण ठरले असे, की सर्वसाधारणपणे, मीठ कमी पडले, तर वरून घेता येते. मीठ जास्त झाले तर अडचण जास्त होते. सर्वच पदर्थांत मात्र वरून मीठ घेऊन खरी मजा येत नाही. ओल्या पदार्थांत मीठ कमी पडले, अगदी किंवा विसरले तरी कमी अडचण होते. कोरड्या पदार्थांत मात्र कठीण प्रसंग असतो. कारण मीठ आता नीट मिसळत नाही. काही कोरड्या पदर्थांत, थोडे मिठाचे पाणी करून चांगले ढवळले, तर जुजबी सुधारणा होऊ शकते. पण काही कोरड्या पदार्थांत हे जमत नाही, कारण मग त्या पदर्थाचा पार लगदा होतो, आणि मूळ पदार्थाचे अस्तित्वच धोक्यात येते.
आमटी वगैरे केवळ ओल्या पदार्थात मीठ कमी जास्त झाले, तर कधी साखर वगैरे घालून, पाणी घालून, दाण्याचे कूट आदी घालून जणू काही काहीच बिघडले नव्हते इतपत सुधारणा होऊ शकते. पण एक मात्र खरे की मीठ जर फारच जास्त - दुप्पट चौपट - झाले तर मात्र सरळ फ्रिज मधे ठेवून पुन्हा केव्हातरी तसलाच पदार्थ मिठाशिवाय बनवून, त्यात आधीचा घालणे याला पर्याय नसतो.
विशेषतः जर पै पाहुणा जेवायला असेल, तर मग तर आपली होणारी धांदल फारच रमणीय असते! त्यात जर कोणी दुर्वास मुनी जेवायला पानावर बसला असेल, तर द्रौपदीचा धावा करणे हेच इष्ट! तिथे श्रीकृष्णाचेही काही काम नाही! तिच्याकडून निदान तिची थाळीतरी मिळू शकेल, तशीच आपली योग्यता असेल तर! पहा प्रयत्न करून!
आणखी एक मौज म्हणजे, मिठाचे सर्वसाधारणपणे योग्य असे काही प्रमाण असते हे जरी खरे, तरी काही लोकाना फार मीठ लागते. तर काहीना फार कमी मीठ पुरते.
गोनीदांच्या भ्रमणगाथेमधे त्यानी म्हटले आहे, की नर्मदा परिक्रमेच्या वेळी त्यानी मीठ तिखट तेल आदी सर्व वर्ज्य केले. मिळणारी माधुकरी नर्मदेवर जाऊन पाण्यात धुवून घेऊन मग सेवन करीत. असे जे जे कोणी योगी वगैरे असतील त्यांची गोष्ट सोडा, पण आपले बुवा मिठावाचून - योग्य प्रमाणात मिठावाचून - अडते हे नक्की.
तर मंडळी, मिठाचे काय आहे, .....! की हे कधीही न संपणारे आख्यान आहे. आणि त्याची मजाही काही और आहे.
तुमचे मिठाबाबत काही अनुभव आहेत का? सुखदु:खदायक? अंतर्मुख / बहिर्मुख / सुमुख / दुर्मुख बनवणारे किंवा इतर कोणाचे असे मुख झालेले पाहावे लागणारे - अयोग्य मिठाच्या प्रमाणामुळे? किंवा मुद्दाम खोडी म्हणून काही कोणावर प्रयोग केलेल्याचे? किंवा कसलेही? या तत्वज्ञानात भर घालणारे?
हे सर्व लिहून झाल्यावर मला वाटू लागले आहे, की हे पाकृ मधे लिहिले असते तर अधिक योग्य झाले असते की काय?
वाचने
5435
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक गोष्ट..
कमी प्रमाण
मीठ..
मिठाचे काय आहे
मस्त
माझी
In reply to मस्त by सुनील
केळकर
केळकर
In reply to केळकर by बिपिन कार्यकर्ते
मीठ ? ... हा तर विवेक!
मस्त जमलाय
मिठा बद्दल
टाटा नमक
In reply to मिठा बद्दल by अविनाशकुलकर्णी
अरे काय
मीठ..
उत्तम.. या
In reply to मीठ.. by प्रभाकर पेठकर
अरे!